माझ्या मनीची तृष्णा

माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा
श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।।

तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते
परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।।

अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला
काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।।

त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची उधळण अपार,
गोवर्धनाचाही सारा भार उचलूनि धरीं ।।

उचलूनी धरीं सर्वकाळी तव भक्तांची तळी,
तयांच्या हृदयकमळी वर्ततो सदा ।।

वर्ततो सदा धर्माच्या बाजूने दुष्ट निर्दालन करी चक्राने
रणांगणावरही गीता सांगणे साक्षीभावाने ।।

साक्षीभावाने तूज पाहणे‌ दे मज ऐसी लोचने
नाही तुजकडे अन्य मागणे कृष्णा दयाघना ।।

सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)

करडखेड… नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून थोड्या अंतरावर वसलेले करडखेड हे अगदी नावाप्रमाणेच चार-पाच हजार लोकसंख्या असलेले छोटेसे खेडे. पण येथील सद्गुरु माणिक प्रभु मंदिर आपले मन आकर्षून घेते. श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या सगरोळी-करडखेड दौऱ्यादरम्यान, परतीच्या वेळेस करडखेडला भेट देण्याचा योग जुळून आला. येथील श्री प्रभु मंदिराची पुढील बाजू माणिकनगरच्या प्रभुमंदिराची आठवण करून देते. श्रीप्रभु मंदिरामध्ये श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्वहस्ते स्थापन केलेली काळ्या पाषाणाची मनोहर प्रभुगादी आहे. त्या संदर्भात मंदिराचे सर्वेसर्वा श्री. माणिकराव कुलकर्णी ह्यांच्याकडून ह्या प्रभुगादीचे महात्म्य ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. माझ्या विनंतीला मान देऊन श्री. माणिकरावांनीही अत्यंत प्रेमपूर्वक गादीचा इतिहास उलगडला.

करडखेड येथे रंगूबाई नावाची एक बाल विधवा होती. त्या काळातील प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या नवव्या वर्षीच तीचे लग्न झाले होते आणि रंगूबाईच्या वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. तेव्हा तिच्या आई-वडिलांना चिंता लागून राहिली की, हिचे पुढे कसे होणार? ज्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते, त्यावेळी तिच्या आई-वडिलांना माहिती मिळाली की, माणिकनगरचे श्री मार्तंड माणिकप्रभु हे सगरोळीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना करडखेडला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. करडखेडला महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. तेथे महाराजश्रींचा तीन दिवस मुक्काम होता. त्या मुक्कामावेळी रंगूबाईच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना रंगूबाईची कहाणी सांगितली. तिची एवढी मोठी जमीन आहे, संपत्ती आहे, त्याचे काय करावे? त्या संदर्भात महाराजांना विचारणा केली, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभु म्हणाले की तुमच्या गावातील तुम्हाला जी आवडतील, ती तीन-चार मुले घेऊन या. त्यातील एकाला आम्ही रंगूबाईला दत्तक देऊ. तेव्हा तेथील तीन-चार मुलांपैकी श्री. माणिकराव कुलकर्णी यांचे आजोबा, म्हणजेच श्री. मल्हारी यांना महाराजश्रींनी रंगूंबाईस दत्तक दिले. त्याचवेळी करडखेडला श्री प्रभुगादी स्थापनेची इच्छा रंगूबाईने श्रीजींसमोर प्रकट केली. श्रीजींनीही त्याला आनंदाने संमती देऊन, स्वहस्ते करडखेडची ही, काळ्या दगडातील, गादी स्थापन केली. ही घटना साधारणतः १९०३ ते १९०४ च्या दरम्यानची आहे. त्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते आणि मल्हारी नावाचा जो दत्तक घेतलेला मुलगा होता, त्याचे वय सुमारे आठ वर्षाचे होते. ज्यावेळेस मल्हारीस दत्तक घेतले गेले, त्यावेळी श्रीजींनी रंगुबाईस असा आशीर्वाद दिला की, ह्या गादीची व्यवस्था लागेल, तुझा वंशही वाढेल आणि तुझं नावही येथे राहील. असे अभयवचनच महाराजश्रींनी दिले. त्या प्रसंगी महाराजश्रींनी रंगूबाईस प्रसाद दिला. आजही प्रसादाची ही डबी आपल्याला करडखेडच्या श्री प्रभु मंदिरात पाहता येते. श्री मल्हारीरावांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र श्री विजयराव उर्फ गुरुदास यांनी श्री सिद्धराज प्रभुंना विचारले की, ह्या प्रसादाच्या डबीचे आता काय करू? तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, श्री मार्तंड माणिक प्रभुंचा प्रसाद कोणाला मिळतो? आणि तो तुमच्याकडे आहे, त्यामुळे तो तसाच ठेवा आणि त्यास पूजेमध्ये देव म्हणूनच पूजा. त्याचे कधीही विसर्जन करू नका. अशा प्रकारे श्री सिद्धराज प्रभुंच्या आज्ञेनुसार आजही प्रसादाची ती डबी कुलकर्णी कुटुंबाने प्राणपणाने जपली आहे. आज त्यांच्या चौथ्या पिढीतही गादी स्थापनेपासूनची श्री प्रभुगादीची सेवा अखंडित आहे. अपवाद फक्त वार्षिक दत्त जयंती उत्सवाचा. श्री दत्त जयंतीच्या दिवशी सर्वजण माणिकनगरला जातात, पण एक जण करडखेडला राहून, गादीची महापूजा करून माणिकनगराला येतो. आणि प्रभु दरबाराचा प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी करडखेडला परततो आणि संध्याकाळी श्री प्रभुगादीची पूजा होते. असा परिपाठ येथे जवळपास सव्वाशे वर्षापासून चालत आला आहे. श्री प्रभुगादीस रोज पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि रुद्राभिषेक होतो. विशेष उत्सवांच्या दिवशी राजोपचार पूजेच्या धर्तीवर यथाशक्ती महापूजा होते. श्री माणिक कुलकर्णी यांच्याबरोबरच त्यांचे बंधू श्री. श्रीपाद आणि श्री. योगेश कुलकर्णी हे सध्या श्रीप्रभुगादीची पूजा वगैरेची व्यवस्था एकत्रितपणे पाहतात. अलीकडेच ह्या श्रीप्रभु मंदिराच्या झालेल्या जीर्णोद्धारात समस्त करडखेड आणि पंचक्रोशीतील प्रभुभक्तांबरोबरच श्री. श्रीपाद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे.

