by Manjiri Pathak | Oct 20, 2023 | Uncategorized

एकदा द माणिक पब्लिक स्कूल मधील मुलांचे श्रीजीं सोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात प्रश्न-उत्तर session सुरू होते. ‘एकच परमात्मा सगळ्यांनमध्ये कसा असू शकतो’ या प्रश्नाचे उत्तर देतांना श्रीजींनी मुलांना समजेल असं मोबाईलचं उदाहरण दिलं की जरी सगळ्यांकडे device व sim वेगवेगळे असो पण नेटवर्क एकच आहे . ते दिसत नसले तरी फोन सुरू असणे हे त्याचे proof आहे. तसेच परमात्म्याचे आहे… भलेही अनेक रूपे असोत पण तत्व एकच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या एकच परमात्म्याचा अंश आहे…किती समर्पक उत्तर आणि मुलांना समजेल असं सोप्या भाषेत श्रीजींनी सांगितले . यातील गाभार्थ मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे . जसं कोणाशी आपण फोन वर बोलत असू आणि जर त्याला आपला आवाज पोहचत नसेल तर समोरची व्यक्ति काय म्हणते ? नेटवर्क मध्ये ये आणि मग आपण जरा घरच्या बाहेर जाऊन किंवा खिडकी जवळ येऊन बोलू लागतो म्हणजे संपर्क कक्षेत यतो…आणि मग समोरच्याला आपला आवाज नीट ऐकू येतो . दूसरं महत्वाचं की कोणतं सिमकार्ड आहे आणि कोणता G आहे ! 4G, 5 G.. आपलं शरीर म्हणजे आपलं device , आपलं मन आणि बुद्धी म्हणजे सिमकार्ड आणि आत्मा म्हणजे नेटवर्क असं आपण समजूया. जेव्हा तीनही गोष्टी aligned असतील तेव्हा प्रभूकृपारूपी संभाषण झालंच म्हणून समजा ! आता खरी गंमत अशी आहे की ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये जर यायचे असेल तर खऱ्या अर्थाने जगाशी ‘disconnect’ व्हावे लागेल (आध्यात्मिक) , out of coverage area म्हणजेच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जावे लागेल (भौतिक जगाशी) . थोडक्यात प्रभूंची अनुभूति घ्यायला आपल्याला आपल्या आत शिरावे लागेल तरच आपल्याला प्रभू कळतील ! आणि एकदा का ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये आपण आलो की ‘प्रभूंना धरणे माहीत आहे सोडणे नाही’ याची अनुभूति आल्याशिवाय रहात नाही.
आता मुख्य मुद्दा हा आहे की प्रभूंच्या नेटवर्क मध्ये येणे म्हणजे काय आणि ते कसं ? तर…. ‘माणिक हा भावाचा भुकेला आणिक न लगे काय’ बस एवढं कळलं म्हणजे एक पायरी आपण चढलो ! भक्तीचे जसे नऊ प्रकार आहेत तसेच काही टप्पे पण आहेत. जस जसे आपण ते गाठू तस तसे आपण अधिक प्रभूंच्या जवळ येऊ …..प्रभुकृपे साठी पात्र होऊ . ज्ञानमार्ग , भक्तिमार्ग आणि योगमार्ग जस ज्याला शक्य तसे त्याने करावे. आपल्या पाच ज्ञानेंद्रिय च्या माध्यमातूनही आपण प्रभूंची भक्ति करू शकतो ; डोळ्यात प्रभूंचेच रूप साठवणे , जास्तीतजास्त प्रभूंविषयीचे ऐकणे. बोलताना प्रभूंविषयीचे बोलणे, आपल्या प्रत्येक श्वासात प्रभूनाम घेणे आणि शाररिक रूपाने जेवढी होईल तेवढी सेवा करणे. भक्तीचा महिमा असा आहे की ज्ञानाच्या अहंकारला देखील मागे टाकतो. परमोच्च आनंद कशाला म्हणतात , समर्पण म्हणजे काय , प्रेम कसं करतात , देहभान विसरणे म्हणजे काय , एवढ कशाला तर स्वत:ला विसरणे म्हणजे काय हे देखील आपल्याला भक्ति मुळेच कळू शकतं. आणि प्रभूकृपे मुळेच हे हू शकतं हे वेगळं सांगायला नको ! एकदा का आपण प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो की आपली पुढची सगळी काळजी मिटलीच म्हणून समजा. प्रभू हे सर्व इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षा प्रमाणे आहेत. आपल्या मनातलं सगळं कळतं त्यांना. योग्य वाट दाखवणारेही तेच आणि काही चुकल्यावर सांभाळून घेणारेही तेच.
सुंदर मुखकमल ,बघताच डोळे दिपती
तेजस्वी मूर्ती ती
तो असे प्रभू हा….प्रभू हा…. प्रभू हा
सगळ्यात असूनही कोणातही नसे
आर्त हाक देताक्षणि मात्र धावून येई
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा
एकदा धरले जे आपले बोट
न सोडे कदापि
‘सगळ्यातून’ अलगत बाहेर काढे
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा
प्रभूंनि सांगितले आहेच…
‘धरियले गे माय श्रीगुरुचे पाय |
मी पण जेथे समूळ गेले तूपण कैचे काय’ ||
प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो तर समजून जा जन्माचं सार्थक झालं .
by Uma Herur | Oct 17, 2023 | Uncategorized
जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।
दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।
बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।
वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,
जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.
दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.
त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,
आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।
श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।
‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,
आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।
साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,
द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।
या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.
बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।
भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,
देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।
तसेच,
गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।
श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.
पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)
त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,
अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।
ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,
वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.
स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,
श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।
हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,
यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।
आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।
अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.
या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.
