ईश्वराबद्दल भीती

ईश्वराबद्दल भीती (देवाचा कोप, Fear of God) – सामान्यजनांच्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून, ईश्वराप्रती प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन…

मानवी जीवनाला मानसिकदृष्ट्या अधिकाधिक बलवान बनवणे, मीच परमात्मास्वरूप आहे, ही धारणा अधिकाधिक व्यापक करणे, ही श्रीजींच्या प्रवचनांची काही ठळक वैशिष्ट्ये. आजच्या भाद्रपद पौर्णिमेच्या प्रवचन पर्वांतर्गत ईश्वराबद्दलची भीती किंवा देवाचा कोप (Fear of God) ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक आणि समाजाला जागृत करणारं, त्याला यथायोग्य दिशा देणार असं प्रवचन श्रीजींच्या मुखकमलातून स्फुरले.

ईश्वर आपल्यावर नाराज होऊ शकतो का? त्याला आपल्या उपासनेची, प्रार्थनेची, भक्तीची आवश्यकता आहे का? आणि आपल्याला देवाची भीती वाटते का? अशा विविध प्रश्नांचा मार्मिक ऊहापोह वेदांतातील अनेक संदर्भासह श्रीजींनी आपल्या आजच्या प्रवचनात केला‌आहे. मुळातच हिंदू धर्मात ईश्वराच्या भीतीची संकल्पनाच नाही हे अधोरेखित करताना, अशा प्रकारच्या भीतीची संकल्पना आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांकडून आणि इंग्रजांकडून आली हे श्रीजी नमूद करतात. आपला देश स्वतंत्र होऊन आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळेस आपल्या मनाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या अनिष्ट संस्काराच्या जोखाड्यातून मुक्त होण्यासाठी श्रीजींचे आजचे हे प्रवचन सर्वांना नक्कीच उद्बोधक व्हावे.

भयाची व्याख्या करताना श्रीजी म्हणतात, परतो अनिष्ट संभावना इती भय: म्हणजेच दुसऱ्यांकडून संकटाची किंवा अनिष्टाची संभावना म्हणजेच भय… किंवा भविष्यात प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या अनुसंधानजन्य उत्पन्न होणाऱ्या मनाचा उद्रेक म्हणजेच भय…‌ हे सांगताना श्रीजी श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या मनाची व्याख्येचा संदर्भ देतात. भय हा मनाचा धर्म आहे. मन आणि परमात्मा यातील भेद स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात, की मन जड, अनात्मा आहे तर परमात्मा हा चेतन आहे आणि म्हणूनच भीतीचा ईश्वराशी काहीही संबंध नाही.

कोणताही मनुष्य सहेतुक उपासना करतो. भय, लाभ, कर्तव्य आणि प्रेम हे ईश्वराचे चार उपासनेचे मुख्य हेतू आहेत. कोणी भयापोटी, तर कोणी काहीतरी लाभ व्हावा म्हणून, कोणी कर्तव्य भावना म्हणून तर कोणी भगवंताप्रती असलेल्या प्रेमापोटी ईश्वराची उपासना करतो. ह्या चारही हेतूंपैकी प्रेम भावनेने केलेली उपासना ही श्रेष्ठतम आहे कारण जेथे प्रेम आहे तेथे कोणतीही भीती नाही.

देवांच्या भीतीसंबंधीत पुराणातील काही संदर्भ देताना श्रीजी तैतरीय उपनिषदाचा आधार घेतात. जो माणूस स्वतःला परमात्म्यापासून यत्किंचितही वेगळा समजतो, त्याला भय असते किंवा अज्ञानी माणसाला भय असते. ही संकल्पना स्पष्ट करतानाच श्रीजी म्हणतात की, भीती असण्यासाठी समोर भयावह काहीतरी गोष्ट असावी लागते. परंतु सर्वत्र परमात्माच भरलेला आहे आणि तो सर्व रूपात प्रकटतो अशी का एकदा मनाची धारणा झाली, की मग भीतीचे काही कारणच उरत नाही. श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेला सकलमत संप्रदाय आणि श्री प्रभुगादीच्या आचार्यांनी रचलेली अनेक पदे, सर्वरूपे श्रीप्रभु हा जाण ही धारणा आपल्या मनावर खोलवर रुजवतात आणि दृढ करतात.‌

