सगरोळी दौरा वृत्तांत (भाग चौथा)

पहाटे ५ वाजताच मोरांच्या केकारवाने जाग आली.‌ येथे माणिकनगरसारखेच वातावरण आहे. मणिचूल पर्वतरांगासारखीच बालाघाटाच्या डोंगरांची रांग, गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमासारखाच मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम, वृक्ष, लता, वेलींची विपुलता, मोर आणि माकडांचा मुक्त संचार. नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्याही सगरोळी माणिकनगरशी एकरुप झालेले दिसते.‌  सकाळीच उपासना आटपून आठच्या सुमारास आम्ही उतरलेल्या, संस्कृती संवर्धन मंडळाच्या, सोयीसुविधांनी अतिशय सुसज्ज अशा, अतिथीगृहात तयार होऊन बसलो. गरमागरम चहा नाश्ता झाल्यावर श्री. विलास जकातेसरांबरोबर संस्थेचा परिसर फिरावयास निघालो. ह्याच परिसरात एकेकाळी श्री मार्तंड माणिक प्रभुंचा संचार असायचा.‌ त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विद्यानगरच्या या भूमीत फिरताना अंगी रोमांच दाटत होते. सुरुवातीला राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाला भेट दिली.  येथून पुढे सगरोळीच्या शिवाजी हायस्कूलमध्ये आलो. “कर्मयोग” नावाची संस्थेचे कार्यालय असलेली इमारत लक्ष वेधून घेत होती. थोडा वेळ शाळेमध्ये व्यतीत केला. या शाळेच्या इमारतीची पायाभरणी श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या हस्ते १९७५ साली झाली आहे. शाळेच्या मुख्य फलकावर श्री ज्ञानराज प्रभुंचे रंगीत खडूंनी चित्र काढून त्यांना स्वागतपर मानवंदनाच दिली होती. शाळेच्या विविध इमारतींच्या उद्घाटनशीला व इमारतींची नावे व संस्थेचे उद्दिष्ट पाहता, संस्कृती संवर्धन संस्थेची श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पिठाचार्यांप्रती असलेला कृतज्ञभाव आणि त्यांची माणिकनगरशी घट्ट जुळलेली नाळ प्रकर्षाने जाणवते.

अतिथिगृहावर परतताना नागकेशराची, प्राजक्ताची फुले गोळा करून आणली. एव्हाना श्रीजी आपल्या नित्य पूजेला बसले होते. त्यांच्या पूजेला फुले अर्पण करून श्रीजींच्या पूजेचा आनंद घेत बसलो. साडेदहाच्या सुमारास श्रीजींची पूजा आटोपल्यावर सकाळी अकरा वाजता देशमुखांच्या गढीवर निघायला सज्ज झालो. आजच्या दिवसाच्या पाद्यपूजांची सुरुवात येथूनच होणार होती.

साधारण सव्वा अकराच्या सुमारास आम्ही “केशव दुर्ग” ह्या सगरोळीच्या देशमुखांच्या (देसायांच्या) गढीवर (वाड्यावर) आलो. वाड्याच्या भोवती पाच भव्य बुरुज आहेत. अत्यंत प्रशस्त असलेला हा वाडा आपल्या गतवैभव अजूनही सांभाळून आहे. मुख्य बुरुजावर देवीचे पांढरे निशाणही, श्रीजींच्या आगमनाने होणाऱ्या आनंदामुळे डौलाने फडफडत होते. वाड्यामध्ये ठिकठिकाणी रंगबिरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. श्रीजी येण्याच्या मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींच्या आगमन होताच देशमुख कुटुंबातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. भक्तकार्याच्या जयघोषामध्ये श्रीजींची स्वारी देशमुखांच्या वाड्यामध्ये आली. श्रीजींनी प्रथम देवीचे दर्शन घेतले. नंतर देशमुख कुटुंबीयांनी श्रीजींची पाद्यपूजा केली. आसपासचे अनेक लोक वाड्यामध्ये पाद्यपूजेसाठी आले होते. अधिक महिना सुरू असल्यामुळे अधिक महिन्याचे वाण देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. सुमारे तासभर हा सोहळा सुरू होता. घरातल्या सुवासिनींनी वहिनीसाहेबांची ओटी वगैरे भरली. त्यावेळेस वहिनी साहेबांनी श्री सिद्धराज प्रभुंचा ह्या खोलीमध्ये मुक्काम असायचा, असे सांगत गत आठवणींना उजाळा दिला. श्रीजींच्या आपल्या गृही येण्यामुळे झालेला आनंद देशमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. इथे श्रीजींची पाद्यपूजा सुरू असताना, श्री. देवीदास दादांनी आम्हाला देवीचे निशाण असलेल्या बुरुजावर नेले. दरवर्षी नवरात्रीमध्ये हे निशाण बदलले जाते. या बुरुजावरून सगरोळी गावाचा परिसर, बालाघाटाची डोंगररांग, मांजरा नदीचे नयनरम्य दर्शन होते. सगरोळीचा परिसर शक्य होईल तितका डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला.

