वेदांत सप्ताह भाग तेरावा

उद्यानातून आता दिंडी वेशीकडे निघाली होती. सध्याचा जो नौबतखाना आहे, त्याच्या द्वारापर्यंत अर्थात सिंहद्वारापर्यंत, म्हणजेच वेशीपर्यंत दिंडी येते. उद्यानापासून वेशीपर्यंत जाताना “छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप” हे माझं अत्यंत आवडतं पद म्हटलं गेलं. दिंडी आता सिंहद्वाराच्या कमानीखाली आली होती. येथून कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीप्रभु मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले आहे की कालाग्निरुद्र हनुमानाची मूर्ती आणि श्रीप्रभु समाधी बरोबर एका सरळ रेषेत, एकाच पातळीवर आहेत. सिंहद्वाराच्या कमानीखाली “जयदेव जयदेव जय हनुमंता” ही हनुमंताची आरती म्हटली गेली. त्यानंतर “नमो घोरतर कालाग्नीरुद्ररूपा” हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी रचलेलं, अंगी चैतन्य स्फुरवणारं , अत्यंत तेजस्वी असे पद म्हटले गेले. ह्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ अगदी टीपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद उचंबळून येत होता. श्री कालाग्निरुद्र हनुमानाला “माणिक क्षेत्र अभिमान रक्षण दक्ष” असेही म्हटले जाते. दास्यभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताला आळवून दिंडी आता श्रीजींचे निवासस्थान असलेल्या नागाईकडे निघाली होती. सिंहद्वारातच थोड्या उंचीवर एक हंडी बांधली होती.‌ भागवत सप्ताहामध्ये काल्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या हंडी मध्ये दहीपोहे ठेवलेले असतात. मातीच्या हंडीला शेंदरी आणि हिरव्या रंगाने रंगवले होते. त्यावर छान नक्षीही काढली होती. योगायोगाने संकलमत संप्रदायाच्या झेंड्यामध्येही हेच दोन रंग आहेत. झेंडूचे हार घालून दहीहंडीला छान सजवले होते. श्रीजी आपल्या हातात काठी घेऊन ही हंडी फोडतात आणि दहीकाल्याचा सोहळा संपन्न होतो. हंडी फोडण्याआधी सगळ्यांचे लक्ष ह्या दहीहंडी वर खिळले होते. श्रीजींनी एका फटक्यातचही हंडी फोडली. दहीहंडी फोडताना “गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण” हे भजन म्हटले गेले. हंडीमधला प्रसाद मिळवण्यासाठी एकच लगबग उडाली. ज्यांच्या हाती हंडीतला प्रसाद लागला, तो हाती लागलेला प्रसाद थोडा थोडा करून इतरांनाही वाटत होते. आपल्या जवळचे असलेले इतरांना वाटण्यामध्ये असलेला आनंद प्रभुभक्तांच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. दहीकाल्याचा आनंद लुटून दिंडी आता श्रीजी यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागाईकडे निघाली होती. वाटेमध्ये बकुळीच्या झाडासमोर “नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळांत हरि आला हो” हे पद म्हटले गेले. तिथून पुढे पालखी आता श्रीजींच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजा समोर आली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या पाटावर श्रीजी येऊन उभे राहिले. येथूनच कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांतावर श्रीजींनी मुक्तहस्ते बुक्का उधळला. दिंडीसाठी आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद घेऊन निघालेले श्रीजी, आता पुन्हा आपल्या कुलदैवताकडे नतमस्तक व्हायला आले होते. येथे “जयदेव जयदेव जय खंडेराया” खंडोबाची आरती आणि “कुलस्वामी माझा देव खंडेराया तयाचे हे पाय हृदयी माझ्या” हे पद अत्यंत उत्साहात म्हटले गेले. घड्याळाचा काटा सकाळी दहाची वेळ दाखवत होता. दिंडी सुरू होऊन एव्हाना साडे दहा तास होत आले होते आणि तरीही सर्व प्रभुभक्त त्याच जोशामध्ये दिंडीचा आनंद लुटत होते. श्रीजींमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी त्या आनंदामध्ये “ले गुलाल प्रभु पर डाल, मलकर गाल, मैने प्रभु से खेली होली” हे त्यांनीच रचलेले पद म्हटलं. हे पद म्हणताना श्रीजींची भक्तांवर आशीर्वादपर बुक्क्याची उधळण सुरू होती. अधून मधून माझ्यावरही होणाऱ्या ह्या अमृत वर्षावाने मन कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा अनुभव करीत होतं.

श्रीजींच्या निवासस्थानातून दिंडी आता आपल्या अंतिम टप्प्यावर निघाली होती. नागाईपासून श्री प्रभू मंदिर पटांगणापर्यंत “असा पातकी सांगू मी काय देवा, कधी नाही केली मनोभावे सेवा, नसे वंदिले म्या तुझे निज पाया, मला तारी रे तारी मार्तंड राया” हे अष्टक म्हटले गेले. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणामध्ये “हा दिसे स्फुरे जो आनंद” हे पद म्हटलं गेलं. पटांगणामध्ये दोन्ही बाजूस ओळीने उभे राहून मधे थोडीशी जागा ठेवतात. ह्याची रचना अगदी वारीची आठवण करून देते. श्री प्रभु मंदिराच्या पायऱ्या चढून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या आवारातील आनंद मंटपात आली होती. येथे “कधी पाहिन मी माझ्या स्वरूपाला, आनंद पूर्णब्रह्माला” हे पद म्हटलं गेलं. समोर गाभाऱ्यामध्ये श्रीप्रभु दिंडीचा हा कौतुक सोहळा पाहत होता. दिंडीतल्या प्रत्येक पदागणिक आपण आपली श्रीप्रभुशी नकळत होणारी एकरूपता अनुभवू शकतो. श्रीप्रभुचे चैतन्य ठाई ठाई जाणवू लागते. अंगावर रोमांच उभे राहू लागतात, मन आनंदाची अनुभूती करू  लागते.

आनंद मंटपातून दिंडी आता श्री प्रभु समोरील कैलास मंटपात आली होती. येथे “मणिका लोकपालका दैन्यहारका सुरासुरवंद्या” ही श्री माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. श्री प्रभू समाधीसमोरील पायर्‍यांवर डोकं टेकवून प्रत्येकाची पावले आता उत्तर दरवाजातून मुक्ती मंडपात जाण्यासाठी पडत होती. ह्या दरम्यान सप्ताह भजनात रोज म्हटले जाणारे “पातकी घातकी मी असे की असा, मन हे भजनी न वसे सहसा” हे तारक अष्टक म्हटले गेले. अष्टकानंतर “जन चला चला गुज पाहण्या हो” हे पद म्हटले गेले. ह्या पदाच्या शेवटी “श्री माणिक आपणचि होण्या हो” ही ओळ येते. आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन, आपल्यातील द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होऊन, आपणच श्री प्रभू परमात्मा आहोत, ही जाणीव दिंडीतील पदे आपल्याला करून देतात.

दिंडी आता परत मुक्तीमंटपात आली होती. आईच्या कुशीतून निघून मुक्तपणे इथे तिथे हिंडून दिंडीचं हे पाडस आता पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलं होतं. चैतन्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं. श्रीजी मुक्तिमंडपात प्रवेश करण्याच्या आधी, दृष्ट उतरवण्यासाठी अकरा नारळ ओवाळून फोडले गेले. त्यानंतर श्रीजी मुक्तिमंटपात प्रवेश करते झाले. मुक्तीमंटपात श्री शंकर माणिकप्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या, श्री शंकर गुरुवर्या वात्सल्य घन योगींन्द्र रक्षी प्रभुवर्या” ही शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. येथे “झालो आम्ही बहु धन्य रे, भेटले सगुण हे ब्रह्म रे” हे स्वस्वरूपाची जाणीव झाल्यावर, होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती करून देणारे पद म्हटले गेले. येथून दिंडी आता श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंध मोक्ष भ्रम कोण तो जाणे अवघा ब्रम्हानंद” हे आत्मानंदाने ओतप्रोत भरलेले पद म्हणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहता येत होता. त्यानंतर “हंसः सोऽहं सोऽहं हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंचे अद्वितीय गोडी चे पद म्हटले गेले. मी-तू पणाची बोळवण होत होती. अद्वैताची ज्योत हृदयामध्ये पूर्ण तेजाने तेवत होती. ह्या तीव्रतेची सुखानुभूती मी प्रथमच अनुभवत होतो. सुखाच्या आनंद लहरीवर तरंगत असतानाच “माणिक माणिक जय गुरु माणिक, माणिक माणिक शिव हर माणिक” चा गजर झाला आणि नकळत श्रीप्रभु प्रेमाने हृदय उचंबळून आले. अलगद ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा आता दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. भावनेच्या ह्या कल्लोळातच “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा सद्गुरु मार्तंडा, आत्मोल्हास प्रभाकर कारण ब्रह्मांड” ही श्री मार्तंड माणिकप्रभुंची आणि तद्नंतर “आरती मधुमती व्यंकेची जननी हेरंब श्यामलेची” ही श्री देवी व्यंकम्मा मातेची आरती म्हटली गेली. त्यानंतर “श्री माणिक जय माणिक, हर माणिक हरी माणिक, चिन्माणिक सन्माणिक” हे परवलीचे भजन म्हटले गेले. वाद्यांचा कल्लोळ चरम पदावर होता. हे पद संपल्यावर “नमः पार्वतीपतये हर हर महादेव”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय” चा जयघोष मुक्ती मंडपात भरून राहिला. दोन क्षण कमालीची शांतता जाणवली. कानात मात्र झांजांची किणकिण अजून ऐकू येत होती. मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. सकाळचे साधरण पावणे अकरा झाले होते.

