by Devidas Keshavrao Deshmukh | Jan 4, 2024 | Uncategorized
संत श्रेष्ठ सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराजांच्या जन्माचे यंदा हे २०६ वे वर्ष होय. श्री प्रभूंनी मत-पंथ- विविध धर्मियांच्या गल्बल्यातून ताक घुसळून घुसळून जसे लोणी काढतात तसे “सकलमत संप्रदायाची“ स्थापना केली. ‘द्वैत बुद्धी ही दूर करा,सकल मताचा पंथ धरा’ असा प्रचार करीत सर्व मतधर्म तत्वांचा आदर करीत त्याचा सुवर्ण मध्य साधत सकलमत पंथाची मुहूर्त मेढ रोवली.श्री गुरु नानकदेवजिंनी अशाच विचारांनी शीख धर्माची स्थापना केली आज तो सर्व मान्य झाला आहे.
‘एकं सद्विप्रा बहुधा वदंती’ असा संदेश देत सृष्टीमध्ये चालकत्वाची भूमिका पार पाढणारी एकच शक्ती आहे. वरपांगी तिची अनेक रूपे दिसतात पण ती शक्ती सर्वत्र एकच आहे. ज्या प्रमाणे अनेक अंधळ्यानी हत्तीच्या निरनिराळ्या अंगाना स्पर्श करून हत्तीचे रूप वर्णन अनेक प्रकारे केले. व आमुक एक प्रकार म्हणजेच हत्ती असे प्रतिपादिले. पण डोळस पणे नीट पाहून ज्ञान मिळविले कि त्याचे स्वरूप कळते ती शक्ती म्हणजे एकच आहे ह्याचे ज्ञान होते हे सद्गुरुनी पटवून दिले. ज्ञान व भक्तीच्या संगमानेच ती स्थिती प्राप्त होवू शकते व अंती मोक्षाप्रत जाता येते असे प्रतिपादिले.
त्या साठी गुरूपदेश व तोही अधिकारी व्यक्तीच्या-गुरूच्या मुखातून मिळविलेले ज्ञानच उपयोगाचे आहे. ऐऱ्या-गैर्यांचा उपदेश काही उपयोगाचा नाही. विशेषत्वाने जिवंत गुरूच्या मुखातून मिळालेले ज्ञान जास्त उपयोगाचे असते. कारण त्या अधिकारी गुरूचे आचरण व ज्ञान हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो त्याचा सरळ-थेट परिणाम आपल्यात मुरतो. वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंनी साधू व राज्याची गोष्ट सांगत हे पटवून दिले कि ‘राजा बोले दल हाले-मिया बोले दाढीही न हाले’ म्हणून गुरु करावा व तोही असा अधिकारी असावा जसा सकलमताचार्य श्री प्रभू.
त्यांच्या काळापासून सर्व गुरु पिठाधिपतींची परंपरा त्यांचे वागणे-चालणे-बोलणे हे आपल्या मन पटलावर कोरले जात आहे.त्यांची योग्यता व अधिकार तसाच परिपूर्ण आहे. त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष वर्तन ह्यात एक वाक्यता दिसते. त्या सर्वांमध्ये दृढ निश्चय, निःसंगता, परोपकार, विश्वबंधुता, सर्वांचा आदर, न्याय प्रीयता, आद्य प्रभूंवरील अढळ श्रद्धा-भक्ती, सततचा व्यासंग, सततची कार्य प्रवणता, बंधू प्रेम व असे अनेक सद्गुण आजवर परंपरेने सर्व पिठाधिपतीत प्रत्ययास येतात. सर्वांच्या साहित्य लेखनातही सामजिक उद्धाराची व मानवी कल्याणाची तळमळ दिसून येते.
वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंचे तर वर्णन करावे तेवढे थोडेच आहे सततचा व्यासंग – धडपड-कार्यप्रवणता – नवनवोन्मेश शालिनी प्रमाणे नित्य नवा ध्यास व त्याची निर्मिती ही त्यांची ठळक वैशिष्ठ्य दिसून येतात. त्यांच्या कामातून प्रतीत होणारी भव्यता व दिव्यता सतत जाणवते. कोणतेही कार्य असो-निरनिराळ्या पिठाधिपतींची प्रती वार्षिक आराधना असो वा मोठे बांधकाम (अगदी झपाटल्या प्रमाणे कामाचा उरक ) असो किंवा एखादा राष्ट्रीय वा सामाजिक कार्यक्रम असो किंवा भक्तांसह यात्रा असो सारेच भव्य आणि दिव्य! कुठेच न्यूनता नाही. सर्वात मिळून मिसळून राहणे-कोण गुरु आणि कोण भक्त ओळखूच येणार नाही.जसे बर्फात गोठलेले पाणी वा बर्फाचे झालेले पाणी!
