ईश्वराबद्दल भीती

ईश्वराबद्दल भीती (देवाचा कोप, Fear of God) – सामान्यजनांच्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून, ईश्वराप्रती प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन…

मानवी जीवनाला मानसिकदृष्ट्या अधिकाधिक बलवान बनवणे, मीच परमात्मास्वरूप आहे, ही धारणा अधिकाधिक व्यापक करणे, ही श्रीजींच्या प्रवचनांची काही ठळक वैशिष्ट्ये. आजच्या भाद्रपद पौर्णिमेच्या प्रवचन पर्वांतर्गत ईश्वराबद्दलची भीती किंवा देवाचा कोप (Fear of God) ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक आणि समाजाला जागृत करणारं, त्याला यथायोग्य दिशा देणार असं प्रवचन श्रीजींच्या मुखकमलातून स्फुरले.

ईश्वर आपल्यावर नाराज होऊ शकतो का? त्याला आपल्या उपासनेची, प्रार्थनेची, भक्तीची आवश्यकता आहे का? आणि आपल्याला देवाची भीती वाटते का? अशा विविध प्रश्नांचा मार्मिक ऊहापोह वेदांतातील अनेक संदर्भासह श्रीजींनी आपल्या आजच्या प्रवचनात केला‌आहे. मुळातच हिंदू धर्मात ईश्वराच्या भीतीची संकल्पनाच नाही हे अधोरेखित करताना, अशा प्रकारच्या भीतीची संकल्पना आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांकडून आणि इंग्रजांकडून आली हे श्रीजी नमूद करतात. आपला देश स्वतंत्र होऊन आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळेस आपल्या मनाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या अनिष्ट संस्काराच्या जोखाड्यातून मुक्त होण्यासाठी श्रीजींचे आजचे हे प्रवचन सर्वांना नक्कीच उद्बोधक व्हावे.

भयाची व्याख्या करताना श्रीजी म्हणतात, परतो अनिष्ट संभावना इती भय: म्हणजेच दुसऱ्यांकडून संकटाची किंवा अनिष्टाची संभावना म्हणजेच भय… किंवा भविष्यात प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या अनुसंधानजन्य उत्पन्न होणाऱ्या मनाचा उद्रेक म्हणजेच भय…‌ हे सांगताना श्रीजी श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या मनाची व्याख्येचा संदर्भ देतात. भय हा मनाचा धर्म आहे. मन आणि परमात्मा यातील भेद स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात, की मन जड, अनात्मा आहे तर परमात्मा हा चेतन आहे आणि म्हणूनच भीतीचा ईश्वराशी काहीही संबंध नाही.

कोणताही मनुष्य सहेतुक उपासना करतो. भय, लाभ, कर्तव्य आणि प्रेम हे ईश्वराचे चार उपासनेचे मुख्य हेतू आहेत. कोणी भयापोटी, तर कोणी काहीतरी लाभ व्हावा म्हणून, कोणी कर्तव्य भावना म्हणून तर कोणी भगवंताप्रती असलेल्या प्रेमापोटी ईश्वराची उपासना करतो. ह्या चारही हेतूंपैकी प्रेम भावनेने केलेली उपासना ही श्रेष्ठतम आहे कारण जेथे प्रेम आहे तेथे कोणतीही भीती नाही.

देवांच्या भीतीसंबंधीत पुराणातील काही संदर्भ देताना श्रीजी तैतरीय उपनिषदाचा आधार घेतात. जो माणूस स्वतःला परमात्म्यापासून यत्किंचितही वेगळा समजतो, त्याला भय असते किंवा अज्ञानी माणसाला भय असते. ही संकल्पना स्पष्ट करतानाच श्रीजी म्हणतात की, भीती असण्यासाठी समोर भयावह काहीतरी गोष्ट असावी लागते. परंतु सर्वत्र परमात्माच भरलेला आहे आणि तो सर्व रूपात प्रकटतो अशी का एकदा मनाची धारणा झाली, की मग भीतीचे काही कारणच उरत नाही. श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेला सकलमत संप्रदाय आणि श्री प्रभुगादीच्या आचार्यांनी रचलेली अनेक पदे, सर्वरूपे श्रीप्रभु हा जाण ही धारणा आपल्या मनावर खोलवर रुजवतात आणि दृढ करतात.‌

परमात्म्याचा अनेकांशी असलेल्या संबंधांबाबत खुलासा करताना श्रीजी कृष्णाचे उदाहरण देतात. आकाशवाणी झाल्यामुळे कंसाला कृष्णाप्रती भीती होती, शिशुपालादि कृष्णाचा द्वेष करायचे, यादवांचे कृष्णाशी रक्ताचे नाते होते, पांडवांशी कृष्णाचे मित्रत्वाचे संबंध होते आणि आपले? आपले कृष्णाची भक्तीचे नाते आहे, त्यामुळे आपल्याला भीतीचे काहीही कारण नाही. जर आपल्याला परमेश्वराबद्दल भीती वाटायला हवी असेल तर आपल्याला कंस किंवा रावण बनायला लागेल, हे सांगतानाच श्रीजी आपल्याला परमात्म्याबरोबर असलेल्या प्रेम संबंधाची जाणीव करून देतात.

अमुक अमुक आचार केले नाहीत तर देव आपल्यावर रागावेल का? ह्या सहज मानवी स्वभावाच्या जाणीवेबद्दल विश्लेषण करताना श्रीजी म्हणतात की, परमात्मा का अलिप्त आहे, त्याच्यामध्ये विकार होऊ शकत नाहीत. आपल्या सुखदुःखाशी परमात्म्याला काहीही घेणे देणे नाही.‌ पण मग, जर तो सुखदुःखाचा दाता नाही तर मग आपल्या जीवनात सुखदुःख का बरे येतात? ह्याचे कारण स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात की, हे सर्व आपल्या कर्माचे फळ असते. आपल्या कर्माच्या फळांमध्ये ईश्वर कधीच ढवळाढवळ करत नाही. कर्माच्या सिद्धांताची एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे ज्यात परमात्मा अजिबात ढवळाढवळ करत नाही. हे समजवताना श्रीजी, न्याय व्यवस्था आणि राष्ट्रपतीचे उदाहरण देतात. जसे राष्ट्रपती हे सर्व शक्तिमान असले तरी एखाद्याला त्याच्या गुन्ह्याच्या, अपराधाच्या संबंधित सजा देताना न्यायव्यवस्थेच्या निर्णयात ते ढवळाढवळ करत नाही.‌ त्याचबरोबर श्रीजी असेही सांगतात की परमात्मा जरी अलिप्त असला तरी तो सर्व भूतांमध्ये समप्रमाणात व्यापून आहे. त्याला कोणी प्रिय नाही आणि कोणी अप्रियही नाही, परंतु जे सुजन त्याचं भक्तिपूर्वक भजन करतात, त्यांच्यात परमात्मा वास करतो आणि ते परमात्म्यात वास करतात. येथे श्रीजी मानवाची आणि परमात्म्याची एकरूपता अधोरेखित करतात.

प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर श्रीजींनी आपल्या प्रार्थनेची परमात्म्याला गरज आहे का? ह्या प्रश्नाची उकल सहजपणे करतात. बऱ्याचदा आपण देवाला नैवेद्य दिला नाही तर तो उपाशी राहील का बरे? आपण जर त्याला अभिषेक स्नान घातले नाही तर तो विनास्नान बसेल का? असे द्वंद्व उपस्थित करणारे अनेक प्रश्न सामान्य जनांच्या मनात उपस्थित होत असतात. ह्याची यथायोग्य सांगड घालताना श्रीजी म्हणतात की, परमेश्वराला आपल्या आराधनेची, सेवेची गरज नाहीये पण आपल्याला आहे. कारण ईश्वर हा निष्काम आहे, तो नित्यतृप्त आहे, तो परीपूर्ण आहे. जर आपल्या सेवेची त्याला गरज लागली तर तो अपूर्ण आहे, असे समजले जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याच्या आराधनेची गरज काय हे सांगताना श्रीजी म्हणतात की, आपलं त्याच्यावर निरतिशय प्रेम असतं. प्रेमाचा स्थायीभाव सांगताना श्रीजी म्हणतात की, प्रेम हे व्यक्त झाल्यावाचून राहत नाही. आपलं भगवंताप्रती असलेलं प्रेम हे आपण आपल्या उपासनेतून, प्रार्थनेतून, सेवेतून व्यक्त करत असतो.‌

काही धर्मांमध्ये जर तुम्ही ईश्वराची सेवा केली नाही तर तो तुम्हाला सजा देईल, असे मनावर बिंबवले जाते, पण श्रीजी म्हणतात की, शिक्षा करणारा हा भगवंत असूच शकत नाही.‌ त्यामुळे तो मला शिक्षा करेल अशी भीती मनात बाळगण्याचे अजिबात कारण नाही. जो भगवंताला शरण जातो, मी तुझा आहे या भावनेने प्रार्थना करतो आणि जो भगवंतापासून स्वतःला कधीही अंतरत नाही, वेगळा समजत नाही, जेथे प्रेम भावनेला प्राधान्य आहे, तेथे निश्चितच भीती नाही. पण जेथे ही भावना नाही तेथे मात्र निश्चितच भीती आहे. आपल्या हिंदू धर्मामधले हे वेगळेपण श्रीजी परिणामकपणे आपल्यासमोर आणतात.

