वेदांत सप्ताह उत्साहात साजरा

चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभु महाराजांनी आपल्या कारकिर्दीत निर्गुण निराकार अशा चैतन्यतत्वाला अग्रस्थानी ठेवणाऱ्या, सर्व जातीधर्मांना ज्ञान आणि भक्तीच्या एकाच समान सुत्रात घट्ट बांधणाऱ्या सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ह्याच निर्गुण निराकार तत्वाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी ह्या उदात्त हेतूने, श्री माणिकप्रभुंनंतर श्री सकलमत संप्रदायाचे तृतीय पीठाचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु ह्यांनी १९०० साली माणिकनगरला प्रथम वेदांतसप्ताह आयोजित केला होता. त्यानंतरचे पीठाचार्य श्री शंकर माणिकप्रभु ह्यांनी त्यात शिस्तबद्धता आणली. त्यानंतरचे पीठाचार्य श्री सिद्धराज माणिकप्रभु व सध्याचे पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु ह्यांनी त्यात कालानुरूप बदल घडवल्याने वेदांत सप्ताहाचा दैदिप्यमान सोहळा आपण सांप्रतकाळी अनुभवू शकतो. सन १९०० साली पहिला वेदांत सप्ताह पार पडला होता. यावर्षी वेदांत सप्ताहाचे १२३ वे वर्ष होते.

ह्यावर्षी वेदांत सप्ताहाची सुरूवात दि. ०९ मार्च २०२३ रोजी श्री शंकर माणिकप्रभुंच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाली. वेदांत सप्ताहकाळात वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदाद्वारे श्री भागवताचे पारायण, जे ह्या सप्ताहाचे मुलभूत अंग आहे, तसेच श्रीगुरुचरित्र आणि श्री माणिकप्रभु चरितामृताचे सामुहिक पारायण सुमारे १८० सद्भक्तांच्या सहभागात अगदी उत्साहाने पार पडले. संगीताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणिकनगरात वेदांत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विविध वाद्यांची विधीवत पूजनही होते. संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच त्यानंतर सप्ताहातील सात दिवशी सात वारांचे भजन अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकार आणि कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. यानंतरही माणिकनगरच्या आसपासच्या गावातील भजनी मंडळांनी संपूर्ण रात्रभर रात्रीभजनाची सेवा प्रभुचरणी अर्पण केली. वेदांत सप्ताह काळात रात्रीसुद्धा प्रभुमंदिर उघडे असते. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी श्री मार्तंड माणिकप्रभु पुण्यतिथीनिमित्त आराधना संपन्न झाली.

वेदांत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री माणिकप्रभु चरित्र व संप्रदायाच्या साहित्यावर आधारित माणिक क्विझ आयोजित करण्यात आले होते. भागवतात सांगितल्याप्रमाणे सप्ताह पारायण नंतर रात्री जागरण करुन‌ हरीनाम संकीर्तन करावयाचे असते. त्यालाच अनुसरून अतिशय भव्य आणि दैदिप्यमान अशी दिंडी वेदांत सप्ताहात आयोजित करण्यात येते. सकलमत संप्रदायातील अनेक पदे वाद्यांच्या कल्लोळात, लयबद्धपणे म्हणताना संपूर्ण माणिकनगरची नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते. दि. १६ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास निघालेल्या दिंडीची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन झाली. ह्या वेळेस अनेक राज्यांतून आलेल्या शेकडो आबालवृद्ध भाविकांनी उस्फूर्तपणे दिंडीचा आनंद लुटला. संपूर्ण वेदांत सप्ताह काळात सहभागी सद्भक्तांची व्यवस्था श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली होती. आपल्या रोजच्या प्रपंचातून एक आठवडा, भगवंताच्या ज्ञान आणि भक्तीयुक्त सहवासात समग्रपणे व्यतीत करून, त्यातून उमटलेल्या आत्मानंदाचे प्रतिबिंब सहभागी प्रत्येक सद्भक्ताच्या चेहऱ्यावर झळकत होते.

महावस्त्र

प्रभुबंधन

लहानपणी मुलांच्या डोकीचे पागोटे किंवा धोतर यांनी प्रभु आपणांस झाडाशी बांधून घेत. खूप आवळून बांधल्यानंतर बघता बघता प्रभू त्यातून निसटून जात. केव्हा केव्हा धोतर प्रभुंच्या कमरेभोवती बांधून, दोन्ही टोकांकडे उभे राहून मुले खूप खेचून ताणून‌ धरत. धोतरास बळकट गाठ मारली जायची पण, प्रभु मात्र जसेच्या तसे मोकळेच असायचे !!!