दिंडी आता समाप्तीसाठी श्री मार्तंड माणिक प्रभूंच्या समाधीसमोर होती. आता दिंडीचे सर्व साहित्य  बुक्का, पदांचे पुस्तक, झेंडा, वाद्ये,  सप्ताहात  सात दिवस पारायणासाठी वापरलेली श्री प्रभुमंदिरातील श्रीमद्भागवतची पोथी, चांदीची छोटी वीणा व अखंड वीणा हे सर्व परत श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर ठेवले गेले व दिंडीची परिसमाप्ती झाली. दिंडीच्या समाप्तीनिमित्त श्रीमार्तंड माणिकप्रभुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला गेला.‌ दिंडीचा हा प्रसाद श्रीजींनी सर्वांना वाटला. ह्या पेढ्याच्या प्रसादाची गोडी अवीट होती. श्रीजी आता चैतन्यलिंगासमोर आले होते. तेथे सर्वांना पुन्हा कुरमुरे पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. श्री प्रभु परिवारातील सदस्य गण आणि प्रभुभक्त सर्वजण मुक्तीमंटपात सुखानैव बसले होते. जवळजवळ बारा तासांनी शरीर असल्याची जाणीव झाली. संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेताही कमालीचा तजेला जाणवत होता. दिंडी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान प्रत्येक चेहऱ्यावर झळकत होते. दिंडीचा महासोहळा आता पूर्ण झाला होता. दिंडीच्या गप्पांचा फड उपस्थितांमध्ये चांगलाच रंगला होता.

गेल्या आठ दिवसांचा काळ झरझर डोळ्यांपुढे तरळला. सकाळचे पारायण, माध्यान्ह काळी श्रीजींचे प्रवचन, सायंकाळी बालगोपाळांची रासक्रीडा, रात्री प्रवचन आणि भजन… संपूर्ण दिवसरात्र कार्यक्रमाची रेलचेल असायची. ह्या आठ दिवसांत बहुतेक वेळ मोबाईल बंद असायचा. त्यामुळे कदाचित समग्रपणे वेदांत सप्ताहाचा आनंद घेता आला. आपल्या आणि भगवंतामध्ये ह्या मोबाईलचे किती व्यवधान आहे हेही जाणवले. दिवसभरात कधीकधी सहा तास ही झोप न होता मन आणि शरीर अत्यंत ताजेतवाने असायचे. सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार ह्यांचा त्रिवेणी संगम वेदांत सप्ताहात अनुभवता आला. ह्या जीवनशैलीचा आपल्या जगण्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, आधीच सुंदर असलेले जीवन अजून सुंदर कसे करता येईल ह्याचा परिपाठचं माणिक नगरातील ह्या वेदांत सप्ताहाने घालून दिला. वेदांत सप्ताहाचे हे वर्णन श्री प्रभु कृपेनेच तेरा भागांमध्ये लिहून पूर्ण झाले. सब कुछ तेरा कुछ नही मेरा ह्या अंतरीच्या कृतज्ञ भावनेने श्री प्रभुसेवेची ही शब्द सुमने त्याच्याच चरणी मनोभावे अर्पण. संपूर्ण वेदांत सप्ताहामध्ये आम्हा समस्त भक्तजनांची अत्यंत दक्षतेने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री माणिक प्रभू संस्थान आणि समस्त सेवेकरी ह्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये श्री प्रभुलाच पाहून त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या श्री संस्थानाप्रती वारंवार कृतज्ञता, आपल्या विद्वत्ताप्रचुर प्रवचनांनी आमच्या अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानसूर्य, श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम… वेदांत सप्ताह आणि दिंडी तसेच श्री माणिक प्रभु संस्थान आणि त्या संबंधित कोणतीही माहिती अविलंब आणि तितक्याच प्रेमाने उपलब्ध करून देणाऱ्या श्री चिद्घन प्रभुंप्रतीसुद्धा वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. वेदांत सप्ताह जरी संपला तरी त्याचे गारुड मनावर अजूनही तसेच आहे. सप्ताह भजनातली पदे, झाजांची किणकिण, अखंड वीणेचा झंकार अजूनही कानात गुंजत आहे, बुक्क्याचा मंद परिमळ अजूनही नाकात भरून राहिला आहे. जीवनात आजवर जे शोधत होतो, ते सापडल्याचे समाधान आहे. स्वर्गिय सुख म्हणजे काय असतं हे दिंडी अनुभवल्यावर कळालं. मनातील द्वैत भाव मिटवून, आत्मानंदाची अनुभूती करून देणारा हा वेदांत सप्ताह, ही दिंडी, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी अनुभवावी आणि त्या अनुभूतीचा योग आपणा सर्वांना लवकरात लवकर यावा, ह्या श्री प्रभुचरणीच्या आणखी एक लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…दिंडी प्रत्यक्ष अनुभवताना किंवा त्याचे वर्णन शब्दात करताना मनात एकच भाव उमटतो आणि तो म्हणजे…धन्य धन्य अति धन्य आम्ही झालो, पूर्णानंद

।।श्री माणिकचरणार्पणमस्तु।।

 

वेदांत सप्ताह भाग अकरावा

दिंडी

भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष आसमंत निनादून टाकत होता आणि त्या मंगल वातावरणात रात्री सव्वा अकराच्या सुमारास श्रीजींनी दिंडीसाठी आपल्या निवासस्थान, नागाई येथून प्रस्थान ठेवले. काठाचे पांढरे शुभ्र धोतर, अंगात पांढराशुभ्र कुर्ता, डोक्यावर असलेली श्री प्रभु गादीची टोपी, आणि हातामध्ये चांदीची सुंदर नक्षीदार काठी अशी श्रीजींची मूर्ती अत्यंत मोहक दिसत होती. श्रीजींच्या चेहऱ्यावर फाकलेले दिव्य तेज सहज टिपता येत होते.‌ पुढे दिवट्या, संबळ, ढोल ताशे, अब्दागिरी घेऊन असलेले भालदार चोपदार, नित्यसवेत असलेला ब्रह्मवृंद, पाठीमागे छत्र घेऊन श्रीजींवर धरून उभा असलेला सेवेकरी, असा श्री संस्थानाला साजेसा थाट श्रीजींच्या प्रस्थानावेळी होता. श्रीजींच्या कुटुंबासह अनेक प्रभुभक्त श्रीजींच्या पाठीमागून मुक्ती मंडपाच्या दिशेने चालत होते. श्रीजींपाठून चालताना आपणही श्री प्रभु परिवाराचाच भाग आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रभुभक्तांच्या सोबत चालताना माझंही मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. अत्यंत त्वरेने भक्तांची ही मांदियाळी मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन उभी ठाकली. मुक्तीमंटप आतून पूर्ण भरला होता, अनेक प्रभुभक्त मुक्तीमंटपाच्या बाहेरील मोकळ्या जागेतही उभे होते. सुदैवाने मला श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीच्या अगदी समोर उभे राहायला जागा मिळाली.

