केल्याने होत आहे रे ! आधी केलेची पाहिजे !! श्री समर्थांच्या या म्हणी प्रमाणे श्री महाराजांनी यंदाचा जयंती उत्सव दणक्यात करून दाखवला.
गेल्या उन्हाळ्यात कोरोनाने सर्वत्र कहर मांडला असताना,व पुढे तिसऱ्या लाटेची जबरदस्त दहशत बसलेली असतानाहि, पावसाळ्यात कोरोनाच्या विळख्यातून थोडीशी उसंत दिसून येताच श्रावणात निर्णय घेवून, १२ ते १८ डिसेंबर पर्यंत श्री सिद्धराज प्रभू मंदिरातील समाधीचे सर्वांना स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे यथा संकल्प सर्व कार्यक्रम अत्यंत भव्य आणि दिव्य असे संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमात कोरोनाचे प्रचंड दडपण असतानाहि सर्व प्रांतातून भक्तांची अभूतपूर्व उपस्थिती जाणवली. श्रीप्रभु जन्मोत्सवाची द्विशताब्दी किंवा श्री मार्तंड प्रभूंचा १५०वा जन्मोत्सव किंवा मोठे यज्ञयाग या सारखे विशेष प्रासंगिक कार्यक्रम नसतानाहि, आता पर्यंतच्या जयंती उत्सवा पेक्षा अलोट गर्दी यंदा ओसंडून वाहत होती. जणू काही ‘विरजा व गुरुगंगा’ या बहिणींनी माणिकनगराला आपल्या रौद्र रूपाने भरभरून वाहत अक्षरशः धुवून काढले. त्यांनाही मागे टाकत आम्हीच का मागं राहू असे म्हणत सकलमती भक्तांची मांदियाळी माणिकनगरला लोटली.
शासनाच्या आदेशाप्रमाणे, जत्रेत दुकानं व हॉटेल्स लागली नव्हती. पण छोटे व्यापारी, हात गाडी व फेरीवाले,यांचा उत्साह इतका दांडगा होता की चला वाहत्या गंगेत आपणहि थोडेसे हात धुऊन घेवू असे म्हणत, दरबारला शेवटच्या दिवशी हार, फुले, पेढे, बत्ताशे, बांगड्या, लहान मुलांची खेळणी वगैरेची फुटकळ दुकाने कुणाचे निमंत्रण वा सूचना नसतानाहि, दुडूदुडू धावत येत तातपुरता आसरा करून घेत एक दिवसासाठी का होईना उभी राहिलीच. जणू गुळाच्या आशेला मुंगळ्यांची रांग किंव्हा ढगाळ पावसाळी कीटकांप्रमाणे अचानक जमा झाले. ही प्रभूंची काय लीला म्हणावी? अर्थात या लीलेतूनच श्रीउत्सव लीलया पार पडला. जसे घोंगावणाऱ्या महापुरातून श्रीदेवी व्यंकम्माला श्रीप्रभूनी अलगद उचलले. कोणालाही कसलाही त्रास किंव्हा कोरोनाची बाधा झाली नाही. या सर्वाला कारण एकच श्रीजींची श्रीप्रभूंवर अतूट श्रद्धा, विश्वास.
“स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य। शिष्यगुरू मी तू पण। सर्वरूपे हा श्री प्रभू जाण।” या श्री मार्तंडप्रभूंच्या वचनाची प्रचिती येते. कोणतेही काम करण्याची हिम्मत व त्यामागचे सुनियोजन (Perfect) नियोजन ही तर श्रीजींची खासियत आहे. कोणतेही Event Management चे कोर्स न केलेले कार्यकर्ते व कोणतीहि Professional Agency या कामात नसतांहि केवळ प्रभू भक्तांची फौज घेवून श्रीजींनी हा उत्सव परिपूर्णतेने पार पाडला. यालाच म्हणतात “योजकः तत्र दुर्लभः”
श्री सिद्धराज प्रभूंचे समाधी मंदिर निर्माणाधीन असल्यामुळे श्रीसमाधीची नित्य पूजा गेल्या काही वर्षांपासून चालू नव्हती,ती विधिवत सुरु व्हावी या एकाच भावनेने नाना धडपडी करून आवश्यक तेवढे बांधकाम होताच. (बाकीचे नंतर यथावकाश होत राहील असा विचार करून) अगदी स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाले.मंदिराची वास्तूपूजा व भक्तांसाठी स्पर्श दर्शन हा अनोखा कार्यक्रम पूर्ण इतमामाने साजरा झाला. या स्पर्श र्दशनाच्या कार्यक्रमात प्रत्येक दर्शनार्थी भक्तांना श्री समाधीवर अभिषेकासाठी शुद्ध पाण्याने भरलेले कलश व बेलपत्री मंदिरात देण्यात आली. यात जातपात-स्त्री-पुरुष-आबाल वृद्ध असा कोणताही भेद नव्हता. श्री मार्तंडप्रभूंनी म्हटल्या प्रमाणे – “घेति पत्र पुष्प फल जल गंध मणी-मोती। आणि नटून म्हणती आता व्हावू चला।। शीघ्र चला अति शीघ्र चला।। हा निर्विकल्प सविकल्पी आला।।”
हे सर्व कार्यक्रम असंख्यांच्या उपस्थितीत आणि ज्यादा वेळ चालत राहिले हे विशेष, आणि लोकांनीहि कोरोनाची भिती न बाळगता,कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,उत्सहात सहभाग घेतला. बत्ताशे उडवणे, नारळ फोडणे,वगैरे प्रकारांना फाटा देत, या वेळी लोकांनीहि चांगले सहकार्य केले. प्रत्येक कार्यक्रम पूर्व परंपरेला धरून, न कंटाळता, घाई न करता, कितीही वेळ लागला तरीही तितक्याच अगत्याने संपन्न झाले. श्रीजींची ही श्रद्धा व सबुरी आमच्यात कधी परावर्तित होईल ते श्रीप्रभूच जाणे. वाटत होते की कोरोना पासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीप्रभूंचा सटकाच इथे उभा आहे. नाही तर आमच्या सारख्या अर्धवट भक्तांना वाटत होते कि एवढ्या मोठ्या महामारीत हा उत्सव एवढया मुक्तपणे घेणे ही जोखिमच आहे.
श्री.आनंदराज प्रभूंची शांत वृत्ती व कृतज्ञता दरबार मध्ये त्यांच्या निवेदनात दिसून आली. तर श्री चैतन्यराज प्रभूंची अखंड सेवा व कार्यातील सातत्य, नेमनिष्ठा हे देखील प्रकर्षाने जाणवली. श्री चारुदत्त व श्री चंद्रहास प्रभू यांचे सोबत गावातील तरुण मंडळी उत्सवा अगोदर व नंतरही मंदिर परिसर स्वच्छ करण्याची सेवा करीत होती. तसेच श्री कौस्तुभ, श्री चिद्घन व श्री चिज्ज्वल यांनीही आपापल्या परीने तांत्रिक बाबी सांभाळत खारीचा वाटा उचलला. तसे श्री प्रभूंच्या घरच्या सर्वच मंडळींचा असाच सहभाग यात दिसला. हे पाहून इतर सकलमती भक्तांच्या मनात अशी श्रद्धा येणारच की. म्हणतात ना ‘Charity begins at home.’ एकंदरीत श्री सिद्धराज प्रभू म्हणतात त्या प्रमाणे ‘प्रभू जवळी असतां। मग चिंता मज का’? श्रीजींच्या प्रमाणे अतुट श्रद्धा आमच्याहि मनात जडो ही प्रभू चरणी प्रार्थना.
[social_warfare]
జై గురు మాణిక్
శ్రీ సద్గురు జ్ఞానరాజు మాణిక్య ప్రభు మహారాజు కీ జై
🙏” Jay Guru Manik ” 🙏
Jai Guru Manik.🙏🙏
श्रीदत्तजयंती काय्रक्रमाचा खूप सुंदर आढावा… जय गुरू माणिक…🌹🙏🌹
जय श्री माणिक प्रभु 🙏💐🕉🚩
Jai guru Manik
Jai guru manik
जय गुरू माणिक. खूप छान लेख आहे. धन्यावाद. 🙏नमस्कार.
जय गुरू माणिक 🙏