by Pranil Sawe | Jun 21, 2022 | Uncategorized
कोलच्या खेळानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीला तयार होण्यासाठी यात्री निवासावर आलो. झटपट स्नान उरकले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा श्रीप्रभु मंदिरात हजर झालो. अनेक प्रभुभक्तांकडून दिंडीची ख्याती ऐकली होती. दिंडीतला एकही क्षण मला नजरेआड करायचा नव्हता. सर्वप्रथम श्रीप्रभु मंदिरात श्री माणिक प्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आज हा भक्तकार्यकल्पद्रुम सार्वभौम श्रीगुरु पूर्ण कलेने नटला होता. चैतन्याची अनुभूती गाभाऱ्यात सुखासनी पहुडलेल्या श्रीप्रभुला पाहून क्षणोक्षणी येत होती. त्या गर्दीतही मनाचा बांध फुटला आणि बसल्याजागीच डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाश्रु म्हणतात कदाचित हेच असावेत… गेल्या आठवडाभरात हा नटनागर दररोज लोभसपणे समोर आला होता. आजही श्रीप्रभुची ती प्रत्येक छबी हृदयामध्ये तशीच कोरलेली आहे. एखाद्याने आपल्या मनाचा ताबा घेणे म्हणजे काय? हे श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होताना कळते. श्रीप्रभु जेव्हा नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो, तेव्हा आपल्या मनाची होणारी भावविभोर अवस्था, चराचरातील श्रीप्रभुचे अनुभवायला येणारे चैतन्य, मनात आलेले क्षुद्रातीक्षुद्र लाडसुद्धा श्रीप्रभुने लडीवाळपणे पुरवणे, असे जेव्हा वारंवार घडते, तेव्हा श्रीप्रभुने नक्कीच आपला हात त्याच्या हातात घेतला आहे, ह्याची जाणीव होते आणि ही जाणीव अत्यंत सुखावह आणि तितकीच आश्वासकही असते.

पूर्ण तेजाने झळाळत असलेल्या श्रीप्रभुचे वर्णन करायला आज कदाचित शब्दही अपुरे पडावेत. सौंदर्य जणू दास बनून श्रीप्रभु चरणी अदबीने, नजाकतीने उभं होतं. रत्नांच्या, मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा गळाभर ऐटीत रुळत होत्या. अबोलीचे नाजूक हार, मोगऱ्याचा सुगंधी हार, पिवळ्या झेंडूचा हार, शेवंतीचा जाडजूड हार आणि गुलाबांच्या अनेक प्रकारच्या भरगच्च हारांमध्ये श्रीप्रभुला सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. श्रीप्रभु समाधीच्या वरच्या बाजूला शेंदरी, पिवळे, लाल, गुलाबी गुलाबांचे गुच्छ श्रीप्रभुच्या रूपाला चारचाँद लावत होते. गुलाबांच्या ह्या तोबा गर्दीमध्येही लाल टपोरा जरबेरा आपलं अस्तित्व दाखवून देत होता. श्रीप्रभु समाधीस अगदी बाहेरच्या बाजूस घातलेल्या भरगच्च गुलाबाच्या हाराला, तगरीच्या फुलांची सुंदर जाळी विणली होती. लाल आणि पांढ–या रंगसंगतीतला तो हार अत्यंत आकर्षक दिसत होता. श्रीप्रभु समाधीभोवती केळी लावल्या होत्या, जणू कर्दळीवनातच श्रीप्रभु आज विहरत होता. श्रीप्रभु समाधीवरील छत्रावरून मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या आणि त्या माळांच्या शेवटी झेंडूची फुले आकर्षकपणे माळली होती. समोरच श्रीप्रभुच्या पादुका दृष्टीस पडत होत्या. बाजूला चांदीच्या समया मंदपणे तेवत होत्या. श्रीप्रभुला पंचपक्वान्नांचा, डाळिंब, चिकू, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, अननस, टरबूज, अंजीर इत्यादी फळांचा नैवेद्य अर्पण केला होता. नैवेद्याच्या भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. चारी बाजूंना समया तेवत होत्या. ह्या सर्व मांदियाळीत समोर पत्रावळीत असलेला भाजी–भाकरीचा नैवेद्य लक्ष वेधून घेत होता. श्री माणिकप्रभु महाराज नेहमी माधुकरीचे अन्न खात. श्री प्रभुंना चटणी–भाकरी खूप आवडायची. श्रीसंस्थानाने ती परंपरा आजतागायत जपली आहे. आजही श्रीप्रभुंना पंचपक्वान्नांचा नैवेद्य असला, तरी मध्यभागी माधुकरीचे भिक्षान्नच असते. असो, सच्चिदानंद दयाघनाच्या ह्या विलोभनीय रूपाला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच बोटे डोक्याला लावून मोडली. तुझा हा आनंद सोहळा मला संपूर्णपणे अनुभवायला मिळू देत, अशी विनंतीवजा प्रार्थना श्रीप्रभुला केली आणि श्रीजींच्या निवासस्थानी नागाई येथे पोहोचलो. ढोल, ताशे, संबळ वाजवणारे श्रीजींच्या निवासस्थानाच्या आवारात उभे होते. भालदार, चोपदार लाल रंगाच्या वेषात मावळ्यांसारखी पगडी घालून अब्दागिरी घेऊन सज्ज झालेले होते. एक सेवेकरी श्रीजींवर धरण्यात येणारी छत्री घेऊन सज्ज होता. अंगणामध्ये जवळपास दहा फूट लांबीची सुस्वागतमची रांगोळी मन वेधून घेत होती. प्रभुभक्त घोळक्याघोळक्याने जमून उभे होते. दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झालेला प्रत्येक जण आता दिंडीसाठी नागाईतून श्रीजींच्या प्रस्थानाचीच वाट पाहत होता.
