तोच भैरव हा माणिक

सोनपिवळी जेजुरी
सोनपिवळे मैलार
सोन्याहुनही सोनेरी
अमुचे माणिकनगर

तिथे अश्वावर स्वार
हाती आयुध शोभे खंड
इथे शिळेचा आकार
पुढे मांडुनि योगदंड

शक्तिरूपिणी म्हाळसा
तेथे शोभे अर्धांगिनी
मधुमती शक्ति व्यंका
येथे परम योगिनी

तिथे खंडोबा, मार्तण्ड –
कुलदैवताचे रूप
कल्पतरु प्रभु माणिक
इथे सद्गुरु स्वरूप

तिथे भंडारा उधळण,
वारी, बुधली-दिवटी
इथे नित्य उपासन
जे ज्या दैवता आवडी

“येळकोट येळकोट”
गजर तेथे “जय मल्हार”
“भक्तकार्य कल्पद्रुम”
येथे “माणिक शिव हर”*

तिथे भव्य युद्ध-वेषे
मणि-मल्लांसी मारिले
इथे सकलमत संदेशे
वैमनस्यासी हारिले

खंडेराय श्री माणिक
भिन्न-भिन्न जरी वाटत
खरे पाहु जाता एक
विप्र बहुधा वदत

आपुले आत्मस्वरूप
तोच भैरव हा माणिक
चित्त शिघ्र हो तद्रूप
नसे मागणे आणिक

नित्य माधुकरी सेवा

माणिकनगर येथे आपली गौरवशाली संस्कृती आणि अनेक परंपरा अत्यंत आत्मियतेने जपल्या जातात. “नित्य माधुकरी सेवा” हीसुद्धा मला अतिशय भावलेली, अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.

वेदांमध्ये पाच प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. ब्रह्म यज्ञ, देव यज्ञ, पितृ यज्ञ, भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ. ह्यापैकी मनुष्य यज्ञामध्ये, आपल्या घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे, असे सांगितले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना फराळ किंवा भोजन देऊन संतुष्ट करतो किंवा प्रवासात आपण काही खाताना सहप्रवाशांनाही देतो, हाही मनुष्ययज्ञाचाच भाग. पूर्वीच्या काळी भोजनाच्या वेळी आपल्या घराच्या आसपास कुणी भुकेला तर‌ नाही ना, ह्याची खात्री केली जायची. तसे कुणी आढळल्यास त्याला भिक्षा अथवा भोजन देऊन मगच, आपण भोजन करायची पद्धत होती. कालौघात ही परंपरा हल्ली लुप्त होत चालली आहे.

ह्या मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊनच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे दोन्ही वेळचा प्रभुप्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. गेले कित्येक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. माणिकनगरी झोळीची परंपरा अजूनही सुरू आहे. ह्या झोळीचा, माधुकरीचा प्रसाद आजही भंडारखान्यातील अन्नामध्ये मिळवून भक्तांना वाटला जातो. ह्या माधुकरी सेवेत आपल्याला दररोज सहभागी होता येईलच, असे नाही. माणिकनगरापासून दूर राहणाऱ्या भक्तांच्या मनात माधुकरी सेवेत आपल्याला सहभागी होता येत नसल्याची सल अनेक प्रभुभक्तांच्या मनात होती. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभु भक्तांच्या अंतरीची तळमळ जाणून‌ द्रवला नाही, तर‌ नवलच! आणि म्हणूनच की काय परगावी असणाऱ्या भक्तांसाठी नित्य माधुकरी सेवेचा सुंदर पायंडा श्री सिद्धराज माणिकप्रभुंच्या गौरवशाली कार्यकाळात पडला.