by Pranil Sawe | Sep 14, 2023 | Uncategorized

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता ।
नृसिंहतात्या नामे विख्याता ।
विठाबाई पत्नी पतीव्रता ।
तात्या महाराजांची ॥१॥
नाईक घराण्याची वंशवेल ।
नृसिंहतात्याच आता फुलवेल ।
दत्तप्रसाद लवकरच भेटेल ।
आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥
होते कालयुक्ति नाम सवंत्सर ।
श्रावण अमावास्या दिवस थोर ।
पुलकित झाले माणिक नगर ।
नांदी मनोहर अवताराची ॥३॥
श्रावणमास उत्सवाचा अंतिम दिवस ।
कृष्णमेघांनी व्यापिले सकल आकाश ।
सूर्यदेवही व्याकुळ दर्शन घेण्यास ।
महायोगी बालकाचे ॥४॥
नऊमास पूर्ण झाले गर्भधारणास ।
परी न दिसे प्रसूतीचे काही चिन्हास ।
काळजी अत्यंत लागली विठाम्मास ।
धावा प्रभुचा करितसे ॥५॥
सकळजन चिंता करिती ।
श्रीमाणिकसी येऊनि विनविती ।
होऊदे विठाम्माची प्रसुती ।
निर्विघ्नपणे प्रभुराया ॥६॥
कनवाळू श्रीमाणिक कृपाघन ।
आला विठाम्मापाशी धावून ।
विठाम्मा विव्हळे कळवळून ।
कृपादृष्टी अवलोकी ॥७॥
गर्भस्थ शिशूस संबोधून ।
श्रीमाणिक बोले प्रेमवचन ।
मातेसी ऐसे छळण ।
योग्य नव्हे ॥८॥
जन्म घेणे आपणांसी क्रमप्राप्त ।
रहाल सदैव संसार बंधमुक्त ।
माणिक वचनी होऊनी आश्वस्त ।
प्रकटावे शीघ्रातीशीघ्र ॥९॥
ऐकोनी श्रीमाणिकप्रभुची विनंती ।
पुढील अवतारकार्याची निश्चिती ।
माणिकवचने मिटली भ्रांती ।
नवजात अर्भकाची ॥१०॥
विठाम्माउदरी अत्रि अंश आला ।
मनोहर नामे श्रीगुरू अवतरला ।
वाढवील जो ब्रह्मचर्य व्रताला ।
आधारभूत होऊनिया ॥११॥
मुखमंडलाची प्रभा ऐसी ।
फाकली दहाही दिशी ।
बैलपोळ्याचा सणही त्यादिवशी ।
हर्षोल्हास चोहीकडे ॥१२॥
बैल आपापले सजवून ।
येती माणिकदर्शना घेऊन ।
सवाद्ये होतसे बैलपूजन ।
अवघा आनंदसोहळा ॥१३॥
पंचक्रोशीतील आले समस्त जन ।
प्रभुसहित घेती बालकाचे दर्शन ।
टाकीले मन सर्वांचे मोहून ।
मनोहर नाम यथार्थ ॥१४॥
नाम ठेविले मनोहर ।
जाणा तोचि विधीहरीहर ।
जग तारावया भूमिवर ।
मनोहररूपे अवतरला ॥१५॥
ऐसा अवतार मनोहर ।
सकलमताचा पुढील धरोहर ।
माणिकप्रभु जाणती खरोखर ।
आपुल्या अंतरात ॥१६॥
हा जरी अल्पायुषी होईल ।
सवाई माणिकप्रभु म्हणवून घेईल ।
सर्वश्रुत माणिक प्रभुंचे बोल ।
सहजी जे निघाले ॥१७॥
एकदा काय नवल घडले ।
प्रभु गादीवरी अप्पासाहेब बैसले ।
पाच वर्षाचे बालक सानुले ।
प्रभु दरबारामाजी ॥१८॥
करती प्रभु बैठकीचे अनुकरण ।
तैसेच गंभीर स्वरूप धारण ।
समस्त करिती मनोहराचे अवलोकन ।
प्रभु पातले तत्क्षणी ॥१९॥
बाळ मनोहरासी पाहुनी ।
बैसला गादीसी बळकावूनी ।
बोलती तयासी हांसूनि ।
कृपानिधी प्रभुमहाराज ॥२०॥
माझी गादी तुला हवी का रे ।
आता मी काय सांगतो ऐक रे ।
गादीवर बैसता दागिने सारे ।
दान करणे दुस-यासी ॥२१॥
अप्पासाहेब प्रभुसी वदती सत्वर ।
सांगेन त्यासी देण्यास तयार ।
दागिने सगळे काढून भरभर ।
ठेविले प्रभुपुढे ॥२२॥
पाहुनि वैराग्याची मूर्तीमंत मूर्ती ।
माणिक प्रभु मनोमन संतोषती ।
लहानशी गादी मांडून बैसविती ।
शेजारी बालमनोहरास ॥२३॥
वैराग्याची महाकठीण स्थिती ।
कृतीतून सहज दाखविती ।
दातृत्वाची तीच माणिकवृत्ती ।
मनोहराठायी उपजली ॥२४॥
प्रभुसमाधी समय जवळ येता ।
भक्तांस लागली उत्तराधिका-याची चिंता ।
कोण संभाळील प्रभुगादीस आता ।
खलबते नानाविध ॥२५॥
जरी तात्यासाहेबांचे पुत्र दोन ।
परी होते लहान आणी अज्ञान ।
एकाचे वय सात, एकाचे तीन ।
सर्वार्थे अयोग्य म्हणती ॥२६॥
भालकीस होता एक युवक ।
मच्छिंद्रराव नामे प्रभुंचा सेवक ।
प्रभुगादी चालविण्यांस तोच लायक ।
धारणा अनेकांची ॥२७॥
बालपणापासून होता लाडका प्रभुंचा ।
प्रभुंचाही व्यवहार अत्यंत प्रेमाचा ।
करतील विचार प्रभु मच्छिंद्ररावाचा ।
गादीवर बैसविण्यास ॥२८॥
उतावीळ होती भक्तजन ।
मच्छिंद्ररावास मेण्यात बैसवून ।
घेऊन येती भालकीहून ।
सवाद्ये मिरवणूक ॥२९॥
भक्तांनी आणली एक गादी ।
प्रभुंच्या उत्तराधिकाराची जी नांदी ।
गादीवर बैसविले प्रभु संन्निधी ।
मच्छिंद्ररावास ॥३०॥
त्याच रात्रीस लीला घडली ।
मच्छिंद्ररावाची गादी खाक झाली ।
ज्या प्रभुगादीची स्वप्न पाहिली ।
नव्हती ती नशीबांत ॥३१॥
काहीच झाले नाही समजून ।
भक्त करिती प्रयत्न परतून ।
प्रभु मच्छिंद्ररावास मांडीवर बैसवून ।
कधी घेतील ॥३२॥
ऐसी उत्कंठा शिगेस पोहोचत ।
वदंता उठली प्रभु दरबारात ।
चाळीस हजाराचे कर्ज असत ।
प्रभुमहाराजांवरी ॥३३॥
जो कोणी उत्तराधिकारी होईल ।
तोच ह्या कर्जासी चुकविल ।
फकिरी संस्थान, कैसे होईल ।
मच्छिंद्रराव विवंचनेत ॥३४॥
मानाची जरी गादी घ्यावी ।
कर्जाची धोंड गळी पडावी ।
पेक्षा आपली भालकी गाठावी ।
हेच बरे ॥३५॥
एकादशीस जेव्हा समाधीत बैसती ।
मच्छिंद्ररावास प्रभु सांगावा धाडती ।
भालकीस पळून गेल्याचे सांगती ।
शिष्य प्रभुमहाराजांस ॥३६॥
प्रभुगादी चालविणे सोपे नाही ।
योग्य अधिकाराविणा शक्य नाही ।
ये-यागबाळ्यास हे झेपणे नाही ।
म्हणे प्रभु माणिक ॥३७॥
मार्गशीर्ष एकादशीचा पुण्य दिवस ।
निश्चित केला संजीवन समाधीस ।
नृसिंह तात्यांच्या उभय पुत्रांस ।
बोलाविणे धाडिले ॥३८॥
येता उभयतां मांडीवर बैसविले ।
क्षण दोन त्यांसवे घालविले ।
आरती पुजापाठ विधीवत करविले ।
सप्रेमे माणिकप्रभुने ॥३९॥
मनोहरास पांघरविला अंगावरील दुशाला ।
प्रसादरूपी घातली गळ्यात माळा ।
मंत्रोपदेश देऊनि प्रसाद दिधला ।