दिंडी… दिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन पंढरपुरची वारी उभी राहते. वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी व कार्तिकी एकादशीला संतांच्या आणि देवाच्या पालखीपुढे भजन करत व नाचत जातात त्याला दिंडी असे म्हणतात. संस्कृत भाषेत “दिंडि:” आणि “दिण्डिर:” असे शब्द आहेत, आणि या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘एक विशिष्ट प्रकारचे वाद्य‘ असा आहे. त्यामुळे वाद्यांच्या गजरात होणाऱ्या हरिसंकिर्तनास दिंडी म्हणता येईल. इतिहासामध्येही आपल्याला किल्ल्यांच्या दिंडी दरवाज्याचे वर्णन अनेकदा आढळते. मराठीत दिंडी ह्या शब्दाचे लहान दरवाजा आणि पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याला स्वर्गाची दारे उघडावी, या हेतूने वारकरी लोक भजन करतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटचालीला दिंडी हे नाव पडले अशी कल्पना आहे. किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात, त्यावरून दिंडी हे नाव आले असावे, असेही एक मत आहे. भजनी मंडळातील एक जण दिंडी नावाचे वीणेसारख एक वाद्य पुढे वाजवीत जातो व बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी असे म्हणतात. असो. भागवत सप्ताहच्या पारायण पद्धतीत असे नमूद केले गेले आहे की, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी वाजत गाजत भगवंताचे स्मरण करत मिरवणूक काढावी व हरिसंकिर्तन करीत रात्री जागरण करावे. श्री मार्तंड माणिकप्रभुंना रात्री जागरण, हरिसंकीर्तन व मिरवणुकीची ही कल्पना फारच आवडली आणि त्यांनीच ह्या मिरवणुकीला वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे स्वरूप देऊन श्री संस्थानाच्या लौकिकास साजेल, असा कार्यक्रम आखला व त्यास दिंडी हेच नाव दिले.

श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज हे स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आणि प्रत्युत्पन्नमति विद्वान असल्यामुळे दिंडीच्या कार्यक्रमात जागच्याजागी पदे रचून त्यांनी गायल्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. दिंडीच्या कार्यक्रमात श्रीजी स्वस्वरूपाशी इतके तादात्म्य पावत की त्यांना कशाचेही भान उरत नसे. पुढे १९३६ साली श्रीजींच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु महाराज श्रीसंस्थानाचे पुढचे पीठाचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी, अधिक भाद्रपद मासात श्रींच्या मासिक आराधनेस जोडून, आपल्या कारकीर्दीचा प्रथम वेदांत सप्ताह उत्सव साजरा करून, दिंडीच्या भव्य कार्यक्रमाने त्याची सांगता केली. श्री शंकर माणिक प्रभुनींच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास आणि दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली, जी अद्यापही चालू आहे.
पुढे १९३७ सालच्या फाल्गुन महिन्यात श्रीजींच्या प्रथम पुण्यतिथीस असे ठरले की, श्रीजींच्या पुण्यतिथीस जोडून,, प्रतिवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीपासून वेदांत सप्ताह उत्सव श्रीजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जावा. १९३७ ते १९४३ सालापर्यंत हा कार्यक्रम अत्यंत वैभवात साजरा केला गेला. १९४४ साली श्रीमाणिक नगरात प्लेगचा प्रकोप होता. त्यात श्री शंकर माणिकप्रभु महाराज स्वतः उदर व्यथेने आजारी होते. त्यांनी सर्व भक्तांस पत्रे पाठवून कळवले की, यंदा वेदांत सप्ताह होऊ शकणार नाही. योगायोग असा की, वेदांत सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ होत असे त्याच्या दोनच दिवस आधी श्री शंकर माणिकप्रभु महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि म्हणूनच १९४६ सालापासून वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेस प्रारंभ होऊ लागला व चतुर्थीला श्री मार्तंड माणिकप्रभु महाराजांची पुण्यतिथी साजरी होऊन, नवमीस दिंडी असा क्रम प्राप्त झाला, तो आजतागायत चालू आहे.
