परमपूज्य सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराजांनी श्री बाळकृष्णाच्या लीलांवर अनेक सुंदर सुंदर भावप्रधान काव्ये केलेली आहेत. ती वाचताना खूप आनंद मिळतो. गोपगोपींचं श्रीकृष्णावरचं प्रेम वाचताना आपण तन्मय होऊन जातो. काव्यातून वर्णिलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि त्या भावभावनांमध्ये आपण तल्लीन होऊन जातो.
पण या काव्यांची एक खासियत आहे. आपण या काव्यांचा जसा अभ्यासपूर्वक विचार करू तसतसे ते शब्द आपल्याला आत्मचिंतन करावयास भाग पाडतात. वेदांतिक वचने आपल्याला मार्गदर्शक होतात. स्वरूप–साध्याच्या मार्गावर ते ईश्वरी चैतन्यच साधकाला कसं आधारभूत होतं, अशा प्रकारचा सुंदर पण गूढ गर्भितार्थ या काव्यांमध्ये दडला आहे.
पुढील काव्य अशाच प्रकारचे सुंदर व गूढगर्भ आहे. परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु यांच्या मंगल पावन चरणी शरण राहून त्याचे विवरण करण्याचा प्रयत्न मी करते आहे.
काव्य:
पहा यशोदे तुझा लेक खोडी
जाऊनी दही दूध मडकी फोडी ।।धृ।।
येतसे नित्य गृहाप्रति माझ्या
लहानसे वासरू वनाप्रति सोडी ।।१।।
जात असतां यमुनेच्या पाण्या
मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।२।।
माणिक म्हणे वर्णितां याचे गुण
शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।
ही एक गोपी यशोदेकडे कृष्णाचे गाऱ्हाणे घेऊन आलेली आहे आणि सांगतेय की तुझा लेक अत्यंत खोड्याळ आहे. ‘तुझा लेखक खोडी‘ यातला खोडी म्हणजे खट्याळ किंवा खोड्याळ हा शब्द बहुदा लहान मुलांच्या ज्या वात्रट लीला असतात त्यासाठीच वापरतात. लहान मुलांच्या खोड्यांनी मोठ्यांना त्रास होतो पण संताप येत नाही किंवा याला काही मोठी शिक्षा करावी असेही वाटत नाही. किंबहुना ‘किती लबाड हो हा, कसं त्याचं डोकं चालतं‘ म्हणून आत लपवून ठेवलेलं कौतुकही बाहेर येतं. असाच काहीसा भाव, यशोदेकडे, कृष्णाचं गाऱ्हाण सांगताना या गोपीचा आहे.
ही गोपी यशोदे कडे तक्रार करतेय की, ‘येतसे नित्य गृहाप्रति माझ्या, लहानसे वासरू वनाप्रति सोडी।।‘. ती म्हणते हा कान्हा माझ्याकडे नित्याचा येतच असतो, पण गप्प बसत नाही. ते लहानसे पाडस वनाच्या दिशेने सोडतो. आता त्या बिचार्या वासराला काय कळतंय? कुठेतरी उंडारलं नी वाट चुकलं, रानात श्वापदं समोर आली, तर काय करील ते?’
परमपूज्य सद्गुरु श्री प्रभुजींनी वेदांतिक तत्वज्ञान मोठ्या खुबीने या गोड तक्रारीमध्ये गुंफलेले आहे. आत्मारामाची स्फुरणे नित्याची येतच असतात. मनाच्या दरवाजातून बाहेर पडणारी वृत्ती तशी कोवळीच असते. पण बाहेरच्या जगात, विषयांच्या निबिड अरण्यात शिरली की तिच्यावर काय आणि कोणते परिणाम होतील सांगता येत नाही. मग ती अध:पतनाला कारणही होऊ शकते. म्हणून तर त्या वासराला एकटं न सोडता त्याच्याबरोबर बुद्धि–विवेकाचा गुराखी हवाच.
आतां गोपीची अवस्था अशी झाली की आतां तक्रार तर केलीच आहे ना, मग सर्वच खोड्या सांगून टाकाव्या! यशोदेला ती सांगते, ‘जात असतां यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।‘ यमुनेच्या पाण्याला जाणे, म्हणजे तिथे स्नान करून, वस्त्र स्वच्छ धुवून, पुन्हा घागरीत पाणी भरून घरी आणणे आणि हा रोजच्या रोज नित्याचा उपक्रम होता.
