जीव ब्रम्ह ऐक्य

“मासानां मार्गशीर्षोऽम्” ही भगवदुक्ति प्रसिद्धच आहे. त्यातही श्रीदत्त जन्मोत्सवाचा सोहळा सदेह माणिकनगरी आणि त्यावर श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमेचे प्रवचन हा त्रिवेणी संगम श्री प्रभुइच्छेने व श्रीप्रभुच्या असीम कृपेनेच ह्यावर्षी घडून आला. तीर्थस्थान, योगदंड पूजन, सकलदेवता निमंत्रण, संगमस्नान, श्री माणिकप्रभु संजीवन समाधी दिवस, गुरुद्वादशी, दक्षिणा दरबार, श्री गुरुपूजन अशा एकापेक्षा एक दैदिप्यमान सोहळ्यांची सफर, ज्ञान आणि भक्ती ही दोन चाके असलेल्या सकलमत संप्रदायाच्या, श्री ज्ञानराज माणिकप्रभु सारथ्य करीत असलेल्या रथावर आरूढ होऊन अनुभवताना, संपूर्ण समाधानाची सुखद अनुभूती होत होती.

श्रीप्रभु जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमा प्रवचन होते. सायंकाळी पश्चिम क्षितिजावर जरी सूर्य मावळला होता तरी, माणिकनगरात श्री ज्ञानराज प्रभुरुपी सूर्य उगवला होता. आकाशातील चंद्राच्या शितल किरणांबरोबरच, श्री प्रभुगादीवरील विराजित सूर्याच्या ज्ञानरुपी तेजस्वी किरणांनी उपस्थितांची अंत:करणे प्रमुदित होत होती. श्री प्रभुला व गुरुपरंपरेला वंदन करून श्रीजींनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. आजचा विषय होता जीव आणि ब्रह्माचे ऐक्य (The Oneness of Jeeva and Brahma). विषयाची यथायोग्य बांधणी हे श्री ज्ञानराज प्रभुंच्या आजवरच्या सर्वच प्रवचनांचे परमविशेष आहे. जसे आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी, आधी आपल्या घरापासून कच्च्या रस्त्यावरून यावे लागते व मग आपण मुख्य महामार्गाला लागतो तद्वतच, एखाद्या समजावयास अत्यंत कठीण असलेल्या विषयाला हात घालताना, श्रीजी त्याची पूर्वपिठीका जनसामान्यांना त्यांना समजेल, रुचेल अशा व्यवहारिक भाषेत सांगतात, जेणेकरून सामान्यांची त्या विषयाप्रती जिज्ञासा जागृत होऊन आणि मूळ विषयाला समग्रपणे ग्रहण करण्यासाठी सामान्यजनांची मानसिकता तयार होते.

ह्याच अनुषंगाने, श्रीजींनी आपल्या प्रवचनाची सुरुवात संसार दुःखमय आहे, ह्या वाक्याने केली. आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते की, आपल्याला सतत सुख प्राप्त व्हावे व कधीही दुःख होऊ नये. पण मग प्रश्न असा येतो की, दुःख का होते ? प्रत्यक्ष भगवंताने संसाराला अशाश्वत दुःखालय म्हटलं आहे.‌ तसे पाहता रोजच्या जीवनात आपला ज्याच्याशी (व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना) संबंध येतो, ते सर्व दुःखमय आहे. आपल्या इंद्रियांचा जेव्हा विषयांशी संबंध येतो, तेथे भोग उत्पन्न होतो आणि ह्या भोगांचे निराकरण केवळ भक्तीरुपी वंगणानेच होऊ शकते. आपल्याला कधी दुःख नको असतं आणि अशावेळी आत्यंतिक सुखासाठी शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे, ज्ञान हा एकमेव उपाय आहे. पण मग आपल्याला, हे ज्ञान नेमकं कोणतं? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे आणि नेमका हाच धागा पकडून, ते ज्ञान म्हणजेच, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ह्या पौर्णिमा प्रवचनाच्या विषयाची वीण श्रीजी अत्यंत सहजपणे आणि तितक्याच तरलतेने विणतात. आपला जीव हेच ब्रह्म आहे आणि ह्या ज्ञानामुळेच दुःखाची निवृत्ती होते.‌

आपण स्वतःला जीवात्मा समजतो आणि श्रीप्रभुला परमात्मा समजतो. मग जीवात्मा आणि परमात्मा एक होऊ शकतो का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यावर श्रीजी म्हणतात, आत्मा एक आहे. आत्मा एकची सर्वांतरी हो… श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या या पदातही अगदी हेच वर्णिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेत आणि श्रुतीतही आत्म्याचे ऐकत्वच प्रतिपादित केले आहे. ही संकल्पना जनसामान्यांत सहजतेने पण खोलवर रुजवतानाच श्रीजी, आत्म्याला मोबाईलच्या नेटवर्कची उपमा देतात. आपण मोबाईलचे नेटवर्क पाहू शकत नाही, त्याचा रंग, रुप, आकार आपल्याला माहित नाही. पण केवळ नेटवर्क दिसत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही, असे आपण म्हणू शकत नाही. तसेच नेटवर्क हा जरी मोबाईलचा प्रत्यक्ष भाग (पार्ट) नसला तरी, तो मोबाईलला सर्व बाजूंनी व्यापून आहे. प्रत्येकाचे मोबाईल जरी वेगवेगळे असले तरी, असंख्य मोबाईलमध्ये एकच नेटवर्क व्यापून आहे. आपला मोबाईल जरी खराब झाला तरी, नेटवर्कचे काहीही नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा मोबाईल नेटवर्कसारखा सर्वव्याप्त आहे. आत्मा जरी उत्पन्न होत नाही, मरत नाही, त्याला रूप, रंग, आकार नाही पण, त्याच्याच सत्तेने सर्व काही चालतं. श्रुतीमध्येही हीच संकल्पना वायू आणि अग्नीचे उदाहरण देऊन समजावली आहे. श्रीजी पुढे म्हणतात, आत्मा जेव्हा व्यष्टीच्या (व्यक्तिगत) स्तरावर प्रकटतो, तेव्हा त्यास जीवात्मा म्हणतात. पण, तोच आत्मा जेव्हा समष्टीच्या (सर्वव्यापी) स्तरावर असतो, तेव्हा त्यास परमात्मा म्हणतात. मूळ आत्म्याच्या जीवात्मा किंवा परमात्मा ह्या उपाधीला जर हटवले, तर उरतो तो केवळ शुद्ध, चैतन्यस्वरूप आत्माच, आणि हेच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे.

पुन्हा, आता हे ज्ञान मग कुठे मिळते? असा आणखी एक प्रश्न सामान्यांना नक्कीच पडणार हे गृहीत धरूनच श्रीजी म्हणतात की, असे ज्ञान श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच मिळते. पण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे नेमके साधन कोणते? हे समजवताना श्रीजी म्हणतात की, ज्ञानी गुरूकडे जाऊन श्रवण, मनन आणि निदिध्यासन केल्यामुळे, हे आत्मज्ञान प्राप्त होते.

श्रवण म्हणजे केवळ ऐकणे नव्हे. विटांचे घर केवळ विटा अंगणात येऊन पडल्यामुळे जसे बांधले जात नाही, घर बांधण्यासाठी एका गवंड्याची आवश्यकता असते, तसेच केवळ ऐकण्याला श्रवण म्हणता येत नाही. एखाद्या क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ श्रीगुरुला शरण जाऊन, दीर्घकाळ त्यांच्या सेवेत राहून, शास्त्रांचे सम्यक ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच श्रवण होय.श्रवण करताना मनामध्ये अनेक प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रश्नांची यादी करणे अनिवार्य आहे. शास्त्रांमध्येही ज्ञान एकदम दिले जात नाही. जसे एक एक पायरी चढून आपण शेवटी गुरुशिखरावर पोहोचतो,  तद्वतच शास्त्रांच्या विविध पैलूंचा यथावकाश अभ्यास करणे म्हणजेच श्रवण होय.

श्रवणानंतर पडलेल्या प्रश्नांचे बुद्धी, तर्क, शास्त्र व गुरुपदेशाद्वारा सम्यक निराकरण करणे म्हणजेच मनन होय. मननाने आता बुद्धी नि:संशय झाली. बुद्धीला, मीच ब्रह्म आहे, हे आता पटले. पण जोपर्यंत आपले मन, मी ब्रह्म आहे, असे मानत नाही, तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. आपल्या बुद्धीला पटलेले, मनानेही सर्वार्थाने स्वीकारणे यालाच निदिध्यासन म्हणतात आणि हे  केवळ नित्य सरावानेच शक्य आहे. श्रवण आणि मननामध्ये श्री गुरु साहाय्य करतो पण निदिध्यासन मात्र आपल्याला एकट्यानेच करावे लागते. हे सांगताना श्रीजी सायकल चालवण्याचे उदाहरण देतात. सायकल चालवायला शिकवताना जसे आपले काका किंवा मामा सुरुवातीला हात देतात पण, नंतर मात्र ते आपल्याला एकट्याला सोडून देतात. हळूहळू आपण एकट्याने सायकल चालवायला शिकतो.

