श्रीप्रभु की रचना का बोधप्रद विवेचन

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून।। प्रभु महाराज द्वारा रचित इस प्रसिद्ध पद को मैंने अनेक बार सुना है और गाया भी है परंतु इस पद के अंदर जो गूढार्थ निहित है उससे मैं अनभिज्ञ था। सौ उमा हेरूर जी ने इस पद पर जो विवेचन किया है वह अत्यंत समर्पक एवं बोधप्रद है। उन्होंने इस पद के गंभीर अर्थ पर जो प्रगल्भ चिंतन और मंथन किया है वह सचमुच स्तुत्य है। ऊपर-ऊपर से भक्तिरस प्रधान लगने वाली इस रचना के अंदर वेदांत के कितने गंभीर सिद्धांत छिपे हुए हैं यह जानकर आश्चर्य हुआ। कृष्ण की दृष्टि पड़ते ही संचित की मटकी का फूटना, प्रारब्ध की झारी, संसाररूपी सुव्यवस्थित वेणी का खुलना और अंतिम पंक्ति में हरि भक्ति के मार्ग पर सम्हलकर चलने की जो बात है वह जानकर मैं मंत्रमुग्ध हुआ। अंतिम पंक्ति में ‘‘हरि चरणी चाले जपून’’ का जो अर्थ लेखिका ने लगाया है वह अत्यंत अनोखा है। हम अपनी सामान्य बुद्धि और लौकिक दृष्टि से जब प्रभु की वाणी को, उनके उपदेशों को उनकी रचनाओं को समझने का प्रयास करते हैं तो वास्तविक अर्थ से भटक जाते हैं और स्वकल्पित अवधारणाऍं बना लेते हैं। इसीलिए महाराजश्री ने कहा है ज्ञान मार्तांडा दिव्य दृष्टिने जाणा।। महापुरुषों की लीलाओं को तथा उनके कार्य को जानने और समझने के लिए दिव्य दृष्टि की आवश्यकता होती है। और मेरा मानना है, कि सौ उमा ताई को प्रभु की कृपा से वह दृष्टि प्राप्त हुई जिसके फलस्वरूप उन्होंने प्रभु महाराज द्वारा रचित इस दिव्य पद के भीतर छिपे अमृतमय रहस्य के दर्शन स्वयं किए और हमें भी करवाए। प्रभुस्वरूप के सतत अनुसंधान के फलस्वरूप लेखिका पर जो कृपा हुई है वह यहॉं इस लेख में दृग्गोचर है। मैंने जब इस लेख को पढ़ा और लेखिका द्वारा प्रतिपादित अर्थ को समझा तो मुझे ऐसा लगा जैसे सालों से छिपा हुआ कोई खज़ाना मिल गया हो। बुद्धि की खिड़कियों को खोलने वाला यह सुंदर एवं उदात्त विवेचन मन को आह्लादित करने वाला है। सभी प्रभुभक्तों से मेरा अनुरोध है, कि इस लेख को अवश्य पढ़ें और श्रीप्रभु के इस पद में छिपे अर्थ का अनुसंधान करें। हमारा संप्रदाय ज्ञानयुक्त भक्ति का मार्गदर्शन करता है। सांप्रदायिक रचनाओं को गाना, पढ़ना और उनके अर्थ का अनुसंधान करना यह प्रत्येक प्रभुभक्त का परम कर्तव्य है और यही सर्वोच्च उपासना भी है। हमारे प्रभु महाराज ने इतने प्रेम और करुणापूर्वक, इतनी सारी सुंदर-सुंदर रचनाओं का अमृतमय उपहार हमें दिया है वह हमारे ही उद्धारहित है। गुरुमहाराज से प्राप्त उस अमूल्य उपहार का यदि हम उपयोग नहीं करेंगें तो और कौन करेगा? आंख मूंदकर घंटों तक ध्यान धारणादि विविध कठिण क्रियाओं को करते रहने से बेहतर है, कि हम श्रीप्रभु के इन अमृतमय पदों पर चिंतन करें। ऐसा करने से निश्चित ही हम उस भाव से एकरूप होकर प्रभुमय हो जाऍंगे इसमें संदेह नहीं है।

कृष्णा मजकडे पाहू नको…

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥

श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.

नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.

वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.

श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.

बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.

राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्‌, यांतच आनंद आहे.

सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.

महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.

माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.

शरणागती

श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.

गुरुदक्षिणा

गुरुपौर्णिमा जरी गुरुला समर्पित असली, तरी गुरु हा अपेक्षारहित असल्याने त्याला शिष्याने आपल्या करिता त्या दिवशी काही विशेष करावे अशी आकांक्षा नसते. म्हणून ह्या दिवसाचे महत्त्व शिष्यालाच अधिक असते! किंबहुना ते असलेच पाहिजे! कारण हा दिवस आहे आपल्या गुरु प्रति आपले आदर, प्रेम आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आपल्या गुरुचे आपल्यावर किती उपकार आहेत, किती ऋण आहे, ह्याची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा. आपला हा आदरयुक्त प्रेमभाव आणि ही कृतज्ञतेची जाणीव गुरुदक्षिणेच्या माध्यमातून आपण गुरु पर्यंत पोहोचवावी ही परंपरागत रूढी.

परंतु ऋण असते ते व्यावहारिक गुरुंचे, सद्गुरुंची असते ती फक्त कृपा! अखंड, अविरत, अक्षय कृपा! आणि म्हणून सद्गुरुला गुरुदक्षिणा तरी काय देणार आपण?