मामा

एक दिवस दुपारच्या वेळेस प्रभु मामाच्या पलंगावर चादर पांघरून स्वस्थ झोपी गेले होते. मामा बाहेरून घरी आल्यावर मामांनी प्रभुंना उठवून प्रभुंच्या स्वच्छंदी वागण्यावरून त्यांनी प्रभुंना बरेच बोल लावले व तू आत्ताच्या आता माझ्या समोरून चालता हो, असे निर्वाणीचे सांगितले. प्रभुनांही प्रपंचामध्ये फारसा रस नव्हता आणि त्यांना ह्यातून बाहेर पडावयाचेच होते. मामांनी असे बोल लावल्यावर, हीच वेळ योग्य समजून, अत्यंत शांत आणि उल्हासित वृत्तीने प्रभुंनी आपले नेसलेले धोतर तेथेच फाडून, त्याची लंगोटी घातली आणि मामांना नमस्कार करून बाहेरचा रस्ता धरला.‌

व्यंकम्मा

प्रभुंनी व्यंकम्माचे निस्सीम आणि शुद्ध प्रेम जाणले होते. एकदा प्रभुंनी व्यंकम्माची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एके समयी स्त्री स्वभावाला अनुसरून व्यंकमा नग्न होऊन स्नान करीत होती. अशावेळी प्रभुंकडून निरोप आला की, “असशील तशी निघून ये!” हा निरोप कानावर पडताच, ती देहभान विसरून तशा स्थितीतच प्रभुंकडे यावयास निघाली. प्रभुंच्या मातोश्रींस हे वर्तमान कळल्याबरोबर त्याही मागोमाग निघाल्या. त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. हेच एकदा नाहीसे झाले तर स्त्रीत्व कसे राहणार? पण तशाही स्थितीमध्ये व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून प्रभुपुढे येऊन उभे राहावयास तयार झाली हे पाहून, ती जवळ येण्याची वाट देखील न पाहता प्रभुंनी आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून व्यंकम्माच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रींकडे पाठवले. त्यावेळी व्यंकम्माचा खरोखर उद्धार झाला.

तुकाराम धनगर

तुकाराम धनगरला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, अशी इच्छा होती. प्रभुंनी त्याला आत्मरूप प्रतीति हा ग्रंथ वाचावयास देवून त्याची पारायणे करावयास सांगितली. कित्येक महिने उलटले, अनेक पारायणे होऊनसुद्धा आत्मरूप प्रतीति येईना म्हणून, एके दिवशी प्रभुसंन्निध येऊन ग्रंथ परत करून तो म्हणाला, “मला यातून काहीही अर्थबोध झाला नाही किंवा स्वस्वरुपाचे ज्ञान झाले नाही.” तेव्हा प्रभुंनी तुकारामाची समजूत काढून भंडारखान्यात जाऊन झोळीचा प्रसाद भक्षण करून येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्या अंगावरील घोंगडे त्याने प्रभुंजवळच ठेवले होते. तो निघून गेल्यावर, प्रभुंनी ते घोंगडे आपल्या अंगावर घेतले आणि काही वेळ स्वस्थ बसले. प्रसाद घेऊन परत आल्यावर त्याचे घोंगडे त्याला परत दिले. तुकाराम घोंगडे अंगावर घेऊन बसताच त्याच्या चित्तवृत्तीचा लय लागून त्याला समाधी लागली. आत्मस्वरूप साक्षात्कार म्हणजे काय असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळाला. घोंगडे पांघरूण तो आनंदभरात रंगून जाऊन डोलत राहिला.

अत्यंत रसाळ अशा श्रीप्रभु चरित्रातील प्रभुंच्या लीला वाचताना मन आनंदाने वारंवार उचंबळून येते. वरील वर्णिलेल्या चारही कथांतून आपल्याला वस्त्र ही सामायिक वस्तू दिसून येते. वरवर जरी ह्या सहज घडलेल्या प्रभुलीला दिसल्या तरी त्यात जीवनाचे सहज सुंदर सार दडलेले आहे. ही वस्त्रे म्हणजे जणू मायेचे पडदेच. या मा सा माया अर्थात् जी नाही ती माया. एकदा का ह्या मायेचे पडदे हटले की, आपल्याला आपल्या खऱ्या, मूळ स्वरूपाची जाणीव होते.

