आज श्री मार्तंड माणिकप्रभु जयंती. महाराष्ट्रात जन्माला येऊन श्री समर्थ रामदासांना शरण न जाणे जसे दुर्भाग्याचे लक्षण तसे कर्नाटकात पाऊल ठेवूनही माणिकनगर विषयी अनभिज्ञ राहण्यासारखे दुसरे दुःख नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जशी वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी डवरलेली असते तशीच माणिकनगरी श्रीजींच्या नित्य चैतन्याने भारलेली असते.

श्री शंकर महाराज आणि श्री मार्तंड माणिक प्रभू या द्वय विभूतींची संमिलीत एक कथा पूर्वीच वाचनात आली आणि तेव्हा पासून श्री मार्तंड माणिकप्रभूंविषयी, त्यांच्या अधिकाराविषयी अत्यंत आदर आणि जिव्हाळा वाटू लागला. त्यांच्या अनेक लीला ऐकून, वाचून मन थक्कच होते असे नाही तर नतमस्तक होते.

अशी वदंता आहे की श्रीक्षेत्र काशीत चुकून कोणालाही धक्का लागावा आणि तो ph.d असावा, तात्पर्य – तेथे अनेक विद्वान आहेत.आमच्या माणिक नगरीत तर या उलट आहे. Ph.d. प्राप्त करायला माणसाला काही वर्षे घालवावी लागतात. माणिकनगरात तर, ” गाव का बच्चा बच्चा वेदांती” असतो. श्री माणिक प्रभूंपासून आजच्या श्रीजीं पर्यंत सर्वांनी आपल्या प्रवचनातून जनमानसावर असे संस्कार केले आहेत. बाळ जन्मतः च वेदांत श्रवण करतं. आनंदाचं बाळकडू घेऊनच मोठं होतं.

समाधान ही येथील इस्टेट आहे. ती तेथून कितीही न्या , मूळ साठा रिकामाच होत नाही. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…. सारखे भरून शिल्लक राहिले आहे आणि याची साक्ष खुद्द श्रीजीं, श्री मार्तंड माणिक प्रभूच देतात.ज्या समाधीवर गुलाबाची चार फुले चार अक्षर रुपी आशीर्वादाची असतात* त्या भूमीच्या प्रत्येक रजकणात आशीर्वाद नसेलच कसा?

अंतत: एवढेच म्हणेन, श्री प्रभूंपासून आजच्या प्रेमळ, विद्वान, updated श्रीजीं पर्यंत सर्वांबद्द्ल आम्हा भक्तांच्या हृदयात अत्यंत प्रेम आहे. ते शब्दबद्ध करण्यासाठी माझी लेखणी असमर्थ असली तरी मती मात्र त्यांचे चरणी लीन आहे हे नक्की.

[social_warfare]