by Pranil Sawe | Jun 22, 2022 | Uncategorized
दिंडी
भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष आसमंत निनादून टाकत होता आणि त्या मंगल वातावरणात रात्री सव्वा अकराच्या सुमारास श्रीजींनी दिंडीसाठी आपल्या निवासस्थान, नागाई येथून प्रस्थान ठेवले. काठाचे पांढरे शुभ्र धोतर, अंगात पांढराशुभ्र कुर्ता, डोक्यावर असलेली श्री प्रभु गादीची टोपी, आणि हातामध्ये चांदीची सुंदर नक्षीदार काठी अशी श्रीजींची मूर्ती अत्यंत मोहक दिसत होती. श्रीजींच्या चेहऱ्यावर फाकलेले दिव्य तेज सहज टिपता येत होते. पुढे दिवट्या, संबळ, ढोल ताशे, अब्दागिरी घेऊन असलेले भालदार चोपदार, नित्यसवेत असलेला ब्रह्मवृंद, पाठीमागे छत्र घेऊन श्रीजींवर धरून उभा असलेला सेवेकरी, असा श्री संस्थानाला साजेसा थाट श्रीजींच्या प्रस्थानावेळी होता. श्रीजींच्या कुटुंबासह अनेक प्रभुभक्त श्रीजींच्या पाठीमागून मुक्ती मंडपाच्या दिशेने चालत होते. श्रीजींपाठून चालताना आपणही श्री प्रभु परिवाराचाच भाग आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रभुभक्तांच्या सोबत चालताना माझंही मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. अत्यंत त्वरेने भक्तांची ही मांदियाळी मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन उभी ठाकली. मुक्तीमंटप आतून पूर्ण भरला होता, अनेक प्रभुभक्त मुक्तीमंटपाच्या बाहेरील मोकळ्या जागेतही उभे होते. सुदैवाने मला श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीच्या अगदी समोर उभे राहायला जागा मिळाली.
“श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगीमहाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय…” श्री माणिक प्रभुच्या परवलीच्या गगनभेदी ब्रीदावळीने आसमंत दुमदुमून गेला. “नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय”चा मंगल गजर झाला. दिंडी सुरू व्हायच्या आधी दिंडीचे सर्व साहित्य जसे बुक्का, दिंडीच्या पदांचे पुस्तक, सकलमत संप्रदायाचा झेंडा हे श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर ठेवले होते. श्री मार्तंड माणिकप्रभुंनीच आपल्या कारकीर्दीत दिंडीची सन १९०० मध्ये मुहूर्तमेढ रोवली. दिंडीचा हा प्रणेता श्री मार्तड माणिकप्रभु, जो ज्ञानमार्तंड, बोधमार्तंड, चिन्मार्तंड अशा अनेक रूपांमध्ये वर्तत आहे, आज बहुरंगी फुलांचा, दागिन्यांचा साज लेऊन दिंडीचा आनंद लुटायला आलेल्या या लेकरांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी सरसावला होता. श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीप्रमाणेच त्यांच्या नंतरच्या पिठाचार्यांच्या समाधीस सजवण्याची एक विशिष्ट पद्धत श्री माणिकनगरला पाहायला मिळते. समाधीस झालर असलेले उंची वस्त्र, त्यावर सुंदर नक्षीकाम असणारी रेशमी शाल. दोहोंची रंगसंगतीही आपल्या मनाचा चटकन ठाव घेईल अशाप्रकारे अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली असते. समाधीच्या पुढील बाजूस दागदागिने आणि फुलांच्या माळांची नेटकेपणे केलेली मांडणी मन मोहून टाकते. समाधीच्या वरच्या बाजूला फुलांची निमुळती होत जाणारी मुकुटाकार मांडणी, त्यावर खोचलेला शिरपेच जणू सद्गुरुचे सगुण रूपच साकार करते. मुख्यत्वेकरून गुलाब फुलांच्या आणि सुगंधित मोगऱ्याच्या साजामध्ये सकलमत संप्रदायाचा झेंडा आसेतुहिमाचल फडकवणारा हा ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आज मध्यरात्रीही स्वयंतेजाने झळाळत होता. समोर महानैवेद्यासाठी फळफळावळ आणि सुकामेवा ठेवला होता. धुपाचा मंद सुवास मुक्तीमंटपात भरून राहिला होता. धुराच्या त्या वलयांत हा मार्तंडप्रभु समस्त भक्तजनांना आत्मसुखाची अनुभूती द्यायला आज सज्ज झाला होता.

श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” आणि “मार्तंड पराक्रमचंड कीर्ती उद्दंड शमवी पाखंडा, उंचवी प्रभो निज सकलमताचा झेंडा” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. त्याच्यानंतर सर्वांना आरती देऊन झाल्यावर, श्रीजी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर गाभार्या बाहेर उभे राहिले. तेथे श्री प्रभुपरिवारातील सर्व सदस्यांनी श्रीजींना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. श्री प्रभु परिवारातील सदस्यांनंतर इतरही प्रभुभक्त गर्दीतून वाट काढत श्रीजींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रीजींना पुष्पमाळा अर्पण केल्या. श्रीजींनीही आशीर्वाद स्वरूप प्रत्येकावर बुक्का उधळला. अगदी पहिल्या रांगेत असल्यामुळे माझ्याही अंगावर हा बुक्का येऊन पडला. बुक्क्याच्या त्या सुगंधी दरवळीने मन नखशिखांत मोहरून गेले. फिक्कट पिवळसर असलेला हा सुगंधित बुक्का, ज्वारीचे पीठ, भंडार आणि अनेकोत्तम सुगंधी द्रव्यांनी युक्त असतो. हा बुक्का श्री मार्तंड प्रभुंचा प्रसाद असतो. दिंडी दरम्यान सर्व समाधींवर अर्चन म्हणून व सकल भक्तजनांवर प्रसाद रूपाने उधळण्यासाठी हा बुक्का वापरला जातो.
ह्यानंतर सकलमत संप्रदायाची “उपदेश रत्नमाला” आणि तदनंतरची “आर्या” म्हटली गेली. श्रीजींनी पहिली ओळ म्हणावी आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठून म्हणावं, प्रत्येक कडव्यानंतर “श्रीमाणिक, जयमाणिक, हरमाणिक, हरिमाणिक, चिन्माणिक, सन्माणिक, जय जय हो सकतामता विजय हो”चा गजर झांजांच्या किणकिणीत उपस्थित प्रभुभक्तांमध्ये चैतन्य फुंकत होता. श्रीजींच्यासमोर, त्यांना मार्गक्रमण करता येईल अशा रीतीने जागा सोडून दोन्ही बाजूला श्रीप्रभु परिवारा समवेत, गावकरी आणि प्रभुभक्त रांगेत उभे असतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे ही श्री संस्थानाचे परम विशेष आहे. दिंडीच्या सुरुवातीलाच “आत्मा एकची सर्वांतरी हो” हे श्री मार्तंड माणिकप्रभु विरचित पद म्हटले गेले. हातामध्ये झांज, टाळ घेऊन भक्तजन आणि गावातील मंडळी दिंडीच्या भजनानंदात मधून मधून त्या विशिष्ट तालावरती उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. ह्या उड्याही अत्यंत लयबद्ध असतात. स्वतः उपस्थित राहून हे सर्व अनुभवल्याशिवाय त्या आनंदाची अनुभूती येणे केवळ अशक्य आहे. दिंडी अनुभवायची माझी उत्सुकता पाहून श्री आनंदराज प्रभुंनी मला पुढे यायला सांगितले. त्यामुळे दिंडीच्या अगदी शेवटपर्यंत हा सुखसोहळा मला आकंठ अनुभवता आला. “एकची सर्वांतरी हो आत्मा” ह्या पदानंतर दिंडी श्रीमार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीच्या मागच्या बाजूनं श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली. संपूर्ण दिंडीमध्ये प्रभुभक्तांची चाल अत्यंत मंदगतीने होत असते. अखंड प्रभुनामाचा आणि वाद्यांचा गजर आपल्या मनास सतत ताजातवाना ठेवत असतो. ह्याकरिता दिंडीत देह आणि मन बुद्धीने सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.
श्री शंकर माणिक प्रभुंनी त्यांच्या कारकिर्दीत दिंडीला एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली. त्यांचा वेदांत विषयाचा व्यासंग प्रचंड होता. श्री शंकर माणिक प्रभु महाराजांच्या वेदांतविषयक लेखांचा संग्रह “ज्ञानशांकरी” ह्या पुस्तक रूपात उपलब्ध करून श्री संस्थानाने समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. काहीसे अबोल पण वेदान्ताचे पूर्ण अधिकारी असलेले श्री शंकर माणिक प्रभुमहाराज अबोलीच्याच फुलांनी नटले होते. समाधीवरील मोत्यांच्या माळा आणि गुलाबांचे हार चित्त वेधून घेत होते. समाधीवरील माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल अतिशय आकर्षक दिसत होते. येथेही फळांचा आणि सुक्यामेव्याचा नैवेद्य प्रभुस अर्पण केला होता. आळवणी होवून “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या” ही श्री शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. नंतर श्री ज्ञानराज प्रभुंनी नवीनच रचलेली “आरती शंकरगुरुनाथा, सद्गुरू माणिक अवधूता” ही आरतीसुद्धा म्हटली गेली. येथे “किती सुख हे, किती किती सुख हे” हे शाश्वत सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देणारे प्रभुपद म्हटले गेले. भजनानंदात पदागणिक प्रभुभक्तांचे उचंबळणे सुरूच होते. श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीनंतर दिंडी आता मुक्तीमंटपात ह्या दोन्ही पीठाचार्यांच्या समाधींच्या मधोमध असलेल्या श्री चैतन्य लिंगासमोर आली. श्रीजींनी श्री चैतन्यलींगासमोर श्री शंकराची “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” ही आरती केली. त्यानंतर “आता जाऊ चला आम्ही पाहू चला, गुरुराज प्रकट प्रभुराज प्रकट अवधूत आला” हे तनमन स्फुरवणारं पद अत्यंत जोशात म्हटलं गेलं. त्या-त्या पदांचा फलक काठीवर उंच धरला जात होता, त्यामुळे कुठल्याही कोपर्यातून भक्तांना त्या पदाचा आनंद लुटता येत होता. सूर आणि वाद्यांच्या त्या कल्लोळाने आता दिंडीची नशा शरीरामध्ये हळूहळू भिनायला लागली होती. शरीर नकळत पदांच्या तालावर ठेका धरू लागलं होतं. चैतन्याची ही अनुभूती अत्यंत आनंददायी होती. श्रीजींनी उधळलेला बुक्का अधून मधून अंगावर पडत होता आणि त्याच्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या.