दिंडीत म्हणावयाच्या पदांची यादी एका फलकावर लिहून ते फलक दिंडीत मिळवण्याची पद्धत श्री शंकर माणिकप्रभु महाराजांनी घालून दिली. भक्तजन फलकावरील पदांचा क्रमांक व पद्यमाला या पुस्तकातील त्या पदांचे पृष्ठ क्रमांक पाहून पद्यमालेच्या आधारे पदे म्हणत असत. बऱ्याच भक्तांकडे पद्यमाला नसते अथवा पदेही मुखोद्गत नसतात, म्हणून दिंडीत भाग घेऊनही त्यांना पदे म्हणता येत नाहीत. काही पदे, आरत्या ह्या सप्ताह भजनाच्या पुस्तकातील असल्यामुळे भक्तांचा बराच वेळ पुस्तकाचे पाने उलटण्यात जातो आणि त्यामुळे एकंदरीतच रसभंग होण्याची पाळी येते. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांनी दिंडीत म्हटल्या जाणाऱ्या पदांची एक क्रमवार पुस्तिका प्रकाशित केली आणि त्याची मांडणी अशी केली की एकदा पुस्तिका हातात धरल्यावर दिंडी संपेपर्यंत पाने शोधण्याची वेळच येऊ नये. त्या अनुषंगाने १९९४ साली “दिंडीची पदे” ही पुस्तिका छापून प्रसिद्ध झाली. आजही दिंडीमध्ये वेळोवेळी म्हटल्या जाणाऱ्या त्या त्या पदांचे फलक उंच धरले जातात, जेणेकरून सर्व भक्तांना ती ती पदे फलक पाहून म्हणता येतात.
मनामध्ये दिंडीच्या इतिहासाची पाने उलगडत असतानाच भक्तकार्य कल्पद्रुमचा जोशपूर्ण जयघोष झाला. जो तो आपापल्या परीने सावध झाला. श्रीजींनी आधी आपल्या निवासस्थानातील देवतांचे दर्शन घेतले. कुलदेवता श्री मल्हारी म्हाळसाकांत व कुलस्वामिनी श्रीनागवेलांबा देवीची आरती म्हटली. नंतर श्रीजींनी मातोश्री मीराबाई साहेबांकडून आशीर्वाद घेतले व मातोश्रींनी श्रीजींना दहीसाखर दिला. मातोश्रींकडून मिळालेल्या भरभरून आशीर्वादानंतर श्रीजी त्यांच्या निवासस्थानातून दिंडीसाठी मुक्तीमंटपात जाण्यासाठी प्रस्थान करते झाले.
क्रमशः…
by Pranil Sawe | Jun 4, 2022 | Uncategorized
परवा मोरपिसे गोळा करायला गेलो असताना, येताना मला श्रीबयाम्मामातेची समाधी दिसली होती. एक दिवस निवांत येऊन या माऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, असे मनोमन ठरवले होते. आज सकाळी सहाच्या चहानंतर संगमाच्या दिशेने, सागाच्या बागेतून निघालो. विरजा नदीच्या काठी एक छोटीसी समाधी बय्यामा माऊलीची आहे. तेथील पक्ष्यांची मंजुळ किलबिल मला सुखावत होती. ओढ्यावजा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते. बगळे काही खाद्य मिळेल का ह्या आशेपोटी विरजेच्या पात्रात उगाचच ध्यानाचा आव आणून उभे होते. जवळच उगवलेली रानफुले घेऊन त्या माऊलीच्या समाधीवर मनोभावे अर्पण केली. जिने आपल्या उदरी नऊ मास प्रत्यक्ष दत्तावतारी श्री माणिक प्रभुंना धारण केले, त्या जगन्माता बयाम्माप्रती अष्टभाव दाटून आले. एकट्यानेच तिच्याशी गप्पा मारल्या. श्री माणिकप्रभुंसारखे नररत्न ह्या जगाला अर्पण केले, म्हणून तिच्या समाधीवर नम्रपणे मस्तक झुकविले. पुन्हा यात्री निवासवर येऊन आदल्या दिवसाच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून काढल्या.

नाश्ता उरकून झटपट पारायणासाठी औदुंबराखाली दाखल झालो. एव्हाना जो तो आपापल्या जागी स्थानापन्न होऊन पारायण करण्यात दंग झालेला होता. आज सहाव्या दिवसाचे श्री माणिक चरितामृताचे वाचनही मनाच्या अगदी प्रफुल्लित अवस्थेत पार पडले. विठ्ठलराव तालुकदाराची कथा, माणक्या पाटलाची कथा, यज्ञ समारंभ व त्यातील विघ्न, तात्यासाहेबांस आलेले वैराग्य, श्री माणिकप्रभुंची जगद्गुरु शंकराचार्यांची भेट, दमडीची साखर, ऐनुद्दीन उस्तादाचे गर्वहरण अशा अनेक कथांमध्ये रमताना आपला श्री माणिकप्रभुंप्रती असलेला स्नेह अधिकच दुणावतो. आपले मन अगदी माणिकमय होऊन जाते. आज पारायण यादरम्यान प्रसाद म्हणून काही भक्तांनी चिकू आणि पेढे वाटले. आजच्या दिवसाच्या पारायणानंतर तोच नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला दाखवला.
