by Manohar Wagle | Jan 9, 2025 | Uncategorized

श्री माणिकप्रभु महाराजांचे भक्त असलेल्या आपण सर्वांनीच, आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी श्रीप्रभुंच्या कृपेचा अनुभव घेतला असेलच. परंतु, आज मी जे काही आपणासमोर उलगडणार आहे, ती श्रीप्रभुची पूर्ण कृपा, भक्तावरील निर्व्याज प्रेम आणि मरणभयहारक शाश्वत संरक्षण कवचाची कथा आहे. माझी लहान चुलत बहीण, सौ. सुनिता खत्री आणि तीचे पती श्री. राज खत्री यांच्या जीवन संघर्षाची ही कथा, आपणा सर्वांचा श्रीप्रभुचरणी असलेला विश्वास अधिकच दृढ करेल, ह्यात तीळमात्रही शंका नाही. गेल्या वर्षभरात उभयतांना जे काही सोसावे लागले ते आपल्या कल्पनेपलीकडले आहे. एखाद्या सामान्य माणूस अशा विपरीत परिस्थितीत कोलमडून गेला असता. परंतु, श्री माणिकप्रभु महाराजांवरील अतीतर विश्वासामुळेच, ह्या दुर्धर प्रसंगावर मात करुन, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली आहे.
सन २०२२च्या अखेरीस श्री. राज खत्री यांची तब्येत अचानक बिघडली. आधीच सडपातळ देहयष्टी असलेल्या श्री. राज यांचे २०२२च्या शेवटच्या दोन महिन्यांत वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांना दर १५ दिवसांनी, उलट्यांचा प्रचंड त्रास होत होता. सुरुवातीला डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय आला आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले. उलट्यांच्या तिसऱ्या प्रकोपानंतर, डॉक्टरांनी श्री. राज यांना पोटाची आणि आतड्याची एन्डोस्कोपी करून घेण्याचा सल्ला दिला.
अशा परिस्थितीत, सौ. सुनीता खत्री आणि तिच्या भावंडांची प्रभुभक्ती कामी आली. कोणत्याही गंभीर वैद्यकीय प्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी, आपल्या गुरूंना त्याबाबत कल्पना देण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्याप्रमाणे, सौ. सुनिताची मोठी बहीण, सौ. रेश्मा हिने श्री. ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांना फोन करून एकंदर परिस्थितीची माहिती दिली. श्रीजींनीही त्यांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एंडोस्कोपी करून घेण्यास सांगितले आणि त्यांना श्रीप्रभुंचा प्रसाद पाठवला. श्री. राज खत्री यांनीही एन्डोस्कोपीसाठी आणि त्यानंतरच्या प्रत्येक चाचणीसाठी जाताना, हा प्रभुप्रसाद श्रद्धायुक्त विश्वासाने आपल्या बरोबर बाळगला.
एंडोस्कोपीच्या अहवालाने संपूर्ण कुटुंबाचा आनंदच जणू हिरावून घेतला गेला. श्री. खत्री यांना पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी लगेचच याबाबत श्रीजींनी पुन्हा संपर्क करताच, “ऑपरेशन करा लो” असे सहज उद्गार श्रीजींच्या मुखातून लागलीच बाहेर पडले. त्यानंतर अनेक घटनांची जणू मालिकाच सुरू झाली. त्यांनी सर्वप्रथम प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरच्या सल्लामसलतीमध्ये केमोथेरपी द्यायची की सर्जरी करायची हा कळीचा मुद्दा होता. श्रीजींचे शस्त्रक्रियेबाबतचे शब्द मनात घोळत असताना, श्री. खत्री शस्त्रक्रियेची मनोमन आशा बाळगून होते आणि अखेरीस डॉ. अडवाणी यांनीही शस्त्रक्रियेचीच शिफारस केली.
ही बातमी रेश्माने श्रीजींना सांगितल्यावर, त्यांनी तिला सांगितले की, “सुनीताला सांग काही काळजी करू नकोस, मी तिच्यासोबत आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना करीन.” त्यांनी सौ. सुनिताला विश्वासाने श्रीप्रभुंच्या “भक्तकार्यकल्पद्रुम” ब्रीदावलीची एक माळ रोज जपायला सांगितली. त्यानंतर श्रीजींनी, “मी प्रसाद पाठवतो,” असे सांगितले. त्यावर रेश्माने श्रीजींना आपण प्रसाद आधीच पाठवल्याची आठवण करून दिली, तेव्हा श्रीजी म्हणाले, “तो प्रसाद प्राथमिक चाचणीसाठी होता, आताचा प्रसाद हा शस्त्रक्रियेसाठीचा आहे.”
