पहा यशोदे

परमपूज्य सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराजांनी श्री बाळकृष्णाच्या लीलांवर अनेक सुंदर सुंदर भावप्रधान काव्ये केलेली आहेत. ती वाचताना खूप आनंद मिळतो. गोपगोपींचं श्रीकृष्णावरचं प्रेम वाचताना आपण तन्मय होऊन जातो. काव्यातून वर्णिलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि त्या भावभावनांमध्ये आपण तल्लीन होऊन जातो.

पण या काव्यांची एक खासियत आहे. आपण या काव्यांचा जसा अभ्यासपूर्वक विचार करू तसतसे ते शब्द आपल्याला आत्मचिंतन करावयास भाग पाडतात. वेदांतिक वचने आपल्याला मार्गदर्शक होतात. स्वरूपसाध्याच्या मार्गावर ते ईश्वरी चैतन्यच साधकाला कसं आधारभूत होतं, अशा प्रकारचा सुंदर पण गूढ गर्भितार्थ या काव्यांमध्ये दडला आहे.

पुढील काव्य अशाच प्रकारचे सुंदर गूढगर्भ आहे. परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु यांच्या मंगल पावन चरणी शरण राहून त्याचे विवरण करण्याचा प्रयत्न मी करते आहे.

काव्य:

पहा यशोदे तुझा लेक खोडी
जाऊनी दही दूध मडकी फोडी ।।धृ।।

येतसे नित्य गृहाप्रति माझ्या
लहानसे वासरू वनाप्रति सोडी ।।१।।

जात असतां यमुनेच्या पाण्या
मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।२।।

माणिक म्हणे वर्णितां याचे गुण
शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।

 

ही एक गोपी यशोदेकडे कृष्णाचे गाऱ्हाणे घेऊन आलेली आहे आणि सांगतेय की तुझा लेक अत्यंत खोड्याळ आहे. ‘तुझा लेखक खोडीयातला खोडी म्हणजे खट्याळ किंवा खोड्याळ हा शब्द बहुदा लहान मुलांच्या ज्या वात्रट लीला असतात त्यासाठीच वापरतात. लहान मुलांच्या खोड्यांनी मोठ्यांना त्रास होतो पण संताप येत नाही किंवा याला काही मोठी शिक्षा करावी असेही वाटत नाही. किंबहुनाकिती लबाड हो हा, कसं त्याचं डोकं चालतंम्हणून आत लपवून ठेवलेलं कौतुकही बाहेर येतं. असाच काहीसा भाव, यशोदेकडे, कृष्णाचं गाऱ्हाण सांगताना या गोपीचा आहे.

ही गोपी यशोदे कडे तक्रार करतेय की, ‘येतसे नित्य गृहाप्रति माझ्या, लहानसे वासरू वनाप्रति सोडी।।‘. ती म्हणते हा कान्हा माझ्याकडे नित्याचा येतच असतो, पण गप्प बसत नाही. ते लहानसे पाडस वनाच्या दिशेने सोडतो. आता त्या बिचार्‍या वासराला काय कळतंय? कुठेतरी उंडारलं नी वाट चुकलं, रानात श्वापदं समोर आली, तर काय करील ते?’

परमपूज्य सद्गुरु श्री प्रभुजींनी वेदांतिक तत्वज्ञान मोठ्या खुबीने या गोड तक्रारीमध्ये गुंफलेले आहे. आत्मारामाची स्फुरणे नित्याची येतच असतात. मनाच्या दरवाजातून बाहेर पडणारी वृत्ती तशी कोवळीच असते. पण बाहेरच्या जगात, विषयांच्या निबिड अरण्यात शिरली की तिच्यावर काय आणि कोणते परिणाम होतील सांगता येत नाही. मग ती अध:पतनाला कारणही होऊ शकते. म्हणून तर त्या वासराला एकटं सोडता त्याच्याबरोबर बुद्धिविवेकाचा गुराखी हवाच.