ह्या सेवेंतर्गत भक्ताला एक डबा आणि ओळख क्रमांक दिला जातो. प्रत्येकाने आपला डबा आपापल्या घरी घेऊन जायचा. दररोज तसेच, काही विशिष्ट प्रसंगी (पारायण, सण, मंगलकार्य) यथाशक्ती रक्कम अन्नदानसाठी ह्या डब्यात जमा करायची. दर दिवशी अगदी पाच-दहा रुपयांपासून आपण कितीही यथाशक्ती रक्कम ह्यात जमा करु शकता. मी साधारणपणे भोजनाला बसायच्या आधी प्रभुंच्या झोळीचे स्मरण करून, तसेच जगातील कोणी भुकेले असतील त्यांना आठवून, त्यांच्या वाट्याचा भाग म्हणून अन्नदानासाठी काही रक्कम नियमित ह्या डब्यात जमा करतो. ह्या निःस्वार्थी सेवेमुळे अन्नाची गोडी आणि खाल्ल्याचे समाधान अजूनच वाढते. साधारणपणे श्रीदत्त जयंतीला भक्त नित्य माधुकरी सेवेसाठी आपली नाव नोंदणी श्री प्रभु संस्थानात करुन, आपापला डबा घेतात आणि पुढच्या श्रीदत्त जयंतीला तो डबा श्रीप्रभु संस्थानात जमा करतात. नित्य माधुकरी सेवेतून जमा झालेल्या निधीचा विनियोग प्रभुंच्या नैवेद्यासाठी आणि भंडारखान्यात सुरु असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या अन्नदानासाठी वापरला जातो. अन्नदानासाठी आपण यथाशक्ती केलेल्या दानाचा विनीयोग, श्री प्रभुपादस्पर्शाने पुनित झालेल्या श्री दत्तक्षेत्री भक्तांच्या क्षुधा शांतीसाठी होतो, ह्यात समाधान तर अपार आहेच, पण नित्य माधुकरी सेवेने आपले प्रारब्ध क्षीण होऊन आपल्या पदरी अन्नदानाचे पुण्यही सहज जमा होते. श्रीप्रभु संस्थानातर्फे नित्य माधुकरी सेवेसाठीचे हे डबे विनामुल्य उपलब्ध आहेत. मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे पुण्यफळ सहज पदरी पाडून देणाऱ्या ह्या सत्पात्री दानाचा लाभ जास्तीत जास्त सद्भक्तांना मिळो, आणि त्यांना प्रभुंचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…

महाराजांचा जन्मदिवस

 

आज आमचे असिम श्रद्धास्थान सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराज यांचा जन्मदिवस ! आम्हा सकलमत सांप्रदायिना अतिशय आनंददायी आणि श्रध्दापुर्ण दिवस !
अध्यात्मिक ग्रथांचा सखोल अभ्यास आणि अतिशय सोप्या भाषेत , व्यवहारातील दाखले देत त्याच विवेचन करून समजावण्याची कला , भगवदगीतेवरची ओघवती भाषेतील निरूपणं म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच !
हिंदी , मराठी , इंग्रजी , कानडी , तेलगु एवढच नव्हे तर उर्दु आणि संस्कृत भाषेवरिल प्रभुत्व , केवळ विस्मयजनक ! माणिकनगरची धार्मिक , शैक्षणिक , क्रीडा , सामाजिक इ . क्षेत्रांतिल त्यानी घडवुन आणलेली प्रगति केवळ अलौकीक !
असे दैवी व्यक्तीमत्व आम्हा सांप्रदायिना गुरूस्थानी लाभावे , हि साक्षात प्रभुकृपाच !
आज श्रीजींच्या जन्मदिनी , त्यांच्या चरणी शतकोटी प्रणाम करताना प्रार्थना करतो कि
प्रभुभक्तिचा आमच्या तिनहि पिढयांतिल वारसा पिढयान्पिढ्या वृद्धींगत होत राहो आणि प्रभुकृपेचा वरद्हस्त अखंड , अविरत लाभत राहो .