प्रवचनाच्या पुढच्या टप्प्यावर श्रीजी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचे लाभ कोणते? हेही सांगतात. ते लाभ म्हणजेच जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती.

जीवन मुक्ती म्हणजेच जिवंत असतानाच ह्या शरीरात मुक्तीचा किंवा मोक्षाचा आनंद अनुभवणे. केवळ अद्वैत सिद्धांतच आपल्याला जीवन मुक्तीचा अनुभव करून देतो. श्रीजी पुढे जीवनमुक्ताची लक्षणेही फोड करून सांगतात. स्वतंत्रता (मी, माझ्या सुखासाठी इतर कोणावरही अवलंबून नाही), पूर्णता (कोणत्याही घटनेचा, वस्तूचा, व्यक्तीचा अथवा परिस्थितीचा अभाव असूनही तो जाणवत नाही, कारण जीव आणि ब्रह्म ऐक्याचे ज्ञान त्याला झालेले असते. परमात्मा पूर्ण आहे आणि त्याच्याशी जर ऐक्य झाले तर मग अपूर्णत्व कुठून राहणार?) आणि समत्व (सर्व परिस्थितीत सम राहणे. बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय, देह, श्वास, परिस्थिती, मानपमान, जय पराजय आणि नफातोटा समत्वपणे पाहणे) ही जीवन मुक्ताची तीन लक्षणे आहेत. सामान्यजनांत असलेली अस्वतंत्रता, अपूर्णता आणि असमत्व हेच त्यांच्या दुःखाचे कारण असते.

त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूनंतर जीवनमुक्तांचे काय होते? याचा उहापोहसुद्धा श्रीजी आपल्या प्रवचनात करतात. श्रीजी म्हणतात, असा जीवनमुक्त विदेहमुक्तीस प्राप्त होतो. म्हणजेच, मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो श्रीप्रभुस्वरूपात लीन होतो. कारण त्याची सर्व कर्मे नष्ट होतात. खरे तर, आपण आपल्या कर्मांमुळेच जन्म होतो. मग ज्ञानी जीवांचे कर्म नष्ट कसे होतात? तर ज्ञानी भोगाद्वारे आपले प्रारब्ध कर्म नष्ट करतो. आपल्या उपासनेने, आपल्या भक्तीने, भविष्यातील कर्मे नष्ट करतो, तसेच ज्ञानाने संचित कर्मे नष्ट करतो. जसे भाजलेले बी अंकुरित होत नाही त्याचप्रमाणे, जीवनमुक्त पुनर्जन्म घेत नाही. ह्यालाच विदेह मुक्ती म्हणतात.

श्री माणिकप्रभुंचे अथवा सकलमत संप्रदायाचे समग्र वाङ्मय, पदे ह्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या प्रसारासाठीच आहेत. आपण स्वतःला श्री प्रभुपेक्षा यत्किंचितही वेगळे मानले तर तेच दुःखाचे अथवा भयाचे कारण होते. आणि म्हणूनच श्रीजी ठामपणे सांगतात की, द्वैतामध्ये दुःख आहे अद्वैतात आनंद आहे. ऐक्यत्वात आनंद आहे. श्रीदत्त जयंतीच्या ह्या परममंगल पर्वामध्ये श्रीजी म्हणतात की, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच श्री माणिकप्रभुंचा अवतार आहे आणि हा बोध ग्रहण करण्यासाठीच श्रीदत्त जयंतीचा महोत्सव आहे. या श्रीदत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचा लाभ काय? तर श्रीजी म्हणतात की, ज्ञानामृतं भोजनम्. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा हा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रसाद आपल्याला श्रीप्रभुकृपेने पोटभर लाभो, तसेच सर्वांमध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासंबंधी आवड आणि श्रद्धा उत्पन्न होऊन, त्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासनरुपी प्रयत्न करून त्याचे कृपाफळ म्हणून आपणांस जीवनमुक्ती आणि अंती विदेहमुक्ती प्राप्त होवो, अशी श्रीप्रभुचरणी विनम्र प्रार्थना करून आणि तसाच आशीर्वाद श्रीजींनी सर्वांना दिला.‌

श्रीजींच्या प्रवचनानंतर लगेचच, माणिकनगरच्याच नृत्यालयातील बालकलाकारांनी भरतनाट्यमचा नितांत सुंदर नृत्याविष्कार सादर केला. श्रीजींनी आपल्या प्रवचनात जीवनमुक्तांची स्वतंत्रता, पूर्णता आणि समत्व ही तीन लक्षणे सांगितली होती, ज्याच्या फलस्वरूप जीवनमुक्तांना नित्य आनंदाची प्राप्ती होत असते. भरतनाट्यममध्ये सादर केलेल्या नृत्याविष्कारामध्ये सहभागी कलाकारांना त्यांच्या शिक्षिकेने नृत्य करण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. नियमित सरावामुळे त्यांचे नृत्य पूर्णत्वास गेले होते. प्रज्वलित केलेले दिवे हातांच्या तळव्यावर, डोक्यावर ठेवून तसेच, आपल्या संपूर्ण शरीराचा भार खाली असलेल्या ताटलीच्या (परातीच्या) कडेवर ठेवून त्या कलाकारांनी संपूर्ण नृत्यामध्ये आपल्या शरीराचा समतोलही उत्तमप्रकारे साधला होता. अत्यंत सुहास्य वदनाने आणि सफाईदारपणे त्यांनी आपले नृत्य सादर केले. श्रीजींनी आपल्या प्रवचनात सांगितलेली जीवनमुक्तांची तिन्ही लक्षणे त्याचवेळी आम्हाला त्या नृत्याविष्कारातही दिसली आणि त्याचे फलस्वरूप उपस्थित सर्वांना अतिशय आनंद झाला. प्रवचनात सांगितलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब नृत्याविष्कारात लगेचच उमटल्यामुळे, ते तत्वज्ञान परिणामकपणे मनात खोलवर रुजण्यास, आपोआपच मदत झाली. हा बोध ग्रहण करण्याची ही सर्व त्या श्रीप्रभुचीच योजना आहे असे समजून श्रीप्रभुकडे कृतज्ञता व्यक्त केली आणि भंडारखान्यात असलेल्या श्री प्रभुच्या प्रसादाचे, आमच्या शरीरातील अन्नमय कोषाशी ऐक्य साधून, आनंदाची ती अनुभूती घेण्यासाठी आमची पावले आपोआपच भंडारखान्याकडे वळाली…

चिदानंदरूप: शिवोहम शिवोहम

आज श्रीगुरु आराधना होती. सूर्य मावळतीला झुकत होता. आरक्त वर्णाच्या त्या बिंबातून बाहेर पडणारी सौम्य किरणे भोवतालच्या आसमंताला सोन्याच्या जेजुरीसारखी पिवळीधम्मक करत होती. गायकाच्या परावाणीतून सुरांचे कारंजे थुईथुई नाचत होते. हंस: सोऽहम् सोऽहम् हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा हे भजन अगदी टीपेला पोहोचले होते. वाद्यवृंदाच्या तालसुरांची मोहिनी, एव्हाना भक्तांवर गारुड करायला लागली होती. आराधनेच्या वेळी श्रीगुरु आपल्या शिरावर मंगल कलश घेऊन भजनाच्या तालावर लयबद्ध डूलत होते. शिवासुद्धा ह्या आनंद सोहळ्यामध्ये न्हाऊन निघत होता. श्रीगुरुंवरून त्याची नजर काही केल्या हटत नव्हती. देहभान हरपून तो अनिमिष नेत्रांनी श्रीगुरुंना आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर काहीतरी शोधत होती.

अस्त समय शिव नाचत प्यारा,
शांभवगण शिव हर ललकारा

हे वाक्य ऐकायला आणि श्रीगुरुंमध्ये त्याला साक्षात् शिवशंकर दिसायला एकच वेळ साधली गेली. अवघे दहा क्षण ही नसतील पण शिवाचा शोध आता संपला होता. समोर जे काही दिसलं तो भास नक्कीच नव्हता. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्याने मनोमन उभ्याउभ्याच श्रीगुरुंना अभिषेक घातला. ज्याच्या दर्शनाची आस आजवर लागली होती, तो क्षणात साक्षात् समोर येऊन, श्रीगुरुरुपात विलीनसुद्धा होऊन गेला होता.

