दीवाना आपकु नहीं ढूंढा

दीवाना आपकु नही धुंडा ।।धृ।।
विद्या सीखी योग कमाया । भगवा सिर मुंडा ।।१।।
ग्यानी बन चित भोगकी आशा । साधु जग भोंडा ।।२।।
बंध मुगति नही, ब्रह्म तू साचा । क्यों रोता रंडा ।।३।।
आत्मभूमिबल मन फल फुली । शरीर जड कुंडा ।।४।।
त्यज विरोध मत, सकलमती हो । तब हो दिल थंडा ।।५।।
चिन्मार्तंड बचन जो भूला । खावे जम दंडा ।।६।।

‘बुडत हे जन देखवेना डोळा ।
म्हणोनि कळवळा येतो मज ।।’
असे अज्ञानी जनांना त्यांच्या जन्ममृत्यूच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी पोटतिडकीने कळवून सांगणारे संतच म्हणतात, ‘दीवाना आपकु नही धुंडा।।’ ‘अरे वेड्या, स्वतःला तू अजून ओळखलं नाहीस!’ परमपूज्य श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज साधकाला माऊलीच्या मायेने समज देत आहेत.

महाराजश्री म्हणतात, ‘विद्या शिकला, शब्दज्ञान खूप मिळवलं, योगमार्गात प्रगती केली, संसाराचा त्याग करून, भगवे वस्त्र परिधान करून, मुंडण करून संन्यास दीक्षा घेतली, पण इतकं सगळं करून, तू स्वतःला ओळखलंस का?’ “दीवाना आपकु नही धुंडा।।”

पुढे महाराजश्री समजावत आहेत, ‘शास्त्रांचा अभ्यास करून खूप ज्ञान मिळवले, विद्वान झाला आणि तरी विषयांसंबंधी तुझी भोगवृत्ती तशीच राहिली, तर जगामध्ये तुझं हे साधुचं ढोंग होईल.’ कारण ज्ञानोबांनी सांगितलय, ‘वैराग्याविना ज्ञानासी तगणे नाही.” म्हणून प्रभुजी म्हणतात, ‘दीवाना आपकु नही धुंडा ।।’

पूज्य मच्छिंद्रनाथ, श्री गोरखनाथांना असाच उपदेश करतात. ते म्हणतात,
‘तो भी कच्चा बे कच्चा बे, नही गुरु का बच्चा ।।
वेदशास्त्रमें रहा न बाकी, पुरा ग्यान कमाया ।
शास्त्रविधीका मार्ग चलकर, तनका लकरा किया ।
तो भी कच्चा ।।१।।

कुंडलिनीको खुब चढावै, ब्रह्मरंध्रमें ले जावे ।
चलता है पानी के उपर, मुख बोले सो होवे ।
तो भी कच्चा ।।२।।

कहे मच्छिंदर सुन बे गोरख, तीनो उपर जाना ।
कृपा भयी जब सद्गुरुजीकी, आप आपको चीना ।
वही सच्चा बे सच्चा बे, वही गुरु का बच्चा ।।३।।’

साधक, ‘मी अज्ञानी आहे’, या अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी उपासनेची जीवापाड धडपड करत आहे, ज्यायोगे मी मुक्त होईल. जन्म मरणाच्या बंधनातून मी कायमचा सुटेल, अशा विचाराने ज्ञान, भक्ती, कर्म, योग इत्यादी मार्गांचा अवलंब करीत मुक्तीसाठी प्रयत्नशील असतो. या मायेच्या बंधनाचे दुःख त्याला रडवत असते.

सद्गुरु अशा आर्त साधकाला समजावीत आहेत, ‘अरे, असा भित्र्यासारखा रडतोस काय? तुझ्या मूळ स्वरूपाला तू ओळखत नाहीस, म्हणून या बंध-मुक्तीच्या घोळात अडकला आहेस. ‘बंध मुगति नही, ब्रह्म तूं साचा ।।’ ब्रह्म हेच तुझे मूळ स्वरूप आहे.

महाराजश्री एवढेच सांगून थांबत नाहीत, तर स्वरूपाला शोधण्यासाठी काय आणि कसे करावे याचेही मार्गदर्शन करतात. ते सांगतात, ‘आत्मभूमिबल मन फल फुली । शरीर जड कुंडा ।।’
कुठलेही कार्य मनाच्या उपाधीशिवाय सिद्ध होत नाही. जसे संत तुकोबा म्हणतात,
‘मना करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’
मात्र मनाच्या या संकल्पाला आत्म्याचे अधिष्ठान हवे, तेव्हांच तर ते मन बाह्यविषयासक्तीपासून विरक्त होईल, वृत्ती अंतर्मुख होतील आणि आत्मस्वरूपापर्यंतची वाटचाल सुखकर होईल.

परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.

आत्मानुसंधान, स्थैर्य आणि बल या तीन गोष्टी जर मनाला जमल्या, तर ते मन स्वरूपसिद्धीच्या दिशेने प्रगती करू शकतं. प्रभुजींनी ‘मन फल फुली’ हा शब्दप्रयोग एवढ्यासाठी केला असावा की, झाडाला फुले फळे लागणे, हे त्याच्या पूर्णत्वाच्या आनंदाचे लक्षण आहे आणि मनुष्य देहामध्ये हा प्रवास फक्त मनच करू शकतं. एरवी शरीर जडच आहे. म्हणून तर संत दासगणू महाराज म्हणतात,
‘मना रे तुजपाशी रे तुजपाशी ।
ने मज वैकुंठासी ।।’

महाराजश्री अत्यंत कनवाळूपणे सांगतात, ‘अरे, तू सकलमती हो!’ म्हणजेच सकलमताचार्य सद्गुरूंना शरण जा! त्यांच्या बोधाविरुद्ध कुणी काही सांगत असेल, तर त्याचा त्याग कर. तरच तुझी अंतरीची तळमळ शांत होईल.

मात्र सद्गुरु मार्तंडप्रभुजी साधकाला एक सावधगिरीचा इशाराही देतात. ‘चिन्मार्तांड वचन जो भूला । खावे जम दंडा ।।

सद्गुरूंचा साधकाला बोध हाच असतो की, ‘तत्वमसि!,’ ‘अरे ब्रह्म तूं साचा।’ हा बोध पूर्ण श्रद्धेने अंतःकरणात रुजला की,
‘सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध: ।
चिदानंद रूपः शिवोऽमं शिवोऽम्।’
हे त्याच्या प्रत्ययाला येतं. ‘अहं ब्रह्मास्मि!’ या स्वरूपाचे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ उठतात.

मात्र सद्गुरु वाचनाकडे दुर्लक्ष केलंस किंवा ते विसरलास तर मात्र यमाचा दंडा खावा लागतो. ‘पुनरपी जननं, पुनरपि मरणं’ या चक्रात अगदी अगतिकपणे फिरत राहावं लागतं. म्हणून, ‘दीवाना आपकु नही धुंडा ।।’ वेड्या आपला शोध घे, स्वस्वरूपाचा शोध घे!

सद्गुरु माऊली साधकाला ‘वेड्या’ म्हणतेय खरी, पण हे ‘मातेच्या कोपी थोकले । स्नेह आथी।। (ज्ञानेश्वरी) असे आहे. महाराजश्रींच्या या काव्यात मातेच्या वात्सल्याचे मार्दव आहे, साधकाच्या हिताची तळमळ आहे, त्याला ज्ञानाचा मार्ग दाखविण्याची तगमग आहे. त्यांचे ‘वेड्या’ म्हणण्यामागे साधकाविषयीचा आत्यंतिक जिव्हाळा आहे.

अशा सद्गुरु सकलमताचार्य श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांचे पावन चरणी कोटी कोटी प्रणाम!

तू स्पंदन है

तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।
आलंबन है तू जीवन का,
मै सीता तू रघुनंदन है ।।

जड काया को निज माया से,
तू कर देता चलता फिरता ।
फिर बैठ स्वयं इस तन में तू,
देता उसको निज चेतनता ।
भवबंधन में तू ही तो है,
तू अपना ही भवभंजन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

इन प्राणों को प्राणित करने की,
केवल है तुझमें क्षमता ।
तू स्वयं अहंता है मेरी,
तू बन जाता मेरी ममता ।
मै चंदन हूॅं, तू गंध प्रभो,
आपना यह चिर गठबंधन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

निर्बुद्ध बुद्धी भी पाती है,
तुझसे ही अपनी चिन्मयता ।
चंचलता मन की तुझसे है,
तुझसे ही मन की तन्मयता ।
मैं कंकण हूॅं, कुंडल हूॅं,
औ’ तूं शुद्ध अमिश्रीत कंचन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

