मंतरलेली रात्र

काल ९ फेब्रुवारी, श्री प्रभुगादीचे पाचवे पीठाधीश श्री सिद्धराज माणिकप्रभु यांची ८६वी जयंती. अस्तित्वाचीही काही विशेष योजना होती की काल नेमका एकांत मिळाला. रोजची उपासना आटोपून, श्रीप्रभुंच्या फोटोपाशी हात जोडले आणि झोपेची तयारी केली.‌ अगदी त्याच वेळी श्रीप्रभु संस्थानाने उपलब्ध करून दिलेल्या “गुरुवाणी” ह्या प्रभुपदांच्या गीतांच्या, श्री सिद्धराज प्रभुंच्या सुरेल आणि दैवी स्वरांचा साज चढलेल्या अमुल्य ठेव्याची नेमकी आठवण झाली. ह्या पदांच्या ध्वनिमुद्रणाचा योग कसा जुळून आला, त्याची अत्यंत सुरस कथा श्रीजींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सविस्तर कथन केली आहेच. छान पैकी स्नान करून, श्रीप्रभुंसमोर सुवासिक अगरबत्ती लावून, दिव्याच्या मंद परंतु, सोनेरी प्रकाशामध्ये ध्यान लावून सहजासनात बसलो. श्री सिद्धराजप्रभुंच्या हयातीत त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधी झाले नाही, परंतुज्ञ ह्या गुरुवाणीसाठी निवडलेल्या त्यांच्या लोभस चित्रामध्ये दिसत असलेल्या, तंबोऱ्यावर फिरणाऱ्या उजव्या हाताच्या बोटांची जादूच जणू एखाद्या मखमली स्पर्श प्रमाणे माझ्या मनबुद्धीवर झाली आणि मन क्षणार्धात श्रीप्रभु मंदिरातील आनंद मंटपात जाऊन पोहोचले.

त्यावेळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री सिद्धराज प्रभु म्हणाले होते, की तुमच्या इच्छेनुसार मी श्रीप्रभुंची पदे म्हणेन, पण ती कोणत्याही इतर ठिकाणी न म्हणता श्रीप्रभु मंदिरातच म्हणेन. आणि ध्वनिमुद्रणाच्या तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून, त्यांची उपेक्षा करून आपल्या आवडत्या वादकांना घेऊन श्री सिद्धराज प्रभूंनी आपल्या दैवी स्वरामध्ये ही पदे अत्यंत भावविभोर होऊन गायली होती. काय मंतरलेली रात्र असेल ती. माणिक नगर म्हणजे संगीताचे माहेरघरचं आणि त्यातही श्री सिद्धराज प्रभुंसारखे सुरांचे आणि संगीताचे मर्म जाणणारे, आपल्या गायनाचे सर्व कसब पणाला लावून, श्रीप्रभुंच्या संजीवन समाधी समोर एकतानता साधत होते. तबल्यावरची ती मोहक थाप, टाळांची मंदमंद किणकिण, सारंगीची सुमधुर धुन, झांजांचा मोहक नाद, शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या शिष्यांची तोलामोलाची साथ आणि श्री प्रभुभक्तीच्या रंगात पूर्णतः रंगून जाऊन टीपेला पोहोचलेला श्री सिद्धराज प्रभुंचा धीर गंभीर आणि तितकाच मंजुळ स्वर. आवाजातील चढ-उतार, तालसुरांची सुरेख लयबद्धता, प्रत्येक पदागणिक द्विगुणित होणारा आनंद, सगळा आसमंत प्रभुभक्तीने भरलेला, ही वेळ, ही रात्र संपूच नये, असे उपस्थित सर्वांनाच वाटत असणार. त्यावेळी उपस्थित प्रभुभक्तांचे भाग्य किती थोर की, ह्या सुरेल भजनाचा आनंद त्यांना मनमुराद लुटता आला.