त्याचवेळी, जर मानवाला भीती नसली तर आचरणात स्वच्छंदता किंवा उच्छृंखलता येऊ शकते असाही अपवाद येतो. ह्याचे समाधान करताना श्रीजी म्हणतात की, ह्या स्वच्छंदतेला, ह्या उच्छृंखलतेला काबूत ठेवून, मनाला नित्य साधनेच्या मार्गात आणून परमात्म्याप्रती एकदा का प्रेम झाले की मग भीतीचा लवलेशही उरत नाही. जसे एखाद्या लहान मुल आपल्या आईस घाबरत नाही कारण तेथे निर्व्याज्य प्रेम असते…

जिथे प्रेम आहे, तिथे भीती नाही,
आणि जिथे भीती आहे, तिथे प्रेम नाही…

जर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशी भीती असेल, याचा अर्थ आपले भगवंतावर प्रेम नाही आणि जर आपले परमात्म्यावर प्रेम असेल तर त्याच्याबद्दलच्या भीतीचा, त्याच्या कोपाचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवाला भगवंताप्रती केवळ प्रेम आणि प्रेमच होऊ शकतं. ईश्वराप्रती असलेल्या भीतीच्या भावनेचा नाश होऊन, ते प्रेम प्रत्येक मानवात उत्पन्न होवो, असा मंगल आशीर्वाद देऊन श्रीजींच्या आजच्या प्रवचनाची सांगता झाली.

आपल्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून ईश्वराप्रती असलेले भीतीची भावना दूर होऊन, त्याच्याबद्दल प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन निश्चितच परिणामकारक होईल, असा विश्वास आजचे हे प्रवचन ऐकल्यावर मला वाटतो…

वेदांत सप्ताह भाग तेरावा

उद्यानातून आता दिंडी वेशीकडे निघाली होती. सध्याचा जो नौबतखाना आहे, त्याच्या द्वारापर्यंत अर्थात सिंहद्वारापर्यंत, म्हणजेच वेशीपर्यंत दिंडी येते. उद्यानापासून वेशीपर्यंत जाताना “छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप” हे माझं अत्यंत आवडतं पद म्हटलं गेलं. दिंडी आता सिंहद्वाराच्या कमानीखाली आली होती. येथून कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीप्रभु मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले आहे की कालाग्निरुद्र हनुमानाची मूर्ती आणि श्रीप्रभु समाधी बरोबर एका सरळ रेषेत, एकाच पातळीवर आहेत. सिंहद्वाराच्या कमानीखाली “जयदेव जयदेव जय हनुमंता” ही हनुमंताची आरती म्हटली गेली. त्यानंतर “नमो घोरतर कालाग्नीरुद्ररूपा” हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी रचलेलं, अंगी चैतन्य स्फुरवणारं , अत्यंत तेजस्वी असे पद म्हटले गेले. ह्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ अगदी टीपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद उचंबळून येत होता. श्री कालाग्निरुद्र हनुमानाला “माणिक क्षेत्र अभिमान रक्षण दक्ष” असेही म्हटले जाते. दास्यभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताला आळवून दिंडी आता श्रीजींचे निवासस्थान असलेल्या नागाईकडे निघाली होती. सिंहद्वारातच थोड्या उंचीवर एक हंडी बांधली होती.‌ भागवत सप्ताहामध्ये काल्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या हंडी मध्ये दहीपोहे ठेवलेले असतात. मातीच्या हंडीला शेंदरी आणि हिरव्या रंगाने रंगवले होते. त्यावर छान नक्षीही काढली होती. योगायोगाने संकलमत संप्रदायाच्या झेंड्यामध्येही हेच दोन रंग आहेत. झेंडूचे हार घालून दहीहंडीला छान सजवले होते. श्रीजी आपल्या हातात काठी घेऊन ही हंडी फोडतात आणि दहीकाल्याचा सोहळा संपन्न होतो. हंडी फोडण्याआधी सगळ्यांचे लक्ष ह्या दहीहंडी वर खिळले होते. श्रीजींनी एका फटक्यातचही हंडी फोडली. दहीहंडी फोडताना “गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण” हे भजन म्हटले गेले. हंडीमधला प्रसाद मिळवण्यासाठी एकच लगबग उडाली. ज्यांच्या हाती हंडीतला प्रसाद लागला, तो हाती लागलेला प्रसाद थोडा थोडा करून इतरांनाही वाटत होते. आपल्या जवळचे असलेले इतरांना वाटण्यामध्ये असलेला आनंद प्रभुभक्तांच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. दहीकाल्याचा आनंद लुटून दिंडी आता श्रीजी यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागाईकडे निघाली होती. वाटेमध्ये बकुळीच्या झाडासमोर “नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळांत हरि आला हो” हे पद म्हटले गेले. तिथून पुढे पालखी आता श्रीजींच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजा समोर आली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या पाटावर श्रीजी येऊन उभे राहिले. येथूनच कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांतावर श्रीजींनी मुक्तहस्ते बुक्का उधळला. दिंडीसाठी आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद घेऊन निघालेले श्रीजी, आता पुन्हा आपल्या कुलदैवताकडे नतमस्तक व्हायला आले होते. येथे “जयदेव जयदेव जय खंडेराया” खंडोबाची आरती आणि “कुलस्वामी माझा देव खंडेराया तयाचे हे पाय हृदयी माझ्या” हे पद अत्यंत उत्साहात म्हटले गेले. घड्याळाचा काटा सकाळी दहाची वेळ दाखवत होता. दिंडी सुरू होऊन एव्हाना साडे दहा तास होत आले होते आणि तरीही सर्व प्रभुभक्त त्याच जोशामध्ये दिंडीचा आनंद लुटत होते. श्रीजींमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी त्या आनंदामध्ये “ले गुलाल प्रभु पर डाल, मलकर गाल, मैने प्रभु से खेली होली” हे त्यांनीच रचलेले पद म्हटलं. हे पद म्हणताना श्रीजींची भक्तांवर आशीर्वादपर बुक्क्याची उधळण सुरू होती. अधून मधून माझ्यावरही होणाऱ्या ह्या अमृत वर्षावाने मन कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा अनुभव करीत होतं.

श्रीजींच्या निवासस्थानातून दिंडी आता आपल्या अंतिम टप्प्यावर निघाली होती. नागाईपासून श्री प्रभू मंदिर पटांगणापर्यंत “असा पातकी सांगू मी काय देवा, कधी नाही केली मनोभावे सेवा, नसे वंदिले म्या तुझे निज पाया, मला तारी रे तारी मार्तंड राया” हे अष्टक म्हटले गेले. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणामध्ये “हा दिसे स्फुरे जो आनंद” हे पद म्हटलं गेलं. पटांगणामध्ये दोन्ही बाजूस ओळीने उभे राहून मधे थोडीशी जागा ठेवतात. ह्याची रचना अगदी वारीची आठवण करून देते. श्री प्रभु मंदिराच्या पायऱ्या चढून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या आवारातील आनंद मंटपात आली होती. येथे “कधी पाहिन मी माझ्या स्वरूपाला, आनंद पूर्णब्रह्माला” हे पद म्हटलं गेलं. समोर गाभाऱ्यामध्ये श्रीप्रभु दिंडीचा हा कौतुक सोहळा पाहत होता. दिंडीतल्या प्रत्येक पदागणिक आपण आपली श्रीप्रभुशी नकळत होणारी एकरूपता अनुभवू शकतो. श्रीप्रभुचे चैतन्य ठाई ठाई जाणवू लागते. अंगावर रोमांच उभे राहू लागतात, मन आनंदाची अनुभूती करू  लागते.

आनंद मंटपातून दिंडी आता श्री प्रभु समोरील कैलास मंटपात आली होती. येथे “मणिका लोकपालका दैन्यहारका सुरासुरवंद्या” ही श्री माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. श्री प्रभू समाधीसमोरील पायर्‍यांवर डोकं टेकवून प्रत्येकाची पावले आता उत्तर दरवाजातून मुक्ती मंडपात जाण्यासाठी पडत होती. ह्या दरम्यान सप्ताह भजनात रोज म्हटले जाणारे “पातकी घातकी मी असे की असा, मन हे भजनी न वसे सहसा” हे तारक अष्टक म्हटले गेले. अष्टकानंतर “जन चला चला गुज पाहण्या हो” हे पद म्हटले गेले. ह्या पदाच्या शेवटी “श्री माणिक आपणचि होण्या हो” ही ओळ येते. आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन, आपल्यातील द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होऊन, आपणच श्री प्रभू परमात्मा आहोत, ही जाणीव दिंडीतील पदे आपल्याला करून देतात.

