by Pranil Sawe | Jul 26, 2026 | Uncategorized

या सच्चिद्गगनासारिखा मी नाही पाहिला
या सच्चिद्गगनासारिखा मी नाही देखिला ॥ध्रृ॥
मी बहुत धुंडियेले,
मी बहुत देखियेले,
मी बहुत अनुभवियेले, ऐसा नाही पाहिला ॥१॥
कधी गुफांमध्ये वसे,
कधी दरबारांत बैसे,
परी ऐसा निर्विकारी जगी, नाही पाहिला ॥२॥
वेडाभाऊ तो अज्ञानी,
परी ज्ञानियांचा ज्ञानी,
सकल वेदांत जो जाणी, ऐसा नाही पाहिला ॥३॥
काही नसे त्याचे पदरी,
परी लक्ष्मी लोळे द्वारी,
तो मनोवांछित सारे पुरवी, ऐसा नाही पाहिला ॥४॥
मनी ठेवि अकर्ता भाव,
सर्व दत्ताची ही माव,
भक्तांसाठी घेई धाव, ऐसा नाही पाहिला ॥५॥
हिंदू ख्रिस्ती मुसलमान,
भेद सांडूनिया जाण,
केले सकलमत स्थापन, ऐसा नाही पाहिला ॥६॥
भक्तकार्य कल्पद्रुम,
तो हा गुरु सार्वभौम,
जो माझा आत्माराम, ऐसा नाही पाहिला ॥७॥
जो जाई माणिकनगरी,
प्रभु त्यांचे हात धरी,
भवसागरी जो तारी, ऐसा नाही पाहिला ॥८॥
by Pranil Sawe | Jun 4, 2026 | Uncategorized

मातेसारखे कनवाळू, पित्यासारखे सांभाळ करणारे, श्री माणिकप्रभु अत्यंत कृपाळू आहेत. ते कुणाचीही आबाळ, उपेक्षा होऊ देत नाहीत. ‘आम्हाला धरता येतं पण सोडता येत नाही,’ हे श्रीप्रभुंचे अक्षय्य आश्वासन आहे. श्रीप्रभूंच्या अवतारकाळात अगणित लीला झाल्या. त्यातील काही छोट्या परंतु त्यातून मोठा बोध मिळणाऱ्या काही निवडक लीला आपल्या मनावर खोल परिणाम करून जातात.
हुमणाबादेत एक अभाविक गृहस्थ राहत होता. आजवरच्या अनेक लीलांनी श्रीप्रभूंची इतकी ख्याती सर्व दूर पसरूनही, तो स्वतः मात्र कधी श्रीप्रभूंच्या दर्शनाला जात नसे. उलट श्रीप्रभूंच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची निंदा करून, त्यांना फुकटचे हिणवीत असे, त्यांची चेष्टा करून, त्यांना नावे ठेवीत असे. असे असताना एक दिवस पायातील चप्पल हरवली म्हणून तो अस्वस्थ झाला. त्याने अनेक ठिकाणी शोधले, परंतु त्याला चप्पल काही मिळाली नाही. या अभाविक माणसाचा हरवलेला जोडा हा अत्यंत आवडीने घेतलेला अगदी नवीन कोरा करकरीत होता. त्यामुळे त्याला चप्पल हरवल्याचे अतिव दुःख होऊन, त्याच्या मनास त्याची चुटपुट लागून राहिली. अज्ञानी, लोभी आणि कंजूष अशा आपल्या स्वभावाला अनुसरून त्याने “जर मला माझी चप्पल मिळाली तर श्रीप्रभूस साखर वाटीन”, असा मनोमन नवस केला. त्यावर आणखी “जर माझी पादत्राणे आजच विनासायस मिळाली, तर श्रीप्रभूकडे स्वतः जाऊन साखर वाटीन,” असेही नवसाचे बोल तो बोलून गेला. पण असा नवस बोलताना आपल्या कंजूष स्वभावानुसार केवळ “दमडीची साखर” वाटेन, असे उद्गार त्याने श्रीप्रभूंच्याप्रती असलेल्या तिरस्कारपोटी काढले. अशा अज्ञानी जीवाला श्रीप्रभूंचे चरित्र, त्याची खोली कशी कळणार?