लहानपणीचे प्रभुंचे खेळ पाहिले, तर प्रभुंचे सवंगडी त्यांना धोतरामध्ये बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. पण साक्षात् दत्तावतारी असणाऱ्या ह्या परब्रह्म अवधूताला, ती माया कशी काय बांधू शकणार? मायेच्या पलीकडे असलेले प्रभु, धोतराच्या गाठीत न अडकता, कायम मोकळेच राहिले.

आपल्या मामाकडे असताना प्रभुंना विश्वाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या मायेतून बाहेर पडायचे होते. त्यासाठी मामांच्या गादीवर झोपल्यानंतर, मामांनी खरडपट्टी काढण्याचे निमित्त साधून, त्यांनी तत्क्षणी आपले धोतर फाडून त्याची लंगोटीमात्र चिंधी कमरेस गुंडाळली. येथेही कौटुंबिक नात्यांच्या मायेतले धोतररुपी पाश प्रभुंनी तिथल्या तिथे फाडून टाकून दिले.

व्यंकम्माच्या परीक्षेच्यावेळी वस्त्रे बाजूला ठेवून, नग्न होऊन आंघोळ करताना, न्हाणीघरातून असशील तशी निघून ये, ही प्रभुआज्ञा प्रमाण म्हणून धावत तशीच धावत निघाली. त्यावेळेसही जणू आपली अविद्यारूपी वस्त्रे काढून तिने न्हाणीघरातच ठेवली होती. प्रभुंनी धारण केलेले वस्त्र जेव्हा प्रभुंनी व्यंकम्माला लज्जा रक्षणासाठी दिले, त्या वस्त्राच्या केवळ स्पर्शाने व्यंकम्मा निःसंग झाली. तिचे मीपण तत्क्षणी विरले. त्यावेळेस व्यंकम्माचा जणू पुनर्जन्मच झाला. अविद्यारुपी मायेचे पडदे गळून जाऊन, दुरीत पार जळून जाऊन व्यंकम्मा धुतल्या तांदळाप्रमाणे सोज्वळ झाली.

तुकाराम धनगराच्या कथेतही आत्मरूप प्रतीतिची अनेक पारायणे करूनही तुकारामास स्वस्वरुपाचा काही बोध झाला नाही. पण आपले अविद्यारूपी मायेचे घोंगडे प्रभुंकडे देताच प्रभुंच्या केवळ स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या घोंगडीला परत धारण करताच, तुकारामाची तत्क्षण समाधी लागली. प्रभुंचा केवळ दिव्यस्पर्श झालेल्या वस्त्रांमध्येही किती अद्भुत सामर्थ्य असते, हे या आणि देवी भगवती श्री व्यंकम्माच्या कथेतून दिसून येते. श्रीप्रभु आपल्या मनबुद्धीवर असलेल्या विविध मायारुपी वस्त्रांना फेडून (अज्ञान दूर करून), अवधूत बनवून, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची निरंतर संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात.

आपल्या संजीवन समाधीच्या वेळीसही प्रभुंनी आपला उत्तराधिकारी निवडताना, आपला पुतण्या अर्थातच श्री मनोहर माणिक प्रभुंना थोड्यावेळ आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्याकडून पूजा आरती करून घेतली. अवघ्या सात वर्षाच्या बाल मनोहरावर प्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला पांघरविला. वयाच्या सातव्या वर्षापासून संजीवन समाधी घेण्याच्या, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत, श्री मनोहर प्रभुंनी संस्थानाचा कारभार, भव्य अशा श्रीप्रभु मंदिराचे निर्माण करण्यापासून, श्रीप्रभु समाधीची पूजा पद्धती तयार करून, श्री प्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाला मूर्त स्वरूप आणण्यापर्यंत अतिशय कुशलतेने सांभाळला. येथेही आपल्याला प्रभु स्पर्शाच्या वस्त्राच्या दिव्यतेची प्रचितीच दिसून येते.

आजच्या घडीला श्रीप्रभु जरी संजीवन समाधीत निजानंदमग्न असले तरी त्यांचे नामस्मरण, त्यांनी रचलेली पदे, श्रीप्रभुनंतरच्या पीठाचार्यांचे समग्र वाङ्मय, प्रवचने ही आपल्याला त्यांच्या स्पर्शरुपी ज्ञानवस्त्रांतच उपलब्ध आहेत.‌ ह्या दिव्य वस्त्रांचा स्पर्श आपणासही होऊन, आपली आध्यात्मिक उन्नती उत्तरोत्तर होत राहो, आपल्याला स्वस्वरुपाचे ज्ञान होवो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक.

