by Pranil Sawe | Dec 3, 2023 | Uncategorized
झोळीपूजा आणि अन्नपूजा – माणिकनगर येथील एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा
माणिकनगर येथील वास्तव्यामध्ये झोळीपूजा आणि अन्नपूजा या दोन विशेष पूजांनी माझे मन अनेकदा वेधून घेतले. इतर दत्तक्षेत्रांमध्ये ही परंपरा सहसा आढळून येत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ह्या नितांतसुंदर अशा परंपरेचा मागोवा घेतला असता, अनेक भक्तमंडळी झोळीपूजा आणि अन्नपूजा करतात असे कळाले. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता म्हणून मुख्यत्वे होत असलेल्या ह्या दोन पूजेंची माहिती इतरांसही मिळावी, आणि त्यांनीही प्रभुची कृपा संपादन करण्याची संधी मिळावी, म्हणून हा अल्पसा लेखन प्रपंच.
श्रीप्रभुंनी लहानपणी मामाचे घर सोडल्यावर, मंठाळच्या अरण्यात अमृतकुंडावर एकांतात साधना केली आणि प्रत्यक्ष श्रीदत्तात्रयांनी तेथे प्रभुंना झोळी आणि सटक्याचा प्रसाद दिला, हे सर्वश्रुतच आहे. त्यानंतरही ह्या झोळीचा आणि पर्यायाने श्री अन्नपूर्णा मातेचाच अखंड वरदहस्त श्री प्रभुसंस्थानावर आहे, ज्याच्या प्रसादस्वरूप श्री संस्थानामध्ये आजतागायत अन्नधान्याची आणि प्रसादाची कधीही कमतरता जाणवली नाही. श्रीमाणिक प्रभुंनीही आपल्या अवतार काळामध्ये, सदैव भिक्षान्न स्वीकारले. पंचपक्वान्नाचे जेवण असले तरी प्रभु झोळीमधील भिक्षा किंवा माधुकरीच घेत. श्री माणिक चरितामृतामध्येही चोवीसाव्या अध्यायात भिक्षेचे महत्त्व विस्ताराने वर्णिले आहे. त्यामुळे सकलमत संप्रदायांमध्ये आणि समस्त प्रभुभक्तांमध्ये भिक्षेच्या झोळीचे विशेष महत्त्व आहे. झोळीची ही परंपरा श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आहे.
श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीनंतर श्री मनोहर माणिकप्रभुंच्या काळात झोळीपूजेची परंपरा सुरू केली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. देह रूपाने श्रीप्रभु जरी समाधीस्थ झाले, तरी चैतन्य स्वरूपाने ते आपल्यातच आहेत, आणि त्यांच्या नैवैद्याकरिता अखंड सुरू असलेले नित्यभिक्षेचे विधान, हे श्रीमाणिक प्रभु संस्थानाच्या आस्था आणि विश्वासाचे परमविशेष आहे. भिक्षेसाठी आजही झोळी माणिकनगरमध्ये पाच घरी फिरते आणि प्रभुंच्या नैवेद्यासाठी भिक्षा आणली जाते. जे भक्त माणिकनगरात राहत नाहीत, पण त्यांना झोळी घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही झोळीपूजेची व्यवस्था साक्षात् प्रभुंनीच जणू अत्यंत कृपाळूपणे केली आहे.

झोळीपूजेमध्ये झोळीमध्ये प्रभुंचा छोटा सटका असतो, त्याची मुख्यत्वे पूजा होते. त्याला स्नान घालून, गंध लावून सटक्याची पूजा केली जाते. त्यानंतर पूजेच्या वेळी नैवेद्याचे जे मंत्र म्हटले जातात, ते मंत्र म्हणून त्यावेळी झोळीमध्ये यथाशक्ती नैवेद्य, शिधा ठेवला जातो. त्यानंतर झोळी बंद करून, पुन्हा झोळीची गंध वैगरे लावून पंचोपचार पूजा होते, नैवेद्य दाखवून, आरती केली जाते. आजही जुन्या प्रभुंभक्तांमध्ये (श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासूनच्या) आजही काही मंगलकार्य, जसे लग्न किंवा मुंज वगैरे पार पडली की, त्यानंतर ते भक्त माणिकनगरला प्रभुमंदिरात येऊन झोळीपूजा करतात. विद्यमान प्रभुपरिवारामध्येही ही परंपरा आवर्जून पाळली जाते. ह्या वेळेस झोळी घेणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचीही हार घालून, आरती करून पूजा केली जाते. एकंदरीतच झोळी पूजा ही प्रभुंच्या ब्रह्मचारी स्वरूपाची किंवा अवधूत दिगंबर किंवा माधुकरी वृत्तीचीच पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अन्नपूजा ह्या पूजा विधीमध्ये श्रीप्रभुसमाधीस दहीभाताचे लिंपण केले जाते आणि नंतर हा दहीभात भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. अन्नपूजेचा संबंध महादेवाच्या पूजेशी आहे. रुद्र अनुष्ठानाची सांगता अन्नपूजेने होते. साधारणतः शंकराच्या पिंडीला अशा प्रकारचे दहीभाताचे लिंपण केले जाते. काही ठिकाणी देवीलाही दहीभाताचे लिंपण करून अन्नपूजेचा विधी पार पडला जातो. हलाहल प्राशन केल्यामुळे शरीराला झालेला दाह कमी व्हावा, या भावनेने श्रीशंकरास दहीभाताच लिंपण आणि असुरांशी युद्ध केल्यावर, देवीला आराम मिळावा म्हणून दहीभाताचं लिंपण करण्याची परंपरा पूर्वापारपासून अनेक ठिकाणी चालत आली आहे. माणिकनगरातही प्रभुसमाधीस अन्नपूजेची परंपरा गेले अनेक वर्षे अखंड सुरू आहे.
