वेदांत सप्ताह भाग नववा

साहेब, चहा आला, ह्या आवाजाने आज सकाळी जाग आली. अत्यंत कर्तव्यतत्पर सेवेकरी, चहा आल्यावर यात्री निवासातील प्रत्येक खोलीत जाऊन रोज वर्दी द्यायचा. झटपट तोंड धुवून चहा प्यायला हजर झालो. आज आणखी काही प्रभुभक्त आपापल्या घरी रवाना होणार होते. सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या. काल पारायण संपले होते आणि श्रीजींच्या वेदांत प्रवचनांचीही सांगता झाली होती. त्यामुळे आज सकाळी काय करावे? हा प्रश्न अनाहुतपणे मनात डोकावला. कालच्या प्रवचनाला थोडेफार ओवीबद्ध केलं आणि मन संगमावर धावू लागलं.

गुरुगंगा आणि विरजा नदीचा संगम. श्री माणिकनगरातलं एक अत्यंत शांत, मन प्रसन्न करणारं ठिकाण. माणिक नगरातील वास्तव्यात मी अनेक तास येथे घालवले आहेत. झटपट स्नान उरकून मी संगमावर आलो. आज अनेक प्रकारचे पक्षी येथे उपस्थित होते. कडूलिंबाच्या झाडावरला मोर, कडूलिंबाच्याच झाडावर दंगामस्ती करणारे अनेक हरेवा, उगाचच इकडून तिकडून उडणारे बुलबुल, गुरु गंगेच्या पात्रात विहीरणारी बदके, वडाच्या झाडावर अत्यंत सावधपणे बसलेले, आणि माझ्या थोड्या हालचालीने ही दुसरीकडे जाऊन बसणारे पांढरे घुबड, संगमाजवळील पाणथळीच्या जागेत असलेला खंड्या, पाण्यात डुबकी मारून मासे टिपण्यात व्यस्त असणाऱ्या टिटव्या, ह्या सर्वांना पाहताना तासभर कधी निघून गेला कळलेच नाही. श्री तात्यामहाराज आणि श्री दादामहाराज ह्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पुष्करणी तीर्थातील पाण्यात वडाचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. हे तीर्थ अत्यंत शोभिवंत असून येथे पाण्यामध्ये पाय सोडून येथील नीरव शांततेचा अनुभव घेणं अतिशय सुखद असतं. पक्ष्यांची किलबिल मनास मोहून टाकत असते, मंद वाहणाऱा वारा वडाच्या पानांशी खेळत असतो आणि त्या मस्तीतच एखादं पान अलगद हेलकावे खात पुष्करणी तीर्थात येऊन विसावतं. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत आनंद ओतप्रोत भरलेला आहे पण तो अनुभवायला आपल्याकडे सवड मात्र हवी. संगमावरून थेट श्री व्यंकम्मामातेच्या मंदिरात गेलो. सकाळी नीरव शांतता होती. सद्गुरु श्रीमाणिक प्रभुंची व्यंकम्मा ही एक निस्सीम शिष्या. आपले संपूर्ण आयुष्य श्री माणिक प्रभुंच्या चरणी अर्पण करून ब्रह्मपदास पोहोचली. श्री प्रभुचरित्रातील श्रीव्यंकम्मा मातेचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळले. ह्या स्थानाला श्रीमाणिकनगरचे शक्तीपीठही म्हणतात. श्री दत्तात्रेयांची मधुमती शामला शक्ती म्हणजेच श्रीदेवी व्यंकम्मा…‌ लेकराने जसे आपल्या आईच्या कुशीत घुटमळत राहावे तसे मंदिरात घुटमळलो. ह्या मंदिराचे बांधकाम ही अतिशय सुबक आहे. येथेही माझे मन छान रमते. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून निघून बाजूला असलेल्या श्री मारुतीरायाला भेटलो. श्री प्रभुमंदिरात येऊन श्रीप्रभु समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागाई (श्रीजींचे निवासस्थान) येथे श्रीजींची नित्यपूजा पाहण्यासाठी आलो.

आज श्री समर्थ रामदास स्वामींचे ११वे वंशज श्री भूषणमहाराज श्रीप्रभु दर्शनार्थ श्रीमाणिकनगरी आले होते. ह्या निमित्ताने सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानाचा, श्री माणिकप्रभु संस्थानाशी अशी असलेला स्नेहसंबंध अनुभवायास मिळाला. श्रीजींच्या नित्य पूजेनंतर आज श्रीनृसिंह निलय येथे सत्संग व उद्बोधनाचा कार्यक्रम होईल असे सांगितले गेले. नित्य पूजेचा तीर्थप्रसाद घेऊन श्री नृसिंह निलयमध्ये जाऊन बसलो. परंपरेप्रमाणे भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. श्रीजींचा नातू चि. प्रज्ञानराज ह्याच्या उपनयन संस्काराच्यावेळी काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री भूषण महाराज आज खास वेळ काढून श्री माणिकनगरला आले होते. श्रीजींनी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्वागत केले. तसेच श्री भूषण महाराजांनीही आपला श्री प्रभुपरिवाराप्रती असलेला स्नेह भेटवस्तू वगैरे देऊन व्यक्त केला. त्यानंतर श्री भूषण महाराजांनी आपले मनोगत अगदी मोजक्या शब्दांत पण अत्यंत संयतपणे व्यक्त केले. श्री भूषण महाराजांना ऐकणे ही कानाला एक मेजवानीच होती. योगायोग असा की श्री भूषण महाराजांच्या मनोगताचे सार हे श्रीजींनी प्रवचन सप्ताहात केलेल्या विवेचनाचेच सार होते. दोन्ही तत्त्वांत एकवाक्यता होती. “सर्व रूपे हा श्री प्रभु जाण” ह्या उक्तीची प्रचीती वारंवार मिळत होती. श्रीजींनी सुरुवातीलाच सांगितले होते की, मी श्री भूषण महाराजांचे स्वागत करणार नाही, कारण श्री समर्थ रामदासांची पूर्वज हे बिदर येथीलच होते त्यामुळे माणिक नगर हे त्यांचेच घर आहे. ही नवीन माहिती श्रीजींकडून ऐकायला मिळाली. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांतूनही दासबोधाची शिकवण डोकावत राहते किंवा शनिवारच्या सप्ताह भजनामध्ये ही रामदास स्वामींचे पद ऐकायला मिळते. दोन संस्थानात मधील असलेले सामंजस्य आणि स्नेहभाव पाहून मन कृतार्थतेचा अनुभव करत होतं.

काल माणिक क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक म्हणून नाव दिलं होतं. महाप्रसादानंतर माणिक क्वीझमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी जमण्यास सांगण्यात आले होते. महाप्रसादानंतर सर्व स्पर्धक श्रीजींच्या घरी जमले होते. सात जोड्या मिळून एकंदरीत १४ जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे स्वरूप काय, स्पर्धेचे नियम काय? कोणकोणत्या टप्प्यात स्पर्धार्धा कशी पार पडेल? ह्याचे सर्व स्पष्टीकरण श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. साडेसहा वाजता स्पर्धा सुरु होणार होती. तोवर तीन तासांमध्ये काय वाचू आणि काय नको असे झाले होते. आज रात्री ह्या वेदांचा सप्ताहाचे आकर्षण असणारी दिंडीही होती. श्री माणिकनगरच्या सर्वच मंदिरांमध्ये, मुक्तीमंटपात, गावात व श्रीजींच्या निवासस्थानी दिंडीची जय्यत तयारी चालली होती. संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या ह्या दिंडी करता थोडा आराम करावा की स्पर्धेची तयारी करावी ह्या संभ्रमात असतानाच श्री प्रभु समर्थ म्हणून स्पर्धेच्या तयारीला लागलो.