मनस्वी अभिनंदन

माणिक नगरच्या श्री माणिक प्रभु हिंदी विद्यालयातील दहावीतील, कु. श्यामला गंगाधर बोलचटवार, ह्या माणिक नगरातील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय आंतरशालेय श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल कुमारी श्यामलाचे मनस्वी अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा… माणिक शिक्षेच्या फेसबुक पेजवर ही बातमी पाहिली आणि मनामध्ये सहजच श्री चैतन्यराज प्रभुंच्या द ग्लोरी ऑफ माणिक नगर (The Glory of Maniknagar…) कवितेतील ओळी नजरेसमोर तरळून गेल्या…. है प्रभू कृपा की छाव मे इस नगर का प्रत्येक घर…

तसे पाहिले तर भगवद्गीता पठण स्पर्धेत अनेक जण प्रथम क्रमांक पटकावतात मग कु. श्यामलाच्या या यशात विशेष असे काय बरे दडले आहे? कु. श्यामलाचा फोटो व्हाट्सअप वर येताच त्याला का बरे इतके लाईक्स मिळाले? ह्याचे उत्तर श्री सकलमत संप्रदायाच्या वाङ्मयात आणि  श्री माणिक प्रभु संस्थानाच्या गादीवर बसलेल्या सर्वच विद्वत्ताप्रचूर पिठाचार्यांनी जनमानसांवर आजवर केलेल्या संस्कारांमध्ये आहे. श्री माणिक प्रभु आणि त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या सर्वच पिठाचार्यांनी वेदांताचा प्रचार आणि प्रसार अगदी हिरीरीने केला. श्री शंकर माणिक प्रभुंनी प्रथम हिंदी विद्यालयाची स्थापना माणिक नगरात केली. श्री शंकर माणिक प्रभुंचे ज्ञानशांकरी म्हणून वेदांतावर भाष्य असलेले लेखांच्या संग्रहाचे पुस्तक संस्थानाने प्रकाशित केले आहे. आज त्याच शाळेच्या कु. श्यामलाने भगवद्गीता पठण स्पर्धेमध्ये दैदिप्यमान असे यश मिळवले आहे. वेदांत सप्ताहामध्ये किंवा पौर्णिमेच्या प्रवचनांमध्ये आजवरच्या पीठाचार्यांकडून समस्त भक्तजनांना वेदांत विषयक ज्ञानामृत पिढ्यानपिढ्या पाजले जात आहे. सध्याचे विद्यमान पीठाधीश श्री ज्ञानराज माणिक प्रभु हे स्वतः श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्यात अग्रणी आहेत. आजपावेतो त्यांची गीतेवर हजारांच्यावर प्रवचने झाली आहेत. ते आपल्या प्रवचनामध्ये नेहमी म्हणतात की, हे सगळं वेदांतपर ज्ञान मी म्हणून तुम्हाला देतो आणि तेही फुकट… आज कु. श्यामलाचा श्री ज्ञानराज माणिक प्रभू बरोबर भेटीचा फोटो पाहिला आणि एक गोष्ट येथे आग्रहाने सांगावीशी वाटते की, श्रीजी, तुम्ही वेदांतपर ज्ञान जरी फुकट देत असलात तरी ते अजीबातच फुकट जात नाहीयेय…

ह्या वेळीच्या श्रीदत्त जयंतीमध्ये पाहिलं तर माणिक नगरामधले वयोवृद्ध, महिला आणि पुरुष, तरुण मंडळी यांच्याबरोबरच लहान लहान मुलं ही श्रीजींचा प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होती. काही नवजात अर्भकेही स्तनपान करता करता श्रीजींचे प्रवचन ऐकत होती. खरोखरच धन्य ती माणिक नगरची जनता, ज्यांना अध्यात्माचे हे बाळकडू अगदी लहान वयापासूनच मिळते. लहान वयातच असे बालमनावर सुसंस्कार झाल्यावर, त्यांच्यात अध्यात्माची आवड निर्माण झाल्यावर, आणि घरातही तसे वातावरण असल्यावर,  स्पर्धेमधील असे दैदिप्यमान यश समग्र असते. ते केवळ पाठांतर करून मिळवलेले नसते. कु. श्यामलाच्या ह्या नेत्रदीपक यशाने सर्वाधिक आनंद श्रीजींना झाला असेल ह्यात तीळमात्रही शंका नाही आणि तो आनंद आपल्याला श्रीजींच्या भावमुद्रेतून सहज टिपता येतो. श्रीजी समाजामध्ये पेरत असलेल्या बीजाचे सकारात्मक अंकुरण होऊन एक सशक्त समाज आणि देश घडवणारी भावी पिढी वृद्धिंगत होत आहे, हे खूपच आश्वासक आहे.