प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या परिवाराकडून श्रीप्रभु समाधीची अन्नपूजा केली जाते. आजही प्रभुंचे नवरात्र दुबळगुंडीच्या रामण्णापंतांच्या कुटुंबाकडे आहे व ते माणिक नगरी येऊन ही प्रभू सेवा करतात. त्यांची अन्नपूजा पाहून इतरांनाही या अन्नपूजेची प्रेरणा झाली. आपले काही काम अडले असल्यास, मी प्रभुची अन्नपूजा करेन, असा नवस अनेक प्रभुभक्त करतात किंवा प्रभुगादीच्या पीठाचार्यांनीही आपल्या भक्तांना, तुमचे काम होईल, काम झाल्यावर प्रभुसमाधीची अन्नपूजा करा, असे अनेकदा सांगितल्याचे कळते. थोडक्यात, प्रभुप्रती कृतज्ञता किंवा नवस पूर्ततेचा विधी म्हणून अन्नपूजेकडे आपल्याला पाहता येईल.
ह्या अन्नपूजेचेही मोठे वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला माणिकनगरी पहायला मिळते. चांदीच्या घंगाळवजा पातेल्यात (ह्याला कन्नड भाषेत कोप्परगी असं म्हणतात) पाच एक किलो दहीभात असतो आणि चांदीच्या पात्रामध्ये अकरा वडे असतात. अन्नपूजेच्या वेळेस हे दहीभात प्रभुमंदिरात ठेवले जाते. श्रीप्रभु समाधीची महान्यासपूर्वक रुद्राभिषेक महापूजा होते. त्यानंतर प्रभूंना वस्त्रसाज केल्यावर, जेव्हा नैवेद्याचे मंत्र येतात त्यावेळी, श्रीप्रभु समाधीस पडदा केला जातो आणि श्रीप्रभु समाधीवर छाटी ठेवली जाते. त्यावर हा दहीभात पसरवला जातो. ह्यावेळी भृगुवल्लीतील अन्नपूजेचे मंत्र म्हटले जातात. श्रीप्रभु समाधीवर पसरवलेल्या दहिभातावर वडे ठेवले जातात. आणि श्रीप्रभु समाधीला हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पसरवलेल्या दहीभातावर पुन्हा एक छाटी टाकली जाते आणि त्यावर गिलाफ (प्रभू समाधीस चारी बाजूंनी घालण्यात येणारे वस्त्र) घातला जातो. गिलाफ घातल्यावर शाल आणि अलंकार घातले जातात. त्याचबरोबर श्रीप्रभु समाधीसमोर आणखी एका ताटात दहिभात ठेवतात आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो, श्रीप्रभु समाधीची आरती केली जाते. त्याचबरोबर यजमानाच्या नवसाच्या पूर्णतेच्या / समाप्तीचा संकल्प सोडला जातो. दोन नारळ फोडले जातात आणि समाधीवर अक्षता टाकून गिलाफ काढला जातो. त्यानंतर श्रीप्रभु समाधीवर असलेलया अन्नपूजेच्या दहीभाताचा प्रसाद गोळा केला जातो. त्यावेळीही पुन्हा उपनिषदातील मंत्र म्हटले जातात. दहीभात पूर्ण टिपून घेतल्यावर, श्रीप्रभु समाधीस स्नान घालून, पुन्हा पंचोपचार पूजा होते आणि वस्त्रालंकार घालून प्रभुंची आरती करून पुष्पांची नेहमीप्रमाणे सजावट करतात. श्रीप्रभु समाधीची ही पूजा पूर्ण झाल्यावर, यजमानांना वडे आणि दहीभात प्रसाद म्हणून दिला जातो आणि उरलेला दहिभात प्रभू मंदिरात असणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.