लहानग्या मनोहरास ॥४०॥
असला वयाने लहान जरी ।
बालमनोहर हाच माझा उत्तराधिकारी ।
दत्तगादीची सेवा करील परोपरी ।
प्रभु वदे अंतिमक्षणी ॥४१॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
मनोहराच्या सामर्थ्याची प्रभुंस जाण ।
आपल्या पाठीमागे संस्थानाचे मोठेपण ।
वाढविल निश्चित ॥४२॥
चालविल सकलमत संप्रदाय परंपरा ।
म्हणतील सवाई माणिकप्रभु दुसरा ।
मनोहरावर ठेऊनि भार सारा ।
प्रभु जाहले समाधिस्त ॥४३।।
बालमनोहरावर ठेऊनि सारी भीस्त ।
श्रीप्रभु झाले संजीवन समाधिस्त ।
कैसी लागेल प्रभुदरबारास शिस्त ।
चिंता समस्तांसी ॥४४॥

प्रभुसमाधीनंतर पहिलाच दरबार ।
लोटला भक्तजनांचा सागर ।
प्रभुसिंहासनावर बालमूर्ती मनोहर ।
सुहास्य वदनी ॥४५॥
दृष्टी समस्तांची मनोहर मुखमंडलावर ।
म्हणती श्रीमाणिक बालमूर्ती खरोखर ।
जो तो आपापल्या वृत्तीनुसार ।
प्रभुसी पाहे मनोहरात ॥४६॥
गादीवर बैसता कर्जाची हकीकत ।
कर्तव्यदक्ष मनोहरप्रभु जेव्हा जाणत ।
यादी बनविण्याचे फर्मान काढत ।
कोणाचे किती देणे ॥४७॥
अप्पासाहेब सांगती बाप्पाचार्यांस ।
निरोप धाडणे देणेक-यांस ।
पत्रे पाठवूनी येण्यास ।
सत्वर सांगितले ॥४८॥
एकेक करोनि जमले सावकार ।
प्रमुख त्यात गोसावी किसनगीर ।
देणे त्याचे दहा हजार ।
श्रीप्रभुंचे होते ॥४९॥
हिशोब कर्जाचा किसनगीरासी विचारता ।
सविनय बोले तो तत्वता ।
प्रभुंना कर्ज देण्याची योग्यता ।
सर्वार्थे नाही माझी ॥५०॥
प्रभुकृपेनेच लक्षावधी नफा जाहला ।
परी दानधर्म नाही काही घडला ।
दहा हजार देता श्रीप्रभुला ।
दानधर्म अनायसे ॥५१॥
ते नव्हतेच कधी ऋण ।
परतफेडीचा नाही काही प्रश्न ।
मनीचे सारे द्वंद्व काढून ।
निश्चिंत व्हावे ॥५२॥
ऐकोनि किसनगीराचे मृदुवचन ।
अप्पासाहेब संतोषले मनोमन ।
किसनगीरास देऊनि पुढारीपण ।
तडजोड करावया इतरांसी ॥५३॥
किसनगीर अत्यंत हजरजबाब ।
देयराशी निश्चिती ताबडतोब ।
मांडूनि यथायोग्य हिशोब ।
अप्पासाहेबांपुढे ठेविती ॥५४॥
पाहुनि एवढ्या मोठ्या रकमेस ।
जनांची उत्सुकता पोहोचली शिगेस ।
अप्पासाहेब शांत त्याही समयास ।
बैसले दरबारात ॥५५॥
एवढ्यात पहा नवल घडले ।
दरबारात सुखद वृत्त धडकले ।
प्रभुसेवार्थ काही दान धाडले ।
विठ्ठलराव तालुकदाराने ॥५७॥
थोडे थोडके नव्हे गाडीभर ।
उतरला कर्जाचा सर्व भार ।
निमित्तमात्र विठ्ठल तालुकदार ।
कर्ताकरविता श्रीमाणिक ॥५७॥
सावकारांचे कर्ज फेडून ।
आशीर्वचन प्रसाद देऊन ।
समस्तांचे आभार मानून ।
आनंद वर्तला ॥५८॥
बाप्पाचार्य मुख्य कारभारी ।
अप्पासाहेबांची पाहून कर्तबगारी ।
वंदिती चरण वारंवारी ।
बालमनोहराचे ॥५९॥
माणिकप्रभु जयंतीची पौर्णिमेची रात्र ।
मनोहरप्रभु करिती महापूजा प्रभुमंदिरात ।
अतोनात गर्दी प्रभुमंदिर परीसरात ।
घ्यावया प्रभुदर्शन ॥६०॥
झाली महानैवेद्याची वेळ ।
सदाशिवराव नेसून सोवळ ।
भंडारखान्यातून नैवेद्याची थाळ ।
घेऊनि येती ॥६१॥
नैवेद्य घेऊन येता प्रभुमंदिरात ।
म्हातारा एक बैसला वाटेत ।
लपेटून घेतले स्वतःस घोंगडीत ।
अस्ताव्यस्त ध्यान ॥६२॥
स्पर्श झाला म्हाता-यास चुकून ।
विटाळ प्रसादास झाला म्हणून ।
म्हाता-यास अद्वातद्वा बोलून ।
गेले परतोनी ॥६३॥
अभ्यंग स्नान करून ।
स्वयंपाक पुन्हा करून ।
सोवळ्यात महानैवेद्य घेऊन ।
सदाशिवराव पातले ॥६४॥
पूजा संपल्यावर स्वस्थ झोपले ।
स्वप्नी श्री माणिकप्रभुच आले ।
सदाशिवरावास प्रभु बोलले ।
ऐका एकचित्ते ॥६५॥
आलो जत्रेची मजा पहावया ।
घेऊनि येसी माझिया नैवेद्या ।
माझाच स्पर्श होता तया ।
विटाळ कैसा ॥६६॥
सदाशिवराव अत्यंत शरमिंदे झाले ।
माफी मागण्या मनोहरप्रभुंकडे आले ।
पाय धरण्या पुढे सरसावले ।
मनोहर प्रभुरायाचे ॥६७॥
पाय धरावया जैसे वाकले ।
मनोहर प्रभु मागे झाले ।
नको सदाशिवराव, पुरे झाले ।
विटाळ उगाच होईल ॥६८॥
मनोहरप्रभुंच्या अंतर्ज्ञानित्वाची जाण ।
सदाशिवरावास झाली मनोमन ।
मनोहरप्रभुस जाऊन शरण ।
करूणा भाकतसे ॥६९॥
भक्तवत्सल प्रभु मनोहर ।
सदाशिवरावास वदति साचार ।
जयंती उत्सवात येती खरोखर ।
विविधरूपे प्रभुमहाराज ॥७०॥
सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ।
चित्तात ठेवावी हीच खूण ।
भेदभाव सदा सर्वदा सारून ।
सेवावे प्रभुचरण ॥७१॥
मनोहर प्रभु परम मातृभक्त ।
भावा बहिणीवरही प्रेम अत्यंत ।
परी होते वैराग्य मूर्तिमंत ।
त्यांच्या ठायी ॥७२॥
जडला एकदा काही आजार ।
मनोहरप्रभु होती त्याने बेजार ।
लोकाबापू वैद्य दर्शनार्थ हजर ।
होते त्यावेळी ॥७३॥
लोकाबापू करती विशेष यत्न ।
श्रीप्रभुंस आला तात्काळ गुण ।
उंचीवस्त्रे, द्रव्य, प्रसाद देऊन ।
यथोचित गौरविले ॥७४॥
मनोहरप्रभुंच्या गळ्यात एकमुखी रूद्राक्ष ।
श्रीमाणिकप्रभुंनी दिधला प्रसाद प्रत्यक्ष ।
लोकाबापूंचे पडता त्यावरी लक्ष ।
इच्छा होय प्राप्तीची ॥७५॥
मनी रूद्राक्षाचा लोभ वर्तत ।
परी मुखे काही न बोलवत ।
मनकवडे मनोहरप्रभु सर्व जाणत ।
लोकाबापूच्या मनींचे ॥७६॥
जरी लोकाबापू मनीचा हेतू पुरवावा ।
परी सर्वांसमोर रूद्राक्ष कैसा द्यावा ।
परतती लोकाबापू जेव्हा आपुल्या गावा ।
प्रभु येती सोडण्या ॥७७॥
आले चालत संगमापर्यंत ।
लोकाबापूंस बोलावून एकांतात ।
रूद्राक्ष घातला गळ्यात ।
अविलंब प्रभुने ॥७८॥
मनोवांछित जे प्राप्त झाले ।
प्रभुने आपले अंतरंग जाणीले ।
लोकाबापू वैद्य चरणी लागले ।