आमच्या सारख्या सामान्य जनात देव-धर्म-गुरु-ह्यांचे विषयी साशंकता व चंचलता सतत प्रतीत होते. काही लोकांचा प्रश्न असाही असतो कि देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? पण दत्त संप्रदाय म्हणतो गुरु श्रेष्ठ, कारण देव देतो व नष्टही करतो, व दुष्ट-सुष्टांचा न्याय करतो, त्यांचे-त्यांचे वर्तनाप्रमाणे दान व दंडही करतो पण गुरु तर दान करतोच आणि दंड करणे ऐवजी दुष्टांना त्याची वृत्ती सुधारून त्याला सुष्ट बनवून सनमार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कारण तो समोर असतो आपण त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाहिलेले असते. देव केवळ कथा पुराणातूनच दिसतो. म्हणून गुरु श्रेष्ठ. व तोही सकलमताचार्य श्री सद्गुरू माणिक प्रभूंसारखाच सर्वश्रेष्ठ!
आमच्या सारख्या संसारिकांचे प्रत्यक्ष प्रमाणावरच लक्ष्य असते किंवा असे म्हणा हवे तर चमत्कार शिवाय नमस्कार नाही. काही नास्तिक, प्रारब्ध वैगैरे काहीच नसून प्रत्यक्ष नैसर्गिकरित्या बरे वाईट घडत असते असे म्हणतात व जरासे बरे वाईट झाले कि कसला देव नी कसला गुरु! अर्थात मनस्तापामुळे असेवाटणे साहजिक आहे, पण सततचे गुरु स्मरण, चिंतन, मनन, व चरित्र पठन या मुळे मुख्य प्रवाहात आपण पुन्हा परत येतो.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मंगळवार दि.२६/१२/२०२३ ला श्री माणिक प्रभू जयंती दिनी सायंकाळी ७.३० वा सगरोळीहून माणिक नगर साठी निघालो गाडीच्या ड्रायवर ने २ वेळा जिवावरचे अपघात केले होते. मनातून धाकधूक होतीच. आम्ही भालकी ते हुमानाबाद्च्या रस्त्यावर असताना अंदाजे रात्री १०.३० च्या सुमारास हाइवे वर एक वळण होते व त्या वळणावरच ट्रक उभा असलेला ड्रायवरला नीट दिसला नाही आणि गाडी ९० ते १०० च्या वेगात, अगदी जवळ येताच त्याच्या लक्षात आले. आणि त्याने प्रसंगावधान राखून झटकन गाडी उजवीकडे वळवून परत डावीकडे वळणावर घेतली. केवळ एका क्षणाच्या १०० व्या भागाच्या वेळेतच हे घडून गेले. गाडी पुन्हा डावीकडे सरळ करताना त्या वेगात सावरले गेले, नाही तर उजवीकडे-डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात गाडीने पलटी खाल्ली असती. श्री प्रभू कृपा म्हणूनच आम्ही बचावलो,नाहीतर आमचे काही खरे नव्हते.
असाच एक प्रकार नाशिकचे श्री.गोपाळराव कुलकर्णी यांचे बाबत वाचण्यात आला. नेमके ह्याच दिवशी जयंती करून २७ च्या पहाटे ते माणिकनगरहून नाशिकला परत जाण्यास निघाले बीडच्या थोडे पुढे जातास दुपारी ४.३० च्या सुमारास ह्यांच्या गाडी पुढील, म्हशी वाहतूक करणाऱ्या ट्रक-ड्रायवरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अचानक थांबला व ह्यांची गाडी त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. त्या गाडीचे हेडलाईट व बॉनेट पासून स्टेरिंग समोरील काचे पर्यंत पूर्ण चकणाचूर झाली.पण काचेच्या आतून स्टेरिंग पुढे त्यांना माणिकनगरात प्रसादात मिळालेला मुख्य देवळातील एक लांबलचक होता. तो त्यांनी स्टेरिंग पुढील काचेच्या आतून मोकळ्या जागेत लांब असा मांडून ठेवला होता.त्या काचे पर्यंतच गाडीचा चुराडा झाला पण काचे पासून-हारापासून आत काहीच नुकसान झाले नाही किंवा साधे खरचटले देखील नाही.
