स्थितप्रज्ञता आणि अचंचल श्रद्धेची मूर्ती

स्थितप्रज्ञता आणि अचंचल श्रद्धेची मूर्ती – श्रीदेवी भगवती व्यंकम्मा

श्री माणिकचरितामृताचे श्रवण, मनन आणि निदीध्यासन करताना चित्तशुद्धी तर होतेच, त्यातील अनेक पात्रे आपल्याभोवती रुंजी घालत राहतात. त्या त्या पात्रांच्या संदर्भात घडलेल्या लीला, त्यातून श्रीप्रभुंनी केलेला निजात्मबोध किंवा त्या लीलेचे उलगडलेले रहस्य जाणून, आपल्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होत राहतो. श्रीप्रभु चरितामृताचे घुटके घेताना, श्रीदेवी व्यंकम्मा मातेची स्थितप्रज्ञता आणि तिची श्रीप्रभु चरणांवर असलेली अचंचल श्रद्धा, आपल्या हृदयात खोलवर घर करून राहते.

तेविसाव्या अध्यायात कोमटी जातीची, अगदी बालवयांतच वैधव्य पदरी पडलेली, व्यंका बाला आपल्यासमोर येते. श्रीप्रभुंच्या दर्शनाला येत असताना, अवकाळी पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेला संपूर्ण परिवार, पुराच्या पाण्यात बुडत असताना कुणीतरी हात देऊन पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर ठेवलेले, सोबत कुणीही नाही, काय करावे? कुठे जावे? भविष्यात काय वाढून ठेवलाय, याची सुतराम कल्पना नसलेली, व्यापारशून्य झालेली इंद्रिये घेऊन, अवघ्या अकरा वर्षाची ही बालविधवा पोर मैलार येथे श्रीप्रभुंच्या दरबारात येते. मध्यभागी गादीवर बसलेल्या श्रीप्रभुंना पाहून आपल्याला पाण्यातून वाचविणारा हाच तो! हाच मला आता भवसागरातूनही तारेल, अशी व्यंकम्माची मनोमन खात्री पटते. एका कोपऱ्यात बसून तासान तास, नंदी जसा शिवाला पाहतो, तसे एकटक श्रीप्रभुंकडे पाहत बसावे, त्याच आत्मानंदात तृप्त असावे, श्रीप्रभुंच्या दिव्यरूपाशी तासन् तास अनुसंधान साधावे, एवढेच व्यंकम्माला माहीत होते. श्रीप्रभुंच्या प्रसादाची काळजी नाही, की श्रीप्रभु चरणांवर मस्तक ठेवायची इच्छा नाही, देहाची पर्वा नाही, अथवा काही मागणे नाही, केवळ आणि केवळ अनिमिष नेत्रांनी श्रीप्रभुंचे नि:श्चल ध्यान, त्यातच तीचे समाधान! कुण्या शिष्याने हटकल्यावर भानावर येऊन व्यंकम्माने श्रीप्रभुंकडून खारकांचा प्रसाद घेतला आणि बाहेर गेली. दोन-तीन दिवसांनी व्यंकम्मा पुन्हा श्रीप्रभु दरबारी आली. त्यावेळी श्रीप्रभुंनी पुन्हा येण्याचे कारण विचारताच, माझे या जगात कोणीही नसून, अंतरीची तळमळ शांत होण्यासाठी आपल्या परममंगल चरणांशिवाय अन्य कुठलेही स्थळ नाही, हे तिने श्रीप्रभुंना अत्यंत निश्चयपूर्वक सांगितले आणि आपल्याला आसरा देण्यासाठी विनंती केली. परंतु आम्ही फकीर, आमच्याबरोबर राहावयाचे, तर अंगावरचे सर्व दागिने उतरावे लागतील, प्रसंगी भुके राहावे लागेल, अंगाला भस्म फासून राहावे लागेल, असे सांगून श्रीप्रभुंनी व्यंकम्माची पहिल्यांदा परीक्षा पाहिली. परंतु श्रीप्रभु चरणांवाचून अन्य तरणोपाय नाही, हा दृढनिश्चय झालेल्या व्यंकम्माने तात्काळ आपले दागिने उतरवून, अंगी शुभ्र वस्त्र धारण केले आणि कपाळी भस्म चर्चिले, ते जीवनभरासाठीच! श्रीप्रभुंची आज्ञा ही ‘शब्दप्रमाण’ मानून, त्याची जपणूक व्यंकम्माने अगदी प्राणपणाने आजीवन केली. अगदी न्हाणीघरात स्नान करत असताना, ‘असशील तशी निघून ये!’ हा श्रीप्रभुंचा निरोप मिळताच, स्त्रीलज्जेचे भानही न राहता, व्यंकम्मा तशीच नग्न अवस्थेत श्रीप्रभुंकडे धावत निघाली. आपल्या भक्ताचे हे निर्व्याज प्रेम पाहून, तिची तत्परता पाहून श्रीप्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला व्यंकम्माला प्रसाद म्हणून लज्जा रक्षणासाठी दिला. श्रीप्रभुंच्या या महावस्ररूपी प्रसादाने व्यंकम्माचे अवघे जीवनच बदलून गेले. ती वृत्तीने नि:संग झाली. आपल्या विरक्त जीवनशैली आणि साधनेने तिने लवकरच श्रीप्रभुंचा विश्वास आणि कृपा संपादन केली. माणिकनगरची स्थापना आणि तेथे कायमचे वास्तव्य करण्यापूर्वी श्रीप्रभु अनेक ठिकाणी भ्रमंती करीत. आपल्याबरोबर चार विश्वासू शिष्य बरोबर ठेवीत. अल्पावधीतच व्यंकम्माने ती योग्यता प्राप्त केली आणि श्रीप्रभुंनी आपल्या मणिचूल पर्वतातील एकांतवासात काही निवडक शिष्याबरोबर व्यंकम्मालाही सोबत घेतले. भालकीच्या घोर अरण्यात श्रीप्रभु व्यंकम्मासहित आपल्या शिष्यांसमावेत आठ आठ दिवस समाधी लावून बसत. याच एकांतवासादरम्यान श्रीप्रभुंनी व्यंकम्मास योगासने आणि समाधी कशी लावावी, हे शिकविले! एका सामान्य बालिकेपासून योगिनी बनण्याचा व्यंकम्माचा प्रवास आता श्रीप्रभुंच्या सान्निध्यात प्रशस्त होत होता.