पारायणानंतर औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या, समोरील मनोहर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि श्रीप्रभु समाधीसमोर उभा राहिलो. आज श्रीप्रभु समाधीवरील गुलाबी रंगाच्या वस्त्रात अत्यंत विलोभनीय दिसत होता. आणि त्यावरील हिरव्या रंगाची नक्षीदार शाल लक्ष वेधून घेत होती. अबोली आणि कागड्यांच्या फुलांचा एकमेकांत बेमालूमपणे गुंफलेला हार ऐक्यत्वाची साक्ष देत होता. अंगावरील विविध माळा खुलून दिसत होत्या. समाधीवर गुलाबाची लाल फुले आपली सुगंध सेवा श्रीप्रभु चरणी अर्पण करत होती. आणि भोवतालचे अबोलीचे भरगच्च गजरे त्या साजाला भारदस्तपणा प्रदान करीत होते. संजीवन समाधी समोरील पादुकांना चंदनाचा लेप लावण्यात आला होता. श्रीप्रभुचं हे असं सजलेले रूप कितीही पाहिलं तरी मनाचे समाधान होत नाही. त्याच्या ह्या ऐश्वर्यसंपन्न रूपाला अनिमिष डोळ्यांनी पाहत, हृदयात साठवून ठेवणे, एवढेच आपल्या हाती असते. श्रीप्रभुसमाधीचे तीर्थ घेऊन कृतकृत्य झालो आणि नेहमीप्रमाणे श्रीप्रभु समाधीला प्रदक्षिणा घातल्या.
आज सकाळी, यज्ञशाळेमध्ये श्री गणेश यागाचे आयोजन केले होते. श्रीजी आपल्या घरची नित्य पूजा आटोपून यज्ञशाळेत हजर होते. उसाचे कांडे, मोदक, खोबरे पोहे, तीळ इत्यादी सामग्रीचे हवन होमकुंडात केले जात होते. सुमारे तासाभरानंतर पूर्णाहुती होऊन श्री गणेश याग संपन्न झाला. ताक पिऊन पुन्हा श्री नृसिंह निलयमध्ये श्रींच्या प्रवचनासाठी येऊन बसलो. परंपरेनुसार वाद्यांच्या आणि भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीमद्भगवद्गीतेच्या वीस ते तेवीस ह्या चार श्लोकांचे अत्यंत विस्तृत विवेचन श्रीजींनी केले. आज मुख्यत्वेकरून दानावर उद्बोधन होते. यज्ञ, दान, तप हे माणसाचे कर्तव्य आहे. आणि ते सोडता येत नाही तसेच ते साधकांना, मनुष्यांना पवित्र करतात. दानाचे फायदे समजावताना दानामुळे अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणा याचे क्षालन होते, तसेच दान केल्यामुळे, आपली प्रकृती बरोबर समरसता होते. दानामुळे सामाजिक न्याय होतो, असे श्रीजींनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावले. तसेच सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे, असे श्रीजी म्हणाले. पुढे जाऊन श्रीजींनी सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणते हे अनेक कथांचा दाखला देऊन समजावले. पुढे जाऊन यज्ञ, दान, तप करताना त्यात काही न्यून राहिले, त्यात काही कमी झाले तर ते, परमात्म्याच्या नामस्मरणाने सुधारता येते हा मौलिक उपदेशही श्रीजींनी सर्वांना समजावून सांगितला. तसेच तेविसाव्या श्लोकातील ॐ तत् सत् च्या स्वरूपाचं विहंगावलोकन श्रीजींनी सर्वांना करून दिले. ॐ हे अक्षर आहे, तो स्वर आहे, तो ध्वनी आहे आणि ती निशाणीपण आहे. अव धातूपासून ॐची उत्पत्ती आणि ॐ म्हणजेच परमात्मा. तत् हे सर्वनाम, परमात्मा हा नेहमी डोळ्यांपाठी असतो, म्हणून तो डोळ्यांपुढे येत नाही जसे कॅमेरामन फोटो काढतो पण फोटोत तो कधीच दिसत नाही. परमात्मा हा कॅमेरामन सारखाच आहे. तसेच सत् म्हणजे सत्ता, एखाद्या वस्तूचे असणे. जसे चष्मा आहे, अंगठी आहे, पेला आहे. ह्यातील “आहे”पणा, म्हणजेच अस्तित्व म्हणजेच सत्.महावाक्याची इतकी सुरेख फोड क्वचितच कोणीतरी करून आपल्याला प्रेमाने भरवत असावं. परमात्मा अनादि-अनंत आहे अस्तित्व अनादि-अनंत आहे म्हणजेच अस्तित्व हाच परमात्मा आहे आणि ॐ तत् सत् हे परमात्म्याचेच नाव आहे. तसेच ब्राह्मण म्हणजे कोण? तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणारा. मुंजीनंतर द्विज होतो, द्विज वेदाभ्यासने विप्र होतो आणि जो विप्र ब्रह्मास जाणतो तोच खरा ब्राम्हण. श्रीजींच्या ज्ञानपूर्ण आहुतींनी गीता यज्ञ धडाडत होता आणि उपस्थितांच्या अज्ञानाचा समूळ नाश होत होता. कलिंगड कधी अख्खे खाता येईल का? नाही ना.पण त्याला छान फोडी करून, मीठ मसाला लावून आपल्यासमोर ठेवले, तर ते आपण आवडीने खातो. श्रीजींच्या प्रवचनाची खासियत ही अशीच आहे. वेदांतासारखा कठीण विषय तो आपल्यासमोर फोड करून, त्यास पुराणांतील व्यवहारातील अनेक गोष्टींचा मसाला लावून आपल्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा स्वरूपात सादर करतात. आणि असा अनुभवसंपन्न ज्ञानी सद्गुरू वेदांताचे निरुपण करण्यासाठी भेटला, म्हणून आपल्याला आपल्याच नशिबाचा नकळत हेवा वाटू लागतो.
महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासावर आलो. दोन-तीन दिवसांचे कपडे धुऊन टाकले. आजच्या प्रवचनाला ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संध्याकाळी श्रीप्रभुमंदिर प्रांगणात आलो. एव्हाना बऱ्याच प्रभुभक्तांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकाची श्री माणिकनगरला जोडले जाण्याची एक वेगळी कथा होती. आणि त्या प्रत्येकाच्या कथा ऐकणे हीसुद्धा कानांना एक पर्वणीच होती. आज श्रीजी बाहेर गेल्यामुळे संध्याकाळचे भक्तकार्य थोडेसे उशिरा झाले. आज कोल खेळ खूपच रंगला होता. अवघे माणिकनगर कोल खेळण्यासाठी जमले होते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून श्रीजी ही बालगोपाल क्रीडा पाहायला सहजतेने उपस्थित होते. हा खेळ पाहतानाही आपल्याला एका विशिष्ट चैतन्याची अनुभूती जाणवते. भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीप्रभु कदाचित एखाद्या बालगोपाळाचं रूप घेऊन कदाचित ह्यात क्रीडा करत असावा. सूर आणि वाद्यांच्या तालावर आपले पाय आपोआपच थिरकायला लागतात. ह्या कोल खेळाचा मनसोक्त आनंद लुटून श्रीप्रभुचा महाप्रसाद घेतला आणि नेहमीप्रमाणे भजनासाठी आनंद मंडपात येऊन बसलो.

आज शुक्रवारी बालाजीचे भजन होते. आजचा रंग गुलाबी होता. श्रीजींच्या मार्गातील लाल पायघड्यांसमोर ही गुलाबी गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. समोर जगत्प्रसुत्या श्रीप्रभु सुखानैव पहुडला होता. भजन ऐकण्यासाठी जणू तोही आज आतुरला होता. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेऊन श्रीजी गादीवर विराजमान झाले आणि रात्रीच्या प्रवचनास सुरुवात झाली. आज शुक्रवारचे श्रीगुरु स्तुतीपर “अरे गुरु राया माझी निरसली माया” हे अगदी तीन कडव्यांचे पद होते. ह्यालाही श्रीजींनी आपल्या वाक्चातुर्याने तासभर रंगविले. श्री माणिकप्रभुंची पदे अत्यंत श्रवणीय तर आहेतच पण त्यातला लपलेला गूढ अर्थ जेव्हा आपल्याला संपूर्णपणे कळतो तेव्हा, भजनाच्या त्या तल्लीनतेत आपल्या डोळ्यांच्या कडा सहज ओलावतात. आजही श्री. आनंदराज प्रभुमहाराज, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री अजय सुगावकरजी ह्यांच्या सूरतालांची जुगलबंदी ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवली. आपल्या अंतर्मनाला एक वेगळेच चैतन्य प्राप्त करून देण्याची क्षमता ह्या भजनांत आहे. चैतन्याची ही अत्यंत सुखद अनुभूती वारंवार घेणे हा श्रीमाणिक नगरातीच्या वास्तव्यातील परमोच्च सुखाचा क्षण आहे. शेजेच्या पदांआधी आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटला गेला. रात्री भजनासाठी उपस्थित भजन मंडळींना श्रीजींचा आशीर्वाद मिळाला. नेहमीप्रमाणे “कमलवदनी हे अमृत भरा माणिक माणिक मंत्र स्मरा. ” या पदाचे दैवी स्वर आसमंतात भरून राहिले. आज भजनानंतर सर्वांना अल्पोपहार मिळाला. सर्वजण आपापल्या निवास्थानी परतू लागले. आज पुन्हा श्रीप्रभुमंदिरात येऊन त्याच्यासमोर हा सगळा आनंदसोहळा अनुभवायला दिल्याबद्दल श्रीप्रभु चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अखंड वीणा आपल्या तारांवर माणिक माणिक नामाने श्रीप्रभुला रिझवत होती.
क्रमशः…
by Prachi Karnik | Apr 20, 2022 | Uncategorized

श्री ज्ञानराज माणिकप्रभु म्हणतात की हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण.
हनुमानाच्या मुखी सतत रामनाम असते, श्री रामाच्या सेवेत तो सर्वकाळ तत्पर असतो. त्याचे हृदय रामाच्या स्वरूपाने, रामभक्तीने ओतप्रोत भरले आहे.
हा नामजप, हा सेवाभाव, ही निष्काम भक्ति आपण काही अंशी जरी स्वतः मधे उतरवू शकलो, तर अध्यात्म मार्गावर आपली निश्चितच खूप प्रगती होईल.
नाम कुणाचे घ्यावे, तर आपल्या आराध्याचे. आणि श्री गुरु संप्रदाया मध्ये म्हटल्या प्रमाणे “जो स्थापी सकलमता, तीची गा अभिमानी देवता, गुरु उपासना कुल देवता, सर्वहि भक्ता श्री माणिक”. त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, कोणतेही काम करत असताना, सर्वकाळ माणिक नामाचा जप आपण अंतरी चालू ठेवावा. असे नामस्मरण म्हणजे पथ्य, पण आपला भवरोग इतका बळावलेला आहे की गुरूमंत्र रूपी औषध सुद्धा नित्य नेमाने आपण घेत राहिले पाहिजे. ही शिकवण सुद्धा सद्गुरु ज्ञानराज महाराजांचीच.