आध्यात्मिक स्तरावर पाहता आपले असे काय आहे, जे आपण गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरुला अर्पण करावे? “गुरुजीने मज बोलणे खुंटविले” ह्या पदामध्ये प्रभु स्वतः म्हणतात-

कोण मी पुसताची मजमाजी मजला।त्वरितचि भेटविले।।

आपली स्वतःची ओळखच  जिथे सद्गुरुशिवाय शक्य नाही, तिथे व्यवहारातील वस्तुंच्या गुरुदक्षिणेची वाच्यता तरी काय करावी?

व्यावहारिक पातळीवर सर्वस्व जरी सद्गुरुला अर्पण केले तरी कमीच आहे. त्यामुळे जे काही आहे ते सद्गुरुंचेच आहे अशा भावनेने तन- मन-धनाने जी शक्य होईल, ती गुरुसेवा करत रहावी. अर्थात तशी सेवा घडण्याकरिता देखिल पुन्हा सद्गुरुकृपाच हवी!

पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-

लाग लाग सख्या गुरु पायी।
तया वाचुनि तुज गती नाही रे।।

महाराज, आपल्या शिवाय आम्हाला अन्यत्र ठाव नाही, किंबहुना तशी गरजच नाही. आमच्या जीवनाची समृद्द्धता आणि सार्थकता दोन्ही आपल्या कृपेनेच संभवत आहे. आपण दिलेले धडे वारंवार गिरवणे हीच आपल्या चरणी अर्पण केलेली गुरुदक्षिणा.

प्रभु प्रेरणेने सुचलेली ही छोटीशी कविता सुद्धा आपल्या प्रवचनातील तीन मनोरंजक व उद्बोधक दृष्टान्तांमधुनच साकारली आहे. ती गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या चरणी सादर सप्रेम समर्पित करते

गुरु पाहिजे

एक छोटं शावक
मेंढरांसह वाढलं
चारा चरत, “में में” करत
मेंढरुच भासू लागलं
त्या घाबरल्या, अन् बावरल्या
मिथ्या अश्या मेंढराला
“अरे मेंढरु नाही, तू सिंह आहे”
हे दर्शविण्यास, हे पटविण्यास
गुरू पाहिजे

एक जुनाट तलवार
म्यानात पडून राहिली
अगणित कालापर्यंत
तिथेच अडून राहिली
त्या थिजलेल्या, अन् गंजलेल्या
मूल निर्मल तलवारीला
घासून-पुसून, निवांत बसून
गंज काढण्यास, शिकलगारसा
गुरू पाहिजे

एक अजब से तिढे
वाटणीस १९ घोडे
अर्धे, पाव, एक पंचमांश
कसे सुटावे कोडे
त्या एकोणीस मधे मिळविल्यास
२०वा घोडा, सुटे हा तिढा
सहज सोडवून, २०वा घेऊन
जाई परतून जो अलिप्त होऊन,
तो गुरू पाहिजे

वेदांत सप्ताह भाग तेरावा

उद्यानातून आता दिंडी वेशीकडे निघाली होती. सध्याचा जो नौबतखाना आहे, त्याच्या द्वारापर्यंत अर्थात सिंहद्वारापर्यंत, म्हणजेच वेशीपर्यंत दिंडी येते. उद्यानापासून वेशीपर्यंत जाताना “छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप” हे माझं अत्यंत आवडतं पद म्हटलं गेलं. दिंडी आता सिंहद्वाराच्या कमानीखाली आली होती. येथून कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीप्रभु मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले आहे की कालाग्निरुद्र हनुमानाची मूर्ती आणि श्रीप्रभु समाधी बरोबर एका सरळ रेषेत, एकाच पातळीवर आहेत. सिंहद्वाराच्या कमानीखाली “जयदेव जयदेव जय हनुमंता” ही हनुमंताची आरती म्हटली गेली. त्यानंतर “नमो घोरतर कालाग्नीरुद्ररूपा” हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी रचलेलं, अंगी चैतन्य स्फुरवणारं , अत्यंत तेजस्वी असे पद म्हटले गेले. ह्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ अगदी टीपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद उचंबळून येत होता. श्री कालाग्निरुद्र हनुमानाला “माणिक क्षेत्र अभिमान रक्षण दक्ष” असेही म्हटले जाते. दास्यभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताला आळवून दिंडी आता श्रीजींचे निवासस्थान असलेल्या नागाईकडे निघाली होती. सिंहद्वारातच थोड्या उंचीवर एक हंडी बांधली होती.‌ भागवत सप्ताहामध्ये काल्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या हंडी मध्ये दहीपोहे ठेवलेले असतात. मातीच्या हंडीला शेंदरी आणि हिरव्या रंगाने रंगवले होते. त्यावर छान नक्षीही काढली होती. योगायोगाने संकलमत संप्रदायाच्या झेंड्यामध्येही हेच दोन रंग आहेत. झेंडूचे हार घालून दहीहंडीला छान सजवले होते. श्रीजी आपल्या हातात काठी घेऊन ही हंडी फोडतात आणि दहीकाल्याचा सोहळा संपन्न होतो. हंडी फोडण्याआधी सगळ्यांचे लक्ष ह्या दहीहंडी वर खिळले होते. श्रीजींनी एका फटक्यातचही हंडी फोडली. दहीहंडी फोडताना “गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण” हे भजन म्हटले गेले. हंडीमधला प्रसाद मिळवण्यासाठी एकच लगबग उडाली. ज्यांच्या हाती हंडीतला प्रसाद लागला, तो हाती लागलेला प्रसाद थोडा थोडा करून इतरांनाही वाटत होते. आपल्या जवळचे असलेले इतरांना वाटण्यामध्ये असलेला आनंद प्रभुभक्तांच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. दहीकाल्याचा आनंद लुटून दिंडी आता श्रीजी यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागाईकडे निघाली होती. वाटेमध्ये बकुळीच्या झाडासमोर “नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळांत हरि आला हो” हे पद म्हटले गेले. तिथून पुढे पालखी आता श्रीजींच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजा समोर आली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या पाटावर श्रीजी येऊन उभे राहिले. येथूनच कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांतावर श्रीजींनी मुक्तहस्ते बुक्का उधळला. दिंडीसाठी आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद घेऊन निघालेले श्रीजी, आता पुन्हा आपल्या कुलदैवताकडे नतमस्तक व्हायला आले होते. येथे “जयदेव जयदेव जय खंडेराया” खंडोबाची आरती आणि “कुलस्वामी माझा देव खंडेराया तयाचे हे पाय हृदयी माझ्या” हे पद अत्यंत उत्साहात म्हटले गेले. घड्याळाचा काटा सकाळी दहाची वेळ दाखवत होता. दिंडी सुरू होऊन एव्हाना साडे दहा तास होत आले होते आणि तरीही सर्व प्रभुभक्त त्याच जोशामध्ये दिंडीचा आनंद लुटत होते. श्रीजींमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी त्या आनंदामध्ये “ले गुलाल प्रभु पर डाल, मलकर गाल, मैने प्रभु से खेली होली” हे त्यांनीच रचलेले पद म्हटलं. हे पद म्हणताना श्रीजींची भक्तांवर आशीर्वादपर बुक्क्याची उधळण सुरू होती. अधून मधून माझ्यावरही होणाऱ्या ह्या अमृत वर्षावाने मन कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा अनुभव करीत होतं.

