वेदांत सप्ताह भाग दुसरा

आज अगदी भल्या पहाटेच जाग आली. एखाद्या गोष्टीबद्दल मन आतुर असले की आपले अंतर्मन जागृत असते. सकाळी सहाचा गजर लावला होता पण सव्वा पाचलाच  जाग आली. किंबहुना बहुतेक यात्री निवास जागा झाला होता. सहाच्या ठोक्याला चहा आला. जय गुरु माणिकच्या गजरात एकमेकांशी सुप्रभात झाले. अनेक गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या. गरम गरम चहाचे घुटके घेत ह्या चर्चा खमंग वाटत होत्या. एखाद्या विषयावर वेगवेगळ्या लोकांची अनेकविध मते ऐकतानासमाजातील अनेक कांगोरे अनुभवता येतात. प्रत्येकाच्या मताला एक विशिष्ट बाजू असते. शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून हे ऐकणं हा ही एक वेगळा अनुभव होता. प्रात:पान हा चहासाठीचा एक वेगळा शब्द माझ्या शब्दकोशात मिश्कील स्वभावाच्या श्री प्रमोद जोशींमुळे जोडला गेला. स्नानासाठी सगळ्यांची गडबड उडून गेली होती. गरम पाण्याची मुबलक व्यवस्था श्री संस्थानातर्फे करण्यात आली होती. स्नानानंतर काहीजण छतावर जाऊन संध्या करण्यात व्यस्त होते तर काहीजण योग, ध्यान ह्यात मग्न होते. एकंदरीत दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात होत होती. स्नानादि कार्यक्रम उरकून श्री माणिक विहारात नाश्त्यासाठी गेलो. सुशीला नामक कुरमुऱ्याचा पोह्यासारखा पदार्थ आणि चहा आज नाश्त्याला होता. येथे पारायण काळात सर्वांनी नाश्ता करूनच पारायणास बसावे असा श्रीजींचा आग्रह असतो. कारण पारायणानंतर श्रीजींचे वेदांतावर निरूपण असते ते कधीकधी दुपारी दीडदोन पर्यंत चालते. त्यामुळे इतका वेळ कुणाला उपवास घडू नये, भुकेमुळे त्रास होऊ नये ह्यासाठी श्री संस्थान अतिशय दक्ष असतं.

आजपासून (२०.०३.२०२२) वेदांत सप्ताह सुरू होत होता. श्रीप्रभुगादीचे चतुर्थ आचार्य श्रीशंकर माणिकप्रभुंची आज पुण्यतिथी. सकाळी श्रीप्रभुमंदिरात श्रीभागवताचे पारायण, औदुंबराखाली श्री गुरुचरित्र आणि श्री माणिकचरित्रामृताचे पारायण, दुपारी बारा वाजता श्रीजींचे वेदांतावर व्याख्यान, सायंकाळी चार वाजता  श्रीशंकर माणिकप्रभु आराधना, संध्याकाळी साडेसहा वाजता कोल, रात्री आठसाडेआठला श्रीजींचे पुन्हा प्रवचन आणि त्याच्यानंतर सप्ताह  भजनातील आजचे, रविवारचे भजन, असा भरगच्च कार्यक्रम होता.

श्रीप्रभु मंदिराच्या आवारात एकच लगबग चालली होती. ब्रह्मवृंद श्रीप्रभु समाधीस मंगल स्नान घालून सजवीत होता. श्रीप्रभुसमाधीच्या बाहेर उजव्या कोपर्‍यात भागवताचे वाचन सकाळीच प्रारंभ झालेले होते.

लेखमालेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच श्रीप्रभु संप्रदायाच्या उपासनेचा रथ हा ज्ञान आणि भक्ती ह्या दोन चाकावर चालत असल्याचे जाणून श्री मार्तंडमाणिक प्रभुंनी भक्तीशास्त्रात अंतिम प्रमाण म्हणून स्वीकारल्या गेलेल्या श्रीभागवत या ग्रंथाचा सप्ताह यज्ञ श्री संस्थानात करण्याचे ठरवून सन १९०० च्या अधिक आषाढ महिन्यात प्रथम भागवत सप्ताह साजरा केला. पुढे १९३६ साली श्रीमार्तंड माणिकप्रभूंच्या महासमाधी नंतर श्रीशंकर माणिकप्रभु महाराज पीठारूढ झाले आणि त्यांनीच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास शेवटच्या दिवशी निघणाऱ्या दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली ती अद्यापही चालू आहे. श्रीशंकर माणिकप्रभुंच्या कारकिर्दीतच वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन मासात ( श्रीमार्तड माणिकप्रभु महाराजांच्या आराधनेला जोडून) साजरा होऊ लागला जो आजतागायत चालू आहे. अशा ह्या वेदांत सप्ताहास शंभर ते सव्वाशे वर्षाची वैभवशाली परंपरा आहे.

सकाळी नऊच्या सुमारास सर्वांनी श्रीप्रभुमंदिराच्या लगत असलेल्या औदुंबराखाली पारायणासाठी जमावे, असे सर्वांना सूचित करण्यात आले होते. पारायणासाठी अत्यंत आकर्षक मंडप घातला होता. पारायणासाठी सिद्ध झालेल्या अनेक आस्तिक महाजनांनी आपापले आसन मांडले. साधारणतः दीडशैच्या आसपास स्त्रीपुरुष श्रीगुरुचरित्र किंवा श्रीमाणिकप्रभु चरितामृत पारायणासाठी सिद्ध झाले होते. श्रीप्रभु मंदिरातर्फे सर्व पारायण करणाऱ्यांसाठी एकत्रित संकल्प करण्यात आला. त्यानंतर साडे अकरा पर्यंत प्रत्येकाने आपापले पारायण संपवावे असे अपेक्षित होते. येथेही प्रत्येकाच्या वयाचा विचार करून, पारायणाची गती लक्षात घेऊन, अडीच तास एका दिवसाच्या वाचनासाठी दिले होते. पहिल्या दिवसाच्या पारायणानंतर सामुदायिक आरती झाली. हुमनाबादच्या श्री. राजू दुबे नामक एका सद्भक्ताने सर्व पारायणकर्त्यांसाठी अगदी आठवडाभर विनामुल्य पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली होती. तसेच वाचन करताना अगरबत्तीही उपलब्ध करून दिली होती. दुबेजींचा संपूर्ण परीवार ह्या सेवाकार्यात सहभागी होता. श्रीप्रभु सेवेसाठी कोणाला, कशी प्रेरणा करतो हे समजण्याच्या पलीकडले आहे. आपण साक्षीपणे केवळ अनुभवायचे असते.

