by Avita Kulkarni | Aug 18, 2026 | Uncategorized

‘आटपाट नगर होतं.तेथे एक सत्शील गरीब ब्राह्मण रहात होता’…अश्या श्रावण कथांमधून मोठे झालेले आम्ही, व्रत महिमा मंडीतकारी होतो.
काळ बराच मागे निघून गेला तसा रूपया बरोबर मूल्यांचे ही अवमूल्यन झालेले पहात आलो आपण. मग ती वैचारिक भेसळ असो किंवा खाद्यपदार्थांची! आजही तुकारामांचा कळस क्रमप्राप्त आहेच.लढा दिल्याशिवाय सोन्यालाही झाक येत नाही हे तंतोतंत खरे आहे.
आज गुरुगंगा नदीवर झालेले प्रदूषित आक्रमण कोणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यासाठी सजग असणारे आदरणीय श्री आनंदराज महाराज आणि आदरणीय श्री चैतन्यराज महाराज यांच्या सशक्त नेतृत्वाखाली भव्य लोकसमूह एकत्रित झालेला पाहिला. दोन्ही सन्मानियांची देहबोली रोखठोक असली तरी दोन परस्पर विरुद्ध गुणांचा कमाल मिलाफ आढळला.भाषेतला अत्यंत संयम पण तेवढीच दमदार तडफ. दुर्मिळ संगम! आज पुनश्च एका दासबोधातील ओवीचे दर्शन घडले.
हे धकाधकीची कामे।तिक्ष्ण बुद्धीची वर्मे।भोळ्या भावार्थे संभ्रमे।कैसे घडे।।19.7.19।।
केवळ भोळी श्रद्धा ठेवून कामं होत नाहीत, तिक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखुन करणे अपेक्षित असते त्याचा प्रत्यय या उठावातून जाणवला.
काही शतकांपूर्वी प्रभूंनी नेटका सामना करण्यासाठी दंड अभिमंत्रित करून दिले होते. ते दंड आजही या सशक्त नेतृत्वाच्या हाती आहेत– माईकच्या स्वरूपात, जनजागृतीच्या स्वरूपात. आजही प्रभूच या उभयतांच्या स्वरूपात ठाम उभे आहेत निःशंक!! श्रीजींचा अभय वरदहस्त आहेच. आपल्या या कार्यास अनेक शुभेच्छा.
by Avita Kulkarni | Dec 22, 2022 | Uncategorized

आज श्री मार्तंड माणिकप्रभु जयंती. महाराष्ट्रात जन्माला येऊन श्री समर्थ रामदासांना शरण न जाणे जसे दुर्भाग्याचे लक्षण तसे कर्नाटकात पाऊल ठेवूनही माणिकनगर विषयी अनभिज्ञ राहण्यासारखे दुसरे दुःख नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जशी वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी डवरलेली असते तशीच माणिकनगरी श्रीजींच्या नित्य चैतन्याने भारलेली असते.
श्री शंकर महाराज आणि श्री मार्तंड माणिक प्रभू या द्वय विभूतींची संमिलीत एक कथा पूर्वीच वाचनात आली आणि तेव्हा पासून श्री मार्तंड माणिकप्रभूंविषयी, त्यांच्या अधिकाराविषयी अत्यंत आदर आणि जिव्हाळा वाटू लागला. त्यांच्या अनेक लीला ऐकून, वाचून मन थक्कच होते असे नाही तर नतमस्तक होते.
अशी वदंता आहे की श्रीक्षेत्र काशीत चुकून कोणालाही धक्का लागावा आणि तो ph.d असावा, तात्पर्य – तेथे अनेक विद्वान आहेत.आमच्या माणिक नगरीत तर या उलट आहे. Ph.d. प्राप्त करायला माणसाला काही वर्षे घालवावी लागतात. माणिकनगरात तर, ” गाव का बच्चा बच्चा वेदांती” असतो. श्री माणिक प्रभूंपासून आजच्या श्रीजीं पर्यंत सर्वांनी आपल्या प्रवचनातून जनमानसावर असे संस्कार केले आहेत. बाळ जन्मतः च वेदांत श्रवण करतं. आनंदाचं बाळकडू घेऊनच मोठं होतं.
समाधान ही येथील इस्टेट आहे. ती तेथून कितीही न्या , मूळ साठा रिकामाच होत नाही. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…. सारखे भरून शिल्लक राहिले आहे आणि याची साक्ष खुद्द श्रीजीं, श्री मार्तंड माणिक प्रभूच देतात.ज्या समाधीवर गुलाबाची चार फुले चार अक्षर रुपी आशीर्वादाची असतात* त्या भूमीच्या प्रत्येक रजकणात आशीर्वाद नसेलच कसा?
अंतत: एवढेच म्हणेन, श्री प्रभूंपासून आजच्या प्रेमळ, विद्वान, updated श्रीजीं पर्यंत सर्वांबद्द्ल आम्हा भक्तांच्या हृदयात अत्यंत प्रेम आहे. ते शब्दबद्ध करण्यासाठी माझी लेखणी असमर्थ असली तरी मती मात्र त्यांचे चरणी लीन आहे हे नक्की.
by Avita Kulkarni | Jun 29, 2022 | Marathi