श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानंतर श्री शंकर माणिकप्रभु येथे आले नाहीत किंवा श्री सिद्धराज माणिकप्रभु येथे आले नाहीत. ते का बरे आले नाहीत? अशातच श्री सिद्धराज प्रभुंचा सन २००१ मध्ये सगरोळी दौरा होता. त्यावेळेस श्री गुरुदासांनीनी सगरोळी येथे जाऊन श्री सिद्धराज प्रभुंना विनंती केली की, महाराज, आपण प्रभुगादी दर्शनासाठी करडखेडला अवश्य यावे. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभु गुरुदासांना म्हणाले, का नाही? येतो ना मी, न यायला का झालं? अवश्य येतो. त्यावेळेस श्री गुरुदास म्हणाले, महाराज, थोडी आर्थिक अडचण आहे. तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, काही काळजी करू नको. मी येतो. श्री सिद्धराज प्रभु करडखेडला आले तो दिवस, वैशाख शुद्ध चतुर्थीचा होता. सन २००१ मध्ये श्री प्रभुगादीची पूजा झाली. श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली. श्री सिद्धराज प्रभु महाराज अत्यंत संतुष्ट झाले. गुरुदासांनी महाराजांना सुकामेवा खावयास दिला. तेव्हा महाराज म्हणाले, मला हे काही नको. मला दही आणि पोहे दे! तेव्हा गुरुदासांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. मी सुदाम्यासारखा आहे म्हणूनच माझ्या गुरूंनी माझ्याकडे दही पोहे मागितले, असा धन्यतेचा भाव त्यांच्या मनाला झाला आणि त्यांना आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आजच्या करडखेड दौऱ्यामध्ये जेथे श्री ज्ञानराज प्रभुंचे आसन होते, जेथे श्रीजींची पाद्यपूजा झाली, त्याच ठिकाणी श्री सिद्धराज प्रभु बसले होते. तेथेच त्यांची पाद्यपूजा झाली होती. आणि श्री सिद्धराज प्रभु माणिकनगरला परतल्यानंतर, जवळजवळ सहा महिने श्री सिद्धराज प्रभुंच्या पाद्यपूजेच्या जागेवर श्री गुरुदासकाका अक्षरशः रोज रात्री लोळण घालायचे. ही माझ्या गुरूंचे चरण धूतलेली जागा आहे. आता मला मरण आले तरी चालेल. माझे जीवन धन्य झाले. आणि त्या धन्यतेतच श्री गुरुदासांनी अश्विन शुद्ध षष्ठीला सर्वांना मी येतो म्हणून मोठ्याने जय गुरु माणिक, जय शंकर म्हणून अगदी सहज प्राण सोडला.

त्याआधी १९६६ साली गुरुदासकाका माणिकनगरला असताना श्री सिद्धराज प्रभुंनी त्यांना विचारले, तुम्हाला किती मुलं मुली? तेव्हा गुरुदास म्हणाले, महाराज, दोन मुली आहेत मला. तेव्हा सिद्धराज प्रभु म्हणाले, मुलगा नाही? गुरुदास काकांनी, नाही म्हणून विनम्रपणे सांगितले. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभुंनी एका सेवेकऱ्याला म्हटले की, प्रभु मंदिरात आलेला प्रसाद घेऊन ये रे! त्यामध्ये केळ होतं, थोडं जास्त पिकलेलं आणि एक खारका. तो प्रसाद गुरुदासांना देऊन म्हटले, जा आता! दोन दिवसांनी दत्तजयंती होती. श्री गुरुदासांनी तो प्रसाद तसाच ठेवून दिला होता. करडखेडला परत घरी येईस्तोवर ते केळ पूर्णपणे खराब होऊन जवळजवळ नासले होते. एक पण गुरुदासांच्या पत्नी, सौ. मनोरमाबाईंनी त्या केळ्याचा प्रसाद सालीसकट तसाच खाल्ला आणि खारका बी सकट खाऊन टाकली. श्री प्रभकृपेने गुरुदासांना दीड वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली त्या मुलाचे नाव त्यांनी माणिक ठेवले. धन्य तो भक्त, धन्य ती गुरुभक्ती आणि धन्य ती  भक्ताची गुरुवरील अचंचल श्रद्धा.

श्री प्रभुगादीसमोर नतमस्तक होताना रंगुबाईची, गुरुदास यांची अनन्य भक्ती आठवली. श्री प्रभुगादीभोवती गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रचंड स्पंदन जाणवतात. देगलूर परिसरात आपण कधी गेलात तर ह्या प्रभुगादीला अवश्य भेट देऊन श्री प्रभुच्या चैतन्याचा जरूर अनुभव घ्यावा.

करडखेडला गावाच्या वेशीपासून श्रीप्रभु मंदिरापर्यंत श्री सकलमताचार्यांची जंगी मिरवणूक निघाली. पावसामुळे येथेही दोन-तीन दिवसांपासून लाईट नव्हती. त्यामुळे रात्रीच्या समयी दिवट्या, मोबाईलचे लाईट आणि बॅटरीवर चालणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात, श्रीप्रभुनामाच्या जयघोषात श्रीप्रभु मंदिराच्या दिशेने सरकणारी श्रीजींसहित भक्तांची मांदियाळी मोठी विलोभनीय दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. जवळपास संपूर्ण करडखेड गाव आज श्रीप्रभु मंदिरात एकवटला होता. श्रीजींची एक छबी आपल्या डोळ्यांमध्ये आणि हृदयामध्ये साठवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होते. अलीकडे जीर्णोद्धार झालेले श्रीप्रभु मंदिर आतून अत्यंत स्वच्छ आणि नेटकेपणाने ठेवले आहे.‌ मुख्य गाभाऱ्यात वर वर्णिल्याप्रमाणे श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्थापन केलेली गादी आहे.‌ श्रीप्रभुगादीला आज फुलांची आकर्षक सजावट केली होती. समईच्या, दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात काळ्या दगडाची श्रीप्रभुगादी अत्यंत मनोहर दिसत होती. गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला श्रीजींना बसण्यासाठी आसन सुशोभित करून ठेवले होते. याच जागेवर श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली होती.

मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ येताच भक्तकार्य कल्पद्रुमचा, आसमंत दुमदुमून टाकणारा, जयघोष झाला. श्री कुलकर्णी कुटुंबाने श्रींजींचे चरण प्राक्षाळले. सुवासिनींनी त्यांना ओवाळले. श्रीप्रभु मंदिरात प्रवेश करताच, श्रीजींनी सर्वप्रथम गादीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीजींना अत्यंत आदरपूर्वक आसनावर बसविले गेले. श्रीजींनी अभयकरांनी आशीर्वाद देऊन, सर्वांना खारकांचा प्रसाद दिला. त्यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी श्रीजींचे दर्शन घेतले. श्रीजींचा आशीर्वाद व प्रसाद मिळाल्यामुळे प्रत्येक जण उत्साहात होता. सर्वांचे आशीर्वचन झाल्यावर, श्रीप्रभुंची आरती करण्यात आली.  सर्व गावकऱ्यांसाठी श्रीप्रभु मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन केले होते.

श्री. कुलकर्णी कुटुंबाने मंदिराशेजारीच असलेल्या आपल्या घरी श्रीजींना प्रसादासाठी निमंत्रित केले होते. पावसामुळे परिसरात लाईट तर नव्हतीच, पण जनरेटरलाही मध्येमध्ये दम लागत होता. कुलकर्णी कुटुंबाने पंगतीसाठी सर्वत्र मेणबत्त्या लावल्या. मेणबत्त्यांच्या त्या प्रकाशात सर्वांची भोजने पार पडली. यानिमित्ताने श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळात कदाचित असेच वातावरण असेल, अशी कल्पना माझ्या मनाने केली. कुलकर्णी कुटुंबाने अगदी पंचपक्वान्नाचा बेत प्रसादासाठी केला होता. गेले तीन दिवस लाईट नसताना, मोटरपंप बंद असतानाही, दूरवरून हातपंपाचे पाणी आणून प्रभुभक्तांची पाण्याची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची परोपरीची काळजी घेतली होती. आपुलकीच्या, प्रेमळ आग्रहाने वाढलेल्या अत्यंत सुग्रास महाप्रसादाचा आस्वाद घेऊन तृप्त होत असतानाच, शेवटी श्रीजींच्या उच्छिष्टांचा प्रसाद सर्वांना मिळाला. श्रीजींच्या सहवासात चैतन्याची अनुभूती होत असतानाच, उच्छिष्टांच्या प्रसादाने देह आणि मनबुद्धीचीही शुद्धी होत होती.‌ प्रसादानंतर श्री. कुलकर्णी कुटुंब आणि समस्त करडखेड ग्रामवासियांना मंगलमय आशीर्वाद देत श्रीजी आणि आम्ही सर्व रात्री दहाच्या सुमारास माणिकनगरसाठी परतीच्या प्रवासाला निघालो.