“श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगीमहाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद‌ निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय…” श्री माणिक प्रभुच्या परवलीच्या गगनभेदी ब्रीदावळीने आसमंत दुमदुमून गेला. “नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय”चा मंगल गजर झाला. दिंडी सुरू व्हायच्या आधी दिंडीचे सर्व साहित्य जसे बुक्का, दिंडीच्या पदांचे पुस्तक, सकलमत संप्रदायाचा झेंडा हे श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर ठेवले होते. श्री मार्तंड माणिकप्रभुंनीच आपल्या कारकीर्दीत दिंडीची सन १९०० मध्ये मुहूर्तमेढ रोवली.‌ दिंडीचा हा प्रणेता श्री मार्तड माणिकप्रभु, जो ज्ञानमार्तंड, बोधमार्तंड, चिन्मार्तंड अशा अनेक रूपांमध्ये वर्तत आहे, आज बहुरंगी फुलांचा, दागिन्यांचा साज लेऊन दिंडीचा आनंद लुटायला आलेल्या या लेकरांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी सरसावला होता. श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीप्रमाणेच त्यांच्या नंतरच्या पिठाचार्यांच्या समाधीस सजवण्याची एक विशिष्ट पद्धत श्री माणिकनगरला पाहायला मिळते. समाधीस झालर असलेले उंची वस्त्र, त्यावर सुंदर नक्षीकाम असणारी रेशमी शाल.  दोहोंची रंगसंगतीही आपल्या मनाचा चटकन ठाव घेईल अशाप्रकारे अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली असते. समाधीच्या पुढील बाजूस दागदागिने आणि फुलांच्या माळांची नेटकेपणे केलेली मांडणी मन मोहून टाकते. समाधीच्या वरच्या बाजूला फुलांची निमुळती होत जाणारी मुकुटाकार मांडणी, त्यावर खोचलेला शिरपेच जणू सद्गुरुचे सगुण रूपच साकार करते. मुख्यत्वेकरून गुलाब फुलांच्या आणि सुगंधित मोगऱ्याच्या साजामध्ये सकलमत संप्रदायाचा झेंडा आसेतुहिमाचल फडकवणारा हा ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आज मध्यरात्रीही स्वयंतेजाने झळाळत होता. समोर महानैवेद्यासाठी फळफळावळ आणि सुकामेवा ठेवला होता. धुपाचा मंद सुवास मुक्तीमंटपात भरून राहिला होता. धुराच्या त्या वलयांत हा मार्तंडप्रभु समस्त भक्तजनांना आत्मसुखाची अनुभूती द्यायला आज सज्ज झाला होता.

श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” आणि “मार्तंड पराक्रमचंड कीर्ती उद्दंड शमवी पाखंडा, उंचवी प्रभो निज सकलमताचा झेंडा” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. त्याच्यानंतर सर्वांना आरती देऊन झाल्यावर, श्रीजी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर गाभार्‍या बाहेर उभे राहिले. तेथे श्री प्रभुपरिवारातील सर्व सदस्यांनी श्रीजींना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. श्री प्रभु परिवारातील सदस्यांनंतर इतरही प्रभुभक्त गर्दीतून वाट काढत श्रीजींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रीजींना पुष्पमाळा अर्पण केल्या. श्रीजींनीही आशीर्वाद स्वरूप प्रत्येकावर बुक्का उधळला. अगदी पहिल्या रांगेत असल्यामुळे माझ्याही अंगावर हा बुक्का येऊन पडला. बुक्क्याच्या त्या सुगंधी दरवळीने मन नखशिखांत मोहरून गेले. फिक्कट पिवळसर असलेला हा सुगंधित बुक्का, ज्वारीचे पीठ, भंडार आणि अनेकोत्तम सुगंधी द्रव्यांनी युक्‍त असतो. हा बुक्का श्री मार्तंड प्रभुंचा प्रसाद असतो. दिंडी दरम्यान सर्व समाधींवर अर्चन म्हणून व सकल भक्तजनांवर प्रसाद रूपाने उधळण्यासाठी हा बुक्का वापरला जातो.

ह्यानंतर सकलमत संप्रदायाची “उपदेश रत्नमाला” आणि तदनंतरची “आर्या” म्हटली गेली. श्रीजींनी पहिली ओळ म्हणावी आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठून म्हणावं, प्रत्येक कडव्यानंतर “श्रीमाणिक, जयमाणिक, हरमाणिक, हरिमाणिक, चिन्माणिक, सन्माणिक, जय जय हो सकतामता विजय हो”चा गजर झांजांच्या किणकिणीत उपस्थित प्रभुभक्तांमध्ये चैतन्य फुंकत होता. श्रीजींच्यासमोर, त्यांना मार्गक्रमण करता येईल अशा रीतीने जागा सोडून दोन्ही बाजूला श्रीप्रभु परिवारा समवेत, गावकरी आणि प्रभुभक्त रांगेत उभे असतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे ही श्री संस्थानाचे परम विशेष आहे. दिंडीच्या सुरुवातीलाच “आत्मा एकची सर्वांतरी हो” हे श्री मार्तंड माणिकप्रभु विरचित पद म्हटले गेले. हातामध्ये झांज, टाळ घेऊन भक्तजन आणि गावातील मंडळी दिंडीच्या भजनानंदात मधून मधून त्या विशिष्ट तालावरती उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. ह्या उड्याही अत्यंत लयबद्ध असतात. स्वतः उपस्थित राहून हे सर्व अनुभवल्याशिवाय त्या आनंदाची अनुभूती येणे केवळ अशक्य आहे. दिंडी अनुभवायची माझी उत्सुकता पाहून श्री आनंदराज प्रभुंनी मला पुढे यायला सांगितले. त्यामुळे दिंडीच्या अगदी शेवटपर्यंत हा सुखसोहळा मला आकंठ अनुभवता आला. “एकची सर्वांतरी हो आत्मा” ह्या पदानंतर दिंडी श्रीमार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीच्या मागच्या बाजूनं श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीसमोर  आली.‌ संपूर्ण दिंडीमध्ये प्रभुभक्तांची चाल अत्यंत मंदगतीने होत असते. अखंड प्रभुनामाचा आणि वाद्यांचा गजर आपल्या मनास सतत ताजातवाना ठेवत असतो. ह्याकरिता दिंडीत देह आणि मन बुद्धीने सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.

श्री शंकर माणिक प्रभुंनी त्यांच्या कारकिर्दीत दिंडीला एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली. त्यांचा वेदांत विषयाचा व्यासंग प्रचंड होता. श्री शंकर माणिक प्रभु महाराजांच्या वेदांतविषयक लेखांचा संग्रह “ज्ञानशांकरी” ह्या पुस्तक रूपात उपलब्ध करून श्री संस्थानाने समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. काहीसे अबोल पण वेदान्ताचे पूर्ण अधिकारी असलेले श्री शंकर माणिक प्रभुमहाराज अबोलीच्याच फुलांनी नटले होते. समाधीवरील मोत्यांच्या माळा आणि गुलाबांचे हार चित्त वेधून घेत होते. समाधीवरील माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल अतिशय आकर्षक दिसत होते. येथेही फळांचा आणि सुक्यामेव्याचा नैवेद्य प्रभुस अर्पण केला होता.‌ आळवणी होवून  “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या” ही श्री शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली.‌ नंतर श्री ज्ञानराज प्रभुंनी नवीनच रचलेली “आरती शंकरगुरुनाथा, सद्गुरू माणिक अवधूता” ही आरतीसुद्धा म्हटली गेली.  येथे “किती सुख हे, किती किती सुख हे” हे शाश्वत सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देणारे प्रभुपद म्हटले गेले. भजनानंदात पदागणिक प्रभुभक्तांचे उचंबळणे सुरूच होते. श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीनंतर दिंडी आता मुक्तीमंटपात ह्या दोन्ही पीठाचार्यांच्या समाधींच्या मधोमध असलेल्या श्री चैतन्य लिंगासमोर आली. श्रीजींनी श्री चैतन्यलींगासमोर श्री शंकराची “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” ही आरती केली. त्यानंतर “आता जाऊ चला आम्ही पाहू चला, गुरुराज प्रकट प्रभुराज प्रकट अवधूत आला” हे तनमन स्फुरवणारं पद अत्यंत जोशात म्हटलं गेलं. त्या-त्या पदांचा फलक काठीवर उंच धरला जात होता, त्यामुळे कुठल्याही कोपर्‍यातून भक्तांना त्या पदाचा आनंद लुटता येत होता. सूर आणि वाद्यांच्या त्या कल्लोळाने आता दिंडीची नशा शरीरामध्ये हळूहळू भिनायला लागली होती.‌ शरीर नकळत पदांच्या तालावर ठेका धरू लागलं होतं. चैतन्याची ही अनुभूती अत्यंत आनंददायी होती. श्रीजींनी उधळलेला बुक्का अधून मधून अंगावर पडत होता आणि त्याच्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या.