परंतु त्याच दिवशी त्या अभाविक माणसाला आपली चप्पल अनायसेच मिळाली आणि तो चपापला. आता मात्र त्याच्या मनात श्रीप्रभूंविषयी विचार येऊ लागले. आपण मनात विचार करत होतो, त्याप्रमाणे आजच्या आज चप्पल मिळाली. आपण सहजच दमडीची साखर वाटू असा नवस बोलून गेलो, परंतु आपल्याच अत्यल्प नवसाची त्याला लाज वाटू लागली आणि या विचाराने त्याला रात्री झोपही येईना. शेवटी दुसऱ्या दिवशी चार आण्याची साखर घेऊन तो प्रभूदरबारात श्रीप्रभूंच्या समोर उभा राहिला. चार आण्याच्या साखरेची पुडी त्याने श्रीप्रभूंसमोर उघडून ठेवली. ते पाहिल्याबरोबर श्रीप्रभूंनी त्याच्या मनातील नवसाप्रमाणे तात्काळ आज्ञा केली की, “ह्या साखरेतून दमडीच्या नवसाचा भाग तेवढा काढून घ्यावा,” असे म्हणून श्रीप्रभूंनी आपल्या एका शिष्याला बोलावून तराजू आणविला आणि त्या साखरेच्या पुडीतील दमडीच्या किंमतीची साखर तोलून घेतली. श्रीप्रभूंच्या या मनकवड्या कृतीने तो अभाविक माणूस गर्भगळीत झाला. ज्याच्या जैसा भाव, तशी श्रीप्रभूंची प्रसन्नता! त्या अभाविक माणसाच्या चपलेचा जोड तात्काळ सापडवून देऊन त्याचा नक्शा श्रीप्रभूंनी तात्काळ उतरविला होता. त्याच्या उपहास करण्याच्या वृत्तीस सर्व लोकांच्या समोर परस्पर श्रीप्रभूंनी अशी वेगळ्याच प्रकारे शिक्षा दिली होती. श्रीप्रभूंचा मनकवडेपणा आणि त्यांच्या सामर्थ्यांची, अधिकाराची साक्ष पटून पश्चातापाने तो श्रीप्रभूंना शरण गेला आणि आपण मला क्षमा करावी, असे म्हणून, तो वारंवार नमस्कार करू लागला. त्यावेळेस श्रीप्रभूंनी त्याला, “तुझ्या पादरक्षेसाठी माझ्या प्रभूला कष्ट पडले. त्याची कल्पना कदाचित तुला नसेल. आपल्या शुल्लक महत्त्वकांक्षेपोटी आपण प्रभुची परीक्षा घेतो, त्याला वेठीस धरतो. परंतु असे करणे योग्य नाही!” असे म्हटले. श्रीप्रभूंच्या ह्या सौम्य बोलामध्येही खास मेख दडली आहे. जरी श्रीप्रभूंचे वरील बोल वरवर खोचक असले, तरी त्यात उपदेशामृत ठासून भरलेले आहे. श्रीप्रभुंचे हे अमृतमय बोल कानी पडताच ऐकणाऱ्याच्या वृत्ती तात्काळ निवळतात. या छोट्याशा कथा भागातूनही समस्त मानव जातीला एक सुंदर बोध मिळत आहे. आपण देवाकडे काय मागतो, एखाद्या शुल्लक गोष्टींसाठी भगवंताला कशाप्रकारे नवस बोलतो, त्याची पूर्तता कशाप्रकारे करतो, त्याबाबतीत आपण किती प्रामाणिक असतो, याचा सुंदर आरसा ही प्रभुलीला आपल्याला दाखविते. त्याचप्रमाणे श्रीप्रभु हा भक्तवचनांप्रती किती दक्ष असतो असतो, तो भक्ताशी कशाप्रकारे जोडलेला असतो, मुख्य म्हणजे भक्ताचा भाव काय आणि कसा आहे, हे तो नित्य कशाप्रकारे तपासून पाहतो, हेही आपल्याला यातून घेण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे “तुझ्या पादरक्षा शोधण्यासाठी माझ्या प्रभुला कष्ट पडले,” असे जेव्हा श्रीप्रभु म्हणतात, तेव्हा ते या गोष्टींचे श्रेय स्वतः न घेता आपल्या दत्तप्रभुंना देतात. यावरून श्रीप्रभुंच्या ठाई असलेला “अकर्ता” भावही ठळकपणे निर्देशीत होतो. सहज सुंदर जीवन जगण्याचे बाळकडू श्री माणिक चरितामृत आपल्याला नित्य पाजत राहते.