परमात्म्याचा अनेकांशी असलेल्या संबंधांबाबत खुलासा करताना श्रीजी कृष्णाचे उदाहरण देतात. आकाशवाणी झाल्यामुळे कंसाला कृष्णाप्रती भीती होती, शिशुपालादि कृष्णाचा द्वेष करायचे, यादवांचे कृष्णाशी रक्ताचे नाते होते, पांडवांशी कृष्णाचे मित्रत्वाचे संबंध होते आणि आपले? आपले कृष्णाची भक्तीचे नाते आहे, त्यामुळे आपल्याला भीतीचे काहीही कारण नाही. जर आपल्याला परमेश्वराबद्दल भीती वाटायला हवी असेल तर आपल्याला कंस किंवा रावण बनायला लागेल, हे सांगतानाच श्रीजी आपल्याला परमात्म्याबरोबर असलेल्या प्रेम संबंधाची जाणीव करून देतात.

अमुक अमुक आचार केले नाहीत तर देव आपल्यावर रागावेल का? ह्या सहज मानवी स्वभावाच्या जाणीवेबद्दल विश्लेषण करताना श्रीजी म्हणतात की, परमात्मा का अलिप्त आहे, त्याच्यामध्ये विकार होऊ शकत नाहीत. आपल्या सुखदुःखाशी परमात्म्याला काहीही घेणे देणे नाही.‌ पण मग, जर तो सुखदुःखाचा दाता नाही तर मग आपल्या जीवनात सुखदुःख का बरे येतात? ह्याचे कारण स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात की, हे सर्व आपल्या कर्माचे फळ असते. आपल्या कर्माच्या फळांमध्ये ईश्वर कधीच ढवळाढवळ करत नाही. कर्माच्या सिद्धांताची एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे ज्यात परमात्मा अजिबात ढवळाढवळ करत नाही. हे समजवताना श्रीजी, न्याय व्यवस्था आणि राष्ट्रपतीचे उदाहरण देतात. जसे राष्ट्रपती हे सर्व शक्तिमान असले तरी एखाद्याला त्याच्या गुन्ह्याच्या, अपराधाच्या संबंधित सजा देताना न्यायव्यवस्थेच्या निर्णयात ते ढवळाढवळ करत नाही.‌ त्याचबरोबर श्रीजी असेही सांगतात की परमात्मा जरी अलिप्त असला तरी तो सर्व भूतांमध्ये समप्रमाणात व्यापून आहे. त्याला कोणी प्रिय नाही आणि कोणी अप्रियही नाही, परंतु जे सुजन त्याचं भक्तिपूर्वक भजन करतात, त्यांच्यात परमात्मा वास करतो आणि ते परमात्म्यात वास करतात. येथे श्रीजी मानवाची आणि परमात्म्याची एकरूपता अधोरेखित करतात.

प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर श्रीजींनी आपल्या प्रार्थनेची परमात्म्याला गरज आहे का? ह्या प्रश्नाची उकल सहजपणे करतात. बऱ्याचदा आपण देवाला नैवेद्य दिला नाही तर तो उपाशी राहील का बरे? आपण जर त्याला अभिषेक स्नान घातले नाही तर तो विनास्नान बसेल का? असे द्वंद्व उपस्थित करणारे अनेक प्रश्न सामान्य जनांच्या मनात उपस्थित होत असतात. ह्याची यथायोग्य सांगड घालताना श्रीजी म्हणतात की, परमेश्वराला आपल्या आराधनेची, सेवेची गरज नाहीये पण आपल्याला आहे. कारण ईश्वर हा निष्काम आहे, तो नित्यतृप्त आहे, तो परीपूर्ण आहे. जर आपल्या सेवेची त्याला गरज लागली तर तो अपूर्ण आहे, असे समजले जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याच्या आराधनेची गरज काय हे सांगताना श्रीजी म्हणतात की, आपलं त्याच्यावर निरतिशय प्रेम असतं. प्रेमाचा स्थायीभाव सांगताना श्रीजी म्हणतात की, प्रेम हे व्यक्त झाल्यावाचून राहत नाही. आपलं भगवंताप्रती असलेलं प्रेम हे आपण आपल्या उपासनेतून, प्रार्थनेतून, सेवेतून व्यक्त करत असतो.‌

