सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने उसंत घेतली. श्रीगुरुंच्या शब्दांबाहेर जायचे धारिष्ट्य कदाचित त्याच्यातही नसावे. पाऊस थांबल्यामुळे गावकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. संध्याकाळी सव्वासहा वाजता आम्ही अतिथीगृहातून, शोभायात्रेचा प्रारंभ जेथून होणार होता, त्या विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पोहोचलो. जवळपास संपूर्ण सगरोळी गाव येथे जमला होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच लगबग चालू होती. श्रीजींच्या स्वागतासाठी संस्कारभारतीच्या भल्या मोठ्या आकर्षक रांगोळ्या मंदिर परिसरात काढल्या होत्या. शोभायात्रेसाठी घोडेस्वार, बँड पथक, लेझीम पथक, वारकऱ्यांचे पथक, सुवासिनींचे पथक घोळक्या घोळक्याने उभे होते. वारकरी मंडळ भजनानंदात एव्हाना दंग झाले होते. शाळेच्या मुलांमध्ये अमुप उत्साह होता. श्रीजींच्या आमच्या गावी येण्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत, आणि त्यांच्यासमोर शोभायात्रेतून आमची कला सादर करण्याची संधी आम्हाला मिळते, हे आमचे भाग्यच. या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे आणि पाऊसही थांबल्यामुळे आता शोभायात्रेत आम्ही आमची कला सादर करू, अशी प्रतिक्रिया एका चिमुकलीने दिली.

साधारणतः साडेसहाच्या दरम्यान श्रीजींचे शोभायात्रेसाठी आगमन झाले. श्रीजींच्या शोभायात्रेसाठी रथ आकर्षक रोषणाईने सजवलेला होता. श्रीजी रथावर आरूढ होताच, श्रीप्रभुच्या भक्तकार्यच्या ब्रीदावलीने आसमंत दुमदुमला. शोभायात्रेच्या सुरुवातीला घोडेस्वार, त्यांच्यापाठी बँड पथक, त्यानंतर लेझीम पथक शिस्तबद्ध पद्धतीने निघाले. त्यानंतर वारकरी मंडळ, सुवासिनी स्त्रिया ह्या आपल्या गावाच्या संस्कृतीचे दर्शन घडवत होत्या. त्यानंतर गावातील सर्व मान्यवर, आबालवृद्ध शोभायात्रेत सहभागी झाले होते. सगरोळी गावच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं, संस्कारांच प्रतिबिंबच जणू ह्या शोभायात्रेत उमटले होते. ह्या शोभायात्रेचा सुखसोहळा पाहण्याची संधी सूर्यदेवही जणू दडवू इच्छित नव्हता आणि म्हणूनच काय ढगांच्या आडून अधूनमधून तोही पाहत होता. सायंकाळच्या संधीप्रकाशात, सूर्यानेही ही अपूर्व संधी साधली होती. गोरज मुहूर्तावरील त्या संधी प्रकाशात, आल्हाददायक वातावरणात अत्यंत उत्साहात शोभायात्रा निघाली. बँडच्या तालावर, लेझीम पथकाने सुंदर लयबद्धता साधली होती. अब्दागिरीवाले बँडच्या तालावर अब्दागिरी उंचच उंच झुलवत होते. इकडे वारकरी मंडळाचा माणिक नामाच्या गजर आसमंतात दुमदुमून राहिला होता. मधूनच फटाक्यांची आतिषबाजी आसमंत उजळवून टाकत होती. रस्त्याच्या दुतर्फा स्त्री-पुरुष उभे राहून श्रीजींना मानवंदना देत होते, कोणी नमस्कार करत होते, कोणी कुतुहलाने, कोणी कौतुकाने, श्रीजींना न्याहाळत होते  गावाच्या वेशीपासून थोड्या पुढे आल्यावर दुकानदारांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी श्रीजींवर गुलाबदलांची उधळण सुरू झाली, ती शोभायात्रा श्रीप्रभु मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत सुरूच राहिली. श्रीजीही सुहास्य वदनाने सर्वांचे अभिवादन, नमस्कार स्वीकारत होते. अशा सुखसोहळ्याच्या वेळी श्रीजींच्या मुखकमलावर चैतन्याची अनुपम छटा फाकली होती. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम आत्मानंदात निमग्न होऊन रथावर आरुढला होता. आपापल्या मोबाईलमध्ये श्रीजींची ही अदा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. मिनिटागणिक हजारो फोटो पडत होते. साधारण पाचशे मीटरचे अंतर कापण्यासाठी आम्हाला पाऊण तास लागला. संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास आम्ही श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचलो. फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. नेमके ह्याच वेळी वारकरी मंडळ या सुखसोहळ्याला अनुरूप असे “या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनि संत सदनी राहिला” हे पद म्हणत होते. बँड आणि लेझीम पथकाने श्रीजींना पुन्हा मानवंदना दिली. श्रीजी रथातून उतरल्यावर सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. श्रीप्रभु मंदिरामध्ये प्रभुचे दर्शन घेऊन श्रीजी आता व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते. सगरोळी गावातील सर्वात जेष्ठ नागरिक श्री. शंकर गंगाराम मुत्येपवार यांनी श्रीजींचे पुष्पहार घालून स्वागत केले. पाच एक मिनिटांनी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, श्रीजींचा खर्जातला “वन्दे श्रीप्रभुसद्गुरुं”चा आवाज सभागृहात निनादला आणि श्रीजींच्या उद्बोधनाला सुरुवात झाली. पुढच्या पाचच मिनिटात अतिशय जोराचा वारा सुटून, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने नेमकी पाद्यपूजेच्या वेळेस आणि शोभायात्रेचे वेळेस उसंत घ्यावी, हे श्रीजींचे पंचमहाभूतावरील असलेल्या अधिकाराचेच द्योतक होते. ह्याआधीही मी अशा स्वरूपाच्या कथा इतर प्रभुभक्तांकडून ऐकल्या होत्या, पण त्याचा प्रत्यय आज याची देही, याची डोळा मी अनुभवला.

क्रमशः….

[social_warfare]