यह दृष्टि जिधर भी जाती है,
आती सम्मुख प्रभु की प्रभुता ।
है ‘ज्ञान’ सृष्टी के कण कण में,
प्रभु की सत्ता औ’ व्यापकता ।
मैं चुंबन हूॅं श्रीचरणों का,
तू दृढतर दृढ आलिंगन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

— श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज

वरील अर्थपूर्ण आणि भावपूर्ण काव्यामध्ये, जीव, जगत् आणि जगदीश्वर, हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, किंबहुना त्यांचे स्वरूप काय आहे, याचे वर्णन परमपूज्य श्री ज्ञानराज महाराजांनी विचक्षण बुद्धिकौशल्याने, त्या परमतत्त्वाचा आधार न सोडता, केलेले आहे. खरं तर, ‘नेह नानास्ति किंचन’, दुसरे असे काही नाहीच, एकच ब्रह्म सर्वत्र व्यापून उरलेले आहे. ब्रह्मापासून जीव, केवळ मायेच्या अविद्येमुळे वेगळा भासतो. सत्य हेच आहे की, ‘जीवो ब्रम्हैव नापर: ।’

भक्ताला ईश्वराचे अस्तित्व जाणवते, ते त्याच्या जीवनाचा सर्वाधार, त्याचे सर्वस्व म्हणूनच. जसे त्याच्या हृदयाचे स्पंदन असो, किंवा श्वासाचे येणे जाणे असो. हृदय जड आहे, पण त्याचे स्पंदन हे ईश्वरी चैतन्याचे प्रदर्शन आहे. श्वास जड आहे, पण त्याच्या येण्या जाण्याचा जो नाद आहे, ते जणू त्या इशचैतन्याचे ‘सोऽहं हंऽसः’ असे अनुगुंजन आहे. परमपूज्य श्रीजींच्या ‘अनुगुंजन’ या शब्दप्रयोगाने, भक्ताचे ईश्वराप्रतीच्या प्रेमभावाचे मार्दव प्रकट झाले आहे. जसे पतिव्रतेचे सर्वस्व जसा तिचा पती असतो, तसेच भाव भक्ताचे असल्याने, परम पूज्य श्रीजी म्हणतात, ‘मै सीता तू, रघुनंदन है ।’

उपनिषदांनी प्रतिपादित केलेले परमात्मतत्व परमपूज्य श्रीजी समजावून देत आहेत. ‘जड कायाको निज मायासे, तू कर देता चलता फिरता ।’ शरीर जड आहे, परंतु ईशचैतन्याच्या उपाधीशी झालेल्या संयोगामुळे, जीव (म्हणजेच चिदाभास) अस्तित्वात आला. तो आभास जरी असला, तरी त्यामधील ‘चिद्’ अंशाने शरीराला चलन वलन प्राप्त झाले. जसे विद्युत प्रवाहने पंखा फिरतो, दूरदर्शन संच चालतो, दिवा जळतो, इत्यादि.

हे चैतन्य तरी आले कुठून ? तर ईश स्वतःच शरीराच्या आनंदमय कोषात ‘कूटस्थ’ म्हणून वास करीत असतो. सूर्याची किरणे जशी सृष्टीला प्रकाशित करतात, तसाच हा कूटस्थ अंतःकरणाला प्रकाशित करतो, त्याची चेतनता देतो आणि जीवाचे कार्य सुरू होते. ही सर्व प्रक्रिया केवळ ईश चैतन्याचाच आविष्कार असला, तरी अज्ञानामुळे, अविद्येमुळे जीव ‘मी’ व ‘माझे’ या भावबंधनात अडकतो. बंधनात त्रासलेला जीव मुक्तीसाठी उपासनेचा, साधनेचा अवलंब करतो. तेव्हा तेथेही इशचैतन्यच आधारभूत असते. त्यामुळे साध्य प्राप्तीनंतर त्याचा परिणाम, ‘पाही आपणासी आपण’ असाच होतो. म्हणून पूज्य श्रीजी म्हणतात, भवबंधनात सांपडणारा ही तोच आणि भवभंजन करणाराही तोच !

प्राणही जड आहेत. पण त्यांना संचलित करणारे पुन्हा आत्मचैतन्यच आहे. शुद्ध ‘मी’ची जाणीव, हे आत्म्याचे स्वरूप आहे. पण अज्ञानाने, आसक्तीने ‘मी’चे ‘माझे’ झाले की त्याला ममत्वाचे रंग चढतात, जे बंधनकारक असतात. परंतु, तिथेही ‘असणे’चे ‘होणे’ होण्यास आत्मचैतन्यच कारणीभूत होते.