बिदरच्या मुक्कामात असताना, सर्व जातीच्या भक्तांनी श्रीप्रभुंना आपापल्या घरी येऊन पूजा स्वीकारण्याचा आग्रह केला. त्यावेळेस सर्व भक्तांना श्रीप्रभुंनी मी उद्या माध्यान्हसमयी आपणाकडे येतो, असे आश्वासन दिले. माध्यान्ह समयी सूर्य डोक्यावर आला, तरी झरणी नृसिंहाच्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी श्रीप्रभु स्वस्थ पडून होते. सर्व भक्तांमध्ये बिदरनगरामध्ये पाद्य पूजेसाठी जाण्यासंदर्भात चलबिचल सुरू झाली. श्रीप्रभु अजूनही उठले नाहीत, म्हणून कुजबुज सुरू झाली. व्यंकम्मा मात्र एका कोपऱ्यात स्वस्थ बसून श्रीप्रभु नामाचा जप करीत होती. त्याचवेळी श्रीप्रभुंनी योगमायेने विश्वरूप धारण करून एकाच वेळी अनेक भक्तांच्या घरी पूजा स्वीकारल्या. थोड्यावेळाने सर्व भक्त पुन्हा श्रीप्रभुंकडे येताच, श्रीप्रभुंच्या योगशक्तीचा उलगडा झाला. अशावेळी शिष्यांमध्ये जरी चलबिचल होती, तरी व्यंकम्मा मात्र त्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहिली.