श्रीजींच्या निवासस्थानातून दिंडी आता आपल्या अंतिम टप्प्यावर निघाली होती. नागाईपासून श्री प्रभू मंदिर पटांगणापर्यंत “असा पातकी सांगू मी काय देवा, कधी नाही केली मनोभावे सेवा, नसे वंदिले म्या तुझे निज पाया, मला तारी रे तारी मार्तंड राया” हे अष्टक म्हटले गेले. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणामध्ये “हा दिसे स्फुरे जो आनंद” हे पद म्हटलं गेलं. पटांगणामध्ये दोन्ही बाजूस ओळीने उभे राहून मधे थोडीशी जागा ठेवतात. ह्याची रचना अगदी वारीची आठवण करून देते. श्री प्रभु मंदिराच्या पायऱ्या चढून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या आवारातील आनंद मंटपात आली होती. येथे “कधी पाहिन मी माझ्या स्वरूपाला, आनंद पूर्णब्रह्माला” हे पद म्हटलं गेलं. समोर गाभाऱ्यामध्ये श्रीप्रभु दिंडीचा हा कौतुक सोहळा पाहत होता. दिंडीतल्या प्रत्येक पदागणिक आपण आपली श्रीप्रभुशी नकळत होणारी एकरूपता अनुभवू शकतो. श्रीप्रभुचे चैतन्य ठाई ठाई जाणवू लागते. अंगावर रोमांच उभे राहू लागतात, मन आनंदाची अनुभूती करू  लागते.

आनंद मंटपातून दिंडी आता श्री प्रभु समोरील कैलास मंटपात आली होती. येथे “मणिका लोकपालका दैन्यहारका सुरासुरवंद्या” ही श्री माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. श्री प्रभू समाधीसमोरील पायर्‍यांवर डोकं टेकवून प्रत्येकाची पावले आता उत्तर दरवाजातून मुक्ती मंडपात जाण्यासाठी पडत होती. ह्या दरम्यान सप्ताह भजनात रोज म्हटले जाणारे “पातकी घातकी मी असे की असा, मन हे भजनी न वसे सहसा” हे तारक अष्टक म्हटले गेले. अष्टकानंतर “जन चला चला गुज पाहण्या हो” हे पद म्हटले गेले. ह्या पदाच्या शेवटी “श्री माणिक आपणचि होण्या हो” ही ओळ येते. आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन, आपल्यातील द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होऊन, आपणच श्री प्रभू परमात्मा आहोत, ही जाणीव दिंडीतील पदे आपल्याला करून देतात.