रात्रीची वेळ, अनोळखी रस्ता (रस्त्यांमधील खड्डे चुकवायचे की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा हा मोठा संभ्रम महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत कायम राहिला), त्याचवेळी सुरू झालेला पाऊस हे सर्व कसोटी पाहणारे होते. पण “आपल्याला राखणारा प्रभु समर्थ आहे”, हा दृढ भाव मनी होता, श्री प्रभुंच्या पादुकाही गाडीत सोबतीला होत्या. त्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय आम्ही मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास श्रीमाणिकनगरी विनासायास पोहोचलो. श्री. गुरुनाथ भटजी, श्री. नरसिंह भटजी आणि श्री. तिरुमल भटजी यांच्या सहवासात प्रभुलीलांचे गुणगान करत, मध्येच प्रभुंची प्रासादिक पदे म्हणत, तिघांपैकी प्रत्येक जण प्रभुसेवेमध्ये माणिकनगरात कसा आला, हे ऐकणे फारच आनंददायी आणि रोमांचकारी होते. खरेच, प्रभुभक्तांच्या सहवासात प्रभुंच्या लीला, त्यांचे अनुभव, त्यांची अनुभूती ऐकताना वेळ कसा निघून जातो, हे अजिबात कळतच नाही. ह्या प्रवासादरम्यान श्री, गुरुनाथ भटजींचा गळा किती गोड आहे, तसेच प्रभुपदे म्हणताना त्यांचे रंगून जाणे, अनुभवता आले. तिघांच्याही कथांतून त्यांचा श्री प्रभुप्रती अत्यंत कृतज्ञ भावच दिसून आला.

शनिवारी सकाळी दयाघन‌ श्रीप्रभुचे मनोभावे दर्शन घेऊन, श्रीजींच्या हस्ते खारकांचा प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मंगळवारपासून सुरू झालेला, जीवन समृद्ध करणारा, विविध प्रसंगातून मनावर खोल परीणाम करणारा, श्रीजींचा सगरोळी दौरा आणि त्यातले प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर एकापाठोपाठ एक तरळत होते. ठाण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये कारमध्ये सुरू असलेल्या प्रभुपदांबरोबरच ते प्रसंगच माझे सोबती होते. श्रीजींचे सहजपणे जनमानसांत मिसळणे, सर्वांत राहूनही आलिप्त असणे, त्यांचे सर्वच विषयांवरील आणि पंचमहाभूतांवरील असलेले प्रभुत्व, भक्तांच्या शंकांचे आणि संकटांचे निरसन करणे, वृत्तीची स्थितप्रज्ञता, सर्वांना समदृष्टीने पाहणे, भक्तांचे अंतरंग ओळखणे, प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता,  भक्तांना सामोरे जाणे, सर्वांचे सुहास्य वदनाने अभिष्टचिंतन करणे, सर्वांना ज्ञान देऊन भक्तीमार्गात प्रशस्त करणे, प्रसंगी मौन धारण करणे, चौफेर निरीक्षण, हे आणि असे अनेक ग्राह्य गुण आठवताना, त्याचे मनन, चिंतन करत‌ असतानाच प्रशस्त असा मुंबई पुणे महामार्ग (एक्स्प्रेस वे) लागला. तोही जणू काही श्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातील ग्राह्य गुणांचे, सकलमत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे सतत मनन, चिंतन आणि निधीध्यासन केल्यास, आपल्या जीवनरुपी गाडीला ज्ञान आणि भक्तीची चाके लावल्यास, आपल्याही जीवनाची गाडी श्रीप्रभुच्या ह्या राजमार्गावर, अंतिम साध्याच्या दिशेने आश्वासकपणे मार्गस्थ होईल, हेच सांगत होता.

समाप्त.

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)

आज सकाळी श्रीजींची संस्थेला भेट आणि कर्मचारी आणि सभासदांसाठी मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले होते.  दुपारच्या महाप्रसादानंतर आम्ही माणिकनगरच्या परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवणार होतो.

सकाळी साधारण साडेअकरा वाजता आम्ही सर्व संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी “कृषिवेद” इमारतीत आलो. श्रीजी संस्कृती संवर्धन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. NDA, NEET, JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना शहरी भागामध्ये लाखो रुपये आकारले जातात. पण ग्रामीण भागातील मुलांनाही ह्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करता यावे आणि त्यासाठी त्यांना सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखून संस्कृती संवर्धन मंडळाने, ग्रामीण भागातील मुलांची त्या दृष्टीने तयारी करून घेण्यासाठी KOTA (NDA, NEET, JEE coaching classes) क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून KOTA क्लासेसच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ श्रीजींच्या हस्ते आज सकाळी पावणे बारा वाजता टाळ्यांच्या गजरामध्ये पार पडला.  यावेळी श्री. प्रमोददादांच्या सुनबाईंनी सौ. श्रद्धा देशमुख ह्यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल प्रास्ताविक केले. त्यानंतर श्रीजींनी आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना स्पर्धात्मक परीक्षांना समर्थपणे सामोरे जाण्याची मानसिकता विशद केली. त्याचबरोबर संस्थेने नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

त्यानंतर श्रीजींचे संस्थेच्याच इमारतीत नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि  सदस्यांसाठी मार्गदर्शनपर उद्बोधन आयोजित केले होते. ह्या सभागृहात पहिला कार्यक्रम श्रीजींच्याच उपस्थितीत होत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ह्या हॉलमध्ये पाच-सातशे लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. व्यासपीठासमोर चढत्या उंचीने पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रेक्षक क्षमता तर वाढतेच, पण प्रत्येकाला कुठल्याही कोपऱ्यातून समोरचा वक्ता अगदी सुस्पष्टपणे दिसतो. सभागृहात आवाजाचीही व्यवस्था उत्तम आहे.

सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट श्रीजींचे आगमन झाल्यावर, श्री प्रमोद दादांनी श्रीजींना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्रीजींना कार्यक्रमाच्या अध्यक्षपदांचा मान देऊन, त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संस्थेच्या गेल्या वर्षभराचा संक्षिप्त आढावा सुरुवातीला घेतला गेला. त्यानंतर श्रीजींना आशीर्वादपर उद्बोधन करण्याची विनंती करताच, श्रीजींनी केवळ मी बोलण्यापेक्षा आपण सगळे संवाद करूया, असे म्हटले.

आपल्या संबोधनाच्या सुरुवातीला संस्कृती संवर्धन मंडळातील “संस्कृती” या शब्दावर श्रीजींनी भाष्य केले. माझ्याकडे एक भाकरी आहे, त्यातून अर्धी भाकरी शेजाऱ्याला देऊन, उरलेली अर्धी भाकरी खाणे ही संस्कृती होय. आपल्या अशा उदात्त संस्कृतीचा अर्थ लक्षात घेऊन, तो सत्यात उतरविण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे काम, संस्कृती संवर्धन मंडळातर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून केले जाते, असे श्रीजींनी सांगतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सभागृहात झाला. संस्थेचे मुख्य कार्यालय ज्याचे नावच ‘कर्मयोग’ आहे, त्या कर्मयोगाचा खरा मतीतार्थ, त्या अनुषंगाने संस्थेने केलेली आतापर्यंतची वाटचाल, मानवी मूल्यांची केलेली जोपासना आणि ह्या सर्वांसाठी पूरक अशी श्रीप्रभुकृपा, याचा थोडक्यात उहापोह श्रीजींनी करून, उपस्थितांना संवाद करण्यासाठी प्रश्न विचारण्यास सांगितले.