माणिक क्विझ… आपण श्री माणिक प्रभु व त्यांच्यानंतरचे पीठाचार्य, तसेच श्री माणिकप्रभु संस्थान आणि त्यांचे उपक्रम, कार्य ह्याबाबत किती जाणतो, ह्याबद्दलची खेळाखेळातून साकारलेली प्रश्नमंजुषा. संध्याकाळी साडेसहा वाजता श्री प्रभुमंदिराच्या पटांगणात माणिक क्विझला सुरुवात झाली. समोरचे पटांगण प्रभुभक्तांनी अगदी फुलून गेले होते. रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अशा सात टीम्स यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. पहिल्या फेरीमध्ये चार भाग होते आणि त्यातून मिळालेल्या गुणांच्या आधारावर पहिल्या चार जोड्या अंतिम फेरीत प्रवेश करणार होत्या. पहिल्या फेरीत श्री प्रभुचरित्रामधील बारकाव्यांबद्दल प्रश्न होते. आपण श्रीप्रभुचरित्र केवळ वाचतो की अगदी समरसून वाचतो? त्यावर मनन चिंतन करतो का? आपण त्याचे पारायण करतो का? आणि पारायण करून श्री प्रभु आपल्याला किती समजले? ह्याचा एक सुंदर परिपाठ श्री माणिक क्विझ घालून देते. त्यानंतर श्रीप्रभुपदे, पीठाचार्यांचे दौरे, श्री प्रभुमंदिर परिसरातील वेगवेगळ्या चिन्हांचे चित्र आणि व्हिडीओ दाखवून त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. श्री प्रभु संस्थानाचे कार्य ह्याबाबतीत आपल्याला किती माहिती आहे? आपण श्री संस्थानाशी किती आत्मीयतेने जोडले गेले आहोत? याचीसुद्धा जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून आपल्याला होत असते. प्रश्नमंजुषेदरम्यान प्रेक्षकांनाही प्रश्न विचारले जायचे किंवा स्पर्धकांना न देता आलेले प्रश्न प्रेक्षकांना विचारले जायचे. बरोबर उत्तर देणार याला चॉकलेट बक्षीस मिळाले. दोन फेऱ्यांमध्ये श्री माणिकप्रभु संस्थानच्या पिठाच्यार्यांच्या लीला आणि त्यांचे सामाजिक कार्य यांचे माहितीपर लघुपट दाखवले जायचे. स्पर्धकांना प्रत्येक फेरीमध्ये उत्तरासाठी त्यांना दहा सेकंदाचा वेळ दिला जायचा. एखाद्या स्पर्धकाला जर त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या स्पर्धक आकडे अग्रेषित केला जायचा. त्याचे अधिकचे गुण त्या त्या जोडीला मिळायचे. पहिल्या फेरीअखेर आमची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीसाठी ही पहिल्या फेरी प्रमाणेच प्रश्न विचारण्यात आले.‌

अंतिम फेरीत गुणांनुसार आमच्या शुक्र जोडीला द्वितीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकातली माझ्या वाट्याची रक्कम एक रुपया प्रसादरुपी घेऊन बाकीची अन्नदानासाठी देऊनही टाकली. ज्ञान आणि खेळाचा सुंदर संगम ह्या माणिक क्विझमध्ये पाहायला मिळतो. गुरुगंगा आणि विरजेचा संगम, श्री माणिक प्रभू संस्थान म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा संगम, माणिक क्विज म्हणजे ज्ञान आणि खेळाचा संगम, श्री प्रभुचा आणि आपला संगम, मन आणि बुद्धीचा संगम, आपल्या मनातील द्वैत भावनेचा संगम होऊन, ऐक्य भावनेची नदी सकलमत संप्रदायाच्या अंगीकराने खळखळ वाहू लागते आणि सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुच दिसू लागतो. श्री माणिकप्रभु संस्थानाने खेळांना नेहमीच प्राधान्य दिलेले आहे व आजही देत आहेत. श्री माणिकप्रभु संस्थानचे पीठाचार्य वेळोवेळी आपल्याला स्वतः खेळांमध्ये रमलेले दिसतात. समाजात, मानवांत खेळभावना आणि अंगी खिलाडूवृत्ती जोपासण्याचे महत्वाचे कार्य श्री संस्थांकडून अविरतपणे जपले जाते. ह्या माणिक क्विझच्या निमित्ताने आपण श्रीप्रभुला किती जाणतो आणि आपल्याला आणखी अध्ययनाची किती आवश्यकता आहे? याची जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून झाली. सुमारे तीन सव्वातीन तास हा खेळ रंगला. त्यानंतर श्रीजी यांच्या घरी भक्त कार्य झाले. भक्तकार्यानंतर कोल खेळला गेला. श्री माणिकनगरच्या आबालवृद्धांसहित सर्वच लोक (विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीसुद्धा) आजच्या, दिंडीच्या दिवशीच्या कोलसाठी आवर्जून हजर असतात. पूर्वी हा खेळ आनंदमंटपात खेळला जायचा, पण वाढत्या संख्येमुळे श्री प्रभुमंदिर पटांगणात खेळला जाऊ लागला. कोलनंतर गोप व फुगडी इ. सुद्धा असते. श्री माणिकनगरचे अनुभवी व वृद्ध लोकसुद्धा या दिवशी कोल खेळतात. या दिवसाच्या कोलध्ये एक वेगळाच जोश अनुभवायास मिळतो. कोलनंतर ‘नम: पार्वतीपतये’ च्या जयघोषात समाप्ती झाली. मन आनंद सागराच्या लहरींवर उचंबळत होते. आणि आता प्रतीक्षा होती ती, ज्याचे वर्णन “नाही स्वर्गी वैकुंठी हे सुख” असे केले आहे ती दिंडी, सदेही अनुभवण्याची…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग आठवा

आज पहाटे साडेपाचलाच जाग आली. जेमतेम पाच तासही झोप झाली नाही, पण तरीही मन प्रसन्नतेची अनुभूती करत होतं. आज पारायणाचा शेवटचा दिवस होता, श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील प्रवचनाचाही शेवटचा दिवस होता. आज चहाच्या चर्चेदरम्यान जाणवले की, अनेक जणांना परतीचे वेध लागले होते. काहीजण आजच संध्याकाळी निघणार होते तर काहीजण उद्या सकाळी निघणार होते.‌ काही जणांचा बिदरला जायचा बेत ठरला होता. काहीजण दिंडीसाठीही थांबणार होते. गेल्या आठवड्याभरात अनेक प्रभुभक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. कोणीतरी चिवडा, चकल्या खायला बोलवत होते. काहीजण एकमेकांचे पत्ते, मोबाईल नंबर घेण्यात व्यस्त होते. पुढल्या वेळेस कुठे, कधी, कसे भेटावे? त्याचेही नियोजन चालू होते. आज मी सगळ्यांसाठी भरपूर वेळ दिला. स्नान उरकून माणिक विहारमध्ये नाश्ता उरकला आणि श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. आज रस्त्यात साथीला वानरसेना होती.  निलगिरीच्या झाडांवर वटवाघळे विराम करत होती. गुरुगंगेच्या पात्रात अनेक बदके विहरत होती. टिटव्या पात्रातल्या झुडूपांमध्ये खाद्य शोधत होत्या. दूरवर आंब्याच्या झाडावर एक मोर बसला होता. एकंदरीत सृष्टीतला प्रत्येक जीव आपापल्या कामात व्यस्त होता. कालाग्नी रुद्र हनुमानाचे दर्शन घेऊन औदुंबराखाली पारायणासाठी पोहोचलो.

आज पारायणाला बसतानाच मन भरून आले होते. श्री राघवदास रामनामे विरचित श्री माणिक चरितामृत इतके रसाळ आणि गोड आहे की, चरित्रनायक श्री माणिकप्रभु कधी आपल्या हृदयाचा ठाव घेतात, ते आपल्यालाही कळत नाही. ह्या चरित्राच्या वाचनानंतरच मी श्री माणिकप्रभुंच्या अंतर्बाह्य प्रेमात पडलो.‌ श्री माणिकप्रभुंच्या लीलांचे वर्णन करताना ग्रंथकार आपल्याला केवळ त्या चमत्कारांमध्येच गुंतवून न ठेवता योग्य तो जीवन उपदेशही देतात. ह्या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना श्री ज्ञानराज माणिकप्रभु पोथीतील आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, मनोकामना पूर्ण होणे म्हणजे काय? मनोकामना पूर्ण करून घेण्यामागे मूळ उद्देश कोणता? मनांत कामनेचा उदय झाला म्हणजे चित्तचांचल्य होऊन एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होते. मनोकामना पूर्ण झाल्यावर ती उद्विग्नता समाप्त होऊन, मन स्वस्थानी उपरम पावते. मनाचे स्वस्वरूपाशी तादात्म्य होताच, आनंदाची अनुभूती मिळते. आपल्याला असे वाटते की, इच्छित वस्तू मिळाल्यामुळे मला आनंद झाला, पण वस्तुस्थिती तशी नाही. कामनेचे शमन झाल्यामुळे आपणांस आनंद होत असतो, कामनेच्या पूर्तीमुळे नव्हे. कुठलीही कामना पूर्ण करण्यासाठी किती खटपटी लटपटी कराव्या लागतात हे सर्वांस विदित आहेच. म्हणून शहाण्यांनी कामना पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडता, आपल्या सर्व कामनांचे शमन होऊन आपण निष्काम कसे होऊ याकडे लक्ष दिले पाहिजे.

