प्रभू जवळ येतील

प्रभूंना बाहेर शोधणारी माणसं आणि स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना अनुभवणारी माणसं या दोघांमधला फरक तुम्ही कधी पाहिला आहे? कधी अनुभवला आहे का? पहिल्या प्रकारात जिथे मूर्ती, तिथेच प्रभु. परिणामी, जितका वेळ आपण मूर्तीसमोर असतो, तितकाच वेळ प्रभूंची अनुभूती टिकते. एकदा का मूर्ती नजरेआड झाली की—“मूर्ती हटी, दुर्घटना घटी!” मनात शेकडो अनुत्तरित प्रश्न असतात आणि ही माणसं कायम त्यातच भरकटत राहतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रभूंनी द्यावीत, आपल्या मनासारखं घडवावं आणि शक्य असेल तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं कॉन्ट्रॅक्टही प्रभुनेच घ्यावं—अशी अपेक्षा असते!

ही मंडळी इतरांना माणिकप्रभू म्हणजे काय, ते किती दिव्य आहे वगैरे उत्तम सांगू शकतात. पण त्या सगळ्या भक्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील सद्गुणांचं Capital Investment किती वाढलं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झाला की नाही—हे मात्र विचारायचं नसतं! दुसऱ्या प्रकारात, स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न आपोआपच सुटू लागतात. कारण माणिकप्रभु त्यांच्यासोबत केवळ मंदिरात नाही, तर चोवीस तास त्यांच्या आचार-विचारांत असतात.सर्वांत आधी सुटणारा प्रश्न बहुधा राग, लोभ आणि मत्सराचा असतो. याच विकारांतून हेवेदावे, भाऊबंदकी, नात्यांमधील दुरावा आणि कुटुंबव्यवस्थेतील बिघाड निर्माण होतात. पुढे त्यातूनच सामाजिक अस्वास्थ्य वाढत जातं.

याउलट प्रेम, स्नेह, जिव्हाळा, करुणा आणि कृतज्ञता हे दैवी गुण दुसऱ्या प्रकारातील माणसांच्या जगण्याचाच भाग बनतात. प्रभूंचे गुण स्वतःमध्ये उतरवले की प्रभुही भरभरून देणारच ना! मग तिकडून “देते जावं देते जावं आणि इकडून “घेत जावं घेत जावं असं जगण्याच्या समृद्धीचं जबरदस्त कॉम्बिनेशन तयार होतं शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?

प्रभूने दिलेल्या या जीवनाचा भरभरून उपभोग घेणं, प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञ राहणं आणि आपलं जगणंच आनंदाचा सोहळा बनवणं. या पलीकडे आयुष्य म्हणजे आणखी काय असतं? तुम्ही एक पाऊल प्रभूंच्या जवळ आलात तर ते दहा पाऊल तुमच्या जवळ येतात आणि प्रभूंनी म्हटलेच आहे !!आम्हाला धरता येते पण सोडता येत नाही!

दंड योजना

‘आटपाट नगर होतं.तेथे एक सत्शील गरीब ब्राह्मण रहात होता’…अश्या श्रावण कथांमधून मोठे झालेले आम्ही, व्रत महिमा मंडीतकारी होतो.

काळ बराच मागे निघून गेला तसा रूपया बरोबर मूल्यांचे ही अवमूल्यन झालेले पहात आलो आपण. मग ती वैचारिक भेसळ असो किंवा खाद्यपदार्थांची! आजही तुकारामांचा कळस क्रमप्राप्त आहेच.लढा दिल्याशिवाय सोन्यालाही झाक येत नाही हे तंतोतंत खरे आहे.

आज गुरुगंगा नदीवर झालेले प्रदूषित आक्रमण कोणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यासाठी सजग असणारे आदरणीय श्री आनंदराज महाराज आणि आदरणीय श्री चैतन्यराज महाराज यांच्या सशक्त नेतृत्वाखाली भव्य लोकसमूह एकत्रित झालेला पाहिला. दोन्ही सन्मानियांची देहबोली रोखठोक असली तरी दोन परस्पर विरुद्ध गुणांचा कमाल मिलाफ आढळला.भाषेतला अत्यंत संयम पण तेवढीच दमदार तडफ. दुर्मिळ संगम! आज पुनश्च एका दासबोधातील ओवीचे दर्शन घडले.
हे धकाधकीची कामे।तिक्ष्ण बुद्धीची वर्मे।भोळ्या भावार्थे संभ्रमे।कैसे घडे।।19.7.19।।

केवळ भोळी श्रद्धा ठेवून कामं होत नाहीत, तिक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखुन करणे अपेक्षित असते त्याचा प्रत्यय या उठावातून जाणवला.