दुसऱ्या दिवशी शिवाने श्रीगुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांना काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर खळखळून हास्य करीत श्रीगुरु म्हणाले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे… शिवा थोडा गोंधळला.‌ श्रीगुरुंचे ते शब्द त्याच्या कानामध्ये रुंजी घालत होते. दुपारी शिवा बाजूच्याच एका शिवमंदिरात गेला. दुपारच्या वेळी ऊन मी म्हणत होते. अगदी पुरातन असलेल्या ह्या मंदिर परिसराला गुप्तकाशीही म्हटले जायचे. मंदिराचा परिसर मोठा प्रशस्त होता. अनेक शिवलिंगे या परिसरात स्थापिली होती. पण मुख्य मंदिर काहीसे वेगळे होते. येथे शाळुंकेवर शिवलिंगाच्या ऐवजी शाळीग्राम होता, जणू तो हरिहराचे ऐक्यच दाखवीत होता. मंदिराच्या कळसावरही रामाच्या धनुष्यबाणाचे चिन्ह होते. मुख्य मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यावर, शिवा बाहेर आला आणि अचानक आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी जमली. जोराचा वारा वाहून गडगडाट व्हायला लागला. शिवा जगन्मातेचे दर्शन घेऊन तिच्या मंदिराच्या आवारात दोन मिनिटं बसला होता आणि त्याच वेळेस विजांच्या कडकडाटासहीत धुंवाधार पाऊस सुरू झाला. शिवाला परतीची घाई होती. कोसळणाऱ्या पावसातच त्याने मंदिराबाहेर एक पाय ठेवला आणि त्याचे अंग मोहरून गेले. पावसाच्या पाण्याचा स्पर्श त्याला शीतलता प्रदान करत होता. तो थंडगार स्पर्श त्याला हवाहवासा वाटू लागला. मंदिरातून परतीच्या मार्गात शिवा पुन्हा मुख्य मंदिराच्या समोर होता. एव्हाना शिवा अचानक आलेल्या पावसामुळे, नखशिखांत भिजला होता.‌ मंदिराच्या पायऱ्या उतरताना, पाच दहा मिनिटाच्या झालेल्या पावसाच्या पाण्याने मंदिर परिसरात पाण्याचं चक्क तळ साचलं होतं. गुडघाभर साचलेल्या त्या पाण्यातून वाट काढताना, शिवा मंदिराच्या महाद्वारापाशी आला. परतीचा नमस्कार करताना त्याला श्रीगुरूंचे शब्द आठवले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे…

श्रीगुरुंनी त्याला आज त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून दिली होती. पुरातन शिवमंदिरात जेथे लखलखीत ऊन पडले होते, तेथे क्षणात पाऊस येतो काय आणि आपल्या देहाला भिजवून जातो काय ह्याचे गूढ शिवाला उलगडले होते. शिवशंकराला जल अत्यंत प्रिय आहे आणि शिवाच्या देहरूपी पिंडीवर अस्तित्वाने आज पावसाची संततधार धरली होती. गुप्तकाशी स्थानामध्येही साठलेल्या पाण्यामुळे शिवाला जणू गंगास्नानच घडले होते. कृतज्ञ आणि कृतार्थ भावनेने ओघळलेले डोळ्यातील आनंदाश्रू पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिळाले होते.‌ जीवाला शिवाची ओळख झाली होती, शिवाला अंत:स्थ शिवाची ओळख झाली होती. श्रीगुरुंनी शिवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली होती. आनंदाच्या त्या भरात शिवा झरझर परतीच्या मार्गाला लागला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानाला कुठेतरी दूरवरून भजनाचे सूर ऐकू होते,

हा शैव नव्हें मनुजाधम मूढ तो ऐका,
मी सांब नव्हें कोण मी धरी जो शंका…

सकलमत संप्रदायाचे कुटुंबप्रमुख

नुकताच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे आयोजित श्री जगन्नाथ पुरी यात्रा, रविवार दिनांक ९ ऑक्टोबर ते शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर दरम्यान माणिकनगर-जगन्नाथ पुरी-माणिकनगर, अशी सफळ संपूर्ण झाली. अलौकिक, अद्भुत, अद्वितीय, अविस्मरणीय अशा या यात्रेचे वर्णन करण्यास कदाचित शब्दही अपुरे पडतील. ह्या यात्रेदरम्यान श्री माणिकप्रभु गादीचे विद्यमान पीठाधिश, श्री ज्ञानराज माणिकप्रभु (श्रीजी) ह्यांना जवळून पाहता आले आणि ते मला ज्या प्रकारे दिसले, भावले‌ ते शब्दबद्ध करण्याचा हा अल्प प्रयत्न आपण गोड मानून घ्याल, अशी आशा व्यक्त करतो.

गेल्या वर्षभरात श्रीजींची वेदांतातील गूढ सिद्धांत सामान्यजनांना व्यवहारातील सहज सोपी उदाहरणे देऊन, अत्यंत आत्मीयतेने, तळमळीने समजावून सांगणारा एक उत्तम वक्ता, जनसामान्यांच्या अनेक समस्या सोडवणारा, आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दल पराकोटीची श्रद्धा आणि जाज्वल्य अभिमान असणारा अलौकिक सिद्धपुरुष, संगीत आणि साहित्याचा व्यासंगी, अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा, इतर धर्म आणि संस्कृतीचीही व्यापक जाणीव असणारा श्री सकलमत संप्रदायाचा एक अधिकारी पुरुष म्हणून श्रीजींबद्दल माझ्या मनात असलेला आदर दर दिवसागणिक दुणावत होता. ह्याच वर्षीच्या वेदांत सप्ताहामध्ये झालेल्या माणिक क्विझ स्पर्धेदरम्यान श्री संस्थानातर्फे आयोजित मागील श्री काशी आणि श्री रामेश्वरयात्रेमधील संदर्भ देऊन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच वेळी  मनात योजले होते की, भविष्यात जेव्हा कधी श्री प्रभुसंस्थानातर्फे अशा यात्रेचे आयोजन टमकेले जाईल, तेव्हा आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करुया.‌ भक्तवत्सल, सार्वभौम श्रीप्रभुच्या असीम कृपेने हा योग लगेचच जुळून यायचा होता म्हणूनच की काय, एप्रिल महिन्यातच श्री जगन्नाथ पुरी यात्रेची घोषणा झाली. क्षणाचाही विलंब न लावता, मी माझे नाव या यात्रेसाठी नोंदवले. श्री क्षेत्र माणिकनगर-पुरी-माणिक नगर अशा प्रवासासाठी मी नाव नोंदणी केली. जायचे यायचे तिकीट, पुरी येथील निवासाची व्यवस्था आणि पुरी येथील कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप  याची अगदी पद्धतशीर माहिती देणारे पत्रक दोन महिने आधीच श्री प्रभुसंस्थानातर्फे हातामध्ये पडले.

नियोजित यात्रेसाठी दिनांक ०७ ऑक्टोबर, शुक्रवारी रात्री ठाण्याहून माणिकनगरला निघालो. माझ्या बरोबर पितृतुल्य श्री. व सौ. चंद्रकांत देशपांडे काका, व फोटोग्राफर श्री. अभिजीत देव होते. सकाळी यथावकाश माणिकनगरला पोहोचलो.‌  माणिक नगरात रविवारी सुरु होणाऱ्या जगन्नाथ पुरी यात्रेसाठी एकच लगबग उडाली होती. एकेक प्रभुभक्त श्रीप्रभु मंदिरात दाखल होत होता. सर्वांना आयकार्ड, टोपी व खाण्यापिण्याचे किट श्री प्रभु संस्थानातर्फे वितरित करण्यात येत होते. अत्यंत नियोजन पद्धतीने होत असलेल्या या सर्व प्रक्रियेमध्ये श्रीजी मात्र आपल्या नित्य पूजेमध्ये व्यस्त होते. आज संध्याकाळी श्रीजींचे पौर्णिमेचे प्रवचन होते. दसऱ्याच्या दिवशी श्रीजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या व त्यांच्याच शुभ हस्ते प्रभुभक्तांसाठी खुल्या केलेल्या सचित्र माणिक प्रभु चरित्रामृत परिक्रमेची अद्भुत यात्रा करून भारावलो होतो. श्रीजींच्या ठाई असलेली सौंदर्यदृष्टी आपल्याला कायापालट झालेल्या श्रीप्रभु मंदिर परिसरात जागोजागी दिसून येते.

पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पौर्णिमा प्रवचनासाठी श्रीजींनी देवाला नवस बोलावा की बोलू नये, यावर समस्त प्रभुभक्तांचे सुंदर प्रबोधन केले. आम्ही जरी शारीरिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या पुरीयात्रेसाठी तयार झालेलो असलो, तरी जगन्नाथ यात्रेला जाताना श्रीजगन्नाथासमोर नेमके काय मागावे व काय मागू नये, ह्याची मानसिक तयारीही श्रीजींनी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने आमच्याकडून करवून घेतली. यातून श्रीजींची भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीची तळमळच आपल्याला दिसून येते. तसेच नवसाच्या रुपात जे मागणं असते, त्याचे स्वरूप स्पष्ट करून जगन्नाथाकडे काय मागावं? याचा निर्णय सर्व प्रभुभक्तांवर सोडतानाच जगन्नाथाकडे योग्य ते मागण्याची सद्बुद्धी श्रीप्रभु आपल्याला देवो आणि सर्वांचे कल्याण होवो, असा शुभाशीर्वाद दिला.‌ गुरु हा केवळ आपल्या भक्तांना मार्ग दाखवण्याचे काम करतो आणि भक्तासाठी काय योग्य, काय अयोग्य याचा निर्णय तो केवळ आणि केवळ भक्तांवर सोपवतो. ह्यातून आपल्याला श्रीजींमधील एका आदर्श गुरुचेच दर्शन होते.

दुसऱ्या दिवशी रविवारी, सकाळी सात सव्वा सातच्या सुमारास जगन्नाथ पुरी यात्रेसाठी जमलेल्या प्रभुभक्तांनी श्रीप्रभु मंदिराचे पटांगण फुलून गेले होते.‌ सर्वांना चहा नाश्ता देण्यात येत होता. सकाळी आठच्या सुमारास नौबत झडली आणि भक्तकार्यकल्पद्रुमच्या जयघोषात, वाद्यांच्या तुंबळ निनादात श्रीजींची स्वारी भक्तांसहित श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीसमोर आली. श्रीजींनी श्रीप्रभुला यात्रेच्या यशस्वीतेसाठी निवेदन दिले. चैतन्याचं सगुण स्वरूप समाधीतल्या निर्गुण स्वरूपाला आवाहन करत होतं. एक क्षण श्रीजींची श्रीप्रभु समाधीशी नजरानजर झाली आणि श्रीजींच्या मुखकमलावर आश्वासक स्मितहास्य उमटले. जणू संपूर्ण यात्रेचा भार ह्याच चैतन्यानेच पेलायचा होता. हा एक क्षण अंगावर रोमांच उभे करून गेला.‌ श्री माणिकप्रभुंच्या ब्रीदावलीतील निरालंब हा शब्द डोळ्यांसमोर तरळला. आता श्रीजी आमचे आधार झाले होते. यानंतर श्रीमाणिकप्रभुंची आरती झाली. सर्वांनी श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेऊन लगेचच बाहेर उभे असलेल्या बसमध्ये चढण्यास सुरुवात केली.‌

 

जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी माणिक नगरहून सुमारे साडेचारशे जण होते. एकंदर दोन रेल्वेगाड्यांमध्ये सर्व प्रभुभक्तांची जाणयेण्याची सोय केली होती. त्यानुसार पहिल्या गाडीच्या प्रवाशांसाठी तीन बसेसची व्यवस्था होती. श्री प्रभुमंदिरातील आरती नंतर श्रीजी लगेच बस लावलेल्या ठिकाणी हजर होते. त्यांना बसायला खुर्ची ठेवली होती पण एकही क्षण खुर्चीत न बसता लवकरात लवकर बस भक्तांनी भरून मार्गस्थ कशी होईल याची जातीने दखल श्रीजी घेत होते. त्यांच्या केवळ उपस्थितीमुळेच समस्त प्रभुभक्तांमध्ये स्फुरण चढले होते. श्रीजींनी नारळ वाढवल्यावर पहिली बस जेव्हा रवाना झाली, तेव्हा श्री माणिक प्रभुंचा जयघोष झाला. त्यानंतर पुढच्या दहा-पंधरा मिनिटात पहिल्या गाडीच्या तिन्ही बसेस रवाना झाल्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारासही ऊन मी म्हणत होते.‌ अशाही परिस्थितीत अंगावरील घाम पुसत श्रीजी दुसऱ्या रेल्वेगाडीच्या दहा बसेसची व्यवस्था लावण्यात गुंतले‌ होते. सकाळी दहाच्या सुमारास सर्व बस माणिकनगरहून सिकंदराबादला रवाना झाल्या होत्या. सर्व प्रभुक्तांप्रमाणेच श्रीजींचा सर्व परिवारसुद्धा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच सिकंदराबादसाठी रवाना झाला होता. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून श्रीजींचं साधेपण ठळकपणे जाणवते.

सिकंदराबादला जाताना वाटेत सदाशिव पेठजवळ सर्व प्रभुभक्तांच्या जेवणाची व्यवस्था श्री माणिक पब्लिक स्कूलतर्फे करण्यात आली होती. पुरीयात्रेसाठी सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हाट्सॲप समूह बनवण्यात आला होता. मलाही त्या समूहात समाविष्ट करण्यात आले. सिकंदराबादला जाणारी पहिली बस आणि शेवटची बस ह्यात जरी दीड दोन तासाचे अंतर असले तरी श्रीजी व्हाट्सॲप च्या माध्यमातून सर्वांचं जेवण झालं की नाही, सर्वजण स्टेशनवर पोहोचले की नाही, कुठली बस कुठे आहे, याची अगदी जातीने चौकशी करत होते. घार जरी आकाशी उडत असली तरी, तिचे चित्त मात्र पिलांपाशीच असते.‌ दोन अडीचच्या सुमारास सर्व बसेस सिकंदराबाद स्टेशनवर पोहोचल्या. आधी फलकनुमा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून चारच्या सुमारास रवाना झाली.‌ तेथेही श्रीजींनी स्वतः जाऊन सर्व प्रभुभक्त गाडीत व्यवस्थित चढले की नाही याची व्यक्तीश: खात्री करून घेत होते. गाडी सुरू झाल्यावर श्रीजींनी सगळ्यांना हात हलवून जणू काही निश्चित जा, मी तुमच्या पाठीशी आहे, अशाप्रकारे आश्वस्त केले. त्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येऊन सर्व प्रभू भक्तांना एक-एक करून भेटू लागले. प्रभुभक्तांना देण्यात येणाऱ्या यात्रा किटचा आढावा, हैदराबादहून येणाऱ्या प्रभुभक्तांची यादी पाहून कोण आले, कोण नाही, याची चौकशी अविरतपणे करत होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही सर्व विशाखा एक्सप्रेसने जगन्नाथ पुरीसाठी रवाना झालो.‌