मुक्तीमंटपातून दिंडी आता शेजारील नव्यानेच बांधून पूर्ण झालेल्या सिद्धराज मणिकप्रभुंच्या समाधीसमोर दाखल झाली. अत्यंत कनवाळू असलेले, वाचासिद्ध श्री सिद्धराज मणिकप्रभु यांची समाधीसुद्धा रंगबिरंगी अनेकविध फुलांनी छान सजवली होती. समाधीला चोहीकडून केळीचे खांब लावले होते. कागडा आणि अबोलीच्या माळा छतावरून रुळत होत्या. येथेही फळांचा आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य श्री प्रभुला अर्पण केला होता. नव्याने बांधलेल्या ह्या वास्तूचे संगमरवरी बांधकाम अत्यंत रेखीव आहे. रात्रीच्या वेळी एकांतात येथे बसणे मनास अपार शांती देऊन जाते. असो. “जय देव जय देव जय सिद्धराजा, श्रीसिद्ध राजा, आरती ओवाळू तुज सद्गुरुराजा” आणि “आरती सिद्धस्वरूपाची, सनातन सद्गुरुभूपाची” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. तदनंतर श्री सिद्धराज प्रभु नित्य गुणगुणत असलेले आणि मनास उभारी देणारे “प्रभु जवळी असता, असता मग चिंता मज कां?” हे पद म्हटले गेले. आपल्या कारकीर्दीत अनेक भक्त जणांचे कल्याण करणाऱ्या, सर्वांस समदृष्टीने पाहणाऱ्या ह्या कनवाळू‌ महात्म्याचे पद ऐकताना अनेक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माणसे जोडण्याची अद्भुत कला श्री माणिक प्रभुंनंतर प्रत्येक पीठाचार्यने हिरीरीने जोपासली आणि आजही जोपासत आहेत. आज दिंडीत जमलेला अफाट जनसागर हे त्याचेच द्योतक होता. श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या आळवणी नंतर दिंडी आता मुक्ती मंडपाच्या आवारात असलेल्या औदुंबराखाली आली. येथे “अवधूता शरण रिघाल्ये, देहींच ब्रह्मसुख फळलें, किती विस्मय नवल हे झाले, ब्रम्हासी ब्रह्मपण आले” हे अवीट गोडीचं पद म्हटले तेव्हा प्रत्येक जण भजनाच्या आनंदात न्हाऊन निघत होता. सकलमत संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत होता. बुक्क्याची श्रीजींच्या हातून मुक्त हस्ते उधळण होत होती. हा प्रसाद रुपी आशीर्वाद ज्याला मिळत होता तो, कृतार्थतेने अगदी धन्य धन्य होत होता. औदुंबरा खालून उत्तर दरवाजातून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या कैलास मंटपात आली होती.

गाभाऱ्यामध्ये श्री प्रभु आपल्या लेकरांची सुहास्यवदनाने जणू वाटच पाहत होता. श्रीजींनी बुक्का श्री प्रभुसमाधीवर उधळला. तेथे “जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका तव पद मोक्ष आम्हा न स्मरू आणिका”, तसेच “आरती सगुण माणिकाची, स्वरूपी जगत्प्रसुत्याची” ह्या दोन आरत्या अत्यंत उत्साहात म्हटल्या गेल्या. त्यानंतर “नित्य वंदू त्या माणिक पायां” आणि “मनोहरनंदन की जय हो”  ही दोन पदे म्हटली गेली. भक्तांचा आनंद आता अगदी टिपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद लुटताना कोणाच्याही ऊर्जेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नव्हती. कैलास मंटपातून दिंडी पुढे आनंद मंटपात आली. येथे “आम्ही चुकलो निजहित कामा, तू चुकू नको आत्मारामा” हे पद म्हटलं गेलं. येथे सर्वांना खडीसाखर आणि लवंग देण्यात आला.

दिंडी आता पुढे आनंद मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या आणि श्रीमाणिकनगरचे आद्यदैवत असलेल्या, श्री सर्वेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. श्रीजींनी श्रीसर्वेश्वराचे दर्शन घेतले. येथे “जय देव जय देव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” आणि श्री वीरभद्राची आरती झाली. श्री सर्वेश्वरासमोर “हा शैव नव्हे मनुजाधम मूढ तो ऐका, मी सांब नव्हे कोण मी धरी जो शंका” हे अंतरी वसलेल्या सांब सदाशिवाची जाणीव करून देणारे पद गायले गेले.‌ येथे श्रीजींनी हाती झांज घेऊन स्वतः वाजविले. उधळत जाणाऱ्या बुक्क्यासह आता प्रत्येक जण हळूहळू पूर्णपणे माणिक रंगात रंगत होता.

दिंडी आता श्री सर्वेश्वर आणि औदुंबर ह्या मधील मोकळ्या जागेत म्हणजेच दक्षिण पटांगणात आली होती. येथे श्री मनोहर माणिकप्रभु विरचित “सख्या माझ्या माणिकाला कोणि तरी दावा” हे  करुण रसाने ओतप्रोत भरलेले पद म्हटलं गेलं. दक्षिण पटांगणातून प्रभू मंदिराचा कळस अत्यंत मोहक दिसत होता.  रंगबिरंगी विद्युतझोतामुळे  रात्रीच्या अंधारात कळसाचा भाग अधिकच नयनरम्य दिसत होता. दक्षिण पटांगणातून दिंडी दोन पावले पुढे चालून औदुंबराखालील श्री अखंडेश्वरासमोर आली. तेथे “श्री जय देव जय देव दत्ता अवधूता” ही श्री दत्तगुरूंची आरती झाली आणि त्यानंतर “मायामलधूत आम्ही अवधूत” हे पद म्हटले गेले. त्यानंतर समोरील मंदिरात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घेऊन दिंडी आता श्री प्रभुसमाधीच्या पाठी असलेल्या श्री मनोहर माणिक प्रभुंच्या समाधी समोर येऊन थांबली. श्री माणिक प्रभुंचा लाडका कुत्रा, “भरोसा”च्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीजी आणि ब्रह्मवृंदाने तळघरामध्ये असलेल्या श्री मनोहर प्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि येथे “जय देव जय देव जय जय गुरुभूपा, आरती ओवाळू तुज सच्चिद्रूपा”, “जयदेव जयदेव मनोहर गुरु स्वामीन्” आणि “आरती सद्गुरु रायाची मनोहरप्रभुच्या पायाची” ह्या तीन आरत्या म्हटल्या गेल्या. त्यानंतर श्री मनोहर प्रभूंनी रचलेले “सखया जावे निजगुरुचरणा शरणा झडकरी” हे दिव्य पद म्हटले गेले. ह्या पदाचं वैशिष्ट्य असं की मुखडा जरी मराठीत असला तरी पहिलं कडवं संस्कृतमध्ये, दुसर कडवं कन्नडमध्ये, तिसरं कडवं हिंदीमध्ये आणि चौथं कडवं मराठीत आहे. चारही कडवी आपण एकाच चालीत म्हणू शकतो. इथे पद म्हणत असताना डोक्यावर छत्र धरलेले श्रीजी मला एक क्षण साईबाबाच वाटले. तीच लकब, तशीच दाढी. योगायोगाने साईबाबा शिर्डीत प्रकटण्याआधी श्री माणिक प्रभुंच्या हयातीत, त्यांच्या दरबारात येऊन श्री प्रभुंकडून अनुग्रह घेऊन गेले होते. झटकन जाऊन श्रीजींना वंदन करून आलो, त्यावेळी बुक्क्याची मूठभर उधळण माझ्यावर झाली. ते सुगंधलेपीत शरीर घेऊन उत्तर पटांगणात श्री मुख्य प्राण मारुतीच्या समोर हजर झालो. येथे लगेचच “नरतनु व्यर्थ गमाई, नही ढूंढा अपना माणिक सांई” हे पद म्हटलं गेलं. श्रीजींचं साईबाबांसमान दिसणं आणि पुढच्या पदातही साई शब्द येणं, ह्या योगायोगा बद्दल मी स्वतःला कृतार्थ समजत होतो.