काही शतकांपूर्वी प्रभूंनी नेटका सामना करण्यासाठी दंड अभिमंत्रित करून दिले होते. ते दंड आजही या सशक्त नेतृत्वाच्या हाती आहेत– माईकच्या स्वरूपात, जनजागृतीच्या स्वरूपात. आजही प्रभूच या उभयतांच्या स्वरूपात ठाम उभे आहेत निःशंक!! श्रीजींचा अभय वरदहस्त आहेच. आपल्या या कार्यास अनेक शुभेच्छा.

प्रभु का बाल रूप

कोमल कोमल पग से प्रभु आँगन में खेल रचाते थे,
देखने प्रभु का बाल रूप भगवान भी छुपकर आते थे।

वृंदावन का कृष्ण भयो है, हर नर-नारी कहते थे,
बाल प्रभु को गोद में लेकर उसकी बलैया लेते थे।

कहता कोई राम रूप है, दस्तगीर कोई कहता है,
जैसा भाव प्रकट होता, प्रभु उसी रूप में होते हैं।

छवि देखकर प्रभु की सारे , कष्ट दूर हो जाते हैं,
खेल-खेल में कई दिनों तक प्रभु गुप्त ही रहते हैं।

मन्नत सबकी पूरी होती, खाली ना कोई जाता है,
हर मर्ज की दवा प्रभु है, उसका माणिक नाम है।

धन्य हुआ कल्याण ग्राम और पावन हो गई भूमि है,
धन्य हुई ये मिट्टी, जिसमें प्रभु नाम की खुशबू है।

