का ग जिव्हे

का ग जिव्हे घेसी न तू प्रभुनाम,
कैवल्यदायी पूर्णकृपेचे जे धाम ॥

परनिदेंस जिव्हा सरसर सरसावी,
प्रभुनाम घेण्या बोबडी का वळावी ॥

व्यर्थ वादविवादा शब्द उच्चारावे,
परी प्रभुनाम घेण्या मौनची व्हावे ॥

गोडधोड ओरपण्या लपलप धावी,
प्रभुनाम घेण्या आत का वळावी ॥

करी बा विचार, जिव्हेचा साचार,
प्रभुनामाचा कर तू त्वरित संस्कार ॥

वळव जिव्हेसि तू, मधुर माणिक नामी,
एक माणिक नामच येईल, सदासर्वदा तुझ्या कामी॥

काळावर सत्ता अन् मृत्यूवर हुकूमत

श्री माणिकप्रभु महाराज हे साक्षात दत्तप्रभूंचे अवतार मानले जातात. ‘सकलमत संप्रदाया’चे संस्थापक असलेल्या प्रभूंच्या जीवनातील प्रत्येक लीला ही भक्ताला अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि भीतीकडून अभयाकडे नेणारी आहे.  अपरिचित  लीलाभाग निवेदित करणार आहे.  हा प्रभूंच्या अगाध सत्तेचा आणि मृत्यूवर असलेल्या त्यांच्या हुकमतीचा एक दैवी दस्तऐवज आहे. प्रभूंच्या लीलांचे वर्णन करणे हे सामान्य मानवाच्या बुद्धीपलीकडचे आहे, परंतु तरीही भक्तांच्या कल्याणासाठी आणि भक्तीचा गोडवा वाढवण्यासाठी हे चरित्र लिहीत आहे. हे चरित्र म्हणजे केवळ कथा नसून ती भक्तांसाठी अमृतधारा आहे.
पहिली प्रमुख कथा श्रीपतराव नावाच्या एका निष्ठावान भक्ताची आहे. श्रीपतराव हे प्रभूंच्या चरणी अत्यंत अनन्यभावाने सेवा करत असत. एकदा एका ज्ञानी ज्योतिषाने श्रीपतरावांची कुंडली पाहून एक भयावह भविष्य वर्तवले. ज्योतिषाने स्पष्ट सांगितले की, श्रीपतरावांचे आयुष्य केवळ ३२ वर्षांचे आहे. या वयानंतर त्यांचा मृत्यू अटळ आहे.
हे ऐकून श्रीपतराव आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. मृत्यूच्या दहशतीने त्यांना ग्रासले. शेवटी ते धावत प्रभूंच्या चरणी आले आणि आपला जीव वाचवण्यासाठी करुणा भाकू लागले. “हे प्रभू, माझे अल्पायुष्य दूर करा, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे,” अशी विनवणी त्यांनी केली.
माणिकप्रभूंनी त्यांना धीर दिला. प्रभू म्हणाले, “ज्योतिषाचे गणित ग्रहांच्या चालीवर असते, पण जो ईश्वराच्या नामाचा आश्रय घेतो, त्याचे नशीब स्वतः ईश्वर लिहितो.” प्रभूंनी त्यांना एक अनुष्ठान दिले. त्यांनी सांगितले की, कागदावर ‘जय गुरु माणिक’ किंवा ‘हरी’ असे नाम लिहावे आणि ते कागद मारुतीच्या मंदिरात अर्पण करावेत.
काही दिवसांनी श्रीपतरावांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना साक्षात प्रभूंचे दर्शन झाले. प्रभू मारुतीरायासमोर उभे होते आणि त्यांनी श्रीपतरावांच्या आयुष्याच्या रेषा बदलून त्यांना दीर्घायुष्य दिले. सकाळी उठल्यावर श्रीपतरावांना जाणवले की त्यांची मृत्यूची भीती कायमची निघून गेली आहे. ज्योतिषाचे भाकीत खोटे ठरले आणि प्रभूंच्या कृपेने ते ३२ वर्षांचा टप्पा ओलांडून सुखाने जगू लागले.
प्रभूंचे दरबार म्हणजे केवळ चमत्कार दाखवण्याचे ठिकाण नव्हते, तर ती एक आध्यात्मिक शाळा होती. एकदा एका भक्ताने अतिशय श्रद्धेने प्रभूंच्या नैवेद्यासाठी ‘पेढे’ आणले होते. तिथे गुंडू नावाचा एक तरुण होता. पेढ्यांचा सुवास आणि रूप पाहून त्याच्या मनात लोभ निर्माण झाला.
प्रभूंनी शिस्त म्हणून ताकीद दिली होती की, जोपर्यंत नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला जात नाही, तोपर्यंत कुणीही त्याला स्पर्श करू नये. पण गुंडूने सर्वांची नजर चुकवून गुपचूप काही पेढे खाल्ले. माणिकप्रभु हे अंतर्यामी होते. त्यांना ही चोरी लगेच समजली. त्यांनी तिथे असलेल्या भक्तांना सांगितले, “ज्याने हे पेढे लोभापायी खाल्ले आहेत, त्याला ताप येईल.”