‘तो हार म्हणजे श्री प्रभूंनी आखलेली लक्ष्मण रेषाच होती’.असे श्री गोपाळराव कुलकर्णी म्हणतात.श्री प्रभू जवळी असतां।मग चिंता मज कां।। ह्या पदाची प्रचिती येते.
by Parag Nerurkar | Dec 14, 2023 | Uncategorized
मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती. ब्रह्मा विष्णु महेश या तिन्ही देवतांचा अनोखा संगम असलेल्या त्रिमुर्ती देवतेचा जन्मोत्सव.”मासानां मार्गशीर्षोऽहम्”. “सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे” असे साक्षात भगवान श्रीकृष्ण सांगतात; त्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्माचा आनंदोत्सव.
ब्रह्मा विष्णु महेश एकाठायी एकवटलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती त्रिमुखी असणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कधी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहिली आहे का? नाही ना. मी पाहिली आहे. आजही पहातो… ती ही सगुण साकार रुपात. माझे सद्गुरू, भगवान श्री दत्तात्रेयांचे चतुर्थ अवतार, श्रीभक्तकार्यकल्पद्रुम सकलमताचार्य श्री माणिक प्रभू महाराज. एकमुखी दत्तगुरु.
प्रत्येक संतपीठाची एखादी तरी वेगळी छटा असते. ती तुम्हाला दुसऱ्या संतपीठाच्या ठिकाणी आढळणार नाही. कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील हुमणाबाद नजिक माणिकनगर येथे पीठासनाधिस्थ श्री माणिक प्रभू महाराज यांची गुरु परंपरा हे येथील एक अलौकिक वैशिष्ट्य आहे. गेली २०० वर्षे ही गुरु परंपरा अक्षुण्णपणे जोपासलेली आहे. “माझ्या गादीवर मीच बसणार” या पहिल्या श्री माणिक प्रभू महाराजांच्या वचनाप्रमाणे तेच प्रभू महाराज, आजच्या सहाव्या पीठासनाधिस्थ सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या रूपाने, आपल्या भक्तांच्या लौकिक व पारलौकिक समुत्कर्षाचा कैवार घेत आहेत. २०० वर्षे अव्याहत. क्वचितच हे अलौकिक वैशिष्ट्य आपल्याला अन्य संतपीठाच्या ठिकाणी पाहायला मिळेल.
या संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे. प्रभू दरबार. सर्वच दत्तपीठांत दत्तजयंतीचा महोत्सव दणक्यात साजरा केला जातो. माणिक नगरला तर हा महोत्सव १० दिवस चालतो. पण “प्रभू दरबार” म्हणजे “जरा हटके” सोहळा. दत्तजयंतीचा महोत्सव आटोपला की दुसऱ्या दिवशी रात्री श्री माणिक प्रभू महाराजांचा दरबार भरतो. राजवस्त्रे ल्यालेले, नानालंकारमंडीत, छत्र चामरे भूषित, डोक्यावर माणिक प्रभूंची खास ओळख असलेली कलाकुसरीची भरजरी टोपी परिधान केलेले राजयोगी संतवर्य प्रभू महाराज; रात्री दरबारातील प्रभू गादीवर विराजमान झाले की प्रभू दरबार सुरू होतो. विशेष म्हणजे दरबारात आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रभू महाराज स्वहस्ते प्रसाद देतात. शेवटच्या भक्ताला प्रसाद दिला की प्रभू महाराज गादीवरून उठतात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारा प्रभू दरबार हे माणिक प्रभू महाराजांच्या सकलमत संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
जर कोणाला एकमुखी दत्तात्रेयांचे दर्शन घेण्याची जिज्ञासा झाली तर त्यांनी प्रभू दरबाराला जरूर यावे आणि सगुण साकार रुपातील राजयोगी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन धन्य व्हावे.