मुक्तीमंटपातून दिंडी आता शेजारील नव्यानेच बांधून पूर्ण झालेल्या सिद्धराज मणिकप्रभुंच्या समाधीसमोर दाखल झाली. अत्यंत कनवाळू असलेले, वाचासिद्ध श्री सिद्धराज मणिकप्रभु यांची समाधीसुद्धा रंगबिरंगी अनेकविध फुलांनी छान सजवली होती. समाधीला चोहीकडून केळीचे खांब लावले होते. कागडा आणि अबोलीच्या माळा छतावरून रुळत होत्या. येथेही फळांचा आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य श्री प्रभुला अर्पण केला होता. नव्याने बांधलेल्या ह्या वास्तूचे संगमरवरी बांधकाम अत्यंत रेखीव आहे. रात्रीच्या वेळी एकांतात येथे बसणे मनास अपार शांती देऊन जाते. असो. “जय देव जय देव जय सिद्धराजा, श्रीसिद्ध राजा, आरती ओवाळू तुज सद्गुरुराजा” आणि “आरती सिद्धस्वरूपाची, सनातन सद्गुरुभूपाची” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. तदनंतर श्री सिद्धराज प्रभु नित्य गुणगुणत असलेले आणि मनास उभारी देणारे “प्रभु जवळी असता, असता मग चिंता मज कां?” हे पद म्हटले गेले. आपल्या कारकीर्दीत अनेक भक्त जणांचे कल्याण करणाऱ्या, सर्वांस समदृष्टीने पाहणाऱ्या ह्या कनवाळू महात्म्याचे पद ऐकताना अनेक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माणसे जोडण्याची अद्भुत कला श्री माणिक प्रभुंनंतर प्रत्येक पीठाचार्यने हिरीरीने जोपासली आणि आजही जोपासत आहेत. आज दिंडीत जमलेला अफाट जनसागर हे त्याचेच द्योतक होता. श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या आळवणी नंतर दिंडी आता मुक्ती मंडपाच्या आवारात असलेल्या औदुंबराखाली आली. येथे “अवधूता शरण रिघाल्ये, देहींच ब्रह्मसुख फळलें, किती विस्मय नवल हे झाले, ब्रम्हासी ब्रह्मपण आले” हे अवीट गोडीचं पद म्हटले तेव्हा प्रत्येक जण भजनाच्या आनंदात न्हाऊन निघत होता. सकलमत संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत होता. बुक्क्याची श्रीजींच्या हातून मुक्त हस्ते उधळण होत होती. हा प्रसाद रुपी आशीर्वाद ज्याला मिळत होता तो, कृतार्थतेने अगदी धन्य धन्य होत होता. औदुंबरा खालून उत्तर दरवाजातून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या कैलास मंटपात आली होती.
गाभाऱ्यामध्ये श्री प्रभु आपल्या लेकरांची सुहास्यवदनाने जणू वाटच पाहत होता. श्रीजींनी बुक्का श्री प्रभुसमाधीवर उधळला. तेथे “जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका तव पद मोक्ष आम्हा न स्मरू आणिका”, तसेच “आरती सगुण माणिकाची, स्वरूपी जगत्प्रसुत्याची” ह्या दोन आरत्या अत्यंत उत्साहात म्हटल्या गेल्या. त्यानंतर “नित्य वंदू त्या माणिक पायां” आणि “मनोहरनंदन की जय हो” ही दोन पदे म्हटली गेली. भक्तांचा आनंद आता अगदी टिपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद लुटताना कोणाच्याही ऊर्जेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नव्हती. कैलास मंटपातून दिंडी पुढे आनंद मंटपात आली. येथे “आम्ही चुकलो निजहित कामा, तू चुकू नको आत्मारामा” हे पद म्हटलं गेलं. येथे सर्वांना खडीसाखर आणि लवंग देण्यात आला.
दिंडी आता पुढे आनंद मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या आणि श्रीमाणिकनगरचे आद्यदैवत असलेल्या, श्री सर्वेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. श्रीजींनी श्रीसर्वेश्वराचे दर्शन घेतले. येथे “जय देव जय देव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” आणि श्री वीरभद्राची आरती झाली. श्री सर्वेश्वरासमोर “हा शैव नव्हे मनुजाधम मूढ तो ऐका, मी सांब नव्हे कोण मी धरी जो शंका” हे अंतरी वसलेल्या सांब सदाशिवाची जाणीव करून देणारे पद गायले गेले. येथे श्रीजींनी हाती झांज घेऊन स्वतः वाजविले. उधळत जाणाऱ्या बुक्क्यासह आता प्रत्येक जण हळूहळू पूर्णपणे माणिक रंगात रंगत होता.

दिंडी आता श्री सर्वेश्वर आणि औदुंबर ह्या मधील मोकळ्या जागेत म्हणजेच दक्षिण पटांगणात आली होती. येथे श्री मनोहर माणिकप्रभु विरचित “सख्या माझ्या माणिकाला कोणि तरी दावा” हे करुण रसाने ओतप्रोत भरलेले पद म्हटलं गेलं. दक्षिण पटांगणातून प्रभू मंदिराचा कळस अत्यंत मोहक दिसत होता. रंगबिरंगी विद्युतझोतामुळे रात्रीच्या अंधारात कळसाचा भाग अधिकच नयनरम्य दिसत होता. दक्षिण पटांगणातून दिंडी दोन पावले पुढे चालून औदुंबराखालील श्री अखंडेश्वरासमोर आली. तेथे “श्री जय देव जय देव दत्ता अवधूता” ही श्री दत्तगुरूंची आरती झाली आणि त्यानंतर “मायामलधूत आम्ही अवधूत” हे पद म्हटले गेले. त्यानंतर समोरील मंदिरात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घेऊन दिंडी आता श्री प्रभुसमाधीच्या पाठी असलेल्या श्री मनोहर माणिक प्रभुंच्या समाधी समोर येऊन थांबली. श्री माणिक प्रभुंचा लाडका कुत्रा, “भरोसा”च्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीजी आणि ब्रह्मवृंदाने तळघरामध्ये असलेल्या श्री मनोहर प्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि येथे “जय देव जय देव जय जय गुरुभूपा, आरती ओवाळू तुज सच्चिद्रूपा”, “जयदेव जयदेव मनोहर गुरु स्वामीन्” आणि “आरती सद्गुरु रायाची मनोहरप्रभुच्या पायाची” ह्या तीन आरत्या म्हटल्या गेल्या. त्यानंतर श्री मनोहर प्रभूंनी रचलेले “सखया जावे निजगुरुचरणा शरणा झडकरी” हे दिव्य पद म्हटले गेले. ह्या पदाचं वैशिष्ट्य असं की मुखडा जरी मराठीत असला तरी पहिलं कडवं संस्कृतमध्ये, दुसर कडवं कन्नडमध्ये, तिसरं कडवं हिंदीमध्ये आणि चौथं कडवं मराठीत आहे. चारही कडवी आपण एकाच चालीत म्हणू शकतो. इथे पद म्हणत असताना डोक्यावर छत्र धरलेले श्रीजी मला एक क्षण साईबाबाच वाटले. तीच लकब, तशीच दाढी. योगायोगाने साईबाबा शिर्डीत प्रकटण्याआधी श्री माणिक प्रभुंच्या हयातीत, त्यांच्या दरबारात येऊन श्री प्रभुंकडून अनुग्रह घेऊन गेले होते. झटकन जाऊन श्रीजींना वंदन करून आलो, त्यावेळी बुक्क्याची मूठभर उधळण माझ्यावर झाली. ते सुगंधलेपीत शरीर घेऊन उत्तर पटांगणात श्री मुख्य प्राण मारुतीच्या समोर हजर झालो. येथे लगेचच “नरतनु व्यर्थ गमाई, नही ढूंढा अपना माणिक सांई” हे पद म्हटलं गेलं. श्रीजींचं साईबाबांसमान दिसणं आणि पुढच्या पदातही साई शब्द येणं, ह्या योगायोगा बद्दल मी स्वतःला कृतार्थ समजत होतो.