कर्मयोगालाच धरून श्रीमद्भगवद्गीतेच्या कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालेला हा संवाद, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, अशा विविध विषयांवर, उपस्थितांच्या मनातील अनेक शंकांचे शास्त्रसंमत, व्यवहारातील अनेक उदाहरणांनी, शंकाचे निरसन व संपूर्ण समाधान होण्यात झाला. उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधान करताना श्रीजींनी भगवद्गीता, उपनिषदे ह्यातील अनेक श्लोक म्हटले. त्यांचे यथायोग्य विवरण, व्यवहारातील सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या उदाहरणांची सांगड घालून, सामान्यांच्या गळी त्यांना रूचेल, पचेल आणि पटेल अशा रीतीने समग्रपणे उतरवणे, हे श्रीजींच्या उद्बोधनाचे परम विशेष आहे. समोरच्याचे तात्काळ सम्यक समाधान करणे हे श्रीजींच्या विचक्षण प्रज्ञेचेच द्योतक आहे. समोरच्या व्यक्तीला एका सेकंदात नजरेखालून घालून (स्कॅन करून), त्याची समस्या ओळखून, त्या समस्येनुरुप परमात्म्याशी संवाद साधून, त्या वैश्विक शक्तीकडून येणारे संदेश आपल्या सिद्धवाणीमध्ये परावर्तीत करून, प्रसादासहित गरजेनुसार यथायोग्य उपासना तत्क्षण सांगणे, हे केवळ सद्गुरुच करू जाणे. अतिशय स्थितप्रज्ञ वृत्तीने, सर्वांचं सर्व काही ऐकून, सर्वांना मंगलमय आशीर्वाद देणारी, श्रीजींची सुहास्यवदन मूर्ती एका कोपऱ्यात उभे राहून पाहणे, हाही एक वेगळाच सुखसोहळा आहे. ह्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.

अर्धा पाऊण तास झालेल्या ह्या सुखसंवादानंतर,  श्री. प्रमोददादांनी आभारपर भाषण केले. त्यानंतर संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण सगरोळी दौऱ्यामध्ये अहोरात्र झटणाऱ्या श्री. धरमसिंग यांचा सत्कार विशेष होता. आपली संपूर्ण हयात प्रभुसेवेमध्ये आनंदाने व्यतीत केलेल्या श्री. धरमसिंगांचा, उत्साह वयाच्या ऐंशीकडे झुकले असतानाही तरुणांनाही लाजवील असाच होता. संपूर्ण दौऱ्यात जेथे जेथे धरमसिंग उपस्थित होते, तेथे ते त्यांना मी चालण्याऐवजी धावतानाच पाहिले. सेवा आणि कर्मयोगाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे, श्री. धरमसिंग!.

दुपारी दीडच्या सुमारास कार्यक्रम आटोपून आम्ही शारदानगरच्या परिसरात असलेल्या श्री. सरस्वतीदेवी मंदिर आणि श्री प्रभुगादीपाशी आलो. श्री मार्तंड माणिक प्रभू आपल्या सगरोळी दौऱ्यामध्ये ह्याच परिसरात वास्तव्य करून असायचे. आजही संध्याकाळी प्रभुगातीसमोर सप्ताह भजन म्हटले जाते. श्री प्रभुंचा प्रसाद असलेला सटका आजही आपल्याला येथे पाहायला मिळतो. सर्वांनी दर्शन घेतले, त्यानंतर आरती झाली. समोरच असलेल्या पिंपळ वृक्षाला पाहून, श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या काळात एका व्यक्तीला पिशाच्चबाधेपासून मुक्ती दिल्याच्या प्रसंगी ह्याच झाडाला बांधून ठेवले होते, त्या घटनेची आठवण, ह्यावेळी कुणीतरी सांगितली. भोजनानंतर सर्वांना आशीर्वाद देऊन दुपारी तीनच्या सुमारास आम्ही माणिकनगरला परतण्यासाठी निघालो.

सगरोळीकरांचा अविस्मरणीय पाहुणचार, नव्याने जुळलेले हृदयसंबंध स्मृतीपटलावर कोरत असतानाच आम्ही अटकळीच्या दिशेने रवाना होत होतो. संपूर्ण रस्ता हिरवागार होता. अटकाळीला श्री. देशमुख यांचे मधले बंधू श्री. विनोदराव वास्तव्यास असतात. श्री. गंगाधर सावकार, श्री. नागनाथ पेन्सिलवारदादा आणि संपूर्ण सगरोळी दौऱ्यामध्ये दौऱ्याचे नियोजन, व्यवस्था आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे, आमच्यापैकी कुणाला काही हवं नको पाहणारे, श्री. सुनीलजी देशमुखही आमच्याबरोबर सगरोळीपासून होते. श्री विनोददादांनी सहकुटुंब श्रीजींची पाद्यपूजा केली. सर्वांना चहा आणि नाश्ता दिला. श्री. विनोददादांचे घर शेतामध्येच आहे. त्यामुळे चहूबाजूंनी निसर्ग सोबतीला होताच. बाजूच्या झाडावर असलेले पेरू आम्हाला खायला मिळाले. घराच्या बाजूलाच संस्थेने व्यवस्थित जपलेले वाचनालय आहे. अटकळीला मुख्यत्वे संस्थेचा तेलबियाणे आणि सुगंधी वनस्पती प्रक्रिया ह्यावर भर आहे. आम्ही साधारणतः तासभर या ठिकाणी व्यतीत केला. शेतीपासून आधीच्या पिठाचार्यांच्या अनेक आठवणी श्री. विनोददादांनी ह्यावेळी जागवल्या. पुन्हा एकदा चहा घेऊन सव्वा पाचच्या सुमारास आम्ही देगलूरसाठी निघालो.

सव्वा सहाच्या सुमारास आम्ही देगलूरला श्री. मेढेवार सावकार यांच्या घरी पोहोचलो. येथेही अतिशय उत्साहात श्रीजींचे स्वागत व तद्नंतर श्रद्धेने पाद्यपूजा झाली. सावकारांच्या घरानंतर श्री. राजकुंटवारे यांच्याही घरी श्रीजींची पाद्यपूजा झाली. देगलूर मधील ह्या दोन पाद्यपूजा आटोपून आम्ही करडखेडला रवाना झालो. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेतली होती. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही करडखेडला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच हाती दिवट्या घेऊन, संबळ वाजवीत गावकरी श्रीजींच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सातवा)

सकाळी साधारण सव्वा अकरा वाजता श्रीजी पाद्यपूजेसाठी सगरोळी गावात निघाले. आजच्या दिवसाची पहिली पाद्यपूजा श्री. अभिजीत महाजन यांच्या घरी अतिशय उत्साहात पार पडली.‌ त्यानंतर श्री. चंद्रकांत पांचाळ, श्री. गिरीश अलुरकर आणि श्री. चंद्रकांत शक्करवार ह्यांच्याकडच्याही पाद्यपूजा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडल्या. ज्यांना श्रीजींना आपल्या घरी बोलावणे शक्य नव्हते, असेही अनेक प्रभुभक्त पाद्यपूजेसाठी श्री. अलुरकरांकडे उपस्थित होते. सर्वांना सुकामेवा घातलेले मसाला दूध श्री. अलुरकरांकडे प्रसाद म्हणून वाटले गेले.‌ काही देण्या-घेण्यापेक्षा श्रीगुरु आपल्या घरी स्वतः आले आहेत, हा आनंद, तो कृतार्थतेचा भाव सर्वच सगरोळीकरांच्या चेहऱ्यावर पाद्यपूजेदरम्यान सहज टिपता येत होता.

