१५ ऑगस्ट २०२१ – ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस. सकाळी ध्वजारोहण केले व माणिकनगरला जाण्यासाठी निघालो – मी, राधा, सांन्वी. आम्ही सर्व गुरु चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळणार ह्या विचाराने प्रसन्न होतो. वाटेत आम्ही प्राची, इशान व शान्वी यांना ठाणे येथून आमच्या बरोबर प्रवासात घेतले. सर्व आनंदी होतो. भजन, गाणी व गप्पा करता-करता माणिकनगरला कधी पोहोचलो  कळलेच नाही.

१६ ऑगस्ट २०२१.. श्रावण सोमवार.. दुर्गाष्टमी.. मार्तंड माणिक प्रभू मंदिरात श्री मार्तंड प्रभु गादीअष्टमी सोहळा व सोमवारच्या भजनाचा लाभ मिळाला. व त्यानंतर महाप्रसाद घेऊन तृप्त झालो. अविस्मरणीय अनुभव होता.. अलौकीक क्षण, आठवणीत गुंफून ठेवावे असे क्षण….

सायंकाळी चैतन्यलिंगाच्या पवित्र स्फटिक शिवलिंगावर रूद्री, श्री यंत्रावर श्रीसुक्त व अखंड जलाभिषेक श्री ज्ञानराज माणिक प्रभूंच्या हस्ते नियमबद्ध पार पडले. ह्या नंतर महाराजांनी दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करणाऱ्यांना प्रसाद दिला.

१७ ऑगस्ट २०२१.. सकाळी ७:३० ला प्रभू मंदिरात दर्शनासाठी गेलो व लवकरच पुन्हा माणिकनगरी येण्याचा योग येऊ द्या, अशी प्रभूंच्या चरणीं प्रार्थना केली. मंदिराच्या आवारात गाडी उभी होती, मुंबईचा प्रवास तीर्थ घेऊन सुरू केला. वाटेत भजन, गाणी, गप्पा चालू होत्या.

आम्ही शिवाजी हॉस्पिटल, कळवा येथ पर्यंत पोहचलो होतो. वेळ रात्री ८:२० असावी. रहदारीची वेळ होती. गप्पांचा विषय होता “दत्त महाराज यांनी दिलेल्या प्रचीत्या…. लोकांना आलेले अनुभव”!! ट्रॅफिक असल्याने गाडीची वाटचाल हळू होती. वाट काढीत कळवा ब्रिजवर पोहोचलो.

अनुभव ऐकून अंगावर शहारे, डोळ्यात पाणी तरळत होते. आपल्या सारख्या सामान्य लोकांना सुद्धा दैनंदिन जीवनात प्रभु कृपेचे छोटे मोठे अनुभव येत असतात, असा संवाद चालू होता..

आणि.. ब्रिजच्या चढणी वर अचानक गाडी बंद पडली, वेळ रा ८:३०..

५०० कि.मी. हुन अधिक अंतर गाडी चालली होती. प्राथमिक अंदाजानुसार बॅटरी व सेल्फ सुरूवात होत नसल्याचे कारण पहायचे होते. मी गाडीतून खाली उतरलो. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास खुणेनेच सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. त्यावर दोन गृहस्थ होते. त्यांनी विचारपूस केली, व त्यांच्यापैकी एक गाडी मागे गेला. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगू लागला. तर दुस-या व्यक्तीने मला गाडीचे बॉनेट उघडण्यास सांगितले व गाडी तपासली. बॅटरी कनेक्टर सैल झाले होते ते तात्पुरते ठीक करून दिले. व आम्हाला सांगितले की तात्पुरते काम केले आहे, मात्र खूप लांबचा प्रवास करू नका, मेकॅनिकला दाखवा. वेळ रा ८:३५/४०.

त्यांच्या कुशलते मुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटात गाडी सुरु झाली होती. त्यांची विचारपूस करून त्यांचे आभार मानणार इतक्यात वाहतूक पोलिस आले व मागे वाहतूक खोळंबली असल्यामुळे आम्हाला तेथून लवकर निघण्यास घाई करू लागले.  तसे ते दोघे सज्जन त्यांच्या दूचाकी वर बसून पटकन निघुन गेले.

गाडीत बसल्यावर घडल्या प्रकाराविषयी आम्ही चर्चा करीत होतो, आणि अगदी योग्य वेळी गाडी विषयी जाणकार व्यक्ती आपल्या मदतीस आली ही निव्वळ प्रभु कृपा असे मानून प्रभु चे आभार मानीत होतो.

मात्र आमची गाडी सुरु व्हायच्या आधीच ते दोघे गृहस्थ आपल्या दुचाकी वर बसून निघून गेले व त्यांची चौकशी करणे, त्यांना धन्यवाद देणे राहुन गेले, म्हणून थोडी खंत ही व्यक्त करीत होतो. इतक्यात अचानक ती दुचाकी पुन्हा कधी आमच्या गाडी शेजारी आली, ते आम्हाला कळलेच नाही. आमचे लक्ष गेले तेव्हा ते मागे बसलेले गृहस्थ (ज्यांनी बॅटरी कनेक्टर दुरुस्त केले होते) आम्हाला खुणवून गाडी थांबवायला सांगत होते. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. छत्री अडकल्यामुळे गाडीची डिक्की उघडी राहिली होती, ती बंद करण्यासाठी त्यांनी गाडी पुन्हा थांबवली होती. ह्या वेळी मात्र आम्ही त्यांना थांबवून त्यांचे मनापासून आभार मानले. व त्यांचे निदान नाव तरी कळावे म्हणून मी त्यांच्याशी संवाद करीत होतो. नाव सांगण्यास ते थोडी टाळाटाळ करू लागले, व स्मित हास्य करून नाव जाणून घेण्याची आवश्यकता नाही असे काहीतरी म्हणाले. मी मात्र त्यांना नाव सांगण्यास आग्रह करीत राहिलो. तेव्हा त्यांनी  काही क्षण विचार केला, आणि मिश्किलपणे मंद हास्य करीत म्हणाले “प्रसाद”!!! व मी अजून काही बोलायच्या आधी ते तेथून निघून गेले.

आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. आपल्या गप्पांचा विषय दत्त महाराज व लोकांना आलेले अनुभव… परतीचा प्रवास निर्विघ्न व सुखरूप होण्यासाठी महाराजांकडून प्रसाद घेऊनच माणिकनगरातून निघण्याची संप्रदायाची परापूर्वी पासून चालत आलेली प्रथा… त्याच प्रथेच्या महत्वाची, प्रभुकृपेची व श्रीजींच्या प्रसादाची प्रचीती आम्हाला आली हे निश्चित!!!

तिथून आम्ही थेट मेकॅनिक कडे गेलो. गाडीचे काम त्याने केले. व आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो.

[social_warfare]