योगायोगाने श्रीजी बाजूच्या डब्यात, आणि श्रीजींचा परिवार माझ्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये होता. प्रत्येक डब्यासाठी एक लीडर नेमून दिला होता.‌ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक जण आपल्या डब्याची स्थिती सांगत होता. श्रीजी ही सर्व प्रभुभक्तांप्रमाणे आमच्याबरोबर रेल्वेने प्रवास करत होते. यातही त्यांचा साधेपणा व सर्वांना समान लेखण्याचा अंगीभूत गुण दिसून येतो. रात्रीच्या जेवणाची, सकाळच्या नाश्त्याची व दुपारच्या जेवणाची व त्याचबरोबर पाण्याची सोय त्या त्या भागातील प्रभुभक्तांनी अगदी आत्मीयतेने व नियोजनबद्ध पद्धतीने केली. भरपेट भोजन होईल इतकं किंबहुना त्याहीपेक्षा थोडसं जास्तच अन्न जेवण आणि नाश्त्याचे वेळीस पुरवलं गेलं.‌ येथेही श्रीजींची भक्तांशी जुळलेली नाळच अधोरेखित होत होती. सिकंदराबादच्या थोड्याशा पुढे पाऊस सुरू झाला आणि जवळजवळ तो शेवटचे स्टेशन, खुर्दा येथपर्यंत होता. प्रवासादरम्यान पुढचे तीन दिवस पुरीला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण श्रीप्रभुकृपेने जगन्नाथ पुरी येथील वास्तव्यात एकही दिवस पावसाने हजेरी लावली नाही. पुरीहून निघण्याच्या दिवशी मात्र सकाळी अगदी पाचच मिनिटं हलकीशी सर येऊन गेली. जणू काही निसर्गाचे डोळेही प्रभुभक्तांच्या विरहामुळे पाणावले होते. श्रीजींनी केवळ आपल्या संकल्पाचा जोरावर पावसाचा त्रास कुठल्याही प्रभुभक्ताला होऊ दिला नाही. अशावेळीस श्रीजींमध्ये मला गोवर्धन पर्वत स्वतःच्या करंगळीवर उचलून घेऊन गोपालांचे पावसापासून रक्षण करणारा श्रीकृष्णच जाणवला. सिकंदराबाद ते खुर्दापर्यंतच्या प्रवासादरम्यान श्रीजींनी एसीचा पहिला डबा ते स्लीपर कोचचा अकरावा डबा असे सुमारे 21 डब्यांचे अंतर दोनदा पार केले. रात्री जेवण झाल्यावर सर्व प्रभुभक्तांना भेटण्यासाठी व सकाळी नाश्ता झाल्यावर पुन्हा एकदा सर्व प्रभुभक्तांना भेटण्यासाठी श्रीजी गाडीतून फिरत होते. त्या त्या डब्यातील प्रभुभक्तांजवळ जाऊन व्यवस्था कशी आहे, जेवण झाले की नाही, अन्न पुरेसं होतं की नाही, काही हवं नको याची आणि एकंदर जिव्हाळ्याची विचारपूस जवळपास प्रत्येक प्रभुभक्ताकडे करत होते. सकाळी आठच्या सुमारास श्रीप्रभु मंदिरात आरतीला हजर असणारे श्रीजी, रात्रीच्या दहा वाजताही तितक्याच उत्साहात वावरत होते. श्रीप्रभुच्या चैतन्याचा सुंदर अविष्कार श्रीजींच्या देहबोलीतून अनुभवता येत होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारणत: चारच्या सुमारास आम्ही खुर्द्याला पोहोचलो. तेथेही सर्व प्रभुभक्तांना नियोजित भक्तनिवासाच्या बसेसमध्ये बसवून देण्यात श्रीजी आघाडीवर होते. प्रभुभक्तांची आणि त्यांच्या सामानाच्या वाहतुकीची सुंदर व्यवस्था श्री प्रभुसंस्थान तर्फे करण्यात आली होती. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही सर्व जगन्नाथपुरी येथील भक्तनिवासात पोहोचलो. रात्री साडेआठच्या सुमारास भोजनाच्यावेळीह रेल्वेशिवाय विमानमार्गानेही येणाऱ्या सर्व प्रभुभक्तांची मांदियाळी आता जगन्नाथ पुरीत जमली होती. हा आकडा एकंदर हजारच्या जवळपास होता. अशावेळी आमचे कुटुंबप्रमुख श्रीजी, सुहास्य वदनाने सर्व प्रभुभक्तांना सामोरे जात होते. रात्री अकराच्या सुमारास पुरुषोत्तम भक्तनिवासावर मुंबईचे काही भक्त खाली बसले होते. श्रीजी येताच, श्रीजींनी कसे चाललाय म्हणून सर्वांना विचारणा केली, त्यावेळी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, असे काही भक्त म्हणाले. श्रीजींनी अविलंब तेथेच बसून‌ सर्वांचा नमस्कार स्वीकार केला. गुरु हा भक्तांमध्येच नित्य रमतो, हे आज पुन्हा अनुभवले.

पुरी यात्रेतील दुसरा दिवस प्रभुभक्तांना ऐच्छिक पर्यटनासाठी राखीव ठेवला होता.‌ आम्ही काहीजण रामचंडी पीठ आणि कोणार्कचे सूर्य मंदिर पाहायला गेलो. सूर्य मंदिर परिसरात श्रीजीही परिवारासह पर्यटनाचा आनंद घेत होते.‌ तेथे त्यांची कुटुंबवत्सलता पाहायला मिळाली.‌ संध्याकाळी निलाद्री भक्तनिवासावर भजनाचा आणि श्रीजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम होता.  दिवसभराच्या पर्यटनानंतरही श्रीजी ज्ञानदानाच्या कार्यासाठी अगदी उत्साहात हजर होते. श्रीप्रभु भजनानंतर प्रवचनाच्या सुरुवातीलाच श्रीजींनी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या “अरे जा श्रीप्रभु रिझवा…” ह्या पदाचा आधार घेऊन श्रीप्रभुला जर भजायचे असेल तर ते माणिकनगरातही होऊ शकलं असतं. मग इतक्या लांब जगन्नाथ पुरीला यायची काय गरज? ही संकल्पना स्पष्ट करतानाच, श्रीजी म्हणतात की, श्रीप्रभुला सर्वत्र पाहण्याचा जो भाव आहे, त्या धारणेला पुष्टी देण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. वैशिष्ट्य म्हणजे सभागृहामध्ये जगन्नाथ पुरी यात्रेचा जो फलक लावला होता त्यावर श्री माणिकप्रभुंच्या चित्र ऐवजी बलराम सुभद्रेसहित श्रीकृष्णाचा फोटो होता. ही सूक्ष्म एकरूपता भक्तांनीही आपल्या हृदयी ठासवावी, ही सुंदर संकल्पना श्रीजींची होती. परमात्मा वस्तू ही अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्याला जाण्यासाठी काही साधनांची आवश्यकता आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये ही वीस साधने तेराव्या अध्यायाच्या आठ ते बारा ह्या पाच श्लोकांमध्ये वर्णन केली आहेत. आणि ह्याच वीस गुणांचा सविस्तर ऊहापोह व्यवहारातील अनेक उदाहरणे सांगून, पुराणातील अनेक कथांचा दाखला देऊन, श्रुतीतील अनेक वाक्यांचा आधार घेऊन श्रीजींनी आपल्या पुढील तीन दिवसातील प्रवचनांमध्ये केला. गेल्या वर्षीच्या अधिक मासामध्ये हाच विषय श्रीजींनी घेतला होता. पण पुन्हा त्याची उजळणी जनसामान्यास व्हावी, त्यांची धारणा बळकट व्हावी आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान प्रत्येक जीवात्म्यास व्हावे, हा उदार हेतू श्रीजींच्या प्रवचनातून जाणवला. उजळणी केल्यामुळे संकल्पना स्पष्ट होऊन, त्या अंतरात खोलवर रुजून बळकट होतात ही एका हाडाच्या शिक्षकाची कार्यपद्धती श्रीजींच्या प्रवचनादरम्यान जाणवली. तसेच ह्या वीस साधनांच्या मूळ विषयाला हात घालण्याआधी श्रीजींनी जवळपास सतरा अठरा मिनिटे सर्व प्रभुभक्तांना मानसिकदृष्ट्या तयार केले.‌ श्रीजींच्या प्रत्येक प्रवचन हे सुरुवातीला उपक्रम (start), सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) ह्याचा एक सर्वांगसुंदर नमुना असतं, जसं गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला हे सूत्र आढळून येतं. जनसामान्यांना गीता समजवतानाच, श्रीजी भगवद्गीता  आपल्या जीवनात, प्रत्येक कृतीत अक्षरशः जगत असतात. साधारणत: दीड तासाच्या प्रवचनानंतर श्रीजी पुन्हा भक्तांना भेटण्यासाठी प्रांगणात हजर होते. मला अजूनही आठवते रात्री अकराच्या सुमारास ते भक्तनिवासाकडे रवाना झाले होते.

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्री सिद्धराज माणिकप्रभुंची पुण्यतिथी होती.‌ सकाळी साडेसात वाजता स्वर्ग बीचवर माणिक प्रभुंच्या पादुकांना समुद्र स्नानाची पर्वणी होती.‌ वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत, वेदोक्त मंत्रांच्या जयघोषात श्रीजींनी प्रभु पादुकांना मनोभावे स्नान घातले. माणिक नगरी जशी षोडशोपचार पूजा व श्राद्धविधी होतात, अगदी तसेच विधी, त्याच थाटात जगन्नाथ पुरीतही झाले.‌ देव्हाऱ्यासह नित्य पूजेतील देवांनाही जगन्नाथ पुरीची यात्रा घडली होती. सकाळी साडेअकरा वाजता नीलाद्री भक्त निवासाच्या ठिकाणी श्री माणिक प्रभू पादुकांची महापूजा संपन्न झाली त्यानंतर दुपारी दोन वाजता श्री सिद्धराज माणिक प्रभूंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर अल्पोपहार होऊन पुन्हा भजन आणि प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. समुद्र स्नानापासून, पुण्यतिथीचे श्राद्ध कर्म व त्यानंतरचे भजन, प्रवचन यामध्ये श्रीजींचा उत्साह तरुणालाही लाजवणारा होता. प्रवचनादरम्यान श्रीजींची विषयावरील पकड, वेदांतासारखा गूढ विषय जनसामान्यांना समजेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीने सादर करण्यातील हातोटी हे गुण केवळ एकमेवाद्वितीयच‌ आहेत. आजही सुमारे दोन तासाच्या प्रवचनानंतर श्रीजी पुन्हा सर्व प्रभू भक्तांना भेटण्यासाठी सुहास्य वदनाने खाली प्रांगणात येऊन बसले होते.