तिकडे सकाळी मुक्तीमंटपातील श्रीशंकर माणिकप्रभुंच्या महापूजेनंतर श्रीजींसहीत भक्त श्रीचैतन्यलिंगासमोर येतात. श्रीचैतन्यलिंगासमोर सर्व वाद्ये, वीणा, मार्तंड प्रभूंची तसबीर . सजवून ठेवलेले असतात. श्रीजी प्रथम श्रीसरस्वती पूजन संपन्न करतात सप्ताह प्रारंभ निमित्त विशेष आरत्या म्हटल्यावर आरतीसोहळा पार पडतो. त्यानंतर  श्री माणिक जय माणिक हा गजर सुरू होतो श्रीजी श्रीसंस्थानच्या मुख्य भजनकर्त्याच्या (श्री. राजेश गिरी, जे वर्षभर प्रभुमंदिरात सातवार भजन करतात) कपाळी गुलाल लावून त्यांस वीणा देतात, तसेच मुंबईचे श्री. चौबळ यांना चांदीची छोटी वीणा देतात. श्रीजी स्वतः झांज घेऊन श्री माणिक जय माणिक भजन सुरू करतात वेदांत सप्ताहची सुरुवात होते. मुख्य भजनकर्त्याला सुपूर्द केलेली वीणा मुक्तिमंटपाला एक प्रदक्षिणा घालून, भजनघोषात प्रभुमंदिरात जाते तेथे अखंड वीणेला प्रारंभ होतो. संपूर्ण वेदांत सप्ताहात ही वीणा श्रीप्रभु नामसंकीर्तनात दिवसरात्र अखंड झंकारत राहते. श्री. चौबळांना  दिलेली चांदीची छोटी वीणा श्रीप्रभु मंदिरात जेथे श्रीभागवत सुरू असते, तेथे वर स्थापित केलेली राहते. सकाळचे श्रीभागवताचे वाचन, जोडीला श्रीगुरुचरित्र आणि श्रीप्रभु चरित्राचे पारायण आणि वीणेचे अखंड नामसंकीर्तन ह्याने प्रभू मंदिरातले वातावरण मंगलमय असते. चैतन्याचा दिव्य अनुभव येथल्या भारलेल्या वातावरणात आपण पदोपदी अनुभवू शकतो. श्रीप्रभुचरित्राचे पारायण श्रीप्रभुच्याच साक्षीने, श्रीप्रभुच्याच संजीवन समाधी समोर, ज्या औदुंबर वृक्षाखाली श्रीप्रभु त्यांच्या काळात बसायचे, त्याच वृक्षाखाली व्हावे, ह्यासारखा धन्यतेचा क्षण आपल्या जीवनात आणखी काय असू शकतो ? पारायण काळात आपली त्या त्या चरित्र नायकाशी एक विशिष्ट प्रकारची नाळ जुळत असते. पहिल्या दिवसाच्या पारायणात श्रीप्रभूंच्या बाललीला वाचून श्रीप्रभुशी नाळ जुळायला सुरुवात झाली. यथावकाश वाचन संपवून श्रीप्रभू समाधी समोर जाऊन कृतज्ञता व्यक्त केली. फुलापानांच्या आणि दागिन्यांच्या दिव्य साजात श्रीप्रभु अधिकच मोहक दिसत होता. श्री प्रभू समाधीस प्रदक्षिणा घालून स्वतःला ऊर्जावान (चार्ज) करून घेतले. कैलास मंटपात एका ज्येष्ठ सद्भक्ताकडे लक्ष गेले. नवी मुंबईच्या सौ. करमरकर काकू श्रीप्रभुचरित्र पारायण करीत होत्या. प्रत्येक दिवसाला दोन, अशाप्रकारे सलग १०८ पारायणांचा त्यांचा संकल्प होता. लगेचच मनात दिवसांची आकडेमोड झाली आणि त्या मातेच्या समोर नतमस्तक झालो. पारायणानंतर आता श्रीजींच्या प्रवचनाची उत्सुकता होती.

भंडारखान्याच्या बाजूला असलेल्या श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाआधी सर्वांना एक ग्लास थंडगार मसाला ताक देण्यात आले. स्त्रियांना पुरुषांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, मधोमध श्रीजींचे व्यासपीठ, पाठीमागे श्रीमाणिकनगर संस्थानाचा श्रीप्रभु मंदिराच्या कळसाचे चित्र असलेला सुंदर फलक मन वेधून घेत होता. वातानुकूलित हॉल, बाहेरच्या दुपारच्या गरमीपासून शरीरास छान थंड करत होता. सर्वांना एकएक वही आणि पेन देण्यात आला. ध्वनी व्यवस्थाही अद्ययावत होती. गीतेच्या सतराव्या अध्यायाची एक एक प्रतही सर्वांना दिली गेली. सर्व आयोजनामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसूत्रता होती. येणाऱ्या सर्व आस्तिक महाजनांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी श्री संस्थानाने घेतली होती.