श्री माणिक चरित्रामृत म्हणजे चैतन्याचा अखंड वाहणारा झरा किंवा थुई थुई उडणारे आनंदाचे कारंजेच. शिखाचे मुडूप, काशी यात्रेच्या ब्राह्मणाची कथा, फकीराचा लोभ तेलंगणाचा अय्या, बयाम्मामातेचा पोटशूळ अशा अनेक प्रभुलीला अनुभवताना श्रीप्रभुंच्या अवतार समाप्तीचे प्रकरण सुरू होते. दादा महाराज (थोरले बंधू), तात्या महाराज (कनिष्ठ बंधू), देवी बयाम्मा माता (श्री माणिक प्रभुंची आई) आणि देवी व्यंकम्मामाता (श्रीमाणिकप्रभुंची पट्टशिष्या) ह्यांचे निर्वाण अंतःकरण हेलावून टाकते. त्यानंतर श्री माणिकप्रभूंचे धीरोदत्तपणे संजीवन समाधी घेणे हे आपल्याला अंतर्बाह्य गलबलून टाकते. नकळत डोळ्यांतून येणारे अश्रू श्री माणिक चरितामृताची पाने भिजवून जातात. केवळ पारायण करताना आपली ही अवस्था होते, तर श्री माणिकप्रभु संजीवन समाधीच्या वेळेस भक्तांची काय अवस्था झाली असेल बरे? कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. दत्तजयंती अगदी चार दिवसांवर असताना मोक्षदा एकादशीच्या दिवशीच श्रीप्रभु संजीवन समाधीत उतरले. श्रीप्रभुंचे जीवन समाधी प्रकरण ग्रंथकर्त्याने अत्यंत उत्कटतेने लिहिलेले आहे. ग्रंथ लिहिण्यापूर्वी ग्रंथकार श्री राम नामे हे श्रीप्रभु सांप्रदायिक नव्हते किंवा चरित्रलेखनापूर्वी ते कधी माणिक नगर असली आले नव्हते. सुरुवातीला श्री माणिक प्रभु कोण? कुठले? त्यांचे चरित्र काय? हे माहीत नसतानाही हा दिव्य ग्रंथ त्यांच्या लेखणीतून श्री प्रभू कृपेनेच लिहिला गेला ह्यापेक्षा आणखी मोठा चमत्कार काय असू शकतो? मला वाटते प्रत्येक दत्तभक्ताच्या संग्रही श्री माणिक चरितामृताची ही दिव्य पोथी अवश्य असावी. भावनेच्या लाटांवर स्वार होत असतानाच पारायणाची समाप्ती झाली. कोण्या एका भक्तांने अकरा रुपये आणखी एका भक्तांने एकविस रुपये दक्षिणा म्हणून पोथीवर ठेवले. आजही ते बत्तीस रुपये श्रीप्रभुचरित्रातच ठेवले आहेत. आजही चीकू, खडीसाखर आणि पेढे मिळाले. श्री प्रभुभक्त सद्भावनेने पोथीजवळ आणून ठेवतात. आजही तोच समाप्तीचा नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला अर्पण केला. आरत्या म्हटल्या आणि हे महाचरित्र निर्विघ्नपणे सफळ संपूर्ण करून घेतल्याबद्दल प्रभुदयाघनाचे मनोमन आभार मानले. पारायण ठिकाणाची आवराआवर करून श्रीप्रभु मंदिरात दर्शनाला आलो.

मोरपिसी रंगाच्या नक्षीदार महावस्त्रावर नाजूक वेलबुट्टीची भगवी शाल आज श्रीप्रभुचे रूप अत्यंत खुलवत होती. तुळशीमाळा, बोरमाळा, वैजयंतीमाळा, मोहनमाळा, मोत्यांच्या माळा, नवरत्न माळा, रुद्राक्ष माळा,  सोन्याच्या माळा श्रीप्रभु गळाभर आनंदाने मिरवत होता.‌ निशिगंध आणि गुलाबाचा भरगच्च हार जणू हाती झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. समाधीवरील जास्वंदीची फुले आणि पिवळ्या झेंडूच्या माळा आपल्या परीने त्या रंगसंगतीत अधिकच भर घालीत होत्या. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची सजावटही सुंदर…‌ ह्या नितांत सुंदर श्रीप्रभुदर्शनाने मन भरून आले आणि सहजच श्रीप्रभु चरणी लीन झालो. पुन्हा एकदा श्रीप्रभुचरणी कृतज्ञता व्यक्त करून, श्रीप्रभुसमाधीस प्रदक्षिणा घातल्या आणि यात्री निवासावर आलो. पारायणाचे व्यासपीठ, पोथी वगैरेची आवराआवर करून श्रीजींच्या घरी पूजेस आलो. श्रीजींच्या घरी नित्य पूजेचे तीर्थ घेऊन परत श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनासाठी येऊन बसलो.

आज श्री मद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या समाप्तीचे प्रवचन होते. श्रीजींनी काल ॐ तत् सत् ची जुजबी ओळख करून दिल्यावर आज त्याच ॐ तत् सत् च्या व्यापक स्वरूपाला जाणण्यासाठी मन आतुर झाले होते. प्रथेप्रमाणे माध्यान्ह काळी भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरामध्ये श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीजींनी २४ ते २८ ह्या पाच श्लोकांचा गूढार्थ समजावून दिला.

सुरुवातीलाच गीता म्हणजे गीत, गीता म्हणजे परमेश्वराने गायलेले गीत. गाण्यामध्ये मोठ्यात मोठ्या गोष्टीला कमीत कमी शब्दात बांधण्याची आणि ते हृदयात ठासवण्याची क्षमता आहे. श्रीमद्भगवत गीतेमध्ये माधुर्य आहे म्हणूनच ती हृदयात उतरते. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कर्मयोग आणि भक्तियोग समांतर आहे, असे समजतात. कर्मयोगाशिवाय भक्तीयोगाची पात्रता नाही आणि भक्तीयोगाच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानयोगाची प्राप्ती नाही. भक्तियोग साधकांस बांधून ठेवतो, प्रत्येकाने गीतेतून ज्ञानयोग  शिकायला हवा, ह्या ज्ञानयोगानेच मुक्ती प्राप्त होते.

श्रीजींनी पुढे ॐ चे व्यापक स्वरूप समजावताना ॐ म्हणजेच प्रणव, ॐ हेच सर्व मंत्रांचं आदिबीज आहे, चारही वेद हे ॐचेच अख्यान आहे. ॐ कालातीत आहे आणि परमात्माही ॐकारचआहे. जगत् म्हणजे ॐकार, परमात्मा म्हणजे ॐकार आणि म्हणूनच जगत् म्हणजेच परमात्मा. वेदांतातील ह्या संकल्पना जनसामान्यांना अधिकाधिक स्पष्ट व्हाव्यात म्हणून आई जशी आपल्या बाळाला हात धरून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे श्रीजी सर्वांना आपल्या मधुर वाणीने, पुराण कथांमधील, व्यवहारातील अनेक गोष्टींचे दाखले देत, वेदांताच्या मार्गावर आपला हात धरून, आपल्या संकल्पना स्पष्ट करून, आपल्याला त्या मार्गावर प्रशस्त करतात. ॐला असलेल्या चार मात्रा, अ + उ ह्या गुणसंधीने झालेला ओ, अशी व्याकरणदृष्ट्या फोडही श्रीजी करून सांगतात. एका मुरलेल्या शिक्षकाचचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जगताचा अनुभव जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थेतून जातो. तसेच अ हा नाभीतूध निघतो, ऊ हृदयातून निघतो आणि म हा जेव्हा दोन्ही ओठ बंद होतात तेव्हा उत्पन्न होतो.‌ ॐ उच्चारण्यावेळी आपल्याला जागृती (अ), स्वप्न (ऊ) आणि सुषुप्तीचा (मी) अनुभव येतो. ॐकार जपते वेळी दोन ॐकारा मधील जागेला (विरामाला) शांती म्हणतात आणि तीच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्यात परमात्मा प्रकट होतो. तीच तुर्या अवस्था… श्रीजींच्या ज्ञानपूर्ण बाणांनी मनातील अज्ञान तीरोहित होत होते. हाच धागा पकडून श्रीजींनी कोल खेळाचे वर्णन केले. संध्याकाळच्या बालगोपाल क्रीडेमध्ये दोन गोपींबरोबर एक कृष्ण असतो. आणि हा कृष्ण म्हणजेच दोन ॐकारामधली असलेली शांती, ते मौन, तो परमात्मा, ती तुर्या अवस्था… तसेच ॐ हे त्रिमूर्तीचं प्रकटीकरण आहे. विष्णूचं प्रकटीकरण म्हणजे अ,  शिवाचं प्रकटीकरण म्हणजे उ आणि ब्रह्माचं प्रकटीकरण म्हणजे म. अर्थात् ॐ म्हणजेच श्री प्रभु दत्तात्रेय.

विषयाचे स्पष्टीकरण जनसामान्यात व्हावे आणि ते संपूर्णपणे व्हावे ह्याकडे श्रीजींचा पूर्ण कटाक्ष असतो. सर्वांना एका कागदावर वर्तुळ काढायला लावून त्यात आणखीन एक छोटे वर्तुळ काढायला सांगितले. छोटे वर्तुळ हे जगत आणि बाहेरच मोठं वर्तुळ हे परमात्मा. जग हे परमात्म्याचाच एक अंश आहे. परमात्मा अगदी व्यापक, विशाल, अनादी, अनंत आहे ही संकल्पना त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनावर कायमची बिंबवली. प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर गीतेचा प्रत्येक अध्याय हे कृष्णाचे उत्तम भाष्य कसे आहे हे समजावून सांगितले. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला उपक्रम (start), नंतर सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) कसा आहे आणि श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हणतात हेही छानपणे समजावले. मोक्षाच्या प्राप्तीसाठी देहत्याग ही द्वैती लोकांची धारणा आहे, पण जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव ज्याला “जीवनमुक्ती” म्हणतात ही सकलमत संप्रदायाची धारणा आहे, अद्वैती जनांचा सिद्धांत आहे. श्री माणिकप्रभुंनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून आपण जीवन जगत असताना मोक्षाचा अनुभव प्राप्त करून देण्याची जडीबुटीच समस्त जगताला दिलेली आहे. जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव हे सकलमत संप्रदायाचे हे परमविशेष आहे. श्रीजींचे आजचे प्रवचन संपूच नये असे प्रत्येकास वाटत होते. महाप्रसादाची वेळ झाली होती तरी उपस्थितांमध्ये थोडीही चुळबुळ जाणवली नाही. श्रीजींच्या प्रवचनानंतर उपस्थित जनसमुदायापैकी काहीजणांनी आपले मनोगत व्यक्त केले. मलाही संधी मिळाली, पण ते कधीतरी विस्ताराने लिहेन. पारायणासाठी जमलेल्या सर्व आस्तिक महाजनांना श्रीजींनी शाल आणि खारकांचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.‌ श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील सतराव्या अध्यायाच्या प्रवचनांचे व्हिडिओ आपल्याला Manik Prabhu ह्या YouTube चॅनेल वर पाहता येतील.

महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. निघणाऱ्या सर्व भक्तांच्या गळाभेटी घेतल्या. गुरूमार्गावर जोडलेली नाती निखळ आनंद देऊन जातात. आज संध्याकाळी मुक्तीमंटपाच्या औदुंबराखाली लवकरच येऊन बसलो. श्रीजींचे प्रवचन आठवून ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे आकाश ढगाळ होते. पण आज आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र होते. श्रीजींच्या प्रवचनामुळे जणूकाही आकाशातील अज्ञानरुपी मळभही दूर झाले होते. आज संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर विविध रंगांची उधळण पाहायला मिळत होती. श्रीप्रभु चैतन्याचा हा अविष्कर पाहणे ही एक नितांत सुंदर अनुभूती आहे. क्षितिजावरील रंगांच्या ह्या खेळाचा भरभरून आनंद औदुंबराखाली बसून लुटला. भक्तकार्यासाठी श्रीजी आज अतीव प्रसन्नतेने उपस्थित होते. बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांसाठी खारकांचा प्रसाद दिला गेला.

भक्तकार्यानंतर श्रीप्रभुमंदिर पटांगणात बालगोपाल क्रीडेचा आनंद लुटण्यासाठी आलो. श्रीप्रभुमंदिर पटांगण भक्तजनांनी खचाखच भरले होते.‌ श्रीप्रभुपदांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रत्येकजण थिरकत होता. श्रीजींनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे दोन गोपींमधला कृष्ण आज प्रथमच कोलदरम्यान अनुभवला. बसल्याजागी  दोन ॐकारामधल्या शांतीतही तो अनुभवला. माझ्या ध्यानातला परमात्मा आणि माझ्यासमोर कोल खेळणारा दोन गोपींमधला परमात्मा एकच निखळ आनंद देत होता. सर्व रूपे श्रीप्रभु जाण… ही अद्वैताची अनुभूतीसुद्धा आज खेळादरम्यान अनुभवता आली आणि या दिव्य अनुभूतीमुळेच कोल खेळाचा आनंद आज अधिकच द्विगुणीत झाला.

संध्याकाळच्या महाप्रसादानंतर भजनासाठी श्रीप्रभु मंदिरात येऊन बसलो. आज शनिवार होता. आज जांभळ्या रंगाची गादी श्रीजींसाठी सजवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे आगमन झाले. आज शनिवार असल्यामुळे भजनाआधी प्रथम आरती झाली. आरतीच्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ रोम रोम पुलकित करत होता.‌ अवघा जनसमुदाय श्रीप्रभु रंगात रंगला होता. आरतीनंतर श्रीजी प्रवचनासाठी गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी “देई मला इतुके रघुराया, मती उपजो तुझिया गुण गाया…” हे माझे अत्यंत आवडीचे पद होते. श्री आनंदराज प्रभुंनी आपल्या दैवी स्वराने ह्या पदाची गोडी अजूनच द्विगुणित केली आहे. अत्यंत सरळ अर्थ असलेल्या पदाचा वेदांतातील गूढार्थ श्रीजींनी रामायणातील अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितला. तासाभराच्या प्रवचनानंतर नेहमीप्रमाणे तबला, पेटी, तंबोरा, सनई, यांच्याबरोबरच सुरांची देहभान हरपून टाकायला लावणारी जुगलबंदी अनुभवली. शनिवारच्या भजनामध्ये खूप पदे आहेत. दास्यभक्तीने ओतप्रोत भरलेली ही पदे मनाचा ठाव घेतात. भजनाच्या शेवटच्या टप्प्यावर “भज मना तू भज भज मना, वायुनंदना तू वानर रूपा…” हे पद जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा श्रीजींच्या हातातही झांज आले होते. ह्या भजनसंध्येची नशा काही वेगळीच असते, कदाचीत ती शब्दांत समर्पकपणे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे, पण ज्यांनी ती नशा अनुभवलीय, तेच ह्याची गोडी जाणू शकतात. आजही भजनानंतर कुरमुरे खोबर्‍याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजन वाल्यांना श्रीजींनी शाल देऊन आशीर्वाद दिला. आज भजनाच्या वेळी गळ्यात वीणा अडकवलेला एक वारकरी अवचितपणे प्रकट होऊन एका हाती झेंडा व दुसर्‍या हाती चिपळ्या घेऊन श्रीप्रभु समाधीभोवती प्रदक्षिणा घालत होता. आणि शेवटच्या गजराच्या वेळी खूप वेळ घुमत होता. त्या नादब्रम्हामध्ये तो अगदी हरवून गेला होता. भजन रसाने त्या आत्म्याची पूर्ण तृप्ती होत होती. असो, श्रीजींच्या प्रस्थानाच्या वेळी “कमल वदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा…” पदाच्या दिव्य लहरी एकापाठोपाठ एक आदळत होत्या‌, आणि साऱ्यांच्या नजरा कृतज्ञतेने घराकडे परतणार्‍या श्रीजीरुपी ज्ञानमार्तंडाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खिळल्या होत्या.

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग सातवा

परवा मोरपिसे गोळा करायला गेलो असताना, येताना मला श्रीबयाम्मामातेची समाधी दिसली होती. एक दिवस निवांत येऊन या माऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, असे मनोमन ठरवले होते. आज सकाळी सहाच्या चहानंतर संगमाच्या दिशेने, सागाच्या बागेतून निघालो. विरजा नदीच्या काठी एक छोटीसी समाधी बय्यामा माऊलीची आहे. तेथील पक्ष्यांची मंजुळ किलबिल मला सुखावत होती. ओढ्यावजा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते. बगळे काही खाद्य मिळेल का ह्या आशेपोटी विरजेच्या पात्रात उगाचच ध्यानाचा आव आणून उभे होते. जवळच उगवलेली रानफुले घेऊन त्या माऊलीच्या समाधीवर मनोभावे अर्पण केली. जिने आपल्या उदरी नऊ मास प्रत्यक्ष दत्तावतारी श्री माणिक प्रभुंना धारण केले, त्या जगन्माता बयाम्माप्रती अष्टभाव दाटून आले. एकट्यानेच तिच्याशी गप्पा मारल्या. श्री माणिकप्रभुंसारखे नररत्न ह्या जगाला अर्पण केले, म्हणून तिच्या समाधीवर नम्रपणे मस्तक झुकविले. पुन्हा यात्री निवासवर येऊन आदल्या दिवसाच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून काढल्या.

नाश्ता उरकून झटपट पारायणासाठी औदुंबराखाली दाखल झालो. एव्हाना जो तो आपापल्या जागी स्थानापन्न होऊन पारायण करण्यात दंग झालेला होता. आज सहाव्या दिवसाचे श्री माणिक चरितामृताचे वाचनही मनाच्या अगदी प्रफुल्लित अवस्थेत पार पडले. विठ्ठलराव तालुकदाराची कथा, माणक्या पाटलाची कथा, यज्ञ समारंभ व त्यातील विघ्न, तात्यासाहेबांस आलेले वैराग्य, श्री माणिकप्रभुंची जगद्गुरु शंकराचार्यांची भेट, दमडीची साखर, ऐनुद्दीन उस्तादाचे गर्वहरण अशा अनेक कथांमध्ये रमताना आपला श्री माणिकप्रभुंप्रती असलेला स्नेह अधिकच दुणावतो. आपले मन अगदी माणिकमय होऊन जाते. आज पारायण यादरम्यान प्रसाद म्हणून काही भक्तांनी चिकू आणि पेढे वाटले. आजच्या दिवसाच्या पारायणानंतर तोच नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला दाखवला.