जीवाचे कुठलेही व्यवहार आत्मचैतन्याशिवाय होऊच शकत नाहीत. म्हणूनच पूज्य श्रीजी म्हणतात, या शरीराशी आत्म्याचे हे कायम स्वरूपाचे गठबंधन आहे, जसे ‘मै चंदन हूॅं, तूं गंध प्रभो ।’

ज्यामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राणी श्रेष्ठ ठरतो, ती बुद्धीही, खरंतर जडच आहे. तिची विवेकशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, ही केवळ आत्मचैतन्याची देन आहे. त्याचप्रमाणे मनाची चंचलता जशी आत्मचैतन्यामुळे प्रतीत होते, तशीच मनाची एकाग्रताही याचमुळे होते. यासाठी पूज्य श्रीजी उदाहरण देतात की, व्यवहारामध्ये कुडे, बांगड्या जरी दिसल्या, तरी त्या ज्यापासून झाली आहेत, ते मुळात शुद्ध अमिश्रित सोनेच आहे. जीवाचा (भक्ताचा) आणि शिवाचा (ईशाचा) संबंधही असाच आहे. सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात,
‘आत्मा जडाशी करि संगतीला ।
तेव्हांच तो कळतो जनाला ।।’

आत्मबोध झालेल्या भक्ताला आता सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. जिथे त्याची दृष्टी जाईल, तिथे केवळ प्रभुचे प्रभुत्व त्याच्या प्रत्ययाला येतं. सृष्टीच्या कणाकणामध्ये ईश्वराचीच सत्ता असल्याने, त्याच्या व्यापकतेची जाणीव प्रकर्षाने झाल्यामुळे, भक्ताच्या हृदयातील उत्कट प्रेमभावना उचंबळून येते. जसं पूज्य श्रीजी म्हणतात,
मैं चुंबन हूॅं श्रीचरणों का,
तू दृढतर दृढ आलिंगन है ।

उत्कट प्रेमाचा सुंदर आणि कोमल आविष्कार, पूज्य श्रीजींनी इथे वर्णिलेला आहे. असीम प्रेमाबरोबर ही संपूर्ण शरणागती आहे. अशा भक्ताला आलिंगन नेण्यासाठी तो दोनावर दोन भुजा घेऊन येतो, असं ज्ञानेश्वरी सांगते. आणि भक्ताला दिलेलं आलिंगनही किती दृढतर दृढ असतं, हे श्रीराधाकृष्णाच्या प्रेमभक्तीमध्ये पाहायला मिळतं.
‘श्रीहरिची जी चिन्मन छाया ।
मिठी देत तिथ दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवण राधिका कवण हरी वा ।।’
(— पूज्य वरदानंद भारती)

परमपूज्य श्रीजींच्या अशा अद्भुत आणि अलौकिक अपरोक्षानुभूतीतूनच हे सुंदर काव्य साकारलं आहे. त्यांच्या पावन मंगल चरणी कोटि कोटि प्रणाम !

श्रवणाची पर्वणी

सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.

श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.

जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.

१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.

इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.

तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.

१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.

२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.

३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.

परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम

जब तलक मैं था

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।

एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।

जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.

त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,

आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।

श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.

भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।

‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,

आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।

साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,

द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।

या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।

जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,

सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।

भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,

देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।

तसेच,

गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।

श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.

पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)

त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,

अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।

ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.

स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,

श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।

हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.

मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,

यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।

आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,

कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।

अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.

या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.

वो दिखा रहे हैं जलवा

वो दिखा रहे हैं जलवा, चेहरा बदल बदल के।
मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के ।।

देखी जो शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।
मिलने उन्हे चला है, दिल ये उछल उछल के ।।१।।

उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।
बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।।

शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।

जो पास आ गए हैं, वो दूर जा न पाऍं।
ऐ “ज्ञान” अब तुझे है, चलना सँभल सँभल के ।।४।।

सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु यांनी या सुंदर गझलेमध्ये ज्ञानी भक्ताची अपरोक्षानुभूती वर्णिलेली आहे. या ज्ञानी भक्ताला, सर्व भूतांमध्ये एकच आत्मा दिसतो आहे. मात्र त्याची बाह्यरूपे वेगवेगळी आहेत. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात, “वो दिखा रहे है जलवा, चेहरा बदल बदलके ।”