माध्यान्हीच्या सुमारास श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात, मंगल वाद्यांच्या कडकडाटात श्रीजींचे थाटात आगमन झाले. श्रीजींनी सर्वांस स्थानापन्न होण्यास सांगितले. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये श्रीचैतन्यराज प्रभूंनी वेदांत सप्ताहाचा गौरवशाली इतिहास आणि उद्देश सांगितला. ह्या वेळच्या ज्ञानप्रबोध वेदांत सप्ताहात श्रीमद्भगवतगीतेतल्या १७व्या अध्यायाच्या अर्थात् श्रद्धात्रयविभागयोगाच्या अमृतपानाचा लाभ भक्तांना श्रीजींच्या दिव्य वाणीतून होणार होता. ह्या अध्यायात २८ श्लोक आहेत. दिवसाला साधारण चार श्लोक असा ठोकताळा मी मनाशी बांधला होता. पण इमारत जर मजबूत हवी तर तिचा पाया मजबूत असायलाच हवा. एखादा विषय समोरच्याला पूर्णपणे समजावा आणि तो कसा समजेल, ह्याकडे श्रीजींचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज केवळ अर्जुनाने केलेल्या प्रश्नाला श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तराच्या पहिल्या श्लोकानेच आजच्या दिवसाची सांगता झाली. आज पहिल्या दोनच श्लोकांचा ऊहापोह सव्वादीड तासाच्या विवेचनात झाला. वेद या शब्दाची उत्पत्ती, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचा आढावा, गीता जेथे सांगितली गेली त्या कुरुक्षेत्राचे महत्व, गीतेतील प्रथम मध्यम आणि चरम षटकाची महती, सोळाव्या आणि सतराव्या अध्यायाची पूर्वपीठिका, ज्ञानप्राप्तीसाठीच्या योग्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या जीवनशैलीची महती सतराव्या अध्यायात कशी सांगितली गेली आहे हे विस्तारपूर्वक साधारणतः तासाभराच्या आढाव्यात श्रीजींनी सांगितले. प्रसंगाच्या अनुषंगाने, वेदांतासारख्या क्लीष्ट आणि कधीकधी सामान्यजनांना नीरस वाटणाऱ्या विषयाला, आपल्या रोजच्या जीवनातील साधी सोपी उदाहरणे देऊन किंवा पुराण कथांमधील दाखले देऊन तो विषय सहज सोपा करण्याची श्रीजींची हातोटी विलक्षण आहे. आणि याचमुळे प्रवचनातला उपस्थित प्रत्येक जण श्रीजींशी एकरुपतेने जोडला जातो. प्रसंगी अनेक प्रश्न विचारून श्रोत्यांना विषयाला धरून ठेवण्याची श्रीजींची खूबीही एकमेवाद्वितीय आहे. हे विवेचन श्रीजींच्या समोर बसून, त्यांच्याच मुखातून पाझरणाऱ्या दिव्य वाणीतून ऐकणे सुखद, अविस्मरणीय आहे आणि म्हणूनच हा सोहळा आगळा आहे, वेगळा आहे.

जे लोक शास्त्र विधींचे उल्लंघन करतात, पण त्यांच्या अंतरात श्रद्धा आहे अशा लोकांची निष्ठा कशी असते ह्या अर्जुनाने विचारलेल्या सुरुवातीच्या प्रश्नाला देहात जी स्वभाव जात श्रद्धा असते ती सात्विक राजसिक आणि तामसिक प्रकारची असते ती तू माझ्याकडून ऐक ह्या श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तरावर आजच्या दिवसाच्या निरुपणाचा डोलारा सांभाळला होता. प्रवचनानंतर ज्या भक्तांना जायचे होते त्यांना प्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासात आलो. एव्हाना तीन वाजले होते.

सायंकाळी चार वाजता मुक्तीमंटपात श्रीशंकर माणिकप्रभु पुण्यतिथी निमित्त आराधनादि कार्यक्रम पार पडले. श्रीजींचा पूर्ण परिवार ह्या कार्यक्रमाला उपस्थित होता. ब्राह्मणभोजन, दक्षिणा, भजन पार पडल्यावर सर्व भाविकांना तीर्थप्रसाद वाटण्यात आला.संध्याकाळी सातच्या सुमारास श्रीप्रभुमंदिरासमोरील पटांगणात बालगोपाळांचा रासक्रीडा रंगला. आज आज पहिला दिवस असल्यामुळे बालगोपाळांची उपस्थिती थोडीशी कमी होती. बालगोपाळांची ही रासक्रीडा, ज्याला श्रीमार्तंड माणिकप्रभुंनी कोल असे नाव दिले आहे. हातामध्ये दांडिया सारख्या टिपऱ्या घेऊन श्रीप्रभुपदांच्या तालावर एका विशिष्ट पद्धतीने वर्तुळाकार फेर धरून नाचणे म्हणजे कोल खेळणे. हा कोल खेळण्याने शरीरातील मनातील कठीण ग्रंथीही आपोआप खोलल्या जातात, अशी मान्यता आहे. श्री भागवत सप्ताहात रासक्रीडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला अनुसरूनच कोलचा समावेश ह्या वेदांत सप्ताहात केला गेला आहे.

सायंकाळी आठच्या सुमारास महाप्रसाद घेऊन पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो. आता उत्कंठा होती ती श्रीजींच्या प्रवचनाची. भजनासाठी आनंद मंडप सुंदर सजला होता. मध्यभागी श्रीजींसाठी छानशी गादी घातली होती. दोन्ही बाजूला वाद्यवृदांसाठी बसण्याची आणि माईकची व्यवस्था करण्यात आली होती. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे येणे अपेक्षित होते. त्याआधी माणिक नगरातले तरुण भक्तीभावाने प्रभुपदे म्हणत होते. साधारणतः साडेआठच्या सुमारास दिवट्यांच्या प्रकाशात, संबळाच्या कडकडाटात, श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे दिमाखात श्रीप्रभुमंदिरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होऊन श्रीजी आनंद मंडपात श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात गादीपाशी आले. श्रीजींच्या बसण्याची व्यवस्था श्रीप्रभुसमाधीच्या अगदी समोर असते. डोक्यावर टोपी, हातामध्ये काठी अशी श्रीजींची अनिमिष नेत्रांनी साठवलेली रुबाबदार छबी आपल्या हृदयात कायम कोरलेली राहते.