एका ब्राह्मण दांपत्यास वृद्धत्व आले, तरी त्यांना पुत्रसंतान नव्हते. श्रीप्रभुंची त्यांच्यावर विशेष प्रीती होती. एकदा ते दांपत्य भेटीस आले असता, त्यावेळेस व्यंकम्माही तेथे आली. श्रीप्रभुंनी व्यंकम्माला चार दिवस न येण्याचे कारण विचारले. त्यावर स्त्रीधर्मानुसार चार दिवस अडचणीचे असल्यामुळे, दर्शनास येता आले नाही, असे व्यंकम्माने श्रीप्रभुंना सांगितले. त्यावेळी श्रीप्रभुंनी व्यंकम्मास, ‘तुला कंटाळा आला असेल, तर तुझ्या मासिक पाळीचे दान या सत्पात्र पात्र ब्राह्मणपत्नीला देऊन मोकळी हो,’ असे सांगितले. येथेही श्रीप्रभुआज्ञा प्रमाण मानून व्यंकम्माने आपल्या हातून त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या हातावर पाणी सोडले आणि तिला रजोनिवृत्ती मिळाली.

टेहेळदास नावाचा श्रीप्रभुंचा एक अभिमानी भक्त होता.व त्याची माता साधारणत: सव्वाशे वर्षांची होती. श्रीप्रभु कधीकधी तिच्या भेटीसाठी तिच्या झोपडीत जात. एके दिवशी श्रीप्रभु टेहेळदासाच्या आईच्या झोपडीत तिच्याशी सुखसंवाद करीत असता, एकाएक झोपडीला आग लागली. त्या आगेच्या प्रभावाने बाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला. सगळीकडे एकच आगडोंब उसळला. श्रीप्रभु आगीमध्ये सापडले, ही वार्ता संपूर्ण माणिकनगरात पसरली. सर्वत्र एकच हाहाकार माजला. सर्व लोकांप्रमाणे श्रीप्रभुंचे बंधूही आग विझविण्यासाठी सरसावले. या प्रचंड आगीमध्ये टेहेळदासाच्या आईसहित श्रीप्रभुही आगीच्या भक्षस्थानी पडले असावेत, अशी शंका, ती भयंकर आग पाहून, अनेक लोकांच्या मनात आली. या हलकल्लोळातही व्यंकम्मा मात्र प्रलयकाळातही स्थिर असणाऱ्या एखाद्या योग्याप्रमाणे श्रीप्रभुगादी जवळ बसून निजानंदात निमग्न झाली होती. पंचमहाभूतांवर सत्ता असणाऱ्या निरालंब, निर्गुण, निरंजन, परिपूर्ण अशा श्रीप्रभुला अग्नी बाधा तो काय करू शकणार? असा ठाम विश्वास केवळ व्यंकम्माच्या ठायींच होता आणि म्हणूनच ती आपल्या जागी स्वस्थचित्त राहिली.