देशमुखांच्या वाड्यावरून आम्ही श्री मार्तंड माणिकप्रभु कृपांकितआणखी एक प्रभुभक्त श्री. खंडेराव देशमुख यांच्या घरी पोहोचलो. येथेही अनेक प्रभुभक्तांची मांदियाळी जमली होती.‌ श्री. खंडेरावांच्या आजीबाईं (कै.‌ तान्यामा) ह्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या अत्यंत जवळच्या शिष्यांपैकी होत्या. त्याकाळी श्री मार्तंड माणिकप्रभुंनी तान्यामांना प्रसादस्वरूप दिलेली नथ,  हनुमानाचा टाक, सोन्याची अंगठी, मण्यांची माळ आजही देशमुख कुटुंबीयांनी आत्मियतेने जपून ठेवली आहे. तसेच पुढील पिढ्यांचे संरक्षण होण्यासाठी चांदीच्या महादेवाची पिंडीही आत काहीतरी वस्तू ठेवून, ती कधीही न उघडण्याची आज्ञा करून भेट दिली.  महाराजश्रींच्या दौऱ्याच्या वेळी उपयोगात येणारी मोठी भांडी, हंडे आजही ह्या भाग्यवान कुटुंबाने श्रद्धेने राखले आहेत. आज ह्या सर्व वस्तू श्री. देशमुख कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत. आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, पण श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपाप्रसादाने आम्ही सर्वांतून सुखरूपपणे तरुन गेलो, अशी कृतज्ञतेची भावनाही श्री. खंडेराव दादांनी व्यक्त केली. श्री मार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे प्रयोजन आणि त्यांची वास्तविक कृती यातील सुयोग्य सांगड आपल्याला ह्या कृपांकित भक्तांनी उलगडलेल्या आठवणींच्या पेटार्‍यातून घालता येते. श्री. खंडेराव देशमुखांकडून आम्ही श्री. चंद्रकांत जोशी, श्री. अनुप जाधव यांच्या घरी पाद्यपूजेसाठी गेलो. सर्वत्र उत्साह व प्रभुभक्तीतला आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण श्रीजींना आपल्या जीवनातील घडामोडी, प्रभुकृपेमुळे झालेली प्रगती श्रीजींना उत्साहाने सांगत होता. प्रत्येकाच्या कथा, व्यथा ऐकून श्रीजी त्यांना खारकांचा प्रसाद व यथायोग्य उपासना देत होते.

पाद्यपूजेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही श्री. शंकरराव जोशी यांच्या घरी आलो. श्री. शंकररावांच्या प्रशस्त घरात मनोभावे पाद्यपूजन झाले. श्री. शंकररावांनीही श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.श्री शंकररावांकडील पाद्यपूजेनंतर आम्ही त्यांचे बंधू श्री. संतोष नारायणराव जोशी आणि श्री. राजेश्वर जोशी यांच्या घरी आलो. श्री. जोशी बंधुद्वयांच्या आदरातीथ्यानंतर आम्ही आजच्या दिवसाच्या पाद्यपूजेचे शेवटचे ठिकाण असलेल्या श्री. सगरोळीकरांच्या निवासस्थानी आलो. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळापासून श्रीप्रभु परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आजही माणिकनगर येथील उत्सवकाळात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सगरोळीकर कुटुंबाकडे असतात आणि ते तितक्याच निस्पृह भावनेने त्याचे यशस्वी निर्वहन करतात. जेव्हा पहिल्यांदा श्री मार्तंड माणिकप्रभु सगरोळीला देशमुखांच्या वाड्यावर आले होते, तेव्हा बापूसाहेब सगरोळीकर अवघ्या दहा वर्षांचे होते. त्यावेळेस त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुंची परोपरीने सेवा केली होती. बापूरावांचे आई-वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे, श्री मार्तंड माणिकप्रभु बापूरावांच्या कुटुंबीयांना म्हणाले की, याला मी माणिकनगरला घेऊन जातो. अशाप्रकारे बापूराव माणिकनगरी आले. माणिकनगरात वास्तव्याला असतानाच बापूरावांचे गीताबाईंशी लग्न झाले. गीताबाईंच्या वडिलांच्या स्वप्नात श्री मार्तंड माणिक प्रभुंनी जावून, तुझी मुलगी सगरोळीच्या बापूरावांस दे, असे म्हणाले. सुरुवातीला या स्वप्नाकडे दुर्लक्ष केल्यावर, पुन्हा तसेच स्वप्न पडले. आणि मग सगरोळीच्या बापूरावांचा शोध घेता घेता गीताबाईंचे वडील सगरोळीहून माणिकनगरात आले. बापूसाहेबांनी जवळपास ४० वर्षे श्री माणिकनगर संस्थानाच्या कारभारात व व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार दरबाराची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. दरम्यानच्या काळात बापूरावांना सहा-सात मुले झाली. आपल्या वाढत्या परिवारासाठी माणिकनगर येथे घर बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुना विनंती केली. पण महाराजश्रींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. वारंवार विचारणा केल्यावर महाराजश्री म्हणाले, तिकडे सगरोळीचे जे आहे, ते कोण बघणार? पुढे तुलाच तिकडे जायचे आहे. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु गादीवर बसले. श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या महासमाधीच्या काही दिवस आधी बापूसाहेबांना खारकांचा प्रसाद देऊन म्हणाले की, मी तुला आता मुक्त करतो. तू आता सगरोळीस परत जा. आपल्या चुलत्यांचे निधन झाल्यानंतर, ते निपुत्रिक असल्यामुळे बापूरावांना संपत्ती व जमीन राखण्यासाठी सगरोळीला परतणे गरजेचे झाले. श्री शंकर माणिकप्रभुंच्या आज्ञेवरून बापूसाहेब पुन्हा सगरोळीला परतले. त्यानंतर बापूसाहेब माणिकनगरला येऊन जाऊन सेवेत राहिले. बापूसाहेबांनंतर त्यांचे चिरंजीवांनी प्रभुसेवेची ही धुरा समर्थपणे सांभाळली. श्री. शामराव सगरोळीकर सुमारे १९६५ पासून २०१९ पर्यंत सुमारे ५५ वर्ष प्रभुसेवेत राहिले. माणिक नगरच्या प्रत्येक महोत्सवात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. माणिकनगरला जाऊन आलो की तिथली ऊर्जा मला वर्षभर पुरते, असे ते नेहमी म्हणायचे. कधी कोणता फोड वैगरे आला की ते त्याला श्रीप्रभुच्या खारकेच्या प्रसादाची बी उगाळून लावत. अशा या प्रभुनिष्ठ परिवाराच्या घरी सर्वांसाठी दुपारच्या महाप्रसादाचीही सिद्धता केली होती. अत्यंत भावनेने सगरोळीकर कुटुंबाने श्रीजींची पाद्यपूजा केली. सध्याच्या पिढीतले श्री. राजीवकाका, श्री. शैलेशकाका आणि श्री. संजीवदादा अगदी अगत्याने सर्वांची व्यवस्था पाहत होते. सगरोळीकरांकडे श्रीजींच्या दर्शनासाठी नांदेडहून अनेक अनेक प्रभुभक्त आले होते. नांदेडच्या भक्तांच्या श्रीजींच्या दर्शनाची व्यवस्था आमचे स्नेही श्री. श्रीनिवास पाटील अगदी तत्परतेने पाहत होते. दुसरीकडे सुवासिनींचे वहिनीसाहेबांची ओटी भरण्याचे‌ व एकमेकींना हळदीकुंकू देण्याचे मंगलकार्य चालू होते. एकंदरीतच वातावरण भारलेले होते. सर्वांची दर्शने पार पडल्यावर, सर्वांनी एकत्र बसून श्रीजींसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. सगरोळीकर कुटुंबाच्या न मोडवणाऱ्या आग्रहामुळे सर्वांचेच आकंठ भोजन झाले. सगरोळीकरांच्या घरातील सदस्यांबरोबरच आम्हीही श्रीजींच्या उच्छिष्टाच्या प्रसाद सेवनाने धन्य धन्य झालो.

दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सर्व पुन्हा शारदानगर येथील अतिथीगृहात आलो.‌ सततच्या पडणाऱ्या पावसामुळे श्रीजींना थोडीशी सर्दीची बाधा झाली होती. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र सगरोळी गावामध्ये फिरताना पावसाने विश्रांती घेतली होती. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मंद मंद सरी बरसल्या, पण त्याने कोणताही प्रभुभक्त भिजला नाही. अतिथीगृहावर देशमुखदादा श्रीजींना म्हणाले, महाराज संध्याकाळी शोभायात्रा आहे. तेव्हा श्रीजी म्हणाले, अहो इतका पाऊस पडतो आहे कशाला शोभायात्रा काढता? आपण प्रभुमंदिरात थेट प्रवचनाला जाऊया! यावर उपस्थितांपैकी कुणीतरी म्हटलं, महाराज शोभायात्रेची सर्व तयारी झाली आहे. लहान मुले ढोल, लेझीम पथकांसह तयार आहेत. तेव्हा एक क्षण थांबून श्रीजींनी म्हटलं, असं म्हणता, ठीक आहे!!! काढूया शोभायात्रा… असे म्हटल्याबरोबर समस्त सगरोळीकरांना आनंदाचे भरते आले. सहा वाजता शोभायात्रा निघणार होती.  मधल्या काळात थोडासा विश्राम करण्याकरता आम्हीही आपापल्या खोलीकडे निघालो. आम्ही विश्रांतीला जात असताना, पावसाने मात्र आता जोर धरला होता…

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग तिसरा)

 

सगरोळी, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक प्राचीन गाव आहे. सगरोळीचे एकेकाळचे नाव सावरवल्ली असे होते. या परिसरात अनेक शिलालेख आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेले श्रीक्षेत्र बासर आणि तेथील सरस्वतीचे शक्तिपीठ (श्री नृसिंहसरस्वती महाराजांशी सायंदेवाची प्रथम भेट इथेच झाली.) आजच्या घडीला द्रष्टे कर्मयोगी कै. बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्कृती संवर्धन मंडळ ही स्वयंसेवी संस्था आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या अनेक उपसंस्था हीच सगरोळी गावाची मुख्य ओळख बनून राहिली आहे. येथील कृषी विकास केंद्र संपूर्ण भारतामध्ये आपली छाप पाडून, आपली वेगळी ओळख जपून आहे. सध्याच्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये आधुनिकदृष्ट्या सर्वांग सुधारणेचे आदर्श गाव अशी सगरोळीची ख्याती आहे.

सगरोळी गाव मांजरा नदीकाठी आहे. येथे मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम आहे. गावाच्या खाली कुंदकुर्ती येथे मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे या भागाला गोदा पंचक्रोशी असेही म्हणतात. उत्खननात सापडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या आधारे हे गाव सातवाहनांच्या काळात वसलेले असावे, असे मानायला अनेक आधार आहेत. सगरोळीचा भाग कधीकाळी सातवाहन, चालुक्य, काकतीय इत्यादी राज्यांत होता. पुढे तो बहामनी, कुतुबशाही व निजामाच्या अंमलाखाली राहिला. पेशव्यांच्या काळात देशमुख-देशपांडे चौथ वसुलीसाठी सर्वत्र पसरले. ते गढी उभारून मुलकी व्यवस्था पाहत. तहसील वसूल करून ठराविक भाग सरकारात जमा करीत. सगरोळी येथे आजही देशमुख (देसाई) कुटुंबाची पाच बुरुजांची गढी आहे. पेशव्यांनी ह्या देशमुखांना सनदा देऊन करीमनगरपर्यंतच्या भागाची जबाबदारी सोपविली होती. सगरोळी गावामध्ये श्रीप्रभु मंदिराच्या बाजूला चालुक्यकालीन गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात शेंदूरचर्चित गणपतीची भव्य मूर्ती मन वेधून घेते.

सगरोळी गावाचा आणि माणिकनगरचा हृदय संबंध आहे. जवळपास सर्व गावच प्रभुसेवेत आहे. माणिकनगरच्या उत्सवांमध्ये सगरोळी गावच्या अनेक अभिमानी प्रभुभक्तांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या पाहायला मिळतात.‌ सगरोळीचा श्री माणिकप्रभु संस्थानाशी कसा संबंध आला ह्याचा मागवा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला असता, श्रेष्ठ, संत-महात्मे ह्या भागात (श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या मुधोळ वगैरे दौऱ्यावेळी) येत आहेत, तेव्हा आपणही त्यांना आपल्या गावी निमंत्रित करावे, असा विचार येऊन जहागिरीचे प्रमुख या नात्याने कै. अमृतराव देशमुख (बापूसाहेब) (श्री. देवीदास दादांचे पणजोबा) ह्यांनी त्यांना निमंत्रित केले असावे, अशी माहिती श्री. देवीदास दादांनी दिली. हा काळ साधारणतः १९०१-१९०३च्या दरम्यान असावा. म्हणजे साधारणतः सव्वाशे वर्षापासून सगरोळीच्या ग्रामस्थांची श्री माणिक प्रभु संस्थानाशी नाळ जोडली गेली आहे.