दिंडी आता परत मुक्तीमंटपात आली होती. आईच्या कुशीतून निघून मुक्तपणे इथे तिथे हिंडून दिंडीचं हे पाडस आता पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलं होतं. चैतन्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं. श्रीजी मुक्तिमंडपात प्रवेश करण्याच्या आधी, दृष्ट उतरवण्यासाठी अकरा नारळ ओवाळून फोडले गेले. त्यानंतर श्रीजी मुक्तिमंटपात प्रवेश करते झाले. मुक्तीमंटपात श्री शंकर माणिकप्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या, श्री शंकर गुरुवर्या वात्सल्य घन योगींन्द्र रक्षी प्रभुवर्या” ही शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. येथे “झालो आम्ही बहु धन्य रे, भेटले सगुण हे ब्रह्म रे” हे स्वस्वरूपाची जाणीव झाल्यावर, होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती करून देणारे पद म्हटले गेले. येथून दिंडी आता श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंध मोक्ष भ्रम कोण तो जाणे अवघा ब्रम्हानंद” हे आत्मानंदाने ओतप्रोत भरलेले पद म्हणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहता येत होता. त्यानंतर “हंसः सोऽहं सोऽहं हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंचे अद्वितीय गोडी चे पद म्हटले गेले. मी-तू पणाची बोळवण होत होती. अद्वैताची ज्योत हृदयामध्ये पूर्ण तेजाने तेवत होती. ह्या तीव्रतेची सुखानुभूती मी प्रथमच अनुभवत होतो. सुखाच्या आनंद लहरीवर तरंगत असतानाच “माणिक माणिक जय गुरु माणिक, माणिक माणिक शिव हर माणिक” चा गजर झाला आणि नकळत श्रीप्रभु प्रेमाने हृदय उचंबळून आले. अलगद ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा आता दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. भावनेच्या ह्या कल्लोळातच “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा सद्गुरु मार्तंडा, आत्मोल्हास प्रभाकर कारण ब्रह्मांड” ही श्री मार्तंड माणिकप्रभुंची आणि तद्नंतर “आरती मधुमती व्यंकेची जननी हेरंब श्यामलेची” ही श्री देवी व्यंकम्मा मातेची आरती म्हटली गेली. त्यानंतर “श्री माणिक जय माणिक, हर माणिक हरी माणिक, चिन्माणिक सन्माणिक” हे परवलीचे भजन म्हटले गेले. वाद्यांचा कल्लोळ चरम पदावर होता. हे पद संपल्यावर “नमः पार्वतीपतये हर हर महादेव”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय” चा जयघोष मुक्ती मंडपात भरून राहिला. दोन क्षण कमालीची शांतता जाणवली. कानात मात्र झांजांची किणकिण अजून ऐकू येत होती. मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. सकाळचे साधरण पावणे अकरा झाले होते.

दिंडी आता समाप्तीसाठी श्री मार्तंड माणिक प्रभूंच्या समाधीसमोर होती. आता दिंडीचे सर्व साहित्य  बुक्का, पदांचे पुस्तक, झेंडा, वाद्ये,  सप्ताहात  सात दिवस पारायणासाठी वापरलेली श्री प्रभुमंदिरातील श्रीमद्भागवतची पोथी, चांदीची छोटी वीणा व अखंड वीणा हे सर्व परत श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर ठेवले गेले व दिंडीची परिसमाप्ती झाली. दिंडीच्या समाप्तीनिमित्त श्रीमार्तंड माणिकप्रभुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला गेला.‌ दिंडीचा हा प्रसाद श्रीजींनी सर्वांना वाटला. ह्या पेढ्याच्या प्रसादाची गोडी अवीट होती. श्रीजी आता चैतन्यलिंगासमोर आले होते. तेथे सर्वांना पुन्हा कुरमुरे पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. श्री प्रभु परिवारातील सदस्य गण आणि प्रभुभक्त सर्वजण मुक्तीमंटपात सुखानैव बसले होते. जवळजवळ बारा तासांनी शरीर असल्याची जाणीव झाली. संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेताही कमालीचा तजेला जाणवत होता. दिंडी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान प्रत्येक चेहऱ्यावर झळकत होते. दिंडीचा महासोहळा आता पूर्ण झाला होता. दिंडीच्या गप्पांचा फड उपस्थितांमध्ये चांगलाच रंगला होता.

गेल्या आठ दिवसांचा काळ झरझर डोळ्यांपुढे तरळला. सकाळचे पारायण, माध्यान्ह काळी श्रीजींचे प्रवचन, सायंकाळी बालगोपाळांची रासक्रीडा, रात्री प्रवचन आणि भजन… संपूर्ण दिवसरात्र कार्यक्रमाची रेलचेल असायची. ह्या आठ दिवसांत बहुतेक वेळ मोबाईल बंद असायचा. त्यामुळे कदाचित समग्रपणे वेदांत सप्ताहाचा आनंद घेता आला. आपल्या आणि भगवंतामध्ये ह्या मोबाईलचे किती व्यवधान आहे हेही जाणवले. दिवसभरात कधीकधी सहा तास ही झोप न होता मन आणि शरीर अत्यंत ताजेतवाने असायचे. सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार ह्यांचा त्रिवेणी संगम वेदांत सप्ताहात अनुभवता आला. ह्या जीवनशैलीचा आपल्या जगण्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, आधीच सुंदर असलेले जीवन अजून सुंदर कसे करता येईल ह्याचा परिपाठचं माणिक नगरातील ह्या वेदांत सप्ताहाने घालून दिला. वेदांत सप्ताहाचे हे वर्णन श्री प्रभु कृपेनेच तेरा भागांमध्ये लिहून पूर्ण झाले. सब कुछ तेरा कुछ नही मेरा ह्या अंतरीच्या कृतज्ञ भावनेने श्री प्रभुसेवेची ही शब्द सुमने त्याच्याच चरणी मनोभावे अर्पण. संपूर्ण वेदांत सप्ताहामध्ये आम्हा समस्त भक्तजनांची अत्यंत दक्षतेने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री माणिक प्रभू संस्थान आणि समस्त सेवेकरी ह्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये श्री प्रभुलाच पाहून त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या श्री संस्थानाप्रती वारंवार कृतज्ञता, आपल्या विद्वत्ताप्रचुर प्रवचनांनी आमच्या अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानसूर्य, श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम… वेदांत सप्ताह आणि दिंडी तसेच श्री माणिक प्रभु संस्थान आणि त्या संबंधित कोणतीही माहिती अविलंब आणि तितक्याच प्रेमाने उपलब्ध करून देणाऱ्या श्री चिद्घन प्रभुंप्रतीसुद्धा वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. वेदांत सप्ताह जरी संपला तरी त्याचे गारुड मनावर अजूनही तसेच आहे. सप्ताह भजनातली पदे, झाजांची किणकिण, अखंड वीणेचा झंकार अजूनही कानात गुंजत आहे, बुक्क्याचा मंद परिमळ अजूनही नाकात भरून राहिला आहे. जीवनात आजवर जे शोधत होतो, ते सापडल्याचे समाधान आहे. स्वर्गिय सुख म्हणजे काय असतं हे दिंडी अनुभवल्यावर कळालं. मनातील द्वैत भाव मिटवून, आत्मानंदाची अनुभूती करून देणारा हा वेदांत सप्ताह, ही दिंडी, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी अनुभवावी आणि त्या अनुभूतीचा योग आपणा सर्वांना लवकरात लवकर यावा, ह्या श्री प्रभुचरणीच्या आणखी एक लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…दिंडी प्रत्यक्ष अनुभवताना किंवा त्याचे वर्णन शब्दात करताना मनात एकच भाव उमटतो आणि तो म्हणजे…धन्य धन्य अति धन्य आम्ही झालो, पूर्णानंद

।।श्री माणिकचरणार्पणमस्तु।।

 

वेदांत सप्ताह भाग बारावा

भोजनशाळेतून दिंडी आता नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. भोजनशाळेच्या पश्चिम दरवाजातून दिंडी माणिकनगर गावातून फिरून श्रीव्यंकम्मामाता मंदिरापर्यंत जाते आणि तेथे अल्पविराम घेऊन पुन्हा मुक्ती मंडपात येते. भोजन शाळेतून बाहेर पडल्यावर लगेचच मंदिरांच्या पुजाऱ्यांची घरे लागतात. प्रत्येक घरासमोर छान रांगोळ्या काढल्या होत्या. घरांच्या मुख्य दरवाजासमोर एक एक पाट ठेवला होता. त्याच्याभोवती फुले, रांगोळ्यांची सुंदर सजावट होती. दिंडीच्या मार्गातल्या जवळजवळ प्रत्येक घरी हीच परंपरा जपली आहे. त्या त्या घरासमोर श्रीजी ह्या पाटावर उभे राहतात आणि घरातली सौभाग्यवती श्रीजींचं औक्षण करते. घरातली पुरुष मंडळी श्रीजींना पुष्पहार घालतात, श्रीजीवर कुरमुरे उधळतात. स्वागताची एक वेगळी अशी ही परंपरा माणिकनगरात अनुभवायला मिळते. घरातले इतर सदस्यही नंतर श्रीजींना वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतात. श्रीजीसुद्धा आशीर्वादपर सर्वांवर बुक्का उधळतात. हा सर्व स्वागतसोहळा सुरू असताना पुढे वाद्यांच्या कल्लोळात प्रभुपदे म्हटली जातात. भोजनशाळेपासून  श्री शिवपंचायतन मंदिरापर्यंत “किति जनांसी भ्रम हा झाला, मी ब्रह्म न कळे जीवाला” हे सुश्राव्य पद कानी पडत होतं. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांची झेप अवकाशाला गवसणी घालणारी आहे. आपण ही पदे बऱ्याच वेळा ऐकतो. पण एका विशिष्ट स्थळी, एका विशिष्ट काळी त्याची परिणामकता अधिकच जाणवते. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर “अहं ब्रह्मास्मि” ह्या महावाक्याची अनुभूती करून देणारे हे पद ऐकणं अत्यंत रोमांचकारी होतं.