सुखाचे माहेरघर

आपण सगळ्यांनीच श्री आनंदराज महाराजांचे पुण्यातील ते व्याख्यान ऐकले असेल, ज्यामध्ये त्यांनी श्री माणिकनगरला “सुखाचे माहेरघर” म्हणून संबोधले आहे. कारण तिथे भगवान दत्तात्रेय हे स्वतः भक्तकार्यकल्पद्रुम बनून श्री माणिकप्रभूंच्या रूपामध्ये भक्तांच्या आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक उद्धारासाठी निरंतर तेथे विराजमान आहेत. त्या व्याख्यानामध्ये महाराजांनी जे काही संबोधले आहे त्या सर्व आपल्या भक्तांच्या मनातील भावना आहेत.
माणिकनगर काय आहे, कसे आहे, आणि तिथे कोणते सुख आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एकदा तरी तिथे जावेच लागते. हे क्षेत्र, हा अनुभव आपण कुणाच्या सांगण्यावरून अनुभवू शकत नाही. आणि हेही तितकेच सत्य आहे की हा लेख वाचणारे तुम्ही वाचक हा अनुभव घेऊनच बसलेले आहात. कारण एक दिवस तिथे जाणारी व्यक्ती तिचा अनुभव सांगताना थकत नाही, तुम्ही तर सर्वजन तिथे बऱ्याच वर्षांपासून जात आहात, तुमचा अनुभव सर्वांत जास्ती आहे यात शंका नाही.
मग हा लेख लिहिण्यामागचा उद्देश काय? हा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की करडखेड येथे श्री प्रभू गादी आहे, आणि त्या प्रभू गादीची सेवा करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे—याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.
एकेदिवशी पहाटे श्री प्रभू गादीची नित्य पूजा चालू होती, व पूजा पद्धती ही माणिकनगर सारखी च आहे. आणि मनात आनंदराज महाराजांचे ते भाषण आठवत होते. तेव्हा एक विचार मनात आला—माणिकनगर हे केवळ सुखाचे माहेरघर नाही, तर ते आमचे आध्यात्मिक शिक्षणाचेही माहेरघर आहे.
वर्षातून अनेक वेळा आपण माणिकनगरला जातो. राजोपचार पूजा आणि विविध संस्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. आणि जेंव्हा – जेंव्हा आपण माणिकनगरमध्ये असतो, तेंव्हा प्रत्येकासाठी ते दिवस खऱ्या अर्थाने “माहेरसुखाचे” असतात—मग ती स्त्री असो, पुरुष असो वा एखादा बालक असो.
पण यामध्ये मला नवल याच वाटतं ते म्हणजे—या माहेरसुखाच्या दिवसांमध्ये आपण नकळतपणे श्रीजींकडून खूप काही शिकत असतो.
घरात प्रभू गादी असल्यामुळे नित्य पूजा-अर्चना होतच असते. पण मी स्वतः दररोज हा अनुभव घेतला आहे की आपण आपल्या घरी माणिकनगरच्या पूजेच्या पद्धतींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही तुमच्या घरी असा अनुभव आला असेल—आपण शक्य तेवढे प्रयत्न करतो की आपल्या घरातील प्रभू विग्रहाची, प्रभू समाधी सारखीच जमेल तशी सुंदर पूजा कशी करता येईल, प्रभू मंदिरात होणारे नित्य सातवारांचे भजन जरी आपण आनंदराज महाराजांसारखे गाऊ शकत नसू, तरी त्यांच्या शैलीत गाण्याचा प्रयत्न करत असतो, तसेच घरातही प्रभू मंदिरासारखी स्वच्छता, शांतता व प्रसन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
आणि गंमत म्हणजे आपण इतके भावनेत गुंतलेले असतो की आपण इथेच थांबत नाही, तर घरात माणिकनगरसारखा प्रसाद म्हणजेच वरण-भात बनवण्याचाही प्रयत्न करतो! हे थोडे हास्यास्पद वाटले तरी त्यामागची भावना मात्र अत्यंत निर्मळ आणि प्रेमळ असते.
खरं तर त्यांच्या पद्धतींचे पूर्ण अनुकरण करणे आपल्यासाठी शक्य नाही. पण श्रीजींसारखी पूजा करण्याची ही जिज्ञासा आपल्याला आई आणि नुकतीच सासरी गेलेल्या मुलीच्या नात्याची आठवण करून देते.
जशी नवीन सासरी गेलेली मुलगी विविध खाण्या – पिण्याचे पदार्थ करून सासरच्या मंडळीचे मन जिंकू पाहण्याचा प्रयत्न करते, आणि माहेरी आल्यावर आईकडून नवीन रेसिपी शिकत असते. लग्न होण्याच्या आधीपासून आई मुलीला पुढे अडचण येऊ नये म्हणून नेहमी शिकण्याचा आग्रह करत असते, पण तेंव्हा ती त्याकडे दुर्लक्ष करते. सासरी अडचण आली की तेंव्हाच तिला आई आठवते. —तशीच आपलीही अवस्था आहे. आपणही आपल्या माहेरघरी, म्हणजेच माणिकनगरला जाऊन आपल्या “आई” म्हणजेच श्रीजींकडून पूजा पद्धती, पूजेसाठी लागणारे साहित्य, इत्यादी शिकतो आणि घरी परतल्यावर त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. श्रीजी देखील अडचण येण्याच्या आधीपासून नेहमीच प्रभुनाम घेण्यास सांगतात, पण आपणही संकट आल्याशिवाय ती गोष्ट रुजवून च घेत नाही—अगदी त्या सासरी गेलेल्या मुलीसारखीच.
मी माझ्या वडिलांना, प्रभू गादी साठी हे अनुकरण करतांना पाहिले आहे. प्रभू समाधीसाठी वापरले जाणारे अत्तर, फुले, पूजेची पद्धत, विविध अलंकार—यांचे ते अनुकरण करून प्रभू गादीला प्रभू समाधीसारखेच भासविण्याचा प्रयत्न करतात. सतत प्रयत्न करणे की आपला मंदिर परिसर माणिकनगरसारखा कसा होईल. जरी ते पूर्णतः शक्य नसले तरी ती भावना मनाला अपार समाधान देते.
अखेर, माहेर हे माहेरच असते. आपण आपल्या आईकडून कितीही शिकलो तरी ती आईच असते व आपल्यापेक्षा ती नेहमी वरचढच असते. तसेच श्रीजींकडून कितीही शिकलो तरी त्यांच्यासारखी पूजा करण्याचे सामर्थ्य आपल्यात नसते. पण आपल्या गुरूंसारखी पूजा करण्याची जिज्ञासाच श्री प्रभूंना अत्यंत प्रिय असते, असे मला वाटते.
माणिकनगरात (माहेरात) असतांना आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने निरीक्षण करून शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि घरी परतल्यावर ( सासरी ) त्या पद्धतीने प्रभू गादीची पूजा करण्याची उत्सुकता मनात असते—जणू त्या प्रभुरूपी सासऱ्याला प्रसन्न करण्याचीच इच्छा असावी.
ही भावना, हा क्रम मला अत्यंत छान वाटतो—तिथे शिकायचे आणि इथे आचरणात आणायचे. एकच श्री प्रभू आपल्यासाठी दोन भूमिका निभावतात—माणिकनगरात ते माहेरचे होतात, तर आपल्या राहत्या गावी ते सासरचे होतात. तिथे ते शिकवतात, आणि इथे येऊन आपण किती शिकलो याची परीक्षा घेतात.
या दुहेरी नात्यात जगण्याचा आनंद काही वेगळाच आहे!
माणिकनगरचे अनुकरण करण्याची आम्हास लज्जा नाही तर ते आमचे भूषण आहे. कधी – कधी वाटतं हा संप्रदाय आम्हास लाभला, असे गुरु लाभले, गेल्या जन्मी असे कोणते पुण्य आम्ही केले असावे, हे प्रभूच जाणे. सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून करणाऱ्या व्रतासारखे, सात जन्म हाच संप्रदाय, हेच गुरु मिळावे अशा व्रताची माहिती असली असती तर या जन्मी हे व्रत करून पुढच्या सात जन्मी देखील हाच संप्रदाय, हेच गुरु, हेच क्षेत्र मागून घेतले असते. कारण या एका क्षेत्राबद्दल मन इतकं आकर्षित आहे की हे सोडून जावे अशी भावना च मनाला पटत नाही. पण मग एक गोष्ट आठवते की इतके चांगले, संपूर्ण गुरु मिळाले असतांना दुसरा जन्म कशाला हवा, याच जन्मी मुक्त होऊयात की!
असो हा मनातला द्वंद्व तर चालतच राहील, आता लेखणीला विराम द्यायची वेळ आली.
एक प्रभू भक्त म्हणून तुम्हा सर्व बंधू – भगिनींना एकच सांगावेसे वाटते की अवश्य एकवेळेस माणिकनगरास भेट द्या. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरे सुख कशात आहे हे अनुभवाल. तो प्रभू इतका दयाळू व सुरेख आहे की तुमचा उद्धार केल्याशिवाय तो तुमचा हात कधीच सोडणार नाही. आणि आमच्या प्रभूची सवय आहे त्याला “धरता येते पण सोडता कधीच येत नाही ” , मला अस वाटतं की – “माणिकनगर का दर्शन किए बिना जीवन की यात्रा अधूरी है।” कारण हे प्रभूचे क्षेत्र, वैभव, पाहण्यासाठी आकाश – पाताळातील लोक हजेरी लावतात मग तुम्ही पृथ्वी वर राहणाऱ्यांनी एकवेळेस हजेरी तर लावलीच पाहिजे.
हा लेख लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे—माणिकनगरला जाऊन आपण फक्त सुख, आराम किंवा आनंद घेत नाही, तर त्या दिवसांत नकळत आपण प्रभू सेवेचे प्रशिक्षणही घेतो. आपण आपल्या गुरूंकडून भक्ती आणि सेवापद्धती शिकतो.
म्हणूनच माणिकनगर आमच्यासाठी केवळ सुखाचे माहेरघर नाही, तर आध्यात्मिक शिक्षणाचेही माहेरघर आहे.