श्री. चंद्रकांत शक्कवारांकडून श्रीजींचा ताफा आता सावकार श्री. गंगाधर शक्करवार यांच्या गृही आला होता. येथे भक्तांची प्रचंड गर्दी होती. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून, वरच्या माळ्यावरील श्रीजींच्या पाद्यपूजेच्या स्थळापर्यंत, संपूर्ण मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींचे आगमन होताच फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. वरच्या मजल्यावरून सुमारे दहा मिनिटं गुलाबदलांची अखंड उधळण श्रीजींवर आणि प्रभुभक्तांवर होत होती. श्रीजींच्या पाद्यपूजेनंतर सुमारे दोन-तीनशे जणांनी श्रीप्रभुपादुकांचे दर्शन आणि श्रीजींचा आशीर्वाद घेतला. आलेल्या सर्व भक्तांसाठी आजही श्री. गंगाधर सावकारांनी महाप्रसादाची सोय केली होती. श्रीगुरु आपल्या घरी प्रत्यक्ष आले आहेत, हा दिवस प्रत्येक भक्तासाठी उत्सवापेक्षा काही कमी नसतो. माझे सारे वैभव हे केवळ आणि केवळ श्रीगुरु कृपेनेच आहे आणि हा कल्पवृक्षरुपी श्रीगुरु आपल्या गृही येतो, अशावेळी त्याच्या स्वागतामध्ये कुठलेही न्यून राहता कामा नये, याची काळजी सावकारांनी पदोपदी घेतल्याचे जाणवले. श्री. गंगाधर सावकारांच्या प्रत्येक कृतीतून कृतज्ञतेचा, कृतार्थतेचा, तो आनंद अगदी ओसंडून वाहत होता. श्रीगुरूंचा आशीर्वाद आपल्याबरोबरच इतरांनाही मिळावा, ही त्यांची तळमळही वाखाणण्याजोगी होती. सर्व भक्तांना श्रीजी अत्यंत प्रसन्न मुद्रेने सामोरे जात होते, आपल्या अभयकरांनी त्यांना आशीर्वाद देत होते.‌

सावकारांकडचे अत्यंत हृदय स्वागत स्वीकारून, श्रीजी आता श्री. नागनाथ पेन्सिलवार यांच्या घरी आले होते. पावसामुळे सगरोळी गावात लाईट नव्हती पण, श्रीप्रभुगादीचा प्रत्यक्ष सूर्यच आज भक्तांच्या घरी पूर्ण तेजाने तळपत होता. आपल्या कृपादृष्टीने त्यांचे क्षेम कल्याण चिंतीत होता. श्री. नागनाथरावांची पुढील पिढी श्रीजींच्या पाद्यपूजेमध्ये दंग होती. पण श्री नागनाथराव सर्व भक्तांची जातीने चौकशी करत होते. यांच्याकडेही मसाला दुधाचा प्रसाद होता.‌ पाद्यपूजेची पुढील फेरी श्री. भरडे सावकारांकडे झाली.‌ यांचे घर देशमुखांच्या गढीच्या पाठीमागेच आहे. सावकारांकडे पाद्यपूजा होऊन श्रीजी आता श्री. श्याम जोशी यांच्या घरी आले होते. श्री. श्यामदादांचे दुमजली घर श्री गुरूंच्या स्वागतासाठी सज्ज होते. घराच्या अंगणात काढलेली जय गुरु माणिकची रांगोळी आकर्षक रंगसंगतीमुळे मन वेधून घेत होती. श्री. श्याम जोशी आणि त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. आज दुपारचे महाप्रसाद श्री. जोशींच्या घरीच होता. श्रीजी, ब्रह्मवृंद, गावकरी, सेवेकरी एकाच पंक्तीला बसले. गावाकडील भक्तांची सेवा ही शहरी भक्तांपेक्षा खूप वेगळी असते. भोजन वाढताना मनापासून केलेला आग्रह गावाकडे अजिबातच मोडता येत नाही. मिष्टान्न भोजनाबरोबरच सर्वांनीच मग गरमागरम मिरचीभजीचा आस्वाद घेतला. महाप्रसादानंतर भक्तकार्यच्या गजरामध्ये आम्ही सर्व अतिथीगृहावर आलो.

सकाळी पाद्यपूजेला निघतेवेळी माझ्या गाडीतील पेट्रोल अगदी खालच्या पातळीवर गेले होते. पेट्रोलच्या इंडिकेटरवर दोनच काड्या दिसत होत्या. तेथून पेट्रोल पंप सुमारे वीस मिनिटांवर असल्यामुळे, जाऊन येऊन साधारण पाऊण तास लागेल आणि आपल्यामुळे पाद्यपूजेला उशीर नको, म्हणून त्यावेळेला पेट्रोल भरता येणे शक्य नव्हते. गाडी जेमतेम पन्नास-साठ किलोमीटर जाईल, असे दाखवीत होती. महामार्गावर गाडीला लांबचा पल्ला गाठते, पण शहरांमध्ये किंवा गावच्या गल्लीबोळामध्ये तसे होत नाही. त्यातच अनेक पाद्यपूजांमुळे गाडी वारंवार चालू-बंद करणे, मागेपुढे करणे ह्यामुळे संपूर्ण पाद्यपूजा फेरीमध्ये पेट्रोल संपणार नाही ना, अशी धाकधुक मनात होती. ती काळजी माझ्या चेहऱ्यावर श्रीजींनी, श्री. गंगाधर सावकार यांच्या घरी कदाचित पाहिली. श्रीजींनी नजरेनेच मला खुणावून विचारले आणि एक मंद स्मित केले. जणू ते म्हणत असावेत, कशाला काळजी करतोस? माझे सत्व राखा, म्हणून श्रीप्रभु चरणांना तिथल्या तिथेच विनंती केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी सव्वा अकरा वाजता निघालेलो आम्ही, साधारणतः साडेतीनला परत अतिथीगृहावर आलो. पेट्रोलच्या इंडिकेटर वर अजूनही दोनच काड्या होत्या, आणि गाडी अजूनही पन्नास-साठ किलोमीटर जाईल असेच दाखवत होती.

अतिथीगृहावर आल्यावर तडक पेट्रोल भरायला निघालो. बिलोलीचा पेट्रोल पंप येताच, पेट्रोलचा इंडिकेटर वाजू लागला. पेट्रोलने किमान पातळी गाठली गेली होती. अगदी वेळेमध्ये पोहोचून, पेट्रोल फुल्ल करून घेतले. येताना मात्र त्या ओढ्याच्या जागी पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती. समोरून आलेल्या दुचाकी स्वारामुळे पाण्याच्या वाढलेल्या पातळीचा अंदाज येत होता. श्री व्यंकमामातेला ज्याप्रमाणे नाल्याला आलेल्या पुरातून श्रीप्रभुने जसे हात देऊन अलगद वाचवले, अगदी त्याच प्रसंगाचे स्मरण करून, भक्तकार्यच्या जयघोषात पाण्यामधून गाडी दामटवली. एक क्षण गाडी थोडीशी हलली, पण प्रभुकृपेने सुखरूप निघालो. खिशातल्या खारकांच्या प्रसादाला हात लावला. यथावकाश अतिथीगृहावर आलो. थोडावेळ पाठ टेकवून संध्याकाळच्या चहाच्या वेळेस, तेथील स्थानिक ड्रायव्हरने सांगितले की बिलोलीचा रस्ता पावसामुळे आता बंद झाला आहे. तेथे छातीएवढे पाणी झाले आहे. श्रीजींनी केलेल्या मंदस्मिताचे रहस्य मला आता उघडले होते. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी.‌.. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या घटनांतून श्रीगुरु आपल्या भक्तांचे सत्व कसे राखतो, हे अनुभवणे रोमांचकारी असते. ह्या आणि अशा अनेक प्रसंगातून आपली श्रीगुरुवरील श्रद्धा, अधिकाधिक बळकट होत जाते.

दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे सकाळच्या सत्रात पाद्यपूजांना थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे सकाळच्या वेळेत चार पाच भक्तांकडच्या पाद्यपूजा राहून गेल्या होत्या. संध्याकाळी पाऊस असतानाही सकाळी राहिलेल्या पाद्यपूजा संध्याकाळी पूर्ण करूया, यावर श्रीजींचा कटाक्ष होता. झिमझिम पडणाऱ्या पावसामध्येसुद्धा आपल्याला भक्तांच्या घरी जायला हवे, ह्या श्रीजींच्या संकल्पाने आम्ही श्रीजींसहित सायंकाळी सात वाजता पुन्हा सगरोळी गावात निघालो.

पहिली पाद्यपूजा श्री. ठाकूर यांच्याकडे होती. त्याच्यानंतर अनुक्रमे श्री. यलमवार, श्री. बाजीराव पेन्सिलवार, श्री. भंडारे आणि शेवटी श्री. नंदू जाधव यांच्याकडे श्रीजींचे आगमन व श्रद्धायुक्त पाद्यपूजन झाले. कुणाकडे बसायला अगदीच कमी जागा, लाईट नसल्यामुळे पुरेशा प्रकाशाचा अभाव, अरुंद गल्लीबोळ, जेथे वाहन जाऊ शकत नाही, अशाही परिस्थितीत श्रीजींनी स्थितप्रज्ञतेने सर्वत्र पाद्यपूजा स्वीकारल्या. प्रसंगी चढणीवरूनही चालत श्रीजी अत्यंत उत्साहाने भक्तांच्या घरी आशीर्वाद द्यायला जात होते. गोरज मुहूर्तावर, सायंकाळच्यावेळी श्रीजी पूर्णकलेने चंद्राच्या शितल किरणांसारखी कृपादृष्टी समभावाने सर्वांवर पडत होती.

सगरोळीतल्या सर्व पाद्यपूजा आटोपल्यावर श्रीजी आता पुन्हा प्रभुमंदिरात आले होते. सगरोळील्या राहिलेल्या प्रभुभक्तांना खारकांच्या प्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर श्रीजींनी प्रभुमंदिरात आरती केली. आणि आरतीनंतर आम्ही बाजूलाच राहत असलेल्या श्री. मुकुंदशास्त्रींच्या घरी गेलो. श्री. मुकुंद शास्त्रींचे घर चालुक्यकालीन गणपतीच्या बाजूलाच आहे. श्री व सौ. मुकुंद शास्त्री यांनी श्रीजींची पाद्य पूजा केली.‌ आम्ही पुन्हा अतिथीगृहावर आलो. येथेच रात्रीचे भोजन झाले. इतका वेळ दम धरून आणि वचकून असलेल्या पावसाने, धुवांधार बरसायला सुरुवात केली. वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण दौऱ्यामध्ये, आम्ही अतिथीगृहावर आलो की पाऊस जोरात पडायला सुरुवात व्हायची. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र पाऊस एक तर विश्राम घ्यायचा किंवा अतिशय सौम्यपणे बरसायचा. श्रीजींच्या अस्तित्वात जणू काही त्यानेही आपल्या वृत्तीला लगाम घातला होता. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, लाईट नाही अशा परिस्थितीतील सगरोळीची ती रात्र कायमच स्मरणात राहील. संस्थेने सर्व खोल्यांना मच्छर येऊ नये म्हणून जाळ्या बसवलेल्या आहेत, त्यामुळे लाईट नसतानाही बाहेरच्या सुखद गारव्यात समाधानाने झोप लागली.

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सहावा)

ज्ञानादान हा श्रीजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावर ज्ञानदान करण्यासाठी विराजमान होतात, तेव्हा त्यांची मुद्रा विलक्षण तेजस्वी होते. ज्ञान देताना होणारा अंतरंगातील आनंद यांच्या मुखकमलावरही झळकतो. चैतन्याचा झरा त्यांच्या वाणीतून खळखळत वाहत राहतो. सद्गुरु हा सदैव भक्तांमध्ये रमणारा असतो. समोर खचाखच भरलेले सभागृह पाहून श्रीजींची कळी अधिकच खुलली होती. सत्पुरुषांच्या अंगी असणारी सर्व लक्षणे आपल्याला श्रीजींमध्ये ठासून भरलेली आढळतात आणि दौऱ्यामध्ये त्याचे प्रमाण जागोजागी मिळत होते. आपल्या प्रवचनातील मुख्य विषयाला हात घालण्याआधी प्रभुवंदना आणि गुरुपरंपरेला वंदन करून, सर्वप्रथम ज्या प्रेमाने, श्रद्धेने आणि आपुलकीने श्रीप्रभु पादुकांचे स्वागत केले त्याबद्दल श्रीजींनी समस्त सगरोळीकरांचे आभार मानले. तसेच तुम्ही अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने केलेल्या आदरातिथ्यामुळे मला अत्यंत आनंद झाला, असेही प्रतिपादन केले. श्रीजींच्या या विनयशीलतेमुळे उपस्थितांत टाळ्यांचा कडकडाट झाला. येथे स्वागत माझे नसून श्रीप्रभु पादुकांचे आहे, हा श्रीजींचा अकर्ता भाव माझ्या मनास अत्यंत भावला.

श्रीजी पुढे म्हणाले की, सगरोळी गावचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा अत्यंत प्राचीन, अत्यंत पुरातन असा संबंध आहे. गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून सगरोळीकरांचे प्रभु संस्थानाशी अत्यंत प्रेमाचे, भक्तीचे आणि श्रद्धेचे नाते आहे, आणि ते उत्तरोत्तर दृढ होत आहे, हे पाहून मला खूप खूप आनंद होत आहे. श्रीजींच्या ह्या वाक्यावर टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. मुळात: गोरगरिबांचे दुःख निवारण करून, त्यांना भक्ती मार्गात आणणे हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट होते, आणि इतक्या वर्षांनी ही हा हेतू सफल होत आहे, किंबहुना त्याची व्याप्ती वाढत आहे, हे पाहून श्रीजींना अत्यानंद होत होता. ह्यातून सद्गुरूंची दृष्टी कशी असते, याची आपल्याला जाणीव होते.

प्रवचनाच्या मुख्य विषयाला हात घालताना श्रीजी म्हणाले, भक्तकार्य कल्पद्रुम हे श्रीप्रभुचे ब्रीद आहे. श्रीप्रभु हा भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे. हे सर्वसामान्य जनांना समजावून सांगताना, श्रीजींनी स्वर्गातल्या कल्पवृक्षाची कथा सांगितली. त्यामुळे श्रीप्रभु आपण जे जे इच्छिले, ते ते देणारा आहे. पण असे असले तरी प्रभुकडे काय मागावे, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. आपल्या इच्छांची यादी कधीही संपत नाही. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मनुष्यांच्या केवळ दोनच इच्छा आहेत. पहिली म्हणजे, मला सदासर्वदा सुख मिळावं आणि दुसरी इच्छा म्हणजे, मला कधीही दुःख होऊ नये. मग या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग किंवा उपाय काय? तर माणसाच्या ह्या इच्छा केवळ ज्ञानानेच पूर्ण होतात.‌ श्रीजींनी पुढे सांगितले की, ह्या पृथ्वीवर मिळून जेवढं धान्य, सोनं, पैसा, पशु, स्त्रिया आहेत, ते एका माणसालाही पुरे पडणारे नाहीयेय, त्याला तृप्त करणारे नाहीयेय. आणि म्हणून असा विचार करून माणसाने समाधानाने राहावं. आपण देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की, देवा, मला सुख दे आणि शांती दे! श्रीजी म्हणतात, केवळ सुख काही कामाचे नाही. सुखामध्ये शांती हवी, समाधान हवं. आजच्या काळातील सर्व समस्या, ह्या शांतीच्या अभावामुळे आहेत.