श्री प्रभु संस्थानामध्ये संगीत विभागात काही वर्षांपूर्वी सेवक असलेल्या कै. गंगाधरपंतांची कन्या कु. श्यामला आता राज्यस्तरावर बिदर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. येथेही श्रीप्रभुकृपेचा आशीर्वाद तिच्यावर अखंड राहो. स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी कु. श्यामलाला अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा.

जय गुरु माणिक

भेट होता समोरासमोर, म्हणावे आधी जय गुरु माणिक,

निरोप घेतानाही शेवटी म्हणावे आनंदे जय गुरु माणिक,

प्रापंचिक कर्मे करता साक्षी ठेवावा, हा श्रीगुरु माणिक,

प्राप्त सुखदु:खातही समान स्मरावा हा श्रीगुरु माणिक,

प्रातःकाळी उठता स्मरण करुन म्हणा जय गुरु माणिक,

निद्रासमयी कृतज्ञता व्यक्त करुन वदा जय गुरु माणिक,

सद्भक्तांची आळ सदोदित पुरवितो, हा श्री गुरु माणिक,

आत्मस्वरुपाचे ज्ञानही करवून देतो, हा श्री गुरु माणिक,

परनिंदा, द्वेष गळोनि जाय, घोष होता जय गुरु माणिक,

सकल धर्म अन् जाती एकसुरे गर्जती, जय गुरु माणिक,

मुख्य उपदेश आम्हा, श्रीगुरु माणिक, जय गुरु माणिक,

मुखामध्ये नित्य असावे श्रीगुरु माणिक जय गुरु माणिक

जीव ब्रम्ह ऐक्य

“मासानां मार्गशीर्षोऽम्” ही भगवदुक्ति प्रसिद्धच आहे. त्यातही श्रीदत्त जन्मोत्सवाचा सोहळा सदेह माणिकनगरी आणि त्यावर श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमेचे प्रवचन हा त्रिवेणी संगम श्री प्रभुइच्छेने व श्रीप्रभुच्या असीम कृपेनेच ह्यावर्षी घडून आला. तीर्थस्थान, योगदंड पूजन, सकलदेवता निमंत्रण, संगमस्नान, श्री माणिकप्रभु संजीवन समाधी दिवस, गुरुद्वादशी, दक्षिणा दरबार, श्री गुरुपूजन अशा एकापेक्षा एक दैदिप्यमान सोहळ्यांची सफर, ज्ञान आणि भक्ती ही दोन चाके असलेल्या सकलमत संप्रदायाच्या, श्री ज्ञानराज माणिकप्रभु सारथ्य करीत असलेल्या रथावर आरूढ होऊन अनुभवताना, संपूर्ण समाधानाची सुखद अनुभूती होत होती.

श्रीप्रभु जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमा प्रवचन होते. सायंकाळी पश्चिम क्षितिजावर जरी सूर्य मावळला होता तरी, माणिकनगरात श्री ज्ञानराज प्रभुरुपी सूर्य उगवला होता. आकाशातील चंद्राच्या शितल किरणांबरोबरच, श्री प्रभुगादीवरील विराजित सूर्याच्या ज्ञानरुपी तेजस्वी किरणांनी उपस्थितांची अंत:करणे प्रमुदित होत होती. श्री प्रभुला व गुरुपरंपरेला वंदन करून श्रीजींनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. आजचा विषय होता जीव आणि ब्रह्माचे ऐक्य (The Oneness of Jeeva and Brahma). विषयाची यथायोग्य बांधणी हे श्री ज्ञानराज प्रभुंच्या आजवरच्या सर्वच प्रवचनांचे परमविशेष आहे. जसे आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी, आधी आपल्या घरापासून कच्च्या रस्त्यावरून यावे लागते व मग आपण मुख्य महामार्गाला लागतो तद्वतच, एखाद्या समजावयास अत्यंत कठीण असलेल्या विषयाला हात घालताना, श्रीजी त्याची पूर्वपिठीका जनसामान्यांना त्यांना समजेल, रुचेल अशा व्यवहारिक भाषेत सांगतात, जेणेकरून सामान्यांची त्या विषयाप्रती जिज्ञासा जागृत होऊन आणि मूळ विषयाला समग्रपणे ग्रहण करण्यासाठी सामान्यजनांची मानसिकता तयार होते.