दिंडी आता परत मुक्तीमंटपात आली होती. आईच्या कुशीतून निघून मुक्तपणे इथे तिथे हिंडून दिंडीचं हे पाडस आता पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलं होतं. चैतन्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं. श्रीजी मुक्तिमंडपात प्रवेश करण्याच्या आधी, दृष्ट उतरवण्यासाठी अकरा नारळ ओवाळून फोडले गेले. त्यानंतर श्रीजी मुक्तिमंटपात प्रवेश करते झाले. मुक्तीमंटपात श्री शंकर माणिकप्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या, श्री शंकर गुरुवर्या वात्सल्य घन योगींन्द्र रक्षी प्रभुवर्या” ही शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. येथे “झालो आम्ही बहु धन्य रे, भेटले सगुण हे ब्रह्म रे” हे स्वस्वरूपाची जाणीव झाल्यावर, होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती करून देणारे पद म्हटले गेले. येथून दिंडी आता श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंध मोक्ष भ्रम कोण तो जाणे अवघा ब्रम्हानंद” हे आत्मानंदाने ओतप्रोत भरलेले पद म्हणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहता येत होता. त्यानंतर “हंसः सोऽहं सोऽहं हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंचे अद्वितीय गोडी चे पद म्हटले गेले. मी-तू पणाची बोळवण होत होती. अद्वैताची ज्योत हृदयामध्ये पूर्ण तेजाने तेवत होती. ह्या तीव्रतेची सुखानुभूती मी प्रथमच अनुभवत होतो. सुखाच्या आनंद लहरीवर तरंगत असतानाच “माणिक माणिक जय गुरु माणिक, माणिक माणिक शिव हर माणिक” चा गजर झाला आणि नकळत श्रीप्रभु प्रेमाने हृदय उचंबळून आले. अलगद ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा आता दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. भावनेच्या ह्या कल्लोळातच “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा सद्गुरु मार्तंडा, आत्मोल्हास प्रभाकर कारण ब्रह्मांड” ही श्री मार्तंड माणिकप्रभुंची आणि तद्नंतर “आरती मधुमती व्यंकेची जननी हेरंब श्यामलेची” ही श्री देवी व्यंकम्मा मातेची आरती म्हटली गेली. त्यानंतर “श्री माणिक जय माणिक, हर माणिक हरी माणिक, चिन्माणिक सन्माणिक” हे परवलीचे भजन म्हटले गेले. वाद्यांचा कल्लोळ चरम पदावर होता. हे पद संपल्यावर “नमः पार्वतीपतये हर हर महादेव”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय” चा जयघोष मुक्ती मंडपात भरून राहिला. दोन क्षण कमालीची शांतता जाणवली. कानात मात्र झांजांची किणकिण अजून ऐकू येत होती. मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. सकाळचे साधरण पावणे अकरा झाले होते.

दिंडी आता समाप्तीसाठी श्री मार्तंड माणिक प्रभूंच्या समाधीसमोर होती. आता दिंडीचे सर्व साहित्य  बुक्का, पदांचे पुस्तक, झेंडा, वाद्ये,  सप्ताहात  सात दिवस पारायणासाठी वापरलेली श्री प्रभुमंदिरातील श्रीमद्भागवतची पोथी, चांदीची छोटी वीणा व अखंड वीणा हे सर्व परत श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर ठेवले गेले व दिंडीची परिसमाप्ती झाली. दिंडीच्या समाप्तीनिमित्त श्रीमार्तंड माणिकप्रभुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला गेला.‌ दिंडीचा हा प्रसाद श्रीजींनी सर्वांना वाटला. ह्या पेढ्याच्या प्रसादाची गोडी अवीट होती. श्रीजी आता चैतन्यलिंगासमोर आले होते. तेथे सर्वांना पुन्हा कुरमुरे पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. श्री प्रभु परिवारातील सदस्य गण आणि प्रभुभक्त सर्वजण मुक्तीमंटपात सुखानैव बसले होते. जवळजवळ बारा तासांनी शरीर असल्याची जाणीव झाली. संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेताही कमालीचा तजेला जाणवत होता. दिंडी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान प्रत्येक चेहऱ्यावर झळकत होते. दिंडीचा महासोहळा आता पूर्ण झाला होता. दिंडीच्या गप्पांचा फड उपस्थितांमध्ये चांगलाच रंगला होता.

गेल्या आठ दिवसांचा काळ झरझर डोळ्यांपुढे तरळला. सकाळचे पारायण, माध्यान्ह काळी श्रीजींचे प्रवचन, सायंकाळी बालगोपाळांची रासक्रीडा, रात्री प्रवचन आणि भजन… संपूर्ण दिवसरात्र कार्यक्रमाची रेलचेल असायची. ह्या आठ दिवसांत बहुतेक वेळ मोबाईल बंद असायचा. त्यामुळे कदाचित समग्रपणे वेदांत सप्ताहाचा आनंद घेता आला. आपल्या आणि भगवंतामध्ये ह्या मोबाईलचे किती व्यवधान आहे हेही जाणवले. दिवसभरात कधीकधी सहा तास ही झोप न होता मन आणि शरीर अत्यंत ताजेतवाने असायचे. सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार ह्यांचा त्रिवेणी संगम वेदांत सप्ताहात अनुभवता आला. ह्या जीवनशैलीचा आपल्या जगण्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, आधीच सुंदर असलेले जीवन अजून सुंदर कसे करता येईल ह्याचा परिपाठचं माणिक नगरातील ह्या वेदांत सप्ताहाने घालून दिला. वेदांत सप्ताहाचे हे वर्णन श्री प्रभु कृपेनेच तेरा भागांमध्ये लिहून पूर्ण झाले. सब कुछ तेरा कुछ नही मेरा ह्या अंतरीच्या कृतज्ञ भावनेने श्री प्रभुसेवेची ही शब्द सुमने त्याच्याच चरणी मनोभावे अर्पण. संपूर्ण वेदांत सप्ताहामध्ये आम्हा समस्त भक्तजनांची अत्यंत दक्षतेने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री माणिक प्रभू संस्थान आणि समस्त सेवेकरी ह्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये श्री प्रभुलाच पाहून त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या श्री संस्थानाप्रती वारंवार कृतज्ञता, आपल्या विद्वत्ताप्रचुर प्रवचनांनी आमच्या अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानसूर्य, श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम… वेदांत सप्ताह आणि दिंडी तसेच श्री माणिक प्रभु संस्थान आणि त्या संबंधित कोणतीही माहिती अविलंब आणि तितक्याच प्रेमाने उपलब्ध करून देणाऱ्या श्री चिद्घन प्रभुंप्रतीसुद्धा वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. वेदांत सप्ताह जरी संपला तरी त्याचे गारुड मनावर अजूनही तसेच आहे. सप्ताह भजनातली पदे, झाजांची किणकिण, अखंड वीणेचा झंकार अजूनही कानात गुंजत आहे, बुक्क्याचा मंद परिमळ अजूनही नाकात भरून राहिला आहे. जीवनात आजवर जे शोधत होतो, ते सापडल्याचे समाधान आहे. स्वर्गिय सुख म्हणजे काय असतं हे दिंडी अनुभवल्यावर कळालं. मनातील द्वैत भाव मिटवून, आत्मानंदाची अनुभूती करून देणारा हा वेदांत सप्ताह, ही दिंडी, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी अनुभवावी आणि त्या अनुभूतीचा योग आपणा सर्वांना लवकरात लवकर यावा, ह्या श्री प्रभुचरणीच्या आणखी एक लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…दिंडी प्रत्यक्ष अनुभवताना किंवा त्याचे वर्णन शब्दात करताना मनात एकच भाव उमटतो आणि तो म्हणजे…धन्य धन्य अति धन्य आम्ही झालो, पूर्णानंद