श्री. राज खत्री हे सामान्यतः चिंताग्रस्त स्वभावाचे आहेत. जीवनामध्ये आजतागायत त्यांना कधी इस्पितळात दाखल करण्यात आले नव्हते आणि आता ते इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेला प्रथमच सामोरे जात होते. परंतु, श्रीप्रभुंच्या कृपेने, शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण, इतके विलक्षण होते की, त्यांनी लगेच श्री. खत्री यांना धीर दिला आणि काळजी करू नका, ते आता सुरक्षित हातात आहेत आणि आता ते जातीने त्यांना पाहणार आहेत, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी श्री. खत्रींचे समाधान केले. जवळ बाळगलेल्या, श्रीजींनी दिलेल्या प्रसादावरील विश्वासाने, श्री. राज यांना नवा आत्मविश्वास मिळाला होता आणि त्या पाठोपाठच्या डॉक्टरांच्या आश्वासक शब्दांनी त्यांना हायसे वाटले होते.
शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण यांनी कुटुंबाला माहिती दिली की, ही अडीच ते तीन तासांची शस्त्रक्रिया असेल, ज्यात श्री. खत्री यांच्या पोटातील गाठ काढली जाईल. पण जेव्हा शस्त्रक्रिया सुरू झाली, तेव्हा श्री. खत्री यांच्या पोटातील आतली बाजू पूर्णपणे खराब झाली असल्याचे पाहून डॉ. कीर्ती भूषण यांना खरोखरच धक्का बसला होता. शस्त्रक्रियेनंतर स्वत: डॉ. कीर्ती भूषण यांनी कबूल केले की, एक क्षण त्यांना काय करावे हेच कळत नव्हते. शस्त्रक्रियेआधी फक्त एक गाठ काढावी लागेल, असे त्यांनी गृहीत धरले होते. पण प्रत्यक्षात त्यांना आता पोटाचा एक मोठा भाग काढावा लागत होता. डॉ. कीर्ती भूषण म्हणाले की, त्यानंतर जणू देवानेच सर्व जबाबदारी घेतली आणि माझ्यामार्फत पुढचे ऑपरेशन करवून घेतले. जी शस्त्रक्रिया तीन तासात पार पाडायची अपेक्षा होती, ती पूर्ण व्हायला आता पाच तास लागले होते. अखेरीस, शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. घरच्यांनी जेव्हा श्रीजींना याबाबत माहिती दिली तेव्हा ते म्हणाले, “बहुत बडा संकट टल गया” (“खूप मोठे संकट टळले आहे”). सौ. सुनीता आणि तिचे पती श्री. राज यांचा श्रीप्रभुंवरील अतूट विश्वास आणि प्रभुंचेही त्यांच्यावरील प्रेम आणि आपल्या प्रिय भक्तांभोवतीच्या चैतन्यशक्तीमुळेच श्री. राज यांना मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः ओढून आणले होते.
त्यानंतर श्री. खत्री यांना केमोथेरपीही देण्यात आली. केमोथेरपी घेतलेल्यांना त्याचे दुष्परिणाम माहित असतीलच. परंतु, पुन्हा एकदा, श्रीप्रभुकृपेने त्यांना केमोथेरपीचे कोणतेही सामान्य दुष्परिणाम जाणवले नाहीत. सुरुवातीला, त्यांच्या खाण्यावर परिणाम झाला होता, परंतु आज, शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ एक वर्षानंतर, श्री. राज खत्री आपले सामान्य जीवन जगत आहेत. तीन महिन्यांपूर्वी, त्यांना कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांनी श्री. राज आता कर्करोगमुक्त झाल्याचे सांगितले. हा एक अद्भुत चमत्कारच होता आणि श्री प्रभुच्या असीम कृपेने नुकत्याच पार पडलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यातही ते उत्साहाने सहभागी होऊ शकले.
एका कुटुंबाचा आपल्या गुरूवरचा पराकोटीचा विश्वास आणि श्रीगुरूंचा प्रसाद मिळाल्यावर, त्यांच्या स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच, श्री. राज खत्री यांच्या नशीबात लिहिलेली दुष्टाक्षरे अखेरीस शुभाक्षरे झाली आणि त्यांना आपला देह श्रीप्रभुंच्या सेवेत अधिकाधिक झिजविण्यासाठी नवीन जीवनदान मिळाले.