ह्याच अनुषंगाने, श्रीजींनी आपल्या प्रवचनाची सुरुवात संसार दुःखमय आहे, ह्या वाक्याने केली. आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते की, आपल्याला सतत सुख प्राप्त व्हावे व कधीही दुःख होऊ नये. पण मग प्रश्न असा येतो की, दुःख का होते ? प्रत्यक्ष भगवंताने संसाराला अशाश्वत दुःखालय म्हटलं आहे.‌ तसे पाहता रोजच्या जीवनात आपला ज्याच्याशी (व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना) संबंध येतो, ते सर्व दुःखमय आहे. आपल्या इंद्रियांचा जेव्हा विषयांशी संबंध येतो, तेथे भोग उत्पन्न होतो आणि ह्या भोगांचे निराकरण केवळ भक्तीरुपी वंगणानेच होऊ शकते. आपल्याला कधी दुःख नको असतं आणि अशावेळी आत्यंतिक सुखासाठी शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे, ज्ञान हा एकमेव उपाय आहे. पण मग आपल्याला, हे ज्ञान नेमकं कोणतं? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे आणि नेमका हाच धागा पकडून, ते ज्ञान म्हणजेच, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ह्या पौर्णिमा प्रवचनाच्या विषयाची वीण श्रीजी अत्यंत सहजपणे आणि तितक्याच तरलतेने विणतात. आपला जीव हेच ब्रह्म आहे आणि ह्या ज्ञानामुळेच दुःखाची निवृत्ती होते.‌

आपण स्वतःला जीवात्मा समजतो आणि श्रीप्रभुला परमात्मा समजतो. मग जीवात्मा आणि परमात्मा एक होऊ शकतो का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यावर श्रीजी म्हणतात, आत्मा एक आहे. आत्मा एकची सर्वांतरी हो… श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या या पदातही अगदी हेच वर्णिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेत आणि श्रुतीतही आत्म्याचे ऐकत्वच प्रतिपादित केले आहे. ही संकल्पना जनसामान्यांत सहजतेने पण खोलवर रुजवतानाच श्रीजी, आत्म्याला मोबाईलच्या नेटवर्कची उपमा देतात. आपण मोबाईलचे नेटवर्क पाहू शकत नाही, त्याचा रंग, रुप, आकार आपल्याला माहित नाही. पण केवळ नेटवर्क दिसत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही, असे आपण म्हणू शकत नाही. तसेच नेटवर्क हा जरी मोबाईलचा प्रत्यक्ष भाग (पार्ट) नसला तरी, तो मोबाईलला सर्व बाजूंनी व्यापून आहे. प्रत्येकाचे मोबाईल जरी वेगवेगळे असले तरी, असंख्य मोबाईलमध्ये एकच नेटवर्क व्यापून आहे. आपला मोबाईल जरी खराब झाला तरी, नेटवर्कचे काहीही नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा मोबाईल नेटवर्कसारखा सर्वव्याप्त आहे. आत्मा जरी उत्पन्न होत नाही, मरत नाही, त्याला रूप, रंग, आकार नाही पण, त्याच्याच सत्तेने सर्व काही चालतं. श्रुतीमध्येही हीच संकल्पना वायू आणि अग्नीचे उदाहरण देऊन समजावली आहे. श्रीजी पुढे म्हणतात, आत्मा जेव्हा व्यष्टीच्या (व्यक्तिगत) स्तरावर प्रकटतो, तेव्हा त्यास जीवात्मा म्हणतात. पण, तोच आत्मा जेव्हा समष्टीच्या (सर्वव्यापी) स्तरावर असतो, तेव्हा त्यास परमात्मा म्हणतात. मूळ आत्म्याच्या जीवात्मा किंवा परमात्मा ह्या उपाधीला जर हटवले, तर उरतो तो केवळ शुद्ध, चैतन्यस्वरूप आत्माच, आणि हेच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे.