क्षणभर ती बैठक डोळ्यासमोर तरळून गेली. श्री सिद्धराज प्रभुंची तंबोऱ्याच्या तारांवरून सहजतेने आणि तितक्याच नजाकतीने फिरणारी ती सुकोमल बोटे, तंबोऱ्याची साथ सोडून मध्येच हातामध्ये धरलेला झांज, मनाच्या त्या प्रफुल्लीत अवस्थेत उंचावलेले हात आणि हातवारे, चेहऱ्यावरचे प्रफुल्लित स्मित, वादकांसोबतची डोळ्यांची नजरानजर, परस्परांना दिलेली दिलखुलास दाद, सर्व काही डोळ्यासमोर साकारत होतं. श्री सिद्धराज प्रभुंच्या ह्या गायनसेवेने अतिशय संतुष्ट झालेल्या श्रीप्रभुंच्या संजीवन समाधीतून फांकलेली चैतन्याची आभा श्री सिद्धराज प्रभुंचा चेहरा जणू उजळवून टाकत होती. त्या मैफिलचा मीही आता एक भाग झालो होतो. ती भावविभोरता, ती एकरूपता ह्या पदांच्या माध्यमातून अनुभवता येत होती. साधारण दीड तासांनी ही अवीट गोडीची संगीत सभा जेव्हा संपली, तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर निरभ्र आकाशामध्ये मध्यावर आलेल्या चंद्राचा शितल प्रकाश माझ्या डाव्या खांद्यावर पडला होता. रात्रीच्या गडद अंधारामध्ये आकाशातील चांदणे अजूनच मोहक वाटत होते. श्रीप्रभुंच्या तसविरीसमोर ठेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. ध्वनिमुद्रणाच्या रात्रीच्या वेळेसच्या त्या भरलेल्या वातावरणाचा तोच आनंद, तीच अनुभूती मला अनुभवायला दिल्याबद्दल, श्रीप्रभुचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले. रात्रीच्या त्या गडद अंधारामध्ये, त्या एकांतामध्ये भीतीचा लवलेशही मला जाणवला नाही. कानामध्ये मात्र श्री सिद्धराज प्रभुंचे “भजनी जो दंग, तोचि निर्भय” असे आश्वासक शब्द भरुन राहिले होते.

धरला हात सोडू नको

 

अपेक्षा नाही कसलीही, उपेक्षा कधीही करू नको,
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।धृ।।

चुकलेल्या पाडससम, मंगलमय तव स्थाना पावलो
बहु जन्माच्या सुकृते झाले तव दर्शन, धन्य जाहलो
कृपादृष्टी पाहिले, पदरी धरिले, दूर आता लोटू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।१।।

विषय वासना, दंभ, अहंकृती, जगण्याची हीच रीत
भजनांतून अनुभविली प्रभु, तुझी वात्सल्यघन प्रीत
स्वार्थी प्रपंचाचा हा कोलाहल, आणखी कानी नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।२।।

ठाऊक असे तुला माणिका, विचार मनीचे उच्छृंखल
दिसून न येत वदनी, परी उठे अंतरात घोर वडवानल
प्रलोभनांचे गाजर बहुगोड जरी, स्वाद चाखणे नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।३।।

घेतल्या कितीतरी आणाभाका, दिधली अनेक वचने
सर्वही तोडीली मोडीली, मोहाच्या घनघोर आक्रमणे
चुकलो जरी, भक्तकार्यकल्पद्रुम ब्रीद तुझे सोडू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।४।।

नाही पूजली तुळस, नाही ध्यायिला मंदिराचा कळस
तव भजनीही केला प्रभुराया, मी नानाविध आळस,
राजाधिराज योगिराज तू, कृपण मजप्रती होऊ नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।५।।

स्वच्छंदे व्यवहारे राहसि, सतत गुरुगंगा विरजा तीरी
करी कृपा मजवरी सत्वरी, माणिक मुक्तिनाथा हरी
स्थितप्रज्ञ अससी जरी, माया कर्दमी आता ठेवू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।६।।

श्रीगोविंद देव गिरिंचा सत्कार सोहळा

श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष, परम श्रद्धेय डाॅ. श्री गोविंददेव गिरी महाराजांचा श्री सज्जनगड संस्थानातर्फे जो हृदय सत्कार झाला तो सोहळा अनुभवताना वेगळीच धन्यता लाभली. परमात्मा पुरुष श्रीप्रभुरामचंद्राने आपल्या जन्मभूमी मंदिराच्या निर्माणच्या कार्याचे कोषाध्यक्षपद ज्या समर्थ गोविंदाचार्यांकडे सोपविले, त्यांचा सत्कार सकलमताचार्य श्रीज्ञानराज माणिकप्रभु यांच्यासारख्या अत्यंत सुयोग्य आणि आत्मसाक्षात्कारी पुण्यात्म्याकडून होणं, आणि तो सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभणं, हा दुग्धशर्करा योग श्री सज्जनगड संस्थानाच्या वतीने जुळून आला.