एकादशी, महाशिवरात्री, श्रावण मास आणि दत्त जयंतीच्या उत्सवाचे पाच दिवस अन्नपूजा केली जात नाही.
थोडक्यात आपल्या घरातील मंगल कार्य पार पडल्यावर झोळीपूजा करण्याचा आणि नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा संकल्प पूर्तीसाठी अन्नपूजा करण्याची परंपरा, अनेक प्रभुभक्तांकडून आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहता येते. आपल्या घरातील मंगल कार्यात श्रीप्रभु आपल्याला काहीही कमी न पडू देता आपली झोळी सदैव भरलेली ठेवतो आणि अशा ह्या भक्तकार्यकल्पद्रुम प्रभुप्रती प्रेम अथवा कृतज्ञता म्हणून झोळीपूजेचे आणि अन्नपूजेचे विधान प्रभुभक्तांमध्ये प्रचलित आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा नविन भक्तांना जर अशी पूजा करायची इच्छा असल्यास आणि आगाऊ सूचना दिल्यास श्री संस्थानाकडून तशी व्यवस्था अत्यंत अल्प दरात केली जाते. झोळीपूजा आणि अन्नपूजा ह्या वैशिष्ट्यपूर्ण विधींची माहिती दिल्याबद्दल श्री माणिक प्रभु संस्थानाचे मुख्य अर्चक श्री. गुरुनाथ गुरुजी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अन्नपूजा किंवा झोळीपूजेच्या निमित्ताने आपणासही प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शीघ्रातीशीघ्र प्राप्त होवो, आणि त्याच्या फलस्वरूप आपली ही झोळी श्रीप्रभु कृपेने निरंतर भरलेली राहो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखीन एका लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक
by Uma Herur | Oct 17, 2023 | Uncategorized
जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।
दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।
बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।
वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,
जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.
दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.
त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,
आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।
श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।
‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,
आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।
साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,
द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।
या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.
बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।
भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,
देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।
तसेच,
गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।
श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.
पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)
त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,
अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।
ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,
वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.
स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,
श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।
हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,
यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।
आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।
अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.
या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.
by Pranil Sawe | Sep 14, 2023 | Uncategorized

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता ।
नृसिंहतात्या नामे विख्याता ।
विठाबाई पत्नी पतीव्रता ।
तात्या महाराजांची ॥१॥
नाईक घराण्याची वंशवेल ।
नृसिंहतात्याच आता फुलवेल ।
दत्तप्रसाद लवकरच भेटेल ।
आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥
होते कालयुक्ति नाम सवंत्सर ।
श्रावण अमावास्या दिवस थोर ।
पुलकित झाले माणिक नगर ।
नांदी मनोहर अवताराची ॥३॥
श्रावणमास उत्सवाचा अंतिम दिवस ।
कृष्णमेघांनी व्यापिले सकल आकाश ।
सूर्यदेवही व्याकुळ दर्शन घेण्यास ।
महायोगी बालकाचे ॥४॥
नऊमास पूर्ण झाले गर्भधारणास ।
परी न दिसे प्रसूतीचे काही चिन्हास ।
काळजी अत्यंत लागली विठाम्मास ।
धावा प्रभुचा करितसे ॥५॥
सकळजन चिंता करिती ।
श्रीमाणिकसी येऊनि विनविती ।
होऊदे विठाम्माची प्रसुती ।
निर्विघ्नपणे प्रभुराया ॥६॥
कनवाळू श्रीमाणिक कृपाघन ।
आला विठाम्मापाशी धावून ।
विठाम्मा विव्हळे कळवळून ।
कृपादृष्टी अवलोकी ॥७॥
गर्भस्थ शिशूस संबोधून ।
श्रीमाणिक बोले प्रेमवचन ।
मातेसी ऐसे छळण ।
योग्य नव्हे ॥८॥
जन्म घेणे आपणांसी क्रमप्राप्त ।
रहाल सदैव संसार बंधमुक्त ।
माणिक वचनी होऊनी आश्वस्त ।
प्रकटावे शीघ्रातीशीघ्र ॥९॥
ऐकोनी श्रीमाणिकप्रभुची विनंती ।
पुढील अवतारकार्याची निश्चिती ।
माणिकवचने मिटली भ्रांती ।
नवजात अर्भकाची ॥१०॥
विठाम्माउदरी अत्रि अंश आला ।
मनोहर नामे श्रीगुरू अवतरला ।
वाढवील जो ब्रह्मचर्य व्रताला ।
आधारभूत होऊनिया ॥११॥
मुखमंडलाची प्रभा ऐसी ।
फाकली दहाही दिशी ।
बैलपोळ्याचा सणही त्यादिवशी ।
हर्षोल्हास चोहीकडे ॥१२॥
बैल आपापले सजवून ।
येती माणिकदर्शना घेऊन ।
सवाद्ये होतसे बैलपूजन ।
अवघा आनंदसोहळा ॥१३॥
पंचक्रोशीतील आले समस्त जन ।
प्रभुसहित घेती बालकाचे दर्शन ।
टाकीले मन सर्वांचे मोहून ।
मनोहर नाम यथार्थ ॥१४॥
नाम ठेविले मनोहर ।
जाणा तोचि विधीहरीहर ।
जग तारावया भूमिवर ।
मनोहररूपे अवतरला ॥१५॥
ऐसा अवतार मनोहर ।
सकलमताचा पुढील धरोहर ।
माणिकप्रभु जाणती खरोखर ।
आपुल्या अंतरात ॥१६॥
हा जरी अल्पायुषी होईल ।
सवाई माणिकप्रभु म्हणवून घेईल ।
सर्वश्रुत माणिक प्रभुंचे बोल ।
सहजी जे निघाले ॥१७॥
एकदा काय नवल घडले ।
प्रभु गादीवरी अप्पासाहेब बैसले ।
पाच वर्षाचे बालक सानुले ।
प्रभु दरबारामाजी ॥१८॥
करती प्रभु बैठकीचे अनुकरण ।
तैसेच गंभीर स्वरूप धारण ।
समस्त करिती मनोहराचे अवलोकन ।
प्रभु पातले तत्क्षणी ॥१९॥
बाळ मनोहरासी पाहुनी ।
बैसला गादीसी बळकावूनी ।
बोलती तयासी हांसूनि ।
कृपानिधी प्रभुमहाराज ॥२०॥
माझी गादी तुला हवी का रे ।
आता मी काय सांगतो ऐक रे ।
गादीवर बैसता दागिने सारे ।
दान करणे दुस-यासी ॥२१॥
अप्पासाहेब प्रभुसी वदती सत्वर ।
सांगेन त्यासी देण्यास तयार ।
दागिने सगळे काढून भरभर ।
ठेविले प्रभुपुढे ॥२२॥
पाहुनि वैराग्याची मूर्तीमंत मूर्ती ।
माणिक प्रभु मनोमन संतोषती ।
लहानशी गादी मांडून बैसविती ।
शेजारी बालमनोहरास ॥२३॥
वैराग्याची महाकठीण स्थिती ।
कृतीतून सहज दाखविती ।
दातृत्वाची तीच माणिकवृत्ती ।
मनोहराठायी उपजली ॥२४॥
प्रभुसमाधी समय जवळ येता ।
भक्तांस लागली उत्तराधिका-याची चिंता ।
कोण संभाळील प्रभुगादीस आता ।
खलबते नानाविध ॥२५॥
जरी तात्यासाहेबांचे पुत्र दोन ।
परी होते लहान आणी अज्ञान ।
एकाचे वय सात, एकाचे तीन ।
सर्वार्थे अयोग्य म्हणती ॥२६॥
भालकीस होता एक युवक ।
मच्छिंद्रराव नामे प्रभुंचा सेवक ।
प्रभुगादी चालविण्यांस तोच लायक ।
धारणा अनेकांची ॥२७॥
बालपणापासून होता लाडका प्रभुंचा ।
प्रभुंचाही व्यवहार अत्यंत प्रेमाचा ।
करतील विचार प्रभु मच्छिंद्ररावाचा ।
गादीवर बैसविण्यास ॥२८॥
उतावीळ होती भक्तजन ।
मच्छिंद्ररावास मेण्यात बैसवून ।
घेऊन येती भालकीहून ।
सवाद्ये मिरवणूक ॥२९॥
भक्तांनी आणली एक गादी ।
प्रभुंच्या उत्तराधिकाराची जी नांदी ।
गादीवर बैसविले प्रभु संन्निधी ।
मच्छिंद्ररावास ॥३०॥
त्याच रात्रीस लीला घडली ।
मच्छिंद्ररावाची गादी खाक झाली ।
ज्या प्रभुगादीची स्वप्न पाहिली ।
नव्हती ती नशीबांत ॥३१॥
काहीच झाले नाही समजून ।
भक्त करिती प्रयत्न परतून ।
प्रभु मच्छिंद्ररावास मांडीवर बैसवून ।
कधी घेतील ॥३२॥
ऐसी उत्कंठा शिगेस पोहोचत ।
वदंता उठली प्रभु दरबारात ।
चाळीस हजाराचे कर्ज असत ।
प्रभुमहाराजांवरी ॥३३॥
जो कोणी उत्तराधिकारी होईल ।
तोच ह्या कर्जासी चुकविल ।
फकिरी संस्थान, कैसे होईल ।
मच्छिंद्रराव विवंचनेत ॥३४॥
मानाची जरी गादी घ्यावी ।
कर्जाची धोंड गळी पडावी ।
पेक्षा आपली भालकी गाठावी ।
हेच बरे ॥३५॥
एकादशीस जेव्हा समाधीत बैसती ।
मच्छिंद्ररावास प्रभु सांगावा धाडती ।
भालकीस पळून गेल्याचे सांगती ।
शिष्य प्रभुमहाराजांस ॥३६॥
प्रभुगादी चालविणे सोपे नाही ।
योग्य अधिकाराविणा शक्य नाही ।
ये-यागबाळ्यास हे झेपणे नाही ।
म्हणे प्रभु माणिक ॥३७॥
मार्गशीर्ष एकादशीचा पुण्य दिवस ।
निश्चित केला संजीवन समाधीस ।
नृसिंह तात्यांच्या उभय पुत्रांस ।
बोलाविणे धाडिले ॥३८॥
येता उभयतां मांडीवर बैसविले ।
क्षण दोन त्यांसवे घालविले ।
आरती पुजापाठ विधीवत करविले ।
सप्रेमे माणिकप्रभुने ॥३९॥
मनोहरास पांघरविला अंगावरील दुशाला ।
प्रसादरूपी घातली गळ्यात माळा ।
मंत्रोपदेश देऊनि प्रसाद दिधला ।
लहानग्या मनोहरास ॥४०॥
असला वयाने लहान जरी ।
बालमनोहर हाच माझा उत्तराधिकारी ।
दत्तगादीची सेवा करील परोपरी ।
प्रभु वदे अंतिमक्षणी ॥४१॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
मनोहराच्या सामर्थ्याची प्रभुंस जाण ।
आपल्या पाठीमागे संस्थानाचे मोठेपण ।
वाढविल निश्चित ॥४२॥
चालविल सकलमत संप्रदाय परंपरा ।
म्हणतील सवाई माणिकप्रभु दुसरा ।
मनोहरावर ठेऊनि भार सारा ।
प्रभु जाहले समाधिस्त ॥४३।।
बालमनोहरावर ठेऊनि सारी भीस्त ।
श्रीप्रभु झाले संजीवन समाधिस्त ।
कैसी लागेल प्रभुदरबारास शिस्त ।
चिंता समस्तांसी ॥४४॥

प्रभुसमाधीनंतर पहिलाच दरबार ।
लोटला भक्तजनांचा सागर ।
प्रभुसिंहासनावर बालमूर्ती मनोहर ।
सुहास्य वदनी ॥४५॥
दृष्टी समस्तांची मनोहर मुखमंडलावर ।
म्हणती श्रीमाणिक बालमूर्ती खरोखर ।
जो तो आपापल्या वृत्तीनुसार ।
प्रभुसी पाहे मनोहरात ॥४६॥
गादीवर बैसता कर्जाची हकीकत ।
कर्तव्यदक्ष मनोहरप्रभु जेव्हा जाणत ।
यादी बनविण्याचे फर्मान काढत ।
कोणाचे किती देणे ॥४७॥
अप्पासाहेब सांगती बाप्पाचार्यांस ।
निरोप धाडणे देणेक-यांस ।
पत्रे पाठवूनी येण्यास ।
सत्वर सांगितले ॥४८॥
एकेक करोनि जमले सावकार ।
प्रमुख त्यात गोसावी किसनगीर ।
देणे त्याचे दहा हजार ।
श्रीप्रभुंचे होते ॥४९॥
हिशोब कर्जाचा किसनगीरासी विचारता ।
सविनय बोले तो तत्वता ।
प्रभुंना कर्ज देण्याची योग्यता ।
सर्वार्थे नाही माझी ॥५०॥
प्रभुकृपेनेच लक्षावधी नफा जाहला ।
परी दानधर्म नाही काही घडला ।
दहा हजार देता श्रीप्रभुला ।
दानधर्म अनायसे ॥५१॥
ते नव्हतेच कधी ऋण ।
परतफेडीचा नाही काही प्रश्न ।
मनीचे सारे द्वंद्व काढून ।
निश्चिंत व्हावे ॥५२॥
ऐकोनि किसनगीराचे मृदुवचन ।
अप्पासाहेब संतोषले मनोमन ।
किसनगीरास देऊनि पुढारीपण ।
तडजोड करावया इतरांसी ॥५३॥
किसनगीर अत्यंत हजरजबाब ।
देयराशी निश्चिती ताबडतोब ।
मांडूनि यथायोग्य हिशोब ।
अप्पासाहेबांपुढे ठेविती ॥५४॥
पाहुनि एवढ्या मोठ्या रकमेस ।
जनांची उत्सुकता पोहोचली शिगेस ।
अप्पासाहेब शांत त्याही समयास ।
बैसले दरबारात ॥५५॥
एवढ्यात पहा नवल घडले ।
दरबारात सुखद वृत्त धडकले ।
प्रभुसेवार्थ काही दान धाडले ।
विठ्ठलराव तालुकदाराने ॥५७॥
थोडे थोडके नव्हे गाडीभर ।
उतरला कर्जाचा सर्व भार ।
निमित्तमात्र विठ्ठल तालुकदार ।
कर्ताकरविता श्रीमाणिक ॥५७॥
सावकारांचे कर्ज फेडून ।
आशीर्वचन प्रसाद देऊन ।
समस्तांचे आभार मानून ।
आनंद वर्तला ॥५८॥
बाप्पाचार्य मुख्य कारभारी ।
अप्पासाहेबांची पाहून कर्तबगारी ।
वंदिती चरण वारंवारी ।
बालमनोहराचे ॥५९॥
माणिकप्रभु जयंतीची पौर्णिमेची रात्र ।
मनोहरप्रभु करिती महापूजा प्रभुमंदिरात ।
अतोनात गर्दी प्रभुमंदिर परीसरात ।
घ्यावया प्रभुदर्शन ॥६०॥
झाली महानैवेद्याची वेळ ।
सदाशिवराव नेसून सोवळ ।
भंडारखान्यातून नैवेद्याची थाळ ।
घेऊनि येती ॥६१॥
नैवेद्य घेऊन येता प्रभुमंदिरात ।
म्हातारा एक बैसला वाटेत ।
लपेटून घेतले स्वतःस घोंगडीत ।
अस्ताव्यस्त ध्यान ॥६२॥
स्पर्श झाला म्हाता-यास चुकून ।
विटाळ प्रसादास झाला म्हणून ।
म्हाता-यास अद्वातद्वा बोलून ।
गेले परतोनी ॥६३॥
अभ्यंग स्नान करून ।
स्वयंपाक पुन्हा करून ।
सोवळ्यात महानैवेद्य घेऊन ।
सदाशिवराव पातले ॥६४॥
पूजा संपल्यावर स्वस्थ झोपले ।
स्वप्नी श्री माणिकप्रभुच आले ।
सदाशिवरावास प्रभु बोलले ।
ऐका एकचित्ते ॥६५॥
आलो जत्रेची मजा पहावया ।
घेऊनि येसी माझिया नैवेद्या ।
माझाच स्पर्श होता तया ।
विटाळ कैसा ॥६६॥
सदाशिवराव अत्यंत शरमिंदे झाले ।
माफी मागण्या मनोहरप्रभुंकडे आले ।
पाय धरण्या पुढे सरसावले ।
मनोहर प्रभुरायाचे ॥६७॥
पाय धरावया जैसे वाकले ।
मनोहर प्रभु मागे झाले ।
नको सदाशिवराव, पुरे झाले ।
विटाळ उगाच होईल ॥६८॥
मनोहरप्रभुंच्या अंतर्ज्ञानित्वाची जाण ।
सदाशिवरावास झाली मनोमन ।
मनोहरप्रभुस जाऊन शरण ।
करूणा भाकतसे ॥६९॥
भक्तवत्सल प्रभु मनोहर ।
सदाशिवरावास वदति साचार ।
जयंती उत्सवात येती खरोखर ।
विविधरूपे प्रभुमहाराज ॥७०॥
सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ।
चित्तात ठेवावी हीच खूण ।
भेदभाव सदा सर्वदा सारून ।
सेवावे प्रभुचरण ॥७१॥
मनोहर प्रभु परम मातृभक्त ।
भावा बहिणीवरही प्रेम अत्यंत ।
परी होते वैराग्य मूर्तिमंत ।
त्यांच्या ठायी ॥७२॥
जडला एकदा काही आजार ।
मनोहरप्रभु होती त्याने बेजार ।
लोकाबापू वैद्य दर्शनार्थ हजर ।
होते त्यावेळी ॥७३॥
लोकाबापू करती विशेष यत्न ।
श्रीप्रभुंस आला तात्काळ गुण ।
उंचीवस्त्रे, द्रव्य, प्रसाद देऊन ।
यथोचित गौरविले ॥७४॥
मनोहरप्रभुंच्या गळ्यात एकमुखी रूद्राक्ष ।
श्रीमाणिकप्रभुंनी दिधला प्रसाद प्रत्यक्ष ।
लोकाबापूंचे पडता त्यावरी लक्ष ।
इच्छा होय प्राप्तीची ॥७५॥
मनी रूद्राक्षाचा लोभ वर्तत ।
परी मुखे काही न बोलवत ।
मनकवडे मनोहरप्रभु सर्व जाणत ।
लोकाबापूच्या मनींचे ॥७६॥
जरी लोकाबापू मनीचा हेतू पुरवावा ।
परी सर्वांसमोर रूद्राक्ष कैसा द्यावा ।
परतती लोकाबापू जेव्हा आपुल्या गावा ।
प्रभु येती सोडण्या ॥७७॥
आले चालत संगमापर्यंत ।
लोकाबापूंस बोलावून एकांतात ।
रूद्राक्ष घातला गळ्यात ।
अविलंब प्रभुने ॥७८॥
मनोवांछित जे प्राप्त झाले ।
प्रभुने आपले अंतरंग जाणीले ।
लोकाबापू वैद्य चरणी लागले ।
अंतर्यामी मनोहरप्रभुंच्या ॥७९॥
विठाम्माची प्रबळ इच्छा अंतरात ।
मनोहराने अडकावे विवाह बंधनात ।
इतरांसही पडे विचार पसंत ।
अनुमोदन सर्वांचे ॥८०॥
श्रीप्रभु पाळती नैष्ठिक ब्रह्मचर्य ।
त्यांस विचारण्याचे होईना धैर्य ।
कैसे होईल विवाह कार्य ।
चिंता समस्तांसी ॥८२॥
प्रभुंची वडील भगिनी मुक्ताबाई ।
तिच्या विवाहाची अपूर्व नवलाई ।
उपाध्यायाचा मुलगा केला जावई ।
सालंकृत कन्यादान ॥८२॥
मनोहरप्रभु पंधरा वर्षाचे झाले ।
माणिक नगराचे रूप पालटले ।
शोभिवंत अनेक मांडव उभारले ।
जय्यत तयारी विवाहाची ॥८३॥
परी विवाह कुणाचा कळेना ।
नवरा नवरीचा उलगडा होईना ।
प्रभुमहाराज अडकतील विवाह बंधना ।
अटकळ काहीजणांची ॥८४॥
समग्र तयारी झाली तरी कळेना ।
नवरा नवरी यांचे गूढ उकलेना ।
विठम्मा पुसतसे शेवटी प्रभुंना ।
विवाहसोहळ्या संबंधी ॥८५॥
मनोहरप्रभु वदती विठाम्मास ।
पाळितो आम्ही ब्रह्मचर्यास ।
नवरी पाहिली खंडेरायास ।
विवाहसोहळा खंडीचा ॥८६॥
आठवले माणिकप्रभुंचे विधान ।
जन्मसमयी जे केले कथन ।
ब्रह्मचर्य व्रतास आधार प्रदान ।
करील मनोहर ॥८७॥
मातोश्रीस अती आश्चर्य सखेद ।
परी मिटवूनी अंतरीचा भेद ।
शहाणपणे सोडून दिला नाद ।
मनोहराच्या विवाहाचा ॥८८॥
बाप्पाचार्यांची मुलगी असे पसंत ।
तिजसवे विवाह केला निश्चित ।
मातोश्रीही त्यास होकार देत ।
लग्नसोहळा थाटात ॥८९॥
खंडेरायाचा पार पडला विवाहसोहळा ।
वंशविस्ताराचा मार्ग झाला मोकळा ।
पुत्रविवाह देखिला आपुल्या डोळा ।
समाधान विठाम्माचे ॥९०॥
मनोहरप्रभु परम योगी थोर ।