श्रीप्रभु आज्ञेत राहणे

खोडकर मुलगा
प्रभुंच्या लहानपणी एक लहान मुलगा एका गाभण म्हशीला फारच त्रास देत होता. मुक्या जनावरांनाही त्रास होतो, म्हणून त्या म्हशीला त्रास न देण्यासंबंधी प्रभुंनी त्या खोडकर मुलास वारंवार समजावले. शेवटी “आता म्हशीच्या अंगास हात लावून तर पहा… म्हणजे…” असे प्रभु बोलले. प्रभुंच्या बोलण्यातील मेख न कळल्याने, “काय होते पाहू…” असे म्हणून त्या मुलाने दोन्ही हात म्हशीच्या पाठीवर ठेवले. प्रभु हसतच म्हणाले, अरे, ती म्हैस फार वाईट आहे, तुझे हात धरून बसेल! पहा रे बुवा आपला विचार!” प्रभुंच्या तोंडूने हे शब्द निघताच, त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या पाठीला चिकटून बसले. त्याला ते मोकळे करता येईनात. म्हैस उधळली, मुलगा म्हशीला लोंबकळू लागला. सर्व मुलांना मोठी गंमत झाली. म्हैस पळते आहे, मुलगा लोंबकळत चालला आहे. मुलगा रडू लागला. “मेलो, मेलो, पुन्हा कधी असे करणार नाही”, असे म्हणू लागला. प्रभुंना त्याची ती केविलवाणी अवस्था पाहावेना. प्रभुंनी ताडकन उठून, पळत जाऊन त्या म्हशीला थांबविले. तिच्या पाठीवर हात फिरवून, “बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही. एकवार त्याला क्षमा कर. सोड त्याला”, असे म्हणताच, मुलाचे हात सुटले. सर्व मुलांना मौजच मौज झाली पण, त्या मुलाला मात्र खाशी अद्दल घडली.

अमृतकुंडावरील घटना
चितापूरच्या विठ्ठलराव पेशकरांचे वडील हे प्रभुंचे बालमित्र. मामांनी रागे भरल्यावर, प्रभुंनी कल्याणमधील मामांचे घर सोडले आणि श्रीप्रभु पेशकर व त्यांच्या आणखीन एका समवयस्काबरोबर मंठाळच्या अरण्यात शिरले. त्यावेळी त्या दोघांनी प्रभुंना तसे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. अरण्याची दोघांना भीती वाटत आहे असे पाहून, प्रभुंनी, “भिऊ नका, माझ्या मागोमाग या, तुमचे भाग्य उदयाला येईल”, असे सांगितल्यावर, ते दोघेही प्रभुंच्या मागे गुहेत शिरले. थोड्यावेळाने त्यांना एक शिळा दिसली व तिघांनी ती बाजूला करताच सर्वजण आतील गुहेत शिरले. त्या गुहेतील जागा अत्यंत स्वच्छ असून त्यात एक आगटी दिसली. जवळ एक चिमटा पडला होता आणि आगटीतील राख रसरशीत होती. थोडेसे पुढे जाताच, पहिल्यापेक्षा मोठी अशी आणखी एक काळी शिळा दृष्टीला पडली. ती दूर करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी करून पाहिला. शेवटी प्रभु हसून म्हणाले, “आता पुरे करा, फक्त माझ्या धोतराचा पदर घट्ट धरून उभे रहा, भिऊ नका”, असे म्हणून प्रभुंनी एक जोराचा हिसडा देताच ती प्रचंड शिळा उलथून पडली. पण आतील गुहेतून एक भयंकर गर्जना ऐकू आली. ती एखाद्या प्रचंड वाघाची असावी, असा त्या दोघांचा भास होऊन ते घाबरून गेले व प्रभुंच्या धोतराचा धरलेला पदर सोडून, मागच्या पावली पळत सुटले. पळता पळता काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला व त्याबरोबर वाघाची गर्जनाही झाली. त्यांनी असे अनुमान केले की, प्रभुंवर त्या वाघाने झडप घालून त्यांना खाऊन टाकले असावे. भीतीने गर्भगळीत होऊन ते धावत सुटले व थोड्याच अवधीत त्यांनी कल्याण गाठले. ह्या प्रकाराबद्दल कोणाजवळ ब्र काढण्याचीसुद्धा त्यांची हिम्मत झाली नाही. त्यानंतर दोन एक महिन्यांनी कल्याणची बरीच मंडळी अमृतकुंडावर निघालेली पाहून, ते दोघेही बरोबर दशम्या घेऊन निघाले. डोंगर चढून अमृतकुंडाजवळ येत असताना, त्यांना प्रभुंचे स्मरण होऊन, पूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल ते एकमेकांबरोबर बोलत होते, इतक्यात प्रभुंची स्वारी त्यांच्यासमोर दृष्टीस पडली. वाघाच्या गुहेतून प्रभु जीवंत बाहेर आल्याचे पाहून त्यांना नवल वाटले आणि प्रभुंचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी व प्रफुल्लित असलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले. “हे असे कसे झाले?” असा प्रश्न त्यांनी प्रभुंना केला. त्यावर प्रभु म्हणाले, “तुम्ही न घाबरता माझ्यामागे आला असता तर, त्याचे मर्म समजले असते. आता काय उपयोग?”