तो अभाविक माणूस आता पश्चातापदग्ध झाला होता. श्रीप्रभूंचे बोल ऐकून तो अगदी सद्गदीत झाला होता. त्याच्या मुखातून शब्दही फुटेना. कसातरी धीर धरून त्याने आपला अपराध श्रीप्रभूंसमोर कबूल केला. “मी आधीच अल्पमती आहे, त्यात मद आणि अहंकारामुळे कारण नसताना आपली निंदा करीत होतो. परंतु आता मी सावध झालो आहे. आपली योग्यता, आपली महत्ता, आपला अधिकार मला कळून चुकला आहे. यापुढे मी अत्यंत काळजीपूर्वक वागेन. आपल्या चरणांचा दास होऊन प्रभुदरबारी पडेल ती सेवा करीन,” असे म्हणून तो मनुष्य श्रीप्रभूंच्या चरणी लागला. अशाप्रकारे तो निंदक श्रीप्रभूंचा भक्त बनला. एखादा पापी मनुष्यसुद्धा श्रीगुरुंच्या सान्निध्यात येताच उद्धरून जातो. “समस्त मानव जातीचे कल्याण,” हेच श्रीगुरुंच्या अवताराचे परमविशेष आहे. या अभाविक माणसासारखे कित्येक दुराभिमानी श्रीप्रभूंनी आजवर उद्धरिले आहेत.
वास्तविक पाहता श्रीप्रभूंची ही लीला अत्यंत छोटीशीच आहे. परंतु त्यातून फार मोठा धडा आपणा सर्वांनाच घेण्यासारखा आहे. त्या अभाविक माणसाने ‘आज जर मला चप्पल मिळाली, तर दमडीची साखर वाटीन,’ असे मनातल्या मनातच बोलला होता. इतर कोणासही ती गोष्ट ठाऊक नव्हती. परंतु चप्पल मिळाल्यावर केवळ दमडीची साखर आपल्या लौकिकास साजेशी होणार नाही, म्हणून तो चार आण्याची साखर घेऊन गेला. सर्वज्ञ श्रीप्रभूंनी त्यातील केवळ दमडीची साखर तोलून घेतली. आपणही बरेचदा संकटकाळांत किंवा एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी भगवंतासमोर अनेक नवस बोलतो, किंवा आपल्याला कोणी पाहिले नाही, कुणाला काही कळणार नाही, या भ्रमात अनेक गोष्टी करून जातो. श्रीप्रभुंना मात्र आपल्या केवळ कृतीच नाही, तर मनातले समस्त विचारतरंगही कळत असतात. त्यामुळे आपण भगवंतासमोर भावनेच्या भरात काय बोलून जातो, आपल्या मनांत काय काय विचारतरंग उमटत असतात आणि याबाबतीत आपण किती दक्ष, सजग असावे, याचा सुंदर परिपाठच ही छोटीशी प्रभुलीला आपल्याला घालून देते.
