नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’

दुसऱ्या दिवशी रात्री तो गोंधळी महाराजांपुढे हजर करण्यात आला. महाराजांनी गोंधळ्यांस तेच पद म्हणण्याची आज्ञा केली ज्याची धुन शहनाईवाल्यांनी वाजवली होती, गोंधळी आनंदाने गाऊ लागला

आम्ही चुकलो जरि तरि काही । तू चुकू नकोस अंबाबाई ॥

पुन्हा पुन्हा हेच पद महाराजांनी गोंधळ्याकडून म्हणवून घेतलं व स्वतः कलमदान घेऊन काहीतरी लिहू लागले. शेवटी महाराज तृप्त झाले व गोंधळ्याला व शहनाईवाल्यास इनाम देऊन त्यांची रवानगी केली.

गोंधळी जाताच महाराजांनी संस्थानच्या भजनी मंडळातील प्रमुखांना बोलावलं व त्यांना नवीन स्वरचित पद शिकवलं. त्या पदाचे बोल होते

आम्ही चुकलो निजहित काम ।
तू चुकू नकोस आत्मारामा ।।

महाराजांची ज्ञानलालसा व स्वरलालसा इतकी तीव्र होती की मामुली समजले जाणारे गोंधळी वाजंत्रीवाले इत्यादी वर्गातील लोकांतही जे काही गुण प्रशंसनीय होते, त्यांचे त्यांनी सदैव कौतुक केले. व त्या लोकांच्या चालींवर सुद्धा गहन गंभीर वेदांतपर पदांची रचना केली.

[social_warfare]