श्री हनुमंत दादा महाराज, मातोश्री श्री बयांमादेवी आणि श्रीनृसिंह तात्या महाराजांची समाधी झाल्यावर, आपणही श्रीप्रभुंच्या आधी समाधीस्थ व्हावे, ही व्यंकम्माची इच्छा होती. आणि श्रावण वद्य त्रयोदशीची मंगलवेळा साधून, अहोरात्र भजनात घालवून, देवी व्यंकम्मा निश्चेष्टित होऊन पडली. व्यंकम्माचे निर्वाण झाले, असे समजून तिच्या कोमटी जातीच्या लोकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. परंतु तिला हात लावताच, तिच्या तोंडातून ॐकार ध्वनी ऐकू येई. जिवंतपणाचे कोणतेही लक्षण व्यंकम्मात दिसत नव्हते. परंतु कोमटी लोकांनी हात लावताच तिच्या देहातून ॐकार ध्वनी ऐकू येई. त्यावेळेस व्यंकम्माचे अंतःकरण श्रीप्रभुंनी तात्काळ ओळखले. आपला अंत्यसंस्कार वैदिक पद्धतीने व्हावा, अशी तिची इच्छा असल्याचे श्रीप्रभुंनी सर्वांना सांगितले. त्याप्रमाणे श्रीप्रभुंच्या सेवेकरी ब्रह्मवृंदाकडून व्यंकम्माच्या अंत्यसंस्काराची तयारी केली गेली. प्रथमत: स्नान घालून, व्यंकम्मास शुभ्र चोळीपातळ नेसविण्यात आले. सर्वांगाला भस्म चर्चिले गेले, कपाळी शुभ्र गंधाचा टिळा आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घातल्या गेल्या. त्यावेळी व्यंकमा एखाद्या निर्मळ योगिनीप्रमाणे भासत होती. श्रीप्रभु आपल्याजवळ असल्याचे जाणून, व्यंकम्मा आपल्या जागेवरून उठली, तिने श्रीप्रभुंना अत्यंत मनोभावे नमस्कार केला. श्रीप्रभुंचे चरण घट्ट पकडले आणि पुन्हा मांडी घालून व्यंकम्मा योगासनात बसली, ती कायमचीच! व्यंकम्माच्या समाधीनंतर तिचे मंदिर बांधावे किंवा कसे, अशी विचारणा करताच श्रीप्रभु म्हणाले, ‘तिच्या सामर्थ्याने तीच आपले मंदिर उभारून घेईल!’ परमविदुषी श्रीदेवी व्यंकम्माचे भव्य मंदिर आजही आपल्याला माणिकनगरी पहावयास मिळते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी, श्रीदेवी व्यंकम्मा ही श्रीदत्तात्रयांची मधुमती शक्तीच आहे, अशी मान्यता सर्व भक्तांमध्ये आहे. नराचा नारायण होणे म्हणजे नेमके काय, हे आपल्याला स्थितप्रज्ञ, श्रीप्रभु चरणांवर अचंचल श्रद्धा आणि श्रीप्रभु वचनांवर अढळ विश्वास असणाऱ्या, श्रीदेवी व्यंकम्माच्या चरित्रातून अनुभवता येते. या सद्गुणांच्या जोरावरच कोमटी जातीतील एक सामान्य व्यंका बालिका अखेरीस श्रीदेवीपदास पोहोचली.

विश्वपालिनी जगदंबे की जय!!!
श्री मधुमती शामलांबा माते की जय!!!
श्री व्यंकम्मा देवीचा उदो उदो!!!

प्रेमळ विठ्ठल

आषाढी एकादशीनिमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरात घुमला श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर

आषाढी एकादशी निमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरामध्ये श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर घुमला. या पुण्यप्रद प्रसंगी श्री चिज्ज्वल प्रभु यांची उपस्थिती विठ्ठल भक्तांसाठी भारावून टाकणारी होती. सुरुवातीला श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघरचे मुख्य अर्चक श्री. मोरमुळे गुरुजी आणि अध्यक्ष श्री. जोशीकाका यांनी श्री चिज्ज्वलप्रभुंचे स्वागत करून, त्यांच्या शुभहस्ते विठ्ठल रखुमाईची पूजा करविली.

 

त्यानंतर श्री. मोरमुळे गुरुजींनी प्रेमळ विठ्ठल मंदिराचे मुख्य प्रेरणास्त्रोत असलेल्या माईसाहेब दांडेकर आणि श्री माणिकप्रभु संस्थानाचे तृतीय पीठाधिश, श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या परस्पर स्नेहाचा, गुरु शिष्य नात्याचा, माईंवर झालेल्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपेचा हृदय संबंध उलगडला. त्यानंतर मुंबईच्या श्री माणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाने श्री माणिकप्रभु आणि माणिकनगरची माहिती उपस्थित पालघरवासीयांना दिली. त्यानंतर श्री चिज्ज्वल प्रभु यांच्या सुरेल आवाजात, श्रीमाणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाच्या साथीने, झांज, संवादिनी, तबला, मृदंगाच्या कल्लोळात श्रीमाणिकप्रभुंची अनेक विठ्ठल भक्तीपर पदे आणि त्यानंतरच्या पीठाधिशांच्या अनेक वेदांतपर रचना सादर करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळेस पालघरच्या श्री. हेमंत लोखंडे यांना स्फूर्ती आवरेनाशी झाली आणि त्यांनीही भजनसंध्येमध्ये तबल्यावर साथ दिली. भजनसंध्येच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या अवतार काळात श्री माणिकप्रभु आणि श्री विठ्ठल यांच्या पंढरपूर येथील हृदयभेटीच्या प्रसंग श्री चिज्ज्वलप्रभु यांनी स्वतःच रचलेल्या ‘जय माणिक जय पुंडलिक वरदाता’ हे काव्य स्वतःच्याच आवाजात सादर केले. त्यावेळेस संपूर्ण सभागृहच जणू भक्तीच्या चंद्रभागेमध्येच डुंबत होते.