काही धर्मांमध्ये जर तुम्ही ईश्वराची सेवा केली नाही तर तो तुम्हाला सजा देईल, असे मनावर बिंबवले जाते, पण श्रीजी म्हणतात की, शिक्षा करणारा हा भगवंत असूच शकत नाही.‌ त्यामुळे तो मला शिक्षा करेल अशी भीती मनात बाळगण्याचे अजिबात कारण नाही. जो भगवंताला शरण जातो, मी तुझा आहे या भावनेने प्रार्थना करतो आणि जो भगवंतापासून स्वतःला कधीही अंतरत नाही, वेगळा समजत नाही, जेथे प्रेम भावनेला प्राधान्य आहे, तेथे निश्चितच भीती नाही. पण जेथे ही भावना नाही तेथे मात्र निश्चितच भीती आहे. आपल्या हिंदू धर्मामधले हे वेगळेपण श्रीजी परिणामकपणे आपल्यासमोर आणतात.

त्याचवेळी, जर मानवाला भीती नसली तर आचरणात स्वच्छंदता किंवा उच्छृंखलता येऊ शकते असाही अपवाद येतो. ह्याचे समाधान करताना श्रीजी म्हणतात की, ह्या स्वच्छंदतेला, ह्या उच्छृंखलतेला काबूत ठेवून, मनाला नित्य साधनेच्या मार्गात आणून परमात्म्याप्रती एकदा का प्रेम झाले की मग भीतीचा लवलेशही उरत नाही. जसे एखाद्या लहान मुल आपल्या आईस घाबरत नाही कारण तेथे निर्व्याज्य प्रेम असते…

जिथे प्रेम आहे, तिथे भीती नाही,
आणि जिथे भीती आहे, तिथे प्रेम नाही…

जर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशी भीती असेल, याचा अर्थ आपले भगवंतावर प्रेम नाही आणि जर आपले परमात्म्यावर प्रेम असेल तर त्याच्याबद्दलच्या भीतीचा, त्याच्या कोपाचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवाला भगवंताप्रती केवळ प्रेम आणि प्रेमच होऊ शकतं. ईश्वराप्रती असलेल्या भीतीच्या भावनेचा नाश होऊन, ते प्रेम प्रत्येक मानवात उत्पन्न होवो, असा मंगल आशीर्वाद देऊन श्रीजींच्या आजच्या प्रवचनाची सांगता झाली.

आपल्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून ईश्वराप्रती असलेले भीतीची भावना दूर होऊन, त्याच्याबद्दल प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन निश्चितच परिणामकारक होईल, असा विश्वास आजचे हे प्रवचन ऐकल्यावर मला वाटतो…