पारायणानंतर औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या, समोरील मनोहर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि श्रीप्रभु समाधीसमोर उभा राहिलो. आज श्रीप्रभु समाधीवरील गुलाबी रंगाच्या वस्त्रात अत्यंत विलोभनीय दिसत होता. आणि त्यावरील हिरव्या रंगाची नक्षीदार शाल लक्ष वेधून घेत होती. अबोली आणि कागड्यांच्या फुलांचा एकमेकांत बेमालूमपणे गुंफलेला हार ऐक्यत्वाची साक्ष देत होता. अंगावरील विविध माळा खुलून दिसत होत्या. समाधीवर गुलाबाची लाल फुले आपली सुगंध सेवा श्रीप्रभु चरणी अर्पण करत होती. आणि भोवतालचे अबोलीचे भरगच्च गजरे त्या साजाला भारदस्तपणा प्रदान करीत होते. संजीवन समाधी समोरील पादुकांना चंदनाचा लेप लावण्यात आला होता. श्रीप्रभुचं हे असं सजलेले रूप कितीही पाहिलं तरी मनाचे समाधान होत नाही. त्याच्या ह्या ऐश्वर्यसंपन्न रूपाला अनिमिष डोळ्यांनी पाहत, हृदयात साठवून ठेवणे, एवढेच आपल्या हाती असते. श्रीप्रभुसमाधीचे तीर्थ घेऊन कृतकृत्य झालो आणि नेहमीप्रमाणे श्रीप्रभु समाधीला प्रदक्षिणा घातल्या.

आज सकाळी, यज्ञशाळेमध्ये श्री गणेश यागाचे आयोजन केले होते. श्रीजी आपल्या घरची नित्य पूजा आटोपून यज्ञशाळेत हजर होते. उसाचे कांडे, मोदक, खोबरे पोहे, तीळ इत्यादी सामग्रीचे हवन होमकुंडात केले जात होते. सुमारे तासाभरानंतर पूर्णाहुती होऊन श्री गणेश याग संपन्न झाला. ताक पिऊन पुन्हा श्री नृसिंह निलयमध्ये श्रींच्या प्रवचनासाठी येऊन बसलो. परंपरेनुसार वाद्यांच्या आणि भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीमद्भगवद्गीतेच्या वीस ते तेवीस ह्या चार श्लोकांचे अत्यंत विस्तृत विवेचन श्रीजींनी केले. आज मुख्यत्वेकरून दानावर उद्बोधन होते. यज्ञ, दान, तप हे माणसाचे कर्तव्य आहे. आणि ते सोडता येत नाही तसेच ते साधकांना, मनुष्यांना पवित्र करतात. दानाचे फायदे समजावताना दानामुळे अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणा याचे क्षालन होते, तसेच दान केल्यामुळे,‌‌ आपली प्रकृती बरोबर समरसता होते. दानामुळे सामाजिक न्याय होतो‌, असे श्रीजींनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावले. तसेच सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे, असे श्रीजी म्हणाले. पुढे जाऊन श्रीजींनी सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणते हे अनेक कथांचा दाखला देऊन समजावले. पुढे जाऊन यज्ञ, दान, तप करताना त्यात काही न्यून राहिले, त्यात काही कमी झाले तर ते, परमात्म्याच्या नामस्मरणाने सुधारता येते हा मौलिक उपदेशही श्रीजींनी सर्वांना समजावून सांगितला. तसेच तेविसाव्या श्लोकातील ॐ तत् सत् च्या स्वरूपाचं विहंगावलोकन श्रीजींनी सर्वांना करून दिले. ॐ हे अक्षर आहे, तो स्वर आहे, तो ध्वनी आहे आणि ती निशाणीपण आहे. अव धातूपासून ॐची उत्पत्ती आणि ॐ म्हणजेच परमात्मा. तत् हे सर्वनाम, परमात्मा हा नेहमी डोळ्यांपाठी असतो, म्हणून तो डोळ्यांपुढे येत नाही जसे कॅमेरामन फोटो काढतो पण फोटोत तो कधीच दिसत नाही. परमात्मा हा कॅमेरामन सारखाच आहे. तसेच सत् म्हणजे सत्ता, एखाद्या वस्तूचे असणे. जसे चष्मा आहे, अंगठी आहे, पेला आहे. ह्यातील “आहे”पणा, म्हणजेच अस्तित्व म्हणजेच सत्.महावाक्याची इतकी सुरेख फोड क्वचितच कोणीतरी करून आपल्याला प्रेमाने भरवत असावं. परमात्मा अनादि-अनंत आहे अस्तित्व अनादि-अनंत आहे म्हणजेच अस्तित्व हाच परमात्मा आहे‌ आणि ॐ तत् सत् हे परमात्म्याचेच नाव आहे. तसेच ब्राह्मण म्हणजे कोण? तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणारा. मुंजीनंतर द्विज होतो, द्विज वेदाभ्यासने विप्र होतो आणि जो विप्र ब्रह्मास जाणतो तोच खरा ब्राम्हण. श्रीजींच्या ज्ञानपूर्ण आहुतींनी गीता यज्ञ धडाडत होता आणि उपस्थितांच्या अज्ञानाचा समूळ नाश होत होता. कलिंगड कधी अख्खे खाता येईल का? नाही ना.पण त्याला छान फोडी करून, मीठ मसाला लावून आपल्यासमोर ठेवले, तर ते आपण आवडीने खातो. श्रीजींच्या प्रवचनाची खासियत ही अशीच आहे. वेदांतासारखा कठीण विषय तो आपल्यासमोर फोड करून, त्यास पुराणांतील व्यवहारातील अनेक गोष्टींचा मसाला लावून आपल्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा स्वरूपात सादर करतात. आणि असा अनुभवसंपन्न ज्ञानी सद्गुरू वेदांताचे निरुपण करण्यासाठी भेटला, म्हणून आपल्याला आपल्याच नशिबाचा नकळत हेवा वाटू लागतो.

महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासावर आलो. दोन-तीन दिवसांचे कपडे धुऊन टाकले. आजच्या प्रवचनाला ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संध्याकाळी श्रीप्रभुमंदिर प्रांगणात आलो. एव्हाना बऱ्याच प्रभुभक्तांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकाची श्री माणिकनगरला जोडले जाण्याची एक वेगळी कथा होती. आणि त्या प्रत्येकाच्या कथा ऐकणे हीसुद्धा कानांना एक पर्वणीच होती. आज श्रीजी बाहेर गेल्यामुळे संध्याकाळचे भक्तकार्य थोडेसे उशिरा झाले. आज कोल खेळ खूपच रंगला होता. अवघे माणिकनगर कोल खेळण्यासाठी जमले होते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून श्रीजी ही बालगोपाल क्रीडा पाहायला सहजतेने उपस्थित होते. हा खेळ पाहतानाही आपल्याला एका विशिष्ट चैतन्याची अनुभूती जाणवते.‌ भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीप्रभु कदाचित एखाद्या बालगोपाळाचं रूप घेऊन कदाचित ह्यात क्रीडा करत असावा. सूर आणि वाद्यांच्या तालावर आपले पाय आपोआपच थिरकायला लागतात. ह्या कोल खेळाचा मनसोक्त आनंद लुटून श्रीप्रभुचा महाप्रसाद घेतला आणि नेहमीप्रमाणे भजनासाठी आनंद मंडपात येऊन बसलो.

आज शुक्रवारी बालाजीचे भजन होते. आजचा रंग गुलाबी होता. श्रीजींच्या मार्गातील लाल पायघड्यांसमोर ही गुलाबी गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. समोर जगत्प्रसुत्या श्रीप्रभु सुखानैव पहुडला होता. भजन ऐकण्यासाठी जणू तोही आज आतुरला होता. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेऊन श्रीजी गादीवर विराजमान झाले आणि रात्रीच्या प्रवचनास सुरुवात झाली. आज शुक्रवारचे श्रीगुरु स्तुतीपर “अरे गुरु राया माझी निरसली माया” हे अगदी तीन कडव्यांचे पद होते. ह्यालाही श्रीजींनी आपल्या वाक्चातुर्याने तासभर रंगविले. श्री माणिकप्रभुंची पदे अत्यंत श्रवणीय तर आहेतच पण त्यातला लपलेला गूढ अर्थ जेव्हा आपल्याला संपूर्णपणे कळतो तेव्हा, भजनाच्या त्या तल्लीनतेत आपल्या डोळ्यांच्या कडा सहज ओलावतात. आजही श्री. आनंदराज प्रभुमहाराज, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री अजय सुगावकरजी ह्यांच्या सूरतालांची जुगलबंदी ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवली. आपल्या अंतर्मनाला एक वेगळेच चैतन्य प्राप्त करून देण्याची क्षमता ह्या भजनांत आहे. चैतन्याची ही अत्यंत सुखद अनुभूती वारंवार घेणे हा श्रीमाणिक नगरातीच्या वास्तव्यातील परमोच्च सुखाचा क्षण आहे. शेजेच्या पदांआधी आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटला गेला. रात्री भजनासाठी उपस्थित भजन मंडळींना श्रीजींचा आशीर्वाद मिळाला. नेहमीप्रमाणे “कमलवदनी हे अमृत भरा माणिक माणिक मंत्र स्मरा. ” या पदाचे दैवी स्वर आसमंतात भरून राहिले. आज भजनानंतर सर्वांना अल्पोपहार मिळाला. सर्वजण आपापल्या निवास्थानी परतू लागले. आज पुन्हा श्रीप्रभुमंदिरात येऊन त्याच्यासमोर हा सगळा आनंदसोहळा अनुभवायला दिल्याबद्दल श्रीप्रभु चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अखंड वीणा आपल्या तारांवर माणिक माणिक नामाने श्रीप्रभुला रिझवत होती.

