जय गुरु माणिक

भेट होता समोरासमोर, म्हणावे आधी जय गुरु माणिक,

निरोप घेतानाही शेवटी म्हणावे आनंदे जय गुरु माणिक,

प्रापंचिक कर्मे करता साक्षी ठेवावा, हा श्रीगुरु माणिक,

प्राप्त सुखदु:खातही समान स्मरावा हा श्रीगुरु माणिक,

प्रातःकाळी उठता स्मरण करुन म्हणा जय गुरु माणिक,

निद्रासमयी कृतज्ञता व्यक्त करुन वदा जय गुरु माणिक,

सद्भक्तांची आळ सदोदित पुरवितो, हा श्री गुरु माणिक,

आत्मस्वरुपाचे ज्ञानही करवून देतो, हा श्री गुरु माणिक,

परनिंदा, द्वेष गळोनि जाय, घोष होता जय गुरु माणिक,

सकल धर्म अन् जाती एकसुरे गर्जती, जय गुरु माणिक,

मुख्य उपदेश आम्हा, श्रीगुरु माणिक, जय गुरु माणिक,

मुखामध्ये नित्य असावे श्रीगुरु माणिक जय गुरु माणिक

जीव ब्रम्ह ऐक्य

“मासानां मार्गशीर्षोऽम्” ही भगवदुक्ति प्रसिद्धच आहे. त्यातही श्रीदत्त जन्मोत्सवाचा सोहळा सदेह माणिकनगरी आणि त्यावर श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमेचे प्रवचन हा त्रिवेणी संगम श्री प्रभुइच्छेने व श्रीप्रभुच्या असीम कृपेनेच ह्यावर्षी घडून आला. तीर्थस्थान, योगदंड पूजन, सकलदेवता निमंत्रण, संगमस्नान, श्री माणिकप्रभु संजीवन समाधी दिवस, गुरुद्वादशी, दक्षिणा दरबार, श्री गुरुपूजन अशा एकापेक्षा एक दैदिप्यमान सोहळ्यांची सफर, ज्ञान आणि भक्ती ही दोन चाके असलेल्या सकलमत संप्रदायाच्या, श्री ज्ञानराज माणिकप्रभु सारथ्य करीत असलेल्या रथावर आरूढ होऊन अनुभवताना, संपूर्ण समाधानाची सुखद अनुभूती होत होती.

श्रीप्रभु जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमा प्रवचन होते. सायंकाळी पश्चिम क्षितिजावर जरी सूर्य मावळला होता तरी, माणिकनगरात श्री ज्ञानराज प्रभुरुपी सूर्य उगवला होता. आकाशातील चंद्राच्या शितल किरणांबरोबरच, श्री प्रभुगादीवरील विराजित सूर्याच्या ज्ञानरुपी तेजस्वी किरणांनी उपस्थितांची अंत:करणे प्रमुदित होत होती. श्री प्रभुला व गुरुपरंपरेला वंदन करून श्रीजींनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. आजचा विषय होता जीव आणि ब्रह्माचे ऐक्य (The Oneness of Jeeva and Brahma). विषयाची यथायोग्य बांधणी हे श्री ज्ञानराज प्रभुंच्या आजवरच्या सर्वच प्रवचनांचे परमविशेष आहे. जसे आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी, आधी आपल्या घरापासून कच्च्या रस्त्यावरून यावे लागते व मग आपण मुख्य महामार्गाला लागतो तद्वतच, एखाद्या समजावयास अत्यंत कठीण असलेल्या विषयाला हात घालताना, श्रीजी त्याची पूर्वपिठीका जनसामान्यांना त्यांना समजेल, रुचेल अशा व्यवहारिक भाषेत सांगतात, जेणेकरून सामान्यांची त्या विषयाप्रती जिज्ञासा जागृत होऊन आणि मूळ विषयाला समग्रपणे ग्रहण करण्यासाठी सामान्यजनांची मानसिकता तयार होते.