लगेच गुंडूला थंडी वाजून ताप भरला. त्याचे शरीर तापाने फणफणले. जेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि प्रभूंची माफी मागितली, तेव्हाच प्रभूंच्या कृपेने तो ताप उतरला. ही लीला दाखवण्यामागे प्रभूंचा उद्देश हाच होता की, भक्तीत संयम आणि गुरूची आज्ञा पाळणे किती महत्त्वाचे आहे.
ही सर्वात थरारक आणि महत्त्वपूर्ण कथा आहे. लक्ष्मणराव नावाचा एक विद्वान होता, जो मंत्रविद्येत निपुण होता. त्याला आपल्या विद्येचा, मंत्रांचा आणि पांडित्याचा मोठा अहंकार होता. तो स्वतःला खूप मोठा मांत्रिक समजत असे.
परंतु, जेव्हा काळाची वेळ आली, तेव्हा त्याची कोणतीही मंत्रविद्या कामी आली नाही. लक्ष्मणराव गंभीर आजारी पडले आणि पाहता पाहता त्यांचे प्राण मावळले. घरातील लोक रडू लागले, अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण इकडे सूक्ष्म रूपात लक्ष्मणरावाचा प्रवास सुरू झाला होता.
दोन भयानक यमदूत लक्ष्मणरावाच्या आत्म्याला घेऊन यमपुरीच्या दिशेने निघाले. लक्ष्मणरावाने वर्णन केले की, तो रस्ता अत्यंत कठीण आणि भयावह होता. शेवटी त्याला यमराजाच्या दरबारात उभे करण्यात आले. तिथे यमराजाचे उग्र रूप पाहून तो थरथरायला लागला. चित्रगुप्त त्याचे पाप-पुण्याचा हिशोब वाचत होते. लक्ष्मणरावाला त्याच्या अहंकाराची आणि कर्माची शिक्षा सुनावण्यात येणार होती.
लक्ष्मणराव पूर्णपणे हतबल झाले होते. तेव्हाच तिथे एक चमत्कार घडला! अचानक संपूर्ण यमलोक एका दैवी प्रकाशाने उजळून निघाला. साक्षात श्री माणिकप्रभु महाराज तिथे प्रकट झाले. प्रभूंचा तो तेजोमय अवतार पाहून स्वतः यमराज आपल्या सिंहासनावरून खाली उतरले आणि त्यांनी प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले.
प्रभू यमराजाला म्हणाले, “हा लक्ष्मणराव आमचा आहे. याने आमचा आश्रय घेतला आहे, त्यामुळे याच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही. याला पुन्हा पृथ्वीवर पाठवून द्या.”
साक्षात मृत्यूच्या देवतेने प्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानली. लक्ष्मणरावाचा आत्मा पुन्हा त्याच्या देहात प्रवेशला. इकडे पृथ्वीवर, लक्ष्मणरावाचे प्रेत अचानक हलू लागले आणि ते जिवंत होऊन उठून बसले! जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. लक्ष्मणरावाने रडत रडत प्रभूंच्या चरणांवर डोके ठेवले आणि आपला यमलोकाचा सर्व अनुभव सर्वांना सांगितला. त्याचा सर्व अहंकार गळून पडला आणि तो प्रभूंचा अनन्य भक्त झाला.
“माझ्या भक्तासी भीती नाही। नेमें निष्ठा धरूनि राही ॥”
म्हणजेच, ज्याने प्रभूंच्या चरणी आपली निष्ठा वाहिली आहे, त्याला या जगात किंवा परलोकात कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. यमराज सुद्धा प्रभूंच्या भक्ताला स्पर्श करू शकत नाहीत. ही कथा भक्तांसाठी एक कवच आहे. श्री माणिकप्रभूंची ही लीला ऐकून आणि वाचून भक्तांचे मन प्रसन्न होते आणि त्यांना जीवनातील संकटांशी लढण्याचे बळ मिळते.

रामनाम

नामस्मरणाचे महत्त्व सांगताना महाराज नेहमी रामायणातील सेतु बांधण्याच्या प्रसंगी घडलेल्या दोन घटना सांगतात.
त्या घटनांवर एक कविता लिहिली आहे. श्रीजी त्या प्रसंगांविषयी जे जे वर्णन करतात ते शक्य तितके समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीजींच्या चरणी सादर अर्पण

जय श्री राम जय जय श्री राम
तीरावर जयघोष चालला
जयघोषे पाषाणां सहजचि
सागरात वानरे टाकला

विशाल ऐशा तरिल्या शिळा
नामप्रतापे सागरजलवर
पाहत होते राम दृश्य हे
दूर बसुन एका खडकावर