प्रसादाची हकीकत
अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही.

व्यंकम्मावर कृपा
मैलारास असताना प्रभुंनी व्यंकम्माला पुराच्या पाण्यातून जीवदान दिले होते. त्यानंतर तिला प्रभुंचा प्रसाद मिळाला आणि तिने प्रभुंकडेच राहण्याचा हट्ट धरला. आपले सर्व दागदागिने तिने प्रभुंना देऊन टाकले. प्रभुंनी व्यंकम्माचे अंतःकरण जाणले होते. निस्सिम आणि शुद्ध प्रेमाने ती ओथंबून गेली होती. ती जरी तरुण होती तरी, वैषयिक स्वार्थी प्रेमाचा तिच्याठायी पूर्ण अभाव होता, हे प्रभुंनी पक्के ओळखले होते. प्रभुंनी प्रसन्न अंतःकरणाने तिच्याकडे दृष्टीक्षेप करून, आपल्या मातोश्री बयाम्मामातेजवळ तिला घेऊन जाण्यास एका शिष्यास सांगितले. तिचे प्रभुंवरील उत्कट प्रेम व भक्ती पाहून प्रभुंच्या मातेसही आनंद झाला व मातोश्रींनी तिला आपल्या कन्येप्रमाणे जवळ बाळगिले. प्रभुंनी व्यंकम्माची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. तिला कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले, तरी ती डगमगली नाही. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला हे पाहून, सर्वांना तिची करूणा आली. पण प्रभुआज्ञा उल्लंघण्याचे व्यंकम्माने कधी मनातदेखील आणले नाही. एके समयी, स्त्री स्वभावला अनुसरून विवस्त्र होऊन, व्यंकमा स्नान करीत होती, अशा प्रसंगी प्रभूंकडून निरोप आला, “असशील तशी निघून ये” हा निरोप कानावर पडताच, देहभान विसरून जाऊन, तशाच स्थितीत व्यंकमा प्रभुंकडे यावयास निघाली. सर्व लोक विस्मित झाले. मातोश्रींना हे वर्तमान कळल्याबरोबर, त्याही मागोमाग निघाल्या आणि त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. प्रभुने अशी भलतीच आज्ञा कशी केली, म्हणून त्यांना विचारण्याचा बयाम्मामातेचा हेतू होता. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. ते एकदा नाहीसे झाल्यावर, स्त्रीत्व कसे राहणार? असो, तशाच स्थितीतही व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून, प्रभुपुढे येऊन उभी राहावयास तयार झाली हे समजल्यावर, तिची ती अनुपम भक्ती पाहून, तो प्रेमाचा निधी उचंबळू लागला. अनिवार प्रसन्न अंतःकरणाने डोलू लागला. व्यंकम्मा जवळ येण्याची वाट देखील न पाहता, प्रभुंनी चटकन आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून, तिच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रीकडे पाठविले. त्यावेळी खरोखर व्यंकम्माचा उद्धार झाला. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा होय. जीवनभर प्रभुआज्ञेत, प्रभुसाधनेत राहून ती शेवटी श्री देवीपदास पोहोचली.