सुमारे दोन तास चाललेल्या ह्या भजनसंध्येमध्ये अनेकांना अद्वैतानंदाची अनुभूती झाली. भजनसंध्येच्या शेवटी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघर यांच्यावतीने श्री चिज्ज्वल प्रभु यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री चिज्ज्वल प्रभु यांनी उपस्थित सर्वांनाच माणिकनगरला येऊन, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन, कृतार्थ होण्यासाठी प्रेमळ निमंत्रण श्री माणिकप्रभु संस्थानाच्या वतीने दिले. जय गुरु माणिक!

योगी करबसप्पांचा विवेक

माणिकनगर समीप हुडगी ग्राम
तेच करबसप्पांचे विश्राम धाम
वृत्तीने अवधूत, दिगंबर कायम
परम योगी वर्ते स्थितप्रज्ञ ।।१।।

श्री मार्तंड माणिकप्रभु प्रयाणांतरी
निघाले हैद्राबादेहून श्रीप्रभु नगरी
हुडगी ग्राम परतीच्या वाटेवरी
तयारी स्वागताची करी योगी ।।२।।

जरी सदैव दिगंबर वर्तत
आज चिंध्या जमा करत
लज्जा रक्षणार्थ लंगोटी शिवत
करीत परीधान ते दिवशी ।।३।।

लंगोटी घालून श्रीजींचे स्वागत
करबसप्पा अत्यंत आनंदें वर्तत
श्रीजीही प्रेमे करबसप्पा समवेत
स्वीकारून आदर सत्कार हर्षभरे ।।४।।

आचारी आणिले प्रभु नगरीहून
पाहुणचार व्यवस्था चोख ठेवून
श्रीमार्तंड माणिक प्रभुसि तोषवून
वाहून घेतले प्रभु सेवेसि ।।५।।

दुसऱ्या दिवशी श्रीजींनी प्रस्थान
ठेविले हुडगीचा पाहुणचार घेऊन
जाता श्रीजी ग्रामसीमा ओलांडून
सोडून फेकत लंगोटी करबसप्पा ।।६।।

पुन्हा आपले दिगंबर वर्तत
समस्त लोक विस्मय करीत
धाडस करून तयासी पुसत
नेसत का नाही वस्त्रप्रावरण ।।७।।

खळाळून हसत करबसप्पा यावर
कुत्रीमांजरे, गाढव आणि डुक्कर
कशासाठी लाजावे यांच्या समोर
घोर जीवासी व्यर्थ लावूनी ।।८।।

ज्यासी झाले आहे आत्मज्ञान
तोचि एक मनुष्यप्राणि जाण
आला आपुल्या ग्रामी सगुण
म्हणून कौपिन केले धारण ।।९।।

तुम्हास नाही स्वस्वरुपाचे ज्ञान
माझ्या लेखी तुम्ही पशूसमान
नुरले काहीच लज्जेचे कारण
आवरण यास्तव फेकिले वस्त्राचे ।।१०।।

ज्ञानाविण नर पशूसमान होत
करबसप्पा सहज दाखवूनि देत
पुरवावा माझिया मनीचाही हेत
विनवित सप्रेमे दास प्रभुचरणी ।।११।।

प्रभु सर्व काही जाणतो

काल आमच्या एका गुरुबंधूसोबत सुखसंवाद चालू असताना आमच्या गुरुबंधूनी एक शंका उपस्थित केली की, आपण जी काही सेवा करतो, ती महाराजांना अवगत होत असेल काय? ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल काय?

