समुद्राचे कुतूहल असणाऱ्या बालकाला येणाऱ्या प्रत्येक लाटेचे अप्रूप वाटते. प्रत्येक लाटेत पाणी तेच पण नजाकत वेगळी. सामान्य समुद्राची जर अशी आगळीक तर ज्ञानसागरास भरती येते तेव्हा पाठोपाठ चार लाटांचे रसपान होते.परम आदरणीय, प्रातःस्मरणीय प.पू. श्री ज्ञानराज माणिक प्रभू रुपी ज्ञानसागराने आमची पात्रे भरली गेली. चिंतनास प्रवृत्त झाली.

सगळे प्रभूने हिरावले, देहवासना हिरावली, आता सुख दुःखाच्या लाटांची काय तमा? अशी प्रभूने कृपाच केली सांगणारे प्रभूने मेरा सबकुछ छिना हे पहिल्या लाटेचे गाणे .ज्ञान नही अब कुछ करनेको यातील श्लेष चिंतनीय ठरला.त्यात न्हाऊन निघालो तोच सत्य एकच असते हे सूत्र जहाँ मै अडा हू द्वारे चपखल पटवून दिले. करो दस्तखत मै कोरी वही हू यातील समर्थता अगस्तिनच्या आचमनाची आठवण देऊन गेली.याही लाटेचा आस्वाद घेतला. मननाची डुबकी मारली. तोवर अजून एक लाट आली. अति सुंदर अशी ती लाट!! ती लाट म्हणाली,नाम आणि रुपात अडकेल तो प्रभू नाहीच. प्रभू तर त्याच्याही अतीत आहे. पण ते ज्ञान होण्यासाठी नाम हे साधन आहे . नाम जिसका है न कुछ ने नवा आयाम दिला. उत्तरोत्तर उपनिषदांकडे कूच करताना ज्याची सर्वांना जिज्ञासा असते ते ब्रह्म कुठे पाहायला मिळेल का? याचे उत्तर वही है ब्रह्म उसे पहचान मध्ये विस्तृत सांगितले, एका अर्थी ब्रह्मदर्शन च घडवून दिले.

काय म्हणावे या रचनांना? माणिकनगरी असलेल्या ज्ञानसूर्याबद्दल काही लिहिणे किंवा बोलणे म्हणजे शब्दांचा केवळ धडपडाट!! ती कृत्रिमता टाळून दोन हात आणि एक शीर लवून नतमस्तक होणे यातच खरी धन्यता वाटते.
प.पू. महाराजांच्या वाणीतून येणारे प्रत्येक अक्षर आम्हास मौल्यवान आहे हे मात्र खरे. त्याचा लाभ सर्वांना सदा सर्वदा होवो ही माणिक प्रभूंच्या चरणी नम्र विनंती.

[social_warfare]