श्री प्रभु मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून दिंडी आता महाद्वारातून बाहेर पडत होती. महाद्वाराच्या पायऱ्यांवर “श्रुतीधर्म रक्षुनि सकलमताते वंदा” हे पद म्हटलं गेलं. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणातून दिंडी आता जुन्या भंडारखान्यात असलेल्या श्री अन्नपूर्णेश्वरी देवीसमोर आली होती. येथे श्री अन्नपूर्णा देवीची आरती म्हटली गेली आणि त्यानंतर “श्रीदेवी त्रिपुरसुंदरी माय पाव” हे पद म्हटले गेले. श्री अन्नपूर्णेचा जयघोष झाला. श्री अन्नपूर्णा देवीच्या मंदिरापासून भोजन शाळेपर्यंत माझ्या अत्यंत आवडीच्या “कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा” ह्या पदाची गुंज आसमंतात करून राहिली. भोजनशाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्वांना सरबत दिले गेले. दिंडी आता भोजनशाळेत येऊन थांबली. येथे “कोण्या सुकृत दैव हे फळले, गुरुहस्तामृत शिरी पडले, मन माझे वळले, स्वहितगुज कळले” हे पद म्हटले गेले. इथे थोडावेळ बसायला मिळाले. पण कोल खेळणारे मात्र रासक्रीडेचा आनंद लुटत राहिले. सुर आणि वाद्यांचा कल्लोळ, टिपऱ्या घेऊन जलद गतीमध्ये कोल खेळणारे भक्तजन… पहाटेच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारासही भोवतालचं वातावरण भारलेलं होतं. निद्रादेवीचा थोडासाही प्रकोप आज मला जाणवत नव्हता. “चैतन्यदेव” हेच मुख्य दैवत असणाऱ्या सकलमत संप्रदायाच्या पुण्यभूमीत चैतन्याची अनुभूती जागोजागी येत होती. भोजन शाळेतील ह्या भारलेल्या वातावरणात सकलमत संप्रदायाचा झेंडा आज अधिकच डौलाने फडकत होता…
क्रमशः…
by Pranil Sawe | Jun 21, 2022 | Uncategorized
कोलच्या खेळानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीला तयार होण्यासाठी यात्री निवासावर आलो. झटपट स्नान उरकले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा श्रीप्रभु मंदिरात हजर झालो. अनेक प्रभुभक्तांकडून दिंडीची ख्याती ऐकली होती. दिंडीतला एकही क्षण मला नजरेआड करायचा नव्हता. सर्वप्रथम श्रीप्रभु मंदिरात श्री माणिक प्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आज हा भक्तकार्यकल्पद्रुम सार्वभौम श्रीगुरु पूर्ण कलेने नटला होता. चैतन्याची अनुभूती गाभाऱ्यात सुखासनी पहुडलेल्या श्रीप्रभुला पाहून क्षणोक्षणी येत होती. त्या गर्दीतही मनाचा बांध फुटला आणि बसल्याजागीच डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाश्रु म्हणतात कदाचित हेच असावेत… गेल्या आठवडाभरात हा नटनागर दररोज लोभसपणे समोर आला होता. आजही श्रीप्रभुची ती प्रत्येक छबी हृदयामध्ये तशीच कोरलेली आहे. एखाद्याने आपल्या मनाचा ताबा घेणे म्हणजे काय? हे श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होताना कळते. श्रीप्रभु जेव्हा नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो, तेव्हा आपल्या मनाची होणारी भावविभोर अवस्था, चराचरातील श्रीप्रभुचे अनुभवायला येणारे चैतन्य, मनात आलेले क्षुद्रातीक्षुद्र लाडसुद्धा श्रीप्रभुने लडीवाळपणे पुरवणे, असे जेव्हा वारंवार घडते, तेव्हा श्रीप्रभुने नक्कीच आपला हात त्याच्या हातात घेतला आहे, ह्याची जाणीव होते आणि ही जाणीव अत्यंत सुखावह आणि तितकीच आश्वासकही असते.

पूर्ण तेजाने झळाळत असलेल्या श्रीप्रभुचे वर्णन करायला आज कदाचित शब्दही अपुरे पडावेत. सौंदर्य जणू दास बनून श्रीप्रभु चरणी अदबीने, नजाकतीने उभं होतं. रत्नांच्या, मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा गळाभर ऐटीत रुळत होत्या. अबोलीचे नाजूक हार, मोगऱ्याचा सुगंधी हार, पिवळ्या झेंडूचा हार, शेवंतीचा जाडजूड हार आणि गुलाबांच्या अनेक प्रकारच्या भरगच्च हारांमध्ये श्रीप्रभुला सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. श्रीप्रभु समाधीच्या वरच्या बाजूला शेंदरी, पिवळे, लाल, गुलाबी गुलाबांचे गुच्छ श्रीप्रभुच्या रूपाला चारचाँद लावत होते. गुलाबांच्या ह्या तोबा गर्दीमध्येही लाल टपोरा जरबेरा आपलं अस्तित्व दाखवून देत होता. श्रीप्रभु समाधीस अगदी बाहेरच्या बाजूस घातलेल्या भरगच्च गुलाबाच्या हाराला, तगरीच्या फुलांची सुंदर जाळी विणली होती. लाल आणि पांढ–या रंगसंगतीतला तो हार अत्यंत आकर्षक दिसत होता. श्रीप्रभु समाधीभोवती केळी लावल्या होत्या, जणू कर्दळीवनातच श्रीप्रभु आज विहरत होता. श्रीप्रभु समाधीवरील छत्रावरून मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या आणि त्या माळांच्या शेवटी झेंडूची फुले आकर्षकपणे माळली होती. समोरच श्रीप्रभुच्या पादुका दृष्टीस पडत होत्या. बाजूला चांदीच्या समया मंदपणे तेवत होत्या. श्रीप्रभुला पंचपक्वान्नांचा, डाळिंब, चिकू, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, अननस, टरबूज, अंजीर इत्यादी फळांचा नैवेद्य अर्पण केला होता. नैवेद्याच्या भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. चारी बाजूंना समया तेवत होत्या. ह्या सर्व मांदियाळीत समोर पत्रावळीत असलेला भाजी–भाकरीचा नैवेद्य लक्ष वेधून घेत होता. श्री माणिकप्रभु महाराज नेहमी माधुकरीचे अन्न खात. श्री प्रभुंना चटणी–भाकरी खूप आवडायची. श्रीसंस्थानाने ती परंपरा आजतागायत जपली आहे. आजही श्रीप्रभुंना पंचपक्वान्नांचा नैवेद्य असला, तरी मध्यभागी माधुकरीचे भिक्षान्नच असते. असो, सच्चिदानंद दयाघनाच्या ह्या विलोभनीय रूपाला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच बोटे डोक्याला लावून मोडली. तुझा हा आनंद सोहळा मला संपूर्णपणे अनुभवायला मिळू देत, अशी विनंतीवजा प्रार्थना श्रीप्रभुला केली आणि श्रीजींच्या निवासस्थानी नागाई येथे पोहोचलो. ढोल, ताशे, संबळ वाजवणारे श्रीजींच्या निवासस्थानाच्या आवारात उभे होते. भालदार, चोपदार लाल रंगाच्या वेषात मावळ्यांसारखी पगडी घालून अब्दागिरी घेऊन सज्ज झालेले होते. एक सेवेकरी श्रीजींवर धरण्यात येणारी छत्री घेऊन सज्ज होता. अंगणामध्ये जवळपास दहा फूट लांबीची सुस्वागतमची रांगोळी मन वेधून घेत होती. प्रभुभक्त घोळक्याघोळक्याने जमून उभे होते. दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झालेला प्रत्येक जण आता दिंडीसाठी नागाईतून श्रीजींच्या प्रस्थानाचीच वाट पाहत होता.
दिंडी… दिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन पंढरपुरची वारी उभी राहते. वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी व कार्तिकी एकादशीला संतांच्या आणि देवाच्या पालखीपुढे भजन करत व नाचत जातात त्याला दिंडी असे म्हणतात. संस्कृत भाषेत “दिंडि:” आणि “दिण्डिर:” असे शब्द आहेत, आणि या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘एक विशिष्ट प्रकारचे वाद्य‘ असा आहे. त्यामुळे वाद्यांच्या गजरात होणाऱ्या हरिसंकिर्तनास दिंडी म्हणता येईल. इतिहासामध्येही आपल्याला किल्ल्यांच्या दिंडी दरवाज्याचे वर्णन अनेकदा आढळते. मराठीत दिंडी ह्या शब्दाचे लहान दरवाजा आणि पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याला स्वर्गाची दारे उघडावी, या हेतूने वारकरी लोक भजन करतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटचालीला दिंडी हे नाव पडले अशी कल्पना आहे. किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात, त्यावरून दिंडी हे नाव आले असावे, असेही एक मत आहे. भजनी मंडळातील एक जण दिंडी नावाचे वीणेसारख एक वाद्य पुढे वाजवीत जातो व बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी असे म्हणतात. असो. भागवत सप्ताहच्या पारायण पद्धतीत असे नमूद केले गेले आहे की, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी वाजत गाजत भगवंताचे स्मरण करत मिरवणूक काढावी व हरिसंकिर्तन करीत रात्री जागरण करावे. श्री मार्तंड माणिकप्रभुंना रात्री जागरण, हरिसंकीर्तन व मिरवणुकीची ही कल्पना फारच आवडली आणि त्यांनीच ह्या मिरवणुकीला वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे स्वरूप देऊन श्री संस्थानाच्या लौकिकास साजेल, असा कार्यक्रम आखला व त्यास दिंडी हेच नाव दिले.

श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज हे स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आणि प्रत्युत्पन्नमति विद्वान असल्यामुळे दिंडीच्या कार्यक्रमात जागच्याजागी पदे रचून त्यांनी गायल्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. दिंडीच्या कार्यक्रमात श्रीजी स्वस्वरूपाशी इतके तादात्म्य पावत की त्यांना कशाचेही भान उरत नसे. पुढे १९३६ साली श्रीजींच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु महाराज श्रीसंस्थानाचे पुढचे पीठाचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी, अधिक भाद्रपद मासात श्रींच्या मासिक आराधनेस जोडून, आपल्या कारकीर्दीचा प्रथम वेदांत सप्ताह उत्सव साजरा करून, दिंडीच्या भव्य कार्यक्रमाने त्याची सांगता केली. श्री शंकर माणिक प्रभुनींच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास आणि दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली, जी अद्यापही चालू आहे.