त्या आत्मारामाचा हा प्रताप आहे की, सर्वत्र एकच एक असूनही, स्थूलदृष्टीला त्याची वेगवेगळी रुपे दिसतात. श्रीजींनी आपल्या आणखी एका काव्यामध्ये म्हटले आहे की, “निर्विकार कहलानेवाले, प्रभु का रूप बदलते देखा।”

कठोपनिषदात ‘रूपं रुपं प्रतिरूपो बभूव’ असे म्हटले आहे. एकरूप असूनही आत्मा विविधतेने कसा दिसतो याचे, अग्नी, वारा यांची उदाहरणे देऊन सांगितले आहे. जसे देवघरातील नंदादीप मंदपणे तेवून सारे पाप नाहीसे करतो, तोच कधीकधी शाप होऊन दावाग्निच्या रूपाने येतो. दिवाळीला पणत्यांमधून वातावरण तेजोमय करणारा अग्नी, कधी आगीचे महाभयंकर रूप घेऊन विध्वंस करतो. पण अग्नी एकच असतो.

“मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के।”

सर्व ब्रह्मांडामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, सृष्टीमध्ये ज्या क्रिया घडत आहेत, त्या सर्वांचा केंद्रबिंदू हाच आत्माराम आहे. स्वामी वरदानंद भारतींनी सुद्धा आत्मारामाचे वर्णन काहीसे असेच केले आहे.
भूतांचे नाना विशेष ।
तरी आत्मा एकरस ।
गणती नसे त्रिज्यांस ।
केंद्र त्याचे एक राही ।।

सृष्टीमधील सर्व क्रियाविधी आत्मसत्तेवर चालतात. त्यामुळे एकच एक आत्मा, हा सर्वांचे अधिष्ठान आहे, केंद्रबिंदू आहे.

“देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”

साधनेच्या आणि तपाच्या बळावर जिद्दीने भक्त जेव्हा, बाह्य विषयांकडे धावणाऱ्या वृत्तींना माघारी वळवतो, अंतर्मुख करतो, तेथे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते. ज्ञानोबा माऊलींनी याचे फार सुरेख वर्णन केले आहे. माऊली म्हणतात,

परतुनी पाठीमोरे ठाके ।
आपणया आपणपे देखे ।
देखतया आपण या ओळखे ।
म्हणे तत्व हे, मी ।। (ज्ञानेश्वरी).

तोच भाव परम पूज्य श्रीजी येथे प्रदर्शित करत आहेत की,
“देखी है शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।”

या आत्मज्ञानी भक्ताला “अहं ब्रह्मास्मि”ची अनुभूती आलेली आहे. ब्रह्मच सर्वत्र व्याप्त असल्याने, समोरील दर्शनही ब्रह्मस्वरूपच आहे, हीच पक्की धारणा असल्यामुळे, मी आणि तो यांचा काहीच भेद नाही. म्हणून तो भक्त म्हणतोय, “देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”

आणि म्हणूनच आपुलकीच्या भावनेने, आपलेपणाने, “मिलने उसे चला है” पण कसा? तर, “ये दिल उछल उछलके।” अत्यंत आनंदाने, प्रेमभावना उचंबळून येऊन, त्याच्या भेटीला, मिलनाला हा समोरा जातो आहे. बऱ्याच कालावधीनंतर समोर आई दिसल्यावर, निरागस लहान मूल जसं आनंदाने उड्या मारीत तिच्याकडे धाव घेतो, तसा काहीसा भाव या काव्यपंक्तीमध्ये आहे.

उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर, आपली अतिशय जवळची प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली तर, आपण अत्यानंदाने, उत्स्फूर्तपणे तिला गळा भेट देतो. तिच्या हृदयाचा ठाव घ्यायचा, तर तिच्या डोळ्यात पाहून खोलवर ठाव घ्यावा लागतो. तेव्हाच अंतरंगातला भाव जाणवतो. याच भावनेने भक्त आत्मस्वरूपाला न्याहाळू लागला की, मनबुद्धी या उपाधीवरून नियंत्रण सुटून जातं आणि त्या सच्चिदानंदाच्या आनंदलहरींमध्ये तो चिंब होतो. “आनंदाचे डोही, आनंद तरंग” अशीच त्याची स्थिती होते. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात,
“बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।”

शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।

आरशात मी स्वतःला बघायला गेलो तर, तिथेही मला आत्मारामच दिसतो आहे. माझे स्वस्वरूपच मला दिसते आहे. कारण आत्मसाक्षात्कार झालेल्या ज्ञान्याला सर्वत्र व्यापक आत्माच दिसणार! “नेह नानास्ति किंचन” दुसरे काही नाहीच. हा ज्ञानी असला, तरी भक्त आहे. त्यामुळे आपले स्वस्वरूप आरशात पाहून त्याचा ऊर भरून आला आहे. या प्रतीतीसाठी त्याने जीवनभर “स तु दीर्घकाल नैर्यंतर सत्कारा सेवितो” या मार्गाने अपार कष्ट सोसलेले असतात. त्यामुळे “तो पाही आपणासी आपण” अशी अवस्था अनुभवताना उत्कटतेमुळे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे.

या काव्यपंक्तीचे दुसऱ्या तऱ्हेनेही चिंतन करता येणे शक्य आहे.

“शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।”

आपली बुद्धीही आरशासारखी स्वच्छ आहे. त्यामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते, तोच चिदाभास किंवा जीव. जीवाचा सहज भाव बहिर्मुख आहे. मात्र तो जेव्हा साधनेच्या बळावर ध्यानाने वृत्ती अंतर्मुख करतो, तेव्हा त्या जीवाला स्वतःचे बिंबस्वरूप – आत्मस्वरूप आनंदमयात दिसते, तेव्हा “पाही आपणासी आपण । आणि म्हणे ते तत्व मी” ही प्रक्रिया होते. आपल्याच सच्चिदानंद स्वरूपाला पाहून, उचंबळलेल्या अष्टसात्विक भावामुळे, अश्रू वाहायला लागतात. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे. खरे तर दृष्टीला आता दुसरे काही पाहायचे नाहीच. आता फक्त अनुभूती!

आपल्याच स्वस्वरूपाची, सच्चिदानंदाची अपरोक्षानुभूती भक्ताने घेतलेली आहे. त्याचा अविट आनंद तो भोगतो आहे. ह्या अमूल्य, अतुल्य आनंदापुढे बाह्य विषयानंदाची आता काही गरज राहिलेली नाही, त्यामुळे त्या सच्चिदानंद स्वरूपापासून जराही दूर जाण्याची भक्ताची इच्छा नाही. म्हणूनच परमपूज्य श्रीजी म्हणतात,

“जो पास आ गये है, वो दूर जा न पाये ।”

भाव दाटून आलेले आहेत. अष्टसात्विक भाव उफाळून आल्यामुळे अश्रू आवरत नाहीत. भक्त ही जी ज्ञानमयता अनुभवतो आहे, पण त्यामधील एक किंतु भक्ताला साशंकित करतो आहे की, या उत्कट भक्तीचा परिणामस्वरूप म्हणून आपण जर “तोच” झालो तर या सच्चिदानंदाचा आनंद भोगता कसा येईल? कारण जिथे सापेक्षता नाही, तेथे जाणीव होतच नाही. त्या आनंदसागरावर वृत्तीचे आनंद तरंग येणारच नाहीत. तटस्थता येईल. संत तुकोबाही या तटस्थतेला नाकारतात आणि म्हणतात,

“जळो माझी ऐशी बुद्धी, जी घाली मज तुजमधी ।
ऐसे करी विठाबाई, तुझे पाय माझे डोई।।”

जीव सुखी होण्याऐवजी सुखरूप होईल, ज्ञानी होण्याऐवजी ज्ञानरूप होईल. म्हणूनच परम पूज्य श्रीजी अतिदक्षतेने आणि विचक्षण बुद्धीने म्हणतायेत,

“हे ‘ज्ञान’ अब तुझे है, चलना संभल संभल के।”

सद्गुरूंनी ही अवस्था प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यांच्या अनेक काव्यांमधून त्यांनी त्यांनी ती प्रकटही केली आहे. जसे,
“निर्विकार कहलाने वाले प्रभू का रूप बदलते देखा ।
असंगता अपनी तजकर नभको भू से मिलते देखा ।।

वरील गजलेमध्ये साधकाला, या स्थितीची ओढ लागावी, असा “जलवा” परम पूज्य श्रीजींच्या शब्दांमध्ये आहे. आशीर्वादाची अपेक्षा करीत त्यांच्या पवित्र मंगल चरणी मी शरण आहे