मग आता हे सुख कुठे मिळेल? वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे, जो सर्व सृष्टीचे नियमन करतो, जो सर्वांचा पालन पोषण करणारा आहे, जो सर्वांवर स्वामित्व गाजवतो, असा तो, परमात्मा आहे. तो एक रूप असूनही अनेक रूपांमध्ये नटतो आणि अशा परमात्म्याला जो आपल्या अंतरात पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते.

जसा दाहकता हा अग्नीचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे तो आनंद, ते सुख सतत त्या वस्तूत असावं. जगातील कोणत्याही गोष्टीत सुख देण्याचं सामर्थ्य नाहीयेय. कारण सुख हा वस्तूचा स्वभावच नाहीयेय. आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये सुख आहे असं वाटतं, त्या त्या गोष्टींमध्ये शाश्वत सुख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वस्तू  सुखदायक वाटतात, त्यामध्येही मुख्यत्वे तीन दोष आहेत. पहिला दोष म्हणजे दुःख मिश्रित तत्व अर्थात् जगात जेवढी सुखे आहेत त्या दुःख मिसळलेले आहे. सुख संपताना ते नेहमी दुःख देऊन जातं. दुसरा दोष म्हणजे बंधतत्व म्हणजेच ते सुख तुम्हाला बंधनात टाकते. त्याची सवय लागते, त्याचं व्यसन लागते, त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाहीत. शेवटचा तिसरा दोष म्हणजे अतृप्तीकरत्वम् म्हणजेच सुख कितीही मिळालं तरी आता पुरे असे कोणीही म्हणत नाही. म्हणूनच अशा दोषयुक्त वस्तूंपेक्षा जो परमात्म्याला आपल्या हृदयात वारंवार पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते. आणि अशा शाश्वत सुखाला शास्त्रामध्ये आणखीन एक नाव आहे. ते म्हणजे, मोक्ष. मोक्ष म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती.‌ म्हणजेच, जेव्हा आपण सुखाची अपेक्षा करतो, तेव्हा आपण खरेतर मोक्षाचीच अपेक्षा करतो.

सामान्य जणांना वाटते की, माझ्या नशिबात असेल तर मला मोक्ष मिळेल, दैवाने दिला तर मला मोक्ष मिळेल. पण श्रीजी म्हणतात, मोक्ष हा कोणाच्याच नशिबात नसतो. मोक्ष हा दैवाधीन नाही, मोक्ष हा प्रारब्धाधीन नाही. मोक्ष हा पुरुषार्थ आहे म्हणजेच मोक्ष ही मनुष्याने स्वप्रयत्नाने मिळवायची गोष्ट आहे. शास्त्र म्हणते, मानवाने जर आपले जीवन सार्थ करायचे असेल, तर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ करावेत. शास्त्राने जरी धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला असला, तरी व्यवहारात मात्र अर्थ, काम, धर्म, मोक्ष असा क्रम संयुक्तिक आहे. अर्थ, काम आणि धर्मावर आपले जे अवलंबून असणे आहे, विसंबून असणे आहे, ती निर्भरता सुटण्याचं नाव म्हणजे मोक्ष! शास्त्राने जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला आहे त्याचा अर्थ असा की, अर्थ आणि काम हे धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावेत. माणसाची प्रवृत्ती ही धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावी. मोक्ष मिळवण्याची अनेक साधने आहेत पण त्या सर्व साधनांपैकी भक्ती हे साधन सर्वश्रेष्ठ आहे.

श्रीजींचे प्रवचन उत्तरोत्तर रंगत होते. वेदांतातील अनेक कठीण संकल्पना स्पष्ट करताना, व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन शंकांचे समाधान झाल्यामुळे उपस्थितांमध्य टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि प्रसंगानुरूप श्रीजींच्या प्रवचनशैलीमुळे हास्याचे फवारे उडत होते. नदी आपल्या उगमापासून वाहताना, वाटेमध्ये अनेक उपनद्या जशा तिला येऊन मिळतात त्याचप्रमाणे, श्रीजींच्या प्रवचनामध्ये मुख्य संकल्पनेला जोडूनच, विषयाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी अनेक उपसंकल्पना येतात. मोक्ष मिळवण्याच्या अनेक साधनांपैकी भक्ती हे एक मुख्य साधन आहे असे म्हटल्यावर, श्रीजींनी आता भक्ती म्हणजे नेमकं काय, हे प्रकरण उपस्थितांना विशद करून सांगितले.

श्रीजी म्हणतात, भक्ती म्हणजे काय? त्याचा उहापोह करताना श्रीजी, नारद महर्षींची भक्तीची व्याख्या उद्धृत करतात. नारद महर्षी म्हणतात, भक्ती म्हणजे परमप्रेम! मग आता परमप्रेम म्हणजे काय? प्रेम तर आपण सगळेच करतो, कोणी गाडीवर, कोणी साडीवर, कोणी दाढीवर… पण हे प्रेम परमप्रेम आहे का? तर नाही, कारण ते चिरकाल टिकणारे नाही. आपल्यापेक्षा ज्येष्ठावर, आदरयुक्त आणि अपेक्षारहित प्रेम म्हणजेच परमप्रेम. आपले आपल्या मुलावर प्रेम असते, त्याला परमप्रेम म्हणता येईल का? आपण साधारणतः पितृभक्ती, मातृभक्ती, देशभक्ती असेच शब्द ऐकतो. परमेश्वराप्रती जे परमप्रेम आहे, त्याचच नाव भक्ती. श्रीजी पुढे म्हणतात, पण इथे एक समस्या आहे. ज्याला आपण कधी पाहिलं नाही, ज्याचं आपल्याला कुळ, गोत्र, नाव, गाव, ठावठिकाणा माहीत नाही, तो काळा आहे की गोरा आहे, हे माहीत नाही, मग त्याच्यावर परमप्रेम करा, असं नारद महर्षी का बरं म्हणत असावेत?

साधं लग्न करायचं तरी आपण अनेक चौकश्या करतो आणि मगच होकार देतो. अशावेळी आपल्याला परमेश्वराबद्दल काय माहित आहे? श्रीजी पुढे सांगतात, भक्ती ही तीन प्रकारची आहे. साधन भक्ती, साध्य भक्ती आणि आत्मस्वरूप भक्ती. मनुष्यप्राणी या तीनच गोष्टींवर प्रेम करू शकतो. ह्याशिवाय इतर गोष्टींवर प्रेम करायला त्याला जागाच शिल्लक नाही.

साधन भक्ती – जी वस्तू माझ्या सुखाचे साधन आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साधनावरील प्रेम.

साध्य भक्ती – जी वस्तू माझ्या सुखासाठी साध्य आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साध्यावरील प्रेम.

आत्मस्वरूप भक्ती – म्हणजे स्वतःवरील प्रेम.