पुढे १९३७ सालच्या फाल्गुन महिन्यात श्रीजींच्या प्रथम पुण्यतिथीस असे ठरले की, श्रीजींच्या पुण्यतिथीस जोडून,, प्रतिवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीपासून वेदांत सप्ताह उत्सव श्रीजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जावा. १९३७ ते १९४३ सालापर्यंत हा कार्यक्रम अत्यंत वैभवात साजरा केला गेला. १९४४ साली श्रीमाणिक नगरात प्लेगचा प्रकोप होता. त्यात श्री शंकर माणिकप्रभु महाराज स्वतः उदर व्यथेने आजारी होते. त्यांनी सर्व भक्तांस पत्रे पाठवून कळवले की, यंदा वेदांत सप्ताह होऊ शकणार नाही. योगायोग असा की, वेदांत सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ होत असे त्याच्या दोनच दिवस आधी श्री शंकर माणिकप्रभु महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि म्हणूनच १९४६ सालापासून वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेस प्रारंभ होऊ लागला व चतुर्थीला श्री मार्तंड माणिकप्रभु महाराजांची पुण्यतिथी साजरी होऊन, नवमीस दिंडी असा क्रम प्राप्त झाला, तो आजतागायत चालू आहे.
दिंडीत म्हणावयाच्या पदांची यादी एका फलकावर लिहून ते फलक दिंडीत मिळवण्याची पद्धत श्री शंकर माणिकप्रभु महाराजांनी घालून दिली. भक्तजन फलकावरील पदांचा क्रमांक व पद्यमाला या पुस्तकातील त्या पदांचे पृष्ठ क्रमांक पाहून पद्यमालेच्या आधारे पदे म्हणत असत. बऱ्याच भक्तांकडे पद्यमाला नसते अथवा पदेही मुखोद्गत नसतात, म्हणून दिंडीत भाग घेऊनही त्यांना पदे म्हणता येत नाहीत. काही पदे, आरत्या ह्या सप्ताह भजनाच्या पुस्तकातील असल्यामुळे भक्तांचा बराच वेळ पुस्तकाचे पाने उलटण्यात जातो आणि त्यामुळे एकंदरीतच रसभंग होण्याची पाळी येते. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांनी दिंडीत म्हटल्या जाणाऱ्या पदांची एक क्रमवार पुस्तिका प्रकाशित केली आणि त्याची मांडणी अशी केली की एकदा पुस्तिका हातात धरल्यावर दिंडी संपेपर्यंत पाने शोधण्याची वेळच येऊ नये. त्या अनुषंगाने १९९४ साली “दिंडीची पदे” ही पुस्तिका छापून प्रसिद्ध झाली. आजही दिंडीमध्ये वेळोवेळी म्हटल्या जाणाऱ्या त्या त्या पदांचे फलक उंच धरले जातात, जेणेकरून सर्व भक्तांना ती ती पदे फलक पाहून म्हणता येतात.
मनामध्ये दिंडीच्या इतिहासाची पाने उलगडत असतानाच भक्तकार्य कल्पद्रुमचा जोशपूर्ण जयघोष झाला. जो तो आपापल्या परीने सावध झाला. श्रीजींनी आधी आपल्या निवासस्थानातील देवतांचे दर्शन घेतले. कुलदेवता श्री मल्हारी म्हाळसाकांत व कुलस्वामिनी श्रीनागवेलांबा देवीची आरती म्हटली. नंतर श्रीजींनी मातोश्री मीराबाई साहेबांकडून आशीर्वाद घेतले व मातोश्रींनी श्रीजींना दहीसाखर दिला. मातोश्रींकडून मिळालेल्या भरभरून आशीर्वादानंतर श्रीजी त्यांच्या निवासस्थानातून दिंडीसाठी मुक्तीमंटपात जाण्यासाठी प्रस्थान करते झाले.
क्रमशः…
by Pranil Sawe | Jun 12, 2022 | Marathi
साहेब, चहा आला, ह्या आवाजाने आज सकाळी जाग आली. अत्यंत कर्तव्यतत्पर सेवेकरी, चहा आल्यावर यात्री निवासातील प्रत्येक खोलीत जाऊन रोज वर्दी द्यायचा. झटपट तोंड धुवून चहा प्यायला हजर झालो. आज आणखी काही प्रभुभक्त आपापल्या घरी रवाना होणार होते. सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या. काल पारायण संपले होते आणि श्रीजींच्या वेदांत प्रवचनांचीही सांगता झाली होती. त्यामुळे आज सकाळी काय करावे? हा प्रश्न अनाहुतपणे मनात डोकावला. कालच्या प्रवचनाला थोडेफार ओवीबद्ध केलं आणि मन संगमावर धावू लागलं.
गुरुगंगा आणि विरजा नदीचा संगम. श्री माणिकनगरातलं एक अत्यंत शांत, मन प्रसन्न करणारं ठिकाण. माणिक नगरातील वास्तव्यात मी अनेक तास येथे घालवले आहेत. झटपट स्नान उरकून मी संगमावर आलो. आज अनेक प्रकारचे पक्षी येथे उपस्थित होते. कडूलिंबाच्या झाडावरला मोर, कडूलिंबाच्याच झाडावर दंगामस्ती करणारे अनेक हरेवा, उगाचच इकडून तिकडून उडणारे बुलबुल, गुरु गंगेच्या पात्रात विहीरणारी बदके, वडाच्या झाडावर अत्यंत सावधपणे बसलेले, आणि माझ्या थोड्या हालचालीने ही दुसरीकडे जाऊन बसणारे पांढरे घुबड, संगमाजवळील पाणथळीच्या जागेत असलेला खंड्या, पाण्यात डुबकी मारून मासे टिपण्यात व्यस्त असणाऱ्या टिटव्या, ह्या सर्वांना पाहताना तासभर कधी निघून गेला कळलेच नाही. श्री तात्यामहाराज आणि श्री दादामहाराज ह्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पुष्करणी तीर्थातील पाण्यात वडाचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. हे तीर्थ अत्यंत शोभिवंत असून येथे पाण्यामध्ये पाय सोडून येथील नीरव शांततेचा अनुभव घेणं अतिशय सुखद असतं. पक्ष्यांची किलबिल मनास मोहून टाकत असते, मंद वाहणाऱा वारा वडाच्या पानांशी खेळत असतो आणि त्या मस्तीतच एखादं पान अलगद हेलकावे खात पुष्करणी तीर्थात येऊन विसावतं. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत आनंद ओतप्रोत भरलेला आहे पण तो अनुभवायला आपल्याकडे सवड मात्र हवी. संगमावरून थेट श्री व्यंकम्मामातेच्या मंदिरात गेलो. सकाळी नीरव शांतता होती. सद्गुरु श्रीमाणिक प्रभुंची व्यंकम्मा ही एक निस्सीम शिष्या. आपले संपूर्ण आयुष्य श्री माणिक प्रभुंच्या चरणी अर्पण करून ब्रह्मपदास पोहोचली. श्री प्रभुचरित्रातील श्रीव्यंकम्मा मातेचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळले. ह्या स्थानाला श्रीमाणिकनगरचे शक्तीपीठही म्हणतात. श्री दत्तात्रेयांची मधुमती शामला शक्ती म्हणजेच श्रीदेवी व्यंकम्मा… लेकराने जसे आपल्या आईच्या कुशीत घुटमळत राहावे तसे मंदिरात घुटमळलो. ह्या मंदिराचे बांधकाम ही अतिशय सुबक आहे. येथेही माझे मन छान रमते. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून निघून बाजूला असलेल्या श्री मारुतीरायाला भेटलो. श्री प्रभुमंदिरात येऊन श्रीप्रभु समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागाई (श्रीजींचे निवासस्थान) येथे श्रीजींची नित्यपूजा पाहण्यासाठी आलो.
आज श्री समर्थ रामदास स्वामींचे ११वे वंशज श्री भूषणमहाराज श्रीप्रभु दर्शनार्थ श्रीमाणिकनगरी आले होते. ह्या निमित्ताने सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानाचा, श्री माणिकप्रभु संस्थानाशी अशी असलेला स्नेहसंबंध अनुभवायास मिळाला. श्रीजींच्या नित्य पूजेनंतर आज श्रीनृसिंह निलय येथे सत्संग व उद्बोधनाचा कार्यक्रम होईल असे सांगितले गेले. नित्य पूजेचा तीर्थप्रसाद घेऊन श्री नृसिंह निलयमध्ये जाऊन बसलो. परंपरेप्रमाणे भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. श्रीजींचा नातू चि. प्रज्ञानराज ह्याच्या उपनयन संस्काराच्यावेळी काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री भूषण महाराज आज खास वेळ काढून श्री माणिकनगरला आले होते. श्रीजींनी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्वागत केले. तसेच श्री भूषण महाराजांनीही आपला श्री प्रभुपरिवाराप्रती असलेला स्नेह भेटवस्तू वगैरे देऊन व्यक्त केला. त्यानंतर श्री भूषण महाराजांनी आपले मनोगत अगदी मोजक्या शब्दांत पण अत्यंत संयतपणे व्यक्त केले. श्री भूषण महाराजांना ऐकणे ही कानाला एक मेजवानीच होती. योगायोग असा की श्री भूषण महाराजांच्या मनोगताचे सार हे श्रीजींनी प्रवचन सप्ताहात केलेल्या विवेचनाचेच सार होते. दोन्ही तत्त्वांत एकवाक्यता होती. “सर्व रूपे हा श्री प्रभु जाण” ह्या उक्तीची प्रचीती वारंवार मिळत होती. श्रीजींनी सुरुवातीलाच सांगितले होते की, मी श्री भूषण महाराजांचे स्वागत करणार नाही, कारण श्री समर्थ रामदासांची पूर्वज हे बिदर येथीलच होते त्यामुळे माणिक नगर हे त्यांचेच घर आहे. ही नवीन माहिती श्रीजींकडून ऐकायला मिळाली. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांतूनही दासबोधाची शिकवण डोकावत राहते किंवा शनिवारच्या सप्ताह भजनामध्ये ही रामदास स्वामींचे पद ऐकायला मिळते. दोन संस्थानात मधील असलेले सामंजस्य आणि स्नेहभाव पाहून मन कृतार्थतेचा अनुभव करत होतं.