।।श्री माणिकचरणार्पणमस्तु।।

 

वेदांत सप्ताह भाग अकरावा

दिंडी

भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष आसमंत निनादून टाकत होता आणि त्या मंगल वातावरणात रात्री सव्वा अकराच्या सुमारास श्रीजींनी दिंडीसाठी आपल्या निवासस्थान, नागाई येथून प्रस्थान ठेवले. काठाचे पांढरे शुभ्र धोतर, अंगात पांढराशुभ्र कुर्ता, डोक्यावर असलेली श्री प्रभु गादीची टोपी, आणि हातामध्ये चांदीची सुंदर नक्षीदार काठी अशी श्रीजींची मूर्ती अत्यंत मोहक दिसत होती. श्रीजींच्या चेहऱ्यावर फाकलेले दिव्य तेज सहज टिपता येत होते.‌ पुढे दिवट्या, संबळ, ढोल ताशे, अब्दागिरी घेऊन असलेले भालदार चोपदार, नित्यसवेत असलेला ब्रह्मवृंद, पाठीमागे छत्र घेऊन श्रीजींवर धरून उभा असलेला सेवेकरी, असा श्री संस्थानाला साजेसा थाट श्रीजींच्या प्रस्थानावेळी होता. श्रीजींच्या कुटुंबासह अनेक प्रभुभक्त श्रीजींच्या पाठीमागून मुक्ती मंडपाच्या दिशेने चालत होते. श्रीजींपाठून चालताना आपणही श्री प्रभु परिवाराचाच भाग आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रभुभक्तांच्या सोबत चालताना माझंही मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. अत्यंत त्वरेने भक्तांची ही मांदियाळी मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन उभी ठाकली. मुक्तीमंटप आतून पूर्ण भरला होता, अनेक प्रभुभक्त मुक्तीमंटपाच्या बाहेरील मोकळ्या जागेतही उभे होते. सुदैवाने मला श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीच्या अगदी समोर उभे राहायला जागा मिळाली.

“श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगीमहाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद‌ निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय…” श्री माणिक प्रभुच्या परवलीच्या गगनभेदी ब्रीदावळीने आसमंत दुमदुमून गेला. “नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय”चा मंगल गजर झाला. दिंडी सुरू व्हायच्या आधी दिंडीचे सर्व साहित्य जसे बुक्का, दिंडीच्या पदांचे पुस्तक, सकलमत संप्रदायाचा झेंडा हे श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर ठेवले होते. श्री मार्तंड माणिकप्रभुंनीच आपल्या कारकीर्दीत दिंडीची सन १९०० मध्ये मुहूर्तमेढ रोवली.‌ दिंडीचा हा प्रणेता श्री मार्तड माणिकप्रभु, जो ज्ञानमार्तंड, बोधमार्तंड, चिन्मार्तंड अशा अनेक रूपांमध्ये वर्तत आहे, आज बहुरंगी फुलांचा, दागिन्यांचा साज लेऊन दिंडीचा आनंद लुटायला आलेल्या या लेकरांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी सरसावला होता. श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीप्रमाणेच त्यांच्या नंतरच्या पिठाचार्यांच्या समाधीस सजवण्याची एक विशिष्ट पद्धत श्री माणिकनगरला पाहायला मिळते. समाधीस झालर असलेले उंची वस्त्र, त्यावर सुंदर नक्षीकाम असणारी रेशमी शाल.  दोहोंची रंगसंगतीही आपल्या मनाचा चटकन ठाव घेईल अशाप्रकारे अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली असते. समाधीच्या पुढील बाजूस दागदागिने आणि फुलांच्या माळांची नेटकेपणे केलेली मांडणी मन मोहून टाकते. समाधीच्या वरच्या बाजूला फुलांची निमुळती होत जाणारी मुकुटाकार मांडणी, त्यावर खोचलेला शिरपेच जणू सद्गुरुचे सगुण रूपच साकार करते. मुख्यत्वेकरून गुलाब फुलांच्या आणि सुगंधित मोगऱ्याच्या साजामध्ये सकलमत संप्रदायाचा झेंडा आसेतुहिमाचल फडकवणारा हा ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आज मध्यरात्रीही स्वयंतेजाने झळाळत होता. समोर महानैवेद्यासाठी फळफळावळ आणि सुकामेवा ठेवला होता. धुपाचा मंद सुवास मुक्तीमंटपात भरून राहिला होता. धुराच्या त्या वलयांत हा मार्तंडप्रभु समस्त भक्तजनांना आत्मसुखाची अनुभूती द्यायला आज सज्ज झाला होता.