श्रीप्रभु की रचना का बोधप्रद विवेचन

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून।। प्रभु महाराज द्वारा रचित इस प्रसिद्ध पद को मैंने अनेक बार सुना है और गाया भी है परंतु इस पद के अंदर जो गूढार्थ निहित है उससे मैं अनभिज्ञ था। सौ उमा हेरूर जी ने इस पद पर जो विवेचन किया है वह अत्यंत समर्पक एवं बोधप्रद है। उन्होंने इस पद के गंभीर अर्थ पर जो प्रगल्भ चिंतन और मंथन किया है वह सचमुच स्तुत्य है। ऊपर-ऊपर से भक्तिरस प्रधान लगने वाली इस रचना के अंदर वेदांत के कितने गंभीर सिद्धांत छिपे हुए हैं यह जानकर आश्चर्य हुआ। कृष्ण की दृष्टि पड़ते ही संचित की मटकी का फूटना, प्रारब्ध की झारी, संसाररूपी सुव्यवस्थित वेणी का खुलना और अंतिम पंक्ति में हरि भक्ति के मार्ग पर सम्हलकर चलने की जो बात है वह जानकर मैं मंत्रमुग्ध हुआ। अंतिम पंक्ति में ‘‘हरि चरणी चाले जपून’’ का जो अर्थ लेखिका ने लगाया है वह अत्यंत अनोखा है। हम अपनी सामान्य बुद्धि और लौकिक दृष्टि से जब प्रभु की वाणी को, उनके उपदेशों को उनकी रचनाओं को समझने का प्रयास करते हैं तो वास्तविक अर्थ से भटक जाते हैं और स्वकल्पित अवधारणाऍं बना लेते हैं। इसीलिए महाराजश्री ने कहा है ज्ञान मार्तांडा दिव्य दृष्टिने जाणा।। महापुरुषों की लीलाओं को तथा उनके कार्य को जानने और समझने के लिए दिव्य दृष्टि की आवश्यकता होती है। और मेरा मानना है, कि सौ उमा ताई को प्रभु की कृपा से वह दृष्टि प्राप्त हुई जिसके फलस्वरूप उन्होंने प्रभु महाराज द्वारा रचित इस दिव्य पद के भीतर छिपे अमृतमय रहस्य के दर्शन स्वयं किए और हमें भी करवाए। प्रभुस्वरूप के सतत अनुसंधान के फलस्वरूप लेखिका पर जो कृपा हुई है वह यहॉं इस लेख में दृग्गोचर है। मैंने जब इस लेख को पढ़ा और लेखिका द्वारा प्रतिपादित अर्थ को समझा तो मुझे ऐसा लगा जैसे सालों से छिपा हुआ कोई खज़ाना मिल गया हो। बुद्धि की खिड़कियों को खोलने वाला यह सुंदर एवं उदात्त विवेचन मन को आह्लादित करने वाला है। सभी प्रभुभक्तों से मेरा अनुरोध है, कि इस लेख को अवश्य पढ़ें और श्रीप्रभु के इस पद में छिपे अर्थ का अनुसंधान करें। हमारा संप्रदाय ज्ञानयुक्त भक्ति का मार्गदर्शन करता है। सांप्रदायिक रचनाओं को गाना, पढ़ना और उनके अर्थ का अनुसंधान करना यह प्रत्येक प्रभुभक्त का परम कर्तव्य है और यही सर्वोच्च उपासना भी है। हमारे प्रभु महाराज ने इतने प्रेम और करुणापूर्वक, इतनी सारी सुंदर-सुंदर रचनाओं का अमृतमय उपहार हमें दिया है वह हमारे ही उद्धारहित है। गुरुमहाराज से प्राप्त उस अमूल्य उपहार का यदि हम उपयोग नहीं करेंगें तो और कौन करेगा? आंख मूंदकर घंटों तक ध्यान धारणादि विविध कठिण क्रियाओं को करते रहने से बेहतर है, कि हम श्रीप्रभु के इन अमृतमय पदों पर चिंतन करें। ऐसा करने से निश्चित ही हम उस भाव से एकरूप होकर प्रभुमय हो जाऍंगे इसमें संदेह नहीं है।

कृष्णा मजकडे पाहू नको…

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥

श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.

नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.

वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.

श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.

बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.

राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्‌, यांतच आनंद आहे.

सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.

महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.

माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.

शरणागती

श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.

गुरुदक्षिणा

गुरुपौर्णिमा जरी गुरुला समर्पित असली, तरी गुरु हा अपेक्षारहित असल्याने त्याला शिष्याने आपल्या करिता त्या दिवशी काही विशेष करावे अशी आकांक्षा नसते. म्हणून ह्या दिवसाचे महत्त्व शिष्यालाच अधिक असते! किंबहुना ते असलेच पाहिजे! कारण हा दिवस आहे आपल्या गुरु प्रति आपले आदर, प्रेम आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आपल्या गुरुचे आपल्यावर किती उपकार आहेत, किती ऋण आहे, ह्याची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा. आपला हा आदरयुक्त प्रेमभाव आणि ही कृतज्ञतेची जाणीव गुरुदक्षिणेच्या माध्यमातून आपण गुरु पर्यंत पोहोचवावी ही परंपरागत रूढी.

परंतु ऋण असते ते व्यावहारिक गुरुंचे, सद्गुरुंची असते ती फक्त कृपा! अखंड, अविरत, अक्षय कृपा! आणि म्हणून सद्गुरुला गुरुदक्षिणा तरी काय देणार आपण?

आध्यात्मिक स्तरावर पाहता आपले असे काय आहे, जे आपण गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरुला अर्पण करावे? “गुरुजीने मज बोलणे खुंटविले” ह्या पदामध्ये प्रभु स्वतः म्हणतात-

कोण मी पुसताची मजमाजी मजला।त्वरितचि भेटविले।।

आपली स्वतःची ओळखच  जिथे सद्गुरुशिवाय शक्य नाही, तिथे व्यवहारातील वस्तुंच्या गुरुदक्षिणेची वाच्यता तरी काय करावी?