ह्याच अनुषंगाने, श्रीजींनी आपल्या प्रवचनाची सुरुवात संसार दुःखमय आहे, ह्या वाक्याने केली. आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते की, आपल्याला सतत सुख प्राप्त व्हावे व कधीही दुःख होऊ नये. पण मग प्रश्न असा येतो की, दुःख का होते ? प्रत्यक्ष भगवंताने संसाराला अशाश्वत दुःखालय म्हटलं आहे.‌ तसे पाहता रोजच्या जीवनात आपला ज्याच्याशी (व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना) संबंध येतो, ते सर्व दुःखमय आहे. आपल्या इंद्रियांचा जेव्हा विषयांशी संबंध येतो, तेथे भोग उत्पन्न होतो आणि ह्या भोगांचे निराकरण केवळ भक्तीरुपी वंगणानेच होऊ शकते. आपल्याला कधी दुःख नको असतं आणि अशावेळी आत्यंतिक सुखासाठी शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे, ज्ञान हा एकमेव उपाय आहे. पण मग आपल्याला, हे ज्ञान नेमकं कोणतं? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे आणि नेमका हाच धागा पकडून, ते ज्ञान म्हणजेच, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ह्या पौर्णिमा प्रवचनाच्या विषयाची वीण श्रीजी अत्यंत सहजपणे आणि तितक्याच तरलतेने विणतात. आपला जीव हेच ब्रह्म आहे आणि ह्या ज्ञानामुळेच दुःखाची निवृत्ती होते.‌

आपण स्वतःला जीवात्मा समजतो आणि श्रीप्रभुला परमात्मा समजतो. मग जीवात्मा आणि परमात्मा एक होऊ शकतो का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यावर श्रीजी म्हणतात, आत्मा एक आहे. आत्मा एकची सर्वांतरी हो… श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या या पदातही अगदी हेच वर्णिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेत आणि श्रुतीतही आत्म्याचे ऐकत्वच प्रतिपादित केले आहे. ही संकल्पना जनसामान्यांत सहजतेने पण खोलवर रुजवतानाच श्रीजी, आत्म्याला मोबाईलच्या नेटवर्कची उपमा देतात. आपण मोबाईलचे नेटवर्क पाहू शकत नाही, त्याचा रंग, रुप, आकार आपल्याला माहित नाही. पण केवळ नेटवर्क दिसत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही, असे आपण म्हणू शकत नाही. तसेच नेटवर्क हा जरी मोबाईलचा प्रत्यक्ष भाग (पार्ट) नसला तरी, तो मोबाईलला सर्व बाजूंनी व्यापून आहे. प्रत्येकाचे मोबाईल जरी वेगवेगळे असले तरी, असंख्य मोबाईलमध्ये एकच नेटवर्क व्यापून आहे. आपला मोबाईल जरी खराब झाला तरी, नेटवर्कचे काहीही नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा मोबाईल नेटवर्कसारखा सर्वव्याप्त आहे. आत्मा जरी उत्पन्न होत नाही, मरत नाही, त्याला रूप, रंग, आकार नाही पण, त्याच्याच सत्तेने सर्व काही चालतं. श्रुतीमध्येही हीच संकल्पना वायू आणि अग्नीचे उदाहरण देऊन समजावली आहे. श्रीजी पुढे म्हणतात, आत्मा जेव्हा व्यष्टीच्या (व्यक्तिगत) स्तरावर प्रकटतो, तेव्हा त्यास जीवात्मा म्हणतात. पण, तोच आत्मा जेव्हा समष्टीच्या (सर्वव्यापी) स्तरावर असतो, तेव्हा त्यास परमात्मा म्हणतात. मूळ आत्म्याच्या जीवात्मा किंवा परमात्मा ह्या उपाधीला जर हटवले, तर उरतो तो केवळ शुद्ध, चैतन्यस्वरूप आत्माच, आणि हेच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे.

पुन्हा, आता हे ज्ञान मग कुठे मिळते? असा आणखी एक प्रश्न सामान्यांना नक्कीच पडणार हे गृहीत धरूनच श्रीजी म्हणतात की, असे ज्ञान श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच मिळते. पण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे नेमके साधन कोणते? हे समजवताना श्रीजी म्हणतात की, ज्ञानी गुरूकडे जाऊन श्रवण, मनन आणि निदिध्यासन केल्यामुळे, हे आत्मज्ञान प्राप्त होते.