आणि म्हणूनच भवजल डोहातून तारून नेणाऱ्या प्रभुच्या नाविक शक्तीची ओळख दाखविणाऱ्यां आपल्या सद्गुरुची मूर्ती आपण मनात तितकीच जपली पाहिजे, जितकी साक्षात श्री प्रभुची, जितकी हनुमानाने श्री रामाची.
हळू हळू मग “एकं सद्विप्रा बहुधा वदंति” ह्याची खात्री पटून आपल्याला गणपती, विष्णू, महेश आणि आपले प्रभु ह्यांच्यात काही भेदच नाही, ही अनुभूति होते. आणि हा विश्वास सुद्धा दृढ होतो की आपल्या सद्गुरूंच्या रूपाने साक्षात श्री प्रभूंचेच दर्शन ह्याची देही ह्याची डोळा आपल्याला होत आहे.
महाराज म्हणतात की सगूण भक्तिची ही पायरी ओलांडून आपण निर्गुण उपासनेच्या पायरीवर पोहोचायला हवे, जिथे “देवा भक्ता मुळी भेदचि नाही” हा प्रत्यय आपल्याला.
प्रभुंच्या कृपेने, आणि श्री महाराजांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला सर्वांना हा प्रत्यय लवकरच होवो हीच प्रार्थना मारुती रायाच्या चरणी.
माणिक माणिक जप कर मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं
श्रीगुरु मंत्र तू जप ले मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं
श्री माणिक छवि हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं
श्रीगुरु मूर्ति हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं
जय माणिक जयघोष करे जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं
श्रीगुरु गुन धुन नित गाये जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं
हर माणिक औ’ हरी माणिक है
माणिक समझ हनुमंत के राम हैं
श्रीगुरु सगुणाकृति माणिक हैं
माणिक समझ हनुमंत के राम हैं
चिन्माणिक सन्माणिक तू बन जा
ज्यों अभिन्न हनुमंत – राम हैं
श्रीगुरु वाणी सदा स्मरत जा
के अभिन्न हनुमंत – राम हैं
by Pranil Sawe | Apr 8, 2022 | Marathi, Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सातवा

आधी श्रीगुरूपरंपरेचा जयजयकार ।
नंतर भगवद्गीतेसी नमस्कार ।
गीतायज्ञाच्या पूर्णाहूतीस तयार ।
ज्ञानराजा होतसे ॥१॥
गीता म्हणजेच मधूर गीत ।
परमात्म्याच्या मुखातून उपजले साक्षात ।
वर्णिले अगदी कमीतकमी शब्दांत ।
गीतेस ठासवा हृदयात ॥२॥
कर्माशिवाय नाही भक्तीयोगाची पात्रता ।
भक्तीशिवाय नाही ज्ञानयोगाची योग्यता ।
ज्ञानायोगानेच होई मुक्तीची सिद्धता ।
रहस्य समजावितसे ज्ञानराजा ॥३॥
प्रभुपरमात्मा आहे जरी अरूप ।
उलगडवून दाखवितसे त्याचे स्वरूप ।
रसाळ वाणीने समाधान ज्ञानगुरूभूप ।
करीतसे समस्त भक्तांचे ॥४॥
अरूपातूनच सर्व रूपे साकारतात ।
नाम-रूपात होई परमात्मा सीमित ।
परी प्रभुपरमात्मा तो भेदरहित ।
ॐ तत् सत् नाम जयाचे ॥५॥
वैदिक सिद्धांतांस मानती जे जन ।
शास्त्रसंम्मत तप, यज्ञ आणि दान ।
प्रथम करोनि ॐ काराचे उच्चारण ।
प्रारंभ करीती विधीसी ॥६॥
ॐ हेच सर्व मंत्रांचे आदिबीज ।
ॐकारातूनच सृष्टीचे झाले उपज ।
समजावितसे ॐकारस्वरूप सहज ।
चारी वेदही ॐकाराचे आख्यान ॥७॥
जगताचा अनुभव तीन अवस्थेतून ।
जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतून ।
जीव अनुभवतो त्या त्या जाणिवेतून ।
भेदाभेद निरूपण ॥८॥
विश्व म्हणती जागृतावस्था अभिमानी ।
तैजस म्हणती स्वप्नावस्था अभिमानी ।
प्राज्ञ म्हणती सुषुप्ती अवस्थाभिमानी ।
व्यक्तीगत स्तरावरील अनुभव ॥९॥
अ निघे तो नाभीतून ।
ऊ प्रकटे हा हृदयातून ।
म झंकारे ओठ मिटून ।
