२८ फेब्रुवारी १९४५ रोजी श्री शंकर माणिकप्रभु, प्रभु चरणी लीन झाले. महाप्रयाणाच्या वेळी हणमंतराव कारभारी व व्यंकटराव रेगुण्डवार हे दोघे महाराजांच्या जवळ होते. महाराजांना उदरव्यथेनी वेदना होत होत्या. तरी त्यांना विनोद सुचला. महाराज व्यंकटरावाला उद्देशून  म्हणाले ‘‘व्यंकट, येतोस काय रे माझ्या बरोबर?’’ हे शब्द ऐकताच व्यंकटराव ओशाळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. ‘‘महाराज, मुले लहान आहेत…’’ वगैरे सबबी तो सांगू लागला. त्याचे उत्तर ऐकून महाराजांना हसू आवरेना. ते पाहून हणमंतराव म्हणाला ‘‘महाराज, मी आपल्या बरोबर येण्यास तयार आहे. आपण मला घेऊन चला.’’ महाराजांची चर्या गंभीर झाली. काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘तुला मी घेऊन गेलो असतो रे हणमंत, पण मुद्दाम येथे ठेवून जात आहे. माझ्या मनात बरीच कार्य करावयाची होती. ती पुरी झाली नाहीत. आता आमचा राजा ती कामगिरी पार पाडील. आमचा राजा (श्री सिद्धराज माणिक प्रभु ) काय काय करणार आहे ते पाहण्याकरता तुला ठेवून जात आहे.’’ आणि काही क्षणानंतर महाराज समाधिस्थ झाले.

सन १९८१ पर्यंत ही हकीगत कुणालाच ठाऊक नव्हती. १९८१ च्या डिसेंबर महिन्यात श्री सिद्धराज माणिक प्रभूना संस्थानची सूत्रे हाती घेऊन २५ वर्षे झाली आणि रजत जयंती महोत्सव साजरा झाला. त्या दिवशी हणमंतराव महाराजांच्या भेटीस आले. व डोळयांतून अश्रू ढाळीत त्यांनी ही हकीगत महाराजांना सांगितली. व म्हणाले ‘‘श्री शंकर महाराज त्या दिवशी जे काही बोलले त्याचा अर्थ मला आता समजला. आपली ही २५ वर्षांची कारकीर्द मी डोळ्यांनी पाहिली. त्यांच्या ‘राजांनी’ केलेलं सारं काही मी पाहिलं. आता मला निरोप द्या. मला श्री शंकर माणिक प्रभूच्या चरणी जाऊन त्यांच्या राजांनी केलेलं सारं काही त्यांना सांगायचं आहे.’’

[social_warfare]