श्रीप्रभुंची लीला अगाध आहे. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौमाची आपल्या भक्तांवर मरणभयहर अशी कृपादृष्टी आहे. सदैव सर्वांचे मंगल चिंतीणाऱ्या, आपल्या कृपेचे संरक्षक कवच सदैव आपल्या भक्तांभोवती ठेवणाऱ्या आणि प्रत्यक्ष काळालाही परतवून लावणाऱ्या सकलमताचार्य श्री माणिकप्रभुंचा जयजयकार असो…
जय जय हो, सकलमता विजय हो !
by Gopal Kulkarni | Jan 7, 2025 | Uncategorized

“आम्हाला धरता येतं, पण सोडता येत नाही” आपल्या अवतारकाळात प्रत्यक्ष श्री माणिकप्रभु नेहमी म्हणत असलेल्या या अभयवचनाचा यथार्थ प्रत्यय मला व माझ्या सर्व कुटुंबाला अलिकडेच आला. परिवारासहित आम्ही सर्वजण दत्तजयंती उत्सवासाठी नाशिकहून माणिकनगर येथे आलो होतो. माणिकनगरी श्रीदत्त जयंती महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटून, शेवटच्या दिवशी श्रीप्रभु दरबारात श्रीजींच्या पवित्र करकमलांनी खारकांचा महाप्रसाद घेतला. त्यावेळी श्रीजींनी जानेवारीतील ठाणे येथे होणाऱ्या श्री माणिक ज्ञानयज्ञास उपस्थित राहण्यासंबंधी वचनही घेतले. दिनांक २८ डिसेंबरच्या पहाटे जवळपास चार वाजण्याच्या सुमारास प्रभुदर्शन व प्रसाद घेऊन कुटुंबासहित नाशिकला प्रस्थान ठेवले. आम्ही माणिकविहार भक्तनिवासातून बाहेर पडत असतानाच, आमचे नाशिकचे गुरुबंधू श्री. रमेश राघूजी यांच्याशी आमची भेट झाली. थोडे बोलणे होऊन त्यांचा निरोप घेतानाच, त्यांनी आम्हाला श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हार दिला. ते म्हणाले की, श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांना गुरुजींनी मोठा फुलांचा हार दिला आहे. फुलांचा हा हार मोठा असल्याने व त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याचे कारण सांगून, त्यांनी तो प्रसादरुपी हार आम्हाला देऊन ते निघून गेले. श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हा हार खूप मोठा असल्याने, तो गाडीला पुढच्या बाजूने बाहेरून बांधूयात, अशा विचाराने मी तसा प्रयत्नही केला. पण इतका सुंदर हार बाहेरून खराब होईल म्हणून, श्रीप्रभु समाधीचा हार बाहेरुन न लावता, गाडीच्या आतील बाजूने काचेलगत डॅशबोर्डवर ठेवला व भक्तकार्यकल्पद्रुम ब्रीदावलीचा गजर करुन प्रवास सुरु केला. श्रीप्रभु समाधीवरील हार मिळाल्याचा आनंदात मन हरखून गेले होते. गाडीच्या चाकांप्रमाणेच, आजवर आमच्या कुटुंबावर श्रीप्रभु कृपावर्षावाच्या अनेक अनेक आठवणीही मनामध्येही गतीमान होत होत्या.