वरील चारही कथा पाहिल्या तर आपल्याला “श्रीगुरु आज्ञा” हा समान धागा आढळतो. खोडकर मुलगा, पेशकर, किंवा अक्कलकोटच्या राजाचा कारभारी यांनी प्रभुआज्ञा पाळली नाही आणि पर्यायाने त्यांनी त्याचे परिणाम भोगले किंवा आपल्या भाग्योदयाची चालून आलेली संधी दडवली. ह्या उलट, व्यंकम्माने प्रभुंच्या मुखकमलातून निघालेला शब्द खाली पडू न देता, तो प्रमाण मानला आणि आपला पारमार्थिक उत्कर्ष साधून घेतला. वरील कथांच्या माध्यमातून श्री गुरुआज्ञेचे महत्त्व आपल्या सहज ध्यानात येते. कारण, आपले नेमके हित कशात आहे, याची पूर्ण जाणिव आपल्या गुरूला असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुरुआज्ञेत राहणे, हे सदासर्वथा हितकर असते. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्री सद्गुरू माणिक प्रभु महाराजांचा जयजयकार असो.

झोळीपूजा आणि अन्नपूजा

झोळीपूजा आणि अन्नपूजा – माणिकनगर येथील एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

माणिकनगर येथील वास्तव्यामध्ये झोळीपूजा आणि अन्नपूजा या दोन विशेष पूजांनी माझे मन अनेकदा वेधून घेतले. इतर दत्तक्षेत्रांमध्ये ही परंपरा सहसा आढळून येत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ह्या नितांतसुंदर अशा परंपरेचा मागोवा घेतला असता, अनेक भक्तमंडळी झोळीपूजा आणि अन्नपूजा करतात असे कळाले. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता म्हणून मुख्यत्वे होत असलेल्या ह्या दोन पूजेंची माहिती इतरांसही मिळावी, आणि त्यांनीही प्रभुची कृपा संपादन करण्याची संधी मिळावी, म्हणून हा अल्पसा लेखन प्रपंच.

श्रीप्रभुंनी लहानपणी मामाचे घर सोडल्यावर, मंठाळच्या अरण्यात अमृतकुंडावर एकांतात साधना केली आणि प्रत्यक्ष श्रीदत्तात्रयांनी तेथे प्रभुंना झोळी आणि सटक्याचा प्रसाद दिला, हे सर्वश्रुतच आहे. त्यानंतरही ह्या झोळीचा आणि पर्यायाने श्री अन्नपूर्णा मातेचाच अखंड वरदहस्त श्री प्रभुसंस्थानावर आहे, ज्याच्या प्रसादस्वरूप श्री संस्थानामध्ये आजतागायत अन्नधान्याची आणि प्रसादाची कधीही कमतरता जाणवली नाही. श्रीमाणिक प्रभुंनीही आपल्या अवतार काळामध्ये, सदैव भिक्षान्न स्वीकारले. पंचपक्वान्नाचे जेवण असले तरी प्रभु झोळीमधील भिक्षा किंवा माधुकरीच घेत. श्री माणिक चरितामृतामध्येही चोवीसाव्या अध्यायात भिक्षेचे महत्त्व विस्ताराने वर्णिले आहे. त्यामुळे सकलमत संप्रदायांमध्ये आणि समस्त प्रभुभक्तांमध्ये भिक्षेच्या झोळीचे विशेष महत्त्व आहे. झोळीची ही परंपरा श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आहे.

श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीनंतर श्री मनोहर माणिकप्रभुंच्या काळात झोळीपूजेची परंपरा सुरू केली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. देह रूपाने श्रीप्रभु जरी समाधीस्थ झाले, तरी चैतन्य स्वरूपाने ते आपल्यातच आहेत, आणि त्यांच्या नैवैद्याकरिता अखंड सुरू असलेले नित्यभिक्षेचे विधान, हे श्रीमाणिक प्रभु संस्थानाच्या आस्था आणि विश्वासाचे परमविशेष आहे. भिक्षेसाठी आजही झोळी माणिकनगरमध्ये पाच घरी फिरते आणि प्रभुंच्या नैवेद्यासाठी भिक्षा आणली जाते.‌ जे भक्त माणिकनगरात राहत नाहीत, पण त्यांना झोळी घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही झोळीपूजेची व्यवस्था साक्षात् प्रभुंनीच जणू अत्यंत कृपाळूपणे केली आहे.