by Pranil Sawe | May 1, 2026 | Uncategorized

का ग जिव्हे घेसी न तू प्रभुनाम,
कैवल्यदायी पूर्णकृपेचे जे धाम ॥
परनिदेंस जिव्हा सरसर सरसावी,
प्रभुनाम घेण्या बोबडी का वळावी ॥
व्यर्थ वादविवादा शब्द उच्चारावे,
परी प्रभुनाम घेण्या मौनची व्हावे ॥
गोडधोड ओरपण्या लपलप धावी,
प्रभुनाम घेण्या आत का वळावी ॥
करी बा विचार, जिव्हेचा साचार,
प्रभुनामाचा कर तू त्वरित संस्कार ॥
वळव जिव्हेसि तू, मधुर माणिक नामी,
एक माणिक नामच येईल, सदासर्वदा तुझ्या कामी॥
by Pranil Sawe | Jan 29, 2026 | Uncategorized

श्री माणिक चरितामृत बोध
श्रीप्रभुंना प्राप्त करण्याचा सरळ मार्ग
श्रीमाणिक चरितामृत सहज दाखविते
भक्ती करा मनोहर बयांमामातेसारखी
जी प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांनाही प्रकटवते
सहृद बना त्या गोविंदा गवळ्यासारखे
जे मरणाच्या दारातूनही परत आणते
निस्पृह भूतदया करा भीमाबाईसारखी,
करुणाकर प्रभुस सदासर्वदा तोषविते,
कोमल भक्ती करा काळंभटजीसारखी
जी प्रत्यक्ष सांबालाही समोर प्रकटवते
सत्वपरिक्षेत खरे उतरा दीक्षितांसारखे
जे मलविष्ठेचेही सोने करून दाखविते
अचंचल श्रद्धा ठेवा व्यंकंमादेवीसारखी
जी सामान्यासही देवीपदी पोहोचविते
अनिवार ओढ भेटीची ठेवा प्रभुंसारखी
जी मूर्तीतून सगुण विठ्ठलास प्रकटवते
आत्मज्ञान प्राप्त व्हावे तुकारामासारखे
जी अविलंब समाधीसुख मिळवून देते
धूंद कलासक्त व्हा नाना नाच्यासारखे
जे नृत्यकलेतून हरिभक्तीस फुलविते
हाकेत आर्तता ठेवा व्यापाऱ्यांसारखी
साक्षात बुडणारे गलबतही तरवून नेते
पूर्ण शरणागत व्हावे विठ्ठलरावासारखे
रंकाचाही रावसाहेब करवून दाखविते
निरागस मने प्रेम करा माणक्यासारखे
जे खोल विहरीच्या तळाशीही वाचविते
विश्वास ठेवा गुरुवरी डोंबाऱ्यासारखा
जो पहिलवानासही आस्मान दाखविते
प्रेमभाव हो टेहेळदास माऊलीसारखा
विक्राळ आगीतूनही सलामत वाचविते
चित्तशुद्धीचे सुरेख निधान हाती लागले
जे श्रद्धा ज्ञान आणि भक्तीस वाढविते
श्रीप्रभुंना प्राप्त करण्याचा सरळ मार्ग
श्रीमाणिक चरितामृत सहज दाखविते
by Pranil Sawe | Jan 25, 2026 | Uncategorized

श्रीजींच्या प्रवचनातून आपण एक गोष्ट अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे, एका अंध भिकाऱ्याला भगवंत प्रसन्न होतो आणि त्याला एक वर मागण्यास सांगतो. त्यावर तो भिकारी म्हणतो, “भगवंता, माझ्या नातवाला मी राजा म्हणून सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहू इच्छितो!” या एका वरामध्ये त्या अंध भिकाऱ्याने भगवंताकडून अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या. एक तर स्वतःला दृष्टी, स्वतःचे दारिद्रहरण, नातू व्हावा म्हणजे स्वतःचे लग्न, मुलेबाळे, त्यांची लग्न होऊन त्यांना मुलेबाळे. त्यातला एक नातू राजा बनून सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहणे, त्यासाठी लागणारे दीर्घायुष्य, इतक्या सगळ्या गोष्टी त्या भिकाऱ्याने भगवंताकडून एकाच वरात प्राप्त करून घेतल्या.