ही संकल्पना स्पष्ट करताना श्रीजी म्हातारी सासूबाई, सुनबाई आणि हिऱ्यांचे कुडे ह्याचे उदाहरण देतात. सासूबाईंकडे असलेले हिऱ्यांचे पुढे मला कसे मिळतील, असा हेतू ठेवून सुनबाईने सासुबाईची (साधन) अहोरात्र सेवा आरंभली. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन सासूबाईंनी दसऱ्याच्या दिवशी हिऱ्यांचे ते कुडे सुनबाईला देऊन टाकले. हिऱ्यांचे ते कुडे (साध्य) मिळताच, सुनबाईने सासूची सेवा बंद केली. म्हणजे साधनावरचे प्रेम समाप्त होऊन आता ते साध्यावर आले होते. हिऱ्यांचे कुडे घालून काढलेले फोटो वगैरे पाठवून झाल्यावर एके दिवशी रात्री  जिवापाड प्रेम असलेले ते हिऱ्यांचे कुडे घालून, सुनबाई रात्री प्रवासाला निघाली. वाटेत दरोडेखोरांनी रस्ता अडवताच अंगावरील सगळ्या दागिन्यांसह अत्यंत प्रिय असलेले ते कुडे तिने दरोडेखोरांना देऊन टाकले. तुम्हाला काय हवं ते घ्या, पण मला मारू नका. म्हणजे साध्यावरील प्रेम‌ आता स्वतःवर आले होते.‌

ईश्वर आपल्या सुखाचे साधन आहे असे समजून, जेव्हा आपण ईश्वराकडे जातो त्यास निकृष्ट भक्ती म्हणतात.‌ त्याचप्रमाणे ईश्वराला साध्य समजून, त्याला प्राप्त करून घ्यायच्या उद्दिष्टाने केलेल्या भक्तीला मध्यम भक्ती म्हणतात.‌ पण तो परमात्मा, तो प्रभु माझंच स्वरूप आहे, अशा तादात्म्य भावनेने, एकात्म भावनेने जे परमेश्वरालाच आत्मा समजून, प्रेम करतात ती सर्वोत्कृष्ट भक्ती आहे. अशा ह्या ईश्वराची भक्ती करायचे ज्ञानोबा तुकोबारायांपासून सर्वांनीच सांगितले आहे.‌ पण ह्या ईश्वराचे नेमके स्वरूप काय? ते वर्णन करण्यासाठी अनेक संतांनी, अनेक ऋषींनी नाना प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण कोणीही ईश्वराचे यथायोग्य स्वरूप वर्णन करू शकले नाहीत. जसे एका हत्तीला सहा आंधळ्यांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून पाहिले. ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती खांबासारखा आहे. ज्याने हत्तीच्या कानाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. अशाप्रकारे प्रत्येकाने सोंड, शेपूट ह्या अनुरूप हत्तीचे वर्णन केले. वास्तविक हत्तीचे समग्र वर्णन कोणीही करू शकला नाही.

पण वेदांमध्ये ईश्वराचे स्वरूप तीन तत्त्वात केले आहे. पहिले म्हणजे ईश्वराने जग निर्माण केले. या जगाची निर्मिती ज्याने केली तो म्हणजे ईश्वर. सबंध जगामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था असल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वत्र जिथे तिथे सुव्यवस्था आहे, याचा अर्थ त्या व्यवस्थेचा कोणीतरी एखादा कर्ता किंवा नियामक असला पाहिजे, आणि तो म्हणजेच ईश्वर!  पण मग असा प्रश्न उठतो की, ईश्वराने हे जग निर्माण केले हे ठीक, पण ह्या जगाच्या निर्मितीसाठी सामग्री कुठून आली? ईश्वर हा जगद्कर्ता आहे मग जग निर्माण कसे झाले? मग दुसरे तत्व सांगितले गेले की, ईश्वराने जग निर्माण केले नाही तर, ईश्वर स्वयं जगद्रूप झाला. मग पुन्हा अपवाद उठतो की, ईश्वर जर स्वयं जगद्रूप झाला तर जगात जेवढे दोष आहेत, दुःख आहेत, जग जड आहे, जगात अनाचारी आहेत, पापी आहेत, मग हे सगळे इश्वर स्वरूप आहे काय? ह्याला ही उत्तर म्हणून वेदांत पुढे सांगितले आहे की, ईश्वर हे जगताचे अधिष्ठान आहे आणि हे जगत् त्या अधिष्ठानावर भासणारा केवळ एक भ्रम आहे. हे समजावून सांगताना, श्रीजी मग सिनेमाचा पडदा आणि त्यावर दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटाचे उदाहरण देतात. सिनेमाचा पडदा हे अधिष्ठान असून त्यावर दाखविली जाणारी कथा हा भ्रम आहे. चित्रपटगृहात जोपर्यंत अंधार असतो, तोपर्यंतच आपल्याला चित्रपट दिसतो. पण चित्रपटाची कथा संपल्यावर, चित्रपटगृहातले दिवे लागल्यावर, आपल्याला पांढरा पडदाच दिसतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा अंधकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत मायेमुळे भ्रांती होतच असते. पण एकदा का ज्ञानाचा प्रकाश पडला की, सत्तेचे अधिष्ठान दिसू लागते आणि आपल्याला अधिष्ठानाचे ज्ञान होते.

सुखापासून सुरू झालेला हा प्रवास हा अनेक नागमोडी वळणे घेऊन, ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत येऊन म्हणजेच अथांग ज्ञानसागरापर्यंत येऊन पोहोचला होता. सर्व प्रभुभक्तांना एकाच नावेमध्ये बसवून श्री ज्ञानराज प्रभुरुपी कुशल नावाड्याने, ज्ञानाच्या ह्या खळखळ वाहणाऱ्या नदीतून, वेदांतसागरापर्यंत सर्वांना सुखरूप आणून पोहोचवले होते. प्रवचनाच्या शेवटी अवधूत चिंतनाचा गजर होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटाने श्रीप्रभु मंदिराचे सभागृह भरून राहिले होते.

प्रवचननंतर श्रीजींनी श्रीप्रभुंची आरती केली आणि अतिथीगृहाकडे प्रस्थान आरंभले. श्रीप्रभु मंदिराच्या बाहेरच सगरोळी गावातील सावकार श्री.गंगाधर शक्करवार ह्यांनी श्रीजींच्या प्रवचनानंतर, भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. श्रीजींच्या प्रवचनासाठी गावातील आबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रवचनानंतर प्रत्येकजण प्रभुचा प्रसाद घेऊन जात होता. पण भक्तांची संख्या पाहता केलेला प्रसाद कमी पडेल की काय अशी काळजी यजमानांना वाटू लागली. पातेल्यात असलेला प्रसाद आणि भक्तांची संख्या याचे प्रमाण अगदीच व्यस्त होते. प्रसादासाठी भक्तांची खूपच मोठी रांग होती, त्यामुळे ऐन वेळी आता काय करावे, अशी चिंता प्रसादाचे वाटप करण्याऱ्यांना भेडसावू लागली. भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले होते आणि नव्याने जास्तीचा भात शिजवायला वेळही नव्हता. त्यातच पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे श्रीप्रभुला शरण जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय नव्हता. हे प्रभुराया, तूंच आता आमचे आता सत्व राख, असे म्हणून भक्तकार्याचा जयघोष झाला. आहे तेवढा प्रसाद वाढूयात, असा विचार करून कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रसाद वाटपाला सुरुवात केली. रांगेतून भक्त येतच होते, प्रत्येकाला भरपूर प्रसाद मिळत होता. पातेल्यात असलेल्या प्रसादाचे आणि भक्तांचे व्यस्त प्रमाण वाटत असतानाही, सर्वांनी मनसोक्त प्रभुचा प्रसाद घेतला. श्रीगुरु जेथे असतो, तेथे देवी अन्नपूर्णेचा निरंतर वास असतो आणि त्यांच्याच कृपेच्या कटाक्षाने पुढील गोष्टी विनासायास घडून येतात. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने श्री माणिक चरितामृतातील भालकीच्या जंगलातील  माधुकरी मागून आणलेल्या अन्नाने हजारो लोक जेवल्याचा प्रसंग आठवला. श्रीगुरूंचा अवतार काळ, स्थळ जरी बदलले, तरी ते एकच गुरुतत्व त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत असते. श्री गंगाधर सावकारांच्या अन्नदानाच्या प्रसंगातून हीच व्यवस्था, श्रीगुरुंचा हाच निर्विवाद अधिकार अधोरेखित होतो.

अतिथीगृहावर परतल्यावर आमच्या सर्वांचे भोजन झाले. श्रीगुरुंच्या कृपावर्षावाची अनुभूती निरंतर घेत असतानाच, बाहेरही पावसाची जोरदार वर्षा सुरू होती. श्रीप्रभु चरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करून निद्रादेवीच्या अधीन झालो.

क्रमशः