आज काल बरेच सत्कार सोहळे होतात. व्यक्तिनिष्ठ उदो उदो होतो. पण श्री गोविंददेव गिरी आचार्यांचा सत्कार सोहळा या सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरील ज्ञानी, प्रतिभावंत आणि मुख्यत्वेकरून आजच्या काळातही समाजाला जोडण्याची भाषा करणाऱ्या आणि त्यादृष्टीने सम्यक आणि अथक प्रयत्न करणाऱ्या विविध संप्रदायांच्या अर्ध्वयुंच्या उपस्थितीमुळे आगळा ठरला, वेगळा ठरला. कृतज्ञतेचा भाव सर्वच महानुभावांच्या आशीर्वाचनातून ओसंडून वाहत होता.

परमपूज्य श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी श्री समर्थ रामदासांचे वंशज श्री भूषण महाराजांसाठी ‘आदरणीय आणि परम आत्मिय’ असे संबोधन करून श्री माणिकप्रभु संस्थान आणि श्री सज्जनगड संस्थानाच्या परस्पर स्नेह सर्वांनाच जाणवून दिला. त्या ‘परम आत्मिय’ संबोधनात परस्पर प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आणि मायेचा ओलावा जाणवला. मराठी माझी मातृभाषा नाही, त्यामुळे पुणेकरांना मराठीत उद्बोधन करताना, जणू काही लंडनला जाऊन इंग्लिश बोलल्याप्रमाणे आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या, माझ्या व्याकरणाकडे लक्ष न देता, मुख्य भावाकडे लक्ष द्या, असे मिश्कीलपणे सांगताच, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

समर्थांचा रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय‌ आणि श्री माणिक प्रभुंचा दत्त संप्रदाय (सकलमत संप्रदाय) ह्या तिन्ही संप्रदायांचा त्रिवेणी संगम आपल्याला कार्यक्रम स्थळी झालेला दिसत होता. नेमका हाच धागा पकडून श्री ज्ञानराज माणिक प्रभुंनी आपण सर्व भक्ती मार्गाने परमेश्वररुपी एकाच धाग्यामध्ये गुंफले गेलेलो आहोत, असे प्रतिपादन केले.

श्री गोविंददेव गिरी महाराजांबद्दल प्रसंशोद्गार काढताना श्रीजी पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याकडे असलेला पैसा आपण आपल्या अत्यंत प्रिय आणि विश्वासू माणसाकडे ठेवायला देतो, तद्वतच श्रीप्रभु रामचंद्रांनी आपला कोष स्वामीजींकडे ठेवला. ही फार मोठी उपलब्धी आहे. आपला पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या कोषाच्या चाव्या देऊन, ज्यांचा भगवंताने आधीच सत्कार केला आहे, त्यांचा अजून सत्कार आम्ही काय करणार?

सर्वांना भेट देण्यात आलेल्या दासबोधातील खालील ओव्या उद्धृत करून श्रीजी पुढे म्हणतात,

संत धर्माचे धर्मक्षेत्र
संत स्वरूपाचे सत्पात्र
ना तरी पुण्याची पवित्र
पुण्यभूमी ।।

खरं पाहता, संत हेच खरे धर्मक्षेत्र आहे, तीच खरी पुण्यभूमी आहे. संतांच्या वास्तव्याने ते क्षेत्र अधिक पुण्यवान होते, कारण त्यांच्यामध्ये साक्षात् परमात्म्याचा वास असतो.