माणिकनगरवरुन उस्मानाबादला साडूंकडे सकाळी सात वाजता पोहोचलो. दुपारपर्यंत आराम करून, भोजन उरकून, दुपारी दोनच्या सुमारास पुढील प्रवास सुरु केला. बीड जाऊन, गेवराई गावाजवळ आल्यावर, आमच्या गाडीच्या पुढे मालवाहू गाडी चालली होती. त्या गाडीत बऱ्याच म्हशी होत्या. त्या गाडीमध्ये व आमच्या गाडीमध्ये सुरक्षित अंतरही होते. म्हणायला वाहनांची गतीही फारशी नव्हती. पण त्या गाडीच्या चालकाने अचानक रस्त्याच्या मधोमध गाडी असतांना ब्रेक दाबला व गाडी तिथल्या तिथे थांबवली. क्षणार्धात घडलेले हे इतके अनपेक्षित होते की, काही कळायच्या आतच माझी गाडी त्या समोरील गाडीवर जाऊन धडकली होती आणि धडाऽऽम् असा आवाज झाला. आपल्या गाडीचा अपघात झाला आहे, याची मला एव्हाना जाणीव झाली होती आणि क्षणभर थोडी भीती वाटली. माझ्या शेजारी माझी पत्नी, मागच्या सीटवर मुलगी बसली होती. मी पटकन गाडीमधून बाहेर आलो आणि बघतो तर गाडीचा पुढील बाजूने अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीचे रेडीयेटर फुटले होते, बोनेटचा पत्रा पूर्णपणे गोळा झाला होता. तसेच गाडीच्या पुढील भागातील इंजिनच्या आजूबाजूचे बरेच भाग तुटलेले दिसत होते. एव्हाना पत्नी आणि मुलगीही बाहेर आली होती. मुलगी तर घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल अनभिज्ञ होती. भेदरलेल्या आणि मनाच्या विषण्ण अवस्थेतही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, अपघातामुळे गाडीचे जे नुकसान झाले आहे, ते फक्त तेथपर्यंतच होते, जेथपर्यंत श्री प्रभु समाधीवरील हार ठेवला होता. हाराच्या पाठीमागे गाडीला काहीही झाले नाही. गाडीची त्यावेळची स्थिती पहाता गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच मार लागला असावा, असे आजूबाजूला जमलेल्या लोकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात श्रीप्रभुकृपेने आम्हाला कुणालाही अगदी खरचटलेसुद्धा नव्हते. मागील सीटवर बसलेल्या माझ्या मुलीला तर अपघात इतका मोठा झाला आहे, हे नीटसे कळलेही नव्हते.

सत्ता प्रभुची चाले मजवर, अघटित कैसे राहे पळभर…
वरील काव्यपंक्तीनुसार श्रीप्रभु महाराज सदैव आमच्या पाठीशी आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आला होती. कदाचित हा प्रसंग आमच्या जीवावरही बेतला असता, पण श्रीप्रभुंचे आशीर्वाद आणि त्यांच्या कृपादृष्टीने आम्ही सर्व सुखरुप होतो. “श्रीप्रभु समाधीवरील मिळालेला तो हार म्हणजेच, श्रीप्रभुंनी काळासाठी आखलेली लक्ष्मणरेषाच होती,” असे अत्यंत कृतज्ञतेने येथे नमुद करावेसे वाटते.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बरेच लोक जमा झाले होते, पोलीसही येऊन पुढील कार्यवाही करुन निघून गेले. मी, माझ्या पत्नी व मुलीबरोबर टोईंगच्या गाडीची वाट पाहत गाडीजवळच थांबलो होतो. त्याच वेळी एक वयस्कर बाबा तेथे आले आणि त्यांनी आम्हाला त्यावेळी अत्यंत आवश्यक असलेला, मानसिक धीर दिला. जणू काही कोणी वडीलधारी व्यक्तीच बोलत आहे असे वाटत होते. त्यांनी आपल्या झोपडीत येण्याचा आमच्याकडे आग्रह धरला. ते म्हणाले की, “मी मघापासून तुमच्याकडे बघत आहे. माझेकडे भाकरी आहे, ती तुम्ही सगळे जण मिळून खा. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खाणेपिणे काही आठवतच नाही. आम्ही त्यांना विनम्रतेने नाही म्हणालो. परंतु बाबांचा आग्रह जास्त पडला म्हणून, आम्ही शेवटी त्यांना चहा करण्यासाठी सांगितले. ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होते की, ” मी धनगर आहे, शाकाहारी आहे, माझी झोपडी लक्षात ठेवा.”