श्री प्रभु मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून दिंडी आता महाद्वारातून बाहेर पडत होती. महाद्वाराच्या पायऱ्यांवर “श्रुतीधर्म रक्षुनि सकलमताते वंदा” हे पद म्हटलं गेलं. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणातून दिंडी आता जुन्या भंडारखान्यात असलेल्या श्री अन्नपूर्णेश्वरी देवीसमोर आली होती. येथे श्री अन्नपूर्णा देवीची आरती म्हटली गेली आणि त्यानंतर “श्रीदेवी त्रिपुरसुंदरी माय पाव” हे पद म्हटले गेले. श्री अन्नपूर्णेचा जयघोष झाला. श्री अन्नपूर्णा देवीच्या मंदिरापासून भोजन शाळेपर्यंत माझ्या अत्यंत आवडीच्या “कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा” ह्या पदाची गुंज आसमंतात करून राहिली. भोजनशाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्वांना सरबत दिले गेले. दिंडी आता भोजनशाळेत येऊन थांबली.  येथे “कोण्या सुकृत दैव हे फळले, गुरुहस्तामृत शिरी पडले, मन माझे वळले, स्वहितगुज कळले” हे पद म्हटले गेले. इथे थोडावेळ बसायला मिळाले. पण कोल खेळणारे मात्र रासक्रीडेचा आनंद लुटत राहिले. सुर आणि वाद्यांचा कल्लोळ,  टिपऱ्या घेऊन जलद गतीमध्ये कोल खेळणारे भक्तजन… पहाटेच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारासही भोवतालचं वातावरण भारलेलं होतं. निद्रादेवीचा थोडासाही प्रकोप आज मला जाणवत नव्हता. “चैतन्यदेव” हेच मुख्य दैवत असणाऱ्या सकलमत संप्रदायाच्या पुण्यभूमीत चैतन्याची अनुभूती जागोजागी येत होती.  भोजन शाळेतील ह्या भारलेल्या वातावरणात सकलमत संप्रदायाचा झेंडा आज अधिकच डौलाने फडकत होता…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग दहावा

कोलच्या खेळानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीला तयार होण्यासाठी यात्री निवासावर आलो. झटपट स्नान उरकले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा श्रीप्रभु मंदिरात हजर झालो. अनेक प्रभुभक्तांकडून दिंडीची ख्याती ऐकली होती. दिंडीतला एकही क्षण मला नजरेआड करायचा नव्हता. सर्वप्रथम श्रीप्रभु मंदिरात श्री माणिक प्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आज हा भक्तकार्यकल्पद्रुम सार्वभौम श्रीगुरु पूर्ण कलेने नटला होता. चैतन्याची अनुभूती गाभाऱ्यात सुखासनी पहुडलेल्या श्रीप्रभुला पाहून क्षणोक्षणी येत होती. त्या गर्दीतही मनाचा बांध फुटला आणि बसल्याजागीच डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाश्रु म्हणतात कदाचित हेच असावेत…‌ गेल्या आठवडाभरात हा नटनागर दररोज लोभसपणे समोर आला होता. आजही श्रीप्रभुची ती प्रत्येक छबी हृदयामध्ये तशीच कोरलेली आहे. एखाद्याने आपल्या मनाचा ताबा घेणे म्हणजे काय? हे श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होताना कळते. श्रीप्रभु जेव्हा नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो, तेव्हा आपल्या मनाची होणारी भावविभोर अवस्था, चराचरातील श्रीप्रभुचे अनुभवायला येणारे चैतन्य, मनात आलेले क्षुद्रातीक्षुद्र लाडसुद्धा श्रीप्रभुने लडीवाळपणे पुरवणे, असे जेव्हा वारंवार घडते, तेव्हा श्रीप्रभुने नक्कीच आपला हात त्याच्या हातात घेतला आहे, ह्याची जाणीव होते आणि ही जाणीव अत्यंत सुखावह आणि तितकीच आश्वासकही असते.

पूर्ण तेजाने झळाळत असलेल्या श्रीप्रभुचे वर्णन करायला आज कदाचित शब्दही अपुरे पडावेत. सौंदर्य जणू दास बनून श्रीप्रभु चरणी अदबीने, नजाकतीने उभं होतं. रत्नांच्या, मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा गळाभर ऐटीत रुळत होत्या. अबोलीचे नाजूक हार, मोगऱ्याचा सुगंधी हार, पिवळ्या झेंडूचा हार, शेवंतीचा जाडजूड हार आणि गुलाबांच्या अनेक प्रकारच्या भरगच्च हारांमध्ये श्रीप्रभुला सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. श्रीप्रभु समाधीच्या वरच्या बाजूला शेंदरी, पिवळे, लाल, गुलाबी गुलाबांचे गुच्छ श्रीप्रभुच्या रूपाला चारचाँद लावत होते. गुलाबांच्या ह्या तोबा गर्दीमध्येही लाल टपोरा जरबेरा आपलं अस्तित्व दाखवून देत होता. श्रीप्रभु समाधीस अगदी बाहेरच्या बाजूस घातलेल्या भरगच्च गुलाबाच्या हाराला, तगरीच्या फुलांची सुंदर जाळी विणली होती. लाल आणि पांढया रंगसंगतीतला तो हार अत्यंत आकर्षक दिसत होता. श्रीप्रभु समाधीभोवती केळी लावल्या होत्या, जणू कर्दळीवनातच श्रीप्रभु आज विहरत होता. श्रीप्रभु समाधीवरील छत्रावरून मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या आणि त्या माळांच्या शेवटी झेंडूची फुले आकर्षकपणे माळली होती. समोरच श्रीप्रभुच्या पादुका दृष्टीस पडत होत्या. बाजूला चांदीच्या समया मंदपणे तेवत होत्या. श्रीप्रभुला पंचपक्वान्नांचा, डाळिंब, चिकू, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, अननस, टरबूज, अंजीर इत्यादी फळांचा नैवेद्य अर्पण केला होता. नैवेद्याच्या भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. चारी बाजूंना समया तेवत होत्या. ह्या सर्व मांदियाळीत समोर पत्रावळीत असलेला भाजीभाकरीचा नैवेद्य लक्ष वेधून घेत होता. श्री माणिकप्रभु महाराज नेहमी माधुकरीचे अन्न खात. श्री प्रभुंना चटणीभाकरी खूप आवडायची. श्रीसंस्थानाने ती परंपरा आजतागायत जपली आहे. आजही श्रीप्रभुंना पंचपक्वान्नांचा नैवेद्य असला, तरी मध्यभागी माधुकरीचे भिक्षान्नच असते. असो, सच्चिदानंद दयाघनाच्या ह्या विलोभनीय रूपाला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच बोटे डोक्याला लावून मोडली. तुझा हा आनंद सोहळा‌ मला संपूर्णपणे अनुभवायला मिळू देत, अशी विनंतीवजा प्रार्थना श्रीप्रभुला केली आणि श्रीजींच्या निवासस्थानी नागाई येथे पोहोचलो. ढोल, ताशे, संबळ वाजवणारे श्रीजींच्या निवासस्थानाच्या आवारात उभे होते. भालदार, चोपदार लाल रंगाच्या वेषात मावळ्यांसारखी पगडी घालून अब्दागिरी घेऊन सज्ज झालेले होते. एक सेवेकरी श्रीजींवर धरण्यात येणारी छत्री घेऊन सज्ज होता. अंगणामध्ये जवळपास दहा फूट लांबीची सुस्वागतमची रांगोळी मन वेधून घेत होती. प्रभुभक्त घोळक्याघोळक्याने जमून उभे होते. दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झालेला प्रत्येक जण आता दिंडीसाठी नागाईतून श्रीजींच्या प्रस्थानाचीच वाट पाहत होता.

दिंडीदिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन पंढरपुरची वारी उभी राहते. वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी कार्तिकी एकादशीला संतांच्या आणि देवाच्या पालखीपुढे भजन करत नाचत जातात त्याला दिंडी असे म्हणतात. संस्कृत भाषेतदिंडि:” आणिदिण्डिर:” असे शब्द आहेत, आणि या दोन्ही शब्दांचा अर्थएक विशिष्ट प्रकारचे वाद्यअसा आहे. त्यामुळे वाद्यांच्या गजरात होणाऱ्या हरिसंकिर्तनास दिंडी म्हणता येईल. इतिहासामध्येही आपल्याला किल्ल्यांच्या दिंडी दरवाज्याचे वर्णन अनेकदा आढळतेमराठीत दिंडी ह्या शब्दाचे लहान दरवाजा आणि पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याला स्वर्गाची दारे उघडावी, या हेतूने वारकरी लोक भजन करतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटचालीला दिंडी हे नाव पडले अशी कल्पना आहे. किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात, त्यावरून दिंडी हे नाव आले असावे, असेही एक मत आहे. भजनी मंडळातील एक जण दिंडी नावाचे वीणेसारख एक वाद्य पुढे वाजवीत जातो बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी असे म्हणतात. असो. भागवत सप्ताहच्या पारायण पद्धतीत असे नमूद केले गेले आहे की, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी वाजत गाजत भगवंताचे स्मरण करत मिरवणूक काढावी हरिसंकिर्तन करीत रात्री जागरण करावे. श्री मार्तंड माणिकप्रभुंना रात्री जागरण, हरिसंकीर्तन मिरवणुकीची ही कल्पना फारच आवडली आणि त्यांनीच ह्या मिरवणुकीला वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे स्वरूप देऊन श्री संस्थानाच्या लौकिकास साजेल, असा कार्यक्रम आखला त्यास दिंडी हेच नाव दिले.