४७व्या अध्यायात रामचंद्रबुवा सोलापूरकर यांच्या पूर्वजांचा इतिहास ओवी क्रमांक १० ते २८ येथपर्यंत अत्यंत विस्ताराने वर्णन केला आहे. वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वर या मूळ गावचे यजुर्वेदी ब्राह्मण म्हणून रामचंद्रबुवांचा अगदी त्रोटक उल्लेख करता आला असता. परंतु, बुवांच्या कुळाचा मूळ पुरुष भीकदेवांना त्यावेळच्या परंपरेनुसार तीन आश्रमांनंतर संन्यास घेण्याची इच्छा झाली. परंतु संन्यास दीक्षा आपल्याला प्रत्यक्ष श्रीदत्त महाराजांनी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी माहुरगडी अत्यंत घोर तपश्चर्या आणि अनुष्ठान करून प्रत्यक्ष श्रीदत्तांनाच प्रसन्न करून घेतले. श्रीदत्तांनी वर माग, असे म्हणताच, भीकदेवांनी “माझ्या पुढच्या पिढीतील सर्वांना संन्यासदीक्षा घेऊनच चिरसमाधी मिळावी”, अशी याचना केली.
या एकाच वरामध्ये अनेक वरदाने भीकदेवांनी श्रीदत्त महाराजांकडून प्राप्त करून घेतली. ‘माझ्या पुढच्या पिढीतील सर्वांना’ – येथे त्यांनी आपला वंशविस्तार पिढ्यान् पिढ्या सुरू राहील, प्रत्येकाला मुलेबाळे होतील, असा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. त्याचबरोबर त्यांना संन्यासधर्म स्वीकारल्यावरच समाधी मिळावी, येथे भीकदेवांनी आपल्या वंशातील पुढच्या पिढीच्या दीर्घायुष्याची याचना केलेली दिसते, कारण शास्त्रानुसार ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास असे चार आश्रम वर्णिले आहेत आणि प्रत्येक आश्रम स्वीकारून संन्यास घेईपर्यंत जवळपास वृद्धापकाळ जवळ येतो. त्याचप्रमाणे येथे आपली पुढची पिढी ही शास्त्रसंमत धर्माचरण आचरण करेल, असे अभिवचनही भीकदेवाने श्री दत्तात्रेयांकडून मिळविले. आपल्या पुढच्या पिढीने ही धर्मरक्षण करावे, आपल्या परंपरा जपाव्या, धर्ममार्गावर चालावे, ही भीकदेवांची तळमळही आपल्याला येथे जाणवते.
श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वाद स्वरूप भीकदेवांच्या पुढच्या पिढीत रंगनाथ स्वामी, पूर्णानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी असे अनेक सिद्ध पुरुष झाले आणि त्या सर्वांनी शेवटी संन्यास दीक्षा घेतली. यातील पूर्णानंदस्वामींनी तर अनेक चमत्कार केले आणि लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाले. रामेश्वरला जाताना सोलापूरच्या पुढे वाटेतच रामचंद्रबुवांच्या मृतप्राय पत्नीलाही श्री माणिकप्रभुंनी जीवदान दिले. पुढे रामचंद्रबुवांनी रामेश्वरला जाण्याचा बेत रहित करून काशीच्या गंगेने श्रीप्रभुंनाच अभिषेक घातला. बुवांची चारधामाची यात्रा रामेश्वर दर्शनाने पूर्ण होणार होती. आधीचे तीन धाम पूर्ण करून, आपली चारधामाची यात्रा रामेश्वरऐवजी माणिकनगरी श्रीप्रभुंचे दर्शन घेऊन पूर्ण केली. यावरून श्रीदत्तांनी दिलेला आशीर्वाद आपल्यला पिढ्यान् पिढ्या फळतो, हेही लक्षात येते.
त्यामुळे आज आपल्याला प्राप्त झालेले गुरुचरण आणि लाभलेली गुरुभक्ती यात आपापल्या पूर्वजांचाही अप्रत्यक्ष सहभाग असतो, हेही आपल्या लक्षात येते. कदाचित त्यांनीही अशीच प्रार्थना त्या वैश्विक शक्तीकडे केली असावी. त्यामुळे आपल्या पूर्वजांचे नित्यनेमे स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून श्राद्धादि कर्मे करणे, हेही आपले कर्तव्य आहे. धर्म रक्षणाच्या, परंपरा जपण्याच्या, छोट्या छोट्या बाबीही ग्रंथकार राघवदासांनी श्रीमाणिक चरितामृतात अगदी विचारपूर्वक गुंफल्या आहेत.
Recent Comments