इतकी प्रचंड वानर सेना
एकजुटीने बांधीत सेतू
इवलीशी ती खार भाबडी
वाटा उचलित रामा हेतू

मनात आले श्री रामाच्या
हातभार थोडा लावावा
झटती सारे अपुल्या कार्या
आपणही भारा उचलावा

ठरवुनि ऐसे उठले राघव
आले निश्चये सेतु स्थानी
उचलति फेकति महासागरी
दगड एक दोन्ही हातांनी

गुडगुडगुडुंब दगड डुंबला
चकित जाहले सारे क्षणभर
प्रयत्न आणिक करण्या पुढती
चटकन सरसावले रघूवर

दुसरा, तिसरा, कितीतरी ते
दगड बुडाले राम करांतुन
हताश होऊन माघारी प्रभु
खडकावरती बसले जाऊन

काही कळेना काय करावे
कोडे हे कोणास पुसावे
बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ ऐशा
हनुमंताला असेल ठावे

बोलावुनि त्यां कथिती राघव
घडला प्रसंग, पुसती कारण
वदले हनूम “दगड फेकतां
म्हटले का “जय श्री राम” आपण?”

नाही? मग कैसे हो तरावे
दगड रामनामाविण एकही
आणि प्रभु ज्यां तुम्ही सोडिले
बुडती निश्चिती ते जलडोही

पलीकडे लंका तीरावर
रावणसेना होय घाबरी
मायावी हे वानर दिसती
सेतू बांधती समुद्रावरी

धीर राखण्या निज सेनेचा
लंकापती तो रावण आला
महाकाय दगडा उचलुनिया
पाण्यावरती सहज तारिला

रावणांस निक्षून विचारी
मंदोदरी ती राजमहालां
हे तुमचे सामर्थ्यच नोहे
चमत्कार हा कसा घडविलां

रावण सांगे गुपित पत्निला
टाकित असता जळांत पत्थर
मनात मी चालविला होता
रामनाम जयघोष निरंतर
रामनाम जयघोष निरंतर

गुढी उभारू प्रभु नामाची

गुढी उभारु प्रभु नामाची
“माणिक जय गुरु माणिक” याची

शरीर अपुले वेळू काठी
लेपवू सत्त्व गुणांची ऊटी
साडी रेशमी बांधू भक्तिची
गुढी उभारु प्रभु नामाची

मन-कलशाला करू पालथे
श्रीगुरु वचन सुतांचे वेढे
माळ शर्करा मधु भावाची
गुढी उभारू प्रभु नामाची

श्रद्धा-सुमने गुंफूनी माला
ध्यान लावू लिंबड्याचा पाला
करुनि अशी शुद्धी चित्ताची
गुढी उभारू प्रभु नामाची

गुढी उभारू प्रभु नामाची
“श्री माणिक जय माणिक” याची
“हर माणिक आणि हरी माणिक”
हे नाम आमुच्या सुखा कारणिक
भव तरण्या नसे आम्हा आणिक
केवळ “चिन्माणिक सन्माणिक”

तव भजनाचे सूर

अमृताहूनि बहुत ही गोड
तव भजनाचे सूर अजोड
मधाळ, मधूर, किती मनोहर
असेच कानी पडो निरंतर

आधिच प्रभुचे रसाळ काव्य
तव स्वरे होई अधिकच दिव्य
अलौकिक प्रभुच्या उपदेशी
वाढवी गोडी भक्त मानसी

प्रभुसि आळविता तव वाणी
भक्त नेत्री ये भरून पाणी
उत्कट, आर्त, भावपूर्ण स्वर
करिती भक्त-हृद-भाव उजागर

कंठ तव घेता आलाप ताना
दशदिशांत संचरे चेतना
छेडित जव लयबद्ध तराणे
वाटे गंधर्वे लाजिरवाणे

“माणिक” नाम विलंबित करता
प्रभुसि तन्मय गायने स्मरता
आतुर प्रभु, तव ऐकाया स्वर
निश्चलता त्यजुनी ये तत्पर

ही किमया जे करिती प्रचूर
ते अजोड तव भजनाचे सूर
मधाळ, मधूर, किती मनोहर
असेच कानी पडो निरंतर
असेच कानी पडो निरंतर

लाभले आम्हांस भाग्य

लाभले आम्हांस भाग्य भजतो प्रभु माणिकेश
जाहलो खरेच धन्य पुजतो प्रभु माणिकेश

कृष्ण, विष्णू, जगदंब, सांब, राम – माणिकेश
काशी, पुरी, गिरीनार, चार धाम – माणिकेश

नित्य अमुचे प्रात: अन् सांज स्मरण – माणिकेश
जप, अनुष्ठान, ध्यान अन् धारण – माणिकेश

बेसुरेसे सूर अमुचे भजन करत – माणिकेश
वाणी आणि लेखणीत स्तवन सतत – माणिकेश

वारसा पुढल्या पिढीस भक्तिभाव माणिकेश
स्थान अमुचे श्रद्धेचे एक ठाव माणिकेश