श्री माणिकप्रभु महाराजांचे भक्त असलेल्या आपण सर्वांनीच, आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी श्रीप्रभुंच्या कृपेचा अनुभव घेतला असेलच. परंतु, आज मी जे काही आपणासमोर उलगडणार आहे, ती श्रीप्रभुची पूर्ण कृपा, भक्तावरील निर्व्याज प्रेम आणि मरणभयहारक शाश्वत संरक्षण कवचाची कथा आहे. माझी लहान चुलत बहीण, सौ. सुनिता खत्री आणि तीचे पती श्री. राज खत्री यांच्या जीवन संघर्षाची ही कथा, आपणा सर्वांचा श्रीप्रभुचरणी असलेला विश्वास अधिकच दृढ करेल, ह्यात तीळमात्रही शंका नाही. गेल्या वर्षभरात उभयतांना जे काही सोसावे लागले ते आपल्या कल्पनेपलीकडले आहे. एखाद्या सामान्य माणूस अशा विपरीत परिस्थितीत कोलमडून गेला असता. परंतु, श्री माणिकप्रभु महाराजांवरील अतीतर विश्वासामुळेच, ह्या दुर्धर प्रसंगावर मात करुन, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली आहे.

सन २०२२च्या अखेरीस श्री. राज खत्री यांची तब्येत अचानक बिघडली. आधीच सडपातळ देहयष्टी असलेल्या श्री. राज यांचे २०२२च्या शेवटच्या दोन महिन्यांत वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांना दर १५ दिवसांनी, उलट्यांचा प्रचंड त्रास होत होता. सुरुवातीला डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय आला आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले. उलट्यांच्या तिसऱ्या प्रकोपानंतर, डॉक्टरांनी श्री. राज यांना पोटाची आणि आतड्याची एन्डोस्कोपी करून घेण्याचा सल्ला दिला.

अशा परिस्थितीत, सौ. सुनीता खत्री आणि तिच्या भावंडांची प्रभुभक्ती कामी आली. कोणत्याही गंभीर वैद्यकीय प्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी, आपल्या गुरूंना त्याबाबत कल्पना देण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्याप्रमाणे, सौ. सुनिताची मोठी बहीण, सौ. रेश्मा हिने श्री. ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांना फोन करून एकंदर परिस्थितीची माहिती दिली. श्रीजींनीही त्यांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एंडोस्कोपी करून घेण्यास सांगितले आणि त्यांना श्रीप्रभुंचा प्रसाद पाठवला. श्री. राज खत्री यांनीही एन्डोस्कोपीसाठी आणि त्यानंतरच्या प्रत्येक चाचणीसाठी जाताना, हा प्रभुप्रसाद श्रद्धायुक्त विश्वासाने आपल्या बरोबर बाळगला.

एंडोस्कोपीच्या अहवालाने संपूर्ण कुटुंबाचा आनंदच जणू हिरावून घेतला गेला. श्री. खत्री यांना पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी लगेचच याबाबत श्रीजींनी पुन्हा संपर्क करताच, “ऑपरेशन करा लो” असे सहज उद्गार श्रीजींच्या मुखातून लागलीच बाहेर पडले. त्यानंतर अनेक घटनांची जणू मालिकाच सुरू झाली. त्यांनी सर्वप्रथम प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरच्या सल्लामसलतीमध्ये केमोथेरपी द्यायची की सर्जरी करायची हा कळीचा मुद्दा होता. श्रीजींचे शस्त्रक्रियेबाबतचे शब्द मनात घोळत असताना, श्री. खत्री शस्त्रक्रियेची मनोमन आशा बाळगून होते आणि अखेरीस डॉ. अडवाणी यांनीही शस्त्रक्रियेचीच शिफारस केली.

ही बातमी रेश्माने श्रीजींना सांगितल्यावर, त्यांनी तिला सांगितले की, “सुनीताला सांग काही काळजी करू नकोस, मी तिच्यासोबत आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना करीन.” त्यांनी सौ. सुनिताला विश्वासाने श्रीप्रभुंच्या “भक्तकार्यकल्पद्रुम” ब्रीदावलीची एक माळ रोज जपायला सांगितली. त्यानंतर श्रीजींनी, “मी प्रसाद पाठवतो,” असे सांगितले. त्यावर रेश्माने श्रीजींना आपण प्रसाद आधीच पाठवल्याची आठवण करून दिली, तेव्हा श्रीजी म्हणाले, “तो प्रसाद प्राथमिक चाचणीसाठी होता, आताचा प्रसाद हा शस्त्रक्रियेसाठीचा आहे.”