अंतर्यामी मनोहरप्रभुंच्या ॥७९॥
विठाम्माची प्रबळ इच्छा अंतरात ।
मनोहराने अडकावे विवाह बंधनात ।
इतरांसही पडे विचार पसंत ।
अनुमोदन सर्वांचे ॥८०॥
श्रीप्रभु पाळती नैष्ठिक ब्रह्मचर्य ।
त्यांस विचारण्याचे होईना धैर्य ।
कैसे होईल विवाह कार्य ।
चिंता समस्तांसी ॥८२॥
प्रभुंची वडील भगिनी मुक्ताबाई ।
तिच्या विवाहाची अपूर्व नवलाई ।
उपाध्यायाचा मुलगा केला जावई ।
सालंकृत कन्यादान ॥८२॥
मनोहरप्रभु पंधरा वर्षाचे झाले ।
माणिक नगराचे रूप पालटले ।
शोभिवंत अनेक मांडव उभारले ।
जय्यत तयारी विवाहाची ॥८३॥
परी विवाह कुणाचा कळेना ।
नवरा नवरीचा उलगडा होईना ।
प्रभुमहाराज अडकतील विवाह बंधना ।
अटकळ काहीजणांची ॥८४॥
समग्र तयारी झाली तरी कळेना ।
नवरा नवरी यांचे गूढ उकलेना ।
विठम्मा पुसतसे शेवटी प्रभुंना ।
विवाहसोहळ्या संबंधी ॥८५॥
मनोहरप्रभु वदती विठाम्मास ।
पाळितो आम्ही ब्रह्मचर्यास ।
नवरी पाहिली खंडेरायास ।
विवाहसोहळा खंडीचा ॥८६॥
आठवले माणिकप्रभुंचे विधान ।
जन्मसमयी जे केले कथन ।
ब्रह्मचर्य व्रतास आधार प्रदान ।
करील मनोहर ॥८७॥
मातोश्रीस अती आश्चर्य सखेद ।
परी मिटवूनी अंतरीचा भेद ।
शहाणपणे सोडून दिला नाद ।
मनोहराच्या विवाहाचा ॥८८॥
बाप्पाचार्यांची मुलगी असे पसंत ।
तिजसवे विवाह केला निश्चित ।
मातोश्रीही त्यास होकार देत ।
लग्नसोहळा थाटात ॥८९॥
खंडेरायाचा पार पडला विवाहसोहळा ।
वंशविस्ताराचा मार्ग झाला मोकळा ।
पुत्रविवाह देखिला आपुल्या डोळा ।
समाधान विठाम्माचे ॥९०॥
मनोहरप्रभु परम योगी थोर ।
नित्य योगाभ्यास करती अपार ।
माणिकप्रभु समाधीपाठी तळघर ।
करवून घेतले ॥९१॥
आखून दिलेल्या नमुन्यानुसार ।
परीपूर्ण जाहले तळघर ।
पाहण्या आले प्रभुमनोहर ।
कारभारी मंडळींसह ॥९२॥
तळघरात होत्या तीन कमानी ।
बांधकाम पडले प्रभुंच्या पचनी ।
मधल्या कमानीत आसन घालोनी ।
प्रभुमहाराज बैसले ॥९३॥
नुरला पारावार त्यांच्या आनंदास ।
निघती उद्गार त्या समयास ।
एखाद्या योगी समाधीस्त होण्यास ।
अत्युत्तम स्थान हे ॥९४॥
वरील घटनेस लोटले षण्मास ।
अश्विन कृष्ण सप्तमी तिथीस ।
अचानक बदल झाले प्रकृतीस ।
श्रीमनोहर प्रभुंच्या ॥९५॥
खंडेराव जाणती विद्याशास्त्र सकळ ।
संस्थान गादी सांभाळण्या सबळ ।
अवतार समाप्तीची हीच वेळ ।
ठरविले मनोमन ॥९६॥
जरी प्रभुमहाराज गंभीर अत्यंत ।
धीर देऊनि करिती सकलांस शांत ।
विधीवत चतुर्थाश्रम घेतला क्षणांत ।
वंदिती मातोश्रीस ॥९७॥
आपला कनिष्ठ बंधू खंडेरावास ।
उपदेश देऊन दिधले प्रसादास ।
प्रसाद देऊनि भक्त मंडळीस ।
तोषविले सर्वांस ॥९८॥
सिद्ध करूनि आसन ।
देह केला विसर्जन ।
चैतन्यात मिसळले चैतन्य ।
अवतार मनोहर ॥९९॥
शोक जाहला अनावर ।
दुःखात बुडाले माणिकनगर ।
कैसा घालावा आवर ।
भावनेस आता ॥१००॥
पुढील विधी यथाशास्त्र केला ।
आणेनी बैसविले संजीवन देहाला ।
मधल्या कमानीत बैसाकार केला ।
होता तेथेची ॥१०१॥
वयमान अवघे एकोणिस ।
घेतले संजीवन समाधीस ।
नैष्ठिक ब्रह्मचार्याचा कळस ।
मनोहर अवतार प्रभुंचा ॥१०२॥
रूप जयाचे अतीव मनोहर ।
वाणीही तैसीच गोड मधुर ।
अत्यंत लाघवी मोहक सुकुमार ।
श्रीप्रभु मनोहर ॥१०३॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
एकोणीसाव्या वर्षी अवतारकार्य पूर्ण ।
बारा वर्षात माणिकनगर संस्थान ।
वाढविले मनोहरप्रभुंनी ॥१०४॥
गवंडी संतरामदादा प्रख्यात ।
घेऊन त्यांसी विश्वासात ।
प्रभुमंदिर निर्मिले अद्भूत ।
शान माणिकनगराची ॥१०५॥
अत्यंत भव्य आणि सुंदर ।
मंदिर बांधले माणिकप्रभु समाधीवर ।
स्थापत्यकलेचा ऐसा नमुना आजवर ।
झाला नाही ॥१०६॥
अचाट प्रभुत्व संस्कृत भाषेवर ।
तैसा योगाभ्यासही करती धुरंधर ।
स्तोत्र, मंत्र निर्मिले अपार ।
संस्थान उत्सवासाठी ॥१०७॥
ठेवूनि परंपरेचा मान ।
राखूनि संप्रदाय अभिमान ।
आखून दिले नित्यपूजाविधान ।
आजतागायत चालतसे ॥१०८॥
काव्य प्रतिभाही तैसिच अलौकिक ।
स्तोत्र, श्लोक आणि अनेक अष्टक ।
विविध भाषेत पदे अनेक ।
कविश्रेष्ठ मनोहर ॥१०९॥
प्रभुभक्ती आणि प्रभुवियोग उत्कट ।
प्रामुख्याने दिसतसे मनोहर काव्यांत ।
इतक्या लहान वयांतही वेदांत ।
मनोहरपदांतूनी झळकत ॥११०॥
स्वामीसमर्थ वदति भक्तांस ।
अक्कलकोटाहून माणिक नगरास ।
बडे भाईस जा भेटण्यास ।
बडा भाई मनोहरप्रभु ॥१११॥
व्यवहार करावा नियमित ।
तैसाच करावा वेळेत ।
कारभारात चोख अत्यंत ।
होते प्रभु महाराज ॥११२॥
होता सात्विक आहार ।
विद्वज्जनांवर प्रेम अपार ।
संतोषोनि देती उपहार ।
दानशूर प्रभुमनोहर ॥११३॥
प्रभुमंदिरावर कळस जरी सोन्याचा ।
आधी मान मनोहरप्रभुंच्या समाधीचा ।
पाया असे विराट प्रभुमंदिराचा ।
आधारभूत जो ॥११४॥
ऐसा अवतार प्रभुमनोहर ।
ब्रह्मचारी विद्वान सुकुमार ।
सवाई माणिक खरोखर ।
हाच गा ॥११५॥
by Pranil Sawe | Sep 11, 2023 | Uncategorized

माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा
श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।।
तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते
परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।।
अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला
काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।।
त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची उधळण अपार,
गोवर्धनाचाही सारा भार उचलूनि धरीं ।।