आजही ते वाक्य कानाभोवती रूंजी घालत आहे. मनाच्या भेदरलेल्या अवस्थेत भेटलेल्या बाबांचा किंवा त्यांच्या धीरोदात्त वाक्यांचा अर्थ त्यावेळी लक्षात आला नाही, पण आज सगळे स्थिरस्थावर झाल्यावर जाणवते आहे की श्रीप्रभु आपल्या भक्तांच्या सदैव कशाप्रकारे बरोबर असतात. ह्या सर्व प्रसंगातून सुखरुप वाचवल्याबद्दल मनोमन श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच, पत्नी देवघरात म्हणत असलेल्या श्रीसिद्धाराज प्रभुंच्या पंक्ती कानावर पडत होत्या…
“प्रभु जवळी असता असता,
मग चिंता मज का, मग भय मज का…”
by Devidas Keshavrao Deshmukh | Jan 4, 2025 | Uncategorized

संत श्रेष्ठ सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराजांच्या जन्माचे यंदा हे २०६ वे वर्ष होय. श्री प्रभूंनी मत-पंथ- विविध धर्मियांच्या गल्बल्यातून ताक घुसळून घुसळून जसे लोणी काढतात तसे “सकलमत संप्रदायाची“ स्थापना केली. ‘द्वैत बुद्धी ही दूर करा,सकल मताचा पंथ धरा’ असा प्रचार करीत सर्व मतधर्म तत्वांचा आदर करीत त्याचा सुवर्ण मध्य साधत सकलमत पंथाची मुहूर्त मेढ रोवली.श्री गुरु नानकदेवजिंनी अशाच विचारांनी शीख धर्माची स्थापना केली आज तो सर्व मान्य झाला आहे.
‘एकं सद्विप्रा बहुधा वदंती’ असा संदेश देत सृष्टीमध्ये चालकत्वाची भूमिका पार पाढणारी एकच शक्ती आहे. वरपांगी तिची अनेक रूपे दिसतात पण ती शक्ती सर्वत्र एकच आहे. ज्या प्रमाणे अनेक अंधळ्यानी हत्तीच्या निरनिराळ्या अंगाना स्पर्श करून हत्तीचे रूप वर्णन अनेक प्रकारे केले. व आमुक एक प्रकार म्हणजेच हत्ती असे प्रतिपादिले. पण डोळस पणे नीट पाहून ज्ञान मिळविले कि त्याचे स्वरूप कळते ती शक्ती म्हणजे एकच आहे ह्याचे ज्ञान होते हे सद्गुरुनी पटवून दिले. ज्ञान व भक्तीच्या संगमानेच ती स्थिती प्राप्त होवू शकते व अंती मोक्षाप्रत जाता येते असे प्रतिपादिले.
त्या साठी गुरूपदेश व तोही अधिकारी व्यक्तीच्या-गुरूच्या मुखातून मिळविलेले ज्ञानच उपयोगाचे आहे. ऐऱ्या-गैर्यांचा उपदेश काही उपयोगाचा नाही. विशेषत्वाने जिवंत गुरूच्या मुखातून मिळालेले ज्ञान जास्त उपयोगाचे असते. कारण त्या अधिकारी गुरूचे आचरण व ज्ञान हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो त्याचा सरळ-थेट परिणाम आपल्यात मुरतो. वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंनी साधू व राज्याची गोष्ट सांगत हे पटवून दिले कि ‘राजा बोले दल हाले-मिया बोले दाढीही न हाले’ म्हणून गुरु करावा व तोही असा अधिकारी असावा जसा सकलमताचार्य श्री प्रभू.
त्यांच्या काळापासून सर्व गुरु पिठाधिपतींची परंपरा त्यांचे वागणे-चालणे-बोलणे हे आपल्या मन पटलावर कोरले जात आहे.त्यांची योग्यता व अधिकार तसाच परिपूर्ण आहे. त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष वर्तन ह्यात एक वाक्यता दिसते. त्या सर्वांमध्ये दृढ निश्चय, निःसंगता, परोपकार, विश्वबंधुता, सर्वांचा आदर, न्याय प्रीयता, आद्य प्रभूंवरील अढळ श्रद्धा-भक्ती, सततचा व्यासंग, सततची कार्य प्रवणता, बंधू प्रेम व असे अनेक सद्गुण आजवर परंपरेने सर्व पिठाधिपतीत प्रत्ययास येतात. सर्वांच्या साहित्य लेखनातही सामजिक उद्धाराची व मानवी कल्याणाची तळमळ दिसून येते.
वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंचे तर वर्णन करावे तेवढे थोडेच आहे सततचा व्यासंग – धडपड-कार्यप्रवणता – नवनवोन्मेश शालिनी प्रमाणे नित्य नवा ध्यास व त्याची निर्मिती ही त्यांची ठळक वैशिष्ठ्य दिसून येतात. त्यांच्या कामातून प्रतीत होणारी भव्यता व दिव्यता सतत जाणवते. कोणतेही कार्य असो-निरनिराळ्या पिठाधिपतींची प्रती वार्षिक आराधना असो वा मोठे बांधकाम (अगदी झपाटल्या प्रमाणे कामाचा उरक ) असो किंवा एखादा राष्ट्रीय वा सामाजिक कार्यक्रम असो किंवा भक्तांसह यात्रा असो सारेच भव्य आणि दिव्य! कुठेच न्यूनता नाही. सर्वात मिळून मिसळून राहणे-कोण गुरु आणि कोण भक्त ओळखूच येणार नाही.जसे बर्फात गोठलेले पाणी वा बर्फाचे झालेले पाणी!
आमच्या सारख्या सामान्य जनात देव-धर्म-गुरु-ह्यांचे विषयी साशंकता व चंचलता सतत प्रतीत होते. काही लोकांचा प्रश्न असाही असतो कि देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? पण दत्त संप्रदाय म्हणतो गुरु श्रेष्ठ, कारण देव देतो व नष्टही करतो, व दुष्ट-सुष्टांचा न्याय करतो, त्यांचे-त्यांचे वर्तनाप्रमाणे दान व दंडही करतो पण गुरु तर दान करतोच आणि दंड करणे ऐवजी दुष्टांना त्याची वृत्ती सुधारून त्याला सुष्ट बनवून सनमार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कारण तो समोर असतो आपण त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाहिलेले असते. देव केवळ कथा पुराणातूनच दिसतो. म्हणून गुरु श्रेष्ठ. व तोही सकलमताचार्य श्री सद्गुरू माणिक प्रभूंसारखाच सर्वश्रेष्ठ!
आमच्या सारख्या संसारिकांचे प्रत्यक्ष प्रमाणावरच लक्ष्य असते किंवा असे म्हणा हवे तर चमत्कार शिवाय नमस्कार नाही. काही नास्तिक, प्रारब्ध वैगैरे काहीच नसून प्रत्यक्ष नैसर्गिकरित्या बरे वाईट घडत असते असे म्हणतात व जरासे बरे वाईट झाले कि कसला देव नी कसला गुरु! अर्थात मनस्तापामुळे असेवाटणे साहजिक आहे, पण सततचे गुरु स्मरण, चिंतन, मनन, व चरित्र पठन या मुळे मुख्य प्रवाहात आपण पुन्हा परत येतो.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मंगळवार दि.२६/१२/२०२३ ला श्री माणिक प्रभू जयंती दिनी सायंकाळी ७.३० वा सगरोळीहून माणिक नगर साठी निघालो गाडीच्या ड्रायवर ने २ वेळा जिवावरचे अपघात केले होते. मनातून धाकधूक होतीच. आम्ही भालकी ते हुमानाबाद्च्या रस्त्यावर असताना अंदाजे रात्री १०.३० च्या सुमारास हाइवे वर एक वळण होते व त्या वळणावरच ट्रक उभा असलेला ड्रायवरला नीट दिसला नाही आणि गाडी ९० ते १०० च्या वेगात, अगदी जवळ येताच त्याच्या लक्षात आले. आणि त्याने प्रसंगावधान राखून झटकन गाडी उजवीकडे वळवून परत डावीकडे वळणावर घेतली. केवळ एका क्षणाच्या १०० व्या भागाच्या वेळेतच हे घडून गेले. गाडी पुन्हा डावीकडे सरळ करताना त्या वेगात सावरले गेले, नाही तर उजवीकडे-डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात गाडीने पलटी खाल्ली असती. श्री प्रभू कृपा म्हणूनच आम्ही बचावलो,नाहीतर आमचे काही खरे नव्हते.
असाच एक प्रकार नाशिकचे श्री.गोपाळराव कुलकर्णी यांचे बाबत वाचण्यात आला. नेमके ह्याच दिवशी जयंती करून २७ च्या पहाटे ते माणिकनगरहून नाशिकला परत जाण्यास निघाले बीडच्या थोडे पुढे जातास दुपारी ४.३० च्या सुमारास ह्यांच्या गाडी पुढील, म्हशी वाहतूक करणाऱ्या ट्रक-ड्रायवरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अचानक थांबला व ह्यांची गाडी त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. त्या गाडीचे हेडलाईट व बॉनेट पासून स्टेरिंग समोरील काचे पर्यंत पूर्ण चकणाचूर झाली.पण काचेच्या आतून स्टेरिंग पुढे त्यांना माणिकनगरात प्रसादात मिळालेला मुख्य देवळातील एक लांबलचक होता. तो त्यांनी स्टेरिंग पुढील काचेच्या आतून मोकळ्या जागेत लांब असा मांडून ठेवला होता.त्या काचे पर्यंतच गाडीचा चुराडा झाला पण काचे पासून-हारापासून आत काहीच नुकसान झाले नाही किंवा साधे खरचटले देखील नाही.