पुढच्या दिवशी सकाळी अकरा वाजता पुन्हा श्रीप्रभुंच्या पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर दीड वाजल्यापासून साधारणतः सहा वाजेपर्यंत श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या महासमाराधनेचा सोहळा अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर भजन आणि श्रीजींचे प्रवचन सुरू झाले. आज चिन्मय मिशनमधून अधिकारी सत्पुरुष, तसेच श्री कृपालू महाराजांच्या आश्रमातील मुख्य श्रीजींच्या प्रवचनासाठी उपस्थित होते. जगन्नाथ पुरी मधील काही यशस्वी उद्योजकांनीही श्रीजींच्या प्रवचनाला आज उपस्थिती लावली होती. यातून श्रीजींचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. सर्वचनानंतर श्रीजींनी सर्वांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आणि “अतिथी देवो भव” ह्या उक्तीला अधोरेखित केले.‌ प्रवचनांच्या ह्या गडबडीतही त्यांचे लक्ष तीनही दिवस खाली चाललेल्या भोजन व्यवस्थेकडे अगदी जातीने होते.‌ एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट पूर्ण क्षमतेने तडीस नेण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही श्रीजींच्या चौफैर असलेल्या नजरेतून दिसून येते.

यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीजी उपम्याची डिश हातात घेऊन सकाळी सर्व भक्तांसमवेत भक्तनिवसाच्या  प्रांगणात नाश्ता करत होते. त्यानंतर त्यांनी तासभर खुर्चीत बसून सर्व प्रभू भक्तांना आपल्या सोबत फोटो काढून दिले. ह्यातून त्यांची भक्तांमध्ये रमण्याची वृत्तीच दिसून येते.  परतीच्या प्रवासामध्ये ही येताना सारखीच बारीक विचारपूस सुरूच राहिली. परतीच्या प्रवासात शेवटी गुलबर्गा उतरल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात, हारतुरे घालून ग्रामवासीयनतर्फे जंगी स्वागत रेल्वे स्टेशनवरच झाले. गुलबर्ग्यापासून हुमनाबादपर्यंतचा प्रवास श्रीजींनी शटल ट्रेनने सेकंड क्लासमधूनच केला. पाहिजे असते तर त्यांनी गुलबर्ग्याहून त्यांच्या खाजगी गाडीने प्रवास करून केला असता पण त्यांनी ते कटाक्षाने टाळले. माणिक नगरला पोहोचल्यावर माणिक नगरवासीयांनी पुन्हा थाटामाटात स्वागत करून श्रीजींच्या संकल्प सिद्धीला मानाचा मुजरा केला. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची प्रभुभक्तांशी जुळलेल्या नात्यांची वीण घट्ट करतात. श्री माणिकप्रभु संस्थानाशी जोडल्या गेलेल्या भक्तांच्या अनेक पिढ्या त्याच आत्मियतेने, त्याच विश्वासाने आजही का टिकून आहेत, याचे उत्तर सांगायला कुण्या पंडिताची आवश्यकता नाही.

उच्च विद्याविभूषित, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, प्रख्यात साहित्यिक, संस्कृतसहित अनेक भाषांवर प्रभुत्व, वेदांत विषयावर विशेष प्राविण्य, श्री माणिक प्रभु गादीचे सहावे आणि विद्यमान पीठाधीश असलेले श्री ज्ञानराज माणिक प्रभु उपाख्य श्रीजी हे तितक्याच सहजतेने जनसामान्यात मिसळतात, सर्वांना सहजतेने उपलब्ध असतात. साधी राहणी, कुठल्याही बडेजावाचा अभाव, सर्वांवर आईची माया व वडिलांचे छत्र धरण्याचा स्वभाव, सर्वांना आपलेसे करण्याची वृत्ती ह्यामुळे श्रीजी सर्वांनाच मनापासून आपले वाटतात, आधार वाटतात. श्रीजींबद्दल इतर भक्तांकडून ऐकलेले प्रत्यक्षात अनुभवताना अत्यंत धन्यता वाटली, अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. श्रीप्रभुच्या प्रेरणेने योजलेली ही जगन्नाथपुरी यात्रेची धुरा श्रीजींनी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलली व यशस्वी करून दाखवली. ह्या संपूर्ण यात्रेदरम्यान कुणालाही, कसलाही त्रास झाल्याचे आजपर्यंत तरी ऐकले नाही, हा केवळ योगायोग नव्हता तर ही प्रभुचैतन्याची प्रचिती होती. या यात्रेच्या यशस्वी संयोजनामध्ये श्रीजींप्रमाणेच श्रीजींचे बंधू श्री आनंदराज प्रभुजी, चिरंजीव श्री चैतन्यराज प्रभुजी, श्री प्रभु संस्थान आणि असंख्य कार्यकर्ते ह्यांच्या अथक परिश्रमाचाही सहयोग होता, त्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता…

ह्या जीवाचे अहोभाग्य की ह्या यात्रेदरम्यान श्रीजींना जवळून पाहता आले, त्यांचा हृदय सहवास ह्या यात्रेदरम्यान आम्हा सर्वांनाच लाभला. संपूर्ण यात्रेदरम्यान सतत पूर्ण गुरुकृपेची नजर आणि मायेची पाखर सर्वच प्रभुभक्तांवर धरणाऱ्या श्रीजीरुपी ह्या आधारवडाप्रती कृतज्ञता म्हणून ही शब्दसुमने अनुग्रहभावे श्रीजींच्या परममंगल चरणी मनोभावे अर्पण..

अद्भुत चरित्र परिक्रमा

आज माणिकनगरी आलो आणि श्रीप्रभुमंदिर परीसरात डोळे दिपवून टाकणारा अद्भुत नजारा पहायला मिळाला. प्रभु महाराजांच्या दिव्य लीलांनी झळाळणारा समग्र जीवनपटच श्रीप्रभुमंदिराच्या आवारातील भिंतींवर साकारलेला पहायला मिळाला. श्रीजींची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आधी सुयोग्य चित्रकार (श्री. पराग घळसासी) यांना शोधलं गेलं व श्रीप्रभु लीलांचे समर्पक वर्णन लिहून परागजींना पाठवले. परागजींनी साकारलेल्या कलाकृतींमध्ये योग्य ते बदल करवून, त्या‌ त्या चित्रांमध्ये अपेक्षित भाव पुरेपूर उतरल्याची खातरजमा करुन‌ घेतली. त्यामुळेच की काय, चैतन्यरुप श्रीप्रभुच्या जीवनपटाची प्रत्येक कलाकृती आपल्याला अत्यंत सजीव वाटते. चित्रकार श्री परागजींवरही श्रीप्रभुची असलेली असीम कृपा, त्यांनी रेखाटलेल्या चित्रांवरुन सहज अनुभवता येते. अलीकडेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ह्या चित्रदालनाचे श्रीजींच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सटक्याच्या कक्षाच्या उजव्या बाजूपासून, रामभक्त असणाऱ्या श्री माणिकप्रभुंच्या आईवडिलांना श्रीरामनवमीच्या दिवशी श्री दत्तप्रभुंचा झालेल्या दृष्टांतापासून ह्या अद्भुत, मन मोहून टाकणाऱ्या चित्रयात्रेला सुरुवात होते. श्रीप्रभुंच्या बाललीला, श्री प्रभुंनी मामाचे घर सोडणे, अंबिलकुंड परीसरातील एकांतातील साधना, श्रीदत्त महाराजांचा श्रीप्रभुंवरील अनुग्रह, श्रीप्रभुच्या लीला, त्यांचे भ्रमण, माणिकनगरची स्थापना, श्री स्वामी समर्थांची, साईबाबांची, श्री गोंदवलेकर महाराजांची भेट, श्री मनोहरप्रभुंवर केलेला अनुग्रह ह्या व अशा अनेक दिव्य लीलांची ही चाळीस चित्रांची विस्मयकारी चित्रयात्रा श्रीमाणिक प्रभुंच्या संजीवन समाधीच्या चित्रापाशी येऊन विसावते. ही श्रीमाणिक प्रभुंचा संपूर्ण जीवनपट उलगडवणारी, अभूतपूर्व अशी चित्रसफर, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीला उजव्या बाजूला ठेवत, प्रदक्षिणा घालून पूर्ण होते. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण चित्रयात्रेला श्रीमाणिकप्रभु चरित्राची सचित्र परिक्रमा म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आजकाल इंस्टंटचा, T20चा जमाना आहे.‌ त्यामुळे ह्या सचित्र परिक्रमेमुळे अनायसेच श्रीप्रभुचरित्राचे झटपट पारायण केल्याची जाणीवही आपल्या मनाला सुखावून जाते. ह्या सचित्र परिक्रमेतील प्रत्येक चित्रात तो तो प्रसंग आपल्या मनात तंतोतंत उभा करण्याची प्रचंड ताकद आहे.‌