श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज हे स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आणि प्रत्युत्पन्नमति विद्वान असल्यामुळे दिंडीच्या कार्यक्रमात जागच्याजागी पदे रचून त्यांनी गायल्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. दिंडीच्या कार्यक्रमात श्रीजी स्वस्वरूपाशी इतके तादात्म्य पावत की त्यांना कशाचेही भान उरत नसे. पुढे १९३६ साली श्रीजींच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु महाराज श्रीसंस्थानाचे पुढचे पीठाचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी, अधिक भाद्रपद मासात श्रींच्या मासिक आराधनेस जोडून, आपल्या कारकीर्दीचा प्रथम वेदांत सप्ताह उत्सव साजरा करून, दिंडीच्या भव्य कार्यक्रमाने त्याची सांगता केलीश्री शंकर माणिक प्रभुनींच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास आणि दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली, जी अद्यापही चालू आहे.

पुढे १९३७ सालच्या फाल्गुन महिन्यात श्रीजींच्या प्रथम पुण्यतिथीस असे ठरले की, श्रीजींच्या पुण्यतिथीस जोडून,, प्रतिवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीपासून वेदांत सप्ताह उत्सव श्रीजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जावा. १९३७ ते १९४३ सालापर्यंत हा कार्यक्रम अत्यंत वैभवात साजरा केला गेला. १९४४ साली श्रीमाणिक नगरात प्लेगचा प्रकोप होता. त्यात श्री शंकर माणिकप्रभु महाराज स्वतः उदर व्यथेने आजारी होते. त्यांनी सर्व भक्तांस पत्रे पाठवून कळवले की, यंदा वेदांत सप्ताह होऊ शकणार नाही. योगायोग असा की, वेदांत सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ होत असे त्याच्या दोनच दिवस आधी श्री शंकर माणिकप्रभु महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि म्हणूनच १९४६ सालापासून वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेस प्रारंभ होऊ लागला चतुर्थीला श्री मार्तंड माणिकप्रभु महाराजांची पुण्यतिथी साजरी होऊन, नवमीस दिंडी असा क्रम प्राप्त झाला, तो आजतागायत चालू आहे.

दिंडीत म्हणावयाच्या पदांची यादी एका फलकावर लिहून ते फलक दिंडीत मिळवण्याची पद्धत श्री शंकर माणिकप्रभु महाराजांनी घालून दिली. भक्तजन फलकावरील पदांचा क्रमांक पद्यमाला या पुस्तकातील त्या पदांचे पृष्ठ क्रमांक पाहून पद्यमालेच्या आधारे पदे म्हणत असत. बऱ्याच भक्तांकडे पद्यमाला नसते अथवा पदेही मुखोद्गत नसतात, म्हणून दिंडीत भाग घेऊनही त्यांना पदे म्हणता येत नाहीत. काही पदे, आरत्या ह्या सप्ताह भजनाच्या पुस्तकातील असल्यामुळे भक्तांचा बराच वेळ पुस्तकाचे पाने उलटण्यात जातो आणि त्यामुळे एकंदरीतच रसभंग होण्याची पाळी येते. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांनी दिंडीत म्हटल्या जाणाऱ्या पदांची एक क्रमवार पुस्तिका प्रकाशित केली आणि त्याची मांडणी अशी केली की एकदा पुस्तिका हातात धरल्यावर दिंडी संपेपर्यंत पाने शोधण्याची वेळच येऊ नये. त्या अनुषंगाने १९९४ सालीदिंडीची पदेही पुस्तिका छापून प्रसिद्ध झाली. आजही दिंडीमध्ये वेळोवेळी म्हटल्या जाणाऱ्या त्या त्या पदांचे फलक उंच धरले जातात, जेणेकरून सर्व भक्तांना ती ती पदे फलक पाहून म्हणता येतात.

मनामध्ये दिंडीच्या इतिहासाची पाने उलगडत असतानाच भक्तकार्य कल्पद्रुमचा जोशपूर्ण जयघोष झाला. जो तो आपापल्या परीने सावध झाला. श्रीजींनी आधी आपल्या निवासस्थानातील देवतांचे दर्शन घेतले. कुलदेवता श्री मल्हारी म्हाळसाकांत कुलस्वामिनी श्रीनागवेलांबा देवीची आरती म्हटली. नंतर श्रीजींनी मातोश्री मीराबाई साहेबांकडून आशीर्वाद घेतले मातोश्रींनी श्रीजींना दहीसाखर दिला. मातोश्रींकडून मिळालेल्या भरभरून आशीर्वादानंतर श्रीजी त्यांच्या निवासस्थानातून दिंडीसाठी मुक्तीमंटपात जाण्यासाठी प्रस्थान करते झाले.

क्रमशः

वेदांत सप्ताह भाग सातवा

परवा मोरपिसे गोळा करायला गेलो असताना, येताना मला श्रीबयाम्मामातेची समाधी दिसली होती. एक दिवस निवांत येऊन या माऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, असे मनोमन ठरवले होते. आज सकाळी सहाच्या चहानंतर संगमाच्या दिशेने, सागाच्या बागेतून निघालो. विरजा नदीच्या काठी एक छोटीसी समाधी बय्यामा माऊलीची आहे. तेथील पक्ष्यांची मंजुळ किलबिल मला सुखावत होती. ओढ्यावजा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते. बगळे काही खाद्य मिळेल का ह्या आशेपोटी विरजेच्या पात्रात उगाचच ध्यानाचा आव आणून उभे होते. जवळच उगवलेली रानफुले घेऊन त्या माऊलीच्या समाधीवर मनोभावे अर्पण केली. जिने आपल्या उदरी नऊ मास प्रत्यक्ष दत्तावतारी श्री माणिक प्रभुंना धारण केले, त्या जगन्माता बयाम्माप्रती अष्टभाव दाटून आले. एकट्यानेच तिच्याशी गप्पा मारल्या. श्री माणिकप्रभुंसारखे नररत्न ह्या जगाला अर्पण केले, म्हणून तिच्या समाधीवर नम्रपणे मस्तक झुकविले. पुन्हा यात्री निवासवर येऊन आदल्या दिवसाच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून काढल्या.

नाश्ता उरकून झटपट पारायणासाठी औदुंबराखाली दाखल झालो. एव्हाना जो तो आपापल्या जागी स्थानापन्न होऊन पारायण करण्यात दंग झालेला होता. आज सहाव्या दिवसाचे श्री माणिक चरितामृताचे वाचनही मनाच्या अगदी प्रफुल्लित अवस्थेत पार पडले. विठ्ठलराव तालुकदाराची कथा, माणक्या पाटलाची कथा, यज्ञ समारंभ व त्यातील विघ्न, तात्यासाहेबांस आलेले वैराग्य, श्री माणिकप्रभुंची जगद्गुरु शंकराचार्यांची भेट, दमडीची साखर, ऐनुद्दीन उस्तादाचे गर्वहरण अशा अनेक कथांमध्ये रमताना आपला श्री माणिकप्रभुंप्रती असलेला स्नेह अधिकच दुणावतो. आपले मन अगदी माणिकमय होऊन जाते. आज पारायण यादरम्यान प्रसाद म्हणून काही भक्तांनी चिकू आणि पेढे वाटले. आजच्या दिवसाच्या पारायणानंतर तोच नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला दाखवला.

पारायणानंतर औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या, समोरील मनोहर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि श्रीप्रभु समाधीसमोर उभा राहिलो. आज श्रीप्रभु समाधीवरील गुलाबी रंगाच्या वस्त्रात अत्यंत विलोभनीय दिसत होता. आणि त्यावरील हिरव्या रंगाची नक्षीदार शाल लक्ष वेधून घेत होती. अबोली आणि कागड्यांच्या फुलांचा एकमेकांत बेमालूमपणे गुंफलेला हार ऐक्यत्वाची साक्ष देत होता. अंगावरील विविध माळा खुलून दिसत होत्या. समाधीवर गुलाबाची लाल फुले आपली सुगंध सेवा श्रीप्रभु चरणी अर्पण करत होती. आणि भोवतालचे अबोलीचे भरगच्च गजरे त्या साजाला भारदस्तपणा प्रदान करीत होते. संजीवन समाधी समोरील पादुकांना चंदनाचा लेप लावण्यात आला होता. श्रीप्रभुचं हे असं सजलेले रूप कितीही पाहिलं तरी मनाचे समाधान होत नाही. त्याच्या ह्या ऐश्वर्यसंपन्न रूपाला अनिमिष डोळ्यांनी पाहत, हृदयात साठवून ठेवणे, एवढेच आपल्या हाती असते. श्रीप्रभुसमाधीचे तीर्थ घेऊन कृतकृत्य झालो आणि नेहमीप्रमाणे श्रीप्रभु समाधीला प्रदक्षिणा घातल्या.

