महाराजांचा जन्मदिवस

 

आज आमचे असिम श्रद्धास्थान सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराज यांचा जन्मदिवस ! आम्हा सकलमत सांप्रदायिना अतिशय आनंददायी आणि श्रध्दापुर्ण दिवस !
अध्यात्मिक ग्रथांचा सखोल अभ्यास आणि अतिशय सोप्या भाषेत , व्यवहारातील दाखले देत त्याच विवेचन करून समजावण्याची कला , भगवदगीतेवरची ओघवती भाषेतील निरूपणं म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच !
हिंदी , मराठी , इंग्रजी , कानडी , तेलगु एवढच नव्हे तर उर्दु आणि संस्कृत भाषेवरिल प्रभुत्व , केवळ विस्मयजनक ! माणिकनगरची धार्मिक , शैक्षणिक , क्रीडा , सामाजिक इ . क्षेत्रांतिल त्यानी घडवुन आणलेली प्रगति केवळ अलौकीक !
असे दैवी व्यक्तीमत्व आम्हा सांप्रदायिना गुरूस्थानी लाभावे , हि साक्षात प्रभुकृपाच !
आज श्रीजींच्या जन्मदिनी , त्यांच्या चरणी शतकोटी प्रणाम करताना प्रार्थना करतो कि
प्रभुभक्तिचा आमच्या तिनहि पिढयांतिल वारसा पिढयान्पिढ्या वृद्धींगत होत राहो आणि प्रभुकृपेचा वरद्हस्त अखंड , अविरत लाभत राहो .

श्रीप्रभु आज्ञेत राहणे

खोडकर मुलगा
प्रभुंच्या लहानपणी एक लहान मुलगा एका गाभण म्हशीला फारच त्रास देत होता. मुक्या जनावरांनाही त्रास होतो, म्हणून त्या म्हशीला त्रास न देण्यासंबंधी प्रभुंनी त्या खोडकर मुलास वारंवार समजावले. शेवटी “आता म्हशीच्या अंगास हात लावून तर पहा… म्हणजे…” असे प्रभु बोलले. प्रभुंच्या बोलण्यातील मेख न कळल्याने, “काय होते पाहू…” असे म्हणून त्या मुलाने दोन्ही हात म्हशीच्या पाठीवर ठेवले. प्रभु हसतच म्हणाले, अरे, ती म्हैस फार वाईट आहे, तुझे हात धरून बसेल! पहा रे बुवा आपला विचार!” प्रभुंच्या तोंडूने हे शब्द निघताच, त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या पाठीला चिकटून बसले. त्याला ते मोकळे करता येईनात. म्हैस उधळली, मुलगा म्हशीला लोंबकळू लागला. सर्व मुलांना मोठी गंमत झाली. म्हैस पळते आहे, मुलगा लोंबकळत चालला आहे. मुलगा रडू लागला. “मेलो, मेलो, पुन्हा कधी असे करणार नाही”, असे म्हणू लागला. प्रभुंना त्याची ती केविलवाणी अवस्था पाहावेना. प्रभुंनी ताडकन उठून, पळत जाऊन त्या म्हशीला थांबविले. तिच्या पाठीवर हात फिरवून, “बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही. एकवार त्याला क्षमा कर. सोड त्याला”, असे म्हणताच, मुलाचे हात सुटले. सर्व मुलांना मौजच मौज झाली पण, त्या मुलाला मात्र खाशी अद्दल घडली.