श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” आणि “मार्तंड पराक्रमचंड कीर्ती उद्दंड शमवी पाखंडा, उंचवी प्रभो निज सकलमताचा झेंडा” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. त्याच्यानंतर सर्वांना आरती देऊन झाल्यावर, श्रीजी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर गाभार्‍या बाहेर उभे राहिले. तेथे श्री प्रभुपरिवारातील सर्व सदस्यांनी श्रीजींना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. श्री प्रभु परिवारातील सदस्यांनंतर इतरही प्रभुभक्त गर्दीतून वाट काढत श्रीजींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रीजींना पुष्पमाळा अर्पण केल्या. श्रीजींनीही आशीर्वाद स्वरूप प्रत्येकावर बुक्का उधळला. अगदी पहिल्या रांगेत असल्यामुळे माझ्याही अंगावर हा बुक्का येऊन पडला. बुक्क्याच्या त्या सुगंधी दरवळीने मन नखशिखांत मोहरून गेले. फिक्कट पिवळसर असलेला हा सुगंधित बुक्का, ज्वारीचे पीठ, भंडार आणि अनेकोत्तम सुगंधी द्रव्यांनी युक्‍त असतो. हा बुक्का श्री मार्तंड प्रभुंचा प्रसाद असतो. दिंडी दरम्यान सर्व समाधींवर अर्चन म्हणून व सकल भक्तजनांवर प्रसाद रूपाने उधळण्यासाठी हा बुक्का वापरला जातो.

ह्यानंतर सकलमत संप्रदायाची “उपदेश रत्नमाला” आणि तदनंतरची “आर्या” म्हटली गेली. श्रीजींनी पहिली ओळ म्हणावी आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठून म्हणावं, प्रत्येक कडव्यानंतर “श्रीमाणिक, जयमाणिक, हरमाणिक, हरिमाणिक, चिन्माणिक, सन्माणिक, जय जय हो सकतामता विजय हो”चा गजर झांजांच्या किणकिणीत उपस्थित प्रभुभक्तांमध्ये चैतन्य फुंकत होता. श्रीजींच्यासमोर, त्यांना मार्गक्रमण करता येईल अशा रीतीने जागा सोडून दोन्ही बाजूला श्रीप्रभु परिवारा समवेत, गावकरी आणि प्रभुभक्त रांगेत उभे असतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे ही श्री संस्थानाचे परम विशेष आहे. दिंडीच्या सुरुवातीलाच “आत्मा एकची सर्वांतरी हो” हे श्री मार्तंड माणिकप्रभु विरचित पद म्हटले गेले. हातामध्ये झांज, टाळ घेऊन भक्तजन आणि गावातील मंडळी दिंडीच्या भजनानंदात मधून मधून त्या विशिष्ट तालावरती उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. ह्या उड्याही अत्यंत लयबद्ध असतात. स्वतः उपस्थित राहून हे सर्व अनुभवल्याशिवाय त्या आनंदाची अनुभूती येणे केवळ अशक्य आहे. दिंडी अनुभवायची माझी उत्सुकता पाहून श्री आनंदराज प्रभुंनी मला पुढे यायला सांगितले. त्यामुळे दिंडीच्या अगदी शेवटपर्यंत हा सुखसोहळा मला आकंठ अनुभवता आला. “एकची सर्वांतरी हो आत्मा” ह्या पदानंतर दिंडी श्रीमार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीच्या मागच्या बाजूनं श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीसमोर  आली.‌ संपूर्ण दिंडीमध्ये प्रभुभक्तांची चाल अत्यंत मंदगतीने होत असते. अखंड प्रभुनामाचा आणि वाद्यांचा गजर आपल्या मनास सतत ताजातवाना ठेवत असतो. ह्याकरिता दिंडीत देह आणि मन बुद्धीने सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.

श्री शंकर माणिक प्रभुंनी त्यांच्या कारकिर्दीत दिंडीला एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली. त्यांचा वेदांत विषयाचा व्यासंग प्रचंड होता. श्री शंकर माणिक प्रभु महाराजांच्या वेदांतविषयक लेखांचा संग्रह “ज्ञानशांकरी” ह्या पुस्तक रूपात उपलब्ध करून श्री संस्थानाने समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. काहीसे अबोल पण वेदान्ताचे पूर्ण अधिकारी असलेले श्री शंकर माणिक प्रभुमहाराज अबोलीच्याच फुलांनी नटले होते. समाधीवरील मोत्यांच्या माळा आणि गुलाबांचे हार चित्त वेधून घेत होते. समाधीवरील माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल अतिशय आकर्षक दिसत होते. येथेही फळांचा आणि सुक्यामेव्याचा नैवेद्य प्रभुस अर्पण केला होता.‌ आळवणी होवून  “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या” ही श्री शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली.‌ नंतर श्री ज्ञानराज प्रभुंनी नवीनच रचलेली “आरती शंकरगुरुनाथा, सद्गुरू माणिक अवधूता” ही आरतीसुद्धा म्हटली गेली.  येथे “किती सुख हे, किती किती सुख हे” हे शाश्वत सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देणारे प्रभुपद म्हटले गेले. भजनानंदात पदागणिक प्रभुभक्तांचे उचंबळणे सुरूच होते. श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीनंतर दिंडी आता मुक्तीमंटपात ह्या दोन्ही पीठाचार्यांच्या समाधींच्या मधोमध असलेल्या श्री चैतन्य लिंगासमोर आली. श्रीजींनी श्री चैतन्यलींगासमोर श्री शंकराची “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” ही आरती केली. त्यानंतर “आता जाऊ चला आम्ही पाहू चला, गुरुराज प्रकट प्रभुराज प्रकट अवधूत आला” हे तनमन स्फुरवणारं पद अत्यंत जोशात म्हटलं गेलं. त्या-त्या पदांचा फलक काठीवर उंच धरला जात होता, त्यामुळे कुठल्याही कोपर्‍यातून भक्तांना त्या पदाचा आनंद लुटता येत होता. सूर आणि वाद्यांच्या त्या कल्लोळाने आता दिंडीची नशा शरीरामध्ये हळूहळू भिनायला लागली होती.‌ शरीर नकळत पदांच्या तालावर ठेका धरू लागलं होतं. चैतन्याची ही अनुभूती अत्यंत आनंददायी होती. श्रीजींनी उधळलेला बुक्का अधून मधून अंगावर पडत होता आणि त्याच्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या.

मुक्तीमंटपातून दिंडी आता शेजारील नव्यानेच बांधून पूर्ण झालेल्या सिद्धराज मणिकप्रभुंच्या समाधीसमोर दाखल झाली. अत्यंत कनवाळू असलेले, वाचासिद्ध श्री सिद्धराज मणिकप्रभु यांची समाधीसुद्धा रंगबिरंगी अनेकविध फुलांनी छान सजवली होती. समाधीला चोहीकडून केळीचे खांब लावले होते. कागडा आणि अबोलीच्या माळा छतावरून रुळत होत्या. येथेही फळांचा आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य श्री प्रभुला अर्पण केला होता. नव्याने बांधलेल्या ह्या वास्तूचे संगमरवरी बांधकाम अत्यंत रेखीव आहे. रात्रीच्या वेळी एकांतात येथे बसणे मनास अपार शांती देऊन जाते. असो. “जय देव जय देव जय सिद्धराजा, श्रीसिद्ध राजा, आरती ओवाळू तुज सद्गुरुराजा” आणि “आरती सिद्धस्वरूपाची, सनातन सद्गुरुभूपाची” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. तदनंतर श्री सिद्धराज प्रभु नित्य गुणगुणत असलेले आणि मनास उभारी देणारे “प्रभु जवळी असता, असता मग चिंता मज कां?” हे पद म्हटले गेले. आपल्या कारकीर्दीत अनेक भक्त जणांचे कल्याण करणाऱ्या, सर्वांस समदृष्टीने पाहणाऱ्या ह्या कनवाळू‌ महात्म्याचे पद ऐकताना अनेक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माणसे जोडण्याची अद्भुत कला श्री माणिक प्रभुंनंतर प्रत्येक पीठाचार्यने हिरीरीने जोपासली आणि आजही जोपासत आहेत. आज दिंडीत जमलेला अफाट जनसागर हे त्याचेच द्योतक होता. श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या आळवणी नंतर दिंडी आता मुक्ती मंडपाच्या आवारात असलेल्या औदुंबराखाली आली. येथे “अवधूता शरण रिघाल्ये, देहींच ब्रह्मसुख फळलें, किती विस्मय नवल हे झाले, ब्रम्हासी ब्रह्मपण आले” हे अवीट गोडीचं पद म्हटले तेव्हा प्रत्येक जण भजनाच्या आनंदात न्हाऊन निघत होता. सकलमत संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत होता. बुक्क्याची श्रीजींच्या हातून मुक्त हस्ते उधळण होत होती. हा प्रसाद रुपी आशीर्वाद ज्याला मिळत होता तो, कृतार्थतेने अगदी धन्य धन्य होत होता. औदुंबरा खालून उत्तर दरवाजातून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या कैलास मंटपात आली होती.

गाभाऱ्यामध्ये श्री प्रभु आपल्या लेकरांची सुहास्यवदनाने जणू वाटच पाहत होता. श्रीजींनी बुक्का श्री प्रभुसमाधीवर उधळला. तेथे “जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका तव पद मोक्ष आम्हा न स्मरू आणिका”, तसेच “आरती सगुण माणिकाची, स्वरूपी जगत्प्रसुत्याची” ह्या दोन आरत्या अत्यंत उत्साहात म्हटल्या गेल्या. त्यानंतर “नित्य वंदू त्या माणिक पायां” आणि “मनोहरनंदन की जय हो”  ही दोन पदे म्हटली गेली. भक्तांचा आनंद आता अगदी टिपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद लुटताना कोणाच्याही ऊर्जेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नव्हती. कैलास मंटपातून दिंडी पुढे आनंद मंटपात आली. येथे “आम्ही चुकलो निजहित कामा, तू चुकू नको आत्मारामा” हे पद म्हटलं गेलं. येथे सर्वांना खडीसाखर आणि लवंग देण्यात आला.

दिंडी आता पुढे आनंद मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या आणि श्रीमाणिकनगरचे आद्यदैवत असलेल्या, श्री सर्वेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. श्रीजींनी श्रीसर्वेश्वराचे दर्शन घेतले. येथे “जय देव जय देव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” आणि श्री वीरभद्राची आरती झाली. श्री सर्वेश्वरासमोर “हा शैव नव्हे मनुजाधम मूढ तो ऐका, मी सांब नव्हे कोण मी धरी जो शंका” हे अंतरी वसलेल्या सांब सदाशिवाची जाणीव करून देणारे पद गायले गेले.‌ येथे श्रीजींनी हाती झांज घेऊन स्वतः वाजविले. उधळत जाणाऱ्या बुक्क्यासह आता प्रत्येक जण हळूहळू पूर्णपणे माणिक रंगात रंगत होता.