बापूसाहेबांचे नारायणराव आणि गोविंदराव असे दोन पुत्र. उभयतांचा तुळजापुरात जाण्याचा वार्षिक नेम होता. पुढे तुळजापूरच्या भवानीने सांगितले की, तू आता थकला आहेस, याकरिता तू येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर तुझ्याकडे येते. मात्र, तू मागे पाहू नकोस! जर मागे पाहिले तर मी त्याच ठिकाणी राहीन! देशमुख मागे न पाहता निघाले, सगरोळीच्या सीमेपर्यंत आल्यावर खरोखरच श्री भवानी आली की नाही म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले आणि देवी तिथेच थांबली, अशी दंतकथा आहे. सगरोळीच्या सीमेवर जिथे देवी गुप्त झाली, त्या स्थळी देशमुखांनी देवीचे देऊळ उभारले आहे. प्रथम देवीचे मानपान होऊन, नंतर नवरात्र उत्सव आरंभ होतो. याच देवीच्या आज्ञेवरून देशमुख श्री प्रभुंच्या दर्शनास गेले आणि महाराजश्रींच्या हस्ते प्रसाद घेऊन आले. गावात श्री प्रभुगादीची स्थापना केली. श्रीदेवी नवरात्राप्रमाणेच, श्रीप्रभु गादीचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. संप्रदायदृष्ट्या शिष्यवृंद नात्याने सगरोळी आणि माणिकनगर एकजीव बनले आहेत.

आपल्या पहिल्या सगरोळी दौऱ्याच्या वेळी श्री मार्तंड माणिकप्रभु, सध्याचे जे शारदानगर आहे, तेथे राहत. पूर्वी हा भागावर मोहाच्या झाडांचे जंगल होते. बालाघाटाच्या डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या या निसर्गरम्य स्थानी महाराजश्रींचा मुक्काम असे. बाबासाहेब लहान असतानाच त्यांचे मातृ-पितृछत्र हरपले. आजीने आणि चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. बाबासाहेब लहानपणी अत्यंत शामळू स्वभावाचे होते. त्यांच्या आज्जीला त्यांची चिंता लागून राहायची. एक दिवस धीर धरून त्यांनी श्री मार्तंड माणिक प्रभुंना आपल्या नातवाबद्दल विचारले. तेव्हा महाराजश्री म्हणाले, याची अजिबात चिंता करू नका, हा एक दिवस खूप मोठा माणूस होईल. पुढे आजींचे वय झाल्यामुळे त्यांना गढीच्या बाहेर असलेल्या प्रभु मंदिरातही जाता येईना, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंनी आजींना त्यांच्या घरीच प्रभुगादीची स्थापना करून दिली. घरातील श्री देवीच्या देव्हाऱ्याशेजारच्या खोलीत एक प्रसादाची डबी भरून जमिनीत ठेवली व त्यावर एक छोटासा कट्टा उभारला. रोज त्या कट्ट्याची पूजा करण्याची आज्ञा देशमुख यांना देवून ही खोली कोणी वापरू नये, अशी ताकीद दिली. दौऱ्यादरम्यान येथे नित्य श्री नित्य मंगल होत होते. महाराजश्रींचा दौरा संपल्यानंतर कोणी एक विद्वान सत्पुरुष संचार करीत सगरोळीस आले. त्यांची पाद्यपूजा, दर्शन वगैरे कार्यक्रम संपल्यावर श्रीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर त्या सत्पुरुषांचे लक्ष देवीच्या शेजारील खोलीकडे गेले. एकांतात अशी सोईस्कर ही खोली झोपावयास बरी आहे असे पाहून, त्यांनी देशमुखांच्या नोकरास आपली झोपण्याची व्यवस्था त्या खोलीत करायची आज्ञा केली. पुढे ते सत्पुरुष त्या खोलीत झोपले असता, त्यांना सटक्याचा मार बसून, “येथून चालता हो” असे शब्द होऊन, खोली बाहेर फेकले गेले. देशमुखांना हे वर्तमान समजताच त्यांनी त्या सत्पुरुषांना नम्रतेने सांगितले की, ह्या खोलीत जो लहानसा कट्टा आहे, त्यात श्री प्रभुंचा प्रसाद ठेवला आहे. दररोज त्या कट्ट्याची पूजा झाल्यावर नंतर ती खोली कुणालाही वापरास देत नाहीत आणि तिकडे कुणीही जात नाही. त्यानंतर त्या सत्पुरुषांनी श्रीदेवीच्या दर्शनानंतर बाजूच्या खोलीतील कट्ट्यांवर फुले वाहून नमस्कार करण्याचा नित्यक्रम ठेवला होता. आजींना दिलेली प्रसादाची ती डबी आजही आपल्याला देशमुखांच्या पूजेमध्ये पाहता येते. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या वास्तव्याने, त्यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेल्या ह्या पुण्यभूमीतच कै. बाबासाहेबानी संस्कृती संवर्धन मंडळाचे बीज रोवले. श्री प्रभुच्या असीम कृपेने आणि कै. बाबासाहेबांच्या अविश्रांत परिश्रमाने आजच्या घडीला आपल्याला संस्थेचा हा डेरेदार वटवृक्ष बहरलेला दिसतो.