श्रवण म्हणजे केवळ ऐकणे नव्हे. विटांचे घर केवळ विटा अंगणात येऊन पडल्यामुळे जसे बांधले जात नाही, घर बांधण्यासाठी एका गवंड्याची आवश्यकता असते, तसेच केवळ ऐकण्याला श्रवण म्हणता येत नाही. एखाद्या क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ श्रीगुरुला शरण जाऊन, दीर्घकाळ त्यांच्या सेवेत राहून, शास्त्रांचे सम्यक ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच श्रवण होय.श्रवण करताना मनामध्ये अनेक प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रश्नांची यादी करणे अनिवार्य आहे. शास्त्रांमध्येही ज्ञान एकदम दिले जात नाही. जसे एक एक पायरी चढून आपण शेवटी गुरुशिखरावर पोहोचतो,  तद्वतच शास्त्रांच्या विविध पैलूंचा यथावकाश अभ्यास करणे म्हणजेच श्रवण होय.

श्रवणानंतर पडलेल्या प्रश्नांचे बुद्धी, तर्क, शास्त्र व गुरुपदेशाद्वारा सम्यक निराकरण करणे म्हणजेच मनन होय. मननाने आता बुद्धी नि:संशय झाली. बुद्धीला, मीच ब्रह्म आहे, हे आता पटले. पण जोपर्यंत आपले मन, मी ब्रह्म आहे, असे मानत नाही, तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. आपल्या बुद्धीला पटलेले, मनानेही सर्वार्थाने स्वीकारणे यालाच निदिध्यासन म्हणतात आणि हे  केवळ नित्य सरावानेच शक्य आहे. श्रवण आणि मननामध्ये श्री गुरु साहाय्य करतो पण निदिध्यासन मात्र आपल्याला एकट्यानेच करावे लागते. हे सांगताना श्रीजी सायकल चालवण्याचे उदाहरण देतात. सायकल चालवायला शिकवताना जसे आपले काका किंवा मामा सुरुवातीला हात देतात पण, नंतर मात्र ते आपल्याला एकट्याला सोडून देतात. हळूहळू आपण एकट्याने सायकल चालवायला शिकतो.

प्रवचनाच्या पुढच्या टप्प्यावर श्रीजी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचे लाभ कोणते? हेही सांगतात. ते लाभ म्हणजेच जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती.

जीवन मुक्ती म्हणजेच जिवंत असतानाच ह्या शरीरात मुक्तीचा किंवा मोक्षाचा आनंद अनुभवणे. केवळ अद्वैत सिद्धांतच आपल्याला जीवन मुक्तीचा अनुभव करून देतो. श्रीजी पुढे जीवनमुक्ताची लक्षणेही फोड करून सांगतात. स्वतंत्रता (मी, माझ्या सुखासाठी इतर कोणावरही अवलंबून नाही), पूर्णता (कोणत्याही घटनेचा, वस्तूचा, व्यक्तीचा अथवा परिस्थितीचा अभाव असूनही तो जाणवत नाही, कारण जीव आणि ब्रह्म ऐक्याचे ज्ञान त्याला झालेले असते. परमात्मा पूर्ण आहे आणि त्याच्याशी जर ऐक्य झाले तर मग अपूर्णत्व कुठून राहणार?) आणि समत्व (सर्व परिस्थितीत सम राहणे. बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय, देह, श्वास, परिस्थिती, मानपमान, जय पराजय आणि नफातोटा समत्वपणे पाहणे) ही जीवन मुक्ताची तीन लक्षणे आहेत. सामान्यजनांत असलेली अस्वतंत्रता, अपूर्णता आणि असमत्व हेच त्यांच्या दुःखाचे कारण असते.

त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूनंतर जीवनमुक्तांचे काय होते? याचा उहापोहसुद्धा श्रीजी आपल्या प्रवचनात करतात. श्रीजी म्हणतात, असा जीवनमुक्त विदेहमुक्तीस प्राप्त होतो. म्हणजेच, मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो श्रीप्रभुस्वरूपात लीन होतो. कारण त्याची सर्व कर्मे नष्ट होतात. खरे तर, आपण आपल्या कर्मांमुळेच जन्म होतो. मग ज्ञानी जीवांचे कर्म नष्ट कसे होतात? तर ज्ञानी भोगाद्वारे आपले प्रारब्ध कर्म नष्ट करतो. आपल्या उपासनेने, आपल्या भक्तीने, भविष्यातील कर्मे नष्ट करतो, तसेच ज्ञानाने संचित कर्मे नष्ट करतो. जसे भाजलेले बी अंकुरित होत नाही त्याचप्रमाणे, जीवनमुक्त पुनर्जन्म घेत नाही. ह्यालाच विदेह मुक्ती म्हणतात.

श्री माणिकप्रभुंचे अथवा सकलमत संप्रदायाचे समग्र वाङ्मय, पदे ह्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या प्रसारासाठीच आहेत. आपण स्वतःला श्री प्रभुपेक्षा यत्किंचितही वेगळे मानले तर तेच दुःखाचे अथवा भयाचे कारण होते. आणि म्हणूनच श्रीजी ठामपणे सांगतात की, द्वैतामध्ये दुःख आहे अद्वैतात आनंद आहे. ऐक्यत्वात आनंद आहे. श्रीदत्त जयंतीच्या ह्या परममंगल पर्वामध्ये श्रीजी म्हणतात की, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच श्री माणिकप्रभुंचा अवतार आहे आणि हा बोध ग्रहण करण्यासाठीच श्रीदत्त जयंतीचा महोत्सव आहे. या श्रीदत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचा लाभ काय? तर श्रीजी म्हणतात की, ज्ञानामृतं भोजनम्. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा हा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रसाद आपल्याला श्रीप्रभुकृपेने पोटभर लाभो, तसेच सर्वांमध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासंबंधी आवड आणि श्रद्धा उत्पन्न होऊन, त्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासनरुपी प्रयत्न करून त्याचे कृपाफळ म्हणून आपणांस जीवनमुक्ती आणि अंती विदेहमुक्ती प्राप्त होवो, अशी श्रीप्रभुचरणी विनम्र प्रार्थना करून आणि तसाच आशीर्वाद श्रीजींनी सर्वांना दिला.‌

श्रीजींच्या प्रवचनानंतर लगेचच, माणिकनगरच्याच नृत्यालयातील बालकलाकारांनी भरतनाट्यमचा नितांत सुंदर नृत्याविष्कार सादर केला. श्रीजींनी आपल्या प्रवचनात जीवनमुक्तांची स्वतंत्रता, पूर्णता आणि समत्व ही तीन लक्षणे सांगितली होती, ज्याच्या फलस्वरूप जीवनमुक्तांना नित्य आनंदाची प्राप्ती होत असते. भरतनाट्यममध्ये सादर केलेल्या नृत्याविष्कारामध्ये सहभागी कलाकारांना त्यांच्या शिक्षिकेने नृत्य करण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. नियमित सरावामुळे त्यांचे नृत्य पूर्णत्वास गेले होते. प्रज्वलित केलेले दिवे हातांच्या तळव्यावर, डोक्यावर ठेवून तसेच, आपल्या संपूर्ण शरीराचा भार खाली असलेल्या ताटलीच्या (परातीच्या) कडेवर ठेवून त्या कलाकारांनी संपूर्ण नृत्यामध्ये आपल्या शरीराचा समतोलही उत्तमप्रकारे साधला होता. अत्यंत सुहास्य वदनाने आणि सफाईदारपणे त्यांनी आपले नृत्य सादर केले. श्रीजींनी आपल्या प्रवचनात सांगितलेली जीवनमुक्तांची तिन्ही लक्षणे त्याचवेळी आम्हाला त्या नृत्याविष्कारातही दिसली आणि त्याचे फलस्वरूप उपस्थित सर्वांना अतिशय आनंद झाला. प्रवचनात सांगितलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब नृत्याविष्कारात लगेचच उमटल्यामुळे, ते तत्वज्ञान परिणामकपणे मनात खोलवर रुजण्यास, आपोआपच मदत झाली. हा बोध ग्रहण करण्याची ही सर्व त्या श्रीप्रभुचीच योजना आहे असे समजून श्रीप्रभुकडे कृतज्ञता व्यक्त केली आणि भंडारखान्यात असलेल्या श्री प्रभुच्या प्रसादाचे, आमच्या शरीरातील अन्नमय कोषाशी ऐक्य साधून, आनंदाची ती अनुभूती घेण्यासाठी आमची पावले आपोआपच भंडारखान्याकडे वळाली…

प्रभु कृपा म्हणजे काय?

भौतिक वस्तू प्राप्त होणे म्हणजे प्रभु कृपा नव्हे. भौतिक सुख-समृद्धी जवळ नसतानाही समाधानी आसणे, म्हणजे प्रभु कृपा.

श्री सदगुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी “प्रभु ने मेरा सब कूछ छिना” या पदातून सांगितलय की ज्यां भक्तांवर प्रभूंना कृपा करावयाची असते त्यांना प्रभु काही देत नाहीत तर त्यांच्याकडूनच सर्व काही काढून घेतात. प्रभु सर्वांसोबत असं करत नाहीत. ज्याला जे हवंय ते सर्वकाही किंबहुना त्याहून ही आधिकच देतात आणि त्यांना पूर्ण संतुष्ट करतात. परंतु कधी कधी जेव्हां एखाद्या भक्तावरती अत्यंत कृपा करावयाची असते तेव्हां प्रभु काही देत नाहीत, उलट त्या भक्ता कडून सर्वकाही काढून घेतात. सर्व काही काढून घेतल्यानंतर त्या भक्ता कडे काहीच उरत नाही. सुख आणि दुःख यांना काहीच महत्त्व राहत नाही. तेव्हां त्याच्या कडे करण्या साठी काही ही राहत नाही आणि आयुष्यात कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे ‘‘माणिक, माणिक जय गुरु माणिक‘‘ हे नाव घेत आयुष्य जगणे.

जीवनात जगत असताना असंख्य संकटे, विविध आडचणी सर्वांनाच येत असतात. अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्या अडचणीच्या डोंगराला सामोरे जाण्याची, त्याच्याशी झुंजण्याची जी शक्ती आपल्याला मिळते, ती शक्ती म्हणजेच प्रभु कृपा. आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात हीच प्रभु कृपा. एकवेळचे जेवणाचे वांदे असताना ही दोन वेळचे जेवण मिळणे ही ही प्रभूचीच कृपा. ‘आता सर्व संपलं’ अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच प्रभू कृपा.

प्रभु चरित्रातील 23वा अध्याय जर आपण पहिला तर त्यात कोमटी जातीतील एक बालिका, लहान वयातच विधवा होते, आई, वडील भाऊ बहिण सर्व नातेवाईक, सखे सोयींरीचा साथ सुटून जातो. आधारासाठी तिला कोणीच राहत नाही,आशा आर्थहीन जीवनात जेव्हां प्रभूंची भेट होते आणि प्रभु कृपा होते तेव्हां त्याच स्त्रीला देवत्व प्राप्त होते. आज आपण त्यांना व्यकंमा देवी या नावाने पुजतो, हीच आहे प्रभु कृपा.

माणसाच्या जीवनात आनेक लहान मोठ्या घटना घडत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात प्रभूंची कृपा अखंडित रूपी होतच असते, परंतु त्या माणसाला प्रभूंची झालेली कृपा कळण्या साठीही भाग्यच लागते आणि ते समजण्या साठी योग्य सदगुरू मिळण्याची गरज असते. त्याशिवाय प्रभूंची झालेली कृपा ही समजत नाही.

आपल्याला परमेश्वर आणि गुरु एकाच देहात भेटणे म्हणजे भाग्यच की हो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईंचे फळ असतील की मला श्री सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांकडून आनुग्रह प्राप्त झाला. आणि मी जेव्हांही माझ्या सदगुरूंचे दर्शन घेतो तेव्हां हे जाणवते की माझे प्रभु आणि माझे गुरु दोघेही एकच देहात वास करत आहेत.

आशीच प्रभु कृपा सर्वांना मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

धांव गे बाई

धांव गे बाई धरिला कान्हा चोर ।।धृ।।
मारावे तरी खोडी सोडीना ।
जैसा वराडी भोर ।।१।।
किती सांगावे कांहीं ऐकेना ।
निशिदिन याचा घोर ।।२।।
माणिक म्हणे प्रभु दीन दिसे परी ।
जो सर्वांहूनि थोर ।।३।।

परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु महाराजांनी वरील काव्यामधून ‘परम प्रेमरुपा’ अशा मधुराभक्तीचा गोडवा प्रदर्शित केला आहे. त्यांच्या कृपेची आकांक्षा मनी धरून, वरील काव्याचे विवरण करण्याचा प्रयत्न करते आहे.

‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’, सद्गुरु श्री माणिकप्रभु ह्यांच्या या काव्यातून त्यांनी, श्रीकृष्णावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या वत्सल गोपी आणि खट्याळ, हट्टी अशा बाळकृष्णाच्या जवळिकेचा सुंदर प्रसंग, ज्यात त्या गोपींच्या प्रेम भावनेच्या अनेक छटा रंगविल्या आहेत.

वाच्यार्थ – गोपींच्या खोड्या काढून, पळून जाणाऱ्या बाळकृष्णाला त्या गोपीने अतिखटपटी करुन पकडले आहे. पण कान्हा इतका चपळ आणि हुलकावे देणारा आहे हे माहित असल्याने, ती गोपी आपल्या इतर गोपींना मदतीसाठी धावत यायला सांगत आहे की ‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’. चोर एवढ्यासाठी म्हटले आहे की, हा गोपींच्या नकळत कधी घरात शिरुन दह्यादुधाची मडकी फोडायचा, फस्त करायचा आणि पळूनही जायचा. घरातल्या दुधाण्यांची गोष्ट सोडा पण त्यांची मनही चोरून‌ न्यायचा. ‘कर्षति इति कृष्णः’. गोपींची मनही कधी आकर्षून घ्यायचा हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. म्हणूनच हवीहवीशी वाटणारी चोरी का होईना, पण चोरीच ना ती !

मग लटके का असेना, त्याच्यावर रागवायचं, चापटी मारायची, या त्यांच्या कृती त्यांचं कृष्णावरचं प्रेम, ममत्व, वात्सल्य हेच भाव दर्शवितात. पण एवढं करून कृष्णाच्या खोड्या काही संपतच नाहीत. जसा एखादा हेकट वराडी असावा, तो त्याला पाहिजे तेच करतो, तुमच्या सांगण्याला भीक घालत नाही, तसाच हा कान्हा करतो आहे. त्यामुळे रात्रंदिवस तो जीवाला घोर लावतो आणि दुसरा विषयच सुचू देत नाही.

आता मात्र गोपींनी त्याला धरले, पकडले. सद्गुरु श्री माणिक प्रभु म्हणतात, ‘आता गोपींना त्याचा कळवळा येतोय’. खट्याळ लेकराला बंदिस्त केल्यावर, गोपींच्या प्रेमळ नजरेला तो दीन दिसतो आहे, तरी ‘जो सर्वांहूनि थोर’ असा हा कान्हा! नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे ‘तत्रापि न महात्मज्ञान विस्मृत्यपवाद:।’ म्हणजेच, कृष्ण हा बालवयात जरी असला, तरी त्याचे मोठेपण त्या कधी विसरल्या नाहीत.

असे हे, कृष्ण आणि गोपी यांच्या जवळिकेचा गोडवा अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेलं मधुर काव्य आहे.

लक्ष्यार्थ – परमार्थमार्गीचा जो साधक आहे, विशेषतः भक्तिमार्गातला, त्याला ईश्वरभेटीची तळमळ तर असतेच. त्याच्या वृत्तींना अंतर्मुख करून, ध्यानमार्गाने त्याचे दर्शन घेण्यासाठी तो अपार कष्ट घेतो. वरील काव्यातील ही गोपी ही त्या अंतर्मुखवृत्तीचे रूपक आहे, असे मला वाटते. संत दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी, जरी बघणे असेल हरी।’ एखाद्या वेळी त्या वृत्तीला सच्चिदानंदाचा अनुभव येतो ही, पण ती वृत्ती तो आनंद कायमच धरुन ठेवीलच अशी खात्री नसते. शिवाय इतर विषयांच्या वृत्ती तर सतत येतच असतात. म्हणून ही ‘गोपी’वृत्ती त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तींनाही अंतर्मुख होण्यासाठी हाक देत आहे आणि हळूहळू नाही तर धावत या, नाही तर हा केव्हा सुटून जाईल, सांगता यायचं नाही. लडिवाळपणे त्या कृष्णाला (आत्मारामाला) ती ‘चोर’ म्हणतेय. शेवटी सर्व वृत्ती या आत्म्याच्या स्फुरणामुळेच आलेल्या असतात. त्यामुळे अत्यंतिक जवळिकेच्या संबंधामुळे वृत्तींना या आत्मारामाची सहज ओढ असतेच. केवळ अविद्येमुळे त्या बाहेरील विषयांकडे ओढल्या जातात. तेव्हा कधीतरी त्याची अनुभूती आली तर ती पुन्हा सुटू जाऊ नये, म्हणून ती ‘गोपी’वृत्ती इतर सर्व वृत्तींना अंतर्मुख होऊन ‘एकवृत्ती’ होण्यासाठी साद घालते आहे. कारण एकवृत्तीचे बळ अधिक असते.

‘मारावे तरी खोडी सोडीना, जैसा वराडी भोर।’ लहान मुलाला आई मारते, ती दुष्टावा म्हणून मारते का? आईने सांगितलेले त्याने ऐकावे म्हणूनच ना! आणि लेकराला मारल्याचं वाईट पुन्हा तिलाच वाटतं. तसंच त्या सच्चिदानंदाचा ‘सदा संग’ राहावा म्हणून साधक जीवाच्या आटापिटीने प्रयत्न करीत असतो. रात्रंदिवस त्या आत्मारामाचा ध्यास त्याला लागून राहिलेला असतो. म्हणूनच ‘निशिदिनी याचा घोर’. संत तुकोबा म्हणतात,

‘हरि तू निष्ठूर निर्गुण, नाही माया बहु कठिण ।
नव्हे ते करिसी आन, कवणे नाही केले ते ।’

प्रभुजींनी ‘घोर’ हा शब्द फार मार्मिकपणे घातला आहे. कृष्णसंग ‘सदा’चा हवा, हा साधकाच्या तळमळीचा उच्चांक आहे. दुसरा विषय त्याच्या वृत्तींना नाही.

आता कृष्ण तर हाती सापडलाय. त्या सच्चिदानंदाचा कोण आनंद आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आरोप त्याच्यावर केले होते, तो आता आपल्या भावाच्या बंधनात पडल्याने, त्याच्यावरच्या उत्कट प्रेमाने तो दीन झाल्यासारखं वाटू लागलाय. पण असं होऊनसुद्धा कृष्णाची थोरवी त्या कधीच विसरत नाहीत. ‘जो सर्वांहुनी थोर।’

अशा ‘जाणोनि नेणता’ झालेल्या भक्ताच्या वृत्तींचं वर्णन प्रभुजींनी ‘कामक्रोधाधिकं सर्वं तस्मिन्नेव करणियं’ (नारद भक्तिसुत्र) म्हणजे जे जे भाव असतील, मग काम असो, क्रोध असो, ते सर्व ‘त्याच्याच’साठी असतील, हे या श्रीकृष्ण आणि गोपीच्या भावपूर्ण प्रसंगातून अतिशय मार्मिकपणे सांगितले आहेत. प्रभुजींच्या या संपूर्ण काव्यातून भक्तीचा गोडवा मनाला प्रसन्नता देऊन जातो.

 

सारखं का माणिकनगरला जाता?

दर पौर्णिमेला माणिकनगरला जायचं म्हटल की ,काही जन म्हणतात काय वेड लागलंय का काय तुला दर महिन्याला पौर्णिमा आली की माणिक नगरला पळतोस! तर आमच्या भाषेत वेडच आहे ते आणि आम्ही प्रभूचेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही तिथं जालच कशाला? बरोबर ना? वेळ आल्यावर्ती वेडेच कामाला येतात बरं आणि शहाणे दुरूनच पळून जातात. वरून अस विचारतात की काय मिळतं तिथं सारखं सारखं जाऊन?

कामधंदे सोडून पळताय अस काय आहे माणिक नगरला ? तर मग आइका. अहो कामधंदे सोडून आम्ही जात नाही तर आम्ही आमच्या प्रभूंसाठी वेळात वेळ काढून जातो, त्यांच्या दर्शनासाठी जातो. मंदिराच्या नऊ पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी चढल्या वरती चांगली आणि वाईट केलेली सर्व कर्म आठवतात आणि डोळे भरून येतात – ते आहे माणिकनगर! आयुष्यातील सगळी दुःख विसरून, घरची, बाहेरची कटकट विसरून दोन दिवस जे सुखाने जगतो ना, जिथं खऱ्या सुख आणि समाधानाचा आभास होतो तेच आहे – माणिकनगर! दर पौर्णिमेला श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांची आमृतवाणी त्यांच्या आगदी समोर बसून आईकण्याचे भाग्य मिळते, भक्तिमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! सर्व जाती धर्माची माणस, श्रीमंत असो वा गरीब जिथं एकत्र येतात, भंडारखाण्यात एकत्र महाप्रसाद घेतात ते पुण्य  ठिकाण आहे – माणिकनगर! जिथं सर्व सुख दुःखाची, पाप आणि पुण्यांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा  शिल्लक काही राहत नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी मिळणारच ते स्थान म्हणजे – माणिकनगर! मुलांचे शिक्षण, मुला, मुलींची लग्न, नोकरीत बढती, आरोग्याच्या तक्रारी, व्यवसायात वाढ हे सर्व मनासारखं जिथं होत ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! जिथे मोठ मोठे योगीपुरुष, नतमस्तक होतात, मोठ मोठी संतपुरुष वेगवेगळ्या रूपाने येऊन जातात. अहंकार जिथं गळून पडतो आणि मग अक्कल ठिकाण्यावरती येते, आपराध केल्याची जिथं जाणीव होते ते स्थान म्हणजे – माणिकनगर!

असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत  प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!

ज्ञानसूर्य श्री मार्तंड माणिक प्रभु

आज श्री मार्तंड माणिकप्रभु जयंती. महाराष्ट्रात जन्माला येऊन श्री समर्थ रामदासांना शरण न जाणे जसे दुर्भाग्याचे लक्षण तसे कर्नाटकात पाऊल ठेवूनही माणिकनगर विषयी अनभिज्ञ राहण्यासारखे दुसरे दुःख नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जशी वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी डवरलेली असते तशीच माणिकनगरी श्रीजींच्या नित्य चैतन्याने भारलेली असते.

श्री शंकर महाराज आणि श्री मार्तंड माणिक प्रभू या द्वय विभूतींची संमिलीत एक कथा पूर्वीच वाचनात आली आणि तेव्हा पासून श्री मार्तंड माणिकप्रभूंविषयी, त्यांच्या अधिकाराविषयी अत्यंत आदर आणि जिव्हाळा वाटू लागला. त्यांच्या अनेक लीला ऐकून, वाचून मन थक्कच होते असे नाही तर नतमस्तक होते.

अशी वदंता आहे की श्रीक्षेत्र काशीत चुकून कोणालाही धक्का लागावा आणि तो ph.d असावा, तात्पर्य – तेथे अनेक विद्वान आहेत.आमच्या माणिक नगरीत तर या उलट आहे. Ph.d. प्राप्त करायला माणसाला काही वर्षे घालवावी लागतात. माणिकनगरात तर, ” गाव का बच्चा बच्चा वेदांती” असतो. श्री माणिक प्रभूंपासून आजच्या श्रीजीं पर्यंत सर्वांनी आपल्या प्रवचनातून जनमानसावर असे संस्कार केले आहेत. बाळ जन्मतः च वेदांत श्रवण करतं. आनंदाचं बाळकडू घेऊनच मोठं होतं.

समाधान ही येथील इस्टेट आहे. ती तेथून कितीही न्या , मूळ साठा रिकामाच होत नाही. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…. सारखे भरून शिल्लक राहिले आहे आणि याची साक्ष खुद्द श्रीजीं, श्री मार्तंड माणिक प्रभूच देतात.ज्या समाधीवर गुलाबाची चार फुले चार अक्षर रुपी आशीर्वादाची असतात* त्या भूमीच्या प्रत्येक रजकणात आशीर्वाद नसेलच कसा?

अंतत: एवढेच म्हणेन, श्री प्रभूंपासून आजच्या प्रेमळ, विद्वान, updated श्रीजीं पर्यंत सर्वांबद्द्ल आम्हा भक्तांच्या हृदयात अत्यंत प्रेम आहे. ते शब्दबद्ध करण्यासाठी माझी लेखणी असमर्थ असली तरी मती मात्र त्यांचे चरणी लीन आहे हे नक्की.