काल माणिक क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक म्हणून नाव दिलं होतं. महाप्रसादानंतर माणिक क्वीझमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी जमण्यास सांगण्यात आले होते. महाप्रसादानंतर सर्व स्पर्धक श्रीजींच्या घरी जमले होते. सात जोड्या मिळून एकंदरीत १४ जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे स्वरूप काय, स्पर्धेचे नियम काय? कोणकोणत्या टप्प्यात स्पर्धार्धा कशी पार पडेल? ह्याचे सर्व स्पष्टीकरण श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. साडेसहा वाजता स्पर्धा सुरु होणार होती. तोवर तीन तासांमध्ये काय वाचू आणि काय नको असे झाले होते. आज रात्री ह्या वेदांचा सप्ताहाचे आकर्षण असणारी दिंडीही होती. श्री माणिकनगरच्या सर्वच मंदिरांमध्ये, मुक्तीमंटपात, गावात व श्रीजींच्या निवासस्थानी दिंडीची जय्यत तयारी चालली होती. संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या ह्या दिंडी करता थोडा आराम करावा की स्पर्धेची तयारी करावी ह्या संभ्रमात असतानाच श्री प्रभु समर्थ म्हणून स्पर्धेच्या तयारीला लागलो.

माणिक क्विझ… आपण श्री माणिक प्रभु व त्यांच्यानंतरचे पीठाचार्य, तसेच श्री माणिकप्रभु संस्थान आणि त्यांचे उपक्रम, कार्य ह्याबाबत किती जाणतो, ह्याबद्दलची खेळाखेळातून साकारलेली प्रश्नमंजुषा. संध्याकाळी साडेसहा वाजता श्री प्रभुमंदिराच्या पटांगणात माणिक क्विझला सुरुवात झाली. समोरचे पटांगण प्रभुभक्तांनी अगदी फुलून गेले होते. रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अशा सात टीम्स यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. पहिल्या फेरीमध्ये चार भाग होते आणि त्यातून मिळालेल्या गुणांच्या आधारावर पहिल्या चार जोड्या अंतिम फेरीत प्रवेश करणार होत्या. पहिल्या फेरीत श्री प्रभुचरित्रामधील बारकाव्यांबद्दल प्रश्न होते. आपण श्रीप्रभुचरित्र केवळ वाचतो की अगदी समरसून वाचतो? त्यावर मनन चिंतन करतो का? आपण त्याचे पारायण करतो का? आणि पारायण करून श्री प्रभु आपल्याला किती समजले? ह्याचा एक सुंदर परिपाठ श्री माणिक क्विझ घालून देते. त्यानंतर श्रीप्रभुपदे, पीठाचार्यांचे दौरे, श्री प्रभुमंदिर परिसरातील वेगवेगळ्या चिन्हांचे चित्र आणि व्हिडीओ दाखवून त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. श्री प्रभु संस्थानाचे कार्य ह्याबाबतीत आपल्याला किती माहिती आहे? आपण श्री संस्थानाशी किती आत्मीयतेने जोडले गेले आहोत? याचीसुद्धा जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून आपल्याला होत असते. प्रश्नमंजुषेदरम्यान प्रेक्षकांनाही प्रश्न विचारले जायचे किंवा स्पर्धकांना न देता आलेले प्रश्न प्रेक्षकांना विचारले जायचे. बरोबर उत्तर देणार याला चॉकलेट बक्षीस मिळाले. दोन फेऱ्यांमध्ये श्री माणिकप्रभु संस्थानच्या पिठाच्यार्यांच्या लीला आणि त्यांचे सामाजिक कार्य यांचे माहितीपर लघुपट दाखवले जायचे. स्पर्धकांना प्रत्येक फेरीमध्ये उत्तरासाठी त्यांना दहा सेकंदाचा वेळ दिला जायचा. एखाद्या स्पर्धकाला जर त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या स्पर्धक आकडे अग्रेषित केला जायचा. त्याचे अधिकचे गुण त्या त्या जोडीला मिळायचे. पहिल्या फेरीअखेर आमची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीसाठी ही पहिल्या फेरी प्रमाणेच प्रश्न विचारण्यात आले.
अंतिम फेरीत गुणांनुसार आमच्या शुक्र जोडीला द्वितीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकातली माझ्या वाट्याची रक्कम एक रुपया प्रसादरुपी घेऊन बाकीची अन्नदानासाठी देऊनही टाकली. ज्ञान आणि खेळाचा सुंदर संगम ह्या माणिक क्विझमध्ये पाहायला मिळतो. गुरुगंगा आणि विरजेचा संगम, श्री माणिक प्रभू संस्थान म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा संगम, माणिक क्विज म्हणजे ज्ञान आणि खेळाचा संगम, श्री प्रभुचा आणि आपला संगम, मन आणि बुद्धीचा संगम, आपल्या मनातील द्वैत भावनेचा संगम होऊन, ऐक्य भावनेची नदी सकलमत संप्रदायाच्या अंगीकराने खळखळ वाहू लागते आणि सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुच दिसू लागतो. श्री माणिकप्रभु संस्थानाने खेळांना नेहमीच प्राधान्य दिलेले आहे व आजही देत आहेत. श्री माणिकप्रभु संस्थानचे पीठाचार्य वेळोवेळी आपल्याला स्वतः खेळांमध्ये रमलेले दिसतात. समाजात, मानवांत खेळभावना आणि अंगी खिलाडूवृत्ती जोपासण्याचे महत्वाचे कार्य श्री संस्थांकडून अविरतपणे जपले जाते. ह्या माणिक क्विझच्या निमित्ताने आपण श्रीप्रभुला किती जाणतो आणि आपल्याला आणखी अध्ययनाची किती आवश्यकता आहे? याची जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून झाली. सुमारे तीन सव्वातीन तास हा खेळ रंगला. त्यानंतर श्रीजी यांच्या घरी भक्त कार्य झाले. भक्तकार्यानंतर कोल खेळला गेला. श्री माणिकनगरच्या आबालवृद्धांसहित सर्वच लोक (विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीसुद्धा) आजच्या, दिंडीच्या दिवशीच्या कोलसाठी आवर्जून हजर असतात. पूर्वी हा खेळ आनंदमंटपात खेळला जायचा, पण वाढत्या संख्येमुळे श्री प्रभुमंदिर पटांगणात खेळला जाऊ लागला. कोलनंतर गोप व फुगडी इ. सुद्धा असते. श्री माणिकनगरचे अनुभवी व वृद्ध लोकसुद्धा या दिवशी कोल खेळतात. या दिवसाच्या कोलध्ये एक वेगळाच जोश अनुभवायास मिळतो. कोलनंतर ‘नम: पार्वतीपतये’ च्या जयघोषात समाप्ती झाली. मन आनंद सागराच्या लहरींवर उचंबळत होते. आणि आता प्रतीक्षा होती ती, ज्याचे वर्णन “नाही स्वर्गी वैकुंठी हे सुख” असे केले आहे ती दिंडी, सदेही अनुभवण्याची…
क्रमशः…
by Pranil Sawe | Jun 4, 2022 | Marathi
आज पहाटे साडेपाचलाच जाग आली. जेमतेम पाच तासही झोप झाली नाही, पण तरीही मन प्रसन्नतेची अनुभूती करत होतं. आज पारायणाचा शेवटचा दिवस होता, श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील प्रवचनाचाही शेवटचा दिवस होता. आज चहाच्या चर्चेदरम्यान जाणवले की, अनेक जणांना परतीचे वेध लागले होते. काहीजण आजच संध्याकाळी निघणार होते तर काहीजण उद्या सकाळी निघणार होते. काही जणांचा बिदरला जायचा बेत ठरला होता. काहीजण दिंडीसाठीही थांबणार होते. गेल्या आठवड्याभरात अनेक प्रभुभक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. कोणीतरी चिवडा, चकल्या खायला बोलवत होते. काहीजण एकमेकांचे पत्ते, मोबाईल नंबर घेण्यात व्यस्त होते. पुढल्या वेळेस कुठे, कधी, कसे भेटावे? त्याचेही नियोजन चालू होते. आज मी सगळ्यांसाठी भरपूर वेळ दिला. स्नान उरकून माणिक विहारमध्ये नाश्ता उरकला आणि श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. आज रस्त्यात साथीला वानरसेना होती. निलगिरीच्या झाडांवर वटवाघळे विराम करत होती. गुरुगंगेच्या पात्रात अनेक बदके विहरत होती. टिटव्या पात्रातल्या झुडूपांमध्ये खाद्य शोधत होत्या. दूरवर आंब्याच्या झाडावर एक मोर बसला होता. एकंदरीत सृष्टीतला प्रत्येक जीव आपापल्या कामात व्यस्त होता. कालाग्नी रुद्र हनुमानाचे दर्शन घेऊन औदुंबराखाली पारायणासाठी पोहोचलो.

आज पारायणाला बसतानाच मन भरून आले होते. श्री राघवदास रामनामे विरचित श्री माणिक चरितामृत इतके रसाळ आणि गोड आहे की, चरित्रनायक श्री माणिकप्रभु कधी आपल्या हृदयाचा ठाव घेतात, ते आपल्यालाही कळत नाही. ह्या चरित्राच्या वाचनानंतरच मी श्री माणिकप्रभुंच्या अंतर्बाह्य प्रेमात पडलो. श्री माणिकप्रभुंच्या लीलांचे वर्णन करताना ग्रंथकार आपल्याला केवळ त्या चमत्कारांमध्येच गुंतवून न ठेवता योग्य तो जीवन उपदेशही देतात. ह्या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना श्री ज्ञानराज माणिकप्रभु पोथीतील आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, मनोकामना पूर्ण होणे म्हणजे काय? मनोकामना पूर्ण करून घेण्यामागे मूळ उद्देश कोणता? मनांत कामनेचा उदय झाला म्हणजे चित्तचांचल्य होऊन एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होते. मनोकामना पूर्ण झाल्यावर ती उद्विग्नता समाप्त होऊन, मन स्वस्थानी उपरम पावते. मनाचे स्वस्वरूपाशी तादात्म्य होताच, आनंदाची अनुभूती मिळते. आपल्याला असे वाटते की, इच्छित वस्तू मिळाल्यामुळे मला आनंद झाला, पण वस्तुस्थिती तशी नाही. कामनेचे शमन झाल्यामुळे आपणांस आनंद होत असतो, कामनेच्या पूर्तीमुळे नव्हे. कुठलीही कामना पूर्ण करण्यासाठी किती खटपटी लटपटी कराव्या लागतात हे सर्वांस विदित आहेच. म्हणून शहाण्यांनी कामना पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडता, आपल्या सर्व कामनांचे शमन होऊन आपण निष्काम कसे होऊ याकडे लक्ष दिले पाहिजे.
श्री माणिक चरित्रामृत म्हणजे चैतन्याचा अखंड वाहणारा झरा किंवा थुई थुई उडणारे आनंदाचे कारंजेच. शिखाचे मुडूप, काशी यात्रेच्या ब्राह्मणाची कथा, फकीराचा लोभ तेलंगणाचा अय्या, बयाम्मामातेचा पोटशूळ अशा अनेक प्रभुलीला अनुभवताना श्रीप्रभुंच्या अवतार समाप्तीचे प्रकरण सुरू होते. दादा महाराज (थोरले बंधू), तात्या महाराज (कनिष्ठ बंधू), देवी बयाम्मा माता (श्री माणिक प्रभुंची आई) आणि देवी व्यंकम्मामाता (श्रीमाणिकप्रभुंची पट्टशिष्या) ह्यांचे निर्वाण अंतःकरण हेलावून टाकते. त्यानंतर श्री माणिकप्रभूंचे धीरोदत्तपणे संजीवन समाधी घेणे हे आपल्याला अंतर्बाह्य गलबलून टाकते. नकळत डोळ्यांतून येणारे अश्रू श्री माणिक चरितामृताची पाने भिजवून जातात. केवळ पारायण करताना आपली ही अवस्था होते, तर श्री माणिकप्रभु संजीवन समाधीच्या वेळेस भक्तांची काय अवस्था झाली असेल बरे? कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. दत्तजयंती अगदी चार दिवसांवर असताना मोक्षदा एकादशीच्या दिवशीच श्रीप्रभु संजीवन समाधीत उतरले. श्रीप्रभुंचे जीवन समाधी प्रकरण ग्रंथकर्त्याने अत्यंत उत्कटतेने लिहिलेले आहे. ग्रंथ लिहिण्यापूर्वी ग्रंथकार श्री राम नामे हे श्रीप्रभु सांप्रदायिक नव्हते किंवा चरित्रलेखनापूर्वी ते कधी माणिक नगर असली आले नव्हते. सुरुवातीला श्री माणिक प्रभु कोण? कुठले? त्यांचे चरित्र काय? हे माहीत नसतानाही हा दिव्य ग्रंथ त्यांच्या लेखणीतून श्री प्रभू कृपेनेच लिहिला गेला ह्यापेक्षा आणखी मोठा चमत्कार काय असू शकतो? मला वाटते प्रत्येक दत्तभक्ताच्या संग्रही श्री माणिक चरितामृताची ही दिव्य पोथी अवश्य असावी. भावनेच्या लाटांवर स्वार होत असतानाच पारायणाची समाप्ती झाली. कोण्या एका भक्तांने अकरा रुपये आणखी एका भक्तांने एकविस रुपये दक्षिणा म्हणून पोथीवर ठेवले. आजही ते बत्तीस रुपये श्रीप्रभुचरित्रातच ठेवले आहेत. आजही चीकू, खडीसाखर आणि पेढे मिळाले. श्री प्रभुभक्त सद्भावनेने पोथीजवळ आणून ठेवतात. आजही तोच समाप्तीचा नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला अर्पण केला. आरत्या म्हटल्या आणि हे महाचरित्र निर्विघ्नपणे सफळ संपूर्ण करून घेतल्याबद्दल प्रभुदयाघनाचे मनोमन आभार मानले. पारायण ठिकाणाची आवराआवर करून श्रीप्रभु मंदिरात दर्शनाला आलो.

मोरपिसी रंगाच्या नक्षीदार महावस्त्रावर नाजूक वेलबुट्टीची भगवी शाल आज श्रीप्रभुचे रूप अत्यंत खुलवत होती. तुळशीमाळा, बोरमाळा, वैजयंतीमाळा, मोहनमाळा, मोत्यांच्या माळा, नवरत्न माळा, रुद्राक्ष माळा, सोन्याच्या माळा श्रीप्रभु गळाभर आनंदाने मिरवत होता. निशिगंध आणि गुलाबाचा भरगच्च हार जणू हाती झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. समाधीवरील जास्वंदीची फुले आणि पिवळ्या झेंडूच्या माळा आपल्या परीने त्या रंगसंगतीत अधिकच भर घालीत होत्या. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची सजावटही सुंदर… ह्या नितांत सुंदर श्रीप्रभुदर्शनाने मन भरून आले आणि सहजच श्रीप्रभु चरणी लीन झालो. पुन्हा एकदा श्रीप्रभुचरणी कृतज्ञता व्यक्त करून, श्रीप्रभुसमाधीस प्रदक्षिणा घातल्या आणि यात्री निवासावर आलो. पारायणाचे व्यासपीठ, पोथी वगैरेची आवराआवर करून श्रीजींच्या घरी पूजेस आलो. श्रीजींच्या घरी नित्य पूजेचे तीर्थ घेऊन परत श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनासाठी येऊन बसलो.
आज श्री मद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या समाप्तीचे प्रवचन होते. श्रीजींनी काल ॐ तत् सत् ची जुजबी ओळख करून दिल्यावर आज त्याच ॐ तत् सत् च्या व्यापक स्वरूपाला जाणण्यासाठी मन आतुर झाले होते. प्रथेप्रमाणे माध्यान्ह काळी भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरामध्ये श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीजींनी २४ ते २८ ह्या पाच श्लोकांचा गूढार्थ समजावून दिला.
सुरुवातीलाच गीता म्हणजे गीत, गीता म्हणजे परमेश्वराने गायलेले गीत. गाण्यामध्ये मोठ्यात मोठ्या गोष्टीला कमीत कमी शब्दात बांधण्याची आणि ते हृदयात ठासवण्याची क्षमता आहे. श्रीमद्भगवत गीतेमध्ये माधुर्य आहे म्हणूनच ती हृदयात उतरते. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कर्मयोग आणि भक्तियोग समांतर आहे, असे समजतात. कर्मयोगाशिवाय भक्तीयोगाची पात्रता नाही आणि भक्तीयोगाच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानयोगाची प्राप्ती नाही. भक्तियोग साधकांस बांधून ठेवतो, प्रत्येकाने गीतेतून ज्ञानयोग शिकायला हवा, ह्या ज्ञानयोगानेच मुक्ती प्राप्त होते.

श्रीजींनी पुढे ॐ चे व्यापक स्वरूप समजावताना ॐ म्हणजेच प्रणव, ॐ हेच सर्व मंत्रांचं आदिबीज आहे, चारही वेद हे ॐचेच अख्यान आहे. ॐ कालातीत आहे आणि परमात्माही ॐकारचआहे. जगत् म्हणजे ॐकार, परमात्मा म्हणजे ॐकार आणि म्हणूनच जगत् म्हणजेच परमात्मा. वेदांतातील ह्या संकल्पना जनसामान्यांना अधिकाधिक स्पष्ट व्हाव्यात म्हणून आई जशी आपल्या बाळाला हात धरून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे श्रीजी सर्वांना आपल्या मधुर वाणीने, पुराण कथांमधील, व्यवहारातील अनेक गोष्टींचे दाखले देत, वेदांताच्या मार्गावर आपला हात धरून, आपल्या संकल्पना स्पष्ट करून, आपल्याला त्या मार्गावर प्रशस्त करतात. ॐला असलेल्या चार मात्रा, अ + उ ह्या गुणसंधीने झालेला ओ, अशी व्याकरणदृष्ट्या फोडही श्रीजी करून सांगतात. एका मुरलेल्या शिक्षकाचचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जगताचा अनुभव जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थेतून जातो. तसेच अ हा नाभीतूध निघतो, ऊ हृदयातून निघतो आणि म हा जेव्हा दोन्ही ओठ बंद होतात तेव्हा उत्पन्न होतो. ॐ उच्चारण्यावेळी आपल्याला जागृती (अ), स्वप्न (ऊ) आणि सुषुप्तीचा (मी) अनुभव येतो. ॐकार जपते वेळी दोन ॐकारा मधील जागेला (विरामाला) शांती म्हणतात आणि तीच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्यात परमात्मा प्रकट होतो. तीच तुर्या अवस्था… श्रीजींच्या ज्ञानपूर्ण बाणांनी मनातील अज्ञान तीरोहित होत होते. हाच धागा पकडून श्रीजींनी कोल खेळाचे वर्णन केले. संध्याकाळच्या बालगोपाल क्रीडेमध्ये दोन गोपींबरोबर एक कृष्ण असतो. आणि हा कृष्ण म्हणजेच दोन ॐकारामधली असलेली शांती, ते मौन, तो परमात्मा, ती तुर्या अवस्था… तसेच ॐ हे त्रिमूर्तीचं प्रकटीकरण आहे. विष्णूचं प्रकटीकरण म्हणजे अ, शिवाचं प्रकटीकरण म्हणजे उ आणि ब्रह्माचं प्रकटीकरण म्हणजे म. अर्थात् ॐ म्हणजेच श्री प्रभु दत्तात्रेय.
विषयाचे स्पष्टीकरण जनसामान्यात व्हावे आणि ते संपूर्णपणे व्हावे ह्याकडे श्रीजींचा पूर्ण कटाक्ष असतो. सर्वांना एका कागदावर वर्तुळ काढायला लावून त्यात आणखीन एक छोटे वर्तुळ काढायला सांगितले. छोटे वर्तुळ हे जगत आणि बाहेरच मोठं वर्तुळ हे परमात्मा. जग हे परमात्म्याचाच एक अंश आहे. परमात्मा अगदी व्यापक, विशाल, अनादी, अनंत आहे ही संकल्पना त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनावर कायमची बिंबवली. प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर गीतेचा प्रत्येक अध्याय हे कृष्णाचे उत्तम भाष्य कसे आहे हे समजावून सांगितले. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला उपक्रम (start), नंतर सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) कसा आहे आणि श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हणतात हेही छानपणे समजावले. मोक्षाच्या प्राप्तीसाठी देहत्याग ही द्वैती लोकांची धारणा आहे, पण जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव ज्याला “जीवनमुक्ती” म्हणतात ही सकलमत संप्रदायाची धारणा आहे, अद्वैती जनांचा सिद्धांत आहे. श्री माणिकप्रभुंनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून आपण जीवन जगत असताना मोक्षाचा अनुभव प्राप्त करून देण्याची जडीबुटीच समस्त जगताला दिलेली आहे. जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव हे सकलमत संप्रदायाचे हे परमविशेष आहे. श्रीजींचे आजचे प्रवचन संपूच नये असे प्रत्येकास वाटत होते. महाप्रसादाची वेळ झाली होती तरी उपस्थितांमध्ये थोडीही चुळबुळ जाणवली नाही. श्रीजींच्या प्रवचनानंतर उपस्थित जनसमुदायापैकी काहीजणांनी आपले मनोगत व्यक्त केले. मलाही संधी मिळाली, पण ते कधीतरी विस्ताराने लिहेन. पारायणासाठी जमलेल्या सर्व आस्तिक महाजनांना श्रीजींनी शाल आणि खारकांचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील सतराव्या अध्यायाच्या प्रवचनांचे व्हिडिओ आपल्याला Manik Prabhu ह्या YouTube चॅनेल वर पाहता येतील.
महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. निघणाऱ्या सर्व भक्तांच्या गळाभेटी घेतल्या. गुरूमार्गावर जोडलेली नाती निखळ आनंद देऊन जातात. आज संध्याकाळी मुक्तीमंटपाच्या औदुंबराखाली लवकरच येऊन बसलो. श्रीजींचे प्रवचन आठवून ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे आकाश ढगाळ होते. पण आज आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र होते. श्रीजींच्या प्रवचनामुळे जणूकाही आकाशातील अज्ञानरुपी मळभही दूर झाले होते. आज संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर विविध रंगांची उधळण पाहायला मिळत होती. श्रीप्रभु चैतन्याचा हा अविष्कर पाहणे ही एक नितांत सुंदर अनुभूती आहे. क्षितिजावरील रंगांच्या ह्या खेळाचा भरभरून आनंद औदुंबराखाली बसून लुटला. भक्तकार्यासाठी श्रीजी आज अतीव प्रसन्नतेने उपस्थित होते. बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांसाठी खारकांचा प्रसाद दिला गेला.
भक्तकार्यानंतर श्रीप्रभुमंदिर पटांगणात बालगोपाल क्रीडेचा आनंद लुटण्यासाठी आलो. श्रीप्रभुमंदिर पटांगण भक्तजनांनी खचाखच भरले होते. श्रीप्रभुपदांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रत्येकजण थिरकत होता. श्रीजींनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे दोन गोपींमधला कृष्ण आज प्रथमच कोलदरम्यान अनुभवला. बसल्याजागी दोन ॐकारामधल्या शांतीतही तो अनुभवला. माझ्या ध्यानातला परमात्मा आणि माझ्यासमोर कोल खेळणारा दोन गोपींमधला परमात्मा एकच निखळ आनंद देत होता. सर्व रूपे श्रीप्रभु जाण… ही अद्वैताची अनुभूतीसुद्धा आज खेळादरम्यान अनुभवता आली आणि या दिव्य अनुभूतीमुळेच कोल खेळाचा आनंद आज अधिकच द्विगुणीत झाला.
संध्याकाळच्या महाप्रसादानंतर भजनासाठी श्रीप्रभु मंदिरात येऊन बसलो. आज शनिवार होता. आज जांभळ्या रंगाची गादी श्रीजींसाठी सजवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे आगमन झाले. आज शनिवार असल्यामुळे भजनाआधी प्रथम आरती झाली. आरतीच्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ रोम रोम पुलकित करत होता. अवघा जनसमुदाय श्रीप्रभु रंगात रंगला होता. आरतीनंतर श्रीजी प्रवचनासाठी गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी “देई मला इतुके रघुराया, मती उपजो तुझिया गुण गाया…” हे माझे अत्यंत आवडीचे पद होते. श्री आनंदराज प्रभुंनी आपल्या दैवी स्वराने ह्या पदाची गोडी अजूनच द्विगुणित केली आहे. अत्यंत सरळ अर्थ असलेल्या पदाचा वेदांतातील गूढार्थ श्रीजींनी रामायणातील अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितला. तासाभराच्या प्रवचनानंतर नेहमीप्रमाणे तबला, पेटी, तंबोरा, सनई, यांच्याबरोबरच सुरांची देहभान हरपून टाकायला लावणारी जुगलबंदी अनुभवली. शनिवारच्या भजनामध्ये खूप पदे आहेत. दास्यभक्तीने ओतप्रोत भरलेली ही पदे मनाचा ठाव घेतात. भजनाच्या शेवटच्या टप्प्यावर “भज मना तू भज भज मना, वायुनंदना तू वानर रूपा…” हे पद जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा श्रीजींच्या हातातही झांज आले होते. ह्या भजनसंध्येची नशा काही वेगळीच असते, कदाचीत ती शब्दांत समर्पकपणे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे, पण ज्यांनी ती नशा अनुभवलीय, तेच ह्याची गोडी जाणू शकतात. आजही भजनानंतर कुरमुरे खोबर्याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजन वाल्यांना श्रीजींनी शाल देऊन आशीर्वाद दिला. आज भजनाच्या वेळी गळ्यात वीणा अडकवलेला एक वारकरी अवचितपणे प्रकट होऊन एका हाती झेंडा व दुसर्या हाती चिपळ्या घेऊन श्रीप्रभु समाधीभोवती प्रदक्षिणा घालत होता. आणि शेवटच्या गजराच्या वेळी खूप वेळ घुमत होता. त्या नादब्रम्हामध्ये तो अगदी हरवून गेला होता. भजन रसाने त्या आत्म्याची पूर्ण तृप्ती होत होती. असो, श्रीजींच्या प्रस्थानाच्या वेळी “कमल वदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा…” पदाच्या दिव्य लहरी एकापाठोपाठ एक आदळत होत्या, आणि साऱ्यांच्या नजरा कृतज्ञतेने घराकडे परतणार्या श्रीजीरुपी ज्ञानमार्तंडाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खिळल्या होत्या.
क्रमशः…
by Pranil Sawe | Jun 4, 2022 | Uncategorized
परवा मोरपिसे गोळा करायला गेलो असताना, येताना मला श्रीबयाम्मामातेची समाधी दिसली होती. एक दिवस निवांत येऊन या माऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, असे मनोमन ठरवले होते. आज सकाळी सहाच्या चहानंतर संगमाच्या दिशेने, सागाच्या बागेतून निघालो. विरजा नदीच्या काठी एक छोटीसी समाधी बय्यामा माऊलीची आहे. तेथील पक्ष्यांची मंजुळ किलबिल मला सुखावत होती. ओढ्यावजा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते. बगळे काही खाद्य मिळेल का ह्या आशेपोटी विरजेच्या पात्रात उगाचच ध्यानाचा आव आणून उभे होते. जवळच उगवलेली रानफुले घेऊन त्या माऊलीच्या समाधीवर मनोभावे अर्पण केली. जिने आपल्या उदरी नऊ मास प्रत्यक्ष दत्तावतारी श्री माणिक प्रभुंना धारण केले, त्या जगन्माता बयाम्माप्रती अष्टभाव दाटून आले. एकट्यानेच तिच्याशी गप्पा मारल्या. श्री माणिकप्रभुंसारखे नररत्न ह्या जगाला अर्पण केले, म्हणून तिच्या समाधीवर नम्रपणे मस्तक झुकविले. पुन्हा यात्री निवासवर येऊन आदल्या दिवसाच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून काढल्या.

नाश्ता उरकून झटपट पारायणासाठी औदुंबराखाली दाखल झालो. एव्हाना जो तो आपापल्या जागी स्थानापन्न होऊन पारायण करण्यात दंग झालेला होता. आज सहाव्या दिवसाचे श्री माणिक चरितामृताचे वाचनही मनाच्या अगदी प्रफुल्लित अवस्थेत पार पडले. विठ्ठलराव तालुकदाराची कथा, माणक्या पाटलाची कथा, यज्ञ समारंभ व त्यातील विघ्न, तात्यासाहेबांस आलेले वैराग्य, श्री माणिकप्रभुंची जगद्गुरु शंकराचार्यांची भेट, दमडीची साखर, ऐनुद्दीन उस्तादाचे गर्वहरण अशा अनेक कथांमध्ये रमताना आपला श्री माणिकप्रभुंप्रती असलेला स्नेह अधिकच दुणावतो. आपले मन अगदी माणिकमय होऊन जाते. आज पारायण यादरम्यान प्रसाद म्हणून काही भक्तांनी चिकू आणि पेढे वाटले. आजच्या दिवसाच्या पारायणानंतर तोच नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला दाखवला.