आज सकाळी, यज्ञशाळेमध्ये श्री गणेश यागाचे आयोजन केले होते. श्रीजी आपल्या घरची नित्य पूजा आटोपून यज्ञशाळेत हजर होते. उसाचे कांडे, मोदक, खोबरे पोहे, तीळ इत्यादी सामग्रीचे हवन होमकुंडात केले जात होते. सुमारे तासाभरानंतर पूर्णाहुती होऊन श्री गणेश याग संपन्न झाला. ताक पिऊन पुन्हा श्री नृसिंह निलयमध्ये श्रींच्या प्रवचनासाठी येऊन बसलो. परंपरेनुसार वाद्यांच्या आणि भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीमद्भगवद्गीतेच्या वीस ते तेवीस ह्या चार श्लोकांचे अत्यंत विस्तृत विवेचन श्रीजींनी केले. आज मुख्यत्वेकरून दानावर उद्बोधन होते. यज्ञ, दान, तप हे माणसाचे कर्तव्य आहे. आणि ते सोडता येत नाही तसेच ते साधकांना, मनुष्यांना पवित्र करतात. दानाचे फायदे समजावताना दानामुळे अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणा याचे क्षालन होते, तसेच दान केल्यामुळे,‌‌ आपली प्रकृती बरोबर समरसता होते. दानामुळे सामाजिक न्याय होतो‌, असे श्रीजींनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावले. तसेच सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे, असे श्रीजी म्हणाले. पुढे जाऊन श्रीजींनी सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणते हे अनेक कथांचा दाखला देऊन समजावले. पुढे जाऊन यज्ञ, दान, तप करताना त्यात काही न्यून राहिले, त्यात काही कमी झाले तर ते, परमात्म्याच्या नामस्मरणाने सुधारता येते हा मौलिक उपदेशही श्रीजींनी सर्वांना समजावून सांगितला. तसेच तेविसाव्या श्लोकातील ॐ तत् सत् च्या स्वरूपाचं विहंगावलोकन श्रीजींनी सर्वांना करून दिले. ॐ हे अक्षर आहे, तो स्वर आहे, तो ध्वनी आहे आणि ती निशाणीपण आहे. अव धातूपासून ॐची उत्पत्ती आणि ॐ म्हणजेच परमात्मा. तत् हे सर्वनाम, परमात्मा हा नेहमी डोळ्यांपाठी असतो, म्हणून तो डोळ्यांपुढे येत नाही जसे कॅमेरामन फोटो काढतो पण फोटोत तो कधीच दिसत नाही. परमात्मा हा कॅमेरामन सारखाच आहे. तसेच सत् म्हणजे सत्ता, एखाद्या वस्तूचे असणे. जसे चष्मा आहे, अंगठी आहे, पेला आहे. ह्यातील “आहे”पणा, म्हणजेच अस्तित्व म्हणजेच सत्.महावाक्याची इतकी सुरेख फोड क्वचितच कोणीतरी करून आपल्याला प्रेमाने भरवत असावं. परमात्मा अनादि-अनंत आहे अस्तित्व अनादि-अनंत आहे म्हणजेच अस्तित्व हाच परमात्मा आहे‌ आणि ॐ तत् सत् हे परमात्म्याचेच नाव आहे. तसेच ब्राह्मण म्हणजे कोण? तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणारा. मुंजीनंतर द्विज होतो, द्विज वेदाभ्यासने विप्र होतो आणि जो विप्र ब्रह्मास जाणतो तोच खरा ब्राम्हण. श्रीजींच्या ज्ञानपूर्ण आहुतींनी गीता यज्ञ धडाडत होता आणि उपस्थितांच्या अज्ञानाचा समूळ नाश होत होता. कलिंगड कधी अख्खे खाता येईल का? नाही ना.पण त्याला छान फोडी करून, मीठ मसाला लावून आपल्यासमोर ठेवले, तर ते आपण आवडीने खातो. श्रीजींच्या प्रवचनाची खासियत ही अशीच आहे. वेदांतासारखा कठीण विषय तो आपल्यासमोर फोड करून, त्यास पुराणांतील व्यवहारातील अनेक गोष्टींचा मसाला लावून आपल्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा स्वरूपात सादर करतात. आणि असा अनुभवसंपन्न ज्ञानी सद्गुरू वेदांताचे निरुपण करण्यासाठी भेटला, म्हणून आपल्याला आपल्याच नशिबाचा नकळत हेवा वाटू लागतो.

महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासावर आलो. दोन-तीन दिवसांचे कपडे धुऊन टाकले. आजच्या प्रवचनाला ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संध्याकाळी श्रीप्रभुमंदिर प्रांगणात आलो. एव्हाना बऱ्याच प्रभुभक्तांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकाची श्री माणिकनगरला जोडले जाण्याची एक वेगळी कथा होती. आणि त्या प्रत्येकाच्या कथा ऐकणे हीसुद्धा कानांना एक पर्वणीच होती. आज श्रीजी बाहेर गेल्यामुळे संध्याकाळचे भक्तकार्य थोडेसे उशिरा झाले. आज कोल खेळ खूपच रंगला होता. अवघे माणिकनगर कोल खेळण्यासाठी जमले होते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून श्रीजी ही बालगोपाल क्रीडा पाहायला सहजतेने उपस्थित होते. हा खेळ पाहतानाही आपल्याला एका विशिष्ट चैतन्याची अनुभूती जाणवते.‌ भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीप्रभु कदाचित एखाद्या बालगोपाळाचं रूप घेऊन कदाचित ह्यात क्रीडा करत असावा. सूर आणि वाद्यांच्या तालावर आपले पाय आपोआपच थिरकायला लागतात. ह्या कोल खेळाचा मनसोक्त आनंद लुटून श्रीप्रभुचा महाप्रसाद घेतला आणि नेहमीप्रमाणे भजनासाठी आनंद मंडपात येऊन बसलो.

आज शुक्रवारी बालाजीचे भजन होते. आजचा रंग गुलाबी होता. श्रीजींच्या मार्गातील लाल पायघड्यांसमोर ही गुलाबी गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. समोर जगत्प्रसुत्या श्रीप्रभु सुखानैव पहुडला होता. भजन ऐकण्यासाठी जणू तोही आज आतुरला होता. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेऊन श्रीजी गादीवर विराजमान झाले आणि रात्रीच्या प्रवचनास सुरुवात झाली. आज शुक्रवारचे श्रीगुरु स्तुतीपर “अरे गुरु राया माझी निरसली माया” हे अगदी तीन कडव्यांचे पद होते. ह्यालाही श्रीजींनी आपल्या वाक्चातुर्याने तासभर रंगविले. श्री माणिकप्रभुंची पदे अत्यंत श्रवणीय तर आहेतच पण त्यातला लपलेला गूढ अर्थ जेव्हा आपल्याला संपूर्णपणे कळतो तेव्हा, भजनाच्या त्या तल्लीनतेत आपल्या डोळ्यांच्या कडा सहज ओलावतात. आजही श्री. आनंदराज प्रभुमहाराज, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री अजय सुगावकरजी ह्यांच्या सूरतालांची जुगलबंदी ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवली. आपल्या अंतर्मनाला एक वेगळेच चैतन्य प्राप्त करून देण्याची क्षमता ह्या भजनांत आहे. चैतन्याची ही अत्यंत सुखद अनुभूती वारंवार घेणे हा श्रीमाणिक नगरातीच्या वास्तव्यातील परमोच्च सुखाचा क्षण आहे. शेजेच्या पदांआधी आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटला गेला. रात्री भजनासाठी उपस्थित भजन मंडळींना श्रीजींचा आशीर्वाद मिळाला. नेहमीप्रमाणे “कमलवदनी हे अमृत भरा माणिक माणिक मंत्र स्मरा. ” या पदाचे दैवी स्वर आसमंतात भरून राहिले. आज भजनानंतर सर्वांना अल्पोपहार मिळाला. सर्वजण आपापल्या निवास्थानी परतू लागले. आज पुन्हा श्रीप्रभुमंदिरात येऊन त्याच्यासमोर हा सगळा आनंदसोहळा अनुभवायला दिल्याबद्दल श्रीप्रभु चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अखंड वीणा आपल्या तारांवर माणिक माणिक नामाने श्रीप्रभुला रिझवत होती.