श्री. राज खत्री हे सामान्यतः चिंताग्रस्त स्वभावाचे आहेत. जीवनामध्ये आजतागायत त्यांना कधी इस्पितळात दाखल करण्यात आले नव्हते आणि आता ते इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेला प्रथमच सामोरे जात होते. परंतु, श्रीप्रभुंच्या कृपेने, शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण, इतके विलक्षण होते की, त्यांनी लगेच श्री. खत्री यांना धीर दिला आणि काळजी करू नका, ते आता सुरक्षित हातात आहेत आणि आता ते जातीने त्यांना पाहणार आहेत, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी श्री. खत्रींचे समाधान केले. जवळ बाळगलेल्या, श्रीजींनी दिलेल्या प्रसादावरील विश्वासाने, श्री. राज यांना नवा आत्मविश्वास मिळाला होता आणि त्या पाठोपाठच्या डॉक्टरांच्या आश्वासक शब्दांनी त्यांना हायसे वाटले होते.

शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण यांनी कुटुंबाला माहिती दिली की, ही अडीच ते तीन तासांची शस्त्रक्रिया असेल, ज्यात श्री. खत्री यांच्या पोटातील गाठ काढली जाईल. पण जेव्हा शस्त्रक्रिया सुरू झाली, तेव्हा श्री. खत्री यांच्या पोटातील आतली बाजू पूर्णपणे खराब झाली असल्याचे पाहून डॉ. कीर्ती भूषण यांना खरोखरच धक्का बसला होता. शस्त्रक्रियेनंतर स्वत: डॉ. कीर्ती भूषण यांनी कबूल केले की, एक क्षण त्यांना काय करावे हेच कळत नव्हते. शस्त्रक्रियेआधी फक्त एक गाठ काढावी लागेल, असे त्यांनी गृहीत धरले होते. पण प्रत्यक्षात त्यांना आता पोटाचा एक मोठा भाग काढावा लागत होता. डॉ. कीर्ती भूषण म्हणाले की, त्यानंतर जणू देवानेच सर्व जबाबदारी घेतली आणि माझ्यामार्फत पुढचे ऑपरेशन करवून घेतले. जी शस्त्रक्रिया तीन तासात पार पाडायची अपेक्षा होती, ती पूर्ण व्हायला आता पाच तास लागले होते. अखेरीस, शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. घरच्यांनी जेव्हा श्रीजींना याबाबत माहिती दिली तेव्हा ते म्हणाले, “बहुत बडा संकट टल गया” (“खूप मोठे संकट टळले आहे”). सौ. सुनीता आणि तिचे पती श्री. राज यांचा श्रीप्रभुंवरील अतूट विश्वास आणि प्रभुंचेही त्यांच्यावरील प्रेम आणि आपल्या प्रिय भक्तांभोवतीच्या चैतन्यशक्तीमुळेच श्री. राज यांना मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः ओढून आणले होते.

त्यानंतर श्री. खत्री यांना केमोथेरपीही देण्यात आली. केमोथेरपी घेतलेल्यांना त्याचे दुष्परिणाम माहित असतीलच. परंतु, पुन्हा एकदा, श्रीप्रभुकृपेने त्यांना केमोथेरपीचे कोणतेही सामान्य दुष्परिणाम जाणवले नाहीत. सुरुवातीला, त्यांच्या खाण्यावर परिणाम झाला होता, परंतु आज, शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ एक वर्षानंतर, श्री. राज खत्री आपले सामान्य जीवन जगत आहेत. तीन महिन्यांपूर्वी, त्यांना कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांनी श्री. राज आता कर्करोगमुक्त झाल्याचे सांगितले. हा एक अद्भुत चमत्कारच होता आणि श्री प्रभुच्या असीम कृपेने नुकत्याच पार पडलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यातही ते उत्साहाने सहभागी होऊ शकले.

एका कुटुंबाचा आपल्या गुरूवरचा पराकोटीचा विश्वास आणि श्रीगुरूंचा प्रसाद मिळाल्यावर, त्यांच्या स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच, श्री. राज खत्री यांच्या नशीबात लिहिलेली दुष्टाक्षरे अखेरीस शुभाक्षरे झाली आणि त्यांना आपला देह श्रीप्रभुंच्या सेवेत अधिकाधिक झिजविण्यासाठी नवीन जीवनदान मिळाले.

श्रीप्रभुंची लीला अगाध आहे. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौमाची आपल्या भक्तांवर मरणभयहर अशी कृपादृष्टी आहे. सदैव सर्वांचे मंगल चिंतीणाऱ्या, आपल्या कृपेचे संरक्षक कवच सदैव आपल्या भक्तांभोवती ठेवणाऱ्या आणि प्रत्यक्ष काळालाही परतवून लावणाऱ्या सकलमताचार्य श्री माणिकप्रभुंचा जयजयकार असो…

जय जय हो, सकलमता विजय हो !

[social_warfare]