सगरोळी, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक प्राचीन गाव आहे. सगरोळीचे एकेकाळचे नाव सावरवल्ली असे होते. या परिसरात अनेक शिलालेख आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेले श्रीक्षेत्र बासर आणि तेथील सरस्वतीचे शक्तिपीठ (श्री नृसिंहसरस्वती महाराजांशी सायंदेवाची प्रथम भेट इथेच झाली.) आजच्या घडीला द्रष्टे कर्मयोगी कै. बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्कृती संवर्धन मंडळ ही स्वयंसेवी संस्था आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या अनेक उपसंस्था हीच सगरोळी गावाची मुख्य ओळख बनून राहिली आहे. येथील कृषी विकास केंद्र संपूर्ण भारतामध्ये आपली छाप पाडून, आपली वेगळी ओळख जपून आहे. सध्याच्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये आधुनिकदृष्ट्या सर्वांग सुधारणेचे आदर्श गाव अशी सगरोळीची ख्याती आहे.

सगरोळी गाव मांजरा नदीकाठी आहे. येथे मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम आहे. गावाच्या खाली कुंदकुर्ती येथे मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे या भागाला गोदा पंचक्रोशी असेही म्हणतात. उत्खननात सापडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या आधारे हे गाव सातवाहनांच्या काळात वसलेले असावे, असे मानायला अनेक आधार आहेत. सगरोळीचा भाग कधीकाळी सातवाहन, चालुक्य, काकतीय इत्यादी राज्यांत होता. पुढे तो बहामनी, कुतुबशाही व निजामाच्या अंमलाखाली राहिला. पेशव्यांच्या काळात देशमुख-देशपांडे चौथ वसुलीसाठी सर्वत्र पसरले. ते गढी उभारून मुलकी व्यवस्था पाहत. तहसील वसूल करून ठराविक भाग सरकारात जमा करीत. सगरोळी येथे आजही देशमुख (देसाई) कुटुंबाची पाच बुरुजांची गढी आहे. पेशव्यांनी ह्या देशमुखांना सनदा देऊन करीमनगरपर्यंतच्या भागाची जबाबदारी सोपविली होती. सगरोळी गावामध्ये श्रीप्रभु मंदिराच्या बाजूला चालुक्यकालीन गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात शेंदूरचर्चित गणपतीची भव्य मूर्ती मन वेधून घेते.

सगरोळी गावाचा आणि माणिकनगरचा हृदय संबंध आहे. जवळपास सर्व गावच प्रभुसेवेत आहे. माणिकनगरच्या उत्सवांमध्ये सगरोळी गावच्या अनेक अभिमानी प्रभुभक्तांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या पाहायला मिळतात.‌ सगरोळीचा श्री माणिकप्रभु संस्थानाशी कसा संबंध आला ह्याचा मागवा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला असता, श्रेष्ठ, संत-महात्मे ह्या भागात (श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या मुधोळ वगैरे दौऱ्यावेळी) येत आहेत, तेव्हा आपणही त्यांना आपल्या गावी निमंत्रित करावे, असा विचार येऊन जहागिरीचे प्रमुख या नात्याने कै. अमृतराव देशमुख (बापूसाहेब) (श्री. देवीदास दादांचे पणजोबा) ह्यांनी त्यांना निमंत्रित केले असावे, अशी माहिती श्री. देवीदास दादांनी दिली. हा काळ साधारणतः १९०१-१९०३च्या दरम्यान असावा. म्हणजे साधारणतः सव्वाशे वर्षापासून सगरोळीच्या ग्रामस्थांची श्री माणिक प्रभु संस्थानाशी नाळ जोडली गेली आहे.

बापूसाहेबांचे नारायणराव आणि गोविंदराव असे दोन पुत्र. उभयतांचा तुळजापुरात जाण्याचा वार्षिक नेम होता. पुढे तुळजापूरच्या भवानीने सांगितले की, तू आता थकला आहेस, याकरिता तू येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर तुझ्याकडे येते. मात्र, तू मागे पाहू नकोस! जर मागे पाहिले तर मी त्याच ठिकाणी राहीन! देशमुख मागे न पाहता निघाले, सगरोळीच्या सीमेपर्यंत आल्यावर खरोखरच श्री भवानी आली की नाही म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले आणि देवी तिथेच थांबली, अशी दंतकथा आहे. सगरोळीच्या सीमेवर जिथे देवी गुप्त झाली, त्या स्थळी देशमुखांनी देवीचे देऊळ उभारले आहे. प्रथम देवीचे मानपान होऊन, नंतर नवरात्र उत्सव आरंभ होतो. याच देवीच्या आज्ञेवरून देशमुख श्री प्रभुंच्या दर्शनास गेले आणि महाराजश्रींच्या हस्ते प्रसाद घेऊन आले. गावात श्री प्रभुगादीची स्थापना केली. श्रीदेवी नवरात्राप्रमाणेच, श्रीप्रभु गादीचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. संप्रदायदृष्ट्या शिष्यवृंद नात्याने सगरोळी आणि माणिकनगर एकजीव बनले आहेत.

आपल्या पहिल्या सगरोळी दौऱ्याच्या वेळी श्री मार्तंड माणिकप्रभु, सध्याचे जे शारदानगर आहे, तेथे राहत. पूर्वी हा भागावर मोहाच्या झाडांचे जंगल होते. बालाघाटाच्या डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या या निसर्गरम्य स्थानी महाराजश्रींचा मुक्काम असे. बाबासाहेब लहान असतानाच त्यांचे मातृ-पितृछत्र हरपले. आजीने आणि चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. बाबासाहेब लहानपणी अत्यंत शामळू स्वभावाचे होते. त्यांच्या आज्जीला त्यांची चिंता लागून राहायची. एक दिवस धीर धरून त्यांनी श्री मार्तंड माणिक प्रभुंना आपल्या नातवाबद्दल विचारले. तेव्हा महाराजश्री म्हणाले, याची अजिबात चिंता करू नका, हा एक दिवस खूप मोठा माणूस होईल. पुढे आजींचे वय झाल्यामुळे त्यांना गढीच्या बाहेर असलेल्या प्रभु मंदिरातही जाता येईना, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंनी आजींना त्यांच्या घरीच प्रभुगादीची स्थापना करून दिली. घरातील श्री देवीच्या देव्हाऱ्याशेजारच्या खोलीत एक प्रसादाची डबी भरून जमिनीत ठेवली व त्यावर एक छोटासा कट्टा उभारला. रोज त्या कट्ट्याची पूजा करण्याची आज्ञा देशमुख यांना देवून ही खोली कोणी वापरू नये, अशी ताकीद दिली. दौऱ्यादरम्यान येथे नित्य श्री नित्य मंगल होत होते. महाराजश्रींचा दौरा संपल्यानंतर कोणी एक विद्वान सत्पुरुष संचार करीत सगरोळीस आले. त्यांची पाद्यपूजा, दर्शन वगैरे कार्यक्रम संपल्यावर श्रीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर त्या सत्पुरुषांचे लक्ष देवीच्या शेजारील खोलीकडे गेले. एकांतात अशी सोईस्कर ही खोली झोपावयास बरी आहे असे पाहून, त्यांनी देशमुखांच्या नोकरास आपली झोपण्याची व्यवस्था त्या खोलीत करायची आज्ञा केली. पुढे ते सत्पुरुष त्या खोलीत झोपले असता, त्यांना सटक्याचा मार बसून, “येथून चालता हो” असे शब्द होऊन, खोली बाहेर फेकले गेले. देशमुखांना हे वर्तमान समजताच त्यांनी त्या सत्पुरुषांना नम्रतेने सांगितले की, ह्या खोलीत जो लहानसा कट्टा आहे, त्यात श्री प्रभुंचा प्रसाद ठेवला आहे. दररोज त्या कट्ट्याची पूजा झाल्यावर नंतर ती खोली कुणालाही वापरास देत नाहीत आणि तिकडे कुणीही जात नाही. त्यानंतर त्या सत्पुरुषांनी श्रीदेवीच्या दर्शनानंतर बाजूच्या खोलीतील कट्ट्यांवर फुले वाहून नमस्कार करण्याचा नित्यक्रम ठेवला होता. आजींना दिलेली प्रसादाची ती डबी आजही आपल्याला देशमुखांच्या पूजेमध्ये पाहता येते. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या वास्तव्याने, त्यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेल्या ह्या पुण्यभूमीतच कै. बाबासाहेबानी संस्कृती संवर्धन मंडळाचे बीज रोवले. श्री प्रभुच्या असीम कृपेने आणि कै. बाबासाहेबांच्या अविश्रांत परिश्रमाने आजच्या घडीला आपल्याला संस्थेचा हा डेरेदार वटवृक्ष बहरलेला दिसतो.

क्रमशः….

[social_warfare]