क्रमशः…

दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण

 

श्री ज्ञानराज माणिकप्रभु म्हणतात की हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण.
हनुमानाच्या मुखी सतत रामनाम असते, श्री रामाच्या सेवेत तो सर्वकाळ तत्पर असतो. त्याचे हृदय रामाच्या स्वरूपाने, रामभक्तीने ओतप्रोत भरले आहे.
हा नामजप, हा सेवाभाव, ही निष्काम भक्ति आपण काही अंशी जरी स्वतः मधे उतरवू शकलो, तर अध्यात्म मार्गावर आपली निश्चितच खूप प्रगती होईल.
नाम कुणाचे घ्यावे, तर आपल्या आराध्याचे. आणि श्री गुरु संप्रदाया मध्ये म्हटल्या प्रमाणे “जो स्थापी सकलमता, तीची गा अभिमानी देवता, गुरु उपासना कुल देवता, सर्वहि भक्ता श्री माणिक”. त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, कोणतेही काम करत असताना, सर्वकाळ माणिक नामाचा जप आपण अंतरी चालू ठेवावा. असे नामस्मरण म्हणजे पथ्य, पण आपला भवरोग इतका बळावलेला आहे की गुरूमंत्र रूपी औषध सुद्धा नित्य नेमाने आपण घेत राहिले पाहिजे. ही शिकवण सुद्धा सद्गुरु ज्ञानराज महाराजांचीच.

आणि म्हणूनच भवजल डोहातून तारून नेणाऱ्या प्रभुच्या नाविक शक्तीची ओळख दाखविणाऱ्यां आपल्या सद्गुरुची मूर्ती आपण मनात तितकीच जपली पाहिजे, जितकी साक्षात श्री प्रभुची, जितकी हनुमानाने श्री रामाची.
हळू हळू मग “एकं सद्विप्रा बहुधा वदंति” ह्याची खात्री पटून आपल्याला गणपती, विष्णू, महेश आणि आपले प्रभु ह्यांच्यात काही भेदच नाही, ही अनुभूति होते. आणि हा विश्वास सुद्धा दृढ होतो की आपल्या सद्गुरूंच्या रूपाने साक्षात श्री प्रभूंचेच दर्शन ह्याची देही ह्याची डोळा आपल्याला होत आहे.

महाराज म्हणतात की सगूण भक्तिची ही पायरी ओलांडून आपण निर्गुण उपासनेच्या पायरीवर पोहोचायला हवे, जिथे “देवा भक्ता मुळी भेदचि नाही” हा प्रत्यय आपल्याला.
प्रभुंच्या कृपेने, आणि श्री महाराजांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला सर्वांना हा प्रत्यय लवकरच होवो हीच प्रार्थना मारुती रायाच्या चरणी.

माणिक माणिक जप कर मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं
श्रीगुरु मंत्र तू जप ले मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं

श्री माणिक छवि हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं
श्रीगुरु मूर्ति हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं

जय माणिक जयघोष करे जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं
श्रीगुरु गुन धुन नित गाये जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं

हर माणिक औ’ हरी माणिक है
माणिक समझ हनुमंत के राम हैं
श्रीगुरु सगुणाकृति माणिक हैं
माणिक समझ हनुमंत के राम हैं

चिन्माणिक सन्माणिक तू बन जा
ज्यों अभिन्न हनुमंत – राम हैं
श्रीगुरु वाणी सदा स्मरत जा
के अभिन्न हनुमंत – राम हैं

ज्ञानप्रबोध भाग सातवा

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सातवा

आधी श्रीगुरूपरंपरेचा जयजयकार ।
नंतर भगवद्गीतेसी नमस्कार ।
गीतायज्ञाच्या पूर्णाहूतीस तयार ।
ज्ञानराजा होतसे ॥१॥

गीता म्हणजेच मधूर गीत ।
परमात्म्याच्या मुखातून उपजले साक्षात ।
वर्णिले अगदी कमीतकमी शब्दांत ।
गीतेस ठासवा हृदयात ॥२॥

कर्माशिवाय नाही भक्तीयोगाची पात्रता ।
भक्तीशिवाय नाही ज्ञानयोगाची योग्यता ।
ज्ञानायोगानेच होई मुक्तीची सिद्धता ।
रहस्य समजावितसे ज्ञानराजा ॥३॥

प्रभुपरमात्मा आहे जरी अरूप ।
उलगडवून दाखवितसे त्याचे स्वरूप ।
रसाळ वाणीने समाधान ज्ञानगुरूभूप ।
करीतसे समस्त भक्तांचे ॥४॥

अरूपातूनच सर्व रूपे साकारतात ।
नाम-रूपात होई परमात्मा सीमित ।
परी प्रभुपरमात्मा तो भेदरहित ।
ॐ तत् सत् नाम जयाचे ॥५॥

वैदिक सिद्धांतांस मानती जे जन ।
शास्त्रसंम्मत तप, यज्ञ आणि दान ।
प्रथम करोनि ॐ काराचे उच्चारण ।
प्रारंभ करीती विधीसी ॥६॥

ॐ हेच सर्व मंत्रांचे आदिबीज ।
ॐकारातूनच सृष्टीचे झाले उपज ।
समजावितसे ॐकारस्वरूप सहज ।
चारी वेदही ॐकाराचे आख्यान ॥७॥

जगताचा अनुभव तीन अवस्थेतून ।
जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतून ।
जीव अनुभवतो त्या त्या जाणिवेतून ।
भेदाभेद निरूपण ॥८॥

विश्व म्हणती जागृतावस्था अभिमानी ।
तैजस म्हणती स्वप्नावस्था अभिमानी ।
प्राज्ञ म्हणती सुषुप्ती अवस्थाभिमानी ।
व्यक्तीगत स्तरावरील अनुभव ॥९॥

अ निघे तो नाभीतून ।
ऊ प्रकटे हा हृदयातून ।
म झंकारे ओठ मिटून ।
ॐकारातच जागृतीस्वप्नसुषुप्ती ॥१०॥

दोन ॐ कारातील शांतीस ।
दोन ॐ कारातील मौनास ।
तुरीया अवस्था म्हणावे तीस ।
तेच परमात्म्याचे स्वरूप ॥११॥

भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।
रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।
दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।
दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥

विष्णू प्रकटे अ मधून ।
शिव प्रकटे ऊ मधून ।
ब्रह्मा प्रकटे म मधून ।
दत्तात्रेय स्वरूप ॐकार ॥१३॥

तत्‌ नावाने परमात्म्यास स्मरून ।
यज्ञ-तप-दान इत्यादि क्रिया करून ।
मनी कुठलीही इच्छा न धरून ।
करीती कर्मे मोक्षार्थी ॥१४॥

वर्तुळात छोटे वर्तुळ काढून ।
छोट्या वर्तुळास जग मानून ।
मोठ्या वर्तुळास परमात्मा समजून ।
तत् स्वरूप समाजावितसे ॥१५॥

जेथे दाखविणे श्रेष्ठत्व ।
आणि परमात्म्याचे अस्तित्व ।
प्रकटीकरण जेथे प्रशस्त ।
सत् शब्दप्रयोग होतसे ॥१६॥

यज्ञ, तप, दानातील स्थिती ।
परमात्म्यासाठी जी कर्मे करती ।
सत् शब्द त्यासच म्हणती ।
जाणावे निश्चये ॥१७॥

शेवटचा श्लोक सतराव्या अध्यायाचा ।
श्रद्धासंबंध उपक्रम आणि उपसंहाराचा ।
आतील मजकूर ह्यातील सामंज्यसाचा ।
उत्तम व्याख्र्यान अध्यायाचे ॥१८॥

श्रद्धेशिवाय केलेले होम हवन ।
तैसेच तप आणि दिलेले दान ।
आणि काही शुभकार्य असेन ।
सर्वही ते असत्‌ ॥१९॥

त्याचे फळ ना इहलोकात ।
ना मिळे परलोकात ।
असत् कर्माची परीणीती दुःखात ।
ज्ञानराज समजावीत ॥२०॥

अत्यंत श्रद्धापूर्वक कार्याचे निर्वहन ।
सात्विक आहार-यज्ञ-तप-दान ।
आदी अंती परमात्म्याचे नामस्मरण ।
सकल कार्यांत साधिजे ॥२१॥

सतराव्या अध्यायाचे समजावोनी सार ।
तदनंतर करोनि श्रीकृष्णाचा जयजयकार ।
वेदांत सप्ताहाचा करोनि उपसंहार ।
ज्ञानामृत पाजविले ॥२२॥

अनुपम सप्ताह सोहळा वेदांत ।
द्वैतभावनेचा करी समूळ अंत ।
अद्वैतभाव प्रकटवी सकल हृदयांत ।
ज्ञान मार्तंड तळपतसे ॥२३॥

संपूर्णम्