by Prachi Karnik | Dec 13, 2023 | Uncategorized
सोनपिवळी जेजुरी
सोनपिवळे मैलार
सोन्याहुनही सोनेरी
अमुचे माणिकनगर
तिथे अश्वावर स्वार
हाती आयुध शोभे खंड
इथे शिळेचा आकार
पुढे मांडुनि योगदंड
शक्तिरूपिणी म्हाळसा
तेथे शोभे अर्धांगिनी
मधुमती शक्ति व्यंका
येथे परम योगिनी
तिथे खंडोबा, मार्तण्ड –
कुलदैवताचे रूप
कल्पतरु प्रभु माणिक
इथे सद्गुरु स्वरूप
तिथे भंडारा उधळण,
वारी, बुधली-दिवटी
इथे नित्य उपासन
जे ज्या दैवता आवडी
“येळकोट येळकोट”
गजर तेथे “जय मल्हार”
“भक्तकार्य कल्पद्रुम”
येथे “माणिक शिव हर”*
तिथे भव्य युद्ध-वेषे
मणि-मल्लांसी मारिले
इथे सकलमत संदेशे
वैमनस्यासी हारिले
खंडेराय श्री माणिक
भिन्न-भिन्न जरी वाटत
खरे पाहु जाता एक
विप्र बहुधा वदत
आपुले आत्मस्वरूप
तोच भैरव हा माणिक
चित्त शिघ्र हो तद्रूप
नसे मागणे आणिक
by Pranil Sawe | Dec 11, 2023 | Uncategorized
माणिकनगर येथे आपली गौरवशाली संस्कृती आणि अनेक परंपरा अत्यंत आत्मियतेने जपल्या जातात. “नित्य माधुकरी सेवा” हीसुद्धा मला अतिशय भावलेली, अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.
वेदांमध्ये पाच प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. ब्रह्म यज्ञ, देव यज्ञ, पितृ यज्ञ, भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ. ह्यापैकी मनुष्य यज्ञामध्ये, आपल्या घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे, असे सांगितले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना फराळ किंवा भोजन देऊन संतुष्ट करतो किंवा प्रवासात आपण काही खाताना सहप्रवाशांनाही देतो, हाही मनुष्ययज्ञाचाच भाग. पूर्वीच्या काळी भोजनाच्या वेळी आपल्या घराच्या आसपास कुणी भुकेला तर नाही ना, ह्याची खात्री केली जायची. तसे कुणी आढळल्यास त्याला भिक्षा अथवा भोजन देऊन मगच, आपण भोजन करायची पद्धत होती. कालौघात ही परंपरा हल्ली लुप्त होत चालली आहे.
ह्या मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊनच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे दोन्ही वेळचा प्रभुप्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. गेले कित्येक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. माणिकनगरी झोळीची परंपरा अजूनही सुरू आहे. ह्या झोळीचा, माधुकरीचा प्रसाद आजही भंडारखान्यातील अन्नामध्ये मिळवून भक्तांना वाटला जातो. ह्या माधुकरी सेवेत आपल्याला दररोज सहभागी होता येईलच, असे नाही. माणिकनगरापासून दूर राहणाऱ्या भक्तांच्या मनात माधुकरी सेवेत आपल्याला सहभागी होता येत नसल्याची सल अनेक प्रभुभक्तांच्या मनात होती. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभु भक्तांच्या अंतरीची तळमळ जाणून द्रवला नाही, तर नवलच! आणि म्हणूनच की काय परगावी असणाऱ्या भक्तांसाठी नित्य माधुकरी सेवेचा सुंदर पायंडा श्री सिद्धराज माणिकप्रभुंच्या गौरवशाली कार्यकाळात पडला.