ॐकारातच जागृतीस्वप्नसुषुप्ती ॥१०॥
दोन ॐ कारातील शांतीस ।
दोन ॐ कारातील मौनास ।
तुरीया अवस्था म्हणावे तीस ।
तेच परमात्म्याचे स्वरूप ॥११॥
भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।
रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।
दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।
दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥
विष्णू प्रकटे अ मधून ।
शिव प्रकटे ऊ मधून ।
ब्रह्मा प्रकटे म मधून ।
दत्तात्रेय स्वरूप ॐकार ॥१३॥
तत् नावाने परमात्म्यास स्मरून ।
यज्ञ-तप-दान इत्यादि क्रिया करून ।
मनी कुठलीही इच्छा न धरून ।
करीती कर्मे मोक्षार्थी ॥१४॥
वर्तुळात छोटे वर्तुळ काढून ।
छोट्या वर्तुळास जग मानून ।
मोठ्या वर्तुळास परमात्मा समजून ।
तत् स्वरूप समाजावितसे ॥१५॥
जेथे दाखविणे श्रेष्ठत्व ।
आणि परमात्म्याचे अस्तित्व ।
प्रकटीकरण जेथे प्रशस्त ।
सत् शब्दप्रयोग होतसे ॥१६॥
यज्ञ, तप, दानातील स्थिती ।
परमात्म्यासाठी जी कर्मे करती ।
सत् शब्द त्यासच म्हणती ।
जाणावे निश्चये ॥१७॥
शेवटचा श्लोक सतराव्या अध्यायाचा ।
श्रद्धासंबंध उपक्रम आणि उपसंहाराचा ।
आतील मजकूर ह्यातील सामंज्यसाचा ।
उत्तम व्याख्र्यान अध्यायाचे ॥१८॥
श्रद्धेशिवाय केलेले होम हवन ।
तैसेच तप आणि दिलेले दान ।
आणि काही शुभकार्य असेन ।
सर्वही ते असत् ॥१९॥
त्याचे फळ ना इहलोकात ।
ना मिळे परलोकात ।
असत् कर्माची परीणीती दुःखात ।
ज्ञानराज समजावीत ॥२०॥
अत्यंत श्रद्धापूर्वक कार्याचे निर्वहन ।
सात्विक आहार-यज्ञ-तप-दान ।
आदी अंती परमात्म्याचे नामस्मरण ।
सकल कार्यांत साधिजे ॥२१॥
सतराव्या अध्यायाचे समजावोनी सार ।
तदनंतर करोनि श्रीकृष्णाचा जयजयकार ।
वेदांत सप्ताहाचा करोनि उपसंहार ।
ज्ञानामृत पाजविले ॥२२॥
अनुपम सप्ताह सोहळा वेदांत ।
द्वैतभावनेचा करी समूळ अंत ।
अद्वैतभाव प्रकटवी सकल हृदयांत ।
ज्ञान मार्तंड तळपतसे ॥२३॥
संपूर्णम्
by Pranil Sawe | Apr 6, 2022 | Marathi, Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सहावा

आधी श्रीगुरूपरंपरेस वंदून ।
नंतर भगवद्गीतेसी नमून ।
आधीची उजळणी करून ।
गीतायज्ञ धडाडला ॥१॥
दान, तप, यज्ञ ।
हेच मानवाचे कर्तव्य ।
पवित्र करूनि धन्य ।
मानवा करीतसे ॥२॥
पंचभूत यज्ञातील शेष ग्रहण ।
करूनि देहाचे करावे समाधान ।
स्वतःपुरता शिजवून करिता भक्षण ।
पाप भक्षिल्यासमान होय ॥३॥
दानाचे प्रकरण चालवित ।
अनंत फायदे गिनवित ।
उदाहरणे देई अपरिमीत ।
ज्ञानराजा गुरूसार्वभौमा ॥४॥
अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणाचे क्षालन ।
प्रकृतीबरोबरची समरसता अनुभवे जाण ।
सामाजिक न्यायासही हेच कारण ।
फायदे अनेक दानाचे ॥५॥
दानात दान अन्नदान ।
सर्वश्रेष्ठ तेच जाण ।
तृप्ती होऊनि समाधान ।
केवळ अन्नदानानेच ॥६॥
दान देणे माझे कर्तव्य आहे ।
अंतरी ही भावना उपजली आहे ।
देश, कालही दानासी उत्तम आहे ।
पहावे नित्य दानसमयी ॥७॥
पात्रता पहावी समोरच्याची तपासून ।
उपकार न करणाऱ्यास शोधून ।
दान करावे मग मनापासून ।
लक्षण सात्विक दानाचे ॥८॥
क्लेशपूर्वक जे करीती दान ।
प्रत्युपकाराचा हेतू मनी ठेवून ।
अथवा फळाची अपेक्षा धरून ।
केलेले दान राजस ॥९॥
अयोग्य काळी, योग्य सत्कारावीण ।
उपमर्द करूनि, अयोग्य ठिकाण ।
कुपात्री केलेले सकळ दान ।
तामस केवळ जाणावे ॥१०॥