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग दुसरा)

मंगळवारी सकाळीच श्री व्यंकम्मादेवी मंदिरात ओटी भरून कुंकुमार्चन केले. थोडा वेळ माणिक प्रभु अंध विद्यालयात मुलांसोबत रमलो. दुपारी भंडारखान्यातील महाप्रसादानंतर तयारीनिशी श्रीजींच्या निवासस्थानी आलो. दुपारी दोनच्या सुमारास भक्तकार्य कल्पद्रुमच्या जयघोषात श्रीजी श्री प्रभुमंदिरात दर्शनासाठी निघाले. श्री माणिकप्रभु संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, त्यांची प्रार्थना करून, आरती केली, आशीर्वाद घेतले आणि पुढे श्री मनोहर प्रभुंच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर श्रीजी, श्री मार्तंड माणिक प्रभुसमाधीसमोर आले. वर वर्णन केल्याप्रमाणे श्रीजींचा श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीशी जणू काही संवाद झाला. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधी समोरच, श्रीजी, श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या चांदीच्या पादुका आणि खारकांचा प्रसाद स्वीकारतात. संपूर्ण दौऱ्यादरम्यान ह्याच पादुकांचे भक्तांच्या घरोघरी पूजन होते. श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीची आरती करून, त्यांना निमंत्रण देऊन पुढे श्री शंकर माणिकप्रभु आणि श्री सिद्धराज माणिकप्रभु यांच्याही समाधीसमोर नतमस्तक झाले. श्रीप्रभु दर्शनानंतर श्रीजी पुन्हा निवासस्थानी आले. दौऱ्यामध्ये श्रीजींबरोबर असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी श्रीजींचे आशीर्वाद घेतले. श्रीजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला दौरा निर्विघ्नपणे पार पडणार, अशी सर्वांचीच मनोमन खात्री झाली. दौऱ्यामध्ये श्री. गुरुनाथ गुरुजी (मुख्य अर्चक), श्री. नरसिंह गुरुजी, श्री. तिरुमल गुरुजी होते आणि सेवेकऱ्यांमध्ये श्री. राजेश गिरी, श्री. माणिकलाल, श्री. इसामभाई, श्री. वीरप्पा आणि निर्मलाकाकूही सहभागी झाल्या होत्या. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास भक्तकार्याच्या जयघोषात माणिकनगरहून आम्ही सगरोळीसाठी प्रस्थान केले.

वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती.‌ त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची पाद्यपूजा झाली. अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीजींचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे, देगलूरच्या प्रभुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही देगलूर सगरोळीसाठी निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सगरोळीच्या प्रभुमंदिरात पोहोचलो.

पावसाची रिपरिप चालू होती, परिसरातील लाईट गेलेली, पण सगरोळीकरांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमी नव्हती. अनेक प्रभुभक्तांची श्रीजींच्या स्वागतासाठी श्रीप्रभुमंदिर परिसरात दाटी झाली होती. श्रीप्रभु मंदिरास लावलेले, मांगल्याचे प्रतिक असलेले नारळाचे झाप, प्रभुमंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या मन वेधून घेत होत्या. फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीजींचे स्वागत केले गेले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. भक्तकार्यच्या जयघोषात श्रीजी श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचले. गाभाऱ्यात श्रीदत्त, श्री गणपतीबरोबरच श्री माणिक प्रभुंची अत्यंत सुबक, संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. बाजूलाच एका आरामखुर्चीमध्ये श्री मार्तंड माणिक प्रभुंचा फोटो ठेवला आहे. आपल्या सगरोळी भेटीत महाराजश्री ह्या खुर्चीत बसत. गावकऱ्यांनी आजही ती खुर्ची अत्यंत आत्मीयतेने जपली आहे. तसेच श्रीजींनी दिलेले तीन सटके, त्यांची काठी, त्रिशुळ ह्याही वस्तू गाभाऱ्यामध्ये नेटकेपणे जपून ठेवलेल्या आहेत. श्रीप्रभु मंदिरामध्ये आरती करून आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे प्रमुख आणि दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली असे बंधूत्रय, श्री. देविदासदादा, श्री. प्रमोद दादा आणि श्री. सुनील दादा यांच्या शारदानगर येथील निवासस्थानी सव्वा आठच्या सुमारास पोहोचलो. घरच्या सुवासिनींच्या औक्षणानंतर सायंकाळचे भक्तकार्य येथेच झाले. देशमुखांच्या घरी रात्रीचे गरमागरम भोजन करून आम्ही संस्थेच्या विश्रामगृहात स्थिरस्थावर झालो. येथेही भरपूर पाऊस होता. उत्तम नियोजन, उतरण्यासाठी स्वच्छ आणि निसर्गरम्य जागा, चोख व्यवस्था आणि दिमतीला अत्यंत तत्पर मदतनीस, ह्यामुळे पहिल्याच भेटीत सगरोळीकरांनी मन जिंकून घेतले.

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पहिला)

श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,

श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,

“माणिकनगरसारखी छप्पन संस्थाने निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यात (श्री मार्तंड माणिकप्रभुंमध्ये)आहे.”

श्री सद्गुरु माणिकप्रभु यांनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून, अवघ्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आणि तत्कालीन विविध जातीधर्मांमध्ये सौहाद्रतेची मुहूर्तमेढ रोवली. श्री माणिक प्रभुंना अभिप्रेत असलेले सकलमत संप्रदायाचे हेच तत्त्वज्ञान व्यापकपणे जनमानसात पसरवण्याचे कार्य, श्री सद्गुरु माणिकप्रभुंचे पुतणे श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांनी केले. त्यांनी त्यावेळेसचे निजाम संस्थान, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लोककल्याणार्थ धर्मयात्रा काढून सकलमत संप्रदायाचा, त्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारही केला. श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पीठाचार्यांचा “दौरा” ही संकल्पना श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या झळाळत्या कारकिर्दीतच सुरू झाली.