व्यावहारिक पातळीवर सर्वस्व जरी सद्गुरुला अर्पण केले तरी कमीच आहे. त्यामुळे जे काही आहे ते सद्गुरुंचेच आहे अशा भावनेने तन- मन-धनाने जी शक्य होईल, ती गुरुसेवा करत रहावी. अर्थात तशी सेवा घडण्याकरिता देखिल पुन्हा सद्गुरुकृपाच हवी!

पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-

लाग लाग सख्या गुरु पायी।
तया वाचुनि तुज गती नाही रे।।

महाराज, आपल्या शिवाय आम्हाला अन्यत्र ठाव नाही, किंबहुना तशी गरजच नाही. आमच्या जीवनाची समृद्द्धता आणि सार्थकता दोन्ही आपल्या कृपेनेच संभवत आहे. आपण दिलेले धडे वारंवार गिरवणे हीच आपल्या चरणी अर्पण केलेली गुरुदक्षिणा.

प्रभु प्रेरणेने सुचलेली ही छोटीशी कविता सुद्धा आपल्या प्रवचनातील तीन मनोरंजक व उद्बोधक दृष्टान्तांमधुनच साकारली आहे. ती गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या चरणी सादर सप्रेम समर्पित करते

गुरु पाहिजे

एक छोटं शावक
मेंढरांसह वाढलं
चारा चरत, “में में” करत
मेंढरुच भासू लागलं
त्या घाबरल्या, अन् बावरल्या
मिथ्या अश्या मेंढराला
“अरे मेंढरु नाही, तू सिंह आहे”
हे दर्शविण्यास, हे पटविण्यास
गुरू पाहिजे

एक जुनाट तलवार
म्यानात पडून राहिली
अगणित कालापर्यंत
तिथेच अडून राहिली
त्या थिजलेल्या, अन् गंजलेल्या
मूल निर्मल तलवारीला
घासून-पुसून, निवांत बसून
गंज काढण्यास, शिकलगारसा
गुरू पाहिजे

एक अजब से तिढे
वाटणीस १९ घोडे
अर्धे, पाव, एक पंचमांश
कसे सुटावे कोडे
त्या एकोणीस मधे मिळविल्यास
२०वा घोडा, सुटे हा तिढा
सहज सोडवून, २०वा घेऊन
जाई परतून जो अलिप्त होऊन,
तो गुरू पाहिजे