आभाळमाया

आभाळासारखे
सद्गुरू माझे
प्रेम तयांचे
आभाळमाया

तापत्रयांचा
जाच मज कैसा
अखंड असता
कृपेची छाया

वात्सल्य त्यांचे
सागरा इतुके
सोडता न ये
धरिता हृदया

दयेचे उदधी
पाहती भक्ति
अन्य नच काही
लागे अर्पाया

सेवा जरी पूर्वी
नसे मज घडली
तरी करुणानिधी
मज स्वीकारीया

गत पुण्ये सारी
फळासि आली
तेव्हा लाभली
ही आभाळमाया

हो श्रीप्रभुराया

हे ध्यान तुझे किती सुंदर हो श्रीप्रभुराया
दे सन्मती मजला सद्गुण तुझिया गाया

काम क्रोध वसती मनी मजला हो खाया
तारी प्रभो मजला, जातसे मी असा वाया

पदोपदी फसवी मज, दूर्धर ही तव माया
यमदूतही बसले टपूनि मजला हो न्याया

वारूनि संकट हे तारी मजला श्री गुरुराया
तनमन माझे सर्वही अर्पण तव निजपाया

भक्तांस्तव झिजवी नित्य तुझी ही काया
अससी सदा तत्पर घास कृपेचा भरवाया

दरवळ तव नामाचा जैसा सुगंधित फाया
दे स्फुरण अंतरी तारक नाम तुझे घ्याया

कृपादृष्टी मजकडे पहा हो श्री प्रभुराया
आनंदे ओवाळीन तुजवरूनि मम काया

हे ध्यान तुझे किती सुंदर हो श्रीप्रभुराया
दे सन्मती मजला सद्गुण तुझिया गाया