‘तो हार म्हणजे श्री प्रभूंनी आखलेली लक्ष्मण रेषाच होती’.असे श्री गोपाळराव कुलकर्णी म्हणतात.श्री प्रभू जवळी असतां।मग चिंता मज कां।। ह्या पदाची प्रचिती येते.
by Manohar G Kulkarni | Dec 5, 2024 | Uncategorized
क्षणभर बस रे गड्या प्रभु चरणी
प्रपंच चिंता स्वयें विसरुनी
देह लोभ हा नको कराया
मी मी म्हणता जाईल काया
प्रभुच येईल तुज ताराया
अद्भुत आहे प्रभुची करणी
नको अपेक्षा करु धनाची
सारी माया असे क्षणाची
कास धरावी गुरु कृपेची
गुरुतत्वाला घाल गवसणी
धन्य मानवी जन्म मिळाला
ठेवा स्मरणी प्रभु नामाला
सुखे करावे नरदेहाला
दास मनोहर करी विनवणी
क्षणभर बस रे गड्या प्रभु चरणी
प्रपंच चिंता स्वयें विसरुनी.
by Prachi Karnik | Dec 4, 2024 | Uncategorized
मोरे महाराज, गुरुराज
मोरे सरकार
तुम मोरे तात, तुम भ्रात
तुम्ही आधार
तुमरे नाम से दिवस उजागर
तुम्हे सुमिरत हो सांझ
मोरे महाराज
तुमरो ध्यान धर मन होवे सुस्थिर
किरपा राखे मोरी लाज
मोरे महाराज
तुमरे दरस को आऊं नित द्वार
पदसेवा मिले काज
मोरे महाराज
तुमरी सीख से है भव-पथ सुंदर
अंत समय भी हो सहज
मोरे महाराज
by Pranil Sawe | Aug 31, 2024 | Uncategorized
श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष, परम श्रद्धेय डाॅ. श्री गोविंददेव गिरी महाराजांचा श्री सज्जनगड संस्थानातर्फे जो हृदय सत्कार झाला तो सोहळा अनुभवताना वेगळीच धन्यता लाभली. परमात्मा पुरुष श्रीप्रभुरामचंद्राने आपल्या जन्मभूमी मंदिराच्या निर्माणच्या कार्याचे कोषाध्यक्षपद ज्या समर्थ गोविंदाचार्यांकडे सोपविले, त्यांचा सत्कार सकलमताचार्य श्रीज्ञानराज माणिकप्रभु यांच्यासारख्या अत्यंत सुयोग्य आणि आत्मसाक्षात्कारी पुण्यात्म्याकडून होणं, आणि तो सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभणं, हा दुग्धशर्करा योग श्री सज्जनगड संस्थानाच्या वतीने जुळून आला.
आज काल बरेच सत्कार सोहळे होतात. व्यक्तिनिष्ठ उदो उदो होतो. पण श्री गोविंददेव गिरी आचार्यांचा सत्कार सोहळा या सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरील ज्ञानी, प्रतिभावंत आणि मुख्यत्वेकरून आजच्या काळातही समाजाला जोडण्याची भाषा करणाऱ्या आणि त्यादृष्टीने सम्यक आणि अथक प्रयत्न करणाऱ्या विविध संप्रदायांच्या अर्ध्वयुंच्या उपस्थितीमुळे आगळा ठरला, वेगळा ठरला. कृतज्ञतेचा भाव सर्वच महानुभावांच्या आशीर्वाचनातून ओसंडून वाहत होता.