समुद्राचे कुतूहल असणाऱ्या बालकाला येणाऱ्या प्रत्येक लाटेचे अप्रूप वाटते. प्रत्येक लाटेत पाणी तेच पण नजाकत वेगळी. सामान्य समुद्राची जर अशी आगळीक तर ज्ञानसागरास भरती येते तेव्हा पाठोपाठ चार लाटांचे रसपान होते.परम आदरणीय, प्रातःस्मरणीय प.पू. श्री ज्ञानराज माणिक प्रभू रुपी ज्ञानसागराने आमची पात्रे भरली गेली. चिंतनास प्रवृत्त झाली.
सगळे प्रभूने हिरावले, देहवासना हिरावली, आता सुख दुःखाच्या लाटांची काय तमा? अशी प्रभूने कृपाच केली सांगणारे प्रभूने मेरा सबकुछ छिना हे पहिल्या लाटेचे गाणे .ज्ञान नही अब कुछ करनेको यातील श्लेष चिंतनीय ठरला.त्यात न्हाऊन निघालो तोच सत्य एकच असते हे सूत्र जहाँ मै अडा हू द्वारे चपखल पटवून दिले. करो दस्तखत मै कोरी वही हू यातील समर्थता अगस्तिनच्या आचमनाची आठवण देऊन गेली.याही लाटेचा आस्वाद घेतला. मननाची डुबकी मारली. तोवर अजून एक लाट आली. अति सुंदर अशी ती लाट!! ती लाट म्हणाली,नाम आणि रुपात अडकेल तो प्रभू नाहीच. प्रभू तर त्याच्याही अतीत आहे. पण ते ज्ञान होण्यासाठी नाम हे साधन आहे . नाम जिसका है न कुछ ने नवा आयाम दिला. उत्तरोत्तर उपनिषदांकडे कूच करताना ज्याची सर्वांना जिज्ञासा असते ते ब्रह्म कुठे पाहायला मिळेल का? याचे उत्तर वही है ब्रह्म उसे पहचान मध्ये विस्तृत सांगितले, एका अर्थी ब्रह्मदर्शन च घडवून दिले.
काय म्हणावे या रचनांना? माणिकनगरी असलेल्या ज्ञानसूर्याबद्दल काही लिहिणे किंवा बोलणे म्हणजे शब्दांचा केवळ धडपडाट!! ती कृत्रिमता टाळून दोन हात आणि एक शीर लवून नतमस्तक होणे यातच खरी धन्यता वाटते.
प.पू. महाराजांच्या वाणीतून येणारे प्रत्येक अक्षर आम्हास मौल्यवान आहे हे मात्र खरे. त्याचा लाभ सर्वांना सदा सर्वदा होवो ही माणिक प्रभूंच्या चरणी नम्र विनंती.
by Avita Kulkarni | Sep 28, 2021 | Marathi

परम आदरणीय श्री ज्ञानराज महाराज लिखित येई चेतन सांबा हे पुस्तक प्राप्त झाले. या पुस्तकात महाराजांनी श्री मार्तंड माणिकप्रभूंनी रचलेल्या येई चेतन सांबा या पदाची सारगर्भित व्याख्या केली आहे. उपाशीपोटी जसे अधाशीपणाने अन्न सेवन केले जाते तद्वत लगबगीने पण काळजीपूर्वक या पुस्काची 15 पाने वाचली. मार्तंड माणिक प्रभूंनी लिहिलेल्या या पदाच्या अर्थाबद्दल नितांत उत्सुकता होती. गहन अर्थ ही सहजगत्या वाचकांच्या वा श्रोत्यांच्या गळी उतरवण्यात श्री ज्ञानराज महाराजांचा हातखंडा आहे. त्याचा लाभ घेऊन या पुस्तकाचे वाचन चालू होते. गुलाबजाम मध्ये पाक मुरतो तद्वत अंतरंगात अर्थ मुरवण्याचा माझा खटाटोप सुरू होता.
पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.
माझ्यासारख्या अति सामान्य स्त्री ची चटकन टाळी वाजली. म्हटले, ही तर पत्राची post script झाली. मार्तंड माणिक प्रभूंच्या येई चेतन सांबा या पदरुपी पत्राला अनुसरूनच अत्यंत विशेष असलेला ताज कलम म्हणजे श्री ज्ञानराज माणिक प्रभूंचे ‘प्रभू तुम्हारे पदकमल पर।’ मार्तंड माणिक प्रभूंचे लेखन ताज असेल तर ज्ञानराज महाराजांचे लेखन त्या मुगुटातील मध्यभागी शोभणारा दिव्य हिरा आहे. ज्यांनी हा ग्रंथ अजून पर्यंत वाचलेला नाही त्यांना सर्वांना मी हा ग्रंथ वाचण्याची विनंती करते. वेशेषेकरून वेदांतात आवड असणार्यांनी हा पुस्तक जर वाचला तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला नक्कीच एक नवीन दृष्टिकोण लाभेल अशी माझी खात्री आहे.

येई चेतन सांबा – या पदाचा अर्थ इतका गहन आणि गूढ अहे, की महाराजांसारख्या सद्गुरूंकडून हा अर्थ समजून घेतल्या शिवाय आपल्या सारख्या सामान्य लोकांना काहीही समजाणार नाही. या पुस्तकाच्या रूपात महाराजांनी आम्हा सर्वांवर जी महत्कृपा केली आहे त्या साठी आम्ही त्यांचे ॠणी आहोत आणि महाराजांनी असेच आम्हाला आपल्या ॠणात ठेवावे अशी प्रार्थना.
Recent Comments