उचलूनी धरीं सर्वकाळी तव भक्तांची तळी,
तयांच्या हृदयकमळी वर्ततो सदा ।।
वर्ततो सदा धर्माच्या बाजूने दुष्ट निर्दालन करी चक्राने
रणांगणावरही गीता सांगणे साक्षीभावाने ।।
साक्षीभावाने तूज पाहणे दे मज ऐसी लोचने
नाही तुजकडे अन्य मागणे कृष्णा दयाघना ।।
by Manohar G Kulkarni | Aug 29, 2023 | Uncategorized

जयजयाजी गुरु माणिका ।
तुजवाचूंनि कोण आणिका ।
प्रभुपाठाचा संकल्प निका ।
बाळका हाती करविला ।।
अक्षय्य निवास तुझा चैतन्यधामा ।
भक्तांस्तव प्रकटला माणिक ग्रामा ।
साक्षीस ठेऊन तुझिया नामा ।
लेखनकामा आरंभितो |
प्रभुपाठ
लाडवंती नामी पवित्र ती भुमि |
भाग्यवंत दोन्ही बया मनोहर || १ ||
राम उपासना करी नित्यक्रमा |
तेणे तो परमात्मा प्रसन्न झाला || २ ||
रामनवमी दिनी श्रीदत्तगुरुंनी |
दृष्टांत देवोनी धन्य केले || ३ ||
दत्तजयंतीला अवतार झाला |
नामे ओळखिला प्रभु ‘माणिक’ || ४ ||
अलौकिक मुर्ती पसरली कीर्ती |
प्रत्यक्ष त्रैमुर्ति प्रगट झाले || ५ ||
गोकुळात खेळ करीतो गोपाळ |
तैसा जमत मेळा प्रभु संगे || ६ ||
गोविंदा गवळी प्रभुचा सोबती |
जिवविला त्यासी प्रभुने बघा || ७ ||
मनुष्य की प्राणी नसे भिन्न कोणी |
प्रभु स्मतृगामी सर्वां ठायी || ८ ||
प्रभु उपासना घडो नित्य नेमा
तुज पुरुषोत्तमा काय मागु || ९ ||
वैकुंठीचा हरी नांदे भुमिवरी |
तो संगमावरी प्रगट झाला || १० ||
भाग्य ते उजळले पुण्य क्षेत्र झाले |
नाम तया दिधले ‘माणिकनगर’ || ११ ||
श्री दत्तप्रभुंची स्थापुनीया गादी |
सकलमत पंथी चालवीला || १२ |
प्रभुच्या मंदिरी मोक्षाची पायरी |
तेथे माझा हरी नांदत असे || १३ ||
प्रभुनाम मनी प्रभुनाम ध्यानी |
प्रभुनाम कानी पडो सदा || १४ ||
संसार सागर दुखाचे आगर |
प्रभु पैल पार नेत असे || १५ ||
प्रभु सांगे आम्हा मुक्तीचाच मार्ग |
तेणे तगमग दुर होई || १६ ||
माणिक माणिक वेदही म्हणती |
शास्त्रही गाती प्रभुचीच महती || १७ ||
प्रभू माझा ‘हरी’ प्रभू माझा ‘हर ‘ |
एक तत्त्व सारं, प्रभुजवळी || १८ ||
माणिक नामाचा खरा तो उच्चार |
जन्म मरण पार जीवा नेई || १९ ||
भक्ताचा आनंद प्रभुच्याच मनी |
कृपाळू होउन सांभाळीतो || २० ||
मी नर पामर प्रभुचा चाकर |
प्रभु विश्वंभर सर्व व्यापी || २१ ||
भाव नाही जेथ प्रभु कैसा तेथ |
उठाठेव व्यर्थ करु नये || २२ ||
करा प्रभु भक्ती प्रभु धरा चित्ती |
परमार्थ प्रचिती येईल त्याने || २३ ||
असत्य हे जग सत्य एक प्रभु |
नाचु गाऊ धावु प्रभुकडे || २४ ||
अवघाची हा देह प्रभुंच्या चरणी |
समर्पण करुनी होऊ धन्य || २५ ||
नाठवावा प्रपंच आठवावी भक्ती |
मिळे ज्याने मुक्ती करा जपतप || २६ ||
चराचरावरी प्रभुचीच सत्ता |
मंत्र धरी चित्ता ‘ श्री माणिक ‘ || २७ ||
पाप असे मुळ दुखाचे कारण |
समाधान जाण प्रभु जवळी || २८ ||
प्रभुच्या संगती होई ज्ञान प्राप्ती |
पार्थासी बोले जैसा नारायण || २९ ||
पतित ते जन जे न मानिती प्रभुस |
त्याने अवघा जन्म व्यर्थ होय || ३० ||
अहंकार झाला तो तेथे बुडाला |
प्रभुकृपेस पात्र कैसा होई || ३१ ||
ठाई ठाई प्रभु सर्वत्र व्यापला |
व्यर्थ वाया गेला शोधुनिया || ३२ ||
नवनीत जैसे सुधामध्ये सिद्ध |
तैसा हृदयस्थ प्रभु माझा || ३३ ||
चालवीतो देह श्वासही चालवे |
प्रभुच बोलवे सर्वाठायी || ३४ ||
क्षणिक सुखाचा करुनीया त्याग |
प्रभुचीच ओढ लागो जीवा || ३५ ||
प्रभुनाम ओठी प्रभुनाम दिठी |
प्रभुनाम कंठी सदा नांदो || ३६ ||
प्रभुचीच भक्ती भक्तीचा सुगंध |
भजनात दंग प्रभु माझा || ३७ ||
भजनाविन कैसा होईल उध्दार |
भक्ताचा आधार प्रभु एक || ३८ ||
एक असे प्रभु, भक्त हे अपार |
प्रभु परमेश्वर सर्वां ठायी || ३९ ||
प्रभुनाम जप सहज साधन |
यम नियम न लागे त्यासी || ४० ||
भक्ताचे कल्याण करी नारायण |
मुमुक्षु ते जन उध्दरीले || ४१ ||
भक्तासाठी प्रभु सदैव अधीर |
नामाची खीर आवडी बहु || ४२ ||
स्तंभातुनी आला प्रल्हादे रक्षीला |
उध्दवा लाभला कृष्ण सखा || ४३ ||
विदुराचे गृही जावुनी केशवा |
गोड मानी सेवा काय सांगु || ४४ ||
प्रभुपाठ नित्य मुखे जरी गाती |
पाप मुक्त होती अवघे जन || ४५ ||
जो नर जाईल माणिकनगरी |
वैकुंठ भुवरी भासे तया || ४६ ||
नामाविन प्रभु ज्ञानाविन जन्म |
व्यर्थ जाई कर्म प्रभुवीण || ४७ ||
नामाचा गजर पडे जया कानी |
पापाची झाडणी होई तेणे || ४८ ||
माणिकनगरी संगमाचे तीरी |
असे माझा हरी ‘ योगेश्वर ‘ || ४९ ||
भक्तीनेच पावे भक्तांचा कैवारी |
जन्म मरण फेरी चुकवी प्रभु || ५० ||
करावे सायास येवुनी जन्मास |
भजावे प्रभुस ऐक्या भावे || ५१ ||
करुनीया वश मनाचा आवेश |
प्रभुनामी यश आहे सत्य || ५२ ||
प्रभुपाठ ज्याचे निरंतर मुखी |
संसारी दु:खी कैसा राहे || ५३ ||
ज्या घरा लागले प्रभुचे चरण |
तया होई जाण सुरलोग || ५४ ||
प्रभु तज एक करीतो आर्जव |
सदा चित्त राहो तुझिया चरणी || ५५ ||
भेदभाव सांडी प्रभुचे वचन |
आत्मा एक जाण सर्वांतरी || ५६ ||
एक धरी ध्यास प्रभुनामाची आस |
सोडु नको त्यास कदाकाळी || ५७ ||
सोडी मोह माया नाशिवंत काया |
अहंभाव जाया करा भक्ती || ५८ ||
प्रभु नाही एैसे कोणते ठिकाण |
चराचरी व्यापून प्रभुच राही || ५९ ||
संजिवनीसम मज प्रभुनाम |
धन्य बलभीम राम रुपी || ६० ||
प्रभुनाम आम्हा पायसाचे दान |
करुनी सेवन होवु धन्य || ६१ ||
प्रभुनाम हेचि मोक्षाचे साधन |
करा भक्तजन जवळी तया || ६२ ||
ज्ञानाचा प्रकाश उतरला देहात |
प्रभुनाम ध्यास घडो सदा || ६३ ||
प्रभु नका देवु मज अहंकार |
मागणे चरणावर हेचि एक || ६४ ||
by Pranil Sawe | Aug 28, 2023 | Uncategorized

करडखेड… नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून थोड्या अंतरावर वसलेले करडखेड हे अगदी नावाप्रमाणेच चार-पाच हजार लोकसंख्या असलेले छोटेसे खेडे. पण येथील सद्गुरु माणिक प्रभु मंदिर आपले मन आकर्षून घेते. श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या सगरोळी-करडखेड दौऱ्यादरम्यान, परतीच्या वेळेस करडखेडला भेट देण्याचा योग जुळून आला. येथील श्री प्रभु मंदिराची पुढील बाजू माणिकनगरच्या प्रभुमंदिराची आठवण करून देते. श्रीप्रभु मंदिरामध्ये श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्वहस्ते स्थापन केलेली काळ्या पाषाणाची मनोहर प्रभुगादी आहे. त्या संदर्भात मंदिराचे सर्वेसर्वा श्री. माणिकराव कुलकर्णी ह्यांच्याकडून ह्या प्रभुगादीचे महात्म्य ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. माझ्या विनंतीला मान देऊन श्री. माणिकरावांनीही अत्यंत प्रेमपूर्वक गादीचा इतिहास उलगडला.
करडखेड येथे रंगूबाई नावाची एक बाल विधवा होती. त्या काळातील प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या नवव्या वर्षीच तीचे लग्न झाले होते आणि रंगूबाईच्या वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. तेव्हा तिच्या आई-वडिलांना चिंता लागून राहिली की, हिचे पुढे कसे होणार? ज्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते, त्यावेळी तिच्या आई-वडिलांना माहिती मिळाली की, माणिकनगरचे श्री मार्तंड माणिकप्रभु हे सगरोळीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना करडखेडला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. करडखेडला महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. तेथे महाराजश्रींचा तीन दिवस मुक्काम होता. त्या मुक्कामावेळी रंगूबाईच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना रंगूबाईची कहाणी सांगितली. तिची एवढी मोठी जमीन आहे, संपत्ती आहे, त्याचे काय करावे? त्या संदर्भात महाराजांना विचारणा केली, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभु म्हणाले की तुमच्या गावातील तुम्हाला जी आवडतील, ती तीन-चार मुले घेऊन या. त्यातील एकाला आम्ही रंगूबाईला दत्तक देऊ. तेव्हा तेथील तीन-चार मुलांपैकी श्री. माणिकराव कुलकर्णी यांचे आजोबा, म्हणजेच श्री. मल्हारी यांना महाराजश्रींनी रंगूंबाईस दत्तक दिले. त्याचवेळी करडखेडला श्री प्रभुगादी स्थापनेची इच्छा रंगूबाईने श्रीजींसमोर प्रकट केली. श्रीजींनीही त्याला आनंदाने संमती देऊन, स्वहस्ते करडखेडची ही, काळ्या दगडातील, गादी स्थापन केली. ही घटना साधारणतः १९०३ ते १९०४ च्या दरम्यानची आहे. त्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते आणि मल्हारी नावाचा जो दत्तक घेतलेला मुलगा होता, त्याचे वय सुमारे आठ वर्षाचे होते. ज्यावेळेस मल्हारीस दत्तक घेतले गेले, त्यावेळी श्रीजींनी रंगुबाईस असा आशीर्वाद दिला की, ह्या गादीची व्यवस्था लागेल, तुझा वंशही वाढेल आणि तुझं नावही येथे राहील. असे अभयवचनच महाराजश्रींनी दिले. त्या प्रसंगी महाराजश्रींनी रंगूबाईस प्रसाद दिला. आजही प्रसादाची ही डबी आपल्याला करडखेडच्या श्री प्रभु मंदिरात पाहता येते. श्री मल्हारीरावांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र श्री विजयराव उर्फ गुरुदास यांनी श्री सिद्धराज प्रभुंना विचारले की, ह्या प्रसादाच्या डबीचे आता काय करू? तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, श्री मार्तंड माणिक प्रभुंचा प्रसाद कोणाला मिळतो? आणि तो तुमच्याकडे आहे, त्यामुळे तो तसाच ठेवा आणि त्यास पूजेमध्ये देव म्हणूनच पूजा. त्याचे कधीही विसर्जन करू नका. अशा प्रकारे श्री सिद्धराज प्रभुंच्या आज्ञेनुसार आजही प्रसादाची ती डबी कुलकर्णी कुटुंबाने प्राणपणाने जपली आहे. आज त्यांच्या चौथ्या पिढीतही गादी स्थापनेपासूनची श्री प्रभुगादीची सेवा अखंडित आहे. अपवाद फक्त वार्षिक दत्त जयंती उत्सवाचा. श्री दत्त जयंतीच्या दिवशी सर्वजण माणिकनगरला जातात, पण एक जण करडखेडला राहून, गादीची महापूजा करून माणिकनगराला येतो. आणि प्रभु दरबाराचा प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी करडखेडला परततो आणि संध्याकाळी श्री प्रभुगादीची पूजा होते. असा परिपाठ येथे जवळपास सव्वाशे वर्षापासून चालत आला आहे. श्री प्रभुगादीस रोज पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि रुद्राभिषेक होतो. विशेष उत्सवांच्या दिवशी राजोपचार पूजेच्या धर्तीवर यथाशक्ती महापूजा होते. श्री माणिक कुलकर्णी यांच्याबरोबरच त्यांचे बंधू श्री. श्रीपाद आणि श्री. योगेश कुलकर्णी हे सध्या श्रीप्रभुगादीची पूजा वगैरेची व्यवस्था एकत्रितपणे पाहतात. अलीकडेच ह्या श्रीप्रभु मंदिराच्या झालेल्या जीर्णोद्धारात समस्त करडखेड आणि पंचक्रोशीतील प्रभुभक्तांबरोबरच श्री. श्रीपाद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे.