ह्या सेवेंतर्गत भक्ताला एक डबा आणि ओळख क्रमांक दिला जातो. प्रत्येकाने आपला डबा आपापल्या घरी घेऊन जायचा. दररोज तसेच, काही विशिष्ट प्रसंगी (पारायण, सण, मंगलकार्य) यथाशक्ती रक्कम अन्नदानसाठी ह्या डब्यात जमा करायची. दर दिवशी अगदी पाच-दहा रुपयांपासून आपण कितीही यथाशक्ती रक्कम ह्यात जमा करु शकता. मी साधारणपणे भोजनाला बसायच्या आधी प्रभुंच्या झोळीचे स्मरण करून, तसेच जगातील कोणी भुकेले असतील त्यांना आठवून, त्यांच्या वाट्याचा भाग म्हणून अन्नदानासाठी काही रक्कम नियमित ह्या डब्यात जमा करतो. ह्या निःस्वार्थी सेवेमुळे अन्नाची गोडी आणि खाल्ल्याचे समाधान अजूनच वाढते. साधारणपणे श्रीदत्त जयंतीला भक्त नित्य माधुकरी सेवेसाठी आपली नाव नोंदणी श्री प्रभु संस्थानात करुन, आपापला डबा घेतात आणि पुढच्या श्रीदत्त जयंतीला तो डबा श्रीप्रभु संस्थानात जमा करतात. नित्य माधुकरी सेवेतून जमा झालेल्या निधीचा विनियोग प्रभुंच्या नैवेद्यासाठी आणि भंडारखान्यात सुरु असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या अन्नदानासाठी वापरला जातो. अन्नदानासाठी आपण यथाशक्ती केलेल्या दानाचा विनीयोग, श्री प्रभुपादस्पर्शाने पुनित झालेल्या श्री दत्तक्षेत्री भक्तांच्या क्षुधा शांतीसाठी होतो, ह्यात समाधान तर अपार आहेच, पण नित्य माधुकरी सेवेने आपले प्रारब्ध क्षीण होऊन आपल्या पदरी अन्नदानाचे पुण्यही सहज जमा होते. श्रीप्रभु संस्थानातर्फे नित्य माधुकरी सेवेसाठीचे हे डबे विनामुल्य उपलब्ध आहेत. मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे पुण्यफळ सहज पदरी पाडून देणाऱ्या ह्या सत्पात्री दानाचा लाभ जास्तीत जास्त सद्भक्तांना मिळो, आणि त्यांना प्रभुंचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…
by Pradeep Raje | Dec 5, 2023 | Uncategorized
आज आमचे असिम श्रद्धास्थान सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराज यांचा जन्मदिवस ! आम्हा सकलमत सांप्रदायिना अतिशय आनंददायी आणि श्रध्दापुर्ण दिवस !
अध्यात्मिक ग्रथांचा सखोल अभ्यास आणि अतिशय सोप्या भाषेत , व्यवहारातील दाखले देत त्याच विवेचन करून समजावण्याची कला , भगवदगीतेवरची ओघवती भाषेतील निरूपणं म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच !
हिंदी , मराठी , इंग्रजी , कानडी , तेलगु एवढच नव्हे तर उर्दु आणि संस्कृत भाषेवरिल प्रभुत्व , केवळ विस्मयजनक ! माणिकनगरची धार्मिक , शैक्षणिक , क्रीडा , सामाजिक इ . क्षेत्रांतिल त्यानी घडवुन आणलेली प्रगति केवळ अलौकीक !
असे दैवी व्यक्तीमत्व आम्हा सांप्रदायिना गुरूस्थानी लाभावे , हि साक्षात प्रभुकृपाच !
आज श्रीजींच्या जन्मदिनी , त्यांच्या चरणी शतकोटी प्रणाम करताना प्रार्थना करतो कि
प्रभुभक्तिचा आमच्या तिनहि पिढयांतिल वारसा पिढयान्पिढ्या वृद्धींगत होत राहो आणि प्रभुकृपेचा वरद्हस्त अखंड , अविरत लाभत राहो .
by Pranil Sawe | Dec 3, 2023 | Uncategorized
खोडकर मुलगा
प्रभुंच्या लहानपणी एक लहान मुलगा एका गाभण म्हशीला फारच त्रास देत होता. मुक्या जनावरांनाही त्रास होतो, म्हणून त्या म्हशीला त्रास न देण्यासंबंधी प्रभुंनी त्या खोडकर मुलास वारंवार समजावले. शेवटी “आता म्हशीच्या अंगास हात लावून तर पहा… म्हणजे…” असे प्रभु बोलले. प्रभुंच्या बोलण्यातील मेख न कळल्याने, “काय होते पाहू…” असे म्हणून त्या मुलाने दोन्ही हात म्हशीच्या पाठीवर ठेवले. प्रभु हसतच म्हणाले, अरे, ती म्हैस फार वाईट आहे, तुझे हात धरून बसेल! पहा रे बुवा आपला विचार!” प्रभुंच्या तोंडूने हे शब्द निघताच, त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या पाठीला चिकटून बसले. त्याला ते मोकळे करता येईनात. म्हैस उधळली, मुलगा म्हशीला लोंबकळू लागला. सर्व मुलांना मोठी गंमत झाली. म्हैस पळते आहे, मुलगा लोंबकळत चालला आहे. मुलगा रडू लागला. “मेलो, मेलो, पुन्हा कधी असे करणार नाही”, असे म्हणू लागला. प्रभुंना त्याची ती केविलवाणी अवस्था पाहावेना. प्रभुंनी ताडकन उठून, पळत जाऊन त्या म्हशीला थांबविले. तिच्या पाठीवर हात फिरवून, “बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही. एकवार त्याला क्षमा कर. सोड त्याला”, असे म्हणताच, मुलाचे हात सुटले. सर्व मुलांना मौजच मौज झाली पण, त्या मुलाला मात्र खाशी अद्दल घडली.