पुन्हा, आता हे ज्ञान मग कुठे मिळते? असा आणखी एक प्रश्न सामान्यांना नक्कीच पडणार हे गृहीत धरूनच श्रीजी म्हणतात की, असे ज्ञान श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच मिळते. पण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे नेमके साधन कोणते? हे समजवताना श्रीजी म्हणतात की, ज्ञानी गुरूकडे जाऊन श्रवण, मनन आणि निदिध्यासन केल्यामुळे, हे आत्मज्ञान प्राप्त होते.

श्रवण म्हणजे केवळ ऐकणे नव्हे. विटांचे घर केवळ विटा अंगणात येऊन पडल्यामुळे जसे बांधले जात नाही, घर बांधण्यासाठी एका गवंड्याची आवश्यकता असते, तसेच केवळ ऐकण्याला श्रवण म्हणता येत नाही. एखाद्या क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ श्रीगुरुला शरण जाऊन, दीर्घकाळ त्यांच्या सेवेत राहून, शास्त्रांचे सम्यक ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच श्रवण होय.श्रवण करताना मनामध्ये अनेक प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रश्नांची यादी करणे अनिवार्य आहे. शास्त्रांमध्येही ज्ञान एकदम दिले जात नाही. जसे एक एक पायरी चढून आपण शेवटी गुरुशिखरावर पोहोचतो,  तद्वतच शास्त्रांच्या विविध पैलूंचा यथावकाश अभ्यास करणे म्हणजेच श्रवण होय.

श्रवणानंतर पडलेल्या प्रश्नांचे बुद्धी, तर्क, शास्त्र व गुरुपदेशाद्वारा सम्यक निराकरण करणे म्हणजेच मनन होय. मननाने आता बुद्धी नि:संशय झाली. बुद्धीला, मीच ब्रह्म आहे, हे आता पटले. पण जोपर्यंत आपले मन, मी ब्रह्म आहे, असे मानत नाही, तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. आपल्या बुद्धीला पटलेले, मनानेही सर्वार्थाने स्वीकारणे यालाच निदिध्यासन म्हणतात आणि हे  केवळ नित्य सरावानेच शक्य आहे. श्रवण आणि मननामध्ये श्री गुरु साहाय्य करतो पण निदिध्यासन मात्र आपल्याला एकट्यानेच करावे लागते. हे सांगताना श्रीजी सायकल चालवण्याचे उदाहरण देतात. सायकल चालवायला शिकवताना जसे आपले काका किंवा मामा सुरुवातीला हात देतात पण, नंतर मात्र ते आपल्याला एकट्याला सोडून देतात. हळूहळू आपण एकट्याने सायकल चालवायला शिकतो.

प्रवचनाच्या पुढच्या टप्प्यावर श्रीजी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचे लाभ कोणते? हेही सांगतात. ते लाभ म्हणजेच जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती.

जीवन मुक्ती म्हणजेच जिवंत असतानाच ह्या शरीरात मुक्तीचा किंवा मोक्षाचा आनंद अनुभवणे. केवळ अद्वैत सिद्धांतच आपल्याला जीवन मुक्तीचा अनुभव करून देतो. श्रीजी पुढे जीवनमुक्ताची लक्षणेही फोड करून सांगतात. स्वतंत्रता (मी, माझ्या सुखासाठी इतर कोणावरही अवलंबून नाही), पूर्णता (कोणत्याही घटनेचा, वस्तूचा, व्यक्तीचा अथवा परिस्थितीचा अभाव असूनही तो जाणवत नाही, कारण जीव आणि ब्रह्म ऐक्याचे ज्ञान त्याला झालेले असते. परमात्मा पूर्ण आहे आणि त्याच्याशी जर ऐक्य झाले तर मग अपूर्णत्व कुठून राहणार?) आणि समत्व (सर्व परिस्थितीत सम राहणे. बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय, देह, श्वास, परिस्थिती, मानपमान, जय पराजय आणि नफातोटा समत्वपणे पाहणे) ही जीवन मुक्ताची तीन लक्षणे आहेत. सामान्यजनांत असलेली अस्वतंत्रता, अपूर्णता आणि असमत्व हेच त्यांच्या दुःखाचे कारण असते.