पारायणानंतर औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या, समोरील मनोहर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि श्रीप्रभु समाधीसमोर उभा राहिलो. आज श्रीप्रभु समाधीवरील गुलाबी रंगाच्या वस्त्रात अत्यंत विलोभनीय दिसत होता. आणि त्यावरील हिरव्या रंगाची नक्षीदार शाल लक्ष वेधून घेत होती. अबोली आणि कागड्यांच्या फुलांचा एकमेकांत बेमालूमपणे गुंफलेला हार ऐक्यत्वाची साक्ष देत होता. अंगावरील विविध माळा खुलून दिसत होत्या. समाधीवर गुलाबाची लाल फुले आपली सुगंध सेवा श्रीप्रभु चरणी अर्पण करत होती. आणि भोवतालचे अबोलीचे भरगच्च गजरे त्या साजाला भारदस्तपणा प्रदान करीत होते. संजीवन समाधी समोरील पादुकांना चंदनाचा लेप लावण्यात आला होता. श्रीप्रभुचं हे असं सजलेले रूप कितीही पाहिलं तरी मनाचे समाधान होत नाही. त्याच्या ह्या ऐश्वर्यसंपन्न रूपाला अनिमिष डोळ्यांनी पाहत, हृदयात साठवून ठेवणे, एवढेच आपल्या हाती असते. श्रीप्रभुसमाधीचे तीर्थ घेऊन कृतकृत्य झालो आणि नेहमीप्रमाणे श्रीप्रभु समाधीला प्रदक्षिणा घातल्या.
आज सकाळी, यज्ञशाळेमध्ये श्री गणेश यागाचे आयोजन केले होते. श्रीजी आपल्या घरची नित्य पूजा आटोपून यज्ञशाळेत हजर होते. उसाचे कांडे, मोदक, खोबरे पोहे, तीळ इत्यादी सामग्रीचे हवन होमकुंडात केले जात होते. सुमारे तासाभरानंतर पूर्णाहुती होऊन श्री गणेश याग संपन्न झाला. ताक पिऊन पुन्हा श्री नृसिंह निलयमध्ये श्रींच्या प्रवचनासाठी येऊन बसलो. परंपरेनुसार वाद्यांच्या आणि भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीमद्भगवद्गीतेच्या वीस ते तेवीस ह्या चार श्लोकांचे अत्यंत विस्तृत विवेचन श्रीजींनी केले. आज मुख्यत्वेकरून दानावर उद्बोधन होते. यज्ञ, दान, तप हे माणसाचे कर्तव्य आहे. आणि ते सोडता येत नाही तसेच ते साधकांना, मनुष्यांना पवित्र करतात. दानाचे फायदे समजावताना दानामुळे अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणा याचे क्षालन होते, तसेच दान केल्यामुळे, आपली प्रकृती बरोबर समरसता होते. दानामुळे सामाजिक न्याय होतो, असे श्रीजींनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावले. तसेच सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे, असे श्रीजी म्हणाले. पुढे जाऊन श्रीजींनी सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणते हे अनेक कथांचा दाखला देऊन समजावले. पुढे जाऊन यज्ञ, दान, तप करताना त्यात काही न्यून राहिले, त्यात काही कमी झाले तर ते, परमात्म्याच्या नामस्मरणाने सुधारता येते हा मौलिक उपदेशही श्रीजींनी सर्वांना समजावून सांगितला. तसेच तेविसाव्या श्लोकातील ॐ तत् सत् च्या स्वरूपाचं विहंगावलोकन श्रीजींनी सर्वांना करून दिले. ॐ हे अक्षर आहे, तो स्वर आहे, तो ध्वनी आहे आणि ती निशाणीपण आहे. अव धातूपासून ॐची उत्पत्ती आणि ॐ म्हणजेच परमात्मा. तत् हे सर्वनाम, परमात्मा हा नेहमी डोळ्यांपाठी असतो, म्हणून तो डोळ्यांपुढे येत नाही जसे कॅमेरामन फोटो काढतो पण फोटोत तो कधीच दिसत नाही. परमात्मा हा कॅमेरामन सारखाच आहे. तसेच सत् म्हणजे सत्ता, एखाद्या वस्तूचे असणे. जसे चष्मा आहे, अंगठी आहे, पेला आहे. ह्यातील “आहे”पणा, म्हणजेच अस्तित्व म्हणजेच सत्.महावाक्याची इतकी सुरेख फोड क्वचितच कोणीतरी करून आपल्याला प्रेमाने भरवत असावं. परमात्मा अनादि-अनंत आहे अस्तित्व अनादि-अनंत आहे म्हणजेच अस्तित्व हाच परमात्मा आहे आणि ॐ तत् सत् हे परमात्म्याचेच नाव आहे. तसेच ब्राह्मण म्हणजे कोण? तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणारा. मुंजीनंतर द्विज होतो, द्विज वेदाभ्यासने विप्र होतो आणि जो विप्र ब्रह्मास जाणतो तोच खरा ब्राम्हण. श्रीजींच्या ज्ञानपूर्ण आहुतींनी गीता यज्ञ धडाडत होता आणि उपस्थितांच्या अज्ञानाचा समूळ नाश होत होता. कलिंगड कधी अख्खे खाता येईल का? नाही ना.पण त्याला छान फोडी करून, मीठ मसाला लावून आपल्यासमोर ठेवले, तर ते आपण आवडीने खातो. श्रीजींच्या प्रवचनाची खासियत ही अशीच आहे. वेदांतासारखा कठीण विषय तो आपल्यासमोर फोड करून, त्यास पुराणांतील व्यवहारातील अनेक गोष्टींचा मसाला लावून आपल्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा स्वरूपात सादर करतात. आणि असा अनुभवसंपन्न ज्ञानी सद्गुरू वेदांताचे निरुपण करण्यासाठी भेटला, म्हणून आपल्याला आपल्याच नशिबाचा नकळत हेवा वाटू लागतो.
महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासावर आलो. दोन-तीन दिवसांचे कपडे धुऊन टाकले. आजच्या प्रवचनाला ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संध्याकाळी श्रीप्रभुमंदिर प्रांगणात आलो. एव्हाना बऱ्याच प्रभुभक्तांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकाची श्री माणिकनगरला जोडले जाण्याची एक वेगळी कथा होती. आणि त्या प्रत्येकाच्या कथा ऐकणे हीसुद्धा कानांना एक पर्वणीच होती. आज श्रीजी बाहेर गेल्यामुळे संध्याकाळचे भक्तकार्य थोडेसे उशिरा झाले. आज कोल खेळ खूपच रंगला होता. अवघे माणिकनगर कोल खेळण्यासाठी जमले होते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून श्रीजी ही बालगोपाल क्रीडा पाहायला सहजतेने उपस्थित होते. हा खेळ पाहतानाही आपल्याला एका विशिष्ट चैतन्याची अनुभूती जाणवते. भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीप्रभु कदाचित एखाद्या बालगोपाळाचं रूप घेऊन कदाचित ह्यात क्रीडा करत असावा. सूर आणि वाद्यांच्या तालावर आपले पाय आपोआपच थिरकायला लागतात. ह्या कोल खेळाचा मनसोक्त आनंद लुटून श्रीप्रभुचा महाप्रसाद घेतला आणि नेहमीप्रमाणे भजनासाठी आनंद मंडपात येऊन बसलो.

आज शुक्रवारी बालाजीचे भजन होते. आजचा रंग गुलाबी होता. श्रीजींच्या मार्गातील लाल पायघड्यांसमोर ही गुलाबी गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. समोर जगत्प्रसुत्या श्रीप्रभु सुखानैव पहुडला होता. भजन ऐकण्यासाठी जणू तोही आज आतुरला होता. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेऊन श्रीजी गादीवर विराजमान झाले आणि रात्रीच्या प्रवचनास सुरुवात झाली. आज शुक्रवारचे श्रीगुरु स्तुतीपर “अरे गुरु राया माझी निरसली माया” हे अगदी तीन कडव्यांचे पद होते. ह्यालाही श्रीजींनी आपल्या वाक्चातुर्याने तासभर रंगविले. श्री माणिकप्रभुंची पदे अत्यंत श्रवणीय तर आहेतच पण त्यातला लपलेला गूढ अर्थ जेव्हा आपल्याला संपूर्णपणे कळतो तेव्हा, भजनाच्या त्या तल्लीनतेत आपल्या डोळ्यांच्या कडा सहज ओलावतात. आजही श्री. आनंदराज प्रभुमहाराज, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री अजय सुगावकरजी ह्यांच्या सूरतालांची जुगलबंदी ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवली. आपल्या अंतर्मनाला एक वेगळेच चैतन्य प्राप्त करून देण्याची क्षमता ह्या भजनांत आहे. चैतन्याची ही अत्यंत सुखद अनुभूती वारंवार घेणे हा श्रीमाणिक नगरातीच्या वास्तव्यातील परमोच्च सुखाचा क्षण आहे. शेजेच्या पदांआधी आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटला गेला. रात्री भजनासाठी उपस्थित भजन मंडळींना श्रीजींचा आशीर्वाद मिळाला. नेहमीप्रमाणे “कमलवदनी हे अमृत भरा माणिक माणिक मंत्र स्मरा. ” या पदाचे दैवी स्वर आसमंतात भरून राहिले. आज भजनानंतर सर्वांना अल्पोपहार मिळाला. सर्वजण आपापल्या निवास्थानी परतू लागले. आज पुन्हा श्रीप्रभुमंदिरात येऊन त्याच्यासमोर हा सगळा आनंदसोहळा अनुभवायला दिल्याबद्दल श्रीप्रभु चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अखंड वीणा आपल्या तारांवर माणिक माणिक नामाने श्रीप्रभुला रिझवत होती.
क्रमशः…
Recent Comments