अमृतकुंडावरील घटना
चितापूरच्या विठ्ठलराव पेशकरांचे वडील हे प्रभुंचे बालमित्र. मामांनी रागे भरल्यावर, प्रभुंनी कल्याणमधील मामांचे घर सोडले आणि श्रीप्रभु पेशकर व त्यांच्या आणखीन एका समवयस्काबरोबर मंठाळच्या अरण्यात शिरले. त्यावेळी त्या दोघांनी प्रभुंना तसे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. अरण्याची दोघांना भीती वाटत आहे असे पाहून, प्रभुंनी, “भिऊ नका, माझ्या मागोमाग या, तुमचे भाग्य उदयाला येईल”, असे सांगितल्यावर, ते दोघेही प्रभुंच्या मागे गुहेत शिरले. थोड्यावेळाने त्यांना एक शिळा दिसली व तिघांनी ती बाजूला करताच सर्वजण आतील गुहेत शिरले. त्या गुहेतील जागा अत्यंत स्वच्छ असून त्यात एक आगटी दिसली. जवळ एक चिमटा पडला होता आणि आगटीतील राख रसरशीत होती. थोडेसे पुढे जाताच, पहिल्यापेक्षा मोठी अशी आणखी एक काळी शिळा दृष्टीला पडली. ती दूर करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी करून पाहिला. शेवटी प्रभु हसून म्हणाले, “आता पुरे करा, फक्त माझ्या धोतराचा पदर घट्ट धरून उभे रहा, भिऊ नका”, असे म्हणून प्रभुंनी एक जोराचा हिसडा देताच ती प्रचंड शिळा उलथून पडली. पण आतील गुहेतून एक भयंकर गर्जना ऐकू आली. ती एखाद्या प्रचंड वाघाची असावी, असा त्या दोघांचा भास होऊन ते घाबरून गेले व प्रभुंच्या धोतराचा धरलेला पदर सोडून, मागच्या पावली पळत सुटले. पळता पळता काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला व त्याबरोबर वाघाची गर्जनाही झाली. त्यांनी असे अनुमान केले की, प्रभुंवर त्या वाघाने झडप घालून त्यांना खाऊन टाकले असावे. भीतीने गर्भगळीत होऊन ते धावत सुटले व थोड्याच अवधीत त्यांनी कल्याण गाठले. ह्या प्रकाराबद्दल कोणाजवळ ब्र काढण्याचीसुद्धा त्यांची हिम्मत झाली नाही. त्यानंतर दोन एक महिन्यांनी कल्याणची बरीच मंडळी अमृतकुंडावर निघालेली पाहून, ते दोघेही बरोबर दशम्या घेऊन निघाले. डोंगर चढून अमृतकुंडाजवळ येत असताना, त्यांना प्रभुंचे स्मरण होऊन, पूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल ते एकमेकांबरोबर बोलत होते, इतक्यात प्रभुंची स्वारी त्यांच्यासमोर दृष्टीस पडली. वाघाच्या गुहेतून प्रभु जीवंत बाहेर आल्याचे पाहून त्यांना नवल वाटले आणि प्रभुंचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी व प्रफुल्लित असलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले. “हे असे कसे झाले?” असा प्रश्न त्यांनी प्रभुंना केला. त्यावर प्रभु म्हणाले, “तुम्ही न घाबरता माझ्यामागे आला असता तर, त्याचे मर्म समजले असते. आता काय उपयोग?”