वेदांत सप्ताह भाग तेरावा

उद्यानातून आता दिंडी वेशीकडे निघाली होती. सध्याचा जो नौबतखाना आहे, त्याच्या द्वारापर्यंत अर्थात सिंहद्वारापर्यंत, म्हणजेच वेशीपर्यंत दिंडी येते. उद्यानापासून वेशीपर्यंत जाताना “छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप” हे माझं अत्यंत आवडतं पद म्हटलं गेलं. दिंडी आता सिंहद्वाराच्या कमानीखाली आली होती. येथून कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीप्रभु मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले आहे की कालाग्निरुद्र हनुमानाची मूर्ती आणि श्रीप्रभु समाधी बरोबर एका सरळ रेषेत, एकाच पातळीवर आहेत. सिंहद्वाराच्या कमानीखाली “जयदेव जयदेव जय हनुमंता” ही हनुमंताची आरती म्हटली गेली. त्यानंतर “नमो घोरतर कालाग्नीरुद्ररूपा” हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी रचलेलं, अंगी चैतन्य स्फुरवणारं , अत्यंत तेजस्वी असे पद म्हटले गेले. ह्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ अगदी टीपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद उचंबळून येत होता. श्री कालाग्निरुद्र हनुमानाला “माणिक क्षेत्र अभिमान रक्षण दक्ष” असेही म्हटले जाते. दास्यभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताला आळवून दिंडी आता श्रीजींचे निवासस्थान असलेल्या नागाईकडे निघाली होती. सिंहद्वारातच थोड्या उंचीवर एक हंडी बांधली होती.‌ भागवत सप्ताहामध्ये काल्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या हंडी मध्ये दहीपोहे ठेवलेले असतात. मातीच्या हंडीला शेंदरी आणि हिरव्या रंगाने रंगवले होते. त्यावर छान नक्षीही काढली होती. योगायोगाने संकलमत संप्रदायाच्या झेंड्यामध्येही हेच दोन रंग आहेत. झेंडूचे हार घालून दहीहंडीला छान सजवले होते. श्रीजी आपल्या हातात काठी घेऊन ही हंडी फोडतात आणि दहीकाल्याचा सोहळा संपन्न होतो. हंडी फोडण्याआधी सगळ्यांचे लक्ष ह्या दहीहंडी वर खिळले होते. श्रीजींनी एका फटक्यातचही हंडी फोडली. दहीहंडी फोडताना “गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण” हे भजन म्हटले गेले. हंडीमधला प्रसाद मिळवण्यासाठी एकच लगबग उडाली. ज्यांच्या हाती हंडीतला प्रसाद लागला, तो हाती लागलेला प्रसाद थोडा थोडा करून इतरांनाही वाटत होते. आपल्या जवळचे असलेले इतरांना वाटण्यामध्ये असलेला आनंद प्रभुभक्तांच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. दहीकाल्याचा आनंद लुटून दिंडी आता श्रीजी यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागाईकडे निघाली होती. वाटेमध्ये बकुळीच्या झाडासमोर “नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळांत हरि आला हो” हे पद म्हटले गेले. तिथून पुढे पालखी आता श्रीजींच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजा समोर आली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या पाटावर श्रीजी येऊन उभे राहिले. येथूनच कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांतावर श्रीजींनी मुक्तहस्ते बुक्का उधळला. दिंडीसाठी आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद घेऊन निघालेले श्रीजी, आता पुन्हा आपल्या कुलदैवताकडे नतमस्तक व्हायला आले होते. येथे “जयदेव जयदेव जय खंडेराया” खंडोबाची आरती आणि “कुलस्वामी माझा देव खंडेराया तयाचे हे पाय हृदयी माझ्या” हे पद अत्यंत उत्साहात म्हटले गेले. घड्याळाचा काटा सकाळी दहाची वेळ दाखवत होता. दिंडी सुरू होऊन एव्हाना साडे दहा तास होत आले होते आणि तरीही सर्व प्रभुभक्त त्याच जोशामध्ये दिंडीचा आनंद लुटत होते. श्रीजींमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी त्या आनंदामध्ये “ले गुलाल प्रभु पर डाल, मलकर गाल, मैने प्रभु से खेली होली” हे त्यांनीच रचलेले पद म्हटलं. हे पद म्हणताना श्रीजींची भक्तांवर आशीर्वादपर बुक्क्याची उधळण सुरू होती. अधून मधून माझ्यावरही होणाऱ्या ह्या अमृत वर्षावाने मन कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा अनुभव करीत होतं.

श्रीजींच्या निवासस्थानातून दिंडी आता आपल्या अंतिम टप्प्यावर निघाली होती. नागाईपासून श्री प्रभू मंदिर पटांगणापर्यंत “असा पातकी सांगू मी काय देवा, कधी नाही केली मनोभावे सेवा, नसे वंदिले म्या तुझे निज पाया, मला तारी रे तारी मार्तंड राया” हे अष्टक म्हटले गेले. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणामध्ये “हा दिसे स्फुरे जो आनंद” हे पद म्हटलं गेलं. पटांगणामध्ये दोन्ही बाजूस ओळीने उभे राहून मधे थोडीशी जागा ठेवतात. ह्याची रचना अगदी वारीची आठवण करून देते. श्री प्रभु मंदिराच्या पायऱ्या चढून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या आवारातील आनंद मंटपात आली होती. येथे “कधी पाहिन मी माझ्या स्वरूपाला, आनंद पूर्णब्रह्माला” हे पद म्हटलं गेलं. समोर गाभाऱ्यामध्ये श्रीप्रभु दिंडीचा हा कौतुक सोहळा पाहत होता. दिंडीतल्या प्रत्येक पदागणिक आपण आपली श्रीप्रभुशी नकळत होणारी एकरूपता अनुभवू शकतो. श्रीप्रभुचे चैतन्य ठाई ठाई जाणवू लागते. अंगावर रोमांच उभे राहू लागतात, मन आनंदाची अनुभूती करू  लागते.

