प्रभु प्रसादाची महिमा

नियतीने घाला घातला पण प्रभूंच्या शक्ती पुढे तिला हरावं लागले. काळ आला होता पण प्रभुंनी वेळ येऊ दिला नाही. माझ्या जिवनात अनेक प्रसंग आले, अनेक संकटं आली पण त्या संकटातून मला प्रभुंनीच क्षणोक्षणी वाचवले. माझ्यावर माझे सद्गुरु म्हणजे – श्री सिद्धराज माणिक प्रभूंची खूप मोठी कृपा आहे, असं मला वाटतं.

शनिवार १९ जून दिवशी मी आपल्या परिवारासोबत  प्रभु दर्शनास माणिकनगरी गेलो होतो. दोन दिवस राहून म्हणजे सोमवारी २१ जून रोजी श्रीजींची (श्रीज्ञानराजप्रभूंची) आज्ञा व प्रसाद घेवून पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. माणिकनगराहुन १८ कि.मी  अंतरावर काळ वाट पहात होता. जणुकाही तो काळ आमच्या सर्वांचा ग्रास घेण्यासाठी ‘आ..’  करुन तोंड पसरूनच बसला होता.

मी गाडी चालवत होतो आणि माझ्या गाडीत माझी पत्नी, दोन नातवंडं, सून व समोरच्या सीटवर मुलगा होता. खटकचिंचोळी गावाच्या परिसरात सडके वर पुढे आयचर टेम्पो दिसला. दोन्ही गाड्या वेगात होत्या अपघात होऊ नये म्हणून मी गाडी डावीकडे घेतली आणि ब्रेक केला. तेवढ्यात steering अचानक वळली व ५ वेळेला पलटी खाऊन आमची कार रस्त्याच्या बाजूला १० फुट खोल खड्ड्यात जाऊन पडली. गाडीचे चाकं वरती व आम्ही खाली, भयंकर प्रसंग होता. काय झालं, हे आम्हाला कळत नव्हतं पण सर्वांच्या मुखात भक्तकार्याचा जप चालू होता. आमची गाडी सडकेवरून केव्हां सरकली आणि त्या खड्ड्यात केव्हां जाऊन कोसळली याचं आम्हाला काही ही भान नव्हतं. आम्ही खरेच जीवंत आहोत का हा विश्वासाही होत नव्हता. सर्वांनाच मोठा झटका बसला होता. हे सगळं होत अस्ताना प्रभूंच्या नावाचा जप आम्ही केव्हां सुरू केला हे ही आम्हाला कळलं नाही. श्रीगुरु माणिक। जय गुरु माणिक हे आपोआप तोंडातून निघत होतं. त्यामुळेच गाडी चे दरवाजे आपोआप उघडले, A.C चालु होता म्हणून door lock होते. पण प्रभूंचा चमत्कार पाहा – गाडीचे दरवाजे आपोआप उघडले. गाडी जिथे पडली होती तिथे एकही काटेरी झुडप नव्हते. सगळे क्षणात गाडीतून बाहेर निघालो.

माझा एक नातू माणिक (वय ५ वर्ष) पत्नीजवळ  होता ड्रायवर सीटच्या मागे, तर एक नातू विक्रम (वय ४ वर्ष ) समोरच्या सीटवर मुलाजवळ होता. प्रभूंच्या उद्दंड कृपेमुळे, कुणालाच काही झाले नाही. एवढ्या मोठ्या भीषण अपघातात जणू काही प्रभूंनी आम्हाला अलगद मांडीवर घेऊन आमचे रक्षण केले.

घटनास्थळी अचानक तीन माणसे आली आणि लगेच क्षणाचाही विलंब न होऊ देता सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांच्या मदतीने कार ला सरळ करून रस्त्यावर आणलं आणि पुन्हा माणिकनगरच्या दिशेने निघालो. तोपर्यंत माणिकनगरात  ही वार्ता कळाली होती. सगळे परत माणिकनगरला पोहचलो. श्रीजींच्या आज्ञेनुसार सगळ्यांनी स्नान केले आणि परत मंदिरात प्रभूंच्या दर्शनास आलो.

माझ्या परिवारावरचा हा एक मोठा गंडांतर प्रभूंच्या कृपेमुळेच त्या दिवशी टळला. प्रभु चरित्राच्या २३व्या अध्यायात म्हटलेलं आहे ‘‘प्रारब्ध कितीही बलवत्तर। असले जरी खबरदार। तुझ्यापुढे केंवि तगणार। सामर्थ्य अपार तुज असता।।’’ या ओवीची खरी प्रचीती आम्हा सर्वांना त्या दिवशी प्रभूंनी करवून दिली. असं म्हणतात कि नशीबाची रेखा दगडावर कोरलेल्या रेखांसारखी असते, त्याला कोणीही बदलू शकत नाही. पण सद्गुरूंची कृपा झाल्यावर काहीही अशक्य नाही असा माझा अनुभव आहे. प्रभूंची कृपा शब्दांत वर्णता येत नाही. आज तर त्यांनी माझे तोंडच बंद केले. आमच्या मार्तंड माणिकप्रभू महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘‘कृपा झालिया काळही त्या न ग्रासे।’’ हा सगळा प्रसंग पाहिल्यावर वाटतं कि, महाराजांचे हे शब्द किती खरे आहेत !

माणिकनगरला श्रीजींपुढे आल्याबरोबर ‘काय झालं रे अनिल?’ म्हणून श्रीजींनी पूर्ण वृत्तांत माझ्याकडून ऐकलं. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा या साठी आम्ही जेव्हां श्रीजींना पुन्हा प्रसाद विचारलं तेव्हां ते म्हणाले ‘‘दिलो कि रे प्रसाद सकाळीच. त्या प्रसादामुळेच सगळे वाचले, आणखी दुसरा प्रसाद कशाला?’’ प्रसाद होता म्हणूनच सर्वजण वाचले – श्रीजींचे हे उद्गार ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘योगक्षेमं वहामि अहम्‌’ परमेश्वराच्या या वचनाचे स्मरण झाले. आम्ही भक्त कितीही गाफिल असलो तरी अमचा तो सद्गुरु सतत आमच्या योगक्षेमाची चिंता वाहत असतो यात मुळीच शंका नही.

‘रात्री इथेच मुक्काम करून सकाळी जा’ श्रीजींनी सांगितले त्यानुसार आम्ही सर्वजण त्या दिवशी राहून दुसरया दिवशी श्रीजींचे दर्शन व आज्ञा घेऊन परत घरी आलो.

प्रभुंच्या कृपेची व त्यांच्या आर्शीवादाची माझ्या जीवनात अनेकदा प्रचीती आली आहे.नव्हे नव्हे तर माझ जीवनच त्यांच्यामुळेच आहे. आमच्या श्वासत सुद्धा प्रभूच आहेत. ज्याप्रमाणे प्रभूंनी मला जवळ केलं त्याच प्रमाणे माझ्या पिढ्यानपिढ्या प्रभुचरणांच्या सेवेत रहावेत हीच माझी प्रार्थना आहे.