श्री. परागजींच्या उत्कटतेने प्रत्येक चित्र आपल्याला श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती करवून देणारे, अतिशय सजीव वाटणारे असे झाले आहे. ह्या चित्रांना केलेली चौकटही अतिशय भव्य आणि चित्ताकर्षक आहे. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची प्रत्येक कलाकृतीही सुंदर… ही उक्ती येथेही लागू होते. श्री प्रभुसंस्थानाने श्रीप्रभुंच्या समग्र जीवनपटाचा हा अमुल्य, चिरंतन ठेवा समस्त प्रभुभक्तांसाठी उपलब्ध करुन‌ दिल्याबद्दल श्री प्रभुसंस्थानाचे अभिनंदन, कौतुक आणि आभार… ज्यांच्या संकल्पनेतून ही सचित्र परिक्रमा साकारली, त्या श्रीजींप्रती कृतज्ञता‌ आणि त्यांच्या परममंगल चरणी कोटी कोटी वंदन… आणि श्रीजींच्या मनातील ही संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्यांनी श्रम केले, त्या सर्वांना अभिनंदन. ज्यांनी श्री माणिकचरितामृताचे वाचन केले आहे, त्यांना ह्या सचित्र परिक्रमेत विशेष आनंदाची अनुभूती येईल.‌ ह्या सचित्र परिक्रमेत मला आत्यंतिक सुखाची अनुभूती आली आणि माणिकनगरच्या पुढील भेटीत ती अनुभूती आपल्याही येवो, ह्या श्रीप्रभुचरणीच्या नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…

The Glory of Maniknagar

वरील एका वाक्यातच माणिकनगरचे संपूर्ण वैभव आणि सौंदर्य अनुभवता येते.‌ श्री चैतन्यराजप्रभुंच्या सिद्ध लेखणीतून स्फुरलेले अवीट गोडीचे, अतीशय सुमधुर असे हे गीत, आपण शरीराने कुठेही असले तरी मनाने आपल्याला निश्चितच माणिकनगरात घेऊन जाते. खाली दिलेल्या लिंकवर आपण युट्यूबवर आपण ह्या गीताचा आनंद घेऊ शकतो…

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून माणिकनगरला माझे जाणे सुरू झाले. माणिकनगरच्या सुरुवातीलाच असलेली भव्य कमान व त्यावरील मंगल कलशाची प्रतिकृती माणिकनगरच्या मांगल्याची चुणूक दाखवून देते. माणिकनगरमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी दिसून येते. आजूबाजूच्या शेतांतून मोरांचा केकारव ऐकू येतो. मुक्तपणे इथून तिथून उड्या मारणारी माकडे आपल्याला माणिकनगरात सहज नजरेस पडतात.‌ पशुपक्ष्यांसाठी हिरवगार माणिकनगर म्हणजे जणू आपलं हक्काचचं घर… श्री माणिकप्रभु स्थापित ह्या पुण्यभूमीमध्ये तेही स्वच्छंदपणे, मुक्तपणे आपले जीवन जगत असतात…

चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी आपल्या अवतारकाळात सन १८४५च्या सुमारास माणिक नगरची स्थापना केली. श्री माणिकप्रभु स्वतः शिवस्वरूप होते, हे श्री माणिक चरित्रामृतातील अनेक कथांतून आपल्याला अनुभवता येते. या गीताच्या धृपदातही ह्या पृथ्वीवर कैलास पर्वताची जर कोणती प्रतिकृती असेल, तर ती म्हणजे माणिकनगर… येथे श्री माणिकप्रभू चराचरांमध्ये व्यापून उरले आहेत आणि ते कसे ह्याची एक समग्र यात्राच ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते. ह्या गीतामध्ये सुरुवातीला दिसणारा प्रभू मंदिराचा कळस हा आपल्याला कैलास पर्वताच्या उत्तुंगतेची आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या श्री माणिकप्रभुंची सुकोमल, सुहास्यवदन छबी त्या भोळ्या कर्पुरगौर सांब सदाशिवाचीच आठवण करून देते.‌

कलबुर्गी (आधीचे गुलबर्गा), बिदर आणि कल्याण ह्या तीन इतिहास प्रसिद्ध शहरांमधील त्रिकोणी क्षेत्रातील डोंगराळ प्रदेशास दरीपट्टी म्हणतात. वरील तिन्ही ठिकाणांच्या मधोमध माणिकनगर वसलेले आहे. त्यामुळेच माणिकनगराच्या सीमा त्रिविध आहेत. तसेच या प्रदेशात मराठी, कानडी आणि तेलगू ह्या भाषा बोलल्या जातात आणि ह्या अनुषंगाने लोक आपापली संस्कृती येथे जपतात.‌ त्यामुळेच त्रिविध सीमा, भाषा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगमच आपल्याला माणिकनगरात पाहायला मिळतो. तसेच ह्या प्रदेशात वातावरण अत्यंत निरोगी असून येथे पाण्याची विपुलता आहे. माणिकनगरात चाफा, बकुळ, मधुमालती, सुंदर सुंदर कमळे अशी आणि अनेक प्रकारची फुले सदैव बहरत असतात. श्रावण महिन्यात श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीवर केलेल्या फुलांच्या अलंकारांवरून आपण त्याचा मनमुराद आनंद लुटला आहेच.‌ जरी येथील प्रदेशांत, लोकांत, संस्कृतीत, भाषेत विविधता असली तरी, केवळ जय गुरु माणिक हे तीन शब्द सर्वांनाच सकलमत संप्रदायाच्या एकच तत्वात गुंफतात.‌ वर वर्णिल्याप्रमाणे येथे विविध फुले जरी उमलली तरी ती प्रभुच्या एकाच समाधीवर अर्पण केली जातात.‌

दरीपट्टीचा डोंगराळ भाग लाल रंगाचा आहे. येथील माती लाल रंगाची आहे. श्री माणिकप्रभुंच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही दिव्य लाल रंगाची भूमी इतकी मंगलमय आहे की, अनेक योगी ह्या मातीचाच टिळा लावतात.‌ प्रेमाचा रंगही लालच असतो, म्हणून तो सौभाग्यकारक समजला गेला आहे. अशी ह्या माणिकनगरच्या मातीत सौभाग्याचं लेणं असलेल्या, कुंकूमाने भरलेल्या मळवटाचीही झलक आपल्याला दिसून येते. घनदाट वृक्षवल्लींनी व्यापलेल्या ह्या प्रदेशातील वातावरण कोणतेही ऋतूत अत्यंत आल्हाददायी तसेच आरोग्यकारक असते.‌

उत्तुंग आणि सुंदर अशा श्रीप्रभु मंदिरावर सोन्याचा झळाळता कळस आहे. ह्या कळसाच्या केवळ दर्शनानेच, त्याला केलेल्या नमस्कारानेच सर्व यश आणि सिद्धी प्राप्त होतात. माणिक नगरचे हे अपूर्व वैभव पाहून स्वर्गातील देव आणि गंधर्वसुद्धा विस्मय करत राहतात.

सकलमत संप्रदायात कोणताही जातीभेद नाही. इथे सर्वांचाच प्रभुस्वरूप म्हणून समान आदर केला जातो. आजही माणिक नगरात विविध धर्माचे उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे वाक्य इथे अक्षरशः जगले जाते.‌ ह्या संकल्पनेचे वर्णन करताना चैतन्यराज म्हणतात की, इथे कोणची हार होऊ नये आणि ह्यातच सकलमत संप्रदायाची जीत आहे. ह्यावरून सकल्पात संप्रदायाच्या विश्वबंधुत्वाची भावना अधोरेखित होते. माणिक नगर मध्ये आपण कुठल्याही दर्गा, मंदिर, मठ, शिवालयाला भेट दिली तर तेथे श्री प्रभुंचं अस्तित्व, त्यांच्या खुणा जाणवतात.

माणिकनगरला संगीताचे माहेरघर म्हटले जाते. भारतातील संगीतातील अनेक प्रसिद्ध विभूतींनी श्रीप्रभुंच्या गादीसमोर आपली कला सादर केली आहे. त्यांची अशी मान्यता आहे की श्रीप्रभुंच्या गादीस समोर संगीत सेवा समर्पित केल्याशिवाय त्यांची संगीत साधना पूर्णच होत नाही. माणिकनगरमध्ये संगीत शिकवण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. अनेक लोक येथे संगीताची आराधना करतात. लता मंगेशकर, पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी सारख्या अनेक विभूतींनी आपली सेवा श्रीप्रभुंच्या गादीसमोर सादर केली आहे.