परमार्थिकदृष्ट्या या ओळींच्या लक्ष्यार्थाचे चिंतन केल्यास असं ध्यानात येतं की, यमुनेचा प्रवाह हा साधनेच्या प्रवाहासारखा आहे. प्रामाणिक साधक नित्याने या साधन–यमुनेच्या पाण्यात स्नान संध्या करीत असतो. ते त्याच्या अंत:करण शुद्धीसाठीच! जीवाचे आत्मचैतन्य हे पंचकोशांच्या आवरणांमध्ये अवगुंठित असते. हे पंचकोशच त्याची वस्त्रे असतात. साधक जेव्हा ह्या आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्नात असतो तेव्हा त्याला या, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशांना ओलांडूनच आनंदमयात प्रवेश करावा लागतो. तेथेच जीवाशिवाचे मिलन होते, अद्वैत होते. या सर्व प्रयत्नांना आत्मचैतन्याचेच अधिष्ठान असते. त्याच्याशिवाय या क्रिया होऊच शकत नाहीत. म्हणून सद्गुरु प्रभुजींनी ‘मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी‘ ही काव्यपंक्ती त्यांच्या अलौकिक विचक्षण प्रज्ञेने लिहिलेली आहे. आता पंचकोशांची ही वस्त्रे फेडली तर, ‘तुका झालासे पांडुरंग‘ ही अवस्था येणारच. ‘अवघा देवचि झाला पाही । भरोनिया अंतर्बाही ।।‘
परमपूज्य सद्गुरु प्रभुजींनी या काव्याच्या पहिल्या दोन कडव्यांत साधकाच्या बाह्य साधनेत ईश्वर कसा परिणाम करतो आणि तिसऱ्या कडव्यात त्याच्या अंतरंग साधनेत कसा परिणाम करतो हे गोपीच्या तक्रारीच्या रूपाने निर्देशित केले आहे.
म्हणूनच सद्गुरु श्री प्रभुजी म्हणतात, ‘माणिक म्हणे वर्णितां याचे गुण, शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।‘ खरं तर जो मुळात निर्गुणच आहे त्याचे गुण कसे काय वर्णन करणार? पण सत्य हेच आहे की कर्ता करविता तर तोच आहे. म्हणून संत तुकोबाही म्हणतात ‘तुझं वर्णी ऐसा तुजविण नाही । दुजा कोणी तिन्ही भुवनी।। सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा। चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ।।‘ त्याचे गुण वर्णिताना शेषाच्या सहस्त्र जिभाही चिरल्या गेल्या असे म्हणातात. तेव्हा श्री प्रभुजी म्हणतात, ‘त्याच्यापुढे माझी मती थोडी।।‘
इतका खोल गर्भितार्थ असलेले तत्त्वज्ञान प्रभुजींनी गोपीच्या भावभावनांच्या इतक्या सुंदर शब्दात उद्धृत केलेले आहे. त्यांच्या अचाट, अजन प्रज्ञेची झेप माझ्यासारख्या अज्ञानी साधकाने कशी वर्णावी? पण ज्ञानोबा माऊलींचे शब्द आठवले, ‘वस्तुत: जरी मी मूर्खू । हातून घडे अविवेकु । तरी पुढे मार्गदर्शकु । संत कृपेचा दिपु आहे ।।‘ आणि या काव्याचे विवरण माझ्या तोकड्या शक्ति–बुद्धीप्रमाणे केले आहे. सद्गुरूंनी यामध्ये झालेल्या चुकांची क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही त्यांच्या पावन मंगल चरणी प्रार्थना करते.
सद्गुरु चरणी अनन्यभावे प्रणाम!
[social_warfare]
अप्रतिम
Jai Guru Manik🙏🏻🙏🏻
Jai Guru Manik🙏🏻🙏🏻
कृष्ण आणि गोपी यांच्या प्रेमाचे अनेक पैलू आहेत त्याचे अंतरंगात शिरण्याचा अनेकांकडून अगदी संतांकडून देखील. शेवटी प्रेम हे प्रेमच असत आणि ते अथांग च आहे हे खरं. आपण ही च भावना छान शब्दांकित केली जय गुरु माणिक.
Jay Guru Manik
Ho Khupch chhan vivechn kele aahe.
Vacht astana prtek shbdacha arth samjto.
Krushn aani gopi yanche nate kiti vegle hote. Prem hich Bhgvantakde janyachi payri aahe.
Sarl shbdat varnan kelymule Thank you