त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूनंतर जीवनमुक्तांचे काय होते? याचा उहापोहसुद्धा श्रीजी आपल्या प्रवचनात करतात. श्रीजी म्हणतात, असा जीवनमुक्त विदेहमुक्तीस प्राप्त होतो. म्हणजेच, मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो श्रीप्रभुस्वरूपात लीन होतो. कारण त्याची सर्व कर्मे नष्ट होतात. खरे तर, आपण आपल्या कर्मांमुळेच जन्म होतो. मग ज्ञानी जीवांचे कर्म नष्ट कसे होतात? तर ज्ञानी भोगाद्वारे आपले प्रारब्ध कर्म नष्ट करतो. आपल्या उपासनेने, आपल्या भक्तीने, भविष्यातील कर्मे नष्ट करतो, तसेच ज्ञानाने संचित कर्मे नष्ट करतो. जसे भाजलेले बी अंकुरित होत नाही त्याचप्रमाणे, जीवनमुक्त पुनर्जन्म घेत नाही. ह्यालाच विदेह मुक्ती म्हणतात.

श्री माणिकप्रभुंचे अथवा सकलमत संप्रदायाचे समग्र वाङ्मय, पदे ह्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या प्रसारासाठीच आहेत. आपण स्वतःला श्री प्रभुपेक्षा यत्किंचितही वेगळे मानले तर तेच दुःखाचे अथवा भयाचे कारण होते. आणि म्हणूनच श्रीजी ठामपणे सांगतात की, द्वैतामध्ये दुःख आहे अद्वैतात आनंद आहे. ऐक्यत्वात आनंद आहे. श्रीदत्त जयंतीच्या ह्या परममंगल पर्वामध्ये श्रीजी म्हणतात की, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच श्री माणिकप्रभुंचा अवतार आहे आणि हा बोध ग्रहण करण्यासाठीच श्रीदत्त जयंतीचा महोत्सव आहे. या श्रीदत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचा लाभ काय? तर श्रीजी म्हणतात की, ज्ञानामृतं भोजनम्. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा हा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रसाद आपल्याला श्रीप्रभुकृपेने पोटभर लाभो, तसेच सर्वांमध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासंबंधी आवड आणि श्रद्धा उत्पन्न होऊन, त्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासनरुपी प्रयत्न करून त्याचे कृपाफळ म्हणून आपणांस जीवनमुक्ती आणि अंती विदेहमुक्ती प्राप्त होवो, अशी श्रीप्रभुचरणी विनम्र प्रार्थना करून आणि तसाच आशीर्वाद श्रीजींनी सर्वांना दिला.‌

श्रीजींच्या प्रवचनानंतर लगेचच, माणिकनगरच्याच नृत्यालयातील बालकलाकारांनी भरतनाट्यमचा नितांत सुंदर नृत्याविष्कार सादर केला. श्रीजींनी आपल्या प्रवचनात जीवनमुक्तांची स्वतंत्रता, पूर्णता आणि समत्व ही तीन लक्षणे सांगितली होती, ज्याच्या फलस्वरूप जीवनमुक्तांना नित्य आनंदाची प्राप्ती होत असते. भरतनाट्यममध्ये सादर केलेल्या नृत्याविष्कारामध्ये सहभागी कलाकारांना त्यांच्या शिक्षिकेने नृत्य करण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. नियमित सरावामुळे त्यांचे नृत्य पूर्णत्वास गेले होते. प्रज्वलित केलेले दिवे हातांच्या तळव्यावर, डोक्यावर ठेवून तसेच, आपल्या संपूर्ण शरीराचा भार खाली असलेल्या ताटलीच्या (परातीच्या) कडेवर ठेवून त्या कलाकारांनी संपूर्ण नृत्यामध्ये आपल्या शरीराचा समतोलही उत्तमप्रकारे साधला होता. अत्यंत सुहास्य वदनाने आणि सफाईदारपणे त्यांनी आपले नृत्य सादर केले. श्रीजींनी आपल्या प्रवचनात सांगितलेली जीवनमुक्तांची तिन्ही लक्षणे त्याचवेळी आम्हाला त्या नृत्याविष्कारातही दिसली आणि त्याचे फलस्वरूप उपस्थित सर्वांना अतिशय आनंद झाला. प्रवचनात सांगितलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब नृत्याविष्कारात लगेचच उमटल्यामुळे, ते तत्वज्ञान परिणामकपणे मनात खोलवर रुजण्यास, आपोआपच मदत झाली. हा बोध ग्रहण करण्याची ही सर्व त्या श्रीप्रभुचीच योजना आहे असे समजून श्रीप्रभुकडे कृतज्ञता व्यक्त केली आणि भंडारखान्यात असलेल्या श्री प्रभुच्या प्रसादाचे, आमच्या शरीरातील अन्नमय कोषाशी ऐक्य साधून, आनंदाची ती अनुभूती घेण्यासाठी आमची पावले आपोआपच भंडारखान्याकडे वळाली…