अमृतकुंडावरील घटना
चितापूरच्या विठ्ठलराव पेशकरांचे वडील हे प्रभुंचे बालमित्र. मामांनी रागे भरल्यावर, प्रभुंनी कल्याणमधील मामांचे घर सोडले आणि श्रीप्रभु पेशकर व त्यांच्या आणखीन एका समवयस्काबरोबर मंठाळच्या अरण्यात शिरले. त्यावेळी त्या दोघांनी प्रभुंना तसे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. अरण्याची दोघांना भीती वाटत आहे असे पाहून, प्रभुंनी, “भिऊ नका, माझ्या मागोमाग या, तुमचे भाग्य उदयाला येईल”, असे सांगितल्यावर, ते दोघेही प्रभुंच्या मागे गुहेत शिरले. थोड्यावेळाने त्यांना एक शिळा दिसली व तिघांनी ती बाजूला करताच सर्वजण आतील गुहेत शिरले. त्या गुहेतील जागा अत्यंत स्वच्छ असून त्यात एक आगटी दिसली. जवळ एक चिमटा पडला होता आणि आगटीतील राख रसरशीत होती. थोडेसे पुढे जाताच, पहिल्यापेक्षा मोठी अशी आणखी एक काळी शिळा दृष्टीला पडली. ती दूर करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी करून पाहिला. शेवटी प्रभु हसून म्हणाले, “आता पुरे करा, फक्त माझ्या धोतराचा पदर घट्ट धरून उभे रहा, भिऊ नका”, असे म्हणून प्रभुंनी एक जोराचा हिसडा देताच ती प्रचंड शिळा उलथून पडली. पण आतील गुहेतून एक भयंकर गर्जना ऐकू आली. ती एखाद्या प्रचंड वाघाची असावी, असा त्या दोघांचा भास होऊन ते घाबरून गेले व प्रभुंच्या धोतराचा धरलेला पदर सोडून, मागच्या पावली पळत सुटले. पळता पळता काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला व त्याबरोबर वाघाची गर्जनाही झाली. त्यांनी असे अनुमान केले की, प्रभुंवर त्या वाघाने झडप घालून त्यांना खाऊन टाकले असावे. भीतीने गर्भगळीत होऊन ते धावत सुटले व थोड्याच अवधीत त्यांनी कल्याण गाठले. ह्या प्रकाराबद्दल कोणाजवळ ब्र काढण्याचीसुद्धा त्यांची हिम्मत झाली नाही. त्यानंतर दोन एक महिन्यांनी कल्याणची बरीच मंडळी अमृतकुंडावर निघालेली पाहून, ते दोघेही बरोबर दशम्या घेऊन निघाले. डोंगर चढून अमृतकुंडाजवळ येत असताना, त्यांना प्रभुंचे स्मरण होऊन, पूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल ते एकमेकांबरोबर बोलत होते, इतक्यात प्रभुंची स्वारी त्यांच्यासमोर दृष्टीस पडली. वाघाच्या गुहेतून प्रभु जीवंत बाहेर आल्याचे पाहून त्यांना नवल वाटले आणि प्रभुंचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी व प्रफुल्लित असलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले. “हे असे कसे झाले?” असा प्रश्न त्यांनी प्रभुंना केला. त्यावर प्रभु म्हणाले, “तुम्ही न घाबरता माझ्यामागे आला असता तर, त्याचे मर्म समजले असते. आता काय उपयोग?”

प्रसादाची हकीकत
अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही.