राहता यज्ञ-दान-तपात काही न्यून ।
सुधारण्याची परमात्मा सांगे खूण ।
सश्रद्धे करिता भगवंताचे नामस्मरण ।
सात्विक होय सकळही ॥११॥
तेवीसावा श्लोक अत्यंत महत्वाचा ।
ॐ तत्सतचा घनीभूत साचा ।
ज्ञानराजाची गोड मधूर वाचा ।
अमृतसिंचन करीतसे ॥१२॥
ज्याच्या मननाने येई त्राण ।
मंत्र त्यासी म्हणती विद्वज्जन ।
ॐ तत्सत् महामंत्र जाण ।
ज्ञानगुरू प्रतिपादतसे ॥१३॥
ॐ असे अक्षर ।
ॐ असे स्वर ।
ॐ ध्वनी मधुर ।
ॐ निशाणीही ॥१४॥
ॐ तत्सतचे स्वरूप ।
उदाहरणे देऊन अमुप ।
परमात्म्याचे वास्तविक रूप ।
ज्ञानगुरू सहज उलगडतसे ॥१५॥
परमात्मा हा अनादी अनंत ।
अस्तित्व ही अनादी अनंत ।
परमात्मा म्हणजेच अस्तीत्व ।
भेद मिटवी ज्ञानराजा ॥१६॥
ॐतत्सतचे करूनि उच्चारण ।
ब्रह्मदेवे सृष्टी निर्मिली जाण ।
मुख्यत्वे यज्ञ, वेद, ब्राह्मण ।
निर्मिली ब्रह्मदेवे ॥१७॥
ब्राह्मण म्हणजे नेमके काय ।
सविस्तर व्याख्या करीत जाय ।
ब्रह्मासी जाणणारा ब्राह्मण होय ।
अज्ञान तिरोहीत ज्ञानमाऊली ॥१८॥
आम्हा अज्ञानी लोकांची धडपड ।
ह्या जडजीवाची होतसे परवड ।
प्रभुकृपे लाभला ज्ञानराज आधारवड ।
धरून ठेवणे हितकर ॥१९॥
by Pranil Sawe | Apr 5, 2022 | Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस पाचवा

प्रथम वंदुनि श्रीगुरूपरंपरा ।
श्रीभगवद्गीतेसी करूनि नमस्कारा ।
लोपविण्या अज्ञानाच्या अंधारा ।
ज्ञान मार्तंड उगवला ॥१॥
चार दिवसांची उजळणी ।
विस्मृतीच्या कुंभास झळाळी ।
ज्ञानामृत पाजण्यास चंद्रमौळी ।
अमृतकुंभ घेऊन उभा ॥२॥
आरंभी योगाची महती ।
ज्ञानगुरू भक्तांस सांगती ।
परमात्म्याशी संबंधीत कृती ।
तीस योग म्हणती ॥३॥
कालच्या कायिक तपानंतर ।
आज वाणीच्या तपावर ।
सविस्तर विवेचन ज्ञानगुरूवर ।
सोदाहरण करीतसे ॥४॥
वाणीचे महत्व अपार ।
मानवाचा सर्वोत्तम अलंकार ।
मनुष्याबद्दलची धारणा वाणीनुसार ।
सदैव होतसे ॥५॥
प्राणियांस दिधला ध्वनी ।
मानवास दिधली वाणी ।
दिधला विशेष गुणी ।
केवळ मानुष्यास ॥६॥
जिव्हा जैसी कर्मेंद्रिय ।
तैसीच ती ज्ञानेंद्रिय ।
सर्व सुखाची सोय ।
तपविता वाणीसी ॥७॥
वाणीनेच पोपट राही पिंज-यात ।
मौनी बगळा स्वच्छंदे विहरत ।
वाणीस ठेवणे सदैव अनुशासनात ।
तप दिव्य वाणीचे ॥८॥
वाणीने महाभारत घडले ।
वाणीनेच रामायण घडले ।
वाणीनेच घडले बिघडले ।
सांगतसे ज्ञानराजा ॥९॥
पुढे सांखे संवादातील भेदाभेद ।
उत्तम संवाद, मध्यम संवाद ।
अधम संवाद आणि निंदापवाद ।
स्पष्टीकरण समस्ताचे ॥१०॥
जे दुसऱ्यास न दुखवेन ।
प्रिय हितकारक यथार्थ भाषण ।
प्रभुचे नाम, वेदशास्त्रांचे पठण ।
हेच तप वाणीचे ॥११॥
कायिक तप सहज साधेन ।
वाचिक तप त्याहून कठीण ।
मानसिक तप सर्वांत कठीण ।
महत्व मानसिक तपाचे ॥१२॥
माकडाची उपमा मनास देऊनि ।
चंचलता स्वभाव सांगे समजावूनि ।
मनाच्या अंकित काया, वाणी ।
मनास ठेवावे काबूत ॥१३॥
मनाची प्रसन्नता, शांत भाव ।
अखंड प्रभु चिंतण्याचा स्वभाव ।
मनाचा निग्रह, अंतरीचा पवित्रभाव ।
हेच तप मनाचे ॥१४॥
फळाची इच्छा न करता ।
योगी करिती सश्रद्धा अत्यंता ।
सात्त्विक तप तयासीच म्हणता ।
जाणावे सुजना ॥१५॥
मानसन्मान पूजा, सत्कारासाठी ।
पाखंडीपणाने करिती स्वर्थासाठी ।
अनिश्चित, क्षणिकफळ ज्याचे पोटी ।
तप राजस ते ॥१६॥
मूर्खतापूर्वक हट्टाने तप करून
मन, वाणी, शरीरास कष्ट देऊन
अथवा दुसऱ्यांचे अनिष्ट साधून
केलेले तप तामस ॥१७॥
Recent Comments