श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानंतर श्री शंकर माणिकप्रभु येथे आले नाहीत किंवा श्री सिद्धराज माणिकप्रभु येथे आले नाहीत. ते का बरे आले नाहीत? अशातच श्री सिद्धराज प्रभुंचा सन २००१ मध्ये सगरोळी दौरा होता. त्यावेळेस श्री गुरुदासांनीनी सगरोळी येथे जाऊन श्री सिद्धराज प्रभुंना विनंती केली की, महाराज, आपण प्रभुगादी दर्शनासाठी करडखेडला अवश्य यावे. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभु गुरुदासांना म्हणाले, का नाही? येतो ना मी, न यायला का झालं? अवश्य येतो. त्यावेळेस श्री गुरुदास म्हणाले, महाराज, थोडी आर्थिक अडचण आहे. तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, काही काळजी करू नको. मी येतो. श्री सिद्धराज प्रभु करडखेडला आले तो दिवस, वैशाख शुद्ध चतुर्थीचा होता. सन २००१ मध्ये श्री प्रभुगादीची पूजा झाली. श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली. श्री सिद्धराज प्रभु महाराज अत्यंत संतुष्ट झाले. गुरुदासांनी महाराजांना सुकामेवा खावयास दिला. तेव्हा महाराज म्हणाले, मला हे काही नको. मला दही आणि पोहे दे! तेव्हा गुरुदासांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. मी सुदाम्यासारखा आहे म्हणूनच माझ्या गुरूंनी माझ्याकडे दही पोहे मागितले, असा धन्यतेचा भाव त्यांच्या मनाला झाला आणि त्यांना आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आजच्या करडखेड दौऱ्यामध्ये जेथे श्री ज्ञानराज प्रभुंचे आसन होते, जेथे श्रीजींची पाद्यपूजा झाली, त्याच ठिकाणी श्री सिद्धराज प्रभु बसले होते. तेथेच त्यांची पाद्यपूजा झाली होती. आणि श्री सिद्धराज प्रभु माणिकनगरला परतल्यानंतर, जवळजवळ सहा महिने श्री सिद्धराज प्रभुंच्या पाद्यपूजेच्या जागेवर श्री गुरुदासकाका अक्षरशः रोज रात्री लोळण घालायचे. ही माझ्या गुरूंचे चरण धूतलेली जागा आहे. आता मला मरण आले तरी चालेल. माझे जीवन धन्य झाले. आणि त्या धन्यतेतच श्री गुरुदासांनी अश्विन शुद्ध षष्ठीला सर्वांना मी येतो म्हणून मोठ्याने जय गुरु माणिक, जय शंकर म्हणून अगदी सहज प्राण सोडला.
त्याआधी १९६६ साली गुरुदासकाका माणिकनगरला असताना श्री सिद्धराज प्रभुंनी त्यांना विचारले, तुम्हाला किती मुलं मुली? तेव्हा गुरुदास म्हणाले, महाराज, दोन मुली आहेत मला. तेव्हा सिद्धराज प्रभु म्हणाले, मुलगा नाही? गुरुदास काकांनी, नाही म्हणून विनम्रपणे सांगितले. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभुंनी एका सेवेकऱ्याला म्हटले की, प्रभु मंदिरात आलेला प्रसाद घेऊन ये रे! त्यामध्ये केळ होतं, थोडं जास्त पिकलेलं आणि एक खारका. तो प्रसाद गुरुदासांना देऊन म्हटले, जा आता! दोन दिवसांनी दत्तजयंती होती. श्री गुरुदासांनी तो प्रसाद तसाच ठेवून दिला होता. करडखेडला परत घरी येईस्तोवर ते केळ पूर्णपणे खराब होऊन जवळजवळ नासले होते. एक पण गुरुदासांच्या पत्नी, सौ. मनोरमाबाईंनी त्या केळ्याचा प्रसाद सालीसकट तसाच खाल्ला आणि खारका बी सकट खाऊन टाकली. श्री प्रभकृपेने गुरुदासांना दीड वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली त्या मुलाचे नाव त्यांनी माणिक ठेवले. धन्य तो भक्त, धन्य ती गुरुभक्ती आणि धन्य ती भक्ताची गुरुवरील अचंचल श्रद्धा.
श्री प्रभुगादीसमोर नतमस्तक होताना रंगुबाईची, गुरुदास यांची अनन्य भक्ती आठवली. श्री प्रभुगादीभोवती गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रचंड स्पंदन जाणवतात. देगलूर परिसरात आपण कधी गेलात तर ह्या प्रभुगादीला अवश्य भेट देऊन श्री प्रभुच्या चैतन्याचा जरूर अनुभव घ्यावा.