माणिक नगरमध्ये अखंड अन्नदान केले जाते. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेल्या भंडारखान्यामध्ये आलेल्या सर्व भक्त जणांना श्रीप्रभुचा पोटभर प्रसाद मिळतो. अनेक भुकेलेले जन हा प्रसाद घेऊन संतुष्ट होतात. सोहळ्याचे वर्णन करताना कवी म्हणतात की, ह्या सुग्रास प्रसादासाठी देवतासुद्धा माध्यान्हकाळी तिष्ठत असतात. खरोखरच प्रभुंच्या माधुकरीचा प्रसाद ज्यात मिसळला आहे, त्या महाप्रसादाची गोडी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधील जेवणापेक्षा अवीट आहे. ज्यांनी ह्या प्रसादाची चव चाखली आहे, त्यांनी हे अनुभवले असेलच.

माणिकनगरी वेद पाठशाळा आहे. येथे मुलांना वेदांताचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. श्रीप्रभु कृपेने येथे गुरु आणि शिष्य, दोघेही वेदांच्या अध्ययनात सफलता प्राप्त करतात आणि त्यांनी उच्चारलेले मंत्र जणू श्रीप्रभु स्वतः सिद्ध करून त्यांची अज्ञानता दूर करतो. श्री माणिकनगर संस्थानाचा रथ ज्ञान आणि भक्ती या दोन चाकांवर दौडत आहे आणि त्यामुळेच ज्ञानाची ही सरिता माणिक नगर मध्ये नित्य खळखळून वाहत असते, ज्ञानाचे हे नगारे येथे अष्टौप्रहर वाजत राहतात.

श्री माणिकनगर संस्थानाने नेहमीच सामाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांना यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विकलांग जनांसाठीसुद्धा श्रीप्रभु त्यांचा मायबाप बनून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. माणिकनगरमध्ये असलेल्या विकलांग शाळेमध्ये असलेले विद्यार्थी नेहमी श्रीप्रभुंची भजन म्हणतात. माणिकनगरातील प्रेमळ नगरवासी सुद्धा त्यांना वात्सल्य आणि प्रेम अगदी भरभरून देतात. आणि त्यांच्याच रूपात जणू श्रीप्रभु त्यांच्या हाताला धरून त्यांना जीवनामध्ये चालायला, स्वयंपूर्ण बनवायला मदत करतो.

श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आतापर्यंतच्या सर्व पिठाचार्यांनी स्वतः कल्पतरू म्हणून आपल्या भक्तांना जे जे हवे आहे ते ते आनंदाने दिले. त्यांच्या सर्व कामना पूर्ण केल्या आणि आजही अव्यहातपणे हे सर्व चालू आहे. ज्याने जे जे मागितले त्याला ते श्रीप्रभुने समर्थपणे दिले. म्हणूनच कवी पुढे म्हणतात की, आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी श्रीप्रभु येथे स्वतः हाती दंड धरून सदैव बसला आहे.

श्रीप्रभुंच्या वास्तव्याने पुनित झालेल्या ह्या दिव्यभूमीमध्ये भजनाचा घोष अखंड चालू असतो आणि त्यामुळेच काय की माणिकनगर हे कदाचित वैकुंठापेक्षाही श्रेष्ठतम असे स्थान आहे असे कवी ठामपणे म्हणतोय. माणिकनगरला आनंदवन, मंगलभुवन अशा कितीतरी नावांनी शब्दबद्ध केलाय. माणिकनगरचे हे सर्वदूर पसरलेले वैभव, इथे आपल्याला येणारी त्याची दिव्य अनुभूती हे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्यप्राय आहे. ज्यांच्या नशिबात श्रीप्रभुचे हे आनंदभुवन आहे, असे सौभाग्यशाली लोक येथे श्रीप्रभु दर्शनासाठी पोहोचतात. माणिकनगरातील प्रत्येक घर हे श्रीप्रभु कृपेच्या छत्रछायेखाली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

श्री माणिकप्रभुंनंतर बालयोगी श्री मनोहर माणिकप्रभुंनी आपल्या अलौकिक शक्तीने सकलमत संप्रदायाचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा नावलौकिक वाढवला. त्यानंतरचे आचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु यांनी तर श्रीप्रभु संस्थानची कीर्ती आसेतु हिमाचल वाढवली. श्री मार्तंड माणिकप्रभुंनंतर श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या कारकीर्दीत अतुलनीय प्रभुभक्तीचा आदर्श घालून दिला व माणिक नगरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या निर्वाणानंतर अगदी बालवयातच गादीवर बसलेल्या सिद्धराज माणिकप्रभूंनी संस्थानाचा संपूर्ण कायापालट केला. आपल्या मितभाषी पण मृदू वाढीने आणि सौहार्दपूर्ण वागणुकीने आजही श्री सिद्धराज प्रभू माणिक नगरातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात विराजमान आहेत. सध्याचे पिठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु आधीच्या पिठाचार्यांचे दिव्य कार्य समर्थपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. श्रीसंस्थानाच्या आधुनिकरणाचा ध्यास श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी घेतला आहे. तसेच भगवद्गीतेच्या माध्यमातून वेदांतातील गूढ सिद्धांत जनसामान्यांना समजतील अशा सहज आणि सरळ, हसत खेळत प्रवचनांच्या माध्यमातून आज ते घराघरात पोहोचवत आहेत.

निसर्ग सौंदर्याने नटलेले, वृक्ष लता वेलींनी फुललेले, पशुपक्ष्यांचे हक्काचे माहेरघर असलेले, शांत प्रशांत असे माणिक नगर जणू काही श्रीप्रभु परमात्म्याचे ही आनंदमय निवासस्थानच आहे. येथील कणाकणांमध्ये चैतन्याची अनुभूती देणाऱ्या आणि प्रभुवास्तव्याने अतिशय पवित्र झालेल्या अशा पुण्यभूमीला कवी कोटी कोटी वंदन करत आहे. अशा ह्या असीम अनंत श्रीप्रभु परमात्म्याच्या दर्शनासाठी केवळ देवच नाही तर असुर सुद्धा दोन्ही हात जोडून उभे आहेत…

संपूर्ण गीतातून माणिक नगरचे हे दिव्य दर्शन आपल्याला साक्षात् माणिक नगराला घेऊन जाते. तेथे अनुभवलेले, हृदयाच्या कोपऱ्यात साठवलेले क्षण पुन्हा ताजेतवाने होतात. आणि शेवटी जेव्हा माणिक नगर माणिक नगर माणिक नगर माणिक नगर असा गजर होतो तेव्हा डोळ्यांच्या कडा प्रभुच्या आठवणीने हलकेच ओलावतात…

आपल्या आसपास कितीतरी तीर्थस्थळे असतील पण त्या त्या अवताराच्या काळापासून त्या दिव्य आठवणी, त्या त्या परंपरा, ती शिकवण अतिशय आत्मीयतेने जपणारे कदाचित माणिक नगर हे एकमेव स्थान असावे…

एखाद्या स्थानाचे वैभव हे केवळ तेथील भव्य वास्तू किंवा सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी किती वेगळे असू शकते, हे आपण या गीताच्या माध्यमातून अनुभवू शकतो. प्रभू परमात्मा हा केवळ मूर्तींमध्ये नसून तो चराचरामध्ये चैतन्य रूपात प्रकट होत असतो आणि माणिकनगरामध्ये श्रीप्रभुचे हे चैतन्य आपण प्रत्येक गोष्टीत, होय, अक्षरशः प्रत्येक गोष्टीत अनुभव शकतो. अतिशय दैवी शब्दांमध्ये गुंफलेले व सुमधुर चाल असलेले हे गीत म्हणजे कवी चैतन्यराज प्रभू यांच्यावर बरसलेली ही दिव्य प्रभुकृपाच आहे. त्याला स्वतः श्री. चैतन्यराज प्रभु आणि श्री. कौस्तुभजी जागीरदार यांनी सुंदर स्वरसाज चढवलेला आहे. श्री आनंदराजप्रभुंच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदानेही अतिशय तोलामोलाची साथ त्यास दिलेली आहे आणि त्यामुळेच सर्वांप्रती मनस्वी कृतज्ञता.
आपण कधी माणिक नगरी गेला असाल, तर ह्या गीताच्या माध्यमातून आपल्या गतस्मृती निश्चितच जाग्या होतील, आपण यापूर्वी जर कधी माणिकनगरला गेले नसाल तर आपल्याला माणिक नगर ला जायची जायची प्रेरणा या गीतातून नक्कीच होईल आणि ती होवो, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंती सह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक…