by Pranil Sawe | Aug 12, 2023 | Uncategorized

मंगळवारी सकाळीच श्री व्यंकम्मादेवी मंदिरात ओटी भरून कुंकुमार्चन केले. थोडा वेळ माणिक प्रभु अंध विद्यालयात मुलांसोबत रमलो. दुपारी भंडारखान्यातील महाप्रसादानंतर तयारीनिशी श्रीजींच्या निवासस्थानी आलो. दुपारी दोनच्या सुमारास भक्तकार्य कल्पद्रुमच्या जयघोषात श्रीजी श्री प्रभुमंदिरात दर्शनासाठी निघाले. श्री माणिकप्रभु संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, त्यांची प्रार्थना करून, आरती केली, आशीर्वाद घेतले आणि पुढे श्री मनोहर प्रभुंच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर श्रीजी, श्री मार्तंड माणिक प्रभुसमाधीसमोर आले. वर वर्णन केल्याप्रमाणे श्रीजींचा श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीशी जणू काही संवाद झाला. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधी समोरच, श्रीजी, श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या चांदीच्या पादुका आणि खारकांचा प्रसाद स्वीकारतात. संपूर्ण दौऱ्यादरम्यान ह्याच पादुकांचे भक्तांच्या घरोघरी पूजन होते. श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीची आरती करून, त्यांना निमंत्रण देऊन पुढे श्री शंकर माणिकप्रभु आणि श्री सिद्धराज माणिकप्रभु यांच्याही समाधीसमोर नतमस्तक झाले. श्रीप्रभु दर्शनानंतर श्रीजी पुन्हा निवासस्थानी आले. दौऱ्यामध्ये श्रीजींबरोबर असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी श्रीजींचे आशीर्वाद घेतले. श्रीजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला दौरा निर्विघ्नपणे पार पडणार, अशी सर्वांचीच मनोमन खात्री झाली. दौऱ्यामध्ये श्री. गुरुनाथ गुरुजी (मुख्य अर्चक), श्री. नरसिंह गुरुजी, श्री. तिरुमल गुरुजी होते आणि सेवेकऱ्यांमध्ये श्री. राजेश गिरी, श्री. माणिकलाल, श्री. इसामभाई, श्री. वीरप्पा आणि निर्मलाकाकूही सहभागी झाल्या होत्या. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास भक्तकार्याच्या जयघोषात माणिकनगरहून आम्ही सगरोळीसाठी प्रस्थान केले.
वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती. त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची पाद्यपूजा झाली. अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीजींचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे, देगलूरच्या प्रभुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही देगलूर सगरोळीसाठी निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सगरोळीच्या प्रभुमंदिरात पोहोचलो.
पावसाची रिपरिप चालू होती, परिसरातील लाईट गेलेली, पण सगरोळीकरांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमी नव्हती. अनेक प्रभुभक्तांची श्रीजींच्या स्वागतासाठी श्रीप्रभुमंदिर परिसरात दाटी झाली होती. श्रीप्रभु मंदिरास लावलेले, मांगल्याचे प्रतिक असलेले नारळाचे झाप, प्रभुमंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या मन वेधून घेत होत्या. फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीजींचे स्वागत केले गेले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. भक्तकार्यच्या जयघोषात श्रीजी श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचले. गाभाऱ्यात श्रीदत्त, श्री गणपतीबरोबरच श्री माणिक प्रभुंची अत्यंत सुबक, संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. बाजूलाच एका आरामखुर्चीमध्ये श्री मार्तंड माणिक प्रभुंचा फोटो ठेवला आहे. आपल्या सगरोळी भेटीत महाराजश्री ह्या खुर्चीत बसत. गावकऱ्यांनी आजही ती खुर्ची अत्यंत आत्मीयतेने जपली आहे. तसेच श्रीजींनी दिलेले तीन सटके, त्यांची काठी, त्रिशुळ ह्याही वस्तू गाभाऱ्यामध्ये नेटकेपणे जपून ठेवलेल्या आहेत. श्रीप्रभु मंदिरामध्ये आरती करून आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे प्रमुख आणि दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली असे बंधूत्रय, श्री. देविदासदादा, श्री. प्रमोद दादा आणि श्री. सुनील दादा यांच्या शारदानगर येथील निवासस्थानी सव्वा आठच्या सुमारास पोहोचलो. घरच्या सुवासिनींच्या औक्षणानंतर सायंकाळचे भक्तकार्य येथेच झाले. देशमुखांच्या घरी रात्रीचे गरमागरम भोजन करून आम्ही संस्थेच्या विश्रामगृहात स्थिरस्थावर झालो. येथेही भरपूर पाऊस होता. उत्तम नियोजन, उतरण्यासाठी स्वच्छ आणि निसर्गरम्य जागा, चोख व्यवस्था आणि दिमतीला अत्यंत तत्पर मदतनीस, ह्यामुळे पहिल्याच भेटीत सगरोळीकरांनी मन जिंकून घेतले.
क्रमशः….
by Pranil Sawe | Aug 9, 2023 | Uncategorized
श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,

श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,
“माणिकनगरसारखी छप्पन संस्थाने निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यात (श्री मार्तंड माणिकप्रभुंमध्ये)आहे.”
श्री सद्गुरु माणिकप्रभु यांनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून, अवघ्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आणि तत्कालीन विविध जातीधर्मांमध्ये सौहाद्रतेची मुहूर्तमेढ रोवली. श्री माणिक प्रभुंना अभिप्रेत असलेले सकलमत संप्रदायाचे हेच तत्त्वज्ञान व्यापकपणे जनमानसात पसरवण्याचे कार्य, श्री सद्गुरु माणिकप्रभुंचे पुतणे श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांनी केले. त्यांनी त्यावेळेसचे निजाम संस्थान, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लोककल्याणार्थ धर्मयात्रा काढून सकलमत संप्रदायाचा, त्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारही केला. श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पीठाचार्यांचा “दौरा” ही संकल्पना श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या झळाळत्या कारकिर्दीतच सुरू झाली.
धर्मचक्रप्रवर्तनार्थ महाराजश्रींनी अनेक दौरे केले. ज्याप्रमाणे गरीबांना धर्म भाकरीच्या तुकड्यांतून शिकवावा लागतो, त्याचप्रमाणे दुःखी, पीडित, आर्तजनांना तो त्यांच्या दुःख विमोचनातून पटवून द्यावा लागतो. महाराजश्रींसारख्या समर्थ, कनवाळू, संत शिरोमणींना याची पूर्ण जाणीव होती. त्यासाठी श्रीजींनी अनेक अलौकिक चमत्कार केले आणि त्यायोगे असंख्य दुःखितांचे अश्रू पुसले. कुणाला ऋणमुक्त केले, कुणाला असाध्य रोगापासून सोडविले, कुणाचा वांझपणा दूर केला, तर कुणाला मरणाच्या दारातून परत फिरवले. अनेकांची अडलेली कामे मार्गस्थ केली, अनेकांच्या आपत्ती दूर केल्या, अनेक भक्तांचे संकट निवारण केले आणि गोरगरिबांना यथायोग्य मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनामध्ये आशेची नवी पहाट उगवून दिली. श्रीजींच्या ह्या दैवी सामर्थ्याने सर्व प्रकारच्या लोकसमुदायांची श्रीजींवर नितांत श्रद्धा बसली. दुःख निवारण आणि उपदेश या दोन माध्यमांद्वारे श्रीजींनी सामान्य जनतेची धर्मभावना जागवली आणि त्यांच्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करून, त्यांना भक्तिमार्गावर प्रशस्त केले. सामान्यजनांना त्यांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून, त्यांच्यावरील संकट दूर करून, सकलमत संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांच्यात रुजवून, त्यांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्रीजींनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यांच्या माध्यमातून केले. अशा ह्या दौऱ्याची सुरुवात इसवी सन १९०० साली झाली. ह्याच वर्षी माणिकनगरमध्ये पहिला वेदांत सप्ताह पार पडला. महाराजश्रींचा पहिला दौरा गुलबर्गा, रायचूर, नारायण पेठ असा झाला. त्याकाळी श्रीजींचे दौरे महिनोंमहिने चालत. दौऱ्याची ही परंपरा त्यानंतरच्या सर्वच पीठाचार्यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे. आजही दौऱ्याची सुरुवात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन, त्यांना साक्षी ठेवूनच केली जाते. दौऱ्यादरम्यान सद्गुरुंचा निरंतर सहवास आपल्याला लाभतो आणि त्यांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची, त्यांचे गुणग्रहण करण्याची संधी लाभते. सद्गुरूंसोबतच्या छोट्या छोट्या प्रसंगातून, कृतीतून, त्यांचे चराचरांतील सर्व शक्तींवर असलेल्या नियंत्रणाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतो आणि गुरुतत्व प्रसंगी किती सुक्ष्मपणे आणि प्रसंगी किती व्यापकपणेही निरंतर कार्यरत होत असते, याची आपल्याला जाणीव होते. ही जाणीवच मग आपल्या जीवनात उतरून, आपले जीवन हळूहळू कृतार्थतेचा अनुभव करू लागते.
एप्रिल २३ मधील नाशिक दौऱ्यामध्ये सद्गुरूंच्या सहवासाचे महत्व कळले होते. मे महिन्यात श्रीजींचा सगरोळी दौरा ठरत असतानाच सगरोळीचे अनन्य प्रभुभक्त श्री. देविदास देशमुख (देसाई) दादांनी प्रणिलभाऊ, तुम्ही श्रीजींच्या दौऱ्यादरम्यान सगरोळीला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले. एक वेळ पंचपक्वान्नाचे भोजन नाकारता येईल, पण प्रभुभक्तांच्या विनंतीला नाही म्हणणे, फार अवघड काम असते, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्रीजी आपल्या प्रवचनातून नेहमी म्हणतात की, आपण ज्या वस्तूचे सतत चिंतन करतो, एक ना एक दिवस आपण त्याचेच स्वरूप होऊन जातो. भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीदावली आपल्या कंठामध्ये अखंड मिरवीत असलेले अनेक अनेक प्रभुभक्त जणू प्रभुस्वरूपच झालेले असतात आणि अशा अभिमानी भक्तांकरवी श्रीप्रभुच जणू काही आपल्याला पालवत असतो. “ही सर्व केवळ त्या प्रभुचीच इच्छा”, असे समजून दादांना त्वरित होकार कळवला. मंगळवार दिनांक १८ जुलै ते शुक्रवार दिनांक २१ जुलै दरम्यान श्रीजींचा सगरोळी-करडखेड दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यासाठी १५ जुलै, शनिवारीच माणिकनगरमध्ये दाखल झालो. सोमवारी सोमवती अमावस्येला शंकराचाच अवतार असलेल्या श्री माणिकप्रभुंच्या संजीवनी समाधीचे दर्शन आणि सेवेची संधी मिळाली. श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. श्रीगुरु आज जणू मेघ बनूनच बरसत होता. गुरुकृपेच्या ह्या वर्षावात असे चिंब भिजणे अत्यंत आनंददायी असते. पावसामुळे बाहेर थंडावा होता आणि समोर मनसोक्त घडत असलेले श्रीप्रभुदर्शन अंतरास शितलता प्रदान करत होत होतं. श्री प्रभुमंदिरातील रात्रीच्या भजनानंतर सगरोळीच्या दौऱ्याची तयारी करुन समाधानाने निद्रादेवीच्या कुशीत विसावलो.
क्रमशः
by Devidas Keshavrao Deshmukh | Jul 24, 2023 | Uncategorized
दि.१८-जुलै-२०२३ सायंकाळ पासून ते २१ च्या दुपार पर्यंत (अधिक श्रावण शुद्ध ०१,शके १९४५ ते अधिक श्रावण शुद्ध ०३) परमपूज्य श्री डॉ.ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांचा सगरोळी दौरा संपन्न झाला.
त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बहूप्रतिक्षित असलेल्या वरून राजानेहि सर्व शक्तीनिशी आपल्या आगमनाने सर्व शेती-तळे,मळ्यात पाणीच पाणी भरून टाकले. आणि श्रीजींच्या आगमनात उल्हसित झालेल्या सर्व भक्तांचे तोंडचे पाणी पळाले पण श्री प्रभु कृपेची अशी किमया कि,”नेमकी भव्य शोभा यात्रा म्हणा-घरोघरीच्या दिवस भरातील पाद्यपूजा म्हणा-त्यावेळी नेमके पावसाने अशक्य वाटणारी उसंत घेतली.गूगल वरचे सारे अंदाज तेवढ्या वेळा पुर्ते फोल ठरविले.” जणू काही श्रीकृष्णाने सहज लीलल्या गोवर्धन पर्वत उचलून धरून कोसळणाऱ्या पावसापासून भक्तांचे रक्षण केले.या पुराण कथेचा पुनःप्रत्यय-प्रचीती आली ही प्रभूचीच कृपा म्हणावी.

दुसरे वैशिट्य म्हणजे-श्री.गंगाधर सावकार शक्करवार ह्यांनी प्रवचनोत्तर महाप्रसादाची व्यवस्था श्री माणिक प्रभु मंदिरा शेजारीच केली होती.अपेक्षे पेक्षा ज्यादा लोक प्रवचनाला जमले होते.शेवटी शेवटी शिजविलेले अन्न कमी पडेल कि काय अशी दाट-साधार काळजी वाटू लागली.भक्तांची रांग तर खूप मोठी होती,आता काय करावे हि चिंता संबंधित कार्यकर्त्यांना भेडसावू लागली.भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले. नव्याने ज्यादा शिजवायला वेळही नव्हता.वेळ रात्री साडेआठ-नवूची होती.वरून पावसाची रिमझिम चालू झालेली.आता आहे तेवढे तरी वाढून टाकू असा विचार करत असताना इकडे लोक रांगेने येतच होते, तस तसे ते रिकामे होवू दिसणारे पातेले व त्यातील तळ गाठणारे अन्न-परातीत भरून नेवू देतच होते.शेवटी अश्यक्य वाटत असताना सर्वांनी मनसोक्त प्रसाद घेतला. हे कथन सर्व कार्यकर्त्यांनी जसेच्या तसे कथन केले.या वेळी अक्षरशः पांडवांच्या वनवासातील द्रौपतीच्या सत्व परीक्षेच्या वेळचे किंवा अलीकडच्या काळातील श्रीगुरु चरित्रातील श्री नरसिंह स्वामिंच्या कृपेने एका दरिद्री आयाचित वृतीच्या ब्राम्हणाच्या समाराधना प्रसंगाची किंवा श्री माणिक चरितामृतातील- भालकी वनातील माधूकरी मागून आणलेल्या अन्नाचे चार सहस्त्र लोकांना अन्न दानाच्या प्रसंगाची,किंवा दत्त जयंती उत्सवात अचानक वाढलेल्या भक्तांना वाढण्यासाठी तयार केलेल्या पुरणपोळ्या- पुरण-पुराणाच्या-कथेची आठवण होते. ही प्रभु कृपेची प्रचीती देते नाही तर काय?

त्या नंतर ठरलेल्या पाद्य पूजा हि व्यवस्थित झाल्या. श्रीजींची तबियत मध्येचे बिघडली.घरी बोलावून श्रीजींना पाद्य पूजा करणाऱ्यांची संख्या व हाती असेलेला मर्यादित वेळ व वरून पावसाचा लपंडाव यांचे व्यस्त प्रमाण होते.त्यातच बाहेर गावाहून ऐन वेळी आलेली दर्शनार्थ भक्त मंडळी- अधिकमासाचे वाण देणारे-ऐनवेळी अति उत्साही पाद्यपूजा करतो म्हणणारे हया सर्वांची विनंती व कोणाची नाराजी नको म्हणून सर्वाना सामवून घेणे याचे गणित सोडवणे अशक्य वाटत असताना अगदी लोण्यातून अलगदपणे केस काढावा-तसे सर्व सुरळीत,वेळेत,व व्यवस्थित झाले.श्री सद्गुरू साईबाबांनी म्हटल्या प्रमाणे “श्रद्धा व सबुरी “ याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला ही देखील प्रभूचीच कृपा म्हणावी.

शेवटी दि.२१ ला सकाळी संस्थेत सर्व कार्यकर्त्यांना संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने मार्गदर्शन पर दिलेले आशीर्वचन म्हणजे सर्वांवर कळसच होता.संस्थेचे नाव-“संस्कृती संवर्धन मंडळ”-संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयाचे नाव कर्मयोग –त्याचा खरा मतितार्थ,कार्यकर्त्यांनकडून होणारी त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी,श्री प्रभु कृपेचा अर्थ या सर्वांचा रोजच्या जीवनातील चालती बोलती उदाहरणे देत,श्रीजीनी आम्हाला पटवून दिले व आम्हाला ते पटलेही.अर्थात प्रत्यक्ष उदाहरण,शंका निरसनात टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद हेच दर्शविते कि-श्री प्रभु कृपा म्हणजे काय चीज आहे. श्री प्रभूंच्या कृपेनेच ,या कामी ,सर्व गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले,तसेच संस्थेच्या विकास कामात वेग आला. संस्थेचे सर्व कार्यकर्तेही आपले घरचे काम समजूनच संस्थेत काम करतात ,ही खूप मोठी जमेची बाब आहे.

शेवटी शंका निरसनात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली समर्पक-समयोचित-तत्काल (हजर जबाबी )व बिनतोड उत्तरे म्हणजे-CID हया जुन्या हिंदी सिनेमातील बडाही CID है.वो नीली छत्रीवाला | हर तालेकी चाबी रखे-हर चाबी का ताला !! हया गाण्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.
दर वेळी गीता-वेदोपनिषदातील त्यांनी केलेली विधाने,उधृत केलेले श्लोक हे त्यांच्या विद्वतेची प्रचीती देतातच पण त्याच बरोबर वेदोपनिषदे-गीता ह्यातील श्लोक व श्री प्रभूंची शिकवण यातील साम्य व महत्व सहज सांगून जातात.जणू प्रभूंची तत्वे व गीता वेदोपनिषद हे एकच आहेत ज्या प्रमाणे वस्त्र व धागे दोरे वेगळे समजू शकत नाही किंवा बर्फातील पाणी व बर्फ वेगळे करता येत नाही किंवा सूर्य व प्रकाश वेगळा करता येत नाही.हे सूर्य प्रकाशा इतकेच स्वच्छ आहे.म्हणूनच म्हणतात गुरु साक्षात परब्रम्ह .

कर्मयोग संबंधात त्यांचे आशीर्वचन ऐकून मला बाबांची आठवण झाली.बाबा (आमचे वडील )एकदा असेच मला म्हणाले होते कि भरपूर शेत जमीन व भला मोठा वाडा परमेश्वराने आपणाला दिला आहे.तो चैनीत,आरामात बसून खाण्यासाठी नसून ज्या गावात,ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही आपण देणे लागतो म्हणून त्यांची सदैव सेवा करत रहावी.
आणि अश्याच एका संकट प्रसंगी म्हणाले होते कि अंबामाय व श्री माणिकप्रभु ह्यांच्या शिवाय आपणाला कोण आहे.आमच्या कुटुंबावर अनेक सामाजिक,राजकीय ,कौटुंबिक संकटे आली, तरी पण श्री प्रभु कृपेनेच आम्ही तरलो,उभारलो आहोत,ह्याचीही प्रचीती वारंवार येते.पण काही वेळी आमचे मन भरकटत जाते.या सर्वांची जाणीव श्रीजींनी आम्हाला आपल्या आशीर्वचनातून करून दिली.त्यांची ती कृपा आमचे वर अशीच राहो,ती वृद्धींगत होवो हि श्री प्रभु चरणी प्रार्थना .
असा आहे श्री प्रभूंच्या कृपेचा पुनःप्रत्ययाचा आनंद….!!!
by Prachi Karnik | Jul 10, 2023 | Uncategorized
गुरु ही पार लगावे नैया
गुरु ही भवसागर खेवैया!
गुरु चरन में शीश नवाऊँ
गुरु बिन ज्ञान कहाँ मैं पाऊँ|

गुरु पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या चरणी अनंत कोटि नमन तसेच त्यांस अनेकानेक सुमंगल शुभेच्छा????????
खरे पाहता ज्याच्या सन्मानार्थ एखादा दिवस विशेष साजरा होतो, त्या व्यक्तिस त्या दिवशी भेट दिली जाते. परंतु सद्गुरुच कर्ता करविता दाता त्राता आहे अशी दृढ श्रद्धा असलेल्या आम्ही भक्तांनी श्री महाराजांस भेट तरी काय द्यावी? उलट पक्षी आजच्या ही दिवशी आमचे हात पसरलेलेच!
तरी परंतु श्रीजींच्या प्रति असलेले सादर प्रेम मात्र आज व्यक्त केल्यावाचुन रहावत नाही. ही भावसुमनांची भेट त्यांनी गोड मानून घ्यावी.
अर्थात ह्या काव्यातही मागणेच आहे. परंतु “परमेश्वराकडे काय मागावे” ह्या विषयी श्रीजींकडून मिळालेल्या धड्याचा अभ्यास करायचा प्रयत्न सतत चालू असतो. त्या अनुषंगाने ह्या काव्यात गुरुची सेवा याचिली आहे.
श्रीजींकडून वारंवार लाभलेल्या ज्ञानामृतातून गुरुसेवेचा जो अर्थ मला उमगला, त्यानुसार गुरुसेवा ही दोन मुख्य वर्गात विभागता येईल असे मी समजते – एक म्हणजे गुरूने जे कार्य अंगी घेतले, त्या कार्यामधे तन-मन-धन लावून सहभागी होणे व अलीकडेच एका प्रवचनात महाराजांनी आणखी एक व्याख्या सांगितली, ती म्हणजे गुरुवचनाप्रमाणे, गुरु आज्ञेप्रमाणे, गुरूच्या अपेक्षेप्रमाणे आचरण करणे.
अशा प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुसेवा मज अल्पशक्ति-अल्पमती कडून श्री प्रभु निरंतर करवून घेवो व त्या योगेच चारही मुक्तिंची अनुभूति होवो हीच आजच्या परम पावन प्रसंगी प्रभुचरणी प्रार्थना ????????
श्री सद्गृरु मार्तंड प्रभुंच्या शब्दात सांगायचे तर
“सेवक हा तुमचा हो प्रिय
बोला मुखे अमुचा हो प्रिय
ज्ञानरूप मार्तांड स्वरूपी
अभेद मती जडू द्या।
सेवा ही घडू द्या।।”
ह्याच आशयाचे हे छोटेसे काव्य श्रीजींच्या सुमंगल चरणी सादर सप्रेम समर्पित
घडो निरंतर श्री गुरु सेवा।
इतुके मजसी देई देवा।।
ज्या ठायी मम वसे सद्गुरु
वारी पावो तेथ निरंतरु
लाभो “सालोक्याचा” ठेवा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।
स्थान मिळावे सद्गुरु चरणी
तन-मन-धन पडो गुरु सत्करणी
“सामीप्याचा” ऱ्हास न व्हावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।
सद्गुरु वचनी अविचल श्रद्धा
अभ्यासे ढळो षड-वैरी बाधा
शीघ्रच मग “सारूप्य” पावावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।
सद्गुरु मज माय बाप भ्राता
सद्गुरु दाता सद्गुरु त्राता
द्वैत परी हा, तो ही निरसावा
“सायुज्याचा” योग घडावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।
by Pranil Sawe | Jul 1, 2023 | Uncategorized

मानव सुखालोलुप अंध ।
मनासी नाही निर्बंध ।
शतावधी आशांनी बद्ध ।
जखडला अगतिक ।।
मोह काम क्रोध ।
लोभ मत्सर मद ।
शिपाई हे हत्यारबंद ।
नजर रोखून ।।
करता थोडी हालचाल ।
म्हणती पळून जाईल ।
कोण मज सोडविल ।
ह्या संमोहनातून ।।
संमोहनाचे ऐसे आवरण ।
जीवासी टाकी आच्छादून ।
परमसत्य गेले झाकून ।
वेदनामय आयुष्य ।।
अंधार दाटला घनदाट ।
अवघड सुटकेचा घाट ।
कोण दाखविल वाट ।
चिंतित निर्वाणी ।।
म्हणून प्रभुनामाची कळ ।
भावे दाबावी नित्यकाळ ।
साधावे क्षेमकुशल सकळ ।
कामक्रोध नासोनि ।।
नित्य अनित्य विवेक ।
वैराग्य पत्करावे सम्यक ।
बाणवावे शमदमादि षटक ।
आणिक मुमुक्षुत्व ।।
सहज साधण्यास मुक्ती ।
वरील चतु:साधनांची युक्ती ।
होता सम्यकज्ञान आणि भक्ती ।
परमवस्तु भेटेल ।।
by Uma Herur | Jun 28, 2023 | Uncategorized

वो दिखा रहे हैं जलवा, चेहरा बदल बदल के।
मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के ।।
देखी जो शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।
मिलने उन्हे चला है, दिल ये उछल उछल के ।।१।।
उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।
बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।।
शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।
जो पास आ गए हैं, वो दूर जा न पाऍं।
ऐ “ज्ञान” अब तुझे है, चलना सँभल सँभल के ।।४।।
सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु यांनी या सुंदर गझलेमध्ये ज्ञानी भक्ताची अपरोक्षानुभूती वर्णिलेली आहे. या ज्ञानी भक्ताला, सर्व भूतांमध्ये एकच आत्मा दिसतो आहे. मात्र त्याची बाह्यरूपे वेगवेगळी आहेत. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात, “वो दिखा रहे है जलवा, चेहरा बदल बदलके ।”
त्या आत्मारामाचा हा प्रताप आहे की, सर्वत्र एकच एक असूनही, स्थूलदृष्टीला त्याची वेगवेगळी रुपे दिसतात. श्रीजींनी आपल्या आणखी एका काव्यामध्ये म्हटले आहे की, “निर्विकार कहलानेवाले, प्रभु का रूप बदलते देखा।”
कठोपनिषदात ‘रूपं रुपं प्रतिरूपो बभूव’ असे म्हटले आहे. एकरूप असूनही आत्मा विविधतेने कसा दिसतो याचे, अग्नी, वारा यांची उदाहरणे देऊन सांगितले आहे. जसे देवघरातील नंदादीप मंदपणे तेवून सारे पाप नाहीसे करतो, तोच कधीकधी शाप होऊन दावाग्निच्या रूपाने येतो. दिवाळीला पणत्यांमधून वातावरण तेजोमय करणारा अग्नी, कधी आगीचे महाभयंकर रूप घेऊन विध्वंस करतो. पण अग्नी एकच असतो.
“मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के।”
सर्व ब्रह्मांडामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, सृष्टीमध्ये ज्या क्रिया घडत आहेत, त्या सर्वांचा केंद्रबिंदू हाच आत्माराम आहे. स्वामी वरदानंद भारतींनी सुद्धा आत्मारामाचे वर्णन काहीसे असेच केले आहे.
भूतांचे नाना विशेष ।
तरी आत्मा एकरस ।
गणती नसे त्रिज्यांस ।
केंद्र त्याचे एक राही ।।
सृष्टीमधील सर्व क्रियाविधी आत्मसत्तेवर चालतात. त्यामुळे एकच एक आत्मा, हा सर्वांचे अधिष्ठान आहे, केंद्रबिंदू आहे.
“देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”
साधनेच्या आणि तपाच्या बळावर जिद्दीने भक्त जेव्हा, बाह्य विषयांकडे धावणाऱ्या वृत्तींना माघारी वळवतो, अंतर्मुख करतो, तेथे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते. ज्ञानोबा माऊलींनी याचे फार सुरेख वर्णन केले आहे. माऊली म्हणतात,
परतुनी पाठीमोरे ठाके ।
आपणया आपणपे देखे ।
देखतया आपण या ओळखे ।
म्हणे तत्व हे, मी ।। (ज्ञानेश्वरी).
तोच भाव परम पूज्य श्रीजी येथे प्रदर्शित करत आहेत की,
“देखी है शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।”
या आत्मज्ञानी भक्ताला “अहं ब्रह्मास्मि”ची अनुभूती आलेली आहे. ब्रह्मच सर्वत्र व्याप्त असल्याने, समोरील दर्शनही ब्रह्मस्वरूपच आहे, हीच पक्की धारणा असल्यामुळे, मी आणि तो यांचा काहीच भेद नाही. म्हणून तो भक्त म्हणतोय, “देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”
आणि म्हणूनच आपुलकीच्या भावनेने, आपलेपणाने, “मिलने उसे चला है” पण कसा? तर, “ये दिल उछल उछलके।” अत्यंत आनंदाने, प्रेमभावना उचंबळून येऊन, त्याच्या भेटीला, मिलनाला हा समोरा जातो आहे. बऱ्याच कालावधीनंतर समोर आई दिसल्यावर, निरागस लहान मूल जसं आनंदाने उड्या मारीत तिच्याकडे धाव घेतो, तसा काहीसा भाव या काव्यपंक्तीमध्ये आहे.
उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।
बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर, आपली अतिशय जवळची प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली तर, आपण अत्यानंदाने, उत्स्फूर्तपणे तिला गळा भेट देतो. तिच्या हृदयाचा ठाव घ्यायचा, तर तिच्या डोळ्यात पाहून खोलवर ठाव घ्यावा लागतो. तेव्हाच अंतरंगातला भाव जाणवतो. याच भावनेने भक्त आत्मस्वरूपाला न्याहाळू लागला की, मनबुद्धी या उपाधीवरून नियंत्रण सुटून जातं आणि त्या सच्चिदानंदाच्या आनंदलहरींमध्ये तो चिंब होतो. “आनंदाचे डोही, आनंद तरंग” अशीच त्याची स्थिती होते. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात,
“बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।”
शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।
आरशात मी स्वतःला बघायला गेलो तर, तिथेही मला आत्मारामच दिसतो आहे. माझे स्वस्वरूपच मला दिसते आहे. कारण आत्मसाक्षात्कार झालेल्या ज्ञान्याला सर्वत्र व्यापक आत्माच दिसणार! “नेह नानास्ति किंचन” दुसरे काही नाहीच. हा ज्ञानी असला, तरी भक्त आहे. त्यामुळे आपले स्वस्वरूप आरशात पाहून त्याचा ऊर भरून आला आहे. या प्रतीतीसाठी त्याने जीवनभर “स तु दीर्घकाल नैर्यंतर सत्कारा सेवितो” या मार्गाने अपार कष्ट सोसलेले असतात. त्यामुळे “तो पाही आपणासी आपण” अशी अवस्था अनुभवताना उत्कटतेमुळे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे.
या काव्यपंक्तीचे दुसऱ्या तऱ्हेनेही चिंतन करता येणे शक्य आहे.
“शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।”
आपली बुद्धीही आरशासारखी स्वच्छ आहे. त्यामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते, तोच चिदाभास किंवा जीव. जीवाचा सहज भाव बहिर्मुख आहे. मात्र तो जेव्हा साधनेच्या बळावर ध्यानाने वृत्ती अंतर्मुख करतो, तेव्हा त्या जीवाला स्वतःचे बिंबस्वरूप – आत्मस्वरूप आनंदमयात दिसते, तेव्हा “पाही आपणासी आपण । आणि म्हणे ते तत्व मी” ही प्रक्रिया होते. आपल्याच सच्चिदानंद स्वरूपाला पाहून, उचंबळलेल्या अष्टसात्विक भावामुळे, अश्रू वाहायला लागतात. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे. खरे तर दृष्टीला आता दुसरे काही पाहायचे नाहीच. आता फक्त अनुभूती!
आपल्याच स्वस्वरूपाची, सच्चिदानंदाची अपरोक्षानुभूती भक्ताने घेतलेली आहे. त्याचा अविट आनंद तो भोगतो आहे. ह्या अमूल्य, अतुल्य आनंदापुढे बाह्य विषयानंदाची आता काही गरज राहिलेली नाही, त्यामुळे त्या सच्चिदानंद स्वरूपापासून जराही दूर जाण्याची भक्ताची इच्छा नाही. म्हणूनच परमपूज्य श्रीजी म्हणतात,
“जो पास आ गये है, वो दूर जा न पाये ।”
भाव दाटून आलेले आहेत. अष्टसात्विक भाव उफाळून आल्यामुळे अश्रू आवरत नाहीत. भक्त ही जी ज्ञानमयता अनुभवतो आहे, पण त्यामधील एक किंतु भक्ताला साशंकित करतो आहे की, या उत्कट भक्तीचा परिणामस्वरूप म्हणून आपण जर “तोच” झालो तर या सच्चिदानंदाचा आनंद भोगता कसा येईल? कारण जिथे सापेक्षता नाही, तेथे जाणीव होतच नाही. त्या आनंदसागरावर वृत्तीचे आनंद तरंग येणारच नाहीत. तटस्थता येईल. संत तुकोबाही या तटस्थतेला नाकारतात आणि म्हणतात,
“जळो माझी ऐशी बुद्धी, जी घाली मज तुजमधी ।
ऐसे करी विठाबाई, तुझे पाय माझे डोई।।”
जीव सुखी होण्याऐवजी सुखरूप होईल, ज्ञानी होण्याऐवजी ज्ञानरूप होईल. म्हणूनच परम पूज्य श्रीजी अतिदक्षतेने आणि विचक्षण बुद्धीने म्हणतायेत,
“हे ‘ज्ञान’ अब तुझे है, चलना संभल संभल के।”
सद्गुरूंनी ही अवस्था प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यांच्या अनेक काव्यांमधून त्यांनी त्यांनी ती प्रकटही केली आहे. जसे,
“निर्विकार कहलाने वाले प्रभू का रूप बदलते देखा ।
असंगता अपनी तजकर नभको भू से मिलते देखा ।।
वरील गजलेमध्ये साधकाला, या स्थितीची ओढ लागावी, असा “जलवा” परम पूज्य श्रीजींच्या शब्दांमध्ये आहे. आशीर्वादाची अपेक्षा करीत त्यांच्या पवित्र मंगल चरणी मी शरण आहे
Recent Comments