परम आदरणीय श्री ज्ञानराज महाराज लिखित येई चेतन सांबा हे पुस्तक प्राप्त झाले. या पुस्तकात महाराजांनी श्री मार्तंड माणिकप्रभूंनी रचलेल्या येई चेतन सांबा या पदाची सारगर्भित व्याख्या केली आहे. उपाशीपोटी जसे अधाशीपणाने अन्न सेवन केले जाते तद्वत लगबगीने पण काळजीपूर्वक या पुस्काची 15 पाने वाचली. मार्तंड माणिक प्रभूंनी लिहिलेल्या या पदाच्या अर्थाबद्दल नितांत उत्सुकता होती. गहन अर्थ ही सहजगत्या वाचकांच्या वा श्रोत्यांच्या गळी उतरवण्यात श्री ज्ञानराज महाराजांचा हातखंडा आहे. त्याचा लाभ घेऊन या पुस्तकाचे वाचन चालू होते. गुलाबजाम मध्ये पाक मुरतो तद्वत अंतरंगात अर्थ मुरवण्याचा माझा खटाटोप सुरू होता.

पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण  मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.

माझ्यासारख्या अति सामान्य स्त्री ची चटकन टाळी वाजली. म्हटले, ही तर पत्राची post script झाली. मार्तंड माणिक प्रभूंच्या येई चेतन सांबा या पदरुपी पत्राला अनुसरूनच अत्यंत विशेष असलेला ताज कलम म्हणजे श्री ज्ञानराज माणिक प्रभूंचे ‘प्रभू तुम्हारे पदकमल पर।’ मार्तंड माणिक प्रभूंचे लेखन ताज असेल तर ज्ञानराज महाराजांचे लेखन त्या मुगुटातील मध्यभागी शोभणारा दिव्य हिरा आहे. ज्यांनी हा ग्रंथ अजून पर्यंत वाचलेला नाही त्यांना सर्वांना मी हा ग्रंथ वाचण्याची विनंती करते. वेशेषेकरून वेदांतात आवड असणार्यांनी हा पुस्तक जर वाचला तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला नक्कीच एक नवीन दृष्टिकोण लाभेल अशी माझी खात्री आहे.

येई चेतन सांबा – या पदाचा अर्थ इतका गहन आणि गूढ अहे, की महाराजांसारख्या सद्गुरूंकडून हा अर्थ समजून घेतल्या शिवाय आपल्या सारख्या सामान्य लोकांना काहीही समजाणार नाही. या पुस्तकाच्या रूपात महाराजांनी आम्हा सर्वांवर जी महत्कृपा केली आहे त्या साठी आम्ही त्यांचे ॠणी आहोत आणि महाराजांनी असेच आम्हाला आपल्या ॠणात ठेवावे अशी प्रार्थना.

[social_warfare]