श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारदर्शक आणि सचोटीच्या व्यवहारामुळेच श्रीराम जन्मभूमी मंदिर दिमाखात उभे राहिले. अन्यथा आपल्या देशामध्ये सरकारी कारभार कसा चालतो याचा श्रीजींनी ‘शिवधनुष्य कोणी तोडले?’ हे मार्मिक, व्यवहारिक उदाहरण देऊन उलगडून सांगितले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटासह उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच देशातील रामाला न मानणाऱ्या काही अधर्मी, निधर्मी आणि विधर्मी लोकांचाही श्रीजींनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. राम म्हणजे नेमकं काय? ह्याचाही खुलासा श्रीजींनी आपल्या आशीर्वाचनात केला. श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना श्रीजींनी, त्यांच्या समाजातील नास्तिकता, अधार्मिकता मिटवण्याच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. त्यामध्ये आठ-दहा लाखांहून जास्त लोकांच्या हृदय मंदिरामध्ये गीता स्थापित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्री गोविंददेव गिरी महाराजांनी गीता परिवाराच्या माध्यमातून केले आहे, हे श्रीजींनी खास करून नमूद केले.

आपल्या आदरातित्थ्यशिलतेचा परिचय देताना श्रीजींनी अत्यंत प्रेमाने श्री गोविंद गिरी महाराजांना माणिक नगरास भेट देण्यासाठी हृदय निमंत्रण मंचावरूनच दिले आणि पुनःश्च त्यांचा गौरव केला.

सकल मत संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदासी संप्रदाय यांच्या तत्त्वज्ञानाचा सुरेख एकत्रित त्रिवेणी संगम ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला. आजच्या घडीला समाजात जे नकारात्मक, विश्वात युद्धाचे जे वातावरण आहे, त्याला छेद देत आपल्या दैदिप्यमान सनातन संस्कृतीची, तत्त्वज्ञानाची झलक ह्या हृदय सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली. श्रीजींसारख्या विद्वत्ताप्रचूर आणि प्रतिभावंत पीठाधीशांच्या आशीर्वचनाने सन्मान सोहळ्याची शान अधिकच वाढविली आणि उपस्थित सर्वच लोकांना धन्यता वाटली. जय जय हो सकलमता विजय हो…

श्रीप्रभु से प्यार

मणिगिरी की लाल मिट्टी का रंग लगने में, वक़्त तो लगता है
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

केवल प्रभुदर्शन की यह बात नहीं,
आदतन बाहर देखने वाली दृष्टि को अंदर मोडने में वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

केवल प्रसाद खानेकी बात नही,
अनेक जन्मों के ज्ञान की भूख मिटने मे, वक़्त तो लगता है
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

केवल गाना बजानाही नही
वेदांत सार से भरे हुए पदों का गूढार्थ समझने में, वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

केवल आचार विचार ही नाही,
प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

प्रभुवाणी का केवल श्रवन, पठन ही नहीं,
प्रभुको आत्मदृष्टी से, देखने में वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,

सत्यदर्शन घडवीसि गुरुराया

 

वेलघेवडा हेच उपजिविकेचे साधन
अज्ञानवश ब्राह्मण खरोखर मानून
घेवड्याच्या मुळाशीच होते निधान
उपटून दाविले श्रीगुरुंनी ।।१।।

अथवा नाना नाच्याचे वर्तन
स्त्रीपात्र वेशभूषेत करी नर्तन
प्रभु करी हरी-लीलांत परीवर्तन
स्वरूपदर्शन तया करवोनि ।।२।।

बहिरंग प्रचार वेष्टण आवरण
बाह्यांगाचा मोह मोठा विलक्षण
सत्यधर्मासी हेच खरे व्यवधान
सावधान अखंड याकारणे ।।३।।

करिसी समस्त जगताचे पोषण
अन् सृष्टीतील घडामोडींचे नियंत्रण
माणिका तुजवांचूनि जगत्रयी कोण
सर्वशक्तिमान ऐसा त्रिभूवनी ।।४।।

सत्याच्या स्वरुपास सोन्याचे आच्छादन
मजलाही सदोदित तयाचेच आकर्षण
हिरण्यमयी आच्छादन दूर सारून
सत्यदर्शन घडवीसि गुरुराया ।।५।।