भूतदया

संतांच्या भूतदया या वर खूप उदाहरणे देता येतील. जे लोक जीवनात त्रस्त आहेत त्यांचे दुःख, संत महात्मे आपल्या संकल्पाने दूर करतात. केवळ मनोमन संतांची आठवण, केल्यामुळे, त्यांना मनोमन प्रार्थना केल्यामुळे दुःख दूर होऊन मनेप्सित कामना पूर्ण होतात. प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य संतात असते.

संतशिरोमणी भगवान दत्तात्रेयांचे चतुर्थावतार सकलमतस्थापक श्री माणिक प्रभूमहाराज यांच्या जीवन चरित्रात अशी अनेक उदाहरणे सापडतील की जेणेकरून अनेकांचे प्रारब्ध बदलून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.

प्रभू बालपणी बसवकल्याण क्षेत्री असतांना त्यांचा मित्र गोविंदा गवळी याला त्याच्या दारात जाऊन खेळण्यासाठी बोलावले. प्रभूंच्या मुखातून ‘गोविंदा, अरे गोविंदा’ म्हणताच घरातून मोठ्याने ओक्साबोक्सी रडण्याचा आवाज ऐकू आला.  गोविंदा मरण पावला होता आणि ती गरीब माणसे त्याच्या भोवती बसून शोक करत होती.

माणिक प्रभूंनी विचारले तेव्हा गोविंदाच्या आईने गोविंदा मृत झाल्याचे सांगितले. त्या माऊलीची माणिक प्रभूवर खूप श्रद्धा होती किंबहुना पूर्ण समर्पण होते. प्रभूंनी तिच्या अंतरगातील भाव, श्रद्धा, समर्पण पाहून आणि एका मातेच्या अंतःकरणात होणा-या पुत्रशोकाचे दुःख जाणून लीला केली आणि म्हणाले ‘अहो, असं काय बोलत आहात. गोविंदा मेला नाही, तो झोपला आहे, तुम्ही त्याला हाक मारा, तो उठेल.’ इतर  सगळ्या लोकांना विश्वास वाटला नाही, पण गोविंदाच्या आईचा माणिक प्रभूंच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. तिने गोविंदास हाक मारली आणि खरोखरच झोपेतून जागे झाल्याप्रमाणे गोविंदा उठला. सगळ्यांना खूप आनंद झाला.

तात्पर्य, संतावर विश्वास, श्रद्धा असली की त्यांच्या भूतदया या जन्मजात गुणामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. संत दयावंत असतात.