दिंडी आता श्री सर्वेश्वर आणि औदुंबर ह्या मधील मोकळ्या जागेत म्हणजेच दक्षिण पटांगणात आली होती. येथे श्री मनोहर माणिकप्रभु विरचित “सख्या माझ्या माणिकाला कोणि तरी दावा” हे  करुण रसाने ओतप्रोत भरलेले पद म्हटलं गेलं. दक्षिण पटांगणातून प्रभू मंदिराचा कळस अत्यंत मोहक दिसत होता.  रंगबिरंगी विद्युतझोतामुळे  रात्रीच्या अंधारात कळसाचा भाग अधिकच नयनरम्य दिसत होता. दक्षिण पटांगणातून दिंडी दोन पावले पुढे चालून औदुंबराखालील श्री अखंडेश्वरासमोर आली. तेथे “श्री जय देव जय देव दत्ता अवधूता” ही श्री दत्तगुरूंची आरती झाली आणि त्यानंतर “मायामलधूत आम्ही अवधूत” हे पद म्हटले गेले. त्यानंतर समोरील मंदिरात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घेऊन दिंडी आता श्री प्रभुसमाधीच्या पाठी असलेल्या श्री मनोहर माणिक प्रभुंच्या समाधी समोर येऊन थांबली. श्री माणिक प्रभुंचा लाडका कुत्रा, “भरोसा”च्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीजी आणि ब्रह्मवृंदाने तळघरामध्ये असलेल्या श्री मनोहर प्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि येथे “जय देव जय देव जय जय गुरुभूपा, आरती ओवाळू तुज सच्चिद्रूपा”, “जयदेव जयदेव मनोहर गुरु स्वामीन्” आणि “आरती सद्गुरु रायाची मनोहरप्रभुच्या पायाची” ह्या तीन आरत्या म्हटल्या गेल्या. त्यानंतर श्री मनोहर प्रभूंनी रचलेले “सखया जावे निजगुरुचरणा शरणा झडकरी” हे दिव्य पद म्हटले गेले. ह्या पदाचं वैशिष्ट्य असं की मुखडा जरी मराठीत असला तरी पहिलं कडवं संस्कृतमध्ये, दुसर कडवं कन्नडमध्ये, तिसरं कडवं हिंदीमध्ये आणि चौथं कडवं मराठीत आहे. चारही कडवी आपण एकाच चालीत म्हणू शकतो. इथे पद म्हणत असताना डोक्यावर छत्र धरलेले श्रीजी मला एक क्षण साईबाबाच वाटले. तीच लकब, तशीच दाढी. योगायोगाने साईबाबा शिर्डीत प्रकटण्याआधी श्री माणिक प्रभुंच्या हयातीत, त्यांच्या दरबारात येऊन श्री प्रभुंकडून अनुग्रह घेऊन गेले होते. झटकन जाऊन श्रीजींना वंदन करून आलो, त्यावेळी बुक्क्याची मूठभर उधळण माझ्यावर झाली. ते सुगंधलेपीत शरीर घेऊन उत्तर पटांगणात श्री मुख्य प्राण मारुतीच्या समोर हजर झालो. येथे लगेचच “नरतनु व्यर्थ गमाई, नही ढूंढा अपना माणिक सांई” हे पद म्हटलं गेलं. श्रीजींचं साईबाबांसमान दिसणं आणि पुढच्या पदातही साई शब्द येणं, ह्या योगायोगा बद्दल मी स्वतःला कृतार्थ समजत होतो.

श्री प्रभु मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून दिंडी आता महाद्वारातून बाहेर पडत होती. महाद्वाराच्या पायऱ्यांवर “श्रुतीधर्म रक्षुनि सकलमताते वंदा” हे पद म्हटलं गेलं. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणातून दिंडी आता जुन्या भंडारखान्यात असलेल्या श्री अन्नपूर्णेश्वरी देवीसमोर आली होती. येथे श्री अन्नपूर्णा देवीची आरती म्हटली गेली आणि त्यानंतर “श्रीदेवी त्रिपुरसुंदरी माय पाव” हे पद म्हटले गेले. श्री अन्नपूर्णेचा जयघोष झाला. श्री अन्नपूर्णा देवीच्या मंदिरापासून भोजन शाळेपर्यंत माझ्या अत्यंत आवडीच्या “कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा” ह्या पदाची गुंज आसमंतात करून राहिली. भोजनशाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्वांना सरबत दिले गेले. दिंडी आता भोजनशाळेत येऊन थांबली.  येथे “कोण्या सुकृत दैव हे फळले, गुरुहस्तामृत शिरी पडले, मन माझे वळले, स्वहितगुज कळले” हे पद म्हटले गेले. इथे थोडावेळ बसायला मिळाले. पण कोल खेळणारे मात्र रासक्रीडेचा आनंद लुटत राहिले. सुर आणि वाद्यांचा कल्लोळ,  टिपऱ्या घेऊन जलद गतीमध्ये कोल खेळणारे भक्तजन… पहाटेच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारासही भोवतालचं वातावरण भारलेलं होतं. निद्रादेवीचा थोडासाही प्रकोप आज मला जाणवत नव्हता. “चैतन्यदेव” हेच मुख्य दैवत असणाऱ्या सकलमत संप्रदायाच्या पुण्यभूमीत चैतन्याची अनुभूती जागोजागी येत होती.  भोजन शाळेतील ह्या भारलेल्या वातावरणात सकलमत संप्रदायाचा झेंडा आज अधिकच डौलाने फडकत होता…

क्रमशः…