झोळीपूजेमध्ये झोळीमध्ये प्रभुंचा छोटा सटका असतो, त्याची मुख्यत्वे पूजा होते. त्याला स्नान घालून, गंध लावून सटक्याची पूजा केली जाते. त्यानंतर पूजेच्या वेळी नैवेद्याचे जे मंत्र म्हटले जातात, ते मंत्र म्हणून त्यावेळी झोळीमध्ये यथाशक्ती नैवेद्य, शिधा ठेवला जातो. त्यानंतर झोळी बंद करून, पुन्हा झोळीची गंध वैगरे लावून पंचोपचार पूजा होते, नैवेद्य दाखवून, आरती केली जाते. आजही जुन्या प्रभुंभक्तांमध्ये (श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासूनच्या) आजही काही मंगलकार्य, जसे लग्न किंवा मुंज वगैरे पार पडली की, त्यानंतर ते भक्त माणिकनगरला प्रभुमंदिरात येऊन झोळीपूजा करतात. विद्यमान प्रभुपरिवारामध्येही ही परंपरा आवर्जून पाळली जाते. ह्या वेळेस झोळी घेणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचीही हार घालून, आरती करून पूजा केली जाते. एकंदरीतच झोळी पूजा ही प्रभुंच्या ब्रह्मचारी स्वरूपाची किंवा अवधूत दिगंबर किंवा माधुकरी वृत्तीचीच पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अन्नपूजा ह्या पूजा विधीमध्ये श्रीप्रभुसमाधीस दहीभाताचे लिंपण केले जाते आणि नंतर हा दहीभात भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. अन्नपूजेचा संबंध महादेवाच्या पूजेशी आहे. रुद्र अनुष्ठानाची सांगता अन्नपूजेने होते. साधारणतः शंकराच्या पिंडीला अशा प्रकारचे दहीभाताचे लिंपण केले जाते. काही ठिकाणी देवीलाही दहीभाताचे लिंपण करून अन्नपूजेचा विधी पार पडला जातो. हलाहल प्राशन केल्यामुळे शरीराला झालेला दाह कमी व्हावा, या भावनेने श्रीशंकरास दहीभाताच लिंपण आणि असुरांशी युद्ध केल्यावर, देवीला आराम मिळावा म्हणून दहीभाताचं लिंपण करण्याची परंपरा पूर्वापारपासून अनेक ठिकाणी चालत आली आहे. माणिकनगरातही प्रभुसमाधीस अन्नपूजेची परंपरा गेले अनेक वर्षे अखंड सुरू आहे.

प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या परिवाराकडून श्रीप्रभु समाधीची अन्नपूजा केली जाते. आजही प्रभुंचे नवरात्र दुबळगुंडीच्या रामण्णापंतांच्या कुटुंबाकडे आहे व ते माणिक नगरी येऊन ही प्रभू सेवा करतात. त्यांची अन्नपूजा पाहून इतरांनाही या अन्नपूजेची प्रेरणा झाली. आपले काही काम अडले असल्यास, मी प्रभुची अन्नपूजा करेन, असा नवस अनेक प्रभुभक्त करतात किंवा प्रभुगादीच्या पीठाचार्यांनीही आपल्या भक्तांना, तुमचे काम होईल, काम झाल्यावर प्रभुसमाधीची अन्नपूजा करा, असे अनेकदा सांगितल्याचे कळते. थोडक्यात, प्रभुप्रती कृतज्ञता किंवा नवस पूर्ततेचा विधी म्हणून अन्नपूजेकडे आपल्याला पाहता येईल.