प्रसादाची हकीकत
अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही.
व्यंकम्मावर कृपा
मैलारास असताना प्रभुंनी व्यंकम्माला पुराच्या पाण्यातून जीवदान दिले होते. त्यानंतर तिला प्रभुंचा प्रसाद मिळाला आणि तिने प्रभुंकडेच राहण्याचा हट्ट धरला. आपले सर्व दागदागिने तिने प्रभुंना देऊन टाकले. प्रभुंनी व्यंकम्माचे अंतःकरण जाणले होते. निस्सिम आणि शुद्ध प्रेमाने ती ओथंबून गेली होती. ती जरी तरुण होती तरी, वैषयिक स्वार्थी प्रेमाचा तिच्याठायी पूर्ण अभाव होता, हे प्रभुंनी पक्के ओळखले होते. प्रभुंनी प्रसन्न अंतःकरणाने तिच्याकडे दृष्टीक्षेप करून, आपल्या मातोश्री बयाम्मामातेजवळ तिला घेऊन जाण्यास एका शिष्यास सांगितले. तिचे प्रभुंवरील उत्कट प्रेम व भक्ती पाहून प्रभुंच्या मातेसही आनंद झाला व मातोश्रींनी तिला आपल्या कन्येप्रमाणे जवळ बाळगिले. प्रभुंनी व्यंकम्माची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. तिला कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले, तरी ती डगमगली नाही. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला हे पाहून, सर्वांना तिची करूणा आली. पण प्रभुआज्ञा उल्लंघण्याचे व्यंकम्माने कधी मनातदेखील आणले नाही. एके समयी, स्त्री स्वभावला अनुसरून विवस्त्र होऊन, व्यंकमा स्नान करीत होती, अशा प्रसंगी प्रभूंकडून निरोप आला, “असशील तशी निघून ये” हा निरोप कानावर पडताच, देहभान विसरून जाऊन, तशाच स्थितीत व्यंकमा प्रभुंकडे यावयास निघाली. सर्व लोक विस्मित झाले. मातोश्रींना हे वर्तमान कळल्याबरोबर, त्याही मागोमाग निघाल्या आणि त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. प्रभुने अशी भलतीच आज्ञा कशी केली, म्हणून त्यांना विचारण्याचा बयाम्मामातेचा हेतू होता. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. ते एकदा नाहीसे झाल्यावर, स्त्रीत्व कसे राहणार? असो, तशाच स्थितीतही व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून, प्रभुपुढे येऊन उभी राहावयास तयार झाली हे समजल्यावर, तिची ती अनुपम भक्ती पाहून, तो प्रेमाचा निधी उचंबळू लागला. अनिवार प्रसन्न अंतःकरणाने डोलू लागला. व्यंकम्मा जवळ येण्याची वाट देखील न पाहता, प्रभुंनी चटकन आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून, तिच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रीकडे पाठविले. त्यावेळी खरोखर व्यंकम्माचा उद्धार झाला. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा होय. जीवनभर प्रभुआज्ञेत, प्रभुसाधनेत राहून ती शेवटी श्री देवीपदास पोहोचली.
वरील चारही कथा पाहिल्या तर आपल्याला “श्रीगुरु आज्ञा” हा समान धागा आढळतो. खोडकर मुलगा, पेशकर, किंवा अक्कलकोटच्या राजाचा कारभारी यांनी प्रभुआज्ञा पाळली नाही आणि पर्यायाने त्यांनी त्याचे परिणाम भोगले किंवा आपल्या भाग्योदयाची चालून आलेली संधी दडवली. ह्या उलट, व्यंकम्माने प्रभुंच्या मुखकमलातून निघालेला शब्द खाली पडू न देता, तो प्रमाण मानला आणि आपला पारमार्थिक उत्कर्ष साधून घेतला. वरील कथांच्या माध्यमातून श्री गुरुआज्ञेचे महत्त्व आपल्या सहज ध्यानात येते. कारण, आपले नेमके हित कशात आहे, याची पूर्ण जाणिव आपल्या गुरूला असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुरुआज्ञेत राहणे, हे सदासर्वथा हितकर असते. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्री सद्गुरू माणिक प्रभु महाराजांचा जयजयकार असो.
Recent Comments