धर्मचक्रप्रवर्तनार्थ महाराजश्रींनी अनेक दौरे केले. ज्याप्रमाणे गरीबांना धर्म भाकरीच्या तुकड्यांतून शिकवावा लागतो, त्याचप्रमाणे दुः‌खी, पीडित, आर्तजनांना तो त्यांच्या दुःख विमोचनातून पटवून द्यावा लागतो. महाराजश्रींसारख्या समर्थ, कनवाळू, संत शिरोमणींना याची पूर्ण जाणीव होती. त्यासाठी श्रीजींनी अनेक अलौकिक चमत्कार केले आणि त्यायोगे असंख्य दुःखितांचे अश्रू पुसले. कुणाला ऋणमुक्त केले, कुणाला असाध्य रोगापासून सोडविले, कुणाचा वांझपणा दूर केला, तर कुणाला मरणाच्या दारातून परत फिरवले. अनेकांची अडलेली कामे मार्गस्थ केली, अनेकांच्या आपत्ती दूर केल्या, अनेक भक्तांचे संकट निवारण केले आणि गोरगरिबांना यथायोग्य मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनामध्ये आशेची नवी पहाट उगवून दिली. श्रीजींच्या ह्या दैवी सामर्थ्याने सर्व प्रकारच्या लोकसमुदायांची श्रीजींवर नितांत श्रद्धा बसली. दुःख निवारण आणि उपदेश या दोन माध्यमांद्वारे श्रीजींनी सामान्य जनतेची धर्मभावना जागवली आणि त्यांच्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करून, त्यांना भक्तिमार्गावर प्रशस्त केले. सामान्यजनांना त्यांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून, त्यांच्यावरील संकट दूर करून, सकलमत संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांच्यात रुजवून‌, त्यांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्रीजींनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यांच्या माध्यमातून केले. अशा ह्या दौऱ्याची सुरुवात इसवी सन १९०० साली झाली. ह्याच वर्षी माणिकनगरमध्ये पहिला वेदांत सप्ताह पार पडला. महाराजश्रींचा पहिला दौरा गुलबर्गा, रायचूर, नारायण पेठ असा झाला. त्याकाळी श्रीजींचे दौरे महिनोंमहिने चालत. दौऱ्याची ही परंपरा त्यानंतरच्या सर्वच पीठाचार्यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे. आजही दौऱ्याची सुरुवात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन, त्यांना साक्षी ठेवूनच केली जाते. दौऱ्यादरम्यान सद्गुरुंचा निरंतर सहवास आपल्याला लाभतो आणि त्यांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची, त्यांचे गुणग्रहण करण्याची संधी लाभते. सद्गुरूंसोबतच्या छोट्या छोट्या प्रसंगातून, कृतीतून, त्यांचे चराचरांतील सर्व शक्तींवर असलेल्या नियंत्रणाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतो आणि गुरुतत्व प्रसंगी किती सुक्ष्मपणे आणि प्रसंगी किती व्यापकपणेही निरंतर कार्यरत होत असते, याची आपल्याला जाणीव होते. ही जाणीवच मग आपल्या जीवनात उतरून, आपले जीवन हळूहळू कृतार्थतेचा अनुभव करू लागते.

एप्रिल २३ मधील नाशिक दौऱ्यामध्ये सद्गुरूंच्या सहवासाचे महत्व कळले होते. मे महिन्यात श्रीजींचा सगरोळी दौरा ठरत असतानाच सगरोळीचे अनन्य प्रभुभक्त श्री. देविदास देशमुख (देसाई) दादांनी प्रणिलभाऊ, तुम्ही श्रीजींच्या दौऱ्यादरम्यान सगरोळीला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले. एक वेळ पंचपक्वान्नाचे भोजन नाकारता येईल, पण प्रभुभक्तांच्या विनंतीला नाही म्हणणे, फार अवघड काम असते, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्रीजी आपल्या प्रवचनातून नेहमी म्हणतात की, आपण ज्या वस्तूचे सतत चिंतन करतो, एक ना एक दिवस आपण त्याचेच स्वरूप होऊन जातो. भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीदावली आपल्या कंठामध्ये अखंड मिरवीत असलेले अनेक अनेक प्रभुभक्त जणू प्रभुस्वरूपच झालेले असतात आणि अशा अभिमानी भक्तांकरवी श्रीप्रभुच जणू काही आपल्याला पालवत असतो. “ही सर्व केवळ त्या प्रभुचीच इच्छा”, असे समजून दादांना त्वरित होकार कळवला. मंगळवार दिनांक १८ जुलै ते शुक्रवार दिनांक २१ जुलै दरम्यान श्रीजींचा सगरोळी-करडखेड दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यासाठी १५ जुलै, शनिवारीच माणिकनगरमध्ये दाखल झालो.‌ सोमवारी सोमवती अमावस्येला शंकराचाच अवतार असलेल्या श्री माणिकप्रभुंच्या संजीवनी समाधीचे दर्शन आणि सेवेची संधी मिळाली. श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. श्रीगुरु आज जणू मेघ बनूनच बरसत होता. गुरुकृपेच्या ह्या वर्षावात असे चिंब भिजणे अत्यंत आनंददायी असते. पावसामुळे बाहेर थंडावा होता आणि समोर मनसोक्त घडत असलेले श्रीप्रभुदर्शन अंतरास शितलता प्रदान करत होत होतं. श्री प्रभुमंदिरातील रात्रीच्या भजनानंतर सगरोळीच्या दौऱ्याची तयारी करुन समाधानाने निद्रादेवीच्या कुशीत विसावलो.

क्रमशः

पुनः प्रत्ययाचा आनंद

दि.१८-जुलै-२०२३ सायंकाळ पासून ते २१ च्या दुपार पर्यंत (अधिक श्रावण शुद्ध ०१,शके १९४५ ते अधिक श्रावण शुद्ध ०३) परमपूज्य श्री डॉ.ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांचा सगरोळी दौरा संपन्न झाला.

