न मिळे अशी मौज पुन्हा

यंदाची दत्तजयंती अनेक दृष्टीने वैभवसंपन्न ठरली. रंगीत इंद्रधनुष्य ठायी ठायी वैभव संपन्न होत होती. आनंद आणि ज्ञानाचा राजमार्ग क्षणोक्षणी श्री ज्ञानराज प्रभु शब्दांकित करत होते. देवळातून कृपा प्राप्त होते पण ज्ञान सजीव गुरूच देऊ शकतो असे ठाम प्रतिपादन करीत प्रत्येकाची बॅटरी चार्ज करण्याकरिता गुरुच आवश्यक असतो असा बोधक संदेश देत आध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. आणि श्रवण, मनन निदिध्यस हा त्रिसूत्री फार्मूलाच मोक्षप्राप्ती करून देतो असे ठामपणे सांगीतले.

या दत्तजयंती चे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे चैतन्यराज प्रभुंचे माणिक प्रभु चरित्रावर विश्लेषक प्रवचन आणि त्यास पद्यमालातील पदांचे समर्पक विश्लेषण ची जोड देत श्रोत्यांना परम आनंदाची अनुभूती देत होती. चैतन्यराज यांचे संगीतमय प्रबोधन ऐकताना एक आठवण आली ती मुद्दाम येथे सांगू इच्छितो. मार्तंड प्रभु जेव्हा एखादे पद लिहून झाले की ते पद कोणाला तरी प्रथम ऐकवावे या हेतूने कोणाला तरी ऐकण्यासाठी बोलवावे तर तसा सेवक मिळत नसे असे वारंवार घडत असे त्या वेळी मार्तंड प्रभु म्हणत की काय हे लोक एकालाही यातला गोडवा कळत नाही सगळेच अगदी सारखेच आहेत असे म्हणत. पण आज चैतन्यराज, मार्तंड प्रभुंचे पदांचा संदर्भ देत प्रभु चरित्र सांगत आहेत हे पाहून मार्तंड प्रभुंच्या मनात आणि माणिक प्रभुंच्या मनात चैतन्यराजां विषयी काय भावना झाल्या असतील असं नुसतं मनात आलं तरी आपलं मन एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. चैतन्यराज प्रभुंचा प्रवचन ऐकून हेच मला जाणवलं. या सगळ्या बाबी विचारात घेऊन पदांचा संदर्भ समजून घेत प्रभु चरित्र श्रवण मनन आणि निदिध्यस द्वारे समजून घेतलं तर प्रत्येक पद आपणाशी बोलके होईल हाच संदेश चैतन्यराजांच्या प्रवचनाच्या माध्यमातून मिळाला.

देवलोकातील स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी दत्त जयंती – असेच वर्णन यावेळी करावे लागेल.
बस इतकेच लिहून विराम घेतो की – न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा!!

शरणागती

श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.

ज्ञानराज प्रभूंची ज्ञानगंगा

संतांचं स्वभाव इतकं उदार आणि दयाळू असतं, की समोर आलेल्याला ते कधीच रिकामा पठवत नसतात. त्यांच्या कडून आपल्याला काही न काही अवश्य मिळतं. मग तो भक्त असो, शिष्य असो, याचक असो, विद्यार्थी असो किंवा जिज्ञासू असो. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांच्या समोर अनेकांना ही प्रचीती आली आहे. समोरच्या व्यक्तीची योग्यता आणि गरज़ेला पाहूण यथायोग्यरीत्या त्याचा समाधान व्हावा असं काही तरी त्याला देण्याचा महाराजांचा कटाक्ष असतो. आज आपण बघतो की कित्येक लोक महाराजांजवळ येतात आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रेरित होतात. शेवटी, सद्गुरूंचे मुख्य कार्य हेच होय. गेल्या १५० वर्षांची परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. या परंपरेचे सर्व आचार्यांनी आपपल्या विशिष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अत्यंत समर्थपणे केलेले आहे, हे सर्व विदित आहे परंतू श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेत प्रवचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या भवसागरातून तारण्याचे श्रेय श्री ज्ञानराज प्रभूंनाच आहे. ‘ज्ञानगंगेत’ भिजून संतृप्त होण्याचा भाग्य आमच्या सारख्या सामान्य माणसाला मिळत आहे, हे आपल्या पूर्व सुकृताचेच फळ होय. विराट रुपाच्या दर्शनाने अर्जुनाला जसा बोध झाला तसेच महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून कायेने, वाणीने आणि मनाने आम्ही सुद्धा सन्मार्गाकडे प्रवृत्त होवोत, श्री ज्ञानराज प्रभूंच्या चरणी हीच प्रार्थना.