दिंडी आता श्री शिवपंचायतन मंदिरासमोर आली होती. माणिकनगरची स्थापना झाली तेव्हा, श्री माणिकप्रभुचे थोरले बंधू श्री हनुमंतदादा यांनी श्री शिव पंचायतन मंदिर बांधून घेतले. या मंदिरात मधोमध शिवलिंग असून चार कोपऱ्यांत गणपती, देवी, विष्णू आणि सूर्यनारायणाच्या सुंदर कोरीव मूर्ती स्थापित आहेत. श्री शिव पंचायतन मंदिरासमोर “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वती रमणा” ही शंकराची आरती झाली. उपस्थितांनी श्रीजींना औक्षण केलं. येथेही श्रीजींवर कुरमुरे उधळले गेले. आशीर्वाद पर बुक्का प्रत्येकावर पडत होता. अवचितपणे अधून मधून तो माझ्याही अंगावर पडत होता. बुक्क्याच्या त्या मंद दरवळीने मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. श्री शिव पंचायतन मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना श्रीजींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळाळत होते. त्यानंतर “गजवदन चित्प्रभू लीला” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंच स्तिमित करणारं पद म्हटलं गेलं.

श्री शिवपंचायतन मंदिरापासून दिंडी आता बाजाराकडे निघाली होती. ह्या मधल्या अंतरात “ऐका तुम्ही संत अनाथाच्या बोला, तुम्ही अवतरला जगकल्याणा” हे पद म्हटलं गेलं. वाटेत लागणाऱ्या घरांमधले सर्वजण श्रींजींच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पहाटे साडेतीन पावणेचारच्या सुमारासही अवघ माणिकनगर जागं होतं आणि त्या सार्‍यांना आशीर्वाद देण्यासाठी हा, श्री माणिक प्रभु गादीचा पीठाधीश रात्रभर माणिकनगरच्या गल्लीबोळातून फिरत होता. खरोखर ती रात्र मंतरलेली होती. रात्रीच्या मिट्ट काळोखला घरोघरी उजळलेले दिवे तीरोहित करत होते. श्रद्धा आणि भक्ती आज पूर्ण कलेने माणिकनगरामध्ये प्रकाशमान होती. बाजारामध्ये पोहोचताच “संत शिरोमणी खरा परंतु तें नाही बा तें नाहीं” हे पद म्हटलं गेलं. त्यानंतर दिंडी पुढे श्री विठोबामंदिरासमोर आली. येथे “गोपी निन्न कंदा बाल मुकुंदा” हे कानडी पद म्हटले गेले. येथे माणिक नगरातली बरीच कुटुंबे श्रीजींच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. कुरमुरे, बुक्क्याची उधळण चालू होती. प्रसाद रुपी मिळालेले श्रीफळ गावकरी जवळच असलेल्या ध्वजस्तंभाच्या जवळ जाऊन फोडून प्रसाद म्हणून खात होते. इतक्या पहाटे लहान मुलेही तितक्याच उत्साहाने श्रीजींचा आशीर्वाद घेत होती. दिंडीचे आपल्या घरी येणं हा प्रत्येक माणिकनगरवासीयांसाठी आनंदोत्सव होता आणि घरातील प्रत्येक जण ह्या आनंद सोहळ्यात उस्फूर्तपणे सहभागी झाला होता. श्रीजी आणि गावकरी यांच्यातील असलेले स्नेहबंध ह्यावेळी अनुभवता आले. श्रीजी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते.

दिंडी आता श्री मारुती मंदिरासमोर आली होती. एव्हाना पहाटेचे पाच वाजत होते. सुरांचा आणि वाद्यांचा कल्लोळ त्याच जल्लोषात त्याच उत्साहात सुरू होता. चैतन्याची ही अभूतपूर्व अनुभूती होती. येथेही माणिकनगरवासियांचा श्रीजींच्या स्वागतासाठी ओघ सुरुच होता. श्री मारुती रायासमोर “जय देव जय देव जय जय हनुमंता” ही आरती म्हटली गेली. त्यानंतर “प्रसवली माता तुज वायुसुता”, “गुज बोलवेना बाई, सुख सांगवेना बाई, स्फूर्ती आवरेना”, “आता जाई रे शरण जरी धरिसी चरण” ही पदे म्हटली गेली. पिंपळाच्या झाडाखाली पहाटेच्या नीरव शांततेत या पदांची गोडी प्रचंड जाणवली. वाद्यांच्या या कल्लोळात पिंपळही आपल्या पानांची सळसळ करून जणू ह्या दिंडीमध्ये आपणही सहभागी असल्याची जाणीव करून देत होता. श्री माणिक प्रभुंच्या काळापासून‌ ह्या मारुती मंदिराचे महत्त्व आहे. श्री मारुती मंदिरापासून दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरापाशी आली होती. हे अंतर जेमतेम दहावीस पावलांचे असेल. ह्या वाटेवर “स्फुरद्रुपी श्री जगदंबे, सच्चिदानंद प्रतिबिंबे” चा जयघोष झाला. दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या आवारात आली होती. आज श्री देवी व्यंकम्मा अष्टभुजा रूपात सजली होती. देवीच्या काठी हातात शस्त्रे होती. महाप्रसादाचे भोग देवीला अर्पण करण्यात आले होते. देवीसमोर अनेक ओट्या भरल्या होत्या. दिंडीतून आपली लेकरं आपल्याला भेटायला आलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री व्यंकम्मामातेचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक स्त्रियांनी देवीची ओटी भरली. देवीच्या समोरील मंडपात, आजूबाजूच्या ओसरींमध्ये गायक आणि वादक, गावकरी आणि दिंडीतील सहभागी मंडळी अल्पविराम घेत होती. श्री व्यंकम्मा माता मंदिरात पंधरा-वीस मिनिटांसाठी अल्पविश्रांती घेतली जाते. दिंडी मधील सहभागी सर्व जणांना चहा चिवडा आणि उपमा दिला गेला. भजनांचा झरा मात्र देवी मंदिरात अखंड वाहत होता. मंदिराच्या ओसरीत थोडावेळ बसलो. पहाटेच्या गार वातावरणात गरमागरम चहा आणि उपमा मनाला तजेला देऊन गेला. पंधरा-वीस मिनिटांच्या अल्पविरामानंतर “येई येई ग चित्कमले, चिन्मधु उन्मनी बाले”, “व्यंका नाम जगज्जननी, कुलभूषण ही अवतरली हो” ही देवीची पदे म्हटली गेली.त्यानंतर “जयदेवी जयदेवी जय जय रेणुके”, “जयदेवी जयदेवी जय निर्विकल्पे” आणि “व्यंके तुज मंगल हो, माणिकश्री मंगल हो” ह्या देवीच्या आरत्या म्हटल्या गेल्या. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून दिंडी आता प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत निघाली होती. दिंडीच्या स्वागतासाठी सूर्यनारायणही सज्ज होत होता. पूर्व क्षितिजावर केशरी रंगाची छटा दिसू लागली होती. पहाटेच्या सहाच्या सुमारास पक्ष्यांची किलबिल आजूबाजूच्या झाडांवरून ऐकू येत होती.

श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या हाताला वळल्यावर प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत जाताना “भासे एकचि हे दो अंग” हे पद म्हटलं गेलं. उगवत्या सूर्याबरोबर दिंडीच्या पुढे असणाऱ्या गावातील मुलांच्या अंगात जणू नवचैतन्यच संचारलं होतं. रात्रभर दिंडीतील भजनानंदाची लयलूट केल्यावरसुद्धा कोणत्याही प्रकारची ग्लानी कोणाच्याही चेहर्‍यावर दिसत नव्हती. दिंडीच्या सुरुवातीचा उत्साह प्रत्येकात अजूनही तसाच कायम होता किंबहुना तो अधिकच दुणावला होता. श्रीप्रभुच्या चैतन्याची ही वेगळीच मिसाल होती. हा अनुभव अत्यंत स्फूर्तिदायक होता. पुढे महाद्वारापासून जुन्या वाड्यापर्यंत चालताना “ब्रह्म मूल जग ब्रम्ह ब्रम्ह जग अहं ब्रम्ह मतवाला है” आणि “गुरु वचना कानी घेऊया, जगी अखंड मुक्ताची राहू” तसेच “ऐका विनवणी तुम्ही संतभूप” ही पदे म्हटली गेली. झांज आणि ढोलकीचा आवाज अगदी टिपेला पोहोचला होता. पूर्वी असलेल्या जुन्या वाड्याच्या उत्तरद्वारात “जय देव जय देव दत्ता अवधूता” श्री दत्तात्रेयांची आरती म्हटली गेली. सूर्यनारायण आता क्षितिजावर आपले अस्तित्व दाखवू लागला होता. त्याचं ते केशरी बिंब निळाशार आकाशामध्ये अधिकच मोहक वाटत होते. दिंडी आता श्री सिद्धराज प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “देव जय देव जय सिद्ध राजा” श्री सिद्धराज प्रभुंची व तद्नंतर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” ही मार्तंड माणिक प्रभुंची आरती म्हणून झाली. श्री सिद्धराज प्रभु समाधी आणि मुक्तिमंटप ह्यामधील मोकळ्या जागेत दिंडी मधले सहभागी सर्व जण आले होते. येथे श्री सिद्धराज माणिक प्रभु विरचित “प्रभु मजकडे कां ना पाही रे” हे पद म्हटलं गेलं. येथे भजनानंदात उस्फूर्त उड्या मारणाऱ्या प्रभुभक्तांचा जोश काही वेगळाच होता. घड्याळाचा काटा जसा पुढे सरकत होता, तशी दिंडीची ही नशा प्रत्येकास मदमस्त करत होती. त्यातच “येई चेतन सांबा मन हे आवरी, हृदयाकाशी उठती मी मी लहरी” हे मार्तंड माणिकप्रभुंचं अद्वितीय पद म्हटलं गेलं. ह्या पदाच्या शेवटी सकलमत प्रभु नांदे जिकडे तिकडे, अशी ओळ आहे. दिंडीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक जण आता प्रभुमयच झालेला होता. मुक्तिमंटपासमोरील नवीन पायऱ्यांवरून उतरताना “मी पण गेल्या हा देह जावो वा चिर राहो” हे पद गायलं केलं. पुढे समोरील मातोश्री लक्ष्मीबाई उद्यानामध्ये “सुरत खूब अजब दरसायो, राजा चेतन हर घट अपनी” हे पद म्हटलं गेलं. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. साधारण आठचा सुमार असावा. मंदिरात आलेले प्रभुभक्त श्रीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्यानात आले होते. श्रीजीही त्यांना अतिशय उत्साहात भेटत होते. नाना प्रकारच्या पुष्पमाळा श्रीजींना अर्पण केल्या जात होत्या. बुक्क्याची उधळणही अविरत सुरूच होती. सकाळच्या सुखद वातावरणात बुक्क्याचा तो सुगंध मनास अधिकच प्रसन्न करीत होता. माथ्यावर छत्र धरलेली श्रीजींची मूर्ती अतिशय लोभस वाटत होती आणि कित्येकदा अशाच प्रकारे नगरप्रदक्षिणेला निघालेले साईबाबा मला त्यांच्यात दिसत होते… बाबांची नगरप्रदक्षिणाही अशीच असावी, अशी अनुभूती मात्र मला दिंडीच्या निमित्ताने मिळत होती.

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग अकरावा

दिंडी

भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष आसमंत निनादून टाकत होता आणि त्या मंगल वातावरणात रात्री सव्वा अकराच्या सुमारास श्रीजींनी दिंडीसाठी आपल्या निवासस्थान, नागाई येथून प्रस्थान ठेवले. काठाचे पांढरे शुभ्र धोतर, अंगात पांढराशुभ्र कुर्ता, डोक्यावर असलेली श्री प्रभु गादीची टोपी, आणि हातामध्ये चांदीची सुंदर नक्षीदार काठी अशी श्रीजींची मूर्ती अत्यंत मोहक दिसत होती. श्रीजींच्या चेहऱ्यावर फाकलेले दिव्य तेज सहज टिपता येत होते.‌ पुढे दिवट्या, संबळ, ढोल ताशे, अब्दागिरी घेऊन असलेले भालदार चोपदार, नित्यसवेत असलेला ब्रह्मवृंद, पाठीमागे छत्र घेऊन श्रीजींवर धरून उभा असलेला सेवेकरी, असा श्री संस्थानाला साजेसा थाट श्रीजींच्या प्रस्थानावेळी होता. श्रीजींच्या कुटुंबासह अनेक प्रभुभक्त श्रीजींच्या पाठीमागून मुक्ती मंडपाच्या दिशेने चालत होते. श्रीजींपाठून चालताना आपणही श्री प्रभु परिवाराचाच भाग आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रभुभक्तांच्या सोबत चालताना माझंही मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. अत्यंत त्वरेने भक्तांची ही मांदियाळी मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन उभी ठाकली. मुक्तीमंटप आतून पूर्ण भरला होता, अनेक प्रभुभक्त मुक्तीमंटपाच्या बाहेरील मोकळ्या जागेतही उभे होते. सुदैवाने मला श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीच्या अगदी समोर उभे राहायला जागा मिळाली.

“श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगीमहाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद‌ निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय…” श्री माणिक प्रभुच्या परवलीच्या गगनभेदी ब्रीदावळीने आसमंत दुमदुमून गेला. “नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय”चा मंगल गजर झाला. दिंडी सुरू व्हायच्या आधी दिंडीचे सर्व साहित्य जसे बुक्का, दिंडीच्या पदांचे पुस्तक, सकलमत संप्रदायाचा झेंडा हे श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर ठेवले होते. श्री मार्तंड माणिकप्रभुंनीच आपल्या कारकीर्दीत दिंडीची सन १९०० मध्ये मुहूर्तमेढ रोवली.‌ दिंडीचा हा प्रणेता श्री मार्तड माणिकप्रभु, जो ज्ञानमार्तंड, बोधमार्तंड, चिन्मार्तंड अशा अनेक रूपांमध्ये वर्तत आहे, आज बहुरंगी फुलांचा, दागिन्यांचा साज लेऊन दिंडीचा आनंद लुटायला आलेल्या या लेकरांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी सरसावला होता. श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीप्रमाणेच त्यांच्या नंतरच्या पिठाचार्यांच्या समाधीस सजवण्याची एक विशिष्ट पद्धत श्री माणिकनगरला पाहायला मिळते. समाधीस झालर असलेले उंची वस्त्र, त्यावर सुंदर नक्षीकाम असणारी रेशमी शाल.  दोहोंची रंगसंगतीही आपल्या मनाचा चटकन ठाव घेईल अशाप्रकारे अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली असते. समाधीच्या पुढील बाजूस दागदागिने आणि फुलांच्या माळांची नेटकेपणे केलेली मांडणी मन मोहून टाकते. समाधीच्या वरच्या बाजूला फुलांची निमुळती होत जाणारी मुकुटाकार मांडणी, त्यावर खोचलेला शिरपेच जणू सद्गुरुचे सगुण रूपच साकार करते. मुख्यत्वेकरून गुलाब फुलांच्या आणि सुगंधित मोगऱ्याच्या साजामध्ये सकलमत संप्रदायाचा झेंडा आसेतुहिमाचल फडकवणारा हा ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आज मध्यरात्रीही स्वयंतेजाने झळाळत होता. समोर महानैवेद्यासाठी फळफळावळ आणि सुकामेवा ठेवला होता. धुपाचा मंद सुवास मुक्तीमंटपात भरून राहिला होता. धुराच्या त्या वलयांत हा मार्तंडप्रभु समस्त भक्तजनांना आत्मसुखाची अनुभूती द्यायला आज सज्ज झाला होता.

श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” आणि “मार्तंड पराक्रमचंड कीर्ती उद्दंड शमवी पाखंडा, उंचवी प्रभो निज सकलमताचा झेंडा” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. त्याच्यानंतर सर्वांना आरती देऊन झाल्यावर, श्रीजी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर गाभार्‍या बाहेर उभे राहिले. तेथे श्री प्रभुपरिवारातील सर्व सदस्यांनी श्रीजींना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. श्री प्रभु परिवारातील सदस्यांनंतर इतरही प्रभुभक्त गर्दीतून वाट काढत श्रीजींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रीजींना पुष्पमाळा अर्पण केल्या. श्रीजींनीही आशीर्वाद स्वरूप प्रत्येकावर बुक्का उधळला. अगदी पहिल्या रांगेत असल्यामुळे माझ्याही अंगावर हा बुक्का येऊन पडला. बुक्क्याच्या त्या सुगंधी दरवळीने मन नखशिखांत मोहरून गेले. फिक्कट पिवळसर असलेला हा सुगंधित बुक्का, ज्वारीचे पीठ, भंडार आणि अनेकोत्तम सुगंधी द्रव्यांनी युक्‍त असतो. हा बुक्का श्री मार्तंड प्रभुंचा प्रसाद असतो. दिंडी दरम्यान सर्व समाधींवर अर्चन म्हणून व सकल भक्तजनांवर प्रसाद रूपाने उधळण्यासाठी हा बुक्का वापरला जातो.

ह्यानंतर सकलमत संप्रदायाची “उपदेश रत्नमाला” आणि तदनंतरची “आर्या” म्हटली गेली. श्रीजींनी पहिली ओळ म्हणावी आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठून म्हणावं, प्रत्येक कडव्यानंतर “श्रीमाणिक, जयमाणिक, हरमाणिक, हरिमाणिक, चिन्माणिक, सन्माणिक, जय जय हो सकतामता विजय हो”चा गजर झांजांच्या किणकिणीत उपस्थित प्रभुभक्तांमध्ये चैतन्य फुंकत होता. श्रीजींच्यासमोर, त्यांना मार्गक्रमण करता येईल अशा रीतीने जागा सोडून दोन्ही बाजूला श्रीप्रभु परिवारा समवेत, गावकरी आणि प्रभुभक्त रांगेत उभे असतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे ही श्री संस्थानाचे परम विशेष आहे. दिंडीच्या सुरुवातीलाच “आत्मा एकची सर्वांतरी हो” हे श्री मार्तंड माणिकप्रभु विरचित पद म्हटले गेले. हातामध्ये झांज, टाळ घेऊन भक्तजन आणि गावातील मंडळी दिंडीच्या भजनानंदात मधून मधून त्या विशिष्ट तालावरती उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. ह्या उड्याही अत्यंत लयबद्ध असतात. स्वतः उपस्थित राहून हे सर्व अनुभवल्याशिवाय त्या आनंदाची अनुभूती येणे केवळ अशक्य आहे. दिंडी अनुभवायची माझी उत्सुकता पाहून श्री आनंदराज प्रभुंनी मला पुढे यायला सांगितले. त्यामुळे दिंडीच्या अगदी शेवटपर्यंत हा सुखसोहळा मला आकंठ अनुभवता आला. “एकची सर्वांतरी हो आत्मा” ह्या पदानंतर दिंडी श्रीमार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीच्या मागच्या बाजूनं श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीसमोर  आली.‌ संपूर्ण दिंडीमध्ये प्रभुभक्तांची चाल अत्यंत मंदगतीने होत असते. अखंड प्रभुनामाचा आणि वाद्यांचा गजर आपल्या मनास सतत ताजातवाना ठेवत असतो. ह्याकरिता दिंडीत देह आणि मन बुद्धीने सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.

श्री शंकर माणिक प्रभुंनी त्यांच्या कारकिर्दीत दिंडीला एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली. त्यांचा वेदांत विषयाचा व्यासंग प्रचंड होता. श्री शंकर माणिक प्रभु महाराजांच्या वेदांतविषयक लेखांचा संग्रह “ज्ञानशांकरी” ह्या पुस्तक रूपात उपलब्ध करून श्री संस्थानाने समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. काहीसे अबोल पण वेदान्ताचे पूर्ण अधिकारी असलेले श्री शंकर माणिक प्रभुमहाराज अबोलीच्याच फुलांनी नटले होते. समाधीवरील मोत्यांच्या माळा आणि गुलाबांचे हार चित्त वेधून घेत होते. समाधीवरील माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल अतिशय आकर्षक दिसत होते. येथेही फळांचा आणि सुक्यामेव्याचा नैवेद्य प्रभुस अर्पण केला होता.‌ आळवणी होवून  “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या” ही श्री शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली.‌ नंतर श्री ज्ञानराज प्रभुंनी नवीनच रचलेली “आरती शंकरगुरुनाथा, सद्गुरू माणिक अवधूता” ही आरतीसुद्धा म्हटली गेली.  येथे “किती सुख हे, किती किती सुख हे” हे शाश्वत सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देणारे प्रभुपद म्हटले गेले. भजनानंदात पदागणिक प्रभुभक्तांचे उचंबळणे सुरूच होते. श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीनंतर दिंडी आता मुक्तीमंटपात ह्या दोन्ही पीठाचार्यांच्या समाधींच्या मधोमध असलेल्या श्री चैतन्य लिंगासमोर आली. श्रीजींनी श्री चैतन्यलींगासमोर श्री शंकराची “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” ही आरती केली. त्यानंतर “आता जाऊ चला आम्ही पाहू चला, गुरुराज प्रकट प्रभुराज प्रकट अवधूत आला” हे तनमन स्फुरवणारं पद अत्यंत जोशात म्हटलं गेलं. त्या-त्या पदांचा फलक काठीवर उंच धरला जात होता, त्यामुळे कुठल्याही कोपर्‍यातून भक्तांना त्या पदाचा आनंद लुटता येत होता. सूर आणि वाद्यांच्या त्या कल्लोळाने आता दिंडीची नशा शरीरामध्ये हळूहळू भिनायला लागली होती.‌ शरीर नकळत पदांच्या तालावर ठेका धरू लागलं होतं. चैतन्याची ही अनुभूती अत्यंत आनंददायी होती. श्रीजींनी उधळलेला बुक्का अधून मधून अंगावर पडत होता आणि त्याच्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या.

मुक्तीमंटपातून दिंडी आता शेजारील नव्यानेच बांधून पूर्ण झालेल्या सिद्धराज मणिकप्रभुंच्या समाधीसमोर दाखल झाली. अत्यंत कनवाळू असलेले, वाचासिद्ध श्री सिद्धराज मणिकप्रभु यांची समाधीसुद्धा रंगबिरंगी अनेकविध फुलांनी छान सजवली होती. समाधीला चोहीकडून केळीचे खांब लावले होते. कागडा आणि अबोलीच्या माळा छतावरून रुळत होत्या. येथेही फळांचा आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य श्री प्रभुला अर्पण केला होता. नव्याने बांधलेल्या ह्या वास्तूचे संगमरवरी बांधकाम अत्यंत रेखीव आहे. रात्रीच्या वेळी एकांतात येथे बसणे मनास अपार शांती देऊन जाते. असो. “जय देव जय देव जय सिद्धराजा, श्रीसिद्ध राजा, आरती ओवाळू तुज सद्गुरुराजा” आणि “आरती सिद्धस्वरूपाची, सनातन सद्गुरुभूपाची” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. तदनंतर श्री सिद्धराज प्रभु नित्य गुणगुणत असलेले आणि मनास उभारी देणारे “प्रभु जवळी असता, असता मग चिंता मज कां?” हे पद म्हटले गेले. आपल्या कारकीर्दीत अनेक भक्त जणांचे कल्याण करणाऱ्या, सर्वांस समदृष्टीने पाहणाऱ्या ह्या कनवाळू‌ महात्म्याचे पद ऐकताना अनेक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माणसे जोडण्याची अद्भुत कला श्री माणिक प्रभुंनंतर प्रत्येक पीठाचार्यने हिरीरीने जोपासली आणि आजही जोपासत आहेत. आज दिंडीत जमलेला अफाट जनसागर हे त्याचेच द्योतक होता. श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या आळवणी नंतर दिंडी आता मुक्ती मंडपाच्या आवारात असलेल्या औदुंबराखाली आली. येथे “अवधूता शरण रिघाल्ये, देहींच ब्रह्मसुख फळलें, किती विस्मय नवल हे झाले, ब्रम्हासी ब्रह्मपण आले” हे अवीट गोडीचं पद म्हटले तेव्हा प्रत्येक जण भजनाच्या आनंदात न्हाऊन निघत होता. सकलमत संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत होता. बुक्क्याची श्रीजींच्या हातून मुक्त हस्ते उधळण होत होती. हा प्रसाद रुपी आशीर्वाद ज्याला मिळत होता तो, कृतार्थतेने अगदी धन्य धन्य होत होता. औदुंबरा खालून उत्तर दरवाजातून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या कैलास मंटपात आली होती.

गाभाऱ्यामध्ये श्री प्रभु आपल्या लेकरांची सुहास्यवदनाने जणू वाटच पाहत होता. श्रीजींनी बुक्का श्री प्रभुसमाधीवर उधळला. तेथे “जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका तव पद मोक्ष आम्हा न स्मरू आणिका”, तसेच “आरती सगुण माणिकाची, स्वरूपी जगत्प्रसुत्याची” ह्या दोन आरत्या अत्यंत उत्साहात म्हटल्या गेल्या. त्यानंतर “नित्य वंदू त्या माणिक पायां” आणि “मनोहरनंदन की जय हो”  ही दोन पदे म्हटली गेली. भक्तांचा आनंद आता अगदी टिपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद लुटताना कोणाच्याही ऊर्जेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नव्हती. कैलास मंटपातून दिंडी पुढे आनंद मंटपात आली. येथे “आम्ही चुकलो निजहित कामा, तू चुकू नको आत्मारामा” हे पद म्हटलं गेलं. येथे सर्वांना खडीसाखर आणि लवंग देण्यात आला.

दिंडी आता पुढे आनंद मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या आणि श्रीमाणिकनगरचे आद्यदैवत असलेल्या, श्री सर्वेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. श्रीजींनी श्रीसर्वेश्वराचे दर्शन घेतले. येथे “जय देव जय देव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” आणि श्री वीरभद्राची आरती झाली. श्री सर्वेश्वरासमोर “हा शैव नव्हे मनुजाधम मूढ तो ऐका, मी सांब नव्हे कोण मी धरी जो शंका” हे अंतरी वसलेल्या सांब सदाशिवाची जाणीव करून देणारे पद गायले गेले.‌ येथे श्रीजींनी हाती झांज घेऊन स्वतः वाजविले. उधळत जाणाऱ्या बुक्क्यासह आता प्रत्येक जण हळूहळू पूर्णपणे माणिक रंगात रंगत होता.

दिंडी आता श्री सर्वेश्वर आणि औदुंबर ह्या मधील मोकळ्या जागेत म्हणजेच दक्षिण पटांगणात आली होती. येथे श्री मनोहर माणिकप्रभु विरचित “सख्या माझ्या माणिकाला कोणि तरी दावा” हे  करुण रसाने ओतप्रोत भरलेले पद म्हटलं गेलं. दक्षिण पटांगणातून प्रभू मंदिराचा कळस अत्यंत मोहक दिसत होता.  रंगबिरंगी विद्युतझोतामुळे  रात्रीच्या अंधारात कळसाचा भाग अधिकच नयनरम्य दिसत होता. दक्षिण पटांगणातून दिंडी दोन पावले पुढे चालून औदुंबराखालील श्री अखंडेश्वरासमोर आली. तेथे “श्री जय देव जय देव दत्ता अवधूता” ही श्री दत्तगुरूंची आरती झाली आणि त्यानंतर “मायामलधूत आम्ही अवधूत” हे पद म्हटले गेले. त्यानंतर समोरील मंदिरात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घेऊन दिंडी आता श्री प्रभुसमाधीच्या पाठी असलेल्या श्री मनोहर माणिक प्रभुंच्या समाधी समोर येऊन थांबली. श्री माणिक प्रभुंचा लाडका कुत्रा, “भरोसा”च्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीजी आणि ब्रह्मवृंदाने तळघरामध्ये असलेल्या श्री मनोहर प्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि येथे “जय देव जय देव जय जय गुरुभूपा, आरती ओवाळू तुज सच्चिद्रूपा”, “जयदेव जयदेव मनोहर गुरु स्वामीन्” आणि “आरती सद्गुरु रायाची मनोहरप्रभुच्या पायाची” ह्या तीन आरत्या म्हटल्या गेल्या. त्यानंतर श्री मनोहर प्रभूंनी रचलेले “सखया जावे निजगुरुचरणा शरणा झडकरी” हे दिव्य पद म्हटले गेले. ह्या पदाचं वैशिष्ट्य असं की मुखडा जरी मराठीत असला तरी पहिलं कडवं संस्कृतमध्ये, दुसर कडवं कन्नडमध्ये, तिसरं कडवं हिंदीमध्ये आणि चौथं कडवं मराठीत आहे. चारही कडवी आपण एकाच चालीत म्हणू शकतो. इथे पद म्हणत असताना डोक्यावर छत्र धरलेले श्रीजी मला एक क्षण साईबाबाच वाटले. तीच लकब, तशीच दाढी. योगायोगाने साईबाबा शिर्डीत प्रकटण्याआधी श्री माणिक प्रभुंच्या हयातीत, त्यांच्या दरबारात येऊन श्री प्रभुंकडून अनुग्रह घेऊन गेले होते. झटकन जाऊन श्रीजींना वंदन करून आलो, त्यावेळी बुक्क्याची मूठभर उधळण माझ्यावर झाली. ते सुगंधलेपीत शरीर घेऊन उत्तर पटांगणात श्री मुख्य प्राण मारुतीच्या समोर हजर झालो. येथे लगेचच “नरतनु व्यर्थ गमाई, नही ढूंढा अपना माणिक सांई” हे पद म्हटलं गेलं. श्रीजींचं साईबाबांसमान दिसणं आणि पुढच्या पदातही साई शब्द येणं, ह्या योगायोगा बद्दल मी स्वतःला कृतार्थ समजत होतो.

श्री प्रभु मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून दिंडी आता महाद्वारातून बाहेर पडत होती. महाद्वाराच्या पायऱ्यांवर “श्रुतीधर्म रक्षुनि सकलमताते वंदा” हे पद म्हटलं गेलं. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणातून दिंडी आता जुन्या भंडारखान्यात असलेल्या श्री अन्नपूर्णेश्वरी देवीसमोर आली होती. येथे श्री अन्नपूर्णा देवीची आरती म्हटली गेली आणि त्यानंतर “श्रीदेवी त्रिपुरसुंदरी माय पाव” हे पद म्हटले गेले. श्री अन्नपूर्णेचा जयघोष झाला. श्री अन्नपूर्णा देवीच्या मंदिरापासून भोजन शाळेपर्यंत माझ्या अत्यंत आवडीच्या “कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा” ह्या पदाची गुंज आसमंतात करून राहिली. भोजनशाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्वांना सरबत दिले गेले. दिंडी आता भोजनशाळेत येऊन थांबली.  येथे “कोण्या सुकृत दैव हे फळले, गुरुहस्तामृत शिरी पडले, मन माझे वळले, स्वहितगुज कळले” हे पद म्हटले गेले. इथे थोडावेळ बसायला मिळाले. पण कोल खेळणारे मात्र रासक्रीडेचा आनंद लुटत राहिले. सुर आणि वाद्यांचा कल्लोळ,  टिपऱ्या घेऊन जलद गतीमध्ये कोल खेळणारे भक्तजन… पहाटेच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारासही भोवतालचं वातावरण भारलेलं होतं. निद्रादेवीचा थोडासाही प्रकोप आज मला जाणवत नव्हता. “चैतन्यदेव” हेच मुख्य दैवत असणाऱ्या सकलमत संप्रदायाच्या पुण्यभूमीत चैतन्याची अनुभूती जागोजागी येत होती.  भोजन शाळेतील ह्या भारलेल्या वातावरणात सकलमत संप्रदायाचा झेंडा आज अधिकच डौलाने फडकत होता…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग दहावा

कोलच्या खेळानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीला तयार होण्यासाठी यात्री निवासावर आलो. झटपट स्नान उरकले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा श्रीप्रभु मंदिरात हजर झालो. अनेक प्रभुभक्तांकडून दिंडीची ख्याती ऐकली होती. दिंडीतला एकही क्षण मला नजरेआड करायचा नव्हता. सर्वप्रथम श्रीप्रभु मंदिरात श्री माणिक प्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आज हा भक्तकार्यकल्पद्रुम सार्वभौम श्रीगुरु पूर्ण कलेने नटला होता. चैतन्याची अनुभूती गाभाऱ्यात सुखासनी पहुडलेल्या श्रीप्रभुला पाहून क्षणोक्षणी येत होती. त्या गर्दीतही मनाचा बांध फुटला आणि बसल्याजागीच डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाश्रु म्हणतात कदाचित हेच असावेत…‌ गेल्या आठवडाभरात हा नटनागर दररोज लोभसपणे समोर आला होता. आजही श्रीप्रभुची ती प्रत्येक छबी हृदयामध्ये तशीच कोरलेली आहे. एखाद्याने आपल्या मनाचा ताबा घेणे म्हणजे काय? हे श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होताना कळते. श्रीप्रभु जेव्हा नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो, तेव्हा आपल्या मनाची होणारी भावविभोर अवस्था, चराचरातील श्रीप्रभुचे अनुभवायला येणारे चैतन्य, मनात आलेले क्षुद्रातीक्षुद्र लाडसुद्धा श्रीप्रभुने लडीवाळपणे पुरवणे, असे जेव्हा वारंवार घडते, तेव्हा श्रीप्रभुने नक्कीच आपला हात त्याच्या हातात घेतला आहे, ह्याची जाणीव होते आणि ही जाणीव अत्यंत सुखावह आणि तितकीच आश्वासकही असते.

पूर्ण तेजाने झळाळत असलेल्या श्रीप्रभुचे वर्णन करायला आज कदाचित शब्दही अपुरे पडावेत. सौंदर्य जणू दास बनून श्रीप्रभु चरणी अदबीने, नजाकतीने उभं होतं. रत्नांच्या, मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा गळाभर ऐटीत रुळत होत्या. अबोलीचे नाजूक हार, मोगऱ्याचा सुगंधी हार, पिवळ्या झेंडूचा हार, शेवंतीचा जाडजूड हार आणि गुलाबांच्या अनेक प्रकारच्या भरगच्च हारांमध्ये श्रीप्रभुला सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. श्रीप्रभु समाधीच्या वरच्या बाजूला शेंदरी, पिवळे, लाल, गुलाबी गुलाबांचे गुच्छ श्रीप्रभुच्या रूपाला चारचाँद लावत होते. गुलाबांच्या ह्या तोबा गर्दीमध्येही लाल टपोरा जरबेरा आपलं अस्तित्व दाखवून देत होता. श्रीप्रभु समाधीस अगदी बाहेरच्या बाजूस घातलेल्या भरगच्च गुलाबाच्या हाराला, तगरीच्या फुलांची सुंदर जाळी विणली होती. लाल आणि पांढया रंगसंगतीतला तो हार अत्यंत आकर्षक दिसत होता. श्रीप्रभु समाधीभोवती केळी लावल्या होत्या, जणू कर्दळीवनातच श्रीप्रभु आज विहरत होता. श्रीप्रभु समाधीवरील छत्रावरून मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या आणि त्या माळांच्या शेवटी झेंडूची फुले आकर्षकपणे माळली होती. समोरच श्रीप्रभुच्या पादुका दृष्टीस पडत होत्या. बाजूला चांदीच्या समया मंदपणे तेवत होत्या. श्रीप्रभुला पंचपक्वान्नांचा, डाळिंब, चिकू, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, अननस, टरबूज, अंजीर इत्यादी फळांचा नैवेद्य अर्पण केला होता. नैवेद्याच्या भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. चारी बाजूंना समया तेवत होत्या. ह्या सर्व मांदियाळीत समोर पत्रावळीत असलेला भाजीभाकरीचा नैवेद्य लक्ष वेधून घेत होता. श्री माणिकप्रभु महाराज नेहमी माधुकरीचे अन्न खात. श्री प्रभुंना चटणीभाकरी खूप आवडायची. श्रीसंस्थानाने ती परंपरा आजतागायत जपली आहे. आजही श्रीप्रभुंना पंचपक्वान्नांचा नैवेद्य असला, तरी मध्यभागी माधुकरीचे भिक्षान्नच असते. असो, सच्चिदानंद दयाघनाच्या ह्या विलोभनीय रूपाला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच बोटे डोक्याला लावून मोडली. तुझा हा आनंद सोहळा‌ मला संपूर्णपणे अनुभवायला मिळू देत, अशी विनंतीवजा प्रार्थना श्रीप्रभुला केली आणि श्रीजींच्या निवासस्थानी नागाई येथे पोहोचलो. ढोल, ताशे, संबळ वाजवणारे श्रीजींच्या निवासस्थानाच्या आवारात उभे होते. भालदार, चोपदार लाल रंगाच्या वेषात मावळ्यांसारखी पगडी घालून अब्दागिरी घेऊन सज्ज झालेले होते. एक सेवेकरी श्रीजींवर धरण्यात येणारी छत्री घेऊन सज्ज होता. अंगणामध्ये जवळपास दहा फूट लांबीची सुस्वागतमची रांगोळी मन वेधून घेत होती. प्रभुभक्त घोळक्याघोळक्याने जमून उभे होते. दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झालेला प्रत्येक जण आता दिंडीसाठी नागाईतून श्रीजींच्या प्रस्थानाचीच वाट पाहत होता.

दिंडीदिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन पंढरपुरची वारी उभी राहते. वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी कार्तिकी एकादशीला संतांच्या आणि देवाच्या पालखीपुढे भजन करत नाचत जातात त्याला दिंडी असे म्हणतात. संस्कृत भाषेतदिंडि:” आणिदिण्डिर:” असे शब्द आहेत, आणि या दोन्ही शब्दांचा अर्थएक विशिष्ट प्रकारचे वाद्यअसा आहे. त्यामुळे वाद्यांच्या गजरात होणाऱ्या हरिसंकिर्तनास दिंडी म्हणता येईल. इतिहासामध्येही आपल्याला किल्ल्यांच्या दिंडी दरवाज्याचे वर्णन अनेकदा आढळतेमराठीत दिंडी ह्या शब्दाचे लहान दरवाजा आणि पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याला स्वर्गाची दारे उघडावी, या हेतूने वारकरी लोक भजन करतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटचालीला दिंडी हे नाव पडले अशी कल्पना आहे. किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात, त्यावरून दिंडी हे नाव आले असावे, असेही एक मत आहे. भजनी मंडळातील एक जण दिंडी नावाचे वीणेसारख एक वाद्य पुढे वाजवीत जातो बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी असे म्हणतात. असो. भागवत सप्ताहच्या पारायण पद्धतीत असे नमूद केले गेले आहे की, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी वाजत गाजत भगवंताचे स्मरण करत मिरवणूक काढावी हरिसंकिर्तन करीत रात्री जागरण करावे. श्री मार्तंड माणिकप्रभुंना रात्री जागरण, हरिसंकीर्तन मिरवणुकीची ही कल्पना फारच आवडली आणि त्यांनीच ह्या मिरवणुकीला वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे स्वरूप देऊन श्री संस्थानाच्या लौकिकास साजेल, असा कार्यक्रम आखला त्यास दिंडी हेच नाव दिले.

श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज हे स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आणि प्रत्युत्पन्नमति विद्वान असल्यामुळे दिंडीच्या कार्यक्रमात जागच्याजागी पदे रचून त्यांनी गायल्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. दिंडीच्या कार्यक्रमात श्रीजी स्वस्वरूपाशी इतके तादात्म्य पावत की त्यांना कशाचेही भान उरत नसे. पुढे १९३६ साली श्रीजींच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु महाराज श्रीसंस्थानाचे पुढचे पीठाचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी, अधिक भाद्रपद मासात श्रींच्या मासिक आराधनेस जोडून, आपल्या कारकीर्दीचा प्रथम वेदांत सप्ताह उत्सव साजरा करून, दिंडीच्या भव्य कार्यक्रमाने त्याची सांगता केलीश्री शंकर माणिक प्रभुनींच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास आणि दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली, जी अद्यापही चालू आहे.

पुढे १९३७ सालच्या फाल्गुन महिन्यात श्रीजींच्या प्रथम पुण्यतिथीस असे ठरले की, श्रीजींच्या पुण्यतिथीस जोडून,, प्रतिवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीपासून वेदांत सप्ताह उत्सव श्रीजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जावा. १९३७ ते १९४३ सालापर्यंत हा कार्यक्रम अत्यंत वैभवात साजरा केला गेला. १९४४ साली श्रीमाणिक नगरात प्लेगचा प्रकोप होता. त्यात श्री शंकर माणिकप्रभु महाराज स्वतः उदर व्यथेने आजारी होते. त्यांनी सर्व भक्तांस पत्रे पाठवून कळवले की, यंदा वेदांत सप्ताह होऊ शकणार नाही. योगायोग असा की, वेदांत सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ होत असे त्याच्या दोनच दिवस आधी श्री शंकर माणिकप्रभु महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि म्हणूनच १९४६ सालापासून वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेस प्रारंभ होऊ लागला चतुर्थीला श्री मार्तंड माणिकप्रभु महाराजांची पुण्यतिथी साजरी होऊन, नवमीस दिंडी असा क्रम प्राप्त झाला, तो आजतागायत चालू आहे.

दिंडीत म्हणावयाच्या पदांची यादी एका फलकावर लिहून ते फलक दिंडीत मिळवण्याची पद्धत श्री शंकर माणिकप्रभु महाराजांनी घालून दिली. भक्तजन फलकावरील पदांचा क्रमांक पद्यमाला या पुस्तकातील त्या पदांचे पृष्ठ क्रमांक पाहून पद्यमालेच्या आधारे पदे म्हणत असत. बऱ्याच भक्तांकडे पद्यमाला नसते अथवा पदेही मुखोद्गत नसतात, म्हणून दिंडीत भाग घेऊनही त्यांना पदे म्हणता येत नाहीत. काही पदे, आरत्या ह्या सप्ताह भजनाच्या पुस्तकातील असल्यामुळे भक्तांचा बराच वेळ पुस्तकाचे पाने उलटण्यात जातो आणि त्यामुळे एकंदरीतच रसभंग होण्याची पाळी येते. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांनी दिंडीत म्हटल्या जाणाऱ्या पदांची एक क्रमवार पुस्तिका प्रकाशित केली आणि त्याची मांडणी अशी केली की एकदा पुस्तिका हातात धरल्यावर दिंडी संपेपर्यंत पाने शोधण्याची वेळच येऊ नये. त्या अनुषंगाने १९९४ सालीदिंडीची पदेही पुस्तिका छापून प्रसिद्ध झाली. आजही दिंडीमध्ये वेळोवेळी म्हटल्या जाणाऱ्या त्या त्या पदांचे फलक उंच धरले जातात, जेणेकरून सर्व भक्तांना ती ती पदे फलक पाहून म्हणता येतात.

मनामध्ये दिंडीच्या इतिहासाची पाने उलगडत असतानाच भक्तकार्य कल्पद्रुमचा जोशपूर्ण जयघोष झाला. जो तो आपापल्या परीने सावध झाला. श्रीजींनी आधी आपल्या निवासस्थानातील देवतांचे दर्शन घेतले. कुलदेवता श्री मल्हारी म्हाळसाकांत कुलस्वामिनी श्रीनागवेलांबा देवीची आरती म्हटली. नंतर श्रीजींनी मातोश्री मीराबाई साहेबांकडून आशीर्वाद घेतले मातोश्रींनी श्रीजींना दहीसाखर दिला. मातोश्रींकडून मिळालेल्या भरभरून आशीर्वादानंतर श्रीजी त्यांच्या निवासस्थानातून दिंडीसाठी मुक्तीमंटपात जाण्यासाठी प्रस्थान करते झाले.

क्रमशः