त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बहूप्रतिक्षित असलेल्या वरून राजानेहि सर्व शक्तीनिशी आपल्या आगमनाने सर्व शेती-तळे,मळ्यात पाणीच पाणी भरून टाकले. आणि श्रीजींच्या आगमनात उल्हसित झालेल्या सर्व भक्तांचे तोंडचे पाणी पळाले पण श्री प्रभु कृपेची  अशी किमया कि,”नेमकी भव्य शोभा यात्रा म्हणा-घरोघरीच्या दिवस भरातील पाद्यपूजा म्हणा-त्यावेळी नेमके पावसाने अशक्य वाटणारी उसंत घेतली.गूगल वरचे सारे अंदाज तेवढ्या वेळा पुर्ते फोल ठरविले.” जणू काही श्रीकृष्णाने सहज लीलल्या गोवर्धन पर्वत उचलून धरून कोसळणाऱ्या पावसापासून भक्तांचे रक्षण केले.या पुराण कथेचा पुनःप्रत्यय-प्रचीती आली ही प्रभूचीच कृपा म्हणावी.

दुसरे वैशिट्य म्हणजे-श्री.गंगाधर सावकार शक्करवार ह्यांनी प्रवचनोत्तर महाप्रसादाची व्यवस्था श्री माणिक प्रभु मंदिरा शेजारीच केली होती.अपेक्षे पेक्षा ज्यादा लोक प्रवचनाला जमले होते.शेवटी शेवटी शिजविलेले अन्न कमी पडेल कि काय अशी दाट-साधार काळजी वाटू लागली.भक्तांची रांग तर खूप मोठी होती,आता काय करावे हि चिंता संबंधित कार्यकर्त्यांना भेडसावू लागली.भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले. नव्याने ज्यादा शिजवायला वेळही नव्हता.वेळ रात्री साडेआठ-नवूची होती.वरून पावसाची रिमझिम चालू झालेली.आता आहे तेवढे तरी वाढून टाकू असा विचार करत असताना इकडे लोक रांगेने येतच होते, तस तसे ते रिकामे होवू दिसणारे पातेले व त्यातील तळ गाठणारे अन्न-परातीत भरून नेवू देतच होते.शेवटी अश्यक्य वाटत असताना सर्वांनी मनसोक्त प्रसाद घेतला. हे कथन सर्व कार्यकर्त्यांनी जसेच्या तसे कथन केले.या वेळी अक्षरशः पांडवांच्या वनवासातील द्रौपतीच्या सत्व परीक्षेच्या वेळचे किंवा अलीकडच्या काळातील श्रीगुरु चरित्रातील श्री नरसिंह स्वामिंच्या कृपेने एका दरिद्री आयाचित वृतीच्या ब्राम्हणाच्या समाराधना प्रसंगाची किंवा श्री माणिक  चरितामृतातील- भालकी वनातील  माधूकरी मागून आणलेल्या अन्नाचे चार सहस्त्र लोकांना अन्न दानाच्या प्रसंगाची,किंवा दत्त जयंती उत्सवात अचानक वाढलेल्या भक्तांना वाढण्यासाठी तयार केलेल्या पुरणपोळ्या- पुरण-पुराणाच्या-कथेची आठवण होते. ही प्रभु कृपेची प्रचीती देते नाही तर काय?

त्या नंतर ठरलेल्या पाद्य पूजा हि व्यवस्थित झाल्या. श्रीजींची तबियत मध्येचे बिघडली.घरी बोलावून श्रीजींना पाद्य पूजा करणाऱ्यांची संख्या  व हाती असेलेला मर्यादित वेळ व वरून पावसाचा लपंडाव यांचे व्यस्त प्रमाण होते.त्यातच बाहेर गावाहून ऐन वेळी आलेली दर्शनार्थ भक्त मंडळी- अधिकमासाचे वाण देणारे-ऐनवेळी अति उत्साही पाद्यपूजा करतो म्हणणारे हया सर्वांची विनंती व कोणाची नाराजी नको म्हणून सर्वाना सामवून घेणे याचे गणित सोडवणे अशक्य वाटत असताना अगदी लोण्यातून अलगदपणे केस काढावा-तसे सर्व सुरळीत,वेळेत,व व्यवस्थित झाले.श्री सद्गुरू साईबाबांनी म्हटल्या प्रमाणे “श्रद्धा व सबुरी “ याचा  प्रत्यक्ष प्रत्यय आला ही देखील प्रभूचीच कृपा म्हणावी.

शेवटी दि.२१ ला सकाळी संस्थेत सर्व कार्यकर्त्यांना संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने मार्गदर्शन पर दिलेले आशीर्वचन म्हणजे सर्वांवर कळसच होता.संस्थेचे नाव-“संस्कृती संवर्धन मंडळ”-संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयाचे नाव कर्मयोग –त्याचा खरा मतितार्थ,कार्यकर्त्यांनकडून होणारी त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी,श्री प्रभु कृपेचा अर्थ या सर्वांचा रोजच्या जीवनातील चालती बोलती उदाहरणे देत,श्रीजीनी आम्हाला पटवून दिले व आम्हाला ते पटलेही.अर्थात प्रत्यक्ष उदाहरण,शंका निरसनात टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद हेच दर्शविते कि-श्री प्रभु कृपा म्हणजे काय चीज आहे. श्री प्रभूंच्या कृपेनेच ,या कामी ,सर्व गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले,तसेच संस्थेच्या विकास कामात वेग आला. संस्थेचे सर्व कार्यकर्तेही आपले घरचे काम समजूनच संस्थेत काम करतात ,ही खूप मोठी जमेची बाब आहे.