याच अनुषंगाने श्री माणिकप्रभु चरित्रातील टर्रा हुसैनखांची कथा आठवली. श्रीप्रभु दरबारी देशभरातील बहुतेक गुणी लोक येत असत. त्यातल्या त्यात नामांकित गवई लोकांचा भरणा फारच असे. श्रीप्रभु गायनप्रेमी असून, त्या शास्त्राचे मार्मिक दर्दी आहेत, अशी प्रभुंची सर्वत्र ख्याती झाली होती. राजेरजवाड्यांकडून बिदागी मिळाली, तरी गुणाची पारख स्वतः राजेलोकांना तितक्यापुरतीच असल्यामुळे, खरे गुण प्रदर्शन त्यांच्याजवळ होत नसते. गुणी लोकांना गुणज्ञाची आवड असल्यामुळे लांब लांबहून गवई माणिकनगरात येत असत. अशाच प्रख्यात गवयांपैकी हुसैनखां नावाचा एक गवई प्रभुंचा लौकिक ऐकून माणिकनगरी आला. तो बहुतेक संस्थानात फिरून मान्यता मिळवून आला होता. त्याला आपल्या विद्येची आणि कर्तबगारीची अत्यंत घमेंड होती. राजदरबारात बहुमान होऊनही बिदागी कितीही मिळाली, तरी त्याचे समाधान होण्यासारखे नव्हते. आपले कसब ओळखणारा कोणी सापडत नाही, याचे त्याला दुःख वाटत होते. एकदा राजदरबारात त्याचे गाणे चालले असता, स्वतः राजाने त्याला शाबासकी दिली. पण त्याचा त्याला राग आला. “महाराज, काय समजून मला आपण वाहवा दिली?” असा रोकडा सवाल करून त्याने लगेच आपले गाणे संपविले. गाढवापुढे गाण्याकरताच आपण गाणे शिकलो, याचे त्याला वाईट वाटून, त्याने यानंतर कोणापुढे गावयाचे नाही असा निश्चय केला. उत्तम गवई पण, अशा फकीरी बाण्याने अधिकच उन्मत्त होऊन, विद्येचा चहाता कोणी मिळतो काय, या शोधात फिरत असतात प्रभुंचा लौकिक समजल्यावर तो माणिकनगरांत येऊन राहिला. येथील दरबारात त्याला अनेक गवई भेटले. सर्वांची हजेरी प्रभुपढे होऊन, त्यांना बिदागीही मिळाली. पण रोज भत्ता खाऊन, हा कित्येक दिवस पडून राहिला तरी, त्याची हजेरी लागण्याचा योग आला नाही.