करडखेडला गावाच्या वेशीपासून श्रीप्रभु मंदिरापर्यंत श्री सकलमताचार्यांची जंगी मिरवणूक निघाली. पावसामुळे येथेही दोन-तीन दिवसांपासून लाईट नव्हती. त्यामुळे रात्रीच्या समयी दिवट्या, मोबाईलचे लाईट आणि बॅटरीवर चालणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात, श्रीप्रभुनामाच्या जयघोषात श्रीप्रभु मंदिराच्या दिशेने सरकणारी श्रीजींसहित भक्तांची मांदियाळी मोठी विलोभनीय दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. जवळपास संपूर्ण करडखेड गाव आज श्रीप्रभु मंदिरात एकवटला होता. श्रीजींची एक छबी आपल्या डोळ्यांमध्ये आणि हृदयामध्ये साठवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होते. अलीकडे जीर्णोद्धार झालेले श्रीप्रभु मंदिर आतून अत्यंत स्वच्छ आणि नेटकेपणाने ठेवले आहे. मुख्य गाभाऱ्यात वर वर्णिल्याप्रमाणे श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्थापन केलेली गादी आहे. श्रीप्रभुगादीला आज फुलांची आकर्षक सजावट केली होती. समईच्या, दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात काळ्या दगडाची श्रीप्रभुगादी अत्यंत मनोहर दिसत होती. गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला श्रीजींना बसण्यासाठी आसन सुशोभित करून ठेवले होते. याच जागेवर श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली होती.
मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ येताच भक्तकार्य कल्पद्रुमचा, आसमंत दुमदुमून टाकणारा, जयघोष झाला. श्री कुलकर्णी कुटुंबाने श्रींजींचे चरण प्राक्षाळले. सुवासिनींनी त्यांना ओवाळले. श्रीप्रभु मंदिरात प्रवेश करताच, श्रीजींनी सर्वप्रथम गादीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीजींना अत्यंत आदरपूर्वक आसनावर बसविले गेले. श्रीजींनी अभयकरांनी आशीर्वाद देऊन, सर्वांना खारकांचा प्रसाद दिला. त्यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी श्रीजींचे दर्शन घेतले. श्रीजींचा आशीर्वाद व प्रसाद मिळाल्यामुळे प्रत्येक जण उत्साहात होता. सर्वांचे आशीर्वचन झाल्यावर, श्रीप्रभुंची आरती करण्यात आली. सर्व गावकऱ्यांसाठी श्रीप्रभु मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन केले होते.
श्री. कुलकर्णी कुटुंबाने मंदिराशेजारीच असलेल्या आपल्या घरी श्रीजींना प्रसादासाठी निमंत्रित केले होते. पावसामुळे परिसरात लाईट तर नव्हतीच, पण जनरेटरलाही मध्येमध्ये दम लागत होता. कुलकर्णी कुटुंबाने पंगतीसाठी सर्वत्र मेणबत्त्या लावल्या. मेणबत्त्यांच्या त्या प्रकाशात सर्वांची भोजने पार पडली. यानिमित्ताने श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळात कदाचित असेच वातावरण असेल, अशी कल्पना माझ्या मनाने केली. कुलकर्णी कुटुंबाने अगदी पंचपक्वान्नाचा बेत प्रसादासाठी केला होता. गेले तीन दिवस लाईट नसताना, मोटरपंप बंद असतानाही, दूरवरून हातपंपाचे पाणी आणून प्रभुभक्तांची पाण्याची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची परोपरीची काळजी घेतली होती. आपुलकीच्या, प्रेमळ आग्रहाने वाढलेल्या अत्यंत सुग्रास महाप्रसादाचा आस्वाद घेऊन तृप्त होत असतानाच, शेवटी श्रीजींच्या उच्छिष्टांचा प्रसाद सर्वांना मिळाला. श्रीजींच्या सहवासात चैतन्याची अनुभूती होत असतानाच, उच्छिष्टांच्या प्रसादाने देह आणि मनबुद्धीचीही शुद्धी होत होती. प्रसादानंतर श्री. कुलकर्णी कुटुंब आणि समस्त करडखेड ग्रामवासियांना मंगलमय आशीर्वाद देत श्रीजी आणि आम्ही सर्व रात्री दहाच्या सुमारास माणिकनगरसाठी परतीच्या प्रवासाला निघालो.
रात्रीची वेळ, अनोळखी रस्ता (रस्त्यांमधील खड्डे चुकवायचे की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा हा मोठा संभ्रम महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत कायम राहिला), त्याचवेळी सुरू झालेला पाऊस हे सर्व कसोटी पाहणारे होते. पण “आपल्याला राखणारा प्रभु समर्थ आहे”, हा दृढ भाव मनी होता, श्री प्रभुंच्या पादुकाही गाडीत सोबतीला होत्या. त्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय आम्ही मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास श्रीमाणिकनगरी विनासायास पोहोचलो. श्री. गुरुनाथ भटजी, श्री. नरसिंह भटजी आणि श्री. तिरुमल भटजी यांच्या सहवासात प्रभुलीलांचे गुणगान करत, मध्येच प्रभुंची प्रासादिक पदे म्हणत, तिघांपैकी प्रत्येक जण प्रभुसेवेमध्ये माणिकनगरात कसा आला, हे ऐकणे फारच आनंददायी आणि रोमांचकारी होते. खरेच, प्रभुभक्तांच्या सहवासात प्रभुंच्या लीला, त्यांचे अनुभव, त्यांची अनुभूती ऐकताना वेळ कसा निघून जातो, हे अजिबात कळतच नाही. ह्या प्रवासादरम्यान श्री, गुरुनाथ भटजींचा गळा किती गोड आहे, तसेच प्रभुपदे म्हणताना त्यांचे रंगून जाणे, अनुभवता आले. तिघांच्याही कथांतून त्यांचा श्री प्रभुप्रती अत्यंत कृतज्ञ भावच दिसून आला.
शनिवारी सकाळी दयाघन श्रीप्रभुचे मनोभावे दर्शन घेऊन, श्रीजींच्या हस्ते खारकांचा प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मंगळवारपासून सुरू झालेला, जीवन समृद्ध करणारा, विविध प्रसंगातून मनावर खोल परीणाम करणारा, श्रीजींचा सगरोळी दौरा आणि त्यातले प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर एकापाठोपाठ एक तरळत होते. ठाण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये कारमध्ये सुरू असलेल्या प्रभुपदांबरोबरच ते प्रसंगच माझे सोबती होते. श्रीजींचे सहजपणे जनमानसांत मिसळणे, सर्वांत राहूनही आलिप्त असणे, त्यांचे सर्वच विषयांवरील आणि पंचमहाभूतांवरील असलेले प्रभुत्व, भक्तांच्या शंकांचे आणि संकटांचे निरसन करणे, वृत्तीची स्थितप्रज्ञता, सर्वांना समदृष्टीने पाहणे, भक्तांचे अंतरंग ओळखणे, प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता, भक्तांना सामोरे जाणे, सर्वांचे सुहास्य वदनाने अभिष्टचिंतन करणे, सर्वांना ज्ञान देऊन भक्तीमार्गात प्रशस्त करणे, प्रसंगी मौन धारण करणे, चौफेर निरीक्षण, हे आणि असे अनेक ग्राह्य गुण आठवताना, त्याचे मनन, चिंतन करत असतानाच प्रशस्त असा मुंबई पुणे महामार्ग (एक्स्प्रेस वे) लागला. तोही जणू काही श्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातील ग्राह्य गुणांचे, सकलमत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे सतत मनन, चिंतन आणि निधीध्यासन केल्यास, आपल्या जीवनरुपी गाडीला ज्ञान आणि भक्तीची चाके लावल्यास, आपल्याही जीवनाची गाडी श्रीप्रभुच्या ह्या राजमार्गावर, अंतिम साध्याच्या दिशेने आश्वासकपणे मार्गस्थ होईल, हेच सांगत होता.
समाप्त.
Recent Comments