सुरुवातीच्या संबोधनात श्रीजींनी संपूर्ण सप्ताहभर प्रवचनासाठी सप्ताह भजनातले, त्यात्या वाराचे गुरुभक्तीपर जे दुसरे पद आहे त्याचे निरूपण करण्याचा मानस व्यक्त केला. आज रविवार असल्यामुळे गुरुविण तूज गती नाही समज मुढाह्या श्रीमाणिक प्रभुंच्या, वरवर, अगदी सहज वाटणाऱ्या पदावर, अत्यंत सम्यक आणि प्रत्येक शब्दाची विस्तृत फोड करणारे विवेचन केले. अगदी छोट्याशा पदांमध्ये किती गहन अर्थ दडला आहे, हे समजून घेताना आपल्या डोळ्यात श्रीप्रभुप्रती कृतज्ञता दाटून येते. तीन कडवी असलेल्या ह्या पदावरचे विवेचन साधारण तासभर चालले ह्यावरुन श्रीजींची अध्यात्मावर असलेली पकड आणि ते इतरांस सहज समजेल, अशा पद्धतीने समजवून सांगण्याची पद्धत पाहून आपला श्रीजींप्रती असलेला आदर अधिकच दुणावतो. श्रीगणेशवंदनेनंतर सुरु झालेले भजन संपले तेव्हा घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या बाराकडे झुकले होते. भजनाच्या समाप्तीनंतर सर्वांना भंडार लावून खोबरंकुरमुऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला. सप्ताह भजनानंतर बाजूच्या गावातले रात्री भजन होते. भजनीमंडळ प्रमुखाला श्रीजींनी शाल पांघरून आशीर्वाद दिला. भजन समाप्तीनंतर श्रीजी आपल्या निवासस्थानी परतत असताना, सर्वजण उभे राहून जेव्हा कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा हे पद म्हणतात, तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. चैतन्याचा हा सुख सोहळा अनुभवून यात्रीनिवासात परतण्यासाठी महाद्वारापाशी आलो. श्रीसंस्थानाने ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांना निवास स्थानापर्यंत पोचवण्यासाठी रात्री बारा वाजताही बसची व्यवस्था केली होती. का कुणास ठाऊक श्रीप्रभुला परत पाहावेसे वाटले म्हणून पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो. वेदांत सप्ताहात श्रीप्रभु अखंड जागा असतो. आम्ही झोपायला जात असताना गावकऱ्यांचे रात्री भजन ऐकावयास श्रीप्रभु आतुर झाला होता आणि अखंड वीणेची तार माणिक माणिक झंकारत होती

क्रमशः

वेदांत सप्ताह भाग पहिला

ज्ञान आणि भक्तीचा अनुपम संगम अशी दिगंत कीर्ती असणाऱ्या श्रीमाणिकनगरच्या वेदांत सप्ताहाचे ह्यावेळेस सदेह साक्षीदार व्हायचे, अशी खूणगाठ दत्तजयंतीच्या वेळीसच मनात बांधली होती. श्रीप्रभु समाधी समोर तशी सविनय याचनाच केली होती. नोकरीच्या ठिकाणी आठवडाभर सुट्टीचे सोपस्कार श्रीप्रभुकृपेने विनासायास पार पडले. श्रीप्रभुच्या रंगात रंगून जाण्यासाठी, धुळवडीच्या दिवशीच (१८मार्च २०२२), रात्री मनाच्या प्रफुल्लित अवस्थेत, श्रीमाणिकनगरी जाण्यासाठी कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये पाऊल ठेवले. योगायोगानेच ठाण्याचे श्री. रणदिवे आणि श्री. फणसे कुटुंब सोबतीला होते. श्रीप्रभुंच्या लीलांचे गुणगान करत कलबुर्गीस (आधीचे नाव गुलबर्गा) उतरलो. तेथून यथावकाश हुमणाबाद व पुढे श्रीमाणिकनगरी साधारणपणे सकाळी साडेदहाच्या सुमारास येऊन पोहोचलो. श्रीजी म्हणतात तसे, प्रपंचाचे गाठोडे श्रीमाणिकनगराच्या कमानीबाहेरच ठेऊन दिले. रिक्त मनाने श्रीमाणिकनगरस्थित गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमाप्रमाणेच, ज्ञान आणि भक्तीचा संगम असलेल्या वेदांत सप्ताहाच्या खळखळणा-या प्रवाहात यथेच्छ डुंबण्यास आतूर झालो. तसे पाहता, ज्ञान आणि भक्तीची ही सरीता श्रीमाणिकनगरी नित्य प्रवाहित होत असते, पण वेदांत सप्ताहाच्या वेळी ती दुथडी भरुन वाहत असते. जिज्ञासूंनी येथे मनसोक्त डुंबावे, आपली अज्ञानाची घागर रीती करून ज्ञान जलाने ती भरूभरुन घ्यावी. अखंड ज्ञानदान हे श्रीमाणिकनगर संस्थानाचे परमविशेष आहे.

महाराष्ट्रातील उकाड्याने त्रस्त झालो होतो पण, येथील वातावरण सुखद होते. मोरांचे केकारव ऐकून माझ्याही मनाचा पिसारा अत्यानंदाने फुलत होता. अनेक माकडेही आनंदाने इकडून तिकडे उगाचच उड्या मारत होती. जणू ती मला माझ्या मनाच्या चंचलतेचीच जाणिव करुन देत होती. माणिकविहारच्या दर्शनी भागातच, सर्व आस्तिक महाजनांचे स्वागत करणारा फलक मन वेधून घेत होता. माणिकविहारच्या काऊंटरवर राहाण्याच्या व्यवस्थेबद्दल चौकशी केली असता, ती यात्री निवासमध्ये असल्याचे कळले. येथील यात्रीव्यवस्था नेहमीच चोख असते. वेदांत सप्ताहाच्या सुमारे तीन आठवडे आधी श्रीचैतन्यराज प्रभुंनी फोन करून कधी, कोण, किती जण येणार? पारायणास बसणार ना? वैगरे चौकशी केली होतीच. काटेकोर नियोजनाचे सुंदर प्रतीबिंबच एकंदर व्यवस्थापनेतून सर्वत्र दिसून येत होते. यात्री निवासात एका खोलीत पाच जणांच्या रहाण्याची व्यवस्था केली होती. गाद्यांवर अंथरलेल्या चादरी स्वच्छ (शुभ्र) होत्या. पिण्याच्या पाण्याचे भरपूर कॅन्स भरून ठेवले होते. आंघोळीसाठी गरम पाणी एका मोठ्या भांड्यात उकळत होते. भक्तांच्या सोयीसाठी चोवीस तास एक मदतनीस व एक सफाई कामगार अगदी शेवटच्या दिवसापर्यंत होते. “अतिथी देवो भव” हे वाक्य श्रीसंस्थानातील प्रत्येक जण येथे नित्य जगत असतो. “सर्व रुपे हा श्री प्रभु जाण” ह्या महावाक्याचे संस्करण श्रीमाणिकनगरातल्या प्रत्येक सेवकांवर झालेले आपणांस पदोपदी अनुभवायास येते. वेदांत सप्ताहात श्रीगुरुचरित्र तसेच श्रीमाणिक प्रभु चरितामृताचे पारायण असल्यामुळे अनेक दत्तभक्तांची मांदियाळीच येथे जमली होती. बहुतेक ज्येष्ठ नागरिक होते पण, प्रत्येकात सळसळता उत्साह होता. पारायणासाठी आलेल्या, नव्वदीच्या घरात असलेल्या, काणेमामांना पाहताच, श्रीप्रभु कुणास, कशी प्रेरणा देतो, हे पाहून स्तिमीत व्हायला होत होते. जणू काही इतक्या तरूणांत मी एकटाच म्हातारा होतो. असो…सामान झटकन लावून, स्नानादी कर्मे आटपून, पुढच्या वीस मिनिटांत श्रीप्रभु मंदिराच्या वाटेवर चालूही लागलो. श्रीमाणिकनगरीच्या कमानीतून प्रवेश करताच श्रीप्रभुभेटीची तीव्र ओढ आपल्याला स्वस्थ बसू देतच नाही.

गुरुगंगेच्या प्रवाहात अनेक बदके विहरत होती. मागच्या वेळी आलो होतो त्यापेक्षा आज खूपच जास्त होती. माकडे, मोर, बदके, वटवाघळे अशा अनेक पशूपक्ष्यांनाही श्रीमाणिकनगर हे जणू काही आपले हक्काचे घरच वाटत असावे. पुलावरून पुढे सिंहद्वारातून श्रीप्रभु मंदिराच्या मुख्य पटांगणात आलो. प्रवेशद्वारावर भगवे झेंडे डौलाने फडकत होते. आनंद मंटप, कैलास मंटप ओलांडून श्रीप्रभु समाधीसमोर कधी उभा राहिलो ते माझे मलाच कळले नाही. वस्त्रांच्या मनमोहक रंगसंगतीत, फुलांच्या नयनरम्य साजात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करून डोळेभरून त्यास पाहिले. परस्पर भेटीचा आनंद अनुभवला. श्रीप्रभुमंदिर परीसरातील श्री सर्वेश्वर महादेव, औदुंबर, श्रीदत्तात्रेय, भरोसाची समाधी आणि श्रीमनोहर माणिकप्रभु समाधी, जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असणारे सटक्यांचा कक्ष आणि श्रीमुख्यप्राण मारुतीचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीप्रभुमंदिरास प्रदक्षिणा घालून शरीरास व मनास ऊर्जावान (चार्ज) केले. इथली सकारात्मक ऊर्जा आणि स्पंदनं आपल्या चित्तवृत्तीला क्षणार्धात प्रफुल्लित करतात आणि मन अंतर्बाह्य शांततेचा अनुभव करू लागतं. थोडावेळ श्रीप्रभुशी मौन संवाद साधून मुक्तिमंटपात श्रीमार्तंड माणिकप्रभु, चैतन्यलिंग आणि श्रीशंकर माणिकप्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढे नव्याने बांधलेल्या श्रीसिद्धराज माणिकप्रभुंच्या समाधी समोर नतमस्तक झालो. नंतर श्रीजींच्या घरी आलो. ओसरीत श्रीजी, श्री आनंदराज, श्रीचैतन्यराज, श्रीचिद्घन प्रभु एकत्रच भेटले. श्रीजींच्या घरी आलेल्या कोणताही प्रभुभक्ताचे अतिशय आत्मियतेने स्वागत केले जाते. तो आनंद आपण श्रीप्रभुपरिवारातील प्रत्येक सदस्याच्या देहबोलीतून सहज टीपू शकतो. असो…श्रीप्रभुमंदिरात दुपारचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासमध्ये परतलो.

एव्हाना खोलीतले इतरजणही आले होते. कोल्हापूरचे साधले, कुलकर्णी, सांगलीचे कुलकर्णी आणि पुण्याचे पेटकरकाका अश्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. दुपारी थोडासा आराम केला. चारच्या सुमारास चहा आला. सर्व जण चहाला जमले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून वेदांत सप्ताहासाठी आलेले. बरेचसे मागच्या पारायणाच्या आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकाचे वेगवेगळे कथाकथन गरमागरम चहाची घोटागणीक लज्जत वाढवत होता. दोन कप चहा घेतला. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. माझ्यासारखा एखाददुसरा पहिल्यांदाच सहभागी होत होता. सकलमत संप्रदायात कुठलाही भेदभाव नाही, ह्याचा पदोपदी अनुभव आपल्याला श्री माणिकनगरात येतो. जय गुरु माणिक हे तीन शब्द एकमेकांना प्रभुप्रेमाच्या एकाच माळेत सहजपणे गुंफतात.

संध्याकाळी पुन्हा प्रभुमंदिरात आलो. क्षितीजावर श्रीप्रभु आपल्या चित्रकलेचं सुंदर प्रदर्शन मांडून बसला होता. मुक्तिमंटपाच्या बाजूलाच असलेल्या औदुंबराखाली बसून, सायंकाळी श्रीप्रभुच्या चैतन्याच्या ह्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होणे मला खूप भावतं. श्रीमाणिकनगरातील अनेक आवडत्या जागांपैकी ही माझी एक आवडती जागा. जीवनात अनेक आनंदाचे क्षण देणाऱ्या श्री प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करताना येथे गहिवरायला होतं, मन आनंदाने उचंबळून येतं. भावनांच्या ह्या कल्लोळात कानांत श्रीमार्तंडप्रभुंची श्रीआनंदराज प्रभुंनी आपल्या सुमधुर सुरांनी सजवलेली पदे गुंजत असतात. धन्य धन्य अती धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद…

दिवेलागणीला भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. भक्तकार्यानंतर सर्व भक्तांना उद्यापासून सुरु होणाऱ्या पारायणासंदर्भात व नंतरच्या आयोजनाबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या गेल्या. तदनंतर प्रभुप्रसाद घेऊन शनिवारच्या भजनात सहभागी झालो. भजनानंतर श्रीप्रभुला निजवून पटांगणात आलो. वेदांत सप्ताहानिमित्त केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे श्रीप्रभुमंदिर परीसर अधिकच शोभायमान दिसत होता. उद्यापासून सुरु होणाऱ्या वेदांत सप्ताहसाठी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. स्वतः श्रीजीही सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून होते. कालच्या प्रवासाच्या शीणामुळे म्हणा किंवा उद्याच्या वेदांत सप्ताहाच्या ओढीने म्हणा, यात्रीनिवासात येऊन स्वत:ला निद्रादेवीच्या हवाली केले….

क्रमशः…

श्रद्धा व मनुष्याचे भौतिक जीवन

दिनांक 20 ते 26 मार्च 2022 पर्यंतच्या वेदांत सप्ताहातील ‘वेदांत शिक्षा वर्गात’ श्रीमद्भगवद्गीतेच्या 17 व्या अध्यायातील ‘श्रद्धात्रय विभाग योग’ या विषयाचे श्रीजींनी सविस्तर रित्या व अत्यंत तळमळीने विश्लेषण करीत – त्याला आपल्या ज्ञानाच्या छन्नी हातोड्याने विशेष पैलू पाडले. गंगेकाठ्च्या श्रीशंकर व माता पार्वतीच्या नाटकीय संवादातून व एका श्रद्धावान भक्तांच्या प्रवेशाचा दृष्टांत देत सात्विक अढळ श्रद्धा ही काय चीज असते हे दाखवून दिले. अर्थात आमच्या सारख्या जडत्वाच्या गाळात फसलेल्यांना तो विषय कितपत समजला हा प्रश्न अलाहिदा! श्रीजींच्या ज्ञान प्रबोधनातून आम्हाला जे काही आकलन झाले ते असे  – मानवी जन्मातील दु:खाने होरपळलेले आपण म्हणतो की ‘‘नरहरीसी निजपद दे नको जन्म दूसरा’’ पण असेही काही लोकांना वाटते की – पंडित लोक म्हणतात त्याप्रमाणे – ‘प्रारब्धच बलवान असते, माणसाचा स्वभाव बदलत नाही,वगैरे वगैरे.’ ते जर खरे तर मग या जन्मातच जे काही नाना खटपटी लटपटी- भानगडी – खोटेनाटे करून आपण सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेच सत्य मानून अशाच पुढच्या जन्मीहि – हे तथाकथित सुंदर जग का नाही उपभोगू? किंवा पुढचा जन्म असो वा नसो किंवा कोणता का व कसा का असेना या जन्मी तरी मिळेल त्या मार्गाने पूर्ण सुख का नाही भोगू? उगाच पुढचा जन्म नको रे बाबा का म्हणू? किंवा या जन्मातच नाना वैकल्ये, नाना उपासना करून घेवून का ताप करू घेऊ? चार्वाक माताप्रमाणे ‘ऋणंकृत्वा घृतं पिबेत्‌’ व्हायचे ते होऊन जावू द्या असा विचार आमच्या सारखे लोक करतात.

यावर श्रीजी म्हणाले, प्रारब्ध बलवत्तर असल्याने याजन्मात नुसता भोग भोगून पुढील जन्म कोणता, कसा याची काय शाश्वती, असे वाटते ना? अशा वेळी पूर्ण श्रद्धेने व तेही सात्विक श्रद्धेने व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने – उपासना केली तरच आत्मज्ञान होते. याजन्मी पुण्य कर्माचे – प्रारब्धाचे भोग भोगून एक नाही दोन नाही तीन नाही तर केंव्हा तरी कुठल्या तरी जन्मात प्रारब्धाचे देणे फिटल्यावर तरी आत्ताच्या जन्मातील सात्विक श्रद्धेने व ईश्वर अर्पण बुद्धीने पाच प्रकारच्या केलेल्या यज्ञ कर्माने – सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील आचरणाने पुढे केंव्हा तरी प्रारब्धाची साखळी तुटून जेंव्हा केवळ पुण्यच  ‘बॅलेंसशीट’ मध्ये जमेच्या बाजूस शिल्लक राहते तेंव्हा तरी पुढची पुनरावृत्ती टळते व आपणास मोक्ष प्राप्त होतो – आपण ब्रम्हस्वरुपास प्राप्त होतो. व तसे होणे केवळ या दुर्लभ अशा मनुष्यजन्मातच शक्य आहे. महत्प्रयासाने व पुण्यकर्मानेच मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतर प्राणी – वनस्पती  व जीवजंतू यांच्या जन्मात पुण्यकर्म वा सात्विक कर्म करणे शक्य नाही. करण त्यांना सदसदविवेकबुद्धी नसते. फक्त मानवालाच ती आहे. म्हणून सात्विक – राजस – तामस यापैकी केवळ सात्विक श्रद्धेचा अंगीकार करीत केवळ सात्विक तप, ज्ञान, आहार व देव, मनुष्य, पित्र, आदि पाच प्रकारच्या यज्ञाच्या व्यवहाराने आपण सद्गुरूंच्या संगतीत दक्षतेने व चातुर्याने विचार करीत शास्त्रविधीनुसार आचरण ठेवले तर व मुख्यतः श्री माणिकप्रभू मानस पूजेत चौथ्या श्लोकाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘‘यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं आराधनं ते प्रभो’’ आपण जे काही करू ते ईश्वरार्पण बुद्धीने केले तर नक्कीच पुढील पुनरावृत्ती टळून आपण मोक्षपदास प्राप्त होवू शकू.

श्रीमद्भगवद्गीतेतल्या बाराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्णाने म्हटले आहेच की  ‘‘मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः।।’’ जे आपले मन भगवंताच्या दृश्य सगुण रूपावर स्थिर करून श्रीपदी अढळ व सात्विक श्रद्धा ठेवतात ते निश्चितच श्री भगवंताच्या स्वरूपास प्राप्त होतात.

ज्ञानप्रबोध भाग सातवा

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सातवा

आधी श्रीगुरूपरंपरेचा जयजयकार ।
नंतर भगवद्गीतेसी नमस्कार ।
गीतायज्ञाच्या पूर्णाहूतीस तयार ।
ज्ञानराजा होतसे ॥१॥

गीता म्हणजेच मधूर गीत ।
परमात्म्याच्या मुखातून उपजले साक्षात ।
वर्णिले अगदी कमीतकमी शब्दांत ।
गीतेस ठासवा हृदयात ॥२॥

कर्माशिवाय नाही भक्तीयोगाची पात्रता ।
भक्तीशिवाय नाही ज्ञानयोगाची योग्यता ।
ज्ञानायोगानेच होई मुक्तीची सिद्धता ।
रहस्य समजावितसे ज्ञानराजा ॥३॥

प्रभुपरमात्मा आहे जरी अरूप ।
उलगडवून दाखवितसे त्याचे स्वरूप ।
रसाळ वाणीने समाधान ज्ञानगुरूभूप ।
करीतसे समस्त भक्तांचे ॥४॥

अरूपातूनच सर्व रूपे साकारतात ।
नाम-रूपात होई परमात्मा सीमित ।
परी प्रभुपरमात्मा तो भेदरहित ।
ॐ तत् सत् नाम जयाचे ॥५॥

वैदिक सिद्धांतांस मानती जे जन ।
शास्त्रसंम्मत तप, यज्ञ आणि दान ।
प्रथम करोनि ॐ काराचे उच्चारण ।
प्रारंभ करीती विधीसी ॥६॥

ॐ हेच सर्व मंत्रांचे आदिबीज ।
ॐकारातूनच सृष्टीचे झाले उपज ।
समजावितसे ॐकारस्वरूप सहज ।
चारी वेदही ॐकाराचे आख्यान ॥७॥

जगताचा अनुभव तीन अवस्थेतून ।
जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतून ।
जीव अनुभवतो त्या त्या जाणिवेतून ।
भेदाभेद निरूपण ॥८॥

विश्व म्हणती जागृतावस्था अभिमानी ।
तैजस म्हणती स्वप्नावस्था अभिमानी ।
प्राज्ञ म्हणती सुषुप्ती अवस्थाभिमानी ।
व्यक्तीगत स्तरावरील अनुभव ॥९॥

अ निघे तो नाभीतून ।
ऊ प्रकटे हा हृदयातून ।
म झंकारे ओठ मिटून ।
ॐकारातच जागृतीस्वप्नसुषुप्ती ॥१०॥

दोन ॐ कारातील शांतीस ।
दोन ॐ कारातील मौनास ।
तुरीया अवस्था म्हणावे तीस ।
तेच परमात्म्याचे स्वरूप ॥११॥

भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।
रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।
दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।
दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥

विष्णू प्रकटे अ मधून ।
शिव प्रकटे ऊ मधून ।
ब्रह्मा प्रकटे म मधून ।
दत्तात्रेय स्वरूप ॐकार ॥१३॥

तत्‌ नावाने परमात्म्यास स्मरून ।
यज्ञ-तप-दान इत्यादि क्रिया करून ।
मनी कुठलीही इच्छा न धरून ।
करीती कर्मे मोक्षार्थी ॥१४॥

वर्तुळात छोटे वर्तुळ काढून ।
छोट्या वर्तुळास जग मानून ।
मोठ्या वर्तुळास परमात्मा समजून ।
तत् स्वरूप समाजावितसे ॥१५॥

जेथे दाखविणे श्रेष्ठत्व ।
आणि परमात्म्याचे अस्तित्व ।
प्रकटीकरण जेथे प्रशस्त ।
सत् शब्दप्रयोग होतसे ॥१६॥

यज्ञ, तप, दानातील स्थिती ।
परमात्म्यासाठी जी कर्मे करती ।
सत् शब्द त्यासच म्हणती ।
जाणावे निश्चये ॥१७॥

शेवटचा श्लोक सतराव्या अध्यायाचा ।
श्रद्धासंबंध उपक्रम आणि उपसंहाराचा ।
आतील मजकूर ह्यातील सामंज्यसाचा ।
उत्तम व्याख्र्यान अध्यायाचे ॥१८॥

श्रद्धेशिवाय केलेले होम हवन ।
तैसेच तप आणि दिलेले दान ।
आणि काही शुभकार्य असेन ।
सर्वही ते असत्‌ ॥१९॥

त्याचे फळ ना इहलोकात ।
ना मिळे परलोकात ।
असत् कर्माची परीणीती दुःखात ।
ज्ञानराज समजावीत ॥२०॥

अत्यंत श्रद्धापूर्वक कार्याचे निर्वहन ।
सात्विक आहार-यज्ञ-तप-दान ।
आदी अंती परमात्म्याचे नामस्मरण ।
सकल कार्यांत साधिजे ॥२१॥

सतराव्या अध्यायाचे समजावोनी सार ।
तदनंतर करोनि श्रीकृष्णाचा जयजयकार ।
वेदांत सप्ताहाचा करोनि उपसंहार ।
ज्ञानामृत पाजविले ॥२२॥

अनुपम सप्ताह सोहळा वेदांत ।
द्वैतभावनेचा करी समूळ अंत ।
अद्वैतभाव प्रकटवी सकल हृदयांत ।
ज्ञान मार्तंड तळपतसे ॥२३॥

संपूर्णम्

ज्ञानप्रबोध भाग सहावा

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सहावा

आधी श्रीगुरूपरंपरेस वंदून ।
नंतर भगवद्गीतेसी नमून ।
आधीची उजळणी करून ।
गीतायज्ञ धडाडला ॥१॥

दान, तप, यज्ञ ।
हेच मानवाचे कर्तव्य ।
पवित्र करूनि धन्य ।
मानवा करीतसे ॥२॥

पंचभूत यज्ञातील शेष ग्रहण ।
करूनि देहाचे करावे समाधान ।
स्वतःपुरता शिजवून करिता भक्षण ।
पाप भक्षिल्यासमान होय ॥३॥

दानाचे प्रकरण चालवित ।
अनंत फायदे गिनवित ।
उदाहरणे देई अपरिमीत ।
ज्ञानराजा गुरूसार्वभौमा ॥४॥

अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणाचे क्षालन ।
प्रकृतीबरोबरची समरसता अनुभवे जाण ।
सामाजिक न्यायासही हेच कारण ।
फायदे अनेक दानाचे ॥५॥

दानात दान अन्नदान ।
सर्वश्रेष्ठ तेच जाण ।
तृप्ती होऊनि समाधान ।
केवळ अन्नदानानेच ॥६॥

दान देणे माझे कर्तव्य आहे ।
अंतरी ही भावना उपजली आहे ।
देश, कालही दानासी उत्तम आहे ।
पहावे नित्य दानसमयी ॥७॥

पात्रता पहावी समोरच्याची तपासून ।
उपकार न करणाऱ्यास शोधून ।
दान करावे मग मनापासून ।
लक्षण सात्विक दानाचे ॥८॥

क्लेशपूर्वक जे करीती दान ।
प्रत्युपकाराचा हेतू मनी ठेवून ।
अथवा फळाची अपेक्षा धरून ।
केलेले दान राजस ॥९॥

अयोग्य काळी, योग्य सत्कारावीण ।
उपमर्द करूनि, अयोग्य ठिकाण ।
कुपात्री केलेले सकळ दान ।
तामस केवळ जाणावे ॥१०॥

राहता यज्ञ-दान-तपात काही न्यून ।
सुधारण्याची परमात्मा सांगे खूण ।
सश्रद्धे करिता भगवंताचे नामस्मरण ।
सात्विक होय सकळही ॥११॥

तेवीसावा श्लोक अत्यंत महत्वाचा ।
ॐ तत्सतचा घनीभूत साचा ।
ज्ञानराजाची गोड मधूर वाचा ।
अमृतसिंचन करीतसे ॥१२॥

ज्याच्या मननाने येई त्राण ।
मंत्र त्यासी म्हणती विद्वज्जन ।
ॐ तत्सत् महामंत्र जाण ।
ज्ञानगुरू प्रतिपादतसे ॥१३॥

ॐ असे अक्षर ।
ॐ असे स्वर ।
ॐ ध्वनी मधुर ।
ॐ निशाणीही ॥१४॥

ॐ तत्सतचे स्वरूप ।
उदाहरणे देऊन अमुप ।
परमात्म्याचे वास्तविक रूप ।
ज्ञानगुरू सहज उलगडतसे ॥१५॥

परमात्मा हा अनादी अनंत ।
अस्तित्व ही अनादी अनंत ।
परमात्मा म्हणजेच अस्तीत्व ।
भेद मिटवी ज्ञानराजा ॥१६॥

ॐतत्सतचे करूनि उच्चारण ।
ब्रह्मदेवे सृष्टी निर्मिली जाण ।
मुख्यत्वे यज्ञ, वेद, ब्राह्मण ।
निर्मिली ब्रह्मदेवे ॥१७॥

ब्राह्मण म्हणजे नेमके काय ।
सविस्तर व्याख्या करीत जाय ।
ब्रह्मासी जाणणारा ब्राह्मण होय ।
अज्ञान तिरोहीत ज्ञानमाऊली ॥१८॥

आम्हा अज्ञानी लोकांची धडपड ।
ह्या जडजीवाची होतसे परवड ।
प्रभुकृपे लाभला ज्ञानराज आधारवड ।
धरून ठेवणे हितकर ॥१९॥

ज्ञानप्रबोध भाग चौथा

वेदांत सप्ताह महोत्सव

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस चौथा

प्रथम गीतेसी करूनि वंदन ।
त्यातील मातृतत्वाचे निरूपण ।
तीन दिवसांचे सिंहावलोकन ।
ज्ञानगुरू करीतसे ॥१॥

आज मुख्यत्वे यज्ञ प्रकार ।
सात्विक, राजस, तामस यज्ञोपचार ।
ह्यातील मुख्य भेदाभेद साचार ।
उलगडतसे ज्ञानराजा ॥२॥

मानवी जीवनातील कर्माची रीत ।
भौतिक, आध्यात्मिक जीवनाशी संबंधीत ।
आध्यात्मिक उन्नतीकारणेस यज्ञकर्म संबोधित ।
उदाहरणासहित स्पष्टीकरण ॥३॥

परमात्म्यास जरी साक्षी ठेवील ।
सर्व कर्मे यज्ञकर्मे होतील ।
परी मनास विचारून पाहशील ।
परमात्म्या अर्पिण्याआधी ॥४॥

ब्रह्मयज्ञाशिवाय इतर यज्ञ प्रकार ।
आहाराशी संबंधीत ज्यांचा विचार ।
राहिला ज्याचा काल विस्तार ।
आज सविस्तर निवेदला ॥५॥

कैसा लाभला हा ज्ञानी गुरू ।
जिज्ञासूंची आळ पुरवी कल्पतरू ।
जगत्वंद्य कृष्ण हा खरोखरू ।
ज्ञानराज माणिकप्रभु ॥६॥

शास्त्रविधीने जे नेमून दिलेले आहे ।
यज्ञ हेच कर्तव्य, मनोमन धरूनि राहे ।
फळाची काही इच्छा न धरू पाहे ।
ऐसा यज्ञ सात्विक तो ॥७॥

केवळ दिखाव्यासाठी केलेला ।
फळाची अपेक्षा ठेवलेला ।
भावना शून्य असलेला ।
यज्ञ तो राजस ॥८॥

मंत्रांशिवाय, शास्त्राला सोडून ।
विनादक्षिणा, अन्नदानाला वर्जून ।
श्रद्धेला पूर्णपणे सोडून ।
केलेला यज्ञ तामस होय ॥९॥

पुढे तपाचे प्रकरण ।
ज्ञानराज चालवितसे सप्रमाण ।
सहा तपांची करवितसे जाण ।
सकल सद्भक्तांसी ॥१०॥

देव, ब्राह्मण, गुरू, ज्ञानींचे पूजन ।
पावित्र्य, सरळता, ब्रह्मचर्य पालन ।
अहिंसेच्या मार्गावरून मार्गक्रमण ।
शारीरिक तप जे का ॥११॥