व्यंकम्मावर कृपा
मैलारास असताना प्रभुंनी व्यंकम्माला पुराच्या पाण्यातून जीवदान दिले होते. त्यानंतर तिला प्रभुंचा प्रसाद मिळाला आणि तिने प्रभुंकडेच राहण्याचा हट्ट धरला. आपले सर्व दागदागिने तिने प्रभुंना देऊन टाकले. प्रभुंनी व्यंकम्माचे अंतःकरण जाणले होते. निस्सिम आणि शुद्ध प्रेमाने ती ओथंबून गेली होती. ती जरी तरुण होती तरी, वैषयिक स्वार्थी प्रेमाचा तिच्याठायी पूर्ण अभाव होता, हे प्रभुंनी पक्के ओळखले होते. प्रभुंनी प्रसन्न अंतःकरणाने तिच्याकडे दृष्टीक्षेप करून, आपल्या मातोश्री बयाम्मामातेजवळ तिला घेऊन जाण्यास एका शिष्यास सांगितले. तिचे प्रभुंवरील उत्कट प्रेम व भक्ती पाहून प्रभुंच्या मातेसही आनंद झाला व मातोश्रींनी तिला आपल्या कन्येप्रमाणे जवळ बाळगिले. प्रभुंनी व्यंकम्माची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. तिला कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले, तरी ती डगमगली नाही. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला हे पाहून, सर्वांना तिची करूणा आली. पण प्रभुआज्ञा उल्लंघण्याचे व्यंकम्माने कधी मनातदेखील आणले नाही. एके समयी, स्त्री स्वभावला अनुसरून विवस्त्र होऊन, व्यंकमा स्नान करीत होती, अशा प्रसंगी प्रभूंकडून निरोप आला, “असशील तशी निघून ये” हा निरोप कानावर पडताच, देहभान विसरून जाऊन, तशाच स्थितीत व्यंकमा प्रभुंकडे यावयास निघाली. सर्व लोक विस्मित झाले. मातोश्रींना हे वर्तमान कळल्याबरोबर, त्याही मागोमाग निघाल्या आणि त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. प्रभुने अशी भलतीच आज्ञा कशी केली, म्हणून त्यांना विचारण्याचा बयाम्मामातेचा हेतू होता. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. ते एकदा नाहीसे झाल्यावर, स्त्रीत्व कसे राहणार? असो, तशाच स्थितीतही व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून, प्रभुपुढे येऊन उभी राहावयास तयार झाली हे समजल्यावर, तिची ती अनुपम भक्ती पाहून, तो प्रेमाचा निधी उचंबळू लागला. अनिवार प्रसन्न अंतःकरणाने डोलू लागला. व्यंकम्मा जवळ येण्याची वाट देखील न पाहता, प्रभुंनी चटकन आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून, तिच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रीकडे पाठविले. त्यावेळी खरोखर व्यंकम्माचा उद्धार झाला. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा होय. जीवनभर प्रभुआज्ञेत, प्रभुसाधनेत राहून ती शेवटी श्री देवीपदास पोहोचली.

वरील चारही कथा पाहिल्या तर आपल्याला “श्रीगुरु आज्ञा” हा समान धागा आढळतो. खोडकर मुलगा, पेशकर, किंवा अक्कलकोटच्या राजाचा कारभारी यांनी प्रभुआज्ञा पाळली नाही आणि पर्यायाने त्यांनी त्याचे परिणाम भोगले किंवा आपल्या भाग्योदयाची चालून आलेली संधी दडवली. ह्या उलट, व्यंकम्माने प्रभुंच्या मुखकमलातून निघालेला शब्द खाली पडू न देता, तो प्रमाण मानला आणि आपला पारमार्थिक उत्कर्ष साधून घेतला. वरील कथांच्या माध्यमातून श्री गुरुआज्ञेचे महत्त्व आपल्या सहज ध्यानात येते. कारण, आपले नेमके हित कशात आहे, याची पूर्ण जाणिव आपल्या गुरूला असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुरुआज्ञेत राहणे, हे सदासर्वथा हितकर असते. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्री सद्गुरू माणिक प्रभु महाराजांचा जयजयकार असो.

झोळीपूजा आणि अन्नपूजा

झोळीपूजा आणि अन्नपूजा – माणिकनगर येथील एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

माणिकनगर येथील वास्तव्यामध्ये झोळीपूजा आणि अन्नपूजा या दोन विशेष पूजांनी माझे मन अनेकदा वेधून घेतले. इतर दत्तक्षेत्रांमध्ये ही परंपरा सहसा आढळून येत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ह्या नितांतसुंदर अशा परंपरेचा मागोवा घेतला असता, अनेक भक्तमंडळी झोळीपूजा आणि अन्नपूजा करतात असे कळाले. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता म्हणून मुख्यत्वे होत असलेल्या ह्या दोन पूजेंची माहिती इतरांसही मिळावी, आणि त्यांनीही प्रभुची कृपा संपादन करण्याची संधी मिळावी, म्हणून हा अल्पसा लेखन प्रपंच.