परमपूज्य श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी श्री समर्थ रामदासांचे वंशज श्री भूषण महाराजांसाठी ‘आदरणीय आणि परम आत्मिय’ असे संबोधन करून श्री माणिकप्रभु संस्थान आणि श्री सज्जनगड संस्थानाच्या परस्पर स्नेह सर्वांनाच जाणवून दिला. त्या ‘परम आत्मिय’ संबोधनात परस्पर प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आणि मायेचा ओलावा जाणवला. मराठी माझी मातृभाषा नाही, त्यामुळे पुणेकरांना मराठीत उद्बोधन करताना, जणू काही लंडनला जाऊन इंग्लिश बोलल्याप्रमाणे आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या, माझ्या व्याकरणाकडे लक्ष न देता, मुख्य भावाकडे लक्ष द्या, असे मिश्कीलपणे सांगताच, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
समर्थांचा रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि श्री माणिक प्रभुंचा दत्त संप्रदाय (सकलमत संप्रदाय) ह्या तिन्ही संप्रदायांचा त्रिवेणी संगम आपल्याला कार्यक्रम स्थळी झालेला दिसत होता. नेमका हाच धागा पकडून श्री ज्ञानराज माणिक प्रभुंनी आपण सर्व भक्ती मार्गाने परमेश्वररुपी एकाच धाग्यामध्ये गुंफले गेलेलो आहोत, असे प्रतिपादन केले.

श्री गोविंददेव गिरी महाराजांबद्दल प्रसंशोद्गार काढताना श्रीजी पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याकडे असलेला पैसा आपण आपल्या अत्यंत प्रिय आणि विश्वासू माणसाकडे ठेवायला देतो, तद्वतच श्रीप्रभु रामचंद्रांनी आपला कोष स्वामीजींकडे ठेवला. ही फार मोठी उपलब्धी आहे. आपला पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या कोषाच्या चाव्या देऊन, ज्यांचा भगवंताने आधीच सत्कार केला आहे, त्यांचा अजून सत्कार आम्ही काय करणार?
सर्वांना भेट देण्यात आलेल्या दासबोधातील खालील ओव्या उद्धृत करून श्रीजी पुढे म्हणतात,
संत धर्माचे धर्मक्षेत्र
संत स्वरूपाचे सत्पात्र
ना तरी पुण्याची पवित्र
पुण्यभूमी ।।
खरं पाहता, संत हेच खरे धर्मक्षेत्र आहे, तीच खरी पुण्यभूमी आहे. संतांच्या वास्तव्याने ते क्षेत्र अधिक पुण्यवान होते, कारण त्यांच्यामध्ये साक्षात् परमात्म्याचा वास असतो.
श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारदर्शक आणि सचोटीच्या व्यवहारामुळेच श्रीराम जन्मभूमी मंदिर दिमाखात उभे राहिले. अन्यथा आपल्या देशामध्ये सरकारी कारभार कसा चालतो याचा श्रीजींनी ‘शिवधनुष्य कोणी तोडले?’ हे मार्मिक, व्यवहारिक उदाहरण देऊन उलगडून सांगितले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटासह उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच देशातील रामाला न मानणाऱ्या काही अधर्मी, निधर्मी आणि विधर्मी लोकांचाही श्रीजींनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. राम म्हणजे नेमकं काय? ह्याचाही खुलासा श्रीजींनी आपल्या आशीर्वाचनात केला. श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना श्रीजींनी, त्यांच्या समाजातील नास्तिकता, अधार्मिकता मिटवण्याच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. त्यामध्ये आठ-दहा लाखांहून जास्त लोकांच्या हृदय मंदिरामध्ये गीता स्थापित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्री गोविंददेव गिरी महाराजांनी गीता परिवाराच्या माध्यमातून केले आहे, हे श्रीजींनी खास करून नमूद केले.

आपल्या आदरातित्थ्यशिलतेचा परिचय देताना श्रीजींनी अत्यंत प्रेमाने श्री गोविंद गिरी महाराजांना माणिक नगरास भेट देण्यासाठी हृदय निमंत्रण मंचावरूनच दिले आणि पुनःश्च त्यांचा गौरव केला.
सकल मत संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदासी संप्रदाय यांच्या तत्त्वज्ञानाचा सुरेख एकत्रित त्रिवेणी संगम ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला. आजच्या घडीला समाजात जे नकारात्मक, विश्वात युद्धाचे जे वातावरण आहे, त्याला छेद देत आपल्या दैदिप्यमान सनातन संस्कृतीची, तत्त्वज्ञानाची झलक ह्या हृदय सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली. श्रीजींसारख्या विद्वत्ताप्रचूर आणि प्रतिभावंत पीठाधीशांच्या आशीर्वचनाने सन्मान सोहळ्याची शान अधिकच वाढविली आणि उपस्थित सर्वच लोकांना धन्यता वाटली. जय जय हो सकलमता विजय हो…
Recent Comments