ह्या अन्नपूजेचेही मोठे वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला माणिकनगरी पहायला मिळते. चांदीच्या घंगाळवजा पातेल्यात (ह्याला कन्नड भाषेत कोप्परगी असं म्हणतात) पाच एक किलो दहीभात असतो आणि चांदीच्या पात्रामध्ये अकरा वडे असतात. अन्नपूजेच्या वेळेस हे दहीभात प्रभुमंदिरात ठेवले जाते. श्रीप्रभु समाधीची महान्यासपूर्वक रुद्राभिषेक महापूजा होते. त्यानंतर प्रभूंना वस्त्रसाज केल्यावर, जेव्हा नैवेद्याचे मंत्र येतात त्यावेळी, श्रीप्रभु समाधीस पडदा केला जातो आणि श्रीप्रभु समाधीवर छाटी ठेवली जाते. त्यावर हा दहीभात पसरवला जातो. ह्यावेळी भृगुवल्लीतील अन्नपूजेचे मंत्र म्हटले जातात. श्रीप्रभु समाधीवर पसरवलेल्या दहिभातावर वडे ठेवले जातात. आणि श्रीप्रभु समाधीला हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पसरवलेल्या दहीभातावर पुन्हा एक छाटी टाकली जाते आणि त्यावर गिलाफ (प्रभू समाधीस चारी बाजूंनी घालण्यात येणारे वस्त्र) घातला जातो. गिलाफ घातल्यावर शाल आणि अलंकार घातले जातात. त्याचबरोबर श्रीप्रभु समाधीसमोर आणखी एका ताटात दहिभात ठेवतात आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो, श्रीप्रभु समाधीची आरती केली जाते. त्याचबरोबर यजमानाच्या नवसाच्या पूर्णतेच्या / समाप्तीचा संकल्प सोडला जातो. दोन नारळ फोडले जातात आणि समाधीवर अक्षता टाकून गिलाफ काढला जातो. त्यानंतर श्रीप्रभु समाधीवर असलेलया अन्नपूजेच्या दहीभाताचा प्रसाद गोळा केला जातो. त्यावेळीही पुन्हा उपनिषदातील मंत्र म्हटले जातात. दहीभात पूर्ण टिपून घेतल्यावर, श्रीप्रभु समाधीस स्नान घालून, पुन्हा पंचोपचार पूजा होते आणि वस्त्रालंकार घालून प्रभुंची आरती करून पुष्पांची नेहमीप्रमाणे सजावट करतात. श्रीप्रभु समाधीची ही पूजा पूर्ण झाल्यावर, यजमानांना वडे आणि दहीभात प्रसाद म्हणून दिला जातो आणि उरलेला दहिभात प्रभू मंदिरात असणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

एकादशी, महाशिवरात्री, श्रावण मास आणि दत्त जयंतीच्या उत्सवाचे पाच दिवस अन्नपूजा केली जात नाही.

थोडक्यात आपल्या घरातील मंगल कार्य पार पडल्यावर झोळीपूजा करण्याचा आणि नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा संकल्प पूर्तीसाठी अन्नपूजा करण्याची परंपरा, अनेक प्रभुभक्तांकडून आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहता येते. आपल्या घरातील मंगल कार्यात श्रीप्रभु आपल्याला काहीही कमी न पडू देता आपली झोळी सदैव भरलेली ठेवतो आणि अशा ह्या भक्तकार्यकल्पद्रुम प्रभुप्रती प्रेम अथवा कृतज्ञता म्हणून झोळीपूजेचे आणि अन्नपूजेचे विधान प्रभुभक्तांमध्ये प्रचलित आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा नविन भक्तांना जर अशी पूजा करायची इच्छा असल्यास आणि आगाऊ सूचना दिल्यास श्री संस्थानाकडून तशी व्यवस्था अत्यंत अल्प दरात केली जाते. झोळीपूजा आणि अन्नपूजा ह्या वैशिष्ट्यपूर्ण विधींची माहिती दिल्याबद्दल श्री माणिक प्रभु संस्थानाचे मुख्य अर्चक श्री. गुरुनाथ गुरुजी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अन्नपूजा किंवा झोळीपूजेच्या निमित्ताने आपणासही प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शीघ्रातीशीघ्र प्राप्त होवो, आणि त्याच्या फलस्वरूप आपली ही झोळी श्रीप्रभु कृपेने निरंतर भरलेली राहो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखीन एका लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक