सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.

श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.

जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.

१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.

इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.

तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.

१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.

२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.

३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.

परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम

[social_warfare]