माणिकनगरी राहिल्यावर प्रभुंना गाणे समजते असे त्याला दिसून आले, पण खात्री झाली नाही. स्वतः प्रभुंपुढे गायन झाल्याशिवाय आपली विद्या प्रभुंना कशी कळावी आणि प्रभुंना तरी कितपत यात गम्य आहे, हे आपल्यास कसे समजावे? बरेच दिवस अशा विचारात गेल्यावर प्रभुंपुढे आपले गायन झाले पाहिजे, असे त्याला वाटून, तसा योग घडवून आणण्याच्या खटपटीस तो लागला. प्रभुंकडे आज्ञा मिळवण्यास त्याला फारच प्रयास पडले. शेवटी एकदाचा योग आला. त्याचे गायन सुरू झाले. त्याचे गायन चालले असता प्रभुंनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. प्रभु आपले गाणे ऐकत नाही हे पाहून, त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे अशा हेतूने, त्याने त्या दिवशी पराकाष्ठा केली. चोहीकडे गवई लोक भरले होते. सर्वांनी “वाहवा” दिली, पण प्रभुंनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. ते दुसऱ्याशी बोलण्याच्या नादात होते. आपले कसब दाखवून प्रभुंचे मन आकर्षून घ्यावे, याची त्याला उत्कंठा लागली. अशा प्रकारच्या मानसिक झटापटीत सापडल्यामुळे, तो एके ठिकाणी अगदीच घसरला. त्याच्या मनाला ती चूक समजली. इतक्यात प्रभूंनीही “वाहवा खांसाहेब!” असे म्हटले. अंतरीची खूण पटली! इतर गवई लोकांच्या लक्षात हे मर्म आले नाही. पण खरा दर्दी हा प्रभु आहे, अशी त्याची खात्री होऊन त्या दिवशी त्याने पराकाष्ठेची बहार केली. प्रभुही अत्यंत खूष झाले. गवयाच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. हुसैनखां गायन संपवून प्रभुंपुढे दंडवत घालून म्हणाला, “महाराज, आज माझ्या विद्येचे व जन्माचे सार्थक झाले! माझ्या विद्येच्या मस्तीमुळे, मी तर्र झालो होतो. याकरिता मला टर्रा हुसैनखां हे नाव मिळाले आहे. येथे माझी मस्ती पार जिरून गेली. पण इत:पर आपल्या चरणाशिवाय, या जगात इतर कोठेही गावयाचे नाही असा माझा दृढ निश्चय झाला आहे.”

या कथेतील हुसैनखांची प्रभुंचे लक्ष आपल्या गायनसेवेकडे वेधून घेण्याची झटापट व त्यात त्याची एका ठिकाणी झालेली घसरण, अत्यंत बोधप्रद आणि मननीय आहे. प्रभुंचे आपल्याकडे लक्ष नाही, असे जरी हुसैनखांला वाटत होते तरी, त्याची मानसिक द्वंद्वातून उद्भवलेली गायनातली छोटीशी घसरणही सर्वज्ञ प्रभुंनी नेमकेपणाने पकडली. आपणही अनेकदा करत असलेल्या अनेक सेवा, मग त्या तनमनधनाच्या असोत, शब्दरूप असोत, गंधरूप असोत, स्वररुप असोत किंवा आणखीन कोणत्याही असोत, निरपेक्ष भावनेनी केलेली आपली सेवा श्रीप्रभु जाणून असतो. आपल्याला त्याचे प्रदर्शन करणे गरजेचे नसते किंवा त्यांच्यापर्यंत माझी सेवा पोचली काय? त्यांना मी केलेली सेवा कळली असेल काय? अशा प्रकारचा किंतु बाळगणे ही गरजेचे नसते. अशा मानसिक झटापटीमध्ये आपण सेवेमधला निखळ आनंद गमावून बसतो आणि आपले सर्व लक्ष त्यांच्याकडून अपेक्षित कौतुकावर, शाबासकीवर लागून राहते.

कोणतीही सेवा ही समर्पण भावनेनेच करावयाची असते आणि निष्काम भावनेने केलेली सेवा एकदा आपण प्रभुंच्या चरणी अर्पण केली की ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतेच. सर्वज्ञ श्रीप्रभु सर्व काही जाणून असतो, भेद मात्र आपल्या बुद्धीत असतो! भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमाणिकप्रभुंचा जयजयकार असो…

पीक मोप आले

नांगरले चांगले शेत
केली मेहनती मशागत
होऊनि अवकाळी बरसात
अवघे पीक वाया गेले ।।१।।

पुन्हा केली मेहनत
झाकोनि अवघे शेत
येता रोगाचे सावट
अवघे पीक वाया गेले ।।२।।

नशीबा दोष न देता
पुन्हा शेत फुलविता
जनावरें खाऊ जाता
अवघे पीक वाया गेले ।।३।।

नाही नाराजीचा सूर
सातत्यात नाही कसूर
सद्गुरू कृपा पुरेपूर
पीक मोप आले ।।४।।