श्री सिद्धराज प्रभु आणि अमीन सयानी

श्री सिद्धराज माणिकप्रभु आणि त्यांचा सिंधिया स्कूल मित्रपरिवार हा नेहमीच माझ्यासाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. त्यात मला जास्त आकर्षण होते ते अमीन सयानी यांचे. सुप्रसिद्ध बिनाका गीतमालेचे होस्ट अमीन सयानी हे श्रीजींचे सिंधिया स्कूल मधील मित्र होते. एकदा बोलण्याच्या ओघात श्रीजींकडून अमीन सयानींचा उल्लेख होताच मी मुंबईत त्यांची भेट घेण्याचे ठरविले व श्रीजींकडून परवानगी घेतली. मुंबईत आल्यावर रीगल सिनेमाचे इमारतीतील ऑफीसमधे अमीन सयानींना भेटावयास गेलो. श्रीजींकडून आलो असे सांगताच ‘‘कैसे हैं हमारे सिद्धराज?’’ असं त्यानी विचारलं.  मी ‘‘श्रीजी ठीक हैं और आपकी हमेशा याद करते हैं’’ असे म्हणताच त्यांनी पुन्हा मला ‘श्रीजी’ म्हणावयास लावले आणि ‘‘कितना अच्छा संबोधन है’’ असे म्हटले. त्यावर ‘‘We devotees respectfully and lovingly call him SHREEJI’’ असे म्हणताच त्यांचा नूरच बदलून गेला. ‘‘आमच्या बॅचमधे अतिशय साधे सरळ प्रेमळ असे सिद्धराज होते, त्यांचे ठायी वास करीत असलेल्या देवत्वाविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना होती’’ असे त्यांनी सांगितले. अमीन सयानीं बरोबर बोलताना ते आपल्या शालेय सहकारी बद्दल बोलत आहेत की एका श्रद्धेय सत्पुरुषाबद्दल तेच कळत नव्हते.

सन् १९४९ साली श्रीजींना वयाच्या दहाव्या वर्षी घरापासून १५०० की. मी. दूर असलेल्या ग्वालियरच्या सुप्रसिद्ध सिंधिया स्कूल येथे शालेय शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. लौकरच आपल्या शांत, कर्तव्यदक्ष व विनयशील स्वभावाने श्रीजींनी आपल्या मित्रपरिवाराची व अध्यापकवर्गाची मनं जिंकून घेतली. श्रींजीचे आपल्या शाळेवरील उत्कट प्रेमाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधिया स्कूलच्या प्रेरणेने माणिकनगर येथे स्थापित केलेले माणिक पब्लिक स्कूल. श्रीजी नेहमी चर्चेत सिंधिया स्कूलच्या आपल्या मित्रपरिवाराबद्दल आत्मीयतेने सांगत व शाळेतील त्यांच्या स्वर्णिम स्मृतींना उजाळा देत. ४०-५० वर्षानंतरही श्रीजींच्या ६०व्या जन्मदिवसाचे आयोजन जेव्हां माणिक पब्लिक स्कूल येथे करण्याचे ठरले तेव्हां अमीन सयानी आणि त्यांचे सिंधिया स्कूलचे मित्र केवळ श्रीजींना भेटण्यासाठी देशाच्या कोन्याकोन्यातून व विदेशातूनही माणिकनगरला आले होते.

धन्य ते श्रीजी व त्यांचे शालेय मित्र!