श्रीप्रभुंनी लहानपणी मामाचे घर सोडल्यावर, मंठाळच्या अरण्यात अमृतकुंडावर एकांतात साधना केली आणि प्रत्यक्ष श्रीदत्तात्रयांनी तेथे प्रभुंना झोळी आणि सटक्याचा प्रसाद दिला, हे सर्वश्रुतच आहे. त्यानंतरही ह्या झोळीचा आणि पर्यायाने श्री अन्नपूर्णा मातेचाच अखंड वरदहस्त श्री प्रभुसंस्थानावर आहे, ज्याच्या प्रसादस्वरूप श्री संस्थानामध्ये आजतागायत अन्नधान्याची आणि प्रसादाची कधीही कमतरता जाणवली नाही. श्रीमाणिक प्रभुंनीही आपल्या अवतार काळामध्ये, सदैव भिक्षान्न स्वीकारले. पंचपक्वान्नाचे जेवण असले तरी प्रभु झोळीमधील भिक्षा किंवा माधुकरीच घेत. श्री माणिक चरितामृतामध्येही चोवीसाव्या अध्यायात भिक्षेचे महत्त्व विस्ताराने वर्णिले आहे. त्यामुळे सकलमत संप्रदायांमध्ये आणि समस्त प्रभुभक्तांमध्ये भिक्षेच्या झोळीचे विशेष महत्त्व आहे. झोळीची ही परंपरा श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आहे.

श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीनंतर श्री मनोहर माणिकप्रभुंच्या काळात झोळीपूजेची परंपरा सुरू केली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. देह रूपाने श्रीप्रभु जरी समाधीस्थ झाले, तरी चैतन्य स्वरूपाने ते आपल्यातच आहेत, आणि त्यांच्या नैवैद्याकरिता अखंड सुरू असलेले नित्यभिक्षेचे विधान, हे श्रीमाणिक प्रभु संस्थानाच्या आस्था आणि विश्वासाचे परमविशेष आहे. भिक्षेसाठी आजही झोळी माणिकनगरमध्ये पाच घरी फिरते आणि प्रभुंच्या नैवेद्यासाठी भिक्षा आणली जाते.‌ जे भक्त माणिकनगरात राहत नाहीत, पण त्यांना झोळी घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही झोळीपूजेची व्यवस्था साक्षात् प्रभुंनीच जणू अत्यंत कृपाळूपणे केली आहे.

झोळीपूजेमध्ये झोळीमध्ये प्रभुंचा छोटा सटका असतो, त्याची मुख्यत्वे पूजा होते. त्याला स्नान घालून, गंध लावून सटक्याची पूजा केली जाते. त्यानंतर पूजेच्या वेळी नैवेद्याचे जे मंत्र म्हटले जातात, ते मंत्र म्हणून त्यावेळी झोळीमध्ये यथाशक्ती नैवेद्य, शिधा ठेवला जातो. त्यानंतर झोळी बंद करून, पुन्हा झोळीची गंध वैगरे लावून पंचोपचार पूजा होते, नैवेद्य दाखवून, आरती केली जाते. आजही जुन्या प्रभुंभक्तांमध्ये (श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासूनच्या) आजही काही मंगलकार्य, जसे लग्न किंवा मुंज वगैरे पार पडली की, त्यानंतर ते भक्त माणिकनगरला प्रभुमंदिरात येऊन झोळीपूजा करतात. विद्यमान प्रभुपरिवारामध्येही ही परंपरा आवर्जून पाळली जाते. ह्या वेळेस झोळी घेणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचीही हार घालून, आरती करून पूजा केली जाते. एकंदरीतच झोळी पूजा ही प्रभुंच्या ब्रह्मचारी स्वरूपाची किंवा अवधूत दिगंबर किंवा माधुकरी वृत्तीचीच पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अन्नपूजा ह्या पूजा विधीमध्ये श्रीप्रभुसमाधीस दहीभाताचे लिंपण केले जाते आणि नंतर हा दहीभात भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. अन्नपूजेचा संबंध महादेवाच्या पूजेशी आहे. रुद्र अनुष्ठानाची सांगता अन्नपूजेने होते. साधारणतः शंकराच्या पिंडीला अशा प्रकारचे दहीभाताचे लिंपण केले जाते. काही ठिकाणी देवीलाही दहीभाताचे लिंपण करून अन्नपूजेचा विधी पार पडला जातो. हलाहल प्राशन केल्यामुळे शरीराला झालेला दाह कमी व्हावा, या भावनेने श्रीशंकरास दहीभाताच लिंपण आणि असुरांशी युद्ध केल्यावर, देवीला आराम मिळावा म्हणून दहीभाताचं लिंपण करण्याची परंपरा पूर्वापारपासून अनेक ठिकाणी चालत आली आहे. माणिकनगरातही प्रभुसमाधीस अन्नपूजेची परंपरा गेले अनेक वर्षे अखंड सुरू आहे.