आनंद मंटपातून दिंडी आता श्री प्रभु समोरील कैलास मंटपात आली होती. येथे “मणिका लोकपालका दैन्यहारका सुरासुरवंद्या” ही श्री माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. श्री प्रभू समाधीसमोरील पायर्‍यांवर डोकं टेकवून प्रत्येकाची पावले आता उत्तर दरवाजातून मुक्ती मंडपात जाण्यासाठी पडत होती. ह्या दरम्यान सप्ताह भजनात रोज म्हटले जाणारे “पातकी घातकी मी असे की असा, मन हे भजनी न वसे सहसा” हे तारक अष्टक म्हटले गेले. अष्टकानंतर “जन चला चला गुज पाहण्या हो” हे पद म्हटले गेले. ह्या पदाच्या शेवटी “श्री माणिक आपणचि होण्या हो” ही ओळ येते. आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन, आपल्यातील द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होऊन, आपणच श्री प्रभू परमात्मा आहोत, ही जाणीव दिंडीतील पदे आपल्याला करून देतात.

दिंडी आता परत मुक्तीमंटपात आली होती. आईच्या कुशीतून निघून मुक्तपणे इथे तिथे हिंडून दिंडीचं हे पाडस आता पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलं होतं. चैतन्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं. श्रीजी मुक्तिमंडपात प्रवेश करण्याच्या आधी, दृष्ट उतरवण्यासाठी अकरा नारळ ओवाळून फोडले गेले. त्यानंतर श्रीजी मुक्तिमंटपात प्रवेश करते झाले. मुक्तीमंटपात श्री शंकर माणिकप्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या, श्री शंकर गुरुवर्या वात्सल्य घन योगींन्द्र रक्षी प्रभुवर्या” ही शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. येथे “झालो आम्ही बहु धन्य रे, भेटले सगुण हे ब्रह्म रे” हे स्वस्वरूपाची जाणीव झाल्यावर, होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती करून देणारे पद म्हटले गेले. येथून दिंडी आता श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंध मोक्ष भ्रम कोण तो जाणे अवघा ब्रम्हानंद” हे आत्मानंदाने ओतप्रोत भरलेले पद म्हणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहता येत होता. त्यानंतर “हंसः सोऽहं सोऽहं हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंचे अद्वितीय गोडी चे पद म्हटले गेले. मी-तू पणाची बोळवण होत होती. अद्वैताची ज्योत हृदयामध्ये पूर्ण तेजाने तेवत होती. ह्या तीव्रतेची सुखानुभूती मी प्रथमच अनुभवत होतो. सुखाच्या आनंद लहरीवर तरंगत असतानाच “माणिक माणिक जय गुरु माणिक, माणिक माणिक शिव हर माणिक” चा गजर झाला आणि नकळत श्रीप्रभु प्रेमाने हृदय उचंबळून आले. अलगद ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा आता दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. भावनेच्या ह्या कल्लोळातच “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा सद्गुरु मार्तंडा, आत्मोल्हास प्रभाकर कारण ब्रह्मांड” ही श्री मार्तंड माणिकप्रभुंची आणि तद्नंतर “आरती मधुमती व्यंकेची जननी हेरंब श्यामलेची” ही श्री देवी व्यंकम्मा मातेची आरती म्हटली गेली. त्यानंतर “श्री माणिक जय माणिक, हर माणिक हरी माणिक, चिन्माणिक सन्माणिक” हे परवलीचे भजन म्हटले गेले. वाद्यांचा कल्लोळ चरम पदावर होता. हे पद संपल्यावर “नमः पार्वतीपतये हर हर महादेव”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय” चा जयघोष मुक्ती मंडपात भरून राहिला. दोन क्षण कमालीची शांतता जाणवली. कानात मात्र झांजांची किणकिण अजून ऐकू येत होती. मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. सकाळचे साधरण पावणे अकरा झाले होते.

दिंडी आता समाप्तीसाठी श्री मार्तंड माणिक प्रभूंच्या समाधीसमोर होती. आता दिंडीचे सर्व साहित्य  बुक्का, पदांचे पुस्तक, झेंडा, वाद्ये,  सप्ताहात  सात दिवस पारायणासाठी वापरलेली श्री प्रभुमंदिरातील श्रीमद्भागवतची पोथी, चांदीची छोटी वीणा व अखंड वीणा हे सर्व परत श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर ठेवले गेले व दिंडीची परिसमाप्ती झाली. दिंडीच्या समाप्तीनिमित्त श्रीमार्तंड माणिकप्रभुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला गेला.‌ दिंडीचा हा प्रसाद श्रीजींनी सर्वांना वाटला. ह्या पेढ्याच्या प्रसादाची गोडी अवीट होती. श्रीजी आता चैतन्यलिंगासमोर आले होते. तेथे सर्वांना पुन्हा कुरमुरे पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. श्री प्रभु परिवारातील सदस्य गण आणि प्रभुभक्त सर्वजण मुक्तीमंटपात सुखानैव बसले होते. जवळजवळ बारा तासांनी शरीर असल्याची जाणीव झाली. संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेताही कमालीचा तजेला जाणवत होता. दिंडी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान प्रत्येक चेहऱ्यावर झळकत होते. दिंडीचा महासोहळा आता पूर्ण झाला होता. दिंडीच्या गप्पांचा फड उपस्थितांमध्ये चांगलाच रंगला होता.