शेवटी शंका निरसनात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली समर्पक-समयोचित-तत्काल (हजर जबाबी )व बिनतोड उत्तरे म्हणजे-CID हया जुन्या हिंदी सिनेमातील बडाही CID है.वो नीली छत्रीवाला | हर तालेकी चाबी रखे-हर चाबी का ताला !! हया गाण्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

दर वेळी गीता-वेदोपनिषदातील त्यांनी केलेली विधाने,उधृत केलेले श्लोक हे त्यांच्या विद्वतेची प्रचीती देतातच पण त्याच बरोबर वेदोपनिषदे-गीता ह्यातील श्लोक  व श्री प्रभूंची शिकवण यातील साम्य व महत्व सहज सांगून जातात.जणू प्रभूंची तत्वे व गीता वेदोपनिषद हे एकच आहेत ज्या प्रमाणे वस्त्र व धागे दोरे वेगळे समजू शकत नाही किंवा बर्फातील पाणी व बर्फ वेगळे करता येत नाही किंवा सूर्य व प्रकाश वेगळा करता येत नाही.हे सूर्य प्रकाशा इतकेच स्वच्छ आहे.म्हणूनच म्हणतात गुरु साक्षात परब्रम्ह .

कर्मयोग संबंधात त्यांचे आशीर्वचन ऐकून मला बाबांची आठवण झाली.बाबा (आमचे वडील )एकदा असेच मला म्हणाले होते कि भरपूर शेत जमीन व भला मोठा वाडा परमेश्वराने आपणाला दिला आहे.तो चैनीत,आरामात बसून खाण्यासाठी नसून ज्या गावात,ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही आपण देणे लागतो म्हणून त्यांची सदैव सेवा करत रहावी.

आणि  अश्याच एका संकट प्रसंगी म्हणाले होते कि अंबामाय व श्री माणिकप्रभु ह्यांच्या शिवाय आपणाला कोण आहे.आमच्या कुटुंबावर अनेक सामाजिक,राजकीय ,कौटुंबिक संकटे आली, तरी पण श्री प्रभु कृपेनेच आम्ही तरलो,उभारलो आहोत,ह्याचीही प्रचीती वारंवार येते.पण काही वेळी आमचे मन भरकटत जाते.या सर्वांची जाणीव श्रीजींनी आम्हाला आपल्या आशीर्वचनातून करून दिली.त्यांची ती कृपा आमचे वर अशीच राहो,ती वृद्धींगत होवो हि श्री प्रभु चरणी प्रार्थना .

असा आहे श्री प्रभूंच्या कृपेचा पुनःप्रत्ययाचा आनंद….!!!

घडो निरंतर श्री गुरु सेवा

गुरु ही पार लगावे नैया
गुरु ही भवसागर खेवैया!
गुरु चरन में शीश नवाऊँ
गुरु बिन ज्ञान कहाँ मैं पाऊँ|

गुरु पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या चरणी अनंत कोटि नमन तसेच त्यांस अनेकानेक सुमंगल शुभेच्छा????????

खरे पाहता ज्याच्या सन्मानार्थ एखादा दिवस विशेष साजरा होतो, त्या व्यक्तिस त्या दिवशी भेट दिली जाते. परंतु सद्गुरुच कर्ता करविता दाता त्राता आहे अशी दृढ श्रद्धा असलेल्या आम्ही भक्तांनी श्री महाराजांस भेट तरी काय द्यावी? उलट पक्षी आजच्या ही दिवशी आमचे हात पसरलेलेच!

तरी परंतु श्रीजींच्या प्रति असलेले सादर प्रेम मात्र आज व्यक्त केल्यावाचुन रहावत नाही. ही भावसुमनांची भेट त्यांनी गोड मानून घ्यावी.

अर्थात ह्या काव्यातही मागणेच आहे. परंतु “परमेश्वराकडे काय मागावे” ह्या विषयी श्रीजींकडून मिळालेल्या धड्याचा अभ्यास करायचा प्रयत्न सतत चालू असतो. त्या अनुषंगाने ह्या काव्यात गुरुची सेवा याचिली आहे.
श्रीजींकडून वारंवार लाभलेल्या ज्ञानामृतातून गुरुसेवेचा जो अर्थ मला उमगला, त्यानुसार गुरुसेवा ही दोन मुख्य वर्गात विभागता येईल असे मी समजते – एक म्हणजे गुरूने जे कार्य अंगी घेतले, त्या कार्यामधे तन-मन-धन लावून सहभागी होणे व अलीकडेच एका प्रवचनात महाराजांनी आणखी एक व्याख्या सांगितली, ती म्हणजे गुरुवचनाप्रमाणे, गुरु आज्ञेप्रमाणे, गुरूच्या अपेक्षेप्रमाणे आचरण करणे.
अशा प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुसेवा मज अल्पशक्ति-अल्पमती कडून श्री प्रभु निरंतर करवून घेवो व त्या योगेच चारही मुक्तिंची अनुभूति होवो हीच आजच्या परम पावन प्रसंगी प्रभुचरणी प्रार्थना ????????

श्री सद्गृरु मार्तंड प्रभुंच्या शब्दात सांगायचे तर
“सेवक हा तुमचा हो प्रिय
बोला मुखे अमुचा हो प्रिय
ज्ञानरूप मार्तांड स्वरूपी
अभेद मती जडू द्या।
सेवा ही घडू द्या।।”

ह्याच आशयाचे हे छोटेसे काव्य श्रीजींच्या सुमंगल चरणी सादर सप्रेम समर्पित

घडो निरंतर श्री गुरु सेवा।
इतुके मजसी देई देवा।।

ज्या ठायी मम वसे सद्गुरु
वारी पावो तेथ निरंतरु
लाभो “सालोक्याचा” ठेवा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

स्थान मिळावे सद्गुरु चरणी
तन-मन-धन पडो गुरु सत्करणी
“सामीप्याचा” ऱ्हास न व्हावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

सद्गुरु वचनी अविचल श्रद्धा
अभ्यासे ढळो षड-वैरी बाधा
शीघ्रच मग “सारूप्य” पावावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।

सद्गुरु मज माय बाप भ्राता
सद्गुरु दाता सद्गुरु त्राता
द्वैत परी हा, तो ही निरसावा
“सायुज्याचा” योग घडावा
इतुके मजसि देई देवा।
घडो निरंतर श्री गुरु सेवा।।