प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या परिवाराकडून श्रीप्रभु समाधीची अन्नपूजा केली जाते. आजही प्रभुंचे नवरात्र दुबळगुंडीच्या रामण्णापंतांच्या कुटुंबाकडे आहे व ते माणिक नगरी येऊन ही प्रभू सेवा करतात. त्यांची अन्नपूजा पाहून इतरांनाही या अन्नपूजेची प्रेरणा झाली. आपले काही काम अडले असल्यास, मी प्रभुची अन्नपूजा करेन, असा नवस अनेक प्रभुभक्त करतात किंवा प्रभुगादीच्या पीठाचार्यांनीही आपल्या भक्तांना, तुमचे काम होईल, काम झाल्यावर प्रभुसमाधीची अन्नपूजा करा, असे अनेकदा सांगितल्याचे कळते. थोडक्यात, प्रभुप्रती कृतज्ञता किंवा नवस पूर्ततेचा विधी म्हणून अन्नपूजेकडे आपल्याला पाहता येईल.

ह्या अन्नपूजेचेही मोठे वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला माणिकनगरी पहायला मिळते. चांदीच्या घंगाळवजा पातेल्यात (ह्याला कन्नड भाषेत कोप्परगी असं म्हणतात) पाच एक किलो दहीभात असतो आणि चांदीच्या पात्रामध्ये अकरा वडे असतात. अन्नपूजेच्या वेळेस हे दहीभात प्रभुमंदिरात ठेवले जाते. श्रीप्रभु समाधीची महान्यासपूर्वक रुद्राभिषेक महापूजा होते. त्यानंतर प्रभूंना वस्त्रसाज केल्यावर, जेव्हा नैवेद्याचे मंत्र येतात त्यावेळी, श्रीप्रभु समाधीस पडदा केला जातो आणि श्रीप्रभु समाधीवर छाटी ठेवली जाते. त्यावर हा दहीभात पसरवला जातो. ह्यावेळी भृगुवल्लीतील अन्नपूजेचे मंत्र म्हटले जातात. श्रीप्रभु समाधीवर पसरवलेल्या दहिभातावर वडे ठेवले जातात. आणि श्रीप्रभु समाधीला हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पसरवलेल्या दहीभातावर पुन्हा एक छाटी टाकली जाते आणि त्यावर गिलाफ (प्रभू समाधीस चारी बाजूंनी घालण्यात येणारे वस्त्र) घातला जातो. गिलाफ घातल्यावर शाल आणि अलंकार घातले जातात. त्याचबरोबर श्रीप्रभु समाधीसमोर आणखी एका ताटात दहिभात ठेवतात आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो, श्रीप्रभु समाधीची आरती केली जाते. त्याचबरोबर यजमानाच्या नवसाच्या पूर्णतेच्या / समाप्तीचा संकल्प सोडला जातो. दोन नारळ फोडले जातात आणि समाधीवर अक्षता टाकून गिलाफ काढला जातो. त्यानंतर श्रीप्रभु समाधीवर असलेलया अन्नपूजेच्या दहीभाताचा प्रसाद गोळा केला जातो. त्यावेळीही पुन्हा उपनिषदातील मंत्र म्हटले जातात. दहीभात पूर्ण टिपून घेतल्यावर, श्रीप्रभु समाधीस स्नान घालून, पुन्हा पंचोपचार पूजा होते आणि वस्त्रालंकार घालून प्रभुंची आरती करून पुष्पांची नेहमीप्रमाणे सजावट करतात. श्रीप्रभु समाधीची ही पूजा पूर्ण झाल्यावर, यजमानांना वडे आणि दहीभात प्रसाद म्हणून दिला जातो आणि उरलेला दहिभात प्रभू मंदिरात असणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