गेल्या आठ दिवसांचा काळ झरझर डोळ्यांपुढे तरळला. सकाळचे पारायण, माध्यान्ह काळी श्रीजींचे प्रवचन, सायंकाळी बालगोपाळांची रासक्रीडा, रात्री प्रवचन आणि भजन… संपूर्ण दिवसरात्र कार्यक्रमाची रेलचेल असायची. ह्या आठ दिवसांत बहुतेक वेळ मोबाईल बंद असायचा. त्यामुळे कदाचित समग्रपणे वेदांत सप्ताहाचा आनंद घेता आला. आपल्या आणि भगवंतामध्ये ह्या मोबाईलचे किती व्यवधान आहे हेही जाणवले. दिवसभरात कधीकधी सहा तास ही झोप न होता मन आणि शरीर अत्यंत ताजेतवाने असायचे. सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार ह्यांचा त्रिवेणी संगम वेदांत सप्ताहात अनुभवता आला. ह्या जीवनशैलीचा आपल्या जगण्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, आधीच सुंदर असलेले जीवन अजून सुंदर कसे करता येईल ह्याचा परिपाठचं माणिक नगरातील ह्या वेदांत सप्ताहाने घालून दिला. वेदांत सप्ताहाचे हे वर्णन श्री प्रभु कृपेनेच तेरा भागांमध्ये लिहून पूर्ण झाले. सब कुछ तेरा कुछ नही मेरा ह्या अंतरीच्या कृतज्ञ भावनेने श्री प्रभुसेवेची ही शब्द सुमने त्याच्याच चरणी मनोभावे अर्पण. संपूर्ण वेदांत सप्ताहामध्ये आम्हा समस्त भक्तजनांची अत्यंत दक्षतेने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री माणिक प्रभू संस्थान आणि समस्त सेवेकरी ह्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये श्री प्रभुलाच पाहून त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या श्री संस्थानाप्रती वारंवार कृतज्ञता, आपल्या विद्वत्ताप्रचुर प्रवचनांनी आमच्या अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानसूर्य, श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम… वेदांत सप्ताह आणि दिंडी तसेच श्री माणिक प्रभु संस्थान आणि त्या संबंधित कोणतीही माहिती अविलंब आणि तितक्याच प्रेमाने उपलब्ध करून देणाऱ्या श्री चिद्घन प्रभुंप्रतीसुद्धा वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. वेदांत सप्ताह जरी संपला तरी त्याचे गारुड मनावर अजूनही तसेच आहे. सप्ताह भजनातली पदे, झाजांची किणकिण, अखंड वीणेचा झंकार अजूनही कानात गुंजत आहे, बुक्क्याचा मंद परिमळ अजूनही नाकात भरून राहिला आहे. जीवनात आजवर जे शोधत होतो, ते सापडल्याचे समाधान आहे. स्वर्गिय सुख म्हणजे काय असतं हे दिंडी अनुभवल्यावर कळालं. मनातील द्वैत भाव मिटवून, आत्मानंदाची अनुभूती करून देणारा हा वेदांत सप्ताह, ही दिंडी, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी अनुभवावी आणि त्या अनुभूतीचा योग आपणा सर्वांना लवकरात लवकर यावा, ह्या श्री प्रभुचरणीच्या आणखी एक लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…दिंडी प्रत्यक्ष अनुभवताना किंवा त्याचे वर्णन शब्दात करताना मनात एकच भाव उमटतो आणि तो म्हणजे…धन्य धन्य अति धन्य आम्ही झालो, पूर्णानंद

।।श्री माणिकचरणार्पणमस्तु।।