नित्य योगाभ्यास करती अपार ।
माणिकप्रभु समाधीपाठी तळघर ।
करवून घेतले ॥९१॥
आखून दिलेल्या नमुन्यानुसार ।
परीपूर्ण जाहले तळघर ।
पाहण्या आले प्रभुमनोहर ।
कारभारी मंडळींसह ॥९२॥
तळघरात होत्या तीन कमानी ।
बांधकाम पडले प्रभुंच्या पचनी ।
मधल्या कमानीत आसन घालोनी ।
प्रभुमहाराज बैसले ॥९३॥
नुरला पारावार त्यांच्या आनंदास ।
निघती उद्गार त्या समयास ।
एखाद्या योगी समाधीस्त होण्यास ।
अत्युत्तम स्थान हे ॥९४॥
वरील घटनेस लोटले षण्मास ।
अश्विन कृष्ण सप्तमी तिथीस ।
अचानक बदल झाले प्रकृतीस ।
श्रीमनोहर प्रभुंच्या ॥९५॥
खंडेराव जाणती विद्याशास्त्र सकळ ।
संस्थान गादी सांभाळण्या सबळ ।
अवतार समाप्तीची हीच वेळ ।
ठरविले मनोमन ॥९६॥
जरी प्रभुमहाराज गंभीर अत्यंत ।
धीर देऊनि करिती सकलांस शांत ।
विधीवत चतुर्थाश्रम घेतला क्षणांत ।
वंदिती मातोश्रीस ॥९७॥
आपला कनिष्ठ बंधू खंडेरावास ।
उपदेश देऊन दिधले प्रसादास ।
प्रसाद देऊनि भक्त मंडळीस ।
तोषविले सर्वांस ॥९८॥
सिद्ध करूनि आसन ।
देह केला विसर्जन ।
चैतन्यात मिसळले चैतन्य ।
अवतार मनोहर ॥९९॥
शोक जाहला अनावर ।
दुःखात बुडाले माणिकनगर ।
कैसा घालावा आवर ।
भावनेस आता ॥१००॥
पुढील विधी यथाशास्त्र केला ।
आणेनी बैसविले संजीवन देहाला ।
मधल्या कमानीत बैसाकार केला ।
होता तेथेची ॥१०१॥
वयमान अवघे एकोणिस ।
घेतले संजीवन समाधीस ।
नैष्ठिक ब्रह्मचार्याचा कळस ।
मनोहर अवतार प्रभुंचा ॥१०२॥
रूप जयाचे अतीव मनोहर ।
वाणीही तैसीच गोड मधुर ।
अत्यंत लाघवी मोहक सुकुमार ।
श्रीप्रभु मनोहर ॥१०३॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
एकोणीसाव्या वर्षी अवतारकार्य पूर्ण ।
बारा वर्षात माणिकनगर संस्थान ।
वाढविले मनोहरप्रभुंनी ॥१०४॥
गवंडी संतरामदादा प्रख्यात ।
घेऊन त्यांसी विश्वासात ।
प्रभुमंदिर निर्मिले अद्भूत ।
शान माणिकनगराची ॥१०५॥
अत्यंत भव्य आणि सुंदर ।
मंदिर बांधले माणिकप्रभु समाधीवर ।
स्थापत्यकलेचा ऐसा नमुना आजवर ।
झाला नाही ॥१०६॥
अचाट प्रभुत्व संस्कृत भाषेवर ।
तैसा योगाभ्यासही करती धुरंधर ।
स्तोत्र, मंत्र निर्मिले अपार ।
संस्थान उत्सवासाठी ॥१०७॥
ठेवूनि परंपरेचा मान ।
राखूनि संप्रदाय अभिमान ।
आखून दिले नित्यपूजाविधान ।
आजतागायत चालतसे ॥१०८॥
काव्य प्रतिभाही तैसिच अलौकिक ।
स्तोत्र, श्लोक आणि अनेक अष्टक ।
विविध भाषेत पदे अनेक ।
कविश्रेष्ठ मनोहर ॥१०९॥
प्रभुभक्ती आणि प्रभुवियोग उत्कट ।
प्रामुख्याने दिसतसे मनोहर काव्यांत ।
इतक्या लहान वयांतही वेदांत ।
मनोहरपदांतूनी झळकत ॥११०॥
स्वामीसमर्थ वदति भक्तांस ।
अक्कलकोटाहून माणिक नगरास ।
बडे भाईस जा भेटण्यास ।
बडा भाई मनोहरप्रभु ॥१११॥
व्यवहार करावा नियमित ।
तैसाच करावा वेळेत ।
कारभारात चोख अत्यंत ।
होते प्रभु महाराज ॥११२॥
होता सात्विक आहार ।
विद्वज्जनांवर प्रेम अपार ।
संतोषोनि देती उपहार ।
दानशूर प्रभुमनोहर ॥११३॥
प्रभुमंदिरावर कळस जरी सोन्याचा ।
आधी मान मनोहरप्रभुंच्या समाधीचा ।
पाया असे विराट प्रभुमंदिराचा ।
आधारभूत जो ॥११४॥
ऐसा अवतार प्रभुमनोहर ।
ब्रह्मचारी विद्वान सुकुमार ।
सवाई माणिक खरोखर ।
हाच गा ॥११५॥
Recent Comments