एकादशी, महाशिवरात्री, श्रावण मास आणि दत्त जयंतीच्या उत्सवाचे पाच दिवस अन्नपूजा केली जात नाही.

थोडक्यात आपल्या घरातील मंगल कार्य पार पडल्यावर झोळीपूजा करण्याचा आणि नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा संकल्प पूर्तीसाठी अन्नपूजा करण्याची परंपरा, अनेक प्रभुभक्तांकडून आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहता येते. आपल्या घरातील मंगल कार्यात श्रीप्रभु आपल्याला काहीही कमी न पडू देता आपली झोळी सदैव भरलेली ठेवतो आणि अशा ह्या भक्तकार्यकल्पद्रुम प्रभुप्रती प्रेम अथवा कृतज्ञता म्हणून झोळीपूजेचे आणि अन्नपूजेचे विधान प्रभुभक्तांमध्ये प्रचलित आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा नविन भक्तांना जर अशी पूजा करायची इच्छा असल्यास आणि आगाऊ सूचना दिल्यास श्री संस्थानाकडून तशी व्यवस्था अत्यंत अल्प दरात केली जाते. झोळीपूजा आणि अन्नपूजा ह्या वैशिष्ट्यपूर्ण विधींची माहिती दिल्याबद्दल श्री माणिक प्रभु संस्थानाचे मुख्य अर्चक श्री. गुरुनाथ गुरुजी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अन्नपूजा किंवा झोळीपूजेच्या निमित्ताने आपणासही प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शीघ्रातीशीघ्र प्राप्त होवो, आणि त्याच्या फलस्वरूप आपली ही झोळी श्रीप्रभु कृपेने निरंतर भरलेली राहो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखीन एका लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक

नेटवर्क मध्ये येणे

एकदा द माणिक पब्लिक स्कूल मधील मुलांचे श्रीजीं सोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात प्रश्न-उत्तर session सुरू होते. ‘एकच परमात्मा सगळ्यांनमध्ये कसा असू शकतो’ या प्रश्नाचे उत्तर देतांना श्रीजींनी मुलांना समजेल असं मोबाईलचं उदाहरण दिलं की जरी सगळ्यांकडे device व sim वेगवेगळे असो पण नेटवर्क एकच आहे . ते दिसत नसले तरी फोन सुरू असणे हे त्याचे proof आहे. तसेच परमात्म्याचे आहे… भलेही अनेक रूपे असोत पण तत्व एकच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या एकच परमात्म्याचा अंश आहे…किती समर्पक उत्तर आणि मुलांना समजेल असं सोप्या भाषेत श्रीजींनी सांगितले . यातील गाभार्थ मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे . जसं कोणाशी आपण फोन वर बोलत असू आणि जर त्याला आपला आवाज पोहचत नसेल तर समोरची व्यक्ति काय म्हणते ? नेटवर्क मध्ये ये आणि मग आपण जरा घरच्या बाहेर जाऊन किंवा खिडकी जवळ येऊन बोलू लागतो म्हणजे संपर्क कक्षेत यतो…आणि मग समोरच्याला आपला आवाज नीट ऐकू येतो . दूसरं महत्वाचं की कोणतं सिमकार्ड आहे आणि कोणता G आहे ! 4G, 5 G.. आपलं शरीर म्हणजे आपलं device , आपलं मन आणि बुद्धी म्हणजे सिमकार्ड आणि आत्मा म्हणजे नेटवर्क असं आपण समजूया. जेव्हा तीनही गोष्टी aligned असतील तेव्हा प्रभूकृपारूपी संभाषण झालंच म्हणून समजा ! आता खरी गंमत अशी आहे की ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये जर यायचे असेल तर खऱ्या अर्थाने जगाशी ‘disconnect’ व्हावे लागेल (आध्यात्मिक) , out of coverage area म्हणजेच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जावे लागेल (भौतिक जगाशी) . थोडक्यात प्रभूंची अनुभूति घ्यायला आपल्याला आपल्या आत शिरावे लागेल तरच आपल्याला प्रभू कळतील ! आणि एकदा का ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये आपण आलो की ‘प्रभूंना धरणे माहीत आहे सोडणे नाही’ याची अनुभूति आल्याशिवाय रहात नाही.
आता मुख्य मुद्दा हा आहे की प्रभूंच्या नेटवर्क मध्ये येणे म्हणजे काय आणि ते कसं ? तर…. ‘माणिक हा भावाचा भुकेला आणिक न लगे काय’ बस एवढं कळलं म्हणजे एक पायरी आपण चढलो ! भक्तीचे जसे नऊ प्रकार आहेत तसेच काही टप्पे पण आहेत. जस जसे आपण ते गाठू तस तसे आपण अधिक प्रभूंच्या जवळ येऊ …..प्रभुकृपे साठी पात्र होऊ . ज्ञानमार्ग , भक्तिमार्ग आणि योगमार्ग जस ज्याला शक्य तसे त्याने करावे. आपल्या पाच ज्ञानेंद्रिय च्या माध्यमातूनही आपण प्रभूंची भक्ति करू शकतो ; डोळ्यात प्रभूंचेच रूप साठवणे , जास्तीतजास्त प्रभूंविषयीचे ऐकणे. बोलताना प्रभूंविषयीचे बोलणे, आपल्या प्रत्येक श्वासात प्रभूनाम घेणे आणि शाररिक रूपाने जेवढी होईल तेवढी सेवा करणे. भक्तीचा महिमा असा आहे की ज्ञानाच्या अहंकारला देखील मागे टाकतो. परमोच्च आनंद कशाला म्हणतात , समर्पण म्हणजे काय , प्रेम कसं करतात , देहभान विसरणे म्हणजे काय , एवढ कशाला तर स्वत:ला विसरणे म्हणजे काय हे देखील आपल्याला भक्ति मुळेच कळू शकतं. आणि प्रभूकृपे मुळेच हे हू शकतं हे वेगळं सांगायला नको ! एकदा का आपण प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो की आपली पुढची सगळी काळजी मिटलीच म्हणून समजा. प्रभू हे सर्व इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षा प्रमाणे आहेत. आपल्या मनातलं सगळं कळतं त्यांना. योग्य वाट दाखवणारेही तेच आणि काही चुकल्यावर सांभाळून घेणारेही तेच.

सुंदर मुखकमल ,बघताच डोळे दिपती
तेजस्वी मूर्ती ती
तो असे प्रभू हा….प्रभू हा…. प्रभू हा

सगळ्यात असूनही कोणातही नसे
आर्त हाक देताक्षणि मात्र धावून येई
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा

एकदा धरले जे आपले बोट
न सोडे कदापि
‘सगळ्यातून’ अलगत बाहेर काढे
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा

प्रभूंनि सांगितले आहेच…
‘धरियले गे माय श्रीगुरुचे पाय |
मी पण जेथे समूळ गेले तूपण कैचे काय’ ||

प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो तर समजून जा जन्माचं सार्थक झालं .

जब तलक मैं था

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।

एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।

जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.

त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,

आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।

श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.

भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।

‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,

आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।

साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,

द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।

या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।

जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,

सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।

भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,

देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।

तसेच,

गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।

श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.

पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)

त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,

अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।

ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.

स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,

श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।

हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.

मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,

यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।

आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,

कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।

अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.

या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.