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग सहावा

काल रात्री उशीरापर्यंत जागून श्रीजींचे प्रवचन ओवीबद्ध केले. डोळा लागला तेव्हा घड्याळाचा काटा दीडकडे झुकला होता. प्रसादस्वरूप मिळालेला निशिगंधाचा हार उशाशी ठेवून, गोड आणि मंद सुगंधी लहरींसंगे निद्रादेवीच्या अधीन झालो. सकाळी चहाच्या गलक्याने जाग आली. हवेत सुखद गारवा होता आणि त्या गारव्यात गरम चहाचे घुटके हवेहवेसे वाटत होते. आज दोन कप चहा घेतला. एव्हाना इतर भक्तांचा पारायण झाल्यावर, बिदरच्या झरणी नरसिंहला जाण्याचा बेत चालला होता. आपल्या अवतार काळात श्रीमाणिक प्रभुंनी येथे आपले विश्वरूप प्रकट केले होते. श्रीगुरुचरित्रातील पापविनाशी तीर्थही येथेच आहे. दहाएक वर्षांपूर्वी मीही या स्थानी जाऊन आलो आहे. आठवणीच्या पुस्तकातील पाने चाळवली गेली. चहा घेऊन छानपैकी नामस्मरणाला बसलो. यथावकाश स्नान करून, नाश्ता आटपून रोजच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीप्रभु मंदिरात पारायणासाठी येऊन बसलो. पावणे नऊच्या सुमारास वाचनाला सुरुवात केली. आज पारायण यादरम्यान भरपूर माकडे औदुंबरवर उड्या मारत होती. औदुंबराखाली आमचे पारायण चालू आहे, ह्याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. अगदी मुक्तपणे ती माकडे मंडपावर, मंडपावरून औदुंबरावर औदुंबरावरून भिंतीवर उड्या मारत आपल्याच मस्तीत दंग होती. पण त्या मुक्या जीवांनी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. अर्ध्या तासाच्या मुक्त क्रीडेनंतर ते आल्या वाटेने निघून गेले. आजच्या पाचव्या दिवसाच्या पारायणाचे अध्याय मोठे रसाळ होते. माणिक नगरची स्थापना, चोर खड्ड्यात पडल्याची कथा, माझ्या अत्यंत जवळची तुकाराम धनगराची कथा, टर्रा हुसैन खानाचे गर्वहरण, नाना नाच्याची कथा, श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा श्री माणिकप्रभुंशी असलेला हृदयसंबंध पारायणादरम्यान अनुभवताना, अंतरात एकापाठोपाठ आनंदलहरी उचंबळून येत होत्या. त्या त्या दिवसाचे पारायण झाल्यावर मन अगदी कृतार्थतेचा अनुभव करत असतं आणि ती अनुभूती अनुभवणे अत्यंत सुखावह असते.

पारायणानंतर श्रीप्रभुचे मन भरुन दर्शन आणि नंतर प्रदक्षिणा हा आता रोजचाच शिरस्ता झाला होता. आज गुरुवार होता. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीगुरू आज अत्यंत  लोभस दिसत होता. श्रीप्रभुची नित्य सजावट करणाऱ्या समस्त ब्रह्मवृंदाचे खरोखर कौतुक करावयास हवे. श्रीप्रभुसमाधीवरील महावस्त्र आणि रेशमी शाल ह्याचा सुंदर मिलाफ आणि त्यावर विविधरंगी फुलांची सजावट आपणांस नित्य अनुभवायला मिळते. आज हिरव्या रंगाच्या वस्त्रसाजावर, अबोलीचा शेंदरी आणि कागड्याचा शुभ्र साज अत्यंत चित्ताकर्षक होता. दोन्ही बाजूंनी निशिगंध झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. तुळशी माळ, बोरमाळ, रुद्राक्ष माळ अशा अनेक माळा गळाभर रुळत होत्या. मोत्यांची सहा पदरी माळ श्रीप्रभुच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती. माणिकरत्नाने मढवलेली सुवर्णपुष्प आणि वर लावलेला रत्नजडित नक्षीदार शिरपेच श्रीप्रभुच्या वैभवाची साक्ष देत होते. श्रीप्रभु समाधीवरील चांदीच्या छत्रावरुन सोडलेल्या झेंडूच्या माळा वातावरणातील मंगलतेत अधिकच भर घालत होत्या. असा हा लडिवाळ श्रीप्रभु गाभाऱ्यात सुखासनी विराजमान होता. श्रीप्रभु दर्शनात व्यत्यय नको म्हणून डोळ्यांच्या पापण्यांनाही मिटू नका असे बजावले. खरेच, अवतार काळी श्रीप्रभु किती लाघवी दिसत असेल? कुणाची नजर लागू नये म्हणून माझीच बोटे कानाजवळ नेऊन मोडली.

आज पुन्हा श्रीजींच्या घरी नित्यपूजेचा आनंद घेतला.‌ माध्यान्हपूजेचे तीर्थ मिळणे हा ही आपल्या भाग्याचा क्षण. श्रीप्रभु कृपेने हे क्षण माणिकनगरातील वास्तव्यात अनेकदा येतात. कधीकधी आपल्यालाच आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. पूजेनंतर श्रीजींनी दहा मिनीटांत प्रवचनाला येतो म्हणून सांगितले.

ताक पिऊन श्रीनृसिंह निलयमध्ये स्थानापन्न झालो. पुढील पाचच मिनिटांत श्रीभक्तकार्याचा गजर झाला आणि श्रीजींची स्वारी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. गुरुपरंपरेस वंदून, श्री भगवद्गीतेस नमून आतापर्यंतच्या सर्व दिवसांचा झटपट आढावा श्रीजींनी घेतला. एक उत्तम वक्ता म्हणून श्रीजींची ही गोष्ट मला अत्यंत भावते. समस्त उपस्थितांना मागील दिवसांत ग्रहण केलेल्या ज्ञानाची उजळणी करून, आजच्या दिवसाच्या विवेचनासाठी ते आपणांस सर्वार्थाने तयार करतात. श्रीजींनी आज १५ ते १९ असे पाच श्लोकांवर भाष्य केले. गीतेतील प्रत्येक अध्यायास योग म्हटले गेलाय आणि जी क्रिया परमात्म्याशी संबंधित असते त्यास योग म्हणतात. परमात्म्याने मानवास दिलेली सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे वाणी… स्नान, अलंकार, साजशृंगारापेक्षा केवळ वाणी हाच मानवाचा श्रेष्ठ अलंकार होय. एखाद्याबद्दलची धारणाही वाणीनेच होते. वाणीनेच रामायण, महाभारत घडले. आपल्या वाणीने कोणालाही दुखवू नये. वाणीत आणि बुद्धीत सामंजस्य का आणि कसे असावे, वाणी तपासायच्या चार चाचण्या अशा समुपदेशनपर त्या त्या श्लोकाच्या शाखा श्रीजींच्या रसाळ वाणीतून विस्तारत होत्या. पुढे मानसिक तप, कायिक तप आणि मानसिक तप म्हणजे काय, हे समजावताना मनास माकडाची उपमा देली. त्यातून मनाची चंचलता कशी माकडासारखी असते, मौन म्हणजे काय आणि ते का गरजेचे आहे? तप म्हणजे काय? तप हे साध्य आहे, साधन नव्हे… गीता यज्ञ धडधडत होता. पुढे अध्यायाच्या अनुषंगाने सात्विक, राजसिक आणि तामसिक तपाचे स्पष्टीकरण देताना महाभारतातील धृष्टद्युम्नामाची कथा सांगितली.गीतेचा भावार्थ उपस्थितांना समजवून देताना श्रीजी शर्थीचे प्रयत्न करतात. विषय सुलभ करताना अनेकविध उदाहरणे देतात.‌ पुराणातील, व्यवहारातील अनेक दाखले देताना, तो तो विषय प्रत्येकाला आकलनीय कसा होईल, हेही श्रीजी अत्यंत आत्मियतेने पाहतात. अलीकडच्या काळात असे उत्तम शिक्षक आणि शिकवण्याची कला हळूहळू कमी होत चालली आहे. एखाद्या विषयाचा उहापोह करताना श्रीजी अनेक उदाहरणे देतात पण विषयाचा मूळ गाभा कधी सुटत नाही. वृक्ष जरी बहरला, त्याच्या अनेक शाखांचा विस्तार जरी झाला तरी मूळ मात्र जमीनीला घट्ट पकडून असते, श्रीजींच्या प्रवचनाची पद्धत अशीच काहीशी आहे.‌ श्रीजींच्या विवेचनातून होणाऱ्या एखाद्या विषयाच्या आकलनाबरोबरच त्यांच्या प्रवचन पद्धतीतून, त्यांच्या देहबोलीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येकाने आपल्या आवडी, निवडी आणि सवडीनुसार घ्यावे. भक्तकार्य ब्रीदावलीचा जयजयकार होऊन आजच्या गीतायज्ञातील आहुत्या पूर्ण झाल्या.

श्रीप्रभुचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. आजच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून‌ काढल्या. श्रीमाणिकनगरात आपण सतत श्रीप्रभुच्या अनुसंधानात राहतो, हे ही ह्या स्थानाचे एक वैशिष्ट्य आहे. आज पुन्हा सायंकाळी श्रीप्रभुमंदिरात आलो.  श्रीप्रभुमंदिराच्या कळसाच्या पाठी पश्चिमेला रंगाची मुक्त उधळण होत होती. चैतन्याची अनुभूती श्रीप्रभु वेगवेगळ्या प्रकारे आपणांस नित्य देत राहतो. आपण केवळ साक्षीभावाने अनुभवत राहावं. औदुंबराखाली बसून‌ सायंकाळी पश्चिमेला होत असलेला चैतन्याचा हा अद्भुत खेळ हृदय पटलावर कायमचा कोरला गेलाय. भक्तकार्य झाल्यावर आज कोल पाहायला आलो. आज बाळगोपाळ क्रीडा विशेष रंगली. सुर, ताल आणि पदलालित्याचा हा खेळ आपणांस एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. हा खेळ पाहताना मनास होणाऱ्या आनंदाच्या भरात मन हळूच, हा खेळ सुरू करणाऱ्या श्रीमार्तंड माणिकप्रभुंच्या चरणी कृतार्थतेने लीन होत होते. कोलनंतर महाप्रसाद घेवून श्री प्रभु मंदिरात भजन आणि प्रवचनासाठी लवकर येऊन बसलो. आज गुरुवारचा हिरवा रंग होता. श्रीप्रभुसमाधीसमोर आनंदमंटपात श्रीजींची हिरव्या रंगाची गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. श्रीजींनीही आज हिरव्या रंगाचा पोषाख धारण केला होता. आज प्रवचन-भजनाआधी आरती झाली, गुरुवारचे अष्टक झाले. गुरूवार आणि शनीवारी  गुरुवारी भजनाच्या आधी आरती असते. सर्व आरत्या व गुरुवार-शनिवार चे अष्टक झाल्यावर मग प्रवचन-भजन इ. ला सुरुवात होते. वर्षभरात गुरुवारची व शनिवारची आरती दुपारी ४ ला होते. मात्र वेदांत सप्ताहात रात्री भजनाला लागून, भजनाच्या आधी होते. आजच्या प्रवचनासाठी गुरुवारचे धरीयेले गे माय श्रीगुरुचे पाय… हे श्रीमाणिक प्रभुंचे गुरूभक्तिपर पद होते. गुरूवारच्या दिवशी, श्रीगुरूच्या संजीवन समाधीसमोर, गुरूच्या तोंडून, गुरुभक्तीचे पद ऐकणे हा विशेष योग होता. संपूर्णपणे शरणागत झाल्यावर, श्रीगुरु आपल्यावर नित्य बरसत राहतो आणि त्यात असे नखशिखांत भिजणे अत्यंत सुखावह असते. आजही सुर-तालांची मैफिल भजनादरम्यान सुरेख रंगली. आधीच श्रीप्रभु पदे इतकी गोड आणि रसाळ आहेत आणि त्यात मिसळलेला हा शास्त्रीय सुरतालांचा गोडवा चित्तवृत्तीला समाधानाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवत होता. शेजेची पदे म्हटली गेली त्यावेळेस कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला. भजनाची सांगता होताना कमलवदनी हे अमृता भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा… ह्या पदाच्या लाटा श्रीप्रभुमंदिर परिसरात एकावर एक आदळत होत्या. आजही भजनानंतर चिवडा, मैसूर पाक, आईस्क्रीम असा महाप्रसाद वाटला गेला. यात्री निवासाकडे पावले वळताना मध्यरात्री बाराच्या सुमारास वातावरणातील गारवा आईस्क्रीमची लज्जत अधिकच वाढवित होता…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग पाचवा

आज श्रीजींची पाद्यपूजा करावयास मिळणार होती त्यामुळे, अगदी पहाटेच जाग आली. स्नानादी कर्मे उरकून छतावर गेलो. आजचीही पहाट प्रसन्न होती. निलगिरीच्या झाडांवर बसलेले दोन मोर मन वेधून घेत होते. मधूनच त्यांचा केकारव पहाटेच्या नीरव शांततेचा भंग करत होता. पूर्वेला क्षितिजावर सूर्यनारायणाची शेंदरी छटा आकर्षक वाटत होती. चहा घेऊन रूम मध्ये आलो. पाद्यपूजेसाठी मला हार हवे होते म्हणून सकाळी साडेसातच्या सुमारास मी एसटी स्टॅंडवर गेलो. हुमणाबादेत व्यवहार थोडेसे उशिराच चालू होतात.  काल संध्याकाळीच एका फुलवाल्याला हारासंबंधी सांगून ठेवले होते. त्यानेही निशिगंधाचे ताजे हार बनवून ठेवले होते. संपूर्ण हारांवर मधमाशांचा घोळका होता. ज्या शिताफीने त्या फुलवाल्याने मधमाशांना हटवले, ते पाहून मला गंमत वाटली. प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञानच कामी येते असे काही नाही. अनुभवांतून खूप काही शिकता येते.  तुम्ही शांत उभे रहा, त्या तुम्हाला काहीही करणार नाहीत, असे खास हैदराबादी हिंदीत म्हणाला.‌ मनासारखे हार मिळाल्यामुळे मीही खुश झालो. बाजूलाच नंदिनी डेअरीतून पेढे मिळाले. श्रीफळ फळे घेऊन परतीच्या वाटेवर एका दुचाकीस्वाराला हात दाखवला आणि त्याच्या सोबत यात्री निवासावर आलो.  पुन्हा स्नान उरकून नाश्ता उरकून पारायण करण्यासाठी श्रीप्रभुमंदिरात आलो.

आज श्रीप्रभुचरित्र वाचताना खूपदा डोळ्यांच्या कडा अलगद ओलावल्या. पारायणकाळात दर दिवसागणिक श्रीप्रभुशी आपली नाळ इतकी घट्ट होत जाते की आपण त्या त्या कथानकात आपण प्रत्यक्ष शिरकाव करतो आणि श्रीप्रभुंच्या लीला वाचताना, त्यांची करुणामयता, परोपकारी वृत्ती आणि भक्तवत्सलता अनुभवताना आपसूकच कंठ दाटून येतो. असो, श्रीप्रभुच्या आनंदलहरी अनुभवत आजचे पारायण पूर्ण केले. श्रीप्रभु दर्शनासाठी मंदिरात आलो. श्रीप्रभु आज अत्यंत शोभिवंत दिसत होता. गडद लाल रंगाच्या समाधीवरील वस्त्रावर, सोनेरी नक्षीकाम असलेली शेंदरी रंगाची रेशमी शाल अत्यंत मोहक दिसत होती. नवरत्नांची, सोन्याच्या, रुद्राक्षांच्या, मोत्यांच्या अनेकविध माळा घालून हा नटनागर आज नटला होता. कागडा आणि अबोलीच्या सुंदर माळा गळाभर रुळत होत्या. नागकेशर, गुलाब, शेवंती आणि फुग्यांच्या फुलांची नेत्रदीपक सजावट, श्रीप्रभभुसौंदर्यात आणखीनच भर घालत होती. श्रीप्रभु समाधीवरील चांदीचे छत्र अबोलीच्या माळांमुळे अत्यंत आकर्षक दिसत होतं. कदाचित माझ्या अंतरंगातील भावनांचे प्रतिबिंबच श्रीप्रभुच्या समाधीवर उमटले होते. श्रीप्रभु मंदिराला प्रदक्षिणा घालून यात्री निवासावर आलो. पाद्यपूजेचे सामान ठेवून श्रीजींच्या घरी आलो.

श्रीजी आपल्या नित्यपूजेत रमले होते. पाद्यपूजेचे सामान एका कोपर्‍यात लावून प्रसन्न चित्ताने श्रीप्रभुच्या तसवीरीकडे एक टक पाहत राहिलो. आज मी सकलमत संप्रदायी होणार होतो. कोरोना काळात श्रीचिद्घन प्रभुंनी मला पुस्तकांचा एक संच पाठवला होता त्यात, साधना प्रदीप नावाचं श्रीसद्गुरू माणिकप्रभु महाराज यांच्या सकलमत संप्रदायाची उपासना पद्धती असलेले हे अगदी छोटेखानी पुस्तक होते. अगदी सोळा पानांचं… गुरुउपदेश घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक विनामूल्य दिले जाते किंवा इतर जनांसाठी हे केवळ वीस रुपयांत उपलब्ध आहे. कितीतरी वेळा हे पुस्तक वाचून झाले असेल. प्रत्येक वेळेस वाचताना सकलमत संप्रदायाचीची दीक्षा घ्यावी असे मनोमन वाटायचे. मृत्युनंतर मला मोक्ष वगैरे मिळेल की नाही हे माहीत नाही पण, सदेह जीवनमुक्तीचा अनुभव सकलमत संप्रदाय आपल्याला सहज करून देतो.  सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुला पाहावे, कोणाची निंदा करू नये, सर्वांचा आदर करावा, असेअगदी सहज सोपे आचरण ह्या संप्रदायात आहे. कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे, स्त्री-पुरुष ह्या संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतात. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापासून सुटका होऊन, आपला उद्धार व्हावा, अशी तीव्र इच्छा ज्यास आहे, तोच हा संप्रदाय दीक्षेचा अधिकारी होय. सकलमताचार्य श्रीमाणिक प्रभुमहाराजांच्या कृपेनेच माझा उद्धार होईल, अशी संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती असणाऱ्यांना या मार्गाचा अवलंब सहज शक्य आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातील गेल्या दोन वर्षातील घडामोडी लक्षात घेता, ही सर्व त्या प्रभुचीच इच्छा आहे, ह्याची मला मनोमन खात्री पटत होती. आज माझ्याबरोबर आणखी एकजण सकलमत संप्रदाय दीक्षा घेणार होता. पूजा करून श्रीजी गादीवर बसले. श्री भक्तकार्य कल्पद्रुमचा जयजयकार झाला. श्रीजींचे पाद्यपूजन यथासांग पार पडले. आरती नैवेद्य झाला.  दि.२३.०३.२०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी श्रीजींनी मला मंत्रोपदेश दिला आणि मी सकलमत संप्रदायी झालो. श्रीजींनी आपल्या गळ्यातला पुष्पहार, माझ्या गळ्यात जेव्हा घातला, त्यावेळी कृतार्थतेच्या परमोच्च शिखरावर मी उभा होतो. मनी अष्टभाव दाटून आले होते. त्यावेळेस झालेली मनाची भावविभोर अवस्था शब्दांत वर्णन करणे कदाचित अशक्य आहे. पाद्यपूजेच्या वेळी श्री. राजन  मोहिलेकाकांचं  आणि श्री. चौबळ काकांचं खूप सहकार्य लाभले. त्यांच्याही प्रती कृतज्ञता अर्पण करतो.

ताक पिऊन श्रीजींच्या प्रवचनासाठी श्रीनृसिंह निलय मध्ये येऊन बसलो. पिशवितल्या निशिगंधाच्या हाराचा वास हॉलमध्ये दरवळून राहिला होता. आज प्रवचनासाठी ११ ते १४ असे चार श्लोक होते. सुरुवातीलाच गीता वंदना च्या संस्कृत श्लोक याचा भावानुवाद श्रीजींनी समजावून सांगितला. एखादं कार्य किंबहुना सर्व कार्ये जर श्रीप्रभुला साक्षी ठेवून केली तर जीवनातली सर्व कर्मे ही यज्ञकर्मे होऊ शकतात. कोणतेही कार्य करण्याआधी ते कार्य आपण श्रीप्रभुस अर्पण करू शकतो काय? असे स्वतःलाच विचारून पहावे. कालच्या प्रवचनात पंचायज्ञापैकी राहिलेल्या ब्रह्मयज्ञाचे स्वरूपही श्रीजींनी समजावून सांगितले. आजच्या श्लोकांमध्ये आलेले यज्ञ आणि तपाचे विवरण आपल्या अत्यंत रसाळ वाणीने करताना, समस्त श्रोत्यांना रुचेल, पचेल आणि ते पूर्णपणे समजेल ह्याकडे श्रीजींचा कटाक्ष होता. त्यांचे वेदांतावरील प्रभुत्व, कंठस्थ असलेले अनेक संस्कृत श्लोक, पुराणातील अनेक कथा हे पाहून श्रीजींविषयीचा आपल्या मनातील आदर अधिकच दुणावतो. आपल्या जवळ असलेले ज्ञान उधळायला श्रीजी नेहमीच तयार असतात, आणि त्या रंगात रंगून जाण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ मात्र हवा. तेवढी सवड तरी काढायला हवी.

प्रवचनानंतर महाप्रसाद घेऊन पुन्हा यात्री निवासावर आलो. आजच्या दिवसाचे प्रवचन अर्धेअधिक ओवीबद्ध करून, दुपारचा चहा घेतल्यावर, मी यात्री निवासच्या बाजूच्या झाडीमध्ये शिरलो. जमिनीवर सागाच्या पानांचा खच पडला होता. त्यामधून चालताना पावलागणिक कर-कर असा लयबद्ध आवाज येत होता. काल मोर ज्या ठिकाणी बसले होते त्या झाडाखाली मोरपीस मिळते का? हा माझा प्रयत्न होता. सागाच्या झाडीतून पुढे पेरूच्या बनातून विरजेच्या काठाकाठाने चालत चालत संगमा पर्यंत जाऊन आलो. मोरांची एक दोन पिसे मिळाली. आजही ती आठवण जपून ठेवली आहे. वाटेत अनेक रंगाचे वेगवेगळे पक्षी पहायला मिळाले. नदीकाठी साप पशुपक्षी आणि झाडे ह्यांचं एक स्वतःचे विश्व आहे आणि प्रत्येक जण बिनधास्तपणे त्या विश्वात रममाण आहे. भटकंती करून पुन्हा खोलीवर आलो. सर्व जाणांना पाद्यपूजेचे तिर्थ वाटले. निशिगंधाचा सुगंध आज संपूर्ण यात्री निवासात दरवळत होता.

सायंकाळी भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. त्यानंतर कोल पाहण्यासाठी श्रीप्रभु मंदिराच्या पटांगणात आलो. अमावास्येनंतर चंद्र जसा कलेकलेने वाढतो, तसा हा खेळ दिवसागणिक रंगतदार होत होता. गावातले बाळगोपाळ, स्त्री-पुरुष विविधरंगी पोषाख घालून हा खेळ खेळत होते. आताशा दोन वर्तुळामध्ये ही बाल गोपाल क्रीडा खेळली जाऊ लागली. सायंकाळी, दिवेलागणीला, प्रकाश झोतात, वाद्यांच्या गजरात श्रीप्रभुंच्या पदांवर, त्याच्याच समाधीसमोर, फेर धरून खेळणे हे कोल खेळणाऱ्या समस्त जनांचे अहो भाग्यच… द्वापार युगातील हे कदाचित कृष्णाचे सवंगडीच असावेत…

रात्रीचा महाप्रसाद घेऊन पुन्हा श्रीप्रभु समाधीसमोर येऊन उभा राहिलो. श्रीप्रभु समाधीवर वाहिलेल्या फुलांबाबत एक विशेष गोष्ट मला नेहमी जाणवते ती म्हणजे श्रीप्रभु समाधीवरील फुले संध्याकाळीही तितकी ताजी असतात. वास्तविक पाहता, श्रीप्रभु समाधीवर एक विद्युत प्रकाशाचा एक झोत सतत चालू असतो, त्याच्या उष्णतेने खरेतर ती फुलं मलूल व्हायला हवीत, पण तसे काही होत नाही. कदाचित ती फुलेही श्रीप्रभुच्या सानिध्यात त्याच्या चैतन्याचा अनुभव करत असावीत. आज बुधवार… आज विठ्ठलाचे भजन… आजचा रंग फिकट निळा होता. श्रीप्रभु समाधीसमोर आनंदमंटपात घातलेली फिकट निळ्या रंगाची गादी मनमोहक दिसत होती. आजही गावातली मुलं श्रीजींच्या प्रवचनाआधी भजनात दंग झाली होती. अगदी वेळेवर, साडेआठच्या सुमारास श्रीजी श्रीप्रभु मंदिरात आले आणि श्रीप्रभु दर्शन घेऊन गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी आता मी सखे कैसे काय करू, कधी भेटेल मम सद्गुरु… हे प्रभु पद होते. कोण मी कैचा ,काही कळेना हे कडवं समजावताना स्वस्वरूपाची खरी ओळख श्रीजींनी आपल्या नेहमीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत उपस्थितांना सांगितली. आजचे प्रवचनही जवळपास तासभर चालले. श्रीजींचे प्रवचन इतके सहजपणे स्फुरलेले असते की प्रवचनाच्या सुमारे अर्धा तास आधी ते विचारतात की आज कुठले पद आहे? ह्यावरून त्यांच्या ज्ञानस्वरूपाची यथार्थ ओळख पटते.

प्रवचनानंतर आजही गणराज पायी मन जड जड जड…‌ ह्या गणपतीच्या पदावर सुर आणि वाद्यांची जुगलबंदी अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीत आपण जसजसं आपल्या आत उतरवतो, तशी तशी त्याची गोडी अधिक वाढत जाते. श्रीप्रभुच्या पदांना अनेक तालांवर ऐकणे हीसुद्धा एक पर्वणीच आहे. आजही भजनानंतर आरती झाली. आरतीनंतर शेजेचे पद झाले. कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी आशीर्वाद दिला. श्रीजींची स्वारी घराकडे परतत असताना कमलावदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा चे दिव्य सुर आसमंतात पुन्हा भरून राहिले. आज सर्वांना आईस्क्रीम दिले गेले. भजनामुळे झालेल्या मनाची आणि आईस्क्रीममुळे झालेल्या शरीराची शीतलता अनुभवत पाय हळूहळू यात्री निवासच्या दिशेने पडत होते…

क्रमशः…