आतां गोपीची अवस्था अशी झाली की आतां तक्रार तर केलीच आहे ना, मग सर्वच खोड्या सांगून टाकाव्या! यशोदेला ती सांगते, ‘जात असतां यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।यमुनेच्या पाण्याला जाणे, म्हणजे तिथे स्नान करून, वस्त्र स्वच्छ धुवून, पुन्हा घागरीत पाणी भरून घरी आणणे आणि हा रोजच्या रोज नित्याचा उपक्रम होता.

परमार्थिकदृष्ट्या या ओळींच्या लक्ष्यार्थाचे चिंतन केल्यास असं ध्यानात येतं की, यमुनेचा प्रवाह हा साधनेच्या प्रवाहासारखा आहे. प्रामाणिक साधक नित्याने या साधनयमुनेच्या पाण्यात स्नान संध्या करीत असतो. ते त्याच्या अंत:करण शुद्धीसाठीच! जीवाचे आत्मचैतन्य हे पंचकोशांच्या आवरणांमध्ये अवगुंठित असते. हे पंचकोशच त्याची वस्त्रे असतात. साधक जेव्हा ह्या आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्नात असतो तेव्हा त्याला या, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशांना ओलांडूनच आनंदमयात प्रवेश करावा लागतो. तेथेच जीवाशिवाचे मिलन होते, अद्वैत होते. या सर्व प्रयत्नांना आत्मचैतन्याचेच अधिष्ठान असते. त्याच्याशिवाय या क्रिया होऊच शकत नाहीत. म्हणून सद्गुरु प्रभुजींनीमागुनी येऊनी वस्त्रचि फेडीही काव्यपंक्ती त्यांच्या अलौकिक विचक्षण प्रज्ञेने लिहिलेली आहे. आता पंचकोशांची ही वस्त्रे फेडली तर, ‘तुका झालासे पांडुरंगही अवस्था येणारच. ‘अवघा देवचि झाला पाही भरोनिया अंतर्बाही ।।

परमपूज्य सद्गुरु प्रभुजींनी या काव्याच्या पहिल्या दोन कडव्यांत साधकाच्या बाह्य साधनेत ईश्वर कसा परिणाम करतो आणि तिसऱ्या कडव्यात त्याच्या अंतरंग साधनेत कसा परिणाम करतो हे गोपीच्या तक्रारीच्या रूपाने निर्देशित केले आहे.

म्हणूनच सद्गुरु श्री प्रभुजी म्हणतात, ‘माणिक म्हणे वर्णितां याचे गुण, शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।खरं तर जो मुळात निर्गुणच आहे त्याचे गुण कसे काय वर्णन करणार? पण सत्य हेच आहे की कर्ता करविता तर तोच आहे. म्हणून संत तुकोबाही म्हणताततुझं वर्णी ऐसा तुजविण नाही दुजा कोणी तिन्ही भुवनी।। सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा। चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ।।त्याचे गुण वर्णिताना शेषाच्या सहस्त्र जिभाही चिरल्या गेल्या असे म्हणातात. तेव्हा श्री प्रभुजी म्हणतात, ‘त्याच्यापुढे माझी मती थोडी।।

इतका खोल गर्भितार्थ असलेले तत्त्वज्ञान प्रभुजींनी गोपीच्या भावभावनांच्या इतक्या सुंदर शब्दात उद्धृत केलेले आहे. त्यांच्या अचाट, अजन प्रज्ञेची झेप माझ्यासारख्या अज्ञानी साधकाने कशी वर्णावी? पण ज्ञानोबा माऊलींचे शब्द आठवले, ‘वस्तुत: जरी मी मूर्खू हातून घडे अविवेकु तरी पुढे मार्गदर्शकु संत कृपेचा दिपु आहे ।।आणि या काव्याचे विवरण माझ्या तोकड्या शक्तिबुद्धीप्रमाणे केले आहे. सद्गुरूंनी यामध्ये झालेल्या चुकांची क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही त्यांच्या पावन मंगल चरणी प्रार्थना करते.

सद्गुरु चरणी अनन्यभावे प्रणाम!

कृष्णा मजकडे पाहू नको…

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥

श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.

नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.

वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.

श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.

